अंगारमळा/माझी शिक्षणगाथा

विकिस्रोत कडून

माझी शिक्षणगाथा


 आमच्या काळी महाविद्यालयाची प्रवेशपरीक्षा शाळेच्या अकराव्या वर्षाच्या शेवटी होई. १९४९ सालापर्यंत या परीक्षेला मॅट्रिक्युलेशनची परीक्षा म्हणत; सर्वसामान्यांच्या बोलण्यात नुसतेच मॅट्रिक. मॅट्रिक म्हणजेच मोजमाप. हे मोजमाप झाले, की उच्चशिक्षणाची व विश्वविद्यालयीन अभ्यासाची दारे खुली होत.

 शाळेतले विद्यार्थी जवळ असताना वडीलधारी माणसे सरकारी नोकरीत असली, वकील असली तर आपल्या विद्यार्थिजीवनाविषयी फारसे बोलत नसत. मॅट्रिक झाले म्हणजे मोठी बाजी मारली, पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट होणे म्हणजे तर पराक्रमाचा कळसच. त्या काळी बी.ए. झाल्यानंतर एम.ए. वगैरे करण्याच्या भानगडीत फारसे कुणी पडत नसे; प्राध्यापक होतकरूच एम.ए.च्या वाटेला जायचे. विद्वन्मान्यतेचे एकदोनच आदर्श एक, आचार्य अत्रे, बी.ए.,बी.टी.,टी.डी. (लंडन), एवढा शिकलेला आणि वर आचार्य, म्हणजे काहीचा काहीच विद्वान माणूस असे वाटायचे. वकील होण्यासाठी बी.ए. होण्याची आवश्यकता नसे, एरवीही कायद्याच्या पदवी परीक्षेला बसता येत असे. पुष्कळसे वकील तर बऱ्यापैकी व्यवसाय चालणाऱ्या वकिलांच्या पदरी कारकुनी करतच वकिली व्यवसायात घुसलेले असायचे.

 तालुक्याच्या गावचा वकील हा भीतीचा विषय होता, आदराचा नव्हता. वकिली प्रदेशातला मान्यवर म्हणजे 'बॅरिस्टर'. त्यावेळचे बहुतेक सारे वंदनीय नेते बॅरिस्टरीची परीक्षा विलायतेत देऊन आलेले. महात्मा गांधी बॅरिस्टर; जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, जमनादास मेहता सारे सारे बॅरिस्टरच. कोणी माणूस अत्रापपणे युक्तिवाद करू लागला, की कुचेष्टेने त्याला, 'बाळा, बाळा, बॅरिस्टर का रे नाही झालास?' असे विचारीत.

 वकिलांचे सगळ्यांचे उत्पन्न चांगले असे. बॅरिस्टर लोकांचा थाट मोठा. काळा डगला, पांढरा शुभ्र खमीस. ही माणसे सारी बिनकॉलरच्या खमीसावर दोरीने कॉलर का बांधत हे आम्हाला समजायचे नाही. इंग्लंडच्या थंड हवेतल्या बॅरिस्टरचा डगला हिंदुस्थानच्या उष्ण दमट हवेत घातला, की पांढराफेक कडक इस्त्रीचा शर्ट दोन दिवस लागोपाठ घालणे काही शक्य होत नाही आणि एक एक दिवस धुलाईचा शर्ट घालावा अशी मिळकत बहुतेक त्या काळच्या बॅरिस्टरांना मिळत नसावी.

 पुढे पुढे बॅरिस्टर हे आमच्या मर्जीतून पार उतरले. बॅरिस्टरची अशी परीक्षा नसतेच. कोणत्या तरी गुत्त्यात (bar) आठ गिनी खर्च करून (१२ पेन्स = १ शिलिंग व २१ शिलिंग = १ गिनी) आणि जुन्या बॅस्टिरना खूश केले, की बॅरिस्टरी आपोआप मिळते असे कुणी सांगितले. त्यामुळे विलायतेत जाऊन फक्त बॅरिस्टर होऊन आलेल्यांचा भाव मनात ढासळला. त्याऐवजी आयसीएस करून आलेले सुभाषचंद्र बोस, चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे आमचे चरित्रनायक झाले.

 डॉक्टर त्या काळी फार फार म्हणजे M.B.B.S. M.D. आणि F.R.C.S. झालेले डॉक्टर मी मुंबईला आल्यावर तेथील इस्पितळातच पाहिले. जिल्ह्यापर्यंतचा मोठा डॉक्टर म्हणजे M.B.B.S.! या पदवीचे मोठे वैचित्र वाटायचे. B.A., B.Sc. या धर्तीवर B.M.B.S. किंवा नुसते B.M. & S. अशी सुटसुटीत पदवी का देत नाहीत, हे कळायचे नाही. बहुतेक डॉक्टर, कुणी आजारी असले तर तपासायला घरी जात असत. अगदी चांगल्या डॉक्टरचीसुद्धा घरी भेट देण्याची फी ३ ते ५ रुपयांच्या वर नसे. दाताच्या डॉक्टराची पत्रास तर न्हाव्यापेक्षा फारशी वरची नव्हती. ते कदाचित रोग्याला बसवायच्या खुर्चीतील सारखेपणामुळेही असेल! M.B.B.S. झालेल्या आणि होऊ पाहणाऱ्या सगळ्या भद्र लोकांनी आम्हाला पार पटवून दिले होते, की M.B.B.S. च्या पाच वर्षांच्या पाच परीक्षा एकदाही नापास न होता सरळसोट पाच वर्षात कोणी विद्यार्थी पार करूच शकत नाही. एखादे वर्ष तरी बुडणारच. विद्यार्थी फारच हुशार असला तर असूयेपोटी प्राध्यापक त्याला एक वर्ष तरी नापास करतातच अशी आमची पक्की समजूत होती. अशीच काहीशी समजूत C.A. (चार्टर्ड अकौंटंट) या हिशेब तपासनिसाच्या संबंधी सर्वदूर होती. कुणा हिशेब तपासनिसाकडे उमेदवारी करता करता तीन परीक्षा द्यायच्या; पण बहुतेकांचा हा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालायचा. महाराष्ट्रात त्या काळी दोनतीन Actuary खूप गाजले होते. या लोकांचा नेमका व्यवसाय काय हे बऱ्याच वर्षांनी कळले होते. जीवनविमा उतरवणाऱ्यांच्या हप्त्यांची रक्कम काय असावी याचा हिशेब करण्याचा हा धंदा. याला एवढा मान का असावा आणि त्यात एवढे काय कठीण असावे की ज्यामुळे भारंभार पगार मिळावा हे आमच्या समजेपलीकडेचे होते. खूप खूप वर्षांनंतर स्वित्झर्लंडमध्ये माझ्या कार्यालयात काम करणारा माझ्या बरोबरीचा एक सहकारी पाहून ॲक्च्युअरी होण्याकरिता लागणाऱ्या बुद्धिमत्तेचे आणि तपस्येचे आपले हिशेब चुकले तर नव्हते ना, असे वाटू लागले.

 मी प्रवेशपरीक्षा पास होण्याआधी इंजिनिअर लोकांना फारसा मान नव्हता. पहिले

कारण, ही मंडळी फारशी शुभ्र स्वच्छ कपड्यात दिसत नसत. वेषभूषेवरूनच त्यांची गाठ शारीरिक कष्टाशी आहे हे उघड होई. ब्राह्मणी परंपरेत वाढलेल्या कोणालाही इंजिनिअर होण्याचे फारसे आकर्षण नसे. इंजिनिअरांचे प्रकार फक्त तीनच होते. बांधकामे करणाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणत, विजेशी काय संबंध असेल तो असणाऱ्यांना इलेक्ट्रिकल म्हणत आणि यंत्राच्या साह्याने कापाकापी, घासाघाशी असली कामे करणाऱ्यांना मेकॅनिकल म्हणत.

 १९४९ सालापर्यंत इंजिनिअरिंग शिकण्यासाठी प्रवेश मिळविणे फारशी कठीण गोष्ट नव्हती. आताप्रमाणे लाखांनी 'हुंडा' देऊन प्रवेश कधीकाळी मिळवावा लागेल यावर कोणाचा विश्वासही बसला नसता. पुण्यासारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे धुरीणही घरोघर जाऊन होतकरू तरुणांना अभियांत्रिकीचे महत्त्व पटवून बळेच आपल्या कॉलेजात आणीत. त्यांच्या महाविद्यालयात एकदा गेले, की मध्ये फारशी अडचण न येता माणूस इंजिनिअर म्हणूनच बाहेर पडे.

 लग्नाच्या बाजारात वकिलांचा मान मोठा, सरकारी नोकरांचा त्याहून मोठा; डॉक्टर, इंजिनिअर हे उतरत्या भाजणीने त्यांच्या खालचे. आता अभियांत्रिकीतच शंभर सव्वाशे शाखा आहेत. M.B.B.S. होऊन कोणीच डॉक्टर थांबत नाही. प्रत्येकाला काही ना काही विशेष प्रावीण्य पदवी (Super specialisation) मिळवल्याखेरीज चालतच नाही. वकिलावकिलात विशेष नैपुण्याच्या शाखा झाल्या. वकील साधा वकील राहिला नाही. गुन्हेगारी खटले चालवणारे वेगळे, नागरी कायदे चालवणारे वेगळे, व्यपारी कायद्यांचे वेगळे, करमहसुलांचे वेगळे, हे सगळे अलीकडे अलीकडे घडले.

 गेल्या आठवड्यात मुंबईच्या एका मान्यवर महाविद्यालयात एका कार्यशाळेसाठी गेलो होतो. तिथल्या प्राचार्यांनी, कलाशाखेबद्दल विद्यार्थ्यांत फारशी रुची नाही याबद्दल हळहळ व्यक्त केली.

 कला विभागाची मोठी गंमत आहे. गेली काही दशके तरी ज्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याइतके गूण मिळत नाहीत, अभियांत्रिकीलाही जाता येत नाही, अगदी वाणिज्य शाखेतसुद्धा प्रवेश मिळण्यासारखा नसतो तेव्हाच विद्यार्थी, अगदी नाइलाजाने, कला महाविद्यालयात जाऊन बी.ए. पदवीचा प्रयत्न करू लागतो. बाकीच्या शाखांत प्रवेश मिळणे कठीण झालेल्या या विद्यार्थ्यांतही वर्षानुक्रमे द्वितीय वर्ग, प्रथम वर्ग, विशेष प्रावीण्य, सुवर्णपदके इ. मिळवणारे निपजतात. असे उशिरा चमकू लागणारे खडे पदवीनंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करू लागतात. ते नच जमल्यास

एखादे ललित साहित्याचे पुस्तक घेऊन कोणत्याही विषयातले प्राध्यापक होतात. त्यातल्या त्यात मागास पूर्णवेळ कायद्याची पदवी संपादन करू पाहतात. एकदा वकिलीला लागला आणि बऱ्यापैकी पैसा मिळू लागला, की वैकुंठाची वाट धरेपर्यंत आपला व्यवसाय कुणी सोडत नाही. ज्यांची वकिली चालतच नाही ते वेगवेगळ्या तऱ्हांच्या खटाटोपींनी धागेदोरे जमवून मॅजिस्ट्रेट बनतात, पुढे चढत चढत न्यायाधीश बनतात, कालानुक्रमाने बिच काय सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीश बनतात.

 अलीकडे राजकारणी राज्यकारभाराचे काम करीत नाहीत, त्यामुळे न्यायाधीशांच्या हातीच सर्व सत्ता येऊ पाहत आहे. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना इंधन कोणत्या प्रकारचे वापरावे, दुचाकीवाल्यांनी डोक्यावर शिरस्त्राणे घालावी किंवा नाही, विद्यालयातील फिया काय असाव्यात येथपासून तर इतिहासात कोणत्या काळी कोठे देऊळ होते का मशीद होती इथपर्यंतचे सर्व निर्णय शैक्षणिक पात्रतेच्या सगळ्या चाळण्यांत गणंग ठरलेले करतात.

 कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आपण निव्वळ मातेऱ्यातून माणके तयार करतो याचा खरे पाहिले तर अभिमान वाटायला पाहिजे. हे मातेरे प्रवेश घेताना भरभक्कम 'हुंडा' देऊन येत नाहीत हेच खरे त्यांचे दु:ख असावे!

 ब्राह्मणी घरात वाढलेला मी, कोणत्याही शारीरिक कष्टाचा कंटाळा होता असे नाही, त्यात कमीपणा वाटे असेही नाही; पण, परमेश्वराने एवढे आयुष्य दिले आहे ते कारखाने काढणे, रोग्यांची शुश्रूषा करणे, कोर्टात वितंडवाद घालणे, सरकारी नोकरीत मान खाली घालून वर्षानुवर्षे काम कण्यात जाणे ही गोष्ट मोठी भयानक वाटे.

 तिसरीचौथीत असताना प्रभातचा 'रामशास्त्री प्रभुणे' हा सिनेमा पाहण्यात आला. हूड आणि निर्बुद्ध मानला गेलेला राम काशीला जातो. 'रामोहरि करी भूऽभृत' अशी घोकंपट्टी करतो; आणखीही काही घोकत असेल; पण सिनेमात एवढेच दाखवले आहे. एवढ्या आधारावर तो प्रकांड पंडित मानला जाऊन राजसत्तेलाही नमवण्याचा अधिकार प्राप्त करतो हे काही छान आहे; असे काहीतरी केले पाहिजे असे वाटे. आठवीत संस्कृतच्या तासाला 'राम: रामौ रामा:' कानावर आल्यावर आता आपला रामशास्त्री होणे काही काळाच्या अवधीचाच प्रश्न आहे असे वाटू लागले. नाशिकच्या शाळेतील आमचे संस्कृतचे गुरुजी... सर्वांना जड वाटणारा विषय इतका सुरस करून सांगणारा असा शिक्षक मी नंतर कधी पाहिलाच नाही. पहिल्याच दिवसापासून त्यांनी पाठांतर बाजूला ठेवून सर्वांनी संस्कृतात बोलले पाहिजे असा आग्रह धरला. फळ्यावर रामरक्षेतील 'माता

रामो, मत्पिता रामचंद्र:' हा 'अनुष्टुप' लिहिला आणि मराठी मातृभाषिकाला संस्कृत ही आजीच आहे असे वाटावे असा बदल तासाभरात घडवून आणला. मग, जिद्दीने संस्कृतच्या परीक्षांना बसवणारे, सुभाषितकाव्यांचे पाठांतर करून घेणारे, सारी भगवद्गीता मुखोद्गत करून घेणारे शिक्षक भेटण्याचे भाग्य लाभले. बाणभट्टाची कादंबरी आणि नादमाधुर्याने तोंडाला सुटणारे पाणी सावरत सावरत तन्मयतेने शिकवणारे गुरुजीही भेटले. 'संस्कृत ही काव्याची भाषा आहे. संस्कृतमध्ये करायचे भाषांतर पद्यबद्धच झाले पाहिजे' असा आग्रह धरून पानेच्या पाने इंग्रजी उतारे सुबोध, नादमधुर काव्यात, पाण्याचा प्रवाह धो धो वाहावा तसे, सांगणारे आचार्यही भेटले.

 संस्कृतची गोडी किती लागली या प्रश्नाचे उत्तर आजही कठीण आहे; पण पुत्रप्राप्तीकरिता गाईपाठोपाठ फिरणारा दिलीप राजा, नारदाच्या तंबोऱ्यावरील फुलांची माळ कोसळल्याने मृत्यू पावलेल्या इंदुमतीबद्दल बाष्पगदगद होऊन विलाप करणारा अज राजा आणि सीताहरणानंतर दंडकारण्यातील झाडाझाडांना सीता कोठे आहे असे बेभानपणे विचारत फिरणारा राम या विश्वात, काही नाही तरी, वर्तमानातल्या असुखद वास्तवाच्या भानाची भूल पाडण्याचे सामर्थ्य हाते. ती एक धुंदीच होती, मस्ती होती. इतरांना ज्या क्षेत्रात रस नाही त्यात आपण आकंठ आनंदात बुडून जात आहोत याचा अहंकारही मोठा असावा. आयुष्यात जगण्यासारखे, करण्यासारखे, अभ्यासण्यासारखे, स्वत:ला झोकून द्यावे असे काही असेल तर ते म्हणजे संस्कृतचा व्यासंग अशी माझी पक्की धारणा झाली होती.

 काशीहून विद्या घेऊन आलेल्या रामला पेशवाईत हुकमी दक्षिणा मिळे. आता संस्कृत व्यासंग्याला भिक्षा मिळण्याचीही शक्यता फारशी नाही; पण त्या व्यासंगाची गोडीच अशी की 'फार काय, पोटात काटे भरावे लागतील एवढेच ना?' अशी अविचारी गुर्मीही होती. परीक्षेत चागले गुण मिळवले आणि दैवयोगे करून चांगल्या महाविद्यालयामध्ये संस्कृत भाषेचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली तर मग पोटापाण्याचाही प्रश्न फारसा राहत नाही. विद्वत्तापूर्ण व्यासंगाची जनमान्यता, सुखवस्तूपणे जगता यावे इतकी अमदनी आणि महाविद्यालयातील वर्गात तारुण्यात नुकतेच पदार्पण करू पाहणाऱ्या तरुणतरुणींना कुमारसंभवातले बारकावे समजावून सांगण्याचे काम! इतका काही सगळा बारकाव्याने विचार आखला गेला होता असे काही नाही; पण संस्कृतचा प्राध्यापक व्हायचे एवढे मनात ठामपणे ठरलेले होते.

 साहित्याच्या रसाची मस्ती चाखण्याचा अनुभव आला, की तो साहित्यापुरताच

मर्यादित राहत नाही. तारुण्याच्या भरात शक्तीच्या अमदानीत उसळणाऱ्या नवनव्या ऊर्मीचे सार्थक करून दाखवण्याची झिंग तयार होते.६ जून १९५१ - एस.एस.सी.च्या परीक्षेचा निकाल लागला, मी शाळेत पहिला आलो. गुणांच्या याद्या मिळाल्या. आमच्या कंपूत 'आता पुढे काय?' याची चर्चा सुरू झाली. आकंठ जेवून तृप्त झालेल्याला रस्त्याकाठी बसलेल्या माणसाच्या पोटातील भुकेची जाणीव नसावी तसा, काही आढ्यतेने मी म्हणालो, 'पुढे कोणता शिक्षणक्रम घ्यायचा यात एवढा विचार करण्यासारखे काय आहे? कोणताही शिक्षणक्रम घेतला तरी फरक काहीच पडत नाही. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख, त्यावेळचे आमचे दुसरे चरित्रनायक, म्हणतात, 'आवडणारी गोष्ट कोणीही करेल; करावी लागणारी गोष्ट आवडीने करणे यात पुरुषार्थ आहे.' आपल्या लोकोत्तरतेच्या धुंदीत आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोड मानणारे कितीतरी खांडेकरी नायक डोक्यात बिळे करून बसले होते.

 एका अत्यंत प्रिय मित्राने म्हटले, "तुला काहीच चिंता नाही. तुझे ठरलेच आहे, तू संस्कृत घेऊन एम.ए. करणार आणि प्राध्यापक होणार!" मी? विश्वाच्या निर्मितीतील एक प्रमुख प्रमेय असलेले माझे आयुष्य आणि हा कसेबसे ५४% मार्क मिळालेला मित्र मला माझी वाट सांगतो आहे? शब्दाशब्दाने वाद वाढला, 'प्राणापेक्षा प्रिय असलेल्या सीतेचा, राजधर्माचे परिपालन करण्याकरिता त्याग करायलाही मी मागेपुढे पाहणार नाही." अशा रामचंद्री अभिनिवेशात मी संस्कृत अभ्यासक्रम न घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. वर्षानुवर्षे ज्या आयुष्यक्रमाची तयारी केली, तो क्षणार्धात हेकटपणे लाथाडला, आता पुढे काय? आईवर रागावलेले बाळ हट्ट करून जेवायला नकार देते; त्यामुळे आईचे हृदय पिळवटते आहे या जाणिवेत त्याला काय आनंद होतो? लव-कुशांनी रामाच्या साऱ्या सैन्याचा पराभव केला. सीतेचे निष्कलंकत्व सिद्ध झाले. तिला कोणी पतिता म्हटले तर लवकुशांचे पराक्रमसिद्ध धनुष्यबाण आकर्ण ताणून सिद्ध झाले असते तरीही रामाने, 'सीतेने पुन्हा एकदा अग्निदिव्य करावे' असा आग्रह धरून मनातल्या मनात कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?

 संस्कृत नाही म्हणजे नाही; पण मग कोणता अभ्यासकम घ्यायचा? संस्कृत भाषेचे लालित्य, माधुर्य, सौंदर्य सोडून त्याच्या नेमक्या उलट्या टोकाचा नीरस, शुष्क, कठोर विषय कोणता घ्यावा? माझे त्यावेळचे संस्कृतचे आचार्य- आयुष्यात विविध कलांचा, गुणांचा, विद्यांचा त्यांच्याइतका व्यापक आणि सखोल आविष्कार करणारा मी आजपर्यंत माहिलेला नाही. १९५० सालच्या एस.एस.सी. परीक्षेत त्यांचा विद्यार्थी बोर्डात पहिला

आला होता- आज नाणेशास्त्रात अर्थशास्त्रात जगभर शिखराची कीर्ती मिळवलेला आणि बहुधा येत्या काही वर्षांत नोबेल पारितोषिक मिळवण्याची निश्चिती असणारा जगदीश भगवती. कोठल्या अपघाताने कोणाच्या आयुष्याला कसे वळण लागेल कोणालाही सांगणे शक्य नाही. मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा निश्चय जाहीर केला. केला म्हणजे केला, 'शेंडी तुटो पारंबी तुटो' आता माघार घेणे नाही.तोंडातून निघालेला शब्द मागे घेणे भाग पडून होणाऱ्या अपमानाने मलिन झालेले जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे?

 जीवेन किम् तत् विपरीत वृत्तेः । प्राणैहि उपक्रोष मलीमसै: वा॥

 मी मध्यमवर्गीय कारकुनाचा मुलगा. त्या वेळी मुंबईत वाणिज्य शाखेची दोन महाविद्यालये होती. एक फोर्टातील सिडनेहॅम आणि दुसरे माटुंग्याचे पोद्दार.सिडनेहम कॉलेजात मोठ मोठे उद्योगपती, गडगंज धनी, व्यापारी यांची मुले वंशपरंपरागत व्यवसाय पुढे नेण्याच्या मिषाने दोनचार वर्षे उल्लूपणा करण्याच्या बुद्धीने आलेली, त्यांचे विश्व वेगळे. महाविद्यालयात येताना दोन दिवस लागोपाठ तीच मोटारगाडी घेऊन येणे त्यांच्या जगात कुचेष्टेचा विषय होई.

 माटुंग्याच्या पोद्दार कॉलेजची परिस्थिती वेगळी. तेथे उच्चमध्यमवर्गीय मुलांचा भरणा अधिक. महाराष्ट्रातले थोडेफार वर आलेले उद्योगपती आपल्या मुलांना तेथे पाठवीत; पण बहुतेक पोद्दारवाशी विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा बँका, विमान कंपन्या, व्यापारी पेढ्या, कारखाने, त्या वेळी एका हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या अल्पसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या यांत भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवण्याची. थोडी मेहनत केली असती तर पोद्दारच्या गटात अधिकच सहजतेने सामावू शकलो असतो; पण सिडनेहम ९०% पारशी, गुजराथी, मारवाडीबहुल. तिथला मराठी विद्यार्थी 'घाटी' मानला जाणारा; कपडे, राहणेसाहणे या सर्वच बाबतीत वेगळा दिसणारा.

 वर्ग सुरू झाले आणि 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता स्वीकारणाऱ्यांच्या वेदना क्षणाक्षणाला जाणवू लागल्या. 'रघुवंशा'तील इंदुमतीस्वयंवरात राजकन्या इंदुमती एका एका राजापुढे जात, ज्याच्या पुढे ती उभी राही त्या राजाचा चेहरा आशेने उजळून जाई. वेत्रवति सुनंदेने राजाची माहिती सांगितल्यानंतर, स्वारस्य न वाटल्याने, इंदुमति पुढे सरकली, की त्या मागे पडलेल्या राजाचा आशेने उजळलेला चेहरा व्याकुळतेने काळा पडे. या जगप्रसिद्ध उपमेकरिता कालिदास 'दीपशिखी कालिदास' म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्याला धि:क्कारून वाणिज्यात शिरलो आणि आयुष्य असे वैराण, खडतर वाटू लागले. हिशेब ठेवण्याच्या पद्धती अभ्यासणे हा काय आयुष्याचा हेतू होऊ शकतो? व्यवसाय

करायला एक मालकी, भागीदारी, सहकारी, भागभांडवली कंपनी इ. पद्धतीच्या बांधणी असतात त्यांचा अभ्यास करायकरिता जगायचे?

 तेवढ्यात, अगदी तरुणसे प्राध्यापक आले. वर्णाने काळसर. भर वर्गातही काळा चष्मा घातलेले आणि इंग्रजी बोलताना ओढून ताणून आणलेला अर्धांग्ल थाट. यांच्याकडे तर ४५ मिनिटे पाहणे आणि यांचे बोलणे ऐकणे अशक्यप्राय आहे असे वाटू लागले; पण क्षणार्धात चमत्कार झाला.

 त्या अवताराकडे पाहून समोरच्या बाकावरील एक विद्यार्थी हसला असावा. हसणे मला ऐकू आले नाही; मात्र प्राध्यापकांचा आवाज वीज कडाडावी तसा ऐकू आला, 'वर्गात हसायचे असेल तर दात साफ ठेवत जा.' त्या विद्यार्थ्याचा चेहरा काही दिसला माही, पण भूमीने गिळले तर बरे अशी त्याची अवस्था झाली असणार. प्राध्यापकांनी त्यांच्या करड्या आवाजाचा सूर चालू ठेवला, "कोणा ऐऱ्यागैऱ्या कॉलेजात आला नाही. वाह्यातपणा करायचा असेल तर कला शाखेत जा, शास्त्रात जा आणि कोठेही जा; वाणिज्य हा गंभीर अभ्यास आहे. जे कोणी केवळ बँकेत किंवा पेढीवर कारकून होण्यासाठी म्हणून वाणिज्याकडे आले असतील त्यांनी आजच वेगळा मार्ग धरावा. सिडनेहॅम हे आशियातील सर्वांत पहिले आणि सर्वश्रेष्ठ वाणिज्य महाविद्यालय आहे. आम्ही कारकून आणि हिशेबनीस तयार करत नाही. येथे प्रवेश घेतलेला विद्यार्थी चार वर्षांत पदवीधर होताना सर्व भारताचा वित्तमंत्री होण्याचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे गाठोडे जमा करतो. असा काही मानस असेल तर या अभ्यासक्रमात रहा, या महाविद्यालयात रहा, नाही तर आपला दुसरा मार्ग पकडा."

 प्राध्यापक महाशयांचा शिकवण्याचा विषय जाहिरातशास्त्र होता; म्हणजे फारसा गंभीर नाही. त्यांनी लगेच सूर बदलून आपल्या विषयाला सुरवात केली; पण त्यांच्या चार वाक्यांनीच माझी मन:स्थिती पार पालटून गेली. कालिदास, भवभूतीची संगत सोडल्याचा विषाद क्षणार्धात नाहीसा झाला आणि अर्थकारण, व्यापार यांसारख्या रूक्ष विषयात पाऊल टाकून, पाहिजे तितके परिश्रम करून, या साऱ्या क्षेत्रात जे काही घडत असेल त्याची पूर्णत: नस पकडण्याची महत्त्वाकांक्षा मनात तयार झाली.

 त्यानंतरच्या ६ वर्षांत पूर्वी संस्कृतचा अभ्यास करायचा, तसाच अर्थशास्त्राचा करायला घेतला. संस्कृतचा पेपर एक, त्याकरिता आवश्यक असलेली तयारी फार थोडी. पण तरीही बाणभट्ट, कालिदास, भवभूती, वाचण्याचा जिद्दीने प्रयत्न केला त्याच जिद्दीने अर्थशास्त्रासंबंधी जे मिळेल ते पुस्तक, अहवाल,मासिके बारकाईने अभ्यासण्याचा झपाटा लावला.

 शेतकरी झाल्यानंतर शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. महाविद्यालयातून शिकलेल्या अर्थशास्त्रातल्या सिद्धांतांचे वास्तवाशी काहीच जुळेना. थातुरमातुर अभ्यास केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची सहज प्रवृत्ती अशी होते, की आपण शिकलो ते खोटे असे कबूल करण्यापेक्षा आपला अनुभव खोटा, शेती खोटी असे मान्य करून टाकावे. शेतकऱ्याच्या, पदवी पदरात पाडून घेतलेल्या मुलाला ती पदवी एवढेच अभिमानस्थान असते; त्याला धब्बा लागू देण्यापेक्षा साऱ्या शेतीच्या इमानाला कलंक लावायला तो मागेपुढे पाहत नाही.शेतकऱ्यांची अनेक पदवीधर मुले राजकारणात पुढे आली. शेती तोट्याचा व्यवसाय असल्याचा अनुभव घेतला आणि तरीही, शेतकरीच अडाणी आहे, आळशी आहे, व्यसनी आहे, खर्चिक आहे असले सिद्धांत मानले. पढिक अर्थशास्त्र खोटे आहे असे छातीवर हात ठेवून सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही कारण अर्थशास्त्राच्या अभ्यासाविषयीचा आत्मविश्वास तितकाच लुळापांगळा.

 अभ्यासक्रम संपल्यानंतर सिडनेहॅम कॉलेजमध्येच व्याख्याता म्हणून नेमणूक झाली. माझे एक प्राध्यापक मित्र कोल्हापूरला वाणिज्य महाविद्यालय स्थापन करत होते. त्यांच्या मदतीला जाण्यासाठी भावुकपणाच्या भरात मी कोल्हापूरला जायचे ठरवले. संस्कृतचा अभ्यास सोडून देण्याच्या तिरमिरीत घेतलेल्या निर्णयाइतकाचा हा निर्णयही सगळे आयुष्य बदलून टाकणारा ठरला.


 त्या काळी प्राध्यापकांचे पगार फार बेताबेताचे होते. म्हणून मी नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत गेलो. संयुक्त राष्ट्रसंघात गेलो. हा सारा इतिहास बहुतेकांना माहीत आहेच. मधल्या काळात समाजवादी व्यवस्था होती. लायसन्स परमिटची व्यवस्था चालवायला प्रत्यक्ष पानाची गादी चालवण्याचा अनुभवही नसलेले प्राध्यापक अर्थतज्ज्ञ म्हणून मान्यता मिळवून गेले. खुल्या बाजारपेठेचे धोरण आल्यानंतर अर्थशास्त्राची पोपटपंची करणाऱ्या साऱ्या प्राध्यापकांचे धाबे दणाणले आहे. गेल्याच आठवड्यातला माझा अनुभव- मुंबईच्या एका कला आणि वाणिज्य महाविद्यालयात भाषण देण्याचा योग आला. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रदर्शनात शेतीसंबंधी संघटनापूर्व शेतकरीद्वेष्टी विचारसरणी आग्रहाने मांडली होती. शेतकरी विद्यार्थ्याला उद्देशून मी लिहिलेले एक पत्र खूप गाजले. त्याच आधाराने भाषण केले. कोणताही ग्रंथ सर्वप्रमाण मानू नका. कोणीही गुरू अनंतकाळ पुरणारा नाही. शेतकरी आईबापांच्या आयुष्यात सुखाचा एकही दिवस उजाडत नाही, असे कोणते पाप त्यांनी केले?' या प्रश्नाचे उत्तर देईल ती विद्या, बाकी

सर्व अविज्ञा.

 प्राध्यापक मंडळी गडबडून गेली, परीक्षेकरितातरी या पुस्तकांचा मान राखा म्हणू लागली. पुस्तकी विद्येविरुद्ध बंड उभे राहिले तर आपल्या नोकऱ्यांचे काय याची चिंता त्यांना पडली असावी. 'सरकार' ही संस्थाच दिवाळ्यात निघू लागल्यानंतर अर्थमंत्री होण्यातही कोणाला फारसे स्वारस्य राहिले नाही, हे उघड आहे.

 माझा हल्ला पुरा नव्हता म्हणून की काय, दुसरे एक व्याख्यातेही उभे ठाकले. शेअर बाजारातील घडामोडी या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. गुंतवणुकीसंबंधी सल्लागार म्हणून ते काम करतात. शिवाय, हर्षद मेहता, गुजाराथमधील सहकारी बँका अशी घोटाळ्यांची प्रकरणे तयार झाली की चौकशीसाठी त्यांना आग्रहाने निमंत्रण जाते. थोडक्यात, गुंतवणूकक्षेत्रातील सर्व गुन्ह्यांचे चतुर डिटेक्टिव्ह 'धनंजय' अशी त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांनीही आपल्या भाषणात आपल्या यशाचे श्रेय स्वत: पुस्तकांकडे केलेल्या दुर्लक्षाला दिले.

 मग, प्राध्यापकवर्गात खूपच चुळबूळ सुरू झाली. अध्यापकांनी जगावे कसे? त्यांची पोटे भरावी कशी? समाजवादाच्या काळात महाविद्यालये निघत, ती सरकारी परमिटने; प्राध्यापकांचे पगार ठरत ते सरकारी समित्यांच्या अहवालांच्या शिफारशींप्रमाणे. अव्वाच्या सव्वा पगार वाढूनही प्राध्यापकांचे संप आणि आंदोलने चालूच आहेत. दिवस झपाट्याने बदलत आहेत. प्राध्यापक म्हणून नेमणूक होतानाच त्यांना खंडणी भरावी लागते. पगार पुरा क्वचितच हातात ठेवला जातो. कला आणि वाणिज्य महाविद्यालयांची संख्या घटत आहे. महाविद्यालयेच बंद पडतील काय अशी धास्ती सर्वांनाच पडली आहे.

 काही वर्षांपूर्वी डॉ. वि.म. दांडेकर यांनी शिक्षणाच्या खासगीकरणासंबंधी एक प्रस्ताव मांडला होता: 'महाविद्यालयांची आवश्यकता नाही. ज्या त्या प्राध्यापकाने आपापला स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, जे विद्यार्थी येतील त्यांना शिकवावे, स्वसंतोषाने जी देतील ती गुरुदक्षिणा, देतील त्यांत संतोष मानावा.' अर्थात्, हा प्रस्ताव प्राध्यापकांना मान्य होण्याची काही शक्यता नव्हती. गुणवत्ता आणि फलनिष्पत्ती दाखवून मेहनताना स्वीकारणे हे पांढरपेशांच्या प्रकृतीस जमणारे नाही!

 दांडेकरांची पद्धती स्वीकरली गेली असती तर अर्थशास्त्राचे फारच थोडे प्राध्यापक पोट भरू शकले असते. त्यांतील एक रिकार्डो. ॲडम स्मिथच्या बरोबरीने विद्वत्मान्य असलेल्या रिकॉर्डोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लंडनच्या शेअर बाजाराचा अचूक अंदाज करून तो स्वत: पैसे गुंतवत असे. या उलाढालीत त्याने प्रचंड कमाई केली.

माझ्यावेळचे सिडनेहॅमचे प्राचार्य अत्यंत आदरणीय आणि व्यासंगी. अमेरिकेच्या अध्यक्षांनीही त्यांना सल्ला देण्यासाठी बोलावले होते. त्यांनी एकदा मुंबईच्या शेअर बाजारात पैसे गुंतवले आणि सगळे घालवले. अर्थशास्त्राच्या गुणवत्ता आणि फलनिष्पत्ती यांच्या आधाराने अमदनी करून देण्याचा एक चांगला मार्ग सोबतच्या व्याख्यात्यांमुळे मला सुचला. नोकरीला लागताना एक भांडवली रक्कम प्रत्येक अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला द्यावी. पगारवाढ, बढती यांचा संबंध पोपटपंची, प्रबंध लिखाण, पुस्तके यांच्याशी नसावा. मुळात दिलेली भांडवली रक्कम बाजारात गुंतवून त्याच्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून उपजीविका चालविणे कोणाही सच्च्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला सहज शक्य व्हावे.

 मोठ्या धारिष्ट्याने ही कल्पना मी सभेत मांडली. एक प्राध्यापिका म्हणाली, 'असे उत्पन्न मिळाले तर आम्ही नोकऱ्या सोडून देऊ.' बरोबरचे व्याख्याते म्हणाले, "औषधावाचून खोकला गेला!"

 ज्या ज्ञानसंपादनाच्या वैशिष्ट्यांमुळे मानवाने चराचर विश्वावर आपली अधिसत्ता स्थापन केली आहे, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी उभ्या राहिलेल्या शिक्षणक्षेत्राची होत असलेली घसरण आणि त्याबद्दल समाजाची अनास्था ही मोठी चिंतेची बाब आहे.

 

(शेतकरी संघटक, ६ व २१ सप्टेंबर २००३)

■ ■