कथाली/प्रस्तावना

विकिस्रोत कडून
प्रस्तावना


 साहित्य प्रवासास शुभेच्छा - शुभास्ते सन्तु पंथानः ।
 प्राचार्या डॉ. शैला (भाभी) लोहिया या सिद्धहस्त लेखिका आहेत. त्यांनी कविता आणि कथा या वाङ्मय प्रकारात प्राधान्याने साहित्य निर्मिती केली आहे. जमिनीत पेरलेले बियाणे जसे स्वाभाविकपणे, सहजपणे, नैसर्गिकतेने आपले रूपं प्रकट करते तशाच स्वाभाविकपणे त्यांच्या साहित्याची निर्मिती होते.
 शैलाभाभींच्या साहित्याला वास्तवाचा भक्कम आधार असतो. अनेकदा हे वास्तव म्हणजे सामाजिक, कौटुंबिक अत्याचाराने घेतलेले भीषण रूप असते. त्यामुळे या वास्तवाचे यथार्थ चित्रण, कलेचा बाज बिघडू न देता त्यांच्या साहित्यातून व्यक्त होताना दिसतो. बहुतेक कथा स्त्रीवादी साहित्य आहेत,
 प्राचार्या सौ. शैलाभाभींचा प्रस्तुत कथासंग्रह या उपरोक्त सत्याचे ज्वलंत दर्शन घडवितो. बहुतेक कथा उपेक्षित स्त्रियांच्या जीवनातील विदारक व्यथा आहेत. 'मला बी साळंला येऊ द्या की...' या कथेतील मेहतर समाजातील शबरी असो वा 'कुंकवाला आधार मेणाचा' मधली बारकूबाई असो. या कथा स्त्रीजीवनातील असहाय्य, अगतिक, दुःखद जीवनाचे दर्शन घडवितात. 'स्फोट' या कथेत एका साखर कारखान्याच्या अध्यक्षाची क्रूरता शब्दबद्ध झाली आहे. प्रतिष्ठेच्या मुर्ख कल्पनेच्या आहारी गेल्याने तो आपल्या बहिणीचा निघृणपणे खून करतो, पत्नीस मोलकरणीपेक्षाही हीन दर्जाने वागवितो. मारहाण नित्याचाच प्रसंग. स्वत:च्या मुलीचीही हत्या करू पाहतो, सहनशीलतेलाही एक मर्यादा असतो. कधी तरी स्फोट होणारच. त्याची बायकोच गुप्तीने नवऱ्याच्या पाठीवर सपासप वार करते. हे आवश्यकच आहे.
 स्त्रियांना आत्मभान आले पाहिजे. त्या निर्भय झाल्या पाहिजेत. भाभींचा 'मनस्विनी' प्रकल्प हे काम गेली अनेक वर्षे निष्ठेने, समर्पक वृत्तीने करीत आहे. या कामातूनच लेखिकेला साहित्य निर्मितीचे रॉ मटेरिअल मिळाले असावे.
 काही कथा पांढरपेशा जीवनातील स्त्रियांचे भावविश्व चित्रित करतात. उदा. 'स्कूटरचोर मुलगी' 'झ्शा', 'मैत्र' मध्ये एक समाज सेवेस वाहून घेतलेली तरुणी 'मीनू' तिचा मित्र असाच सेवेस वाहून घेतलेला सदू यांचे भावविश्व नाजूकपणे चित्रित झाले आहे. कथेच्या शेवटातून या कथेचा रोख कळतो. संवादात्मकता आणि ग्रामीण भाषेतून वातावरणनिर्मिती केल्याने कथेतील ग्रामीण वास्तव डोळ्यासमोर उभे राहते. मारवाडी - राजस्थानी भाषेचा वापरही अशाच कौशल्याने झाला आहे. 'गेंदलासु गोद भराओ जी बन्ना' या कथेतही याचा प्रत्यय येतो. गीताने रंजकता वाढली आहे.
 डॉ. सौ. शैला (भाभी) लोहिया या समाजसेवेस वाहून घेतलेल्या, सुविद्य, संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांच्या व्यापक, सहानुभूतीपूर्ण अवलोकनातून दिसलेले समाजदर्शन त्या समर्थपणे आपल्या साहित्यातून घडवितात. हा कथासंग्रह त्याची बोलकी साक्ष आहे.
 यंदाच्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कथा हा गौण वाङ्मय प्रकार आहे' या विषयावर परिसंवाद झाला. तो किती व्यर्थ, अनावश्यक होता याचे प्रत्यंतर जी. ए. ते भाभीपर्यंतच्या कथाकारांच्या कथा देत आहेत. मराठी साहित्यांचे दालन अनेक नामवंत कथाकारांनी समृद्ध केले. जागतिक वाङ्मयात कथेला मानाचे स्थान आहे.
 प्राचार्या डॉ. सौ. शैला (भाभी) लोहिया यांना माझ्या पुढील साहित्य प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रा. रा. द. अरगडे