अन्वयार्थ – २/केल्याने होत आहे रे

विकिस्रोत कडून


केल्याने होत आहे रे


 १९८० मध्ये शेतीच्या प्रश्नाच्या अभ्यासाची माझी तपस्या सुरू झाली. ज्या प्रश्नाला अगदी सुरुवातीला हात लावला त्याला या महिन्यात अनपेक्षित यश मिळाले त्या आनंदात मी हे लिहीत आहे.
 गुजराथमधील भुज जिल्ह्यात नखत्राना तालुक्यात शेतकऱ्यांनी खवटपणाचा अंशही नसलेले भुईमुगाचे बियाणे तयार केले. त्याच्या गुणवत्तेबद्दल सर्वोत्तम प्रयोगशाळांनीही प्रमाणपत्रे दिली आहेत. या प्रयोगाच्या काळातच प्रचंड भूकंप झाला. पण, शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने आणि चिकाटीने काम चालू ठेवले, त्याला डॉ. बसू यांचे मार्गदर्शन लाभले आणि तयार झालेल्या भुईमुगात आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा ९० टक्के कमी खवटपणा आढळला.
 आपण ज्याला खवट दाणा म्हणतो त्यात अफ्लाटॉक्सिन् नावाचे विष असते. शंकर हलाहल प्याला तसे भारतीय हे विष पिढ्यान्पिढ्या पचवून बसले आहेत. पण, इतर देशांत या खवटपणाने पोटाचे, यकृताचे कॅन्सर होतात असे निःसंशय निदान झाले आहे. भुईमुगाच्या उन्हाळा पिकात या विषाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. खरीप आणि रब्बी हंगामांतमात्र भारतीय भुईमुगात हे विष आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा ५ ते १० पट जास्त असते. त्यामुळे, त्या भुईमुगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणे दुरापास्त झाले आहे.
 मी जेथे शेती सुरू केली त्या आंबेठाण गावाच्या परिसरात भुईमूग हे एक प्रमुख पीक आहे; कांदा हे दुसरे. त्यामुळे, चाकणच्या आसपास तेलाच्या गिरण्या अनेक वर्षांपासून उभ्या आहेत. भुईमुगाला भाव नाही हा प्रश्न तेथील शेतकऱ्यांना मोठा भेडसावीत होता. किर्लोस्कर ट्रॅक्टरच्या कामाच्या संबंधाने मी अल्जेरियात गेलो होतो. तेथून परतताना जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेलो. त्या देशात ग्राहक भांडारांची अनेक जाळी आहेत. त्यांपैकी
एकदोघांना जाऊन भेटलो. जुन्या स्वित्झर्लंडच्या वासामुळे थोडी सलगी जमली. मी भारतात जाऊन काय खटाटोप करतोय याचे त्यांना कौतुक वाटले. मी मदतीसाठी हात फैलावत नाही तर, निवडक (Hand-picked) भुईमुगाला बाजारपेठ शोधत आहे हे समजल्यावर स्वीस माणसे अधिक आस्थेने व आदराने बोलली.
 मी चौकशी सुरू केलेली पहिलीच बाजारपेठ दरवर्षी ३०० कोटी रुपयांची निवडक शेंगदाण्याची आयात करते. टेलिव्हिजनसमोर बसल्या बसल्या तोंडात टाकण्याचे अनेक पदार्थ पाश्चिमात्य देशांत मोठे लोकप्रिय आहेत. त्यामुळे, शेंगदाणा, मका आणि बटाटे यंचा खप भरपूर आहे. त्या वेळी त्यांची खरेदी प्रामुख्याने इस्रायल आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून होत असे.
 मोठ्या उदारतेने सारी मागणी हिंदुस्थानकडे वळविण्याचे त्यांनी कबूल केले; पण लगेच नाही. या बाजारपेठेचे तीन वर्षांचे आगाऊ करार झालेले होते. १९८२ सालापासून हिंदुस्थानकडून खरेदी करण्याचे त्यांनी मान्य केले. कागदपत्र तयार करण्यासाठी एक अधिकारी समोर आला. त्याने सहज प्रश्न विचारला, "ज्या भागात तुम्ही काम करता आहात तो हिंदुस्थानात नेमका कोठे आहे?"
 त्याला हिंदुस्थानच्या भूगोलाची कितपत माहिती असणार म्हणून मी म्हटले, "मुंबईच्या जवळ."
 "म्हणजे नेमके कोठे?"
 "पुण्याजवळ."
 "पुण्याच्या कोणत्या बाजूला?"
 आता मी जरा सावध झालो. याला महाराष्ट्राची काहीशी माहिती दिसते.
 "पुणे-नाशिक रस्त्यावर."
 "म्हणजे खेड - मंचरच्या बाजूला?"
 आता मला धक्का बसला. आंबेठाण-चाकण येथे आपण जाऊन राहिलो म्हणजे भारतातील कोण्या दुर्गम खेड्यात जाऊन राहिलो हा दंभ गळून पडला. पण, आपला भाग या गोऱ्याला माहीत आहे म्हटल्यावर आनंदही वाटला आणि मी "हो", म्हटले. त्यावर त्याचा आणखी एक धक्का; "मग तुम्हाला अफ्लाटॉक्सिन् काढणे शक्य होणार नाही," त्याने आत्मविश्वासपूर्वक निर्वाळा दिला.
 मीही आव्हान स्वीकारले आणि अफाफ्लाटॉक्सिन्विरहित व खवटपणाचा अंशही नसलेले भुईमुगाचे नमुने दोन वर्षात मी पाठवावेत आणि त्यानंतर दोन वर्षांनी खरेदीचा करार सुरू व्हावा असे ठरले.
 हिंदुस्थानात परतल्यावर मी चंग बांधून कामाला लागलो. त्या क्षेत्रातील
तज्ज्ञांचा सल्ला घेतला. मुबईच्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राने तयार केलेले उत्सर्जनप्रक्रियेचे बियाणे मिळवले. मोठे छान पीक आले. पण, खवटपणा काही कमी करता आला नव्हता. शेंगेतील आर्द्रता झपाट्याने कमी करायला हवी यासाठी अनेक प्रयोग करून पाहिले. शेंगेतील आर्द्रता कमी होईना तेव्हा फोलकट काढून दाण्यातील आर्द्रता कमी करून ठेवली. प्रत्येक दाणा एका बदामाच्या वजनाचा, चांगला कुरकुरीत झालेला. माझ्या घरी येणारे पाहुणे बरेच महिने त्याची प्रशंसा करीत त्याचा आस्वाद घेत होते.
 तेवढ्यात, चाकणचे कांदा आंदोलन सुरू झाले. उपवास, तुरुंगवास यांत हे सगळे प्रकरण मगे पडून गेले. चटकमटक खाद्य म्हणून दाणे उत्तम, पण आठदहा पोती दाणे घरी थोडेच संपणार? चाकणच्या बाजारात त्याला गिऱ्हाईक भेटेना. तेथील सारे खरीददार तेल गाळण्याकरीता मिळेल तसला भुईमूग खरेदी करणारे; त्यांना असल्या मालाची काय कदर? शेवटी साध्या खवट भुईमुगापेक्षाही कमी किमतीने ती पोती विकून मोकळे व्हावे लागले!
 शेतीमालाच्या भावाच्या आंदोलनाआधी, शेतीमालाच्या संबंधी सरकारच्या कूटनीतीचे पूर्ण आकलन होण्याआधी तथाकथित विधायक मार्गाचे मी जे प्रयोग केले, त्यांतील हा पहिला. त्यानंतर बटाटा, कांदा यांच्या प्रक्रियेचे प्रयोग झाले. बरीच रक्कम आणि कष्ट अक्कलखाती जमा झाले.
 वीस वर्षांहून अधिक काळ मधे गेला; पण, शुद्ध दाणा आपल्याला करता आला नाही याची बोच राहिली होती. जागतिक व्यापार संस्थेसंबंधीच्या टास्क फोर्सचे अध्यक्षपद घेतल्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला तो खाद्यतेलासंबंधी. हिंदुस्थानातील खाद्यतेलाचे संकट पेट्रोलियमच्या दुर्भिक्ष्यापेक्षाही अधिक कठीण. तेलबिया आणि खाद्यतेल यांचे देशातील उत्पादन वाढविण्याकरिता विचार सुरू झाला. मी काही सरकारात नाही, एका विषयापुरता सल्लागार आहे; तरीही हाती असलेल्या पदाचा वापर करून सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि महाराष्ट्र या राज्यांत भुईमुगाचे उत्तम बियाणे तयार करण्याचे प्रकल्प सुरू केले; त्याचे मुख्य श्रेय डॉ. बसू यांना आहे. डॉ. मुक्तिसाधन बसू हे त्यांचे नाव. भुईमुगाच्या शेतकऱ्यांच्या मुक्तीचे ते खरोखरच साधन बनले आहेत.
 या प्रयोगातील यशामुळे मनातील एक जुनी रुखरुख गेली आणि बाजारपेठेची मोकळीक मिळाल्यास भारतीय शेती जागतिक दर्जाची होऊ शकते याबद्दलचा आत्मविश्वास दृढ झाला.

दि. १८/७/२००१
■ ■