Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४ । केसरीची त्रिमूर्ति

लाग्र सामाजिक व धार्मिक परिवर्तन होणें अवश्य आहे हें सत्य विष्णुशास्त्री यांनी जाणलें नाही.
दोन ताण
 यावरून असें दिसतें की, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, विरुद्ध मताविषयीचा आदर, समता, बंधुता हीं जीं नवसमाजरचनेचीं तत्त्वें, त्याचप्रमाणे देशाभिमान व त्यासाठी अवश्य असे त्याग, संघटना, एकोपा यांसारखे गुण हे एका बाजूला आणि सनातन परंपरेतील जातीय उच्चनीचता, ब्राह्मणांचें श्रेष्ठत्व, धर्माची अपरिवर्तनीयता हीं तत्त्वें दुसऱ्या बाजूला यांचे दोन्ही बाजूंनी दोन ताण विष्णुशास्त्री यांच्या मनाला लागले होते; आणि त्यामुळे अनेक जुन्या पीठिका, परंपरा यांवर निक्षून प्रहार करीत असतांना सुद्धा त्यांच्या अभ्यंतरांत इतर कांही निषिद्ध अशा जुन्या तत्त्वांविषयीचा आग्रह कायम असे.
 खं. भि. बेलसरे या नांवाचे विष्णुशास्त्री यांचे एक अनन्यभक्त होते. त्यांनी १८९१ साली 'विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या चरित्राचें व लेखांचें साधारण स्वरूप' या नांवाचें एक लहानसें पुस्तक लिहिलें आहे. त्यांत विष्णुशास्त्री यांच्या धर्ममतांविषयी चर्चा केली आहे. तिचा भावार्थ असा- शास्त्रीबुवांच्या कित्येक लेखांवरून ते पक्के हिंदुधर्मी होते, त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता, व डोळे मिटून ते त्यास अनुसरत असत, असा सकृद्दर्शनीं कोणाचाहि सिद्धान्त होऊन जाईल; पण आम्हांस तसें वाटत नाही. त्यांनी हिंदु धर्माचा अभिमान धरला होता ही गोष्ट खोटी नव्हे. तरी तो अभिमान विश्वासजन्य होता, असें मात्र म्हणवत नाही. तर देशभक्तिजन्य होता, असें आमचें मत आहे. म्हणजे त्यांस स्वदेशाविषयी जें अत्यंत प्रेम होतें त्यामुळे विस्कळीत होत चाललेल्या हिंदु समाजास बंधनरूप जो हिंदु धर्म त्याचा अभिमान त्यांस वाटू लागला इतकेंच (पृ. ७३).
 हे विवेचन करून, मनुष्य कितीहि ज्ञानी झाला तरी त्याचे पूर्वग्रह सर्वस्वीं सुटत नाहीत, याची अनेक उदाहरणें बेलसरे यांनी दिली आहेत. आणि शास्त्रीबुवांच्या विचारांतील विसंगतीचें स्पष्टीकरण केलें आहे (पृ. ७६). याचा अर्थ असा की, उत्कट स्वदेशाभिमानामुळे या देशाचा सतानत असा जो हिंदु धर्म त्याचा त्यांना तसाच अभिमान वाटे, व त्यांतील दोषांकडे ते पाश्चात्त्य विद्येने प्राप्त झालेल्या विवेकी दृष्टीने पाहू शकत नसत. मात्र ही स्थिति नेहमीच असे असे नाही. तो विवेक जागृत झाला की ते स्वकीयांचे दोषहि कठोरपणें दाखवून त्यांवर निःस्पृह अशी टीका करीत असत. त्यासंबंधी चर्चा पुढे येणारच आहे; पण त्याआधी देशाभिमानामुळे दृष्टि झाकोळलेली असतांना त्यांनी हिंदुस्थानच्या अवनतीची जो मीमांसा केली आहे, तिची चिकित्सा करावयाची आहे. ती मीमांसा विष्णुशास्त्री यांच्या नेहमीच्या भेदक बुद्धिवादी दृष्टिकोनाशी विसंगत अशी झालेली आहे. तिचा परामर्श घेऊन मग स्वकीयांच्या दोषांवरहि ते किती प्रखर क्ष-किरणें टाकूं शकतात तें आपण पाहू.