पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहणार.

 या आठवणी वाचताना मागे केव्हातरी डॉ. अनिल अवचट यांनी किर्लोस्कर मासिकात लिहिलेला लेख 'डॉक्टर - जगवतात नि नागवतात' आठवला. आज रुग्णाला डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जायचे म्हटले की नको वाटते. याची अनेक कारणे आहेत. उपचार खर्चीक होत आहेत. उपचारपूर्व तपासण्या आवश्यक/अनिवार्य असतात का याबाबत समाज साशंक आहे. शस्त्रक्रिया, औषधे, लॅबोरेटरी यांचे एकछत्री साम्राज्य रुग्णांच्या की डॉक्टरांच्या फायद्याचे यांची चर्चा सुरू झाली आहे. कट प्रैक्टिस लपून राहिलेली गोष्ट नाही. अशा पार्श्वभूमीवर 'रुग्णानुबंध' वाचणे हे मोठे समाजशिक्षण व समुपदेशन होय.

 'स्वस्थस्य स्वास्थरक्षणम्।
 आतुरस्य विकार प्रशमनं च ||'

 डॉक्टरांचे पहिले कार्य माणसाच्या आरोग्याचे रक्षण करणे होय. म्हणजे अनावश्यक उपचार टाळणे. व्याधी असेल तरच उपचार हा आदर्श परत एकदा या व्यवसायात रुजणे कसे गरजेचे आहे, ते हे पुस्तक समजावते. डॉक्टरांचे काम केवळ गोळ्या देणे नसून दिलासा देणे, आरोग्यविषयक गैरसमज दूर करणे, रुग्णांच्या मनातील भीती, नैराश्य दर करणे, त्याचा आत्मविश्वास वाढवणे हे पण आहे.

 साहित्य म्हणजे केवळ मनोरंजन नसून ते जीवन मार्ग आक्रमण्याचे, जीवनाचा चक्रव्यूह भेदण्याचे, मार्गदर्शनाचे साधन होय, याची प्रचिती देणारे हे पुस्तक. डॉ. दिलीप शिंदे मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते, तेव्हा पहिल्या दिवशी त्यांच्या शिक्षकांनी तुम्ही मेडिकलला का आलात असे विचारल्यावर बाळबोध उत्तर दिले होते, 'मला रुग्णांची सेवा करायची आहे.' त्यांच्या उत्तरावर सर्व विद्यार्थी खो-खो हसले होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या हसण्यात शिक्षकही सामील झाले होते. आज ते शिक्षक, विद्यार्थी डॉक्टर समाज क्षितिजावर कुठेच नाहीत. आहेत फक्त डॉ. दिलीप शिंदे. जी माणसं स्व विवेकाच्या कसोटीवर चालत राहतात, समाज फक्त त्यांना नि त्यांनाच लक्षात ठेवतो नि त्यांच्या मागे उभा राहतो.

◼◼

वाचावे असे काही/११४