आपले आभाळ पेलताना/हरेक वेदनेचा रंग वेगळा

विकिस्रोत कडून

हरेक वेदनेचा रंग वेगळा


 स्त्रीच्या असहायतेचे रूप अनेक रंगी नि. अनेक तऱ्हेचे असते. शोभादर्शक यंत्राला जरासा धक्का लागला की आतली आकृती अगदी नवे रूप घेते. जे यापूर्वीही नव्हते नि पुढेही नसेल असे. अगदी तसेच बाईच्या 'बाईपाणा' तून येणाऱ्या दुःखाचे, वेदनेचे, असहायतेचे रूप आहे. प्रत्येक प्रश्नाचा पोत वेगळा नि रंगही वेगळा.

 मला आठवते तशी ही अनेक विविध रूपे माझ्या मनावर नकळत गोंदली गेली..... मीरा सारळकर, सुरेल आवाजात गाणारी. तिच्या गाण्याचा केवढा दिमाख असायचा, वार्षिक स्नेहसंमेलनात आमचे गायनाचे सर मोठ्या अभिमानाने तिला तबल्याची साथ करायचे. जणू त्यांची नजर म्हणत असायची, पाहा कशी तयार केलीय मी ही शिष्या. पण तिचे लग्न ठरले ते एका गावातल्या औरंगजेबाशी. तिचा तंबोरा माहेरी धूळ खात पडलाय. आणि ती ? तिच्या 'साहेबांच्या' प्रचंड घरातल्या शो-पीससारखी , सूरं हरवून जगतेय, आणि शकू? आम्ही मॅट्रिकला असतानाच तिचे लग्न ठरले. मार्चमध्ये परीक्षा नि लग्नाचा मुहूर्त फेब्रुवारीत. शकू गणित आणि सायन्स मध्ये भलती पक्की जणू जिभेवर आकडे नाचायचे आणि केमेस्ट्रीतील तापदायक समीकरणंही ! पण 'आपले लग्न थोडे पुढे ढकला' असे सांगण्याची हिंमत ती कुठून आणणार? गेली पस्तीस वर्षे ती उसने हसू ओठांवर घोळवीत आणि पक्क्या गणिताच्या विलक्षण गोड कथा आपल्या मुला-नातवांना सांगत सुव्यवस्थितपणे संसार करतेय.

 मला नेहमी प्रश्न पडतो. अशा लाखो स्त्रियांच्या फुलण्याआधीच कोमावलेल्या गुणांचा, कलाशक्तीचा, बुध्दिमतेचा साठा किती मोठा असेल बरं? त्याचा स्फोट कधीच होणार नाही काय?

 खरे तर आम्ही स्वत:सुध्दा स्वतःला मुरड घालतच जगत असतो! आमच्या शिबिरात आम्ही एकदा चर्चा केली. ती अशी, की आपल्याला. स्वत:लाही आपल्याच पतिराजांकडून कशी अन्यायकारक वागणूक मिळते. सुरुवातीला सगळ्याजाणी जरा बोलायला बिचकतात. पण एकदा का मात्र झाकणे उघडली गेली नि ----
एकीने सांगितले ते असे-

 आपले पुरोगामी म्हाणवणारे पतिराजसुध्दा कही कधी विचित्र वागतात. एकदा आमच्या शेतातला सालदारा ह्यांच्याशी बोलत होता. दोघांचेही आवाज थोडे चढले. सालदाराने सकाळीच माझ्या कानावर त्याची अडचण सांगितली होती. म्हणून मी बाहेर येऊन त्यांना समजावू लागले तर त्यांनी चक्क आवाज चढवला. बाहेर का आलीस तू? बायकांचं काय काम आहे इथं? आम्ही आमचं पाहून घेऊ. तू पहिले आत जा. वाटलं, माझ्यावर वीज पडतेय. पण गप्प बसले नि आत गेले. आत माझी कॉलेजला जाणारी मुलगी होती. तिचेच डोळे भरून आले होते. माझा हात हातात घेऊन ती म्हणाली, "कभी कभी पिताजी कितना अन्याय करते है तुमपर माँ ! कैसे सहेती है तू?" हा झाला एका उच्च विद्याविभूषित कार्यकर्तीचा अनुभव. तर, दुसरा आमच्या सयाबाईचा ती म्हणाली, आमी मांग हाव. आमच्यात पुरुष बायकोला मारतातच. न्हाय मारलं तर त्याला बाईलवेडा म्हणतात. आमचे मालक बी उगा मारायचे. काराण नाय की काय नाय. मजुराला जशी हप्त्याला हजेरी मिळते, तसा मला मार मिळायचा. पन जवापासून ते संवस्थेत काम कराया लागले तवापासन मार बंद झाला. मग मीच इचारलं - आताशा मार न्हाई काई न्हाई. तुमचं मन दुसरीवर तर न्हाई बसलं ? तवा म्हनाले "येडी का काय तू ? बाई बी माणूस हाय. ती काय जनावर हाय? जनावरावर प्रेम करतो आपण. मग लाग्नाच्या बायकोला मार कशापायी द्यायचा? " माइया नावानं बँकेत पैसे बी ठिवलेत आता त्यांनी.

 गेल्या ३० वर्षात कितीतरी जणी मला भेटल्या. त्यांच्या नकळत त्यांचे अनुभव मी माइया पदरात भरुन घेत होते. त्यातूनच १९८४ साली मानवलोकसंचलित 'मनस्विनी महिला प्रकल्पा'चा जन्म झाला.

 'मानवलोक' या स्वयंसेवी संस्थेची आधारशिला राष्ट्र सेवादल. विकेंद्रित लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय या तत्त्वांवर श्रध्दा ठेवून राष्ट्रप्रेमाची शिकवण देणाऱ्या, लहान मुले व तरुण यावर संस्कार करणाऱ्या राष्ट्रसेवा दलाने महाराष्ट्रात हजारो धडपडणारी मुले निर्माण केली. अनेक घरे सेवादलमय केली. अशाच एका घरात मी वाढले. बाईचे माणूसपण आमच्या घरात स्वयंभूपणे मान्य केलेले होते. राष्ट्रसेवा दलाचे भाऊ रानडे धुळ्याच्या घरी नेहमी येत. लहानपणी
भाऊंबरोबर खेड्यात जायचा योग आला. सभेला एकही बाई नाही. भाऊ म्हाणाले, "महिला नसलेल्या सभेत मी बोलाणार नाही." मग झाली सुरु चुळबूळ. एखादा तरुण असं काही बोलला असता तर खैर नव्हती. बोलणारा, म्हातारा पांढरे केस नि टक्कलवाला. डोळ्यातून नितांत माया वाहणारी. मग कुणीतरी एका वयस्क बाईला, एका आईला आणून बसवले नि सभा सुरू झाली. तर अशा या वातावरणात वाढताना समाजाकडे कुतुहलाने पाहण्याची नजर आपोआप आली. डॉ. व्दारकादास लोहिया १२ व्या वर्षांपासून सेवा दल संस्कारांनी भारलेले, घडलेले. पाठीवर मायेचा हात दादांचा ऊर्फ नारायणराव काळदातेंचा आणि श्री. किंबहुने गुरुजी, ग.धो.देशपांडे या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांचा. साथीला जुना सेवा दलाचा संच. नव्या दमाच्या परिवर्तनवादी तरुणांची नवी जोड मिळाली. आणि अशा पारिवारिक वातावराणातूनच 'मानवलोक' आकाराला आले.

 संस्था सुरू करतानाच मनाशी खूणगाठ बांधली होती की, एकाने संस्थेसाठी पूर्णवेळ द्यायचा. दुसऱ्याने भाकरीची सोय पाहायची. १९७४ ते ८० पर्यंत हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाची एक शाखा म्हणून काम केले. या फांदीला नवी पालवी फुटू लागली. आणि १९८२ ला या फांदीतूनच 'मानवलोक' ऊर्फ मराठवाडा नवनिर्माण लोकायत निर्माण झाले. १९७४ ते ८२ या आठ वर्षात माझे घर मला बांधून ठेवण्याइतके चिमणे राहिले नव्हते. 'मानवलोक' च्या कामात मलाही आस्था होती. हे काम करताना असे लक्षात आले की, भाऊ रानडेंच्या काळातले खेडे अजूनही आहे तसेच होते. स्त्रियांचे जीवन जणू अडथळ्यांची शर्यत. आणि ती त्यांना अगदी नैसर्गिक वाटते. डोंगरभागात काम सुरू केले. तिथे मुलांचे रातांधळेपणाचे प्रमाण ६ टक्के होते. नारू होता, घाण, माशा, डास यांचे थैमान. दरसाली पाच-सहा बायका बाळंतपणात मरत. बाई अडली तर दवाखाना चार कोस दूर. रस्ता नाही. अल्पभूधारकांची संख्या जास्त. दोन-पाच एकर जमीन. तीही कोरडवाहू. पाऊसबाबा धडपाणी आला; तर पहिले पीक घेऊन गावातील साठ टक्के माणूस पुण्या-मुंबईकडे वा साखर कारखान्याकडे धाव घेई. मग त्यातून होणारे बायका-मुलांचे हाल. हे सारे जवळून पाहिले नि मानवलोकने ठरवले की, स्त्रियांच्यासाठी काम सुरू करायचे. ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय कामाची आखणी कशी करणार? मग त्याला सुरुवात झाली. प्रत्येक गावात एखादा आड वा डोह असे. ज्यातील आसस
तरुण सुनांचा बळी घेत. आणि एखादा पिंपळ असे , ज्यावरच्या मुंजाला तरणीताठी बाई बळी म्हणून हवी असे. शिवाय अंगावर चिमणी पडून भाजून मरणाऱ्यांची संख्याही बरीच. हे सारे समजावून घेताना असे मनोमन वाटले की, अडचणीत आलेल्या बाईला 'दिलासा' देणारे घर लाभले तर आसरा-नि मुंजाचा जोर थोडा कमी होईल. १९८३ मध्ये पुणे येथे कार्यालय असलेल्या तेरे डेस होम्स,जर्मनी या संस्थेने निलंग्यात महिला जागृती शिबीर:अयोजित केले होते. तिथे माझ्यावर जबाबदारी सोपविली होती ती भारतीय इतिहासातील स्त्री जीवनाचा आढावा घेण्याची. त्यातून या संस्थेशी नाते जुळले. माझ्या मनातली ओढ आणि मानवलोक संस्थेतील शिस्तबध्दता यांची तेरे डेस होम्सच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली.

 आणि आम्ही महिलांसाठी प्रकल्प सुरु करावा असा आग्रह केला. इन्ग्रीड मेंडोसा, उषा आठल्ये सांच्या सहयोगातून 'मनस्विनी' अवतरली. मी त्या काळात महाभारताने भारलेले होते. इरावती कर्व्यांचे 'युगान्त', दुर्गाबाई भागवतांचे 'व्यासपर्व', आनंद साधल्यांचे 'हा जरा नावाचा इतिहास',याचा अभ्यास सुरू होता. आणि त्या प्रवासातच 'मनस्विनी' भेटली. महर्षी व्यासांनी द्रौपदीचे माणूसपण भाविनी, मनस्विनी, अग्नी कन्ये या शब्दांतून व्यक्त केले होते. त्या सुमारास स्त्रीच्या देहालाच मोजणाऱ्या समाजाचे चित्र रेखाटणारी 'देहस्विनी' ही माझी कथा 'मेनका' मासिकातून प्रकाशित झाली होती. स्त्रीचे केवळ देहस्विनीपण नाकारण्याचा तो एक प्रयत्न होता, आणि त्यातून 'मनस्विनी' चे ऊर्जस्वल व्यक्तिमत्त्व मनात साकारले. हे नांव सर्वानाच भावले. आणि १ एप्रिल १९८४ ला 'मानवलोक' संस्थेचा महिलासाठी काम करणारा विभाग म्हणून 'मनस्विनी महिला प्रकल्प' ची सुरुवात झाली. प्रकल्पाचा आराखडा तयार करणे तसे सोपे नसते. मनातल्या कल्पनांचे पाय जमिनीत ठामपणे उभे करायचे असतात. त्यासाठी प्रकल्पाचा हेतू, उदिष्टे ती साध्य करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा स्वीकार करणार या बाबींचा डोळसपणे विचार करावा लागतो. तेही एक शास्त्र आहे. त्या शास्त्राची ओळख करुन घेतली.

 अडचणीत आलेल्या स्त्रीला अर्ध्या रात्री आधार देणारे 'दिलासा घर' सुरु झाले. महिलांचा प्रतिसाद मिळाला. अवघ्या एका वर्षात लक्षात आले की, दिलासात येणारी बाई लेकुरवाळीही असू शकते. तिच्या मुलांनाही आम्ही दिलासा घरात प्रवेश दिला. 'दिलासा' चे घरपण सुधडपणे सांभाळणाऱ्या गंगामावशी ऊर्फ मम्मी बायकांचे माहेरपण करीत. पोरांच्या आजी होत. गेल्या अकरा वर्षात सुमारे २०० हून अधिक महिला दिलासात राहून गेल्या. बहुतेक महिला खेड्यातून येणाऱ्या. अनेकजणी चक्क निरक्षर असत. मग तिथेच त्यांच्यासाठी साक्षरता वर्ग सुरु केला. या महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी, त्यांचे शिक्षण व आवड लक्षात घेऊन प्रशिक्षण देणारा विभाग सुरु केला. त्यात अशिक्षित महिलांना सहजपणे करता येणारे उद्योग शिकविले जातं. घायपाताच्या तंतूच्या शोभिवंत आणि गरजेच्या वस्तू करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबादहून शिक्षिका बोलावली. शिवणकाम, आरशाचे पारंपारिक भरतकाम, पापड, मसाले इ.चे प्रशिक्षण दिले जाई. मी पुण्या-मुंबईकडे बैठका वा मेळाव्यांना गेले की, चर्चा ऐकू येई. अपारंपारीक उद्योग मुलींना शिकवायला हवेत. किती दिवस माणसांनी लोणच्यात बुडायचे, वगैरे. मनाला ते पटत असे. पण लहान गावात अपारंपारिक उद्योगांना विशेष वाव नसे. आम्हीही प्रयोग केले. सायकलचे पंक्चर काढणे, स्टोव्ह दुरुस्ती, इलेक्ट्रिक फिटिंग, विटेला वीट जोडणारे गवंडीकाम इ. व्यवसाय शिकण्याची मोहीम सुरू केली. कारण आमच्या डोक्यात "बाया माणसाची कामे व गडी माणसाची कामे" यांचे विभाजन फिट्ट बसलेले. मग आम्ही एक जोड दिला, तो असा की, शिवण्याच्या कामात स्टोव्ह दुरुस्ती, पंक्चर काढणे, इलेक्ट्रिक फिटिंग यांचा समावेश केला. मुली हे नवे व्यवसाय उत्साहाने शिकत. स्टोव्ह दुरुस्ती, खडू तयार करणे याचा त्यांना पुढे उपयोग झाला. पण सायकल नि इलेक्ट्रिसिटी यांचे नाते महिलांशी असू शकते याला मान्यता मिळाली नाही. आमची खेडी एखाद्या उठावदार शहराजवळ असती तर कदाचित एखाद्या टी.व्ही. वा रेडिओच्या कारखान्यातील जुळणीची कामे बायका करु शकल्या असत्या.

 दिलासा घरातील महिलांना सन्मानाने घरी परत जाता यावे, ते शक्य नसल्यास पोटगी व संपत्तीत अधिकार मिळावा या हेतूने मोफत कायदा व कुटुंब सल्ला दिला जाई. दोन वर्षाच्या अनुभवावरून असे लक्षात येते की, अशा तऱ्हेची मदत समाजातील अनेकजणींना हवी असते. कोर्टाची व वकिलाची फी देण्याची ऐपत घरातून हाकलून दिलेल्या बाईला कशी असणार? खेड्यापाड्यातून हिंडताना, बापभावाच्या घरात दिल्या अन्नावर जगण्याऱ्या परित्यक्ता भेटत. दिलासा घरात राहायला येणे त्यांच्यां बापभावांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असे. ती हिंमत त्या कशी करणार? उलट त्यांचे जगणे अधिक दुःखमय. या अनुभवातून १९८६ च्या जुलैत मोफत कायदा सल्ला केंद्र उभे राहिले. या केंद्राला मात्र समाजाच्या प्रत्येक थरातून प्रतिसाद मिळाला. दाखल होणाऱ्या प्रत्येक केसचा आम्ही अभ्यास करत असू. केस कोर्टात दाखल करण्यापूर्वी आम्ही सासरच्यांची नवऱ्याची बाजू ऐकण्याच्या भूमिकेतून त्यांना पत्र पाठवायचे. ७० टक्के लोक प्रतिसाद देत. त्यांच्याशी बोलताना प्रकरणाचा उलगडा होई. शेवटी प्रश्न माणसाचेच. रूढी, परंपरा, धार्मिक रिवाज, संस्कार यांच्यात हरवलेले माणूसपण वर काढण्यात कधी यश येई. मग पुन्हा एकदा पती-पत्नीचे सूर जुळून येत. हे यश न आले, हा ग्रहाचा धूर हरवता आला नाही तर मग कोर्टात जाणे आलेच.

 या एकाकी महिलांना केवळ आधार व प्रशिक्षण देण्याइतकेच मानसिक बळ देण्यावर आम्ही भर दिला. तिच्यातील आत्मविश्वास वाढावा; एकट्या स्त्रीलाही जीवनातील सौंदर्य, आनंद अनुभवता येतो याची प्रचीती यावी यासाठी आम्ही विविध उपक्रम आखीत असू. पंचमीचे फेर, ईदमिलापचा महिला मेळा, नवरात्रातील टिपऱ्याचा फेर, उखाण्याच्या स्पर्धा, नवी गाणी, पथनाट्ये, सहली इ.तून बायका धीट होत. आपले एकटेपणाचे आधुरेपण विसरून आपण सगळ्याजणी एक आहोत, मैत्रिणी आहोत याची जाणीव त्यांना होई. पाहाता पाहाता कळंब, बीड, माजलगाव, सेलू, केज येथे मोफत कायदा सल्ला केंद्रे सुरु झाली. अर्थात त्या गावातील गट उत्साही असेल तर केंद्र चांगले चाले. एक केंद्र आम्ही बंद केले. आज पाच केंद्रे सुव्यवस्थितपणे सुरु आहेत.गेल्या नऊ वर्षात सुमारे पाच हजार प्रकरणे नोंदवली गेली. त्यातील अनेकजणी स्वत:चा छोटा व्यवसाय करीत आहेत. बालवाडी शिक्षिका, आरोग्यासेविका म्हणून काम करीत आहेत.

 अगदी पहिल्यांदा आलेली कन्या कांता भाज्याच्या बालग्रामची 'सदनमाता' म्हणून काम पाहाते. या संस्थेची स्थापना करण्यात तिची महत्त्वाची भूमिका असल्याने ती कार्यकारिणीची सदस्यां आहे. दिलासात आली तेव्हाचा अवतार आजही आठवतो.....धुळीने माखलेले नऊवारी बिनकाष्ट्याचे लुगडे. उभा आडवा ताठर बांधा, राकट बोलणे, अडुम धुडूम चालणे. "आन मंग? उगा हाय का ह्यो देह? माज्या नोवऱ्यानं पलंगाच्या गजाळीनं मारलं. पन म्या हूं की चूं केलं न्हाय. मार म्हाणलं, तुझा जीव शांत होइस्तो मार. माज्या सासूलाच कीव आली. तिनंच हितं भैणीकडं आणून घातलं. बाईच बाईचा जीव जाणणार...!!.." हे ती झोकात सांगत असे. कांता दिलासा घरात राहायला आली तेव्हा आपल्याला कोर्टातून न्याय मिळेल, धुण्याभांड्यापलिकडची नोकरी मिळेल असा विश्वास तिला वाटत नव्हतां. दिलासा घरात आल्यापासून जीवनाकडे पाहाण्याचा तिचा दृष्टिकोन बदलत गेला. ती होमगार्ड झाली. तिथे सर्वोत्कृष्ट रक्षिका म्हणून ख्याती झाली. कांताला कोर्टातून न्याय मिळाला. ही निर्मळ मनाची. मनमोकळी. परवाच कांताचे स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र आलेय. ती केवळ साक्षार नाही तर सुजाण डोळस झाली आहे. कांताच्या नावानं चार पैसे बँकेत आहेत. मध्यंतरी भेटायला आली तेव्हा कांताला मी सहज म्हटले . "कांता तरुण आहेस. लग्न करायचं काय ? द्यायची का जाहिरात? तिचे उत्तर असे.

 "भाभी, एका बुरकुल्यात शिजलं नाही ते दुसऱ्या बुरकुल्यात शिजेलच यांची कोन ग्यारंटी देणार? हाय ती वरी हाय. काय कमी हाय मला? पोटच्याची माय तर कुणीबी होईल पण दुसऱ्याच्या लेकराची माय होनबी महत्वाच असतंच की !! " या कांता कुंभारणीने जे शहाणपण शिकविले ते कोणता वेद शिकवील?

 अशा अनेक कांता, लता, भागिरथी, शांता, सत्यशीला, पंचफुला, मंगला, सुलताना, ग्रेस.... अनेकजणी.

 हातात सहा महिन्याची प्रीती नि एक जुनकट पर्स एवढच समान.

 " ताई मी ग्रॅज्युएट आहे. मला एम.ए. करायचं" एवढच बडबडणारी सुधा. एका मध्यमवर्गीय शिक्षित घरात जन्माला आलेली सुधा एका विज्ञान विषयाच्या प्राध्यापकाची पत्नी आहे. पाठोपाठ चार मुलींना जन्म दिला हाच तिचा दोष. सततची मारहाण. माहेरी होणारी कुचंबणा. यामुळे तिचे मन जणू बधिरले होते. प्राध्यापकाशी सततचा संपर्क साधल्यानंतर महोदय संस्थेत आले. गृहस्थ स्वभावाने गरीब. त्यांच्या काही तक्रारी होत्या. सुधा गबाळी राहाते, मुलींना स्वच्छ ठेवत नाही. जेवणात केस निघतात मुलीच्या

 अभ्यासात लक्ष देत नाही...वगैरे, वगैरे. पण दोघांच्याही तक्रारी फारशा भयानक नव्हत्या. मारहाण होत नव्हती. पण शिव्या दिल्या जात हेही दोघांनी कबूल केले. मुलीच्या भवितव्याचा विचार उभयतांनी केला. गेल्या नऊ वर्षांपासून सुधा संसार करते आहे. कदाचित ती खूप सुखात नसेलही. पण तिने आणि नवऱ्याने त्यांचे तडकलेले घर सांधण्यासाठी स्वत:चे काही
आग्रह सोडले आहेत.

 "..... माझ्या मामाला इथल्या मोठ्या दवाखान्यात ठेवलं होतं. त्याच्या जवळ कोणीतरी हवं म्हणून मला हितं ठेवलं, माज्या बापानी. तेबी यायचे रोज संध्याकाळी. मी कपडे धुवाया जवळच्या तळ्यावर रोज जायची. तिथच ती बाई भेटली मला. म्हणाली, तू तराणीताठी पोर, इंथं कशाला धुणं धुतीस. माज्या घरी चल. तिथंच आंघूळ करीत जा नि कपडे बी धूत जा. बकूळ पानी, हाय. मला बरी वाटली बाई, बामणासारखं राहणं नि बोलणं. मग जायला लागले तिथे. जेवू बी लागले. कंदी कंदी मुक्काम पन करु लागले. बापाला सांगितलं की चांगली मावशी भेटलीय. लयी माया करायची माझ्यावर. तिनंच माझ्या केसांची सागरवेणी घालायला शिकवली. मॅक्सी शिवली. पंजाबी ड्रेस घेतला. एक दिवस मामाकडे गेलेच न्हाई.बाईजीकडेच राहिले. तिथे रात्री तरुण पोरं येत. मजा करत. व्हिडिओ बघत. चार पाच पोरी पन येत. एक दिवस मी बी एका पोरासंग खोलीत गेले. बाहेरून बायजीनं दार लावून घेतलं..." ती गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमधली नखरेल मुलगी बोलत होती. मी सुन्न होऊन ऐकत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी तिची त्या घरातून सुटका केली होती. काही कार्यवाही न्यायालयातून व्हायची असल्याने व इथे महिलांसाठी कस्टडी नसल्याने तिला दोन दिवस 'दिलासा'त ठेवले. पण त्या दोन दिवसात लक्षात आले की ती पंधराच्या उंबरठ्यावरची पोर गळ्यागत बुडली होती. वैद्यकीय तपासणीतून लक्षात आले की नको ते रोगही जडले असावेत. दोन दिवसात इथे खूप रमली. बापाचा पत्ता देऊन म्हणाली की, त्याना बोलवा. पहावसं वाटतंय. पोलीस नियमानुसार तिला औरंगाबादला घेऊन गेले. सुधारगृहात ठेवले. पण एक दिवस बाई दिलासात हजर. तिला आमच्याजवळ राहायचे होते. पण ती चार दिवसापेक्षा एक दिवसही इथे राहू शकली नाही. संध्याकाळ झाली की तिचे डोळे लकाकू लागत. टग्या पोरांच्या फेऱ्या आसपास वाढल्या. इथली शिस्त तिला मानवेना. शेवटी तिची रवानगी परत पोलिस स्टेशनमध्ये केली आणि मनाची एक खिडकी बंद करुन घेतली. नंतर चारच दिवसांनी तिचे वयस्क वडील काठी टेकीत संस्थेत आले. ही त्याची सर्वात धाकटी लेक. आई तान्हेपणीच वारली.अति लाडामुळे शाळेत गेली नाही. घरात भाऊ-भावजया. घरी काम नाही की अभ्यास नाही. वाढत्या वयात मायेची पाखर न मिळाल्याने ती बेफाम बनत गेली. मामाच्या आजारपणाच्या निमित्ताने शहरात आली, तिथून पळून गेली.

 "बाई, तुमचं कारड मिळालं. वाटल लेकरू डोळ्यांनी बघावं. ती काई वळणावर येण्यातली राहिली नाही. तिच्या भावांना न सांगता झालोय मी. पण भेट नसिबात नाही. चिमणीचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं की त्याला पुन्ना घरट्यात घेत नाहीत...." बोलता बोलता म्हाताऱ्याचा आवाज घुसमटून गेला.

 अनेकजणी आल्या. पण या पोरीची आठवण झाली की मन आतल्या आत चिरत जातं. आपल्या मर्यादा खुपायला लागतात.

 हे काम खूपदा चटकेही देते. आपल्या आसपासची, सहकारी जनांच्या घरची प्रकरणे हाताळतांना जवळच्यांची नाराजी पत्करावी लागते. द्वेशही सहन करावा लागतो. घरच्या मुलांना, कार्यकर्त्या मुलींना त्रास सहन करावा लागतो. पण या टोचत्या उन्हातही एक हलकीशी सरही सरसरून जाते. जेव्हा ती मदत केलेली महिला चोरुन भेटते नि हात घट्ट धरुन सांगते, "ताई, लई उपकार वाटून घेतलेत हो. माज्या लेकरासाठी जिवंत राहायचं बळ दिलंत." अशा प्रसंगातून कर्ते सुधारक आणि बोलके सुधारक यांचेही दर्शन घडते.

 शांता तीन मुलांची आई. लोकसतेतील मधुवंती सप्रेचा लेख वाचून, तिचे पोस्टातील बंधू संस्थेत आले. तिच्या दोनही मुलांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शांता शिवाणकाम, खडू, निर्धुर चुली बनविण्याचे तंत्र शिकली. इंग्रजीचा अभ्यास मन लावून करी. ती आज स्वत:च्या पायावर सन्मानाने उभी आहे. मुलंही मोठी झाली आहेत. पण तिने टाकलेला प्रश्न अजूनही सतावतो.

 .... ताई,नवऱ्याला जशी बायको लागते, तसा बाईलाही नवरा हवासा वाटतोच की तुमीच म्हणता ना की बाई माणूस आहे.?... - या प्रश्नासाठी कोणते उत्तर आहे आमच्याकडे?

 ... हरिणीच्या डोळ्यांची, आदबशीर वागणारी वंदना अवघी पंचविशीतील पोर. दोन मुलग्यांची आई. अठरा हजार हुंडा नि दोहो अंगानी खर्च देऊन हिचे लग्न भरपूर पाणथळाची शेती असलेल्या अडाणी पाणथळाशी लाऊन दिले. दीर इंजिनिअर, सरकारी नोकर. शेतीत कष्ट करणारा हिचा नवरा आणि माल वविकणार दीर. हिने एका वहीत हिशेब ठेवला. तो असा. दोनशे पोती हायब्रीड, पन्नास पोती तूर, चाळीस क्विंटल कापूस... आणि किंमत? दादांना
माहीत. ही वही दिराच्या हाती पडली.आणि तिची रवानगी माहेरी झाली. सहा महिने झाले तरी न्यायला कोणी आले नाही म्हणून ही सासरी आली पाण तिला घरात घेतले नाही. बारा दिवस रस्त्यावर नि शेजारच्या ओट्यावर काढले. 'भूमिकन्या मंडळा' च्या बैठतीस ती आली असल्याने संस्थेत आपाणहून आली. आज जेवण्याच्या डब्यांचा व्यवसाय करणारी वंदना स्वयंसिध्दपणे उभी आहे. दोन खोल्याच्या स्वत:च्या घरात सन्मानाने राहाते आहे. ती गोकुळला वकील करणार आहे तिन अर्जुनला भ्रष्टाचार न करणारा इंजिनियर बनवायचे आहे. कमल आपल्या अंपंग अंगदला बारावीनंतर दुकान घालून देणार आहे. शालन आपल्या मनीषाला नर्सिंगला घालाणार होती पण चांगला मुलगा सांगून आला. त्याने बारावी पास झालेल्या मनीला मागणी घातली. पुढे शिकवणार आहे. शालनची बालवाडी सुरु आहे.

 ...अशा या अनेकजणी. अवघ्या पंचविशीत आयुष्याचे धिंडवडे होतांना आतल्या आंत करपणाऱ्या. पण त्यांच्या मनांतही इवलीशी स्वप्ने आहेत. आपली स्वप्ने साकार करण्याची उमेद त्यांना देण्याची शक्ती आहे समाजाजवळ? किंवा संस्थेजवळ?

 शारदाच्या नवऱ्याने पत्नीला स्वत:च्या व्यसनासाठी बाजारात बसविण्याचा प्रयत्न केला. सातवीपर्यंत शिकलेली शारदा नवऱ्याने पाठविलेल्या गिऱ्हाईकाची शिकार बनली. पण दुसऱ्या क्षणी तिथून माहेरी निघून गेली. माहेरी तरी कोण होतं? विधवा आई. मग सहा महिने 'दिलासा'त होती. शारदाचा नवरा दारू प्यायला की पशू होत असे. शुध्दीवर असतांना मात्र शारदावर खूप प्रेम केले होते. त्या प्रेमाच्या आठवणी ती विसरू शकत नव्हती. भावाच्या,आईच्या रेट्यामुळे ती कोर्टात गेली. कोर्टातून काडीमोड घेतला. पण तरीही मन त्याच्यातच घुटमळत होतं. ती प्रौढ साक्षरता वर्गाची शिक्षिका झाली. आईकडे राहू लागली. एक दिवस ढगेबाईनी बातमी आणली की शारदा नवऱ्याबरोबर राहू लागली आहे! आम्ही चक्रावून गेलो. दोन चार दिवसांत शारदा स्वतः आली.

 ... "मी नवऱ्याबरोबर राहण्याचं ठरवलं आहे. त्यांनी दारू सोडलीय, नि गाव सोडून ते इथंच राहायला तयार आहेत. इथेच काहीतरी काम करतील. मी पण कष्ट करीन. त्याना पश्चात्ताप झालाय. कसं करू मी? तुमचाही धाक राहील." शारदाने सांगितले.....आणि गेले वर्षभर दोघंही सुखाने राहात
आहेत. शारदाच्या मामाच्या जोडीने नवरा रंगाच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. मेहनत करतो. आता दारुचं म्हाणाल तर ती पूर्णपणे सुटलेली नाही. कधीतरी घेतो. पण पूर्वीसारखा धिंगाणा घालत नाही.

 आता शारदाच्या बाबतीत आम्ही हरलो कि जिंकलो? खरे तर इथं हारजीत हा प्रकार नाहीच. प्रत्येक समस्या वेगळी आणि तिचं उत्तरही वेगळ. कोणत्याही पुस्तकात न सापडणारं.

 गेल्या चार-पाच वर्षात झालेल्या कामाचे एकूण मूल्यमापन एका तज्ज्ञ मित्रानी केले होते. आलेल्या स्त्रियांत बहुजन समाजाच्या स्त्रिया मोठ्या संख्येने आहेत. ब्राह्मण, मारवाडी, कोष्टी, जैन, मुस्लिम, न्हावी इत्यादी समाजातीलही आहेत. पण दलित समाजातील स्त्रिया त्या मानाने कमी आलेल्या दिसतात. संस्था या स्त्रियांपर्यंत पोचली नाही की या स्त्रियांना हे प्रश्न जाचत नाही? असा प्रश्न समोर ठाकला. प्रश्नाचं उत्तर शोधताना लक्षात आलं की, मागास समाजातल्या स्त्रिया प्रत्यक्ष दिलासा घरात राहाण्यासाठी अवघ्या चारपाचच आल्या असल्या तरी मोफत कायदा मदत केंद्रात त्या मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. मध्यमवर्गीय वातावरणातील स्त्री पुष्कळदा परावलंबी असते. त्यामुळे तिचा आधार नवऱ्याच्या घरातन बाहेर पडताच पार तुटून जातो. पण मागासवर्गातील स्त्री आर्थिकदृष्ट्या अपंग होत नाहीत. उरतो प्रश्न कायद्याच्या मदतीचा. तो घेण्यासाठी त्या येतात. परंतु स्वतः कमावत्या - रोजंदारीवर असल्याने माहेरी त्या बिनधास्तपणे राहू शकतात. शिवाय 'नवऱ्याने टाकलेली बाई' ही गोष्ट मध्यमवर्गीयांना जेवढी लपाविशी वाटते. तेवढी सर्वहारा समाजातल्या लोकांना लपवावीशी वाटत नाही.

 "नवरा म्हणतो, तुमची वस्तू डावी आहे, तरी पत्करली मी. तिला जन्मभर सांभाळायचं तर तिच्या बापानी अधुनमधून पैसा लावायलाच हवा. बायको म्हंजे वस्तू वाटते त्याला. कधीपण वापरावी नि कधीपण फेकून द्यावी. असं कसं हो?" सुनंदा तडकून विचारते. ही दिसायला खूप काळी. नवरा पुण्याला सरकारी खात्यात ड्रायव्हर आहे. ही बापाची एकूलती एक म्हणून लग्न केलं. एक मुलगाही आहे. नवऱ्याने पुण्याला दोन वेळ जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस कोर्टाच्या समन्सला याने दाद दिली नाही. पण आता मात्र समन्स त्याला पोचले आहे. आपल्याला पोटगी द्यावी
लागेल या भीतीने तो पुण्याहा गुंड घेऊन येतो. आणि सुनंदाच्या घरासमोर जाऊन शिव्या-धमक्या देतो. पोलिसाकडे दाद मागितली तर ते लक्ष देत नाहीत. साधा अर्ज दाखल करण्यासाठी कुणाची तरी चिट्ठी लागते. सुनंदा मात्र धीराने उभी आहे. आई-वडिलांच्या सहाय्याने मुलाला वाढवते आहे. मात्र भेटली की एकदा तरी विचारते.

 'भाभी, माझा मुलगा तर तो नेणार नाही ना? तेवढा माझा मला राहू द्या. मग कशालाच डरत नाही मी. कोर्ट मुलाचा ताबा तर नवऱ्याला देणार नाही ना !' काय उत्तर देणार आपण? शेवटी पोलीस आणि न्यायाधीश या समाजाचेच घटक. समाजातील वकील असोत, खोट्या साक्षी देणारे निढविलेले साक्षीदार असोत, सामाजिक न्यायदानासाठी समतोल तराजू हातात घेणारे न्यायाधीश असोत किंवा कायदा करणारे तज्ज्ञ असोत ते या समाजाचे घटक असतात.

 समाजात स्त्री विषयी जी भूमिका रुजली आहे तीच त्यांनी घेतली तर कोणी कोणाला बोल लावायचा? समाज मनातील स्त्रीचे चित्र बदलायचे असेल तर तळापर्यंत पोचायला हवे.

 समाजातील मानसिकता बदलण्याचा प्रयोग म्हाणजेच मानवलोक वा मनस्विनीसारख्या सामाजिक संघटना वा संस्था. आज परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरावे यासाठी झगडणाऱ्यांची संख्या वाढतेय.

 या ठिकाणी एक गोष्ट आठवते. जी रामशास्त्री प्रभुण्यांच्या नावाने सांगितली जाते. एक लाल-लुगड्यातली विधवा उत्तम प्रवचन करीत असे. प्रवचन ऐकावयांस रामशास्त्री आलेले पाहून तिने प्रश्न केला. शास्त्रीजी, स्त्री आणि पुरुष निसर्गत: सारखेच. जन्म सारखा, मृत्यू सारखा. अनुभव घेण्याची शक्ती सारखीच. असे असतांना स्त्रिया व पुरुषांना दुहेरी न्याय का? पती मरण पावला तर बाईला विद्रुप केले जाते. अशुभ मानले जाते पण पुरुषाची पत्नी मरण पावली तर पंधराव्या दिवशी तो दुसरा विवाह करतो असे का? शास्त्रीजी उतरले, 'बाई तुमचे म्हाणणे खरे आहे. न्याय देणारे आणि न्यायासाठी कायदे करणारे पुरुषच. एक वेळ अशी येईल, त्यावेळी तुमच्यासारख्या स्त्रिया कायदे तयार करतील. न्यायदान देण्यासाठी आसनस्थ होतील तेव्हा स्त्रियांना जरुर न्याय मिळेल.

 स्त्रीमुक्तीसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे संसार, कुटुंब नाकारणाऱ्या, मुक्त लैंगिक संबंधाची भलावणी करणाऱ्या बायका. अशी भूमिका स्वत:ला संस्कृतीरक्षक समजाणारे सोयिस्करपणे पसरवीत असतात. त्यांना काय माहीत की स्त्रीला घर हवे असते. मात्र ते शोषनमुक्त हते. जिथे स्त्रीला माणूस म्हणून सन्मान असतो, प्रगतीची संधी असते ते घर तिचेही असते.

 बाईचं 'माणूसपण' समाजाला मान्य करायला लावताना शेकडो कोस अनवाणी चालत जावे लागणार आहे. पण अनेकांचे....सुजाण स्त्री-पुरुषांचे हात जेवढे वाढतील तेवढे हे अंतर सोपे आणि जवळचे होणार आहे. भारतीय तत्वज्ञान 'आत्म्याचे अस्तित्व' मानते. मग आत्म्याला जात असते का? लिंग असते का? स्त्रीच्या सतत जाळणाऱ्या आत्म्याची कोणती सोय आम्ही लावली?

आत्मा चालला उपासी, दूरदूरच्या गावाले
माय मातीच्या कानांत, दोन सवाल पुशीले..
गांठ गांठ पदराला, वल्या वढाळ वळखी
माती मातीला मिळता, पुढं निघाली पालखी
पालखीत कोण राणा? त्याले काय रुप रंग?
कुन्या जातीचा पालव, आता डोईवर सांग...
कुकवाचं देन-घेणं, काळ्या मन्यांचा वायदा
परदेशी पराईण, तिले कोनाचा कायदा?
काया मातीची वाकळ, आता मागेच सुटली
आभाळाच्या अंतरातं, एक जखम गोंदली....


 रोज रोज मरणाऱ्या अशा कित्येक 'परदेशी पराईणी'. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताना लाखो जखमा उरात गोंदल्या जातात. निदान एकीला तरी मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून आपण साऱ्यांनी तिच्या या दोन प्रश्नांना उत्तर द्यायला बांधून घेतले पाहिजे.

 तर, अशा हजारों कहाण्यांपैकी या चार दोन. आपले आभाळ आपणच पेलण्याची उमेद त्यांच्यात निर्माण करण्याच्या एका अधुऱ्या प्रयत्नाचा... धडपडीचा. . . ध्यासाचा हा त्रोटक आढावा.