पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘जागतिक घडामोडी : वर्तमानाचा साक्षेपी आढावा


 वृत्तपत्रीय लेखन दोन प्रकारचे असते. त्यातील वृत्त वाचनानंतर दिवसभरात घडणाच्या घडामोडी, उलाढाली व परिपाठात वाचक ते लौकिकाअर्थाने त्वरित विसरून जातो. हे विस्मरण वरवरचे असते. प्रसंगपरत्वे विस्मृतीत गेलेल्या, पण सुप्त मनाच्या कोशात तळात संथ पहुडणाऱ्या त्या वृत्तास उजाळ्याच्या रूपाने पुढे संदर्भाचे, दृष्टांताचे महत्त्व येते. ते मग गतकालाचा दाखला म्हणून वर्तमानास मार्गदर्शन करते. कधी कधी ते वृत्त चिकित्सेची कसोटी (लिटमस टेस्ट) ही ठरते. वृत्तपत्रीय दुस-या प्रकारच्या लेखनात अग्रलेख, स्तंभ व समकालीन प्रासंगिक लेख येतात. त्यांची मूळ बैठक वैचारिक असते. त्या लेखनास प्रबोधनाचे अधिष्ठान असते. शिळोप्याचा उद्योग म्हणून वृत्ते ज्या सहजतेने रचली जातात तसे या लेखनाचे असत नाही. लेखक ज्या गांभीर्याने ते लिहितात, तितक्याच गांभीर्याने वाचक ते वाचतात, विचार करतात, अंतर्मुख होतात. समाजास कार्यप्रवण करण्याचे, दिशा दाखवण्याचे, नवसमाज रचनेचे सामर्थ्य या लेखनात असते. त्यामुळे आज स्तंभ, अग्रलेख लिहायचा म्हणून अस्वस्थ असणारे कितीतरी संपादक स्तंभलेखक मी पाहिले, अनुभवले आहेत. डॉ. सुभाष देसाई अशांपैकी एक स्तंभलेखक होते. त्याचे ‘जागतिक घडामोडी' हे पुस्तक वैश्विक नवरचनेचा साक्षेपी आलेख होय.
 संपादक, स्तंभलेखक दैनिकांची रोजची वा नैमित्तिक गरज म्हणून काही लिहीत राहतात. त्यांच्या लेखन सातत्याने एक वाचकवर्ग जसा तयार होतो, तशी त्या लेखनातून एक विचारशृंखला, शैलीही आकारत राहते. महाराष्ट्रातील महावृत्तपत्रांतून महासंपादकांनी अनेक महास्तंभ चालविले ('महा' हे अलीकडचे एक नवे फॅड/प्रकरण होय) म.टा.च्या गोविंद तळवलकरांचे 'वाचता वाचता', ‘परिक्रमा', अग्रलेख ‘लोकसत्ता' च्या माधव गडक-यांचे ‘चौफेर', अरुण टिकेकरांचं ‘तारतम्य' (१/२), लोकमतच्या महावीर जोंधळेचे ‘संबळ', ‘सकाळ'च्या विजय कुवळेकरांचं ‘पैलू' हे सारे ग्रंथरूप-सुभाष देसाईंचे ‘जागतिक घडामोडी' हे दैनिक पुढारीतील स्तंभलेखनाचेचे ग्रंथरूप.

 डॉ. सुभाष देसाईंना जागतिक, राजकारण, समाजकारण, अर्थकारणाची

वेचलेली फुले/६४