पान:मराठी रंगभुमी.djvu/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.

गर्जीपणामुळे अथवा कर्तव्यपराङ्मुखतेमुळे असो, लोकांची नाटकाविषयींची अभिरुचि बिघडत चालली असून दिवसेंदिवस तिला अपायकारक वळण लागत चालले आहे यांत कांहीं संशय नाही. ही स्थिति लवकर न सुधारेल तर त्याचे अनिष्ट परिणाम समाजास भोगावे लागतील. ही अभिरुचि कशी बिघडली आहे, सांप्रत कशा प्रकारची नाटकें रंगभूमीवर येत आहेत व मराठी रंगभूमीची एकंदर स्थिति कशी आहे याचें सामान्य स्वरूप वाचकांस कळावे या हेतूनें हें पुस्तक मी लिहिले आहे. हे स्वरूप पूर्णपणे लक्षांत यावे, ह्मणून गेल्या ६० वर्षांतील महाराष्ट्रांतील नाटकमंडळ्यांचा इतिहास यांत दिला आहे. अलीकडे नाट्यविषयासंबंधाने लेख लिहितांना कोणी संगीत नाटके अगोदर झाली असें ह्मणतो, तर कोणी गद्य नाटकें अगोदर झाली असें ह्मणतो; कोणी कै. आण्णा किर्लोस्कर यांजकडे संगीत नाटकाचे आद्यकर्तृत्व देतो, तर कोणी रा. त्रिलोकेकर यांजकडे देतो; कोणी शारदा हेच सामाजिक विषयावरील पहिले नाटक ह्मणतो, तर कोणी दुसरेच काही तरी म्हणतो; कोणी गद्य नाटकें चांगली ह्मणतो, तर कोणी संगीत चांगली म्हणतो; कोणी किर्लोस्करांच्या चाली पसंत करितो, तर कोणास पाटणकरी चालीशिवाय चाल आवडत नाहीं; सारांश, कोणी कांहीं कोणी कांहीं म्हणत असतो. हा सर्व घोंटाळा दूर होऊन मराठी रंगभूमीवर आलेल्या नाटकांची व नाटकमंडळ्यांची संगतवार हकीकत कळून चांगले कोणते व वाईट कोणतें याचा विचारकरण्यास लोकांस लावावे हा दुसरा हेतु हा इतिहास लिहिण्यांत आहे. हा इतिहास लिहिण्याचे कामी गेल्या २०।२५ वर्षांत महाराष्ट्रांतून फिरणाऱ्या निरनिराळ्या कंपन्यांचे खेळ