पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनावरचे दोन ताण । ५३


क्रांतीचा उपहास
 माधवराव रानडे यांच्या तत्त्वज्ञानांतील अनेक सिद्धान्त विष्णुशास्त्री यांना वरीलप्रमाणेच मान्य होण्यासारखे होते. मानवत्वाची प्रतिष्ठा हें त्याचें पहिलें महातत्त्व होते. संपत्तीच्या उपभोगाविषयीचीं त्यांचीं मतें, त्यांचा मराठी भाषेचा अभिमान, इंग्रजी विद्येविषयीची त्यांची भक्ति, भारताच्या प्राचीन संस्कृतिविषयीचा त्यांचा अभिमान, मराठ्यांच्या इतिहासासंबंधीचे त्यांचे प्रेम, त्यांचे शुद्ध, निष्कलंक चारित्र्य, अखंड उद्योग तत्परता, त्यांचा स्वदेशाभिमान आणि त्यांची अत्यंत थोर, अत्यंत सुसंस्कृत अभिरुचि यांविषयी त्यांच्या शत्रूंनाहि शंका घेण्यास जागा नव्हती. विष्णुशास्त्री यांनी या युगाचे अग्रणी, असा त्यांचा गौरवहि केला होता. असें असतांना त्यांच्या कार्यातील अधू जागा तेवढ्या निवडून त्यांवर विष्णुशास्त्री सतत प्रहार करीत राहिले आणि सामाजिक व धार्मिक क्रांतीची ते जी पायाभरणी करीत होते तिची त्यांनी पूर्ण उपेक्षा केली. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणें तिचा उपहास केला. त्यामुळेच मनांत येतें की, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, विचारस्वातंत्र्य, ज्ञाननिष्ठा, ह्रीं जीं नवसमाज- निर्मितीची तत्त्वें त्यांनी मनाशी निश्चित केली होतीं त्यांचा संपूर्ण व्याप, संपूर्ण आशय, त्यांचे सर्व घटकोपघटक त्यांच्या ध्यानी आले नव्हते.
 म. जोतिबा फुले यांनी तत्कालीं चालू असलेल्या सर्व धार्मिक, सामाजिक व आर्थिक चळवळींचा मोहरा सामान्य जनांकडे, शूद्र, अस्पृश्य, दलित यांच्याकडे वळविण्याचा अखंड प्रयत्न चालविला होता; आणि लोकशाहीचा तोच खरा आशय होता. लो. टिळकांनी केसरीच्या पहिल्या अंकापासून सामान्य जनतेच्या जागृतींतून निर्माण होणाऱ्या लोकशाहीवर आपले सर्व लक्ष केंद्रित केलें होतें. आता जनता जागृत व्हावयाची तर सामान्य जनांच्या ठायीं व्यक्तित्वाची जागृति होणें अवश्य असतें ; आणि हिंदुसमाजांतील धर्मबंधनें व जातिबंधनें कायम असतांना शूद्र, अस्पृश्य, दलित यांच्या व्यक्तित्वाला अवसर मिळणे अशक्य होतें. यासाठीच जोतिबांनी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी या अविवेकी, घातक बंधनांवर घणाघात चालविले होते. लोकशाहीचे उपासक विष्णुशास्त्री यांनी या त्यांच्या कार्याचें स्वागत करावयास हवें होतें; पण तें न करतां त्यांनी जोतिबांवर भयंकर जहरी टीका केली. 'गुलामगिरी' या जोतिबांच्या पुस्तकांत अनेक अपसिद्धान्त आहेत. त्याची भाषा असंस्कृत आहे, म्हणून त्यांवर विष्णुशास्त्री यांनी टीका केली असती तरी कांहीच बिघडलें नसतें. पण ती करूनहि जनजागृतीचा जो प्रयत्न जोतिबांनी चालविला होता त्याचें, इंग्रज राज्यकर्त्यांच्या कांही कृत्यांचें नीर-क्षीर- विवेकाने त्यांनी जसें स्वागत केलें तसें करावयास हवें होतें असें वाटतें. पण तें त्यांनी केले नाही.
 याचें कारण असें दिसतें की, लोकशाहीच्या स्थापनेसाठी, आपलें प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य लोकांच्या अंगीं निर्माण होण्यासाठी, या देशांत आमू-