काय घडे अवगत - उचलला हारा हारखलं मन भार...

विकिस्रोत कडून

उचलला हारा

हारखलं मन भारी

निजला हार्‍यांत

तान्हा माझा शरीहांरी

डोक्यावर हारा

वाट मयाची धरली

भंवयाचा मया

आंब्याखाले उतरली

उतारला हारा

हालकलं माझं मन

निजला हार्‍यांत

माझा तानका 'सोपान'

लागली कामाले

उसामधी धरे बारे

उसाच्या पानाचे

हातींपायीं लागे चरे

ऐकूं ये आरायी

धांवा धांवा घात झाला !

अरे, धांवा लव्हकरी

आंब्याखाले नाग आला

तठे धांवत धांवत

आली उभी धांववर

काय घडे आवगत

कायजांत चरचर

फना उभारत नाग

व्हता त्याच्यामधीं दंग

हारा उपडा पाडूनी

तान्हं खेये नागासंग

हात जोडते नागोबा

माझं वांचव रे तान्हं

अरे, नको देऊं डंख

तुले शंकराचा आन

आतां वाजव वाजव

बालकिस्ना तुझा पोवा

सांग सांग नागोबाले

माझा आयकरे धांवा

तेवढ्यांत नाल्याकडे

ढोरक्याचा पोवा वाजे

त्याच्या सूराच्या रोखानं

नाग गेला वजेवजे

तव्हां आली आंब्याखाले

उचललं तानक्याले

फुकीसनी दोन्हीं कान

मुके कितीक घेतले

देव माझा रे नागोबा

नहीं तान्ह्याले चावला

सोता व्हयीसनी तान्हा

माझ्या तान्ह्याशीं खेयला

कधीं भेटशीन तव्हां

व्हतील रे भेटी गांठी

येत्या नागपंचमीले

आणीन दुधाची वाटी


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.