पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२ । केसरीची त्रिमूर्ति

 आपले लोक उद्योग करीत नाहीत, आळशी आहेत, बसून खाण्यांत, पोटांतले पाणी हलूं न देण्यांत त्यांना भूषण वाटतें, श्रीमंतीचें हेंच लक्षण, असें त्यांस वाटतें; अशी टीका लोकहितवादींनी केली आहे. आणि ती केवळ ब्राह्मणांवरच नाही, तर राजेरजवाडे, सरदार यांवरहि केली आहे. 'संपत्तीचा उपभोग' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी अशीच टीका केली आहे. आणि शेवटी आमचे राजेरजवाडे आणि इतर श्रीमान् गृहस्थ यांनी, ऐश्वर्य आम्हीच भोगावें, हा मूर्खपणाचा अभिमान सोडून देऊन युरोपियन लोकांचा कित्ता उचलावा आणि प्रवास करणें, विद्या जोडणें या कामों संपत्तीचा उपयोग करावा, असा उपदेश केला आहे.
 जातिभेद, परदेशगमन, आणि विशेषतः स्वदेशप्रीति यांविषयी या दोन नेत्यांची मतें अशींच मिळतीजुळती आहेत. धर्मसुधारणेविषयी लोकहितवादी यांचा एक उतारा देतो. त्यावरून सर्व भावार्थ घ्यानीं येईल. "प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार करण्याची व बोलण्याची लिहिण्याची मोकळीक असावी. आचारापेक्षा नीति प्रमुख मानावी, स्त्री-पुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामांत व संसारांत एकसारखे असावेत. जाति-अभिमान नसावा. स्वदेशाची प्रीति व त्याचें कल्याण विशेषेकरून मनांत असावें, गुणेकरून व योग्यतेवरून जातिभेद मानावा, कुलेकरून मानूं नये. सरकारकडून प्रजेचे अधिकार थोर असावे. म्हणजे जे रयतेच्या हिताचे कायदे आहेत, ते सरकारशी भांडून घेत जावे. विद्यावृद्धीकरिता सर्वांनी मेहनत करावी, शेवटचें कलम असें की, सर्वांनी सत्याने चालावें."
 लोकहितवादींची धर्माची ही व्याख्या आहे. यांतले बहुतेक विचार विष्णुशास्त्री यांना जसेच्या तसे मान्य आहेत, हें आतापर्यंतच्या विवरणावरून दिसून येईल.
नीरक्षीर विवेक !
 मनांत असें येतें की, विष्णुशास्त्री यांनी त्यांची दखल घेऊन त्यांचा गौरव केला असता, तर देशांतल्या या भिन्न शक्ति एक होऊन समाजाची प्रगति वेगाने झाली असती. लोकहितवादी यांची इंग्रजांविषयीची अंधभक्ति, विचार-आचार यांतील विसंगति, त्यांची अतिरेकी स्वजननिंदा, त्यांची असंस्कृत भाषा यांवर टीका करूनहि विष्णुशास्त्री यांना त्यांच्या वरील विचारधनाचा गौरव करता आला असता. इंग्रजांच्या, राज्यकर्त्यांच्या व एकंदर पाश्चात्त्य पडितांच्या बाबतींत त्यांनी अशीच नीरक्षीरविवेकी दृष्टि ठेविलेली दृष्टीस पडते. त्यांच्यावर त्यांनी जितकी प्रखर टीका केली तितकीच त्यांच्या गुणांची स्तुतीहि केली. त्यांचा कित्ता घ्यावा, त्यांना गुरु मानावें, म्हणजे लोह-परिस- न्यायाने आपल्याला त्यांचे गुण लाभतील, असा उपदेशहि केला आहे. मग हाच विवेक लोकहितवादी, न्या. मू. रानडे व जोतिबा फुले यांच्याविषयी त्यांनी कां केला नाही ?