पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जबाबदारी म्हणून संग्रह करणे शहाणपणाचे. तेच तत्त्व दानासही लागू आहे. दुस-याची काळजी, गरज हे आपण आपले कर्तव्य मानतो का? यावरच माणूसपण अवलंबून असते.

     असताना कोणीही दान करील. नसतानाही दान करता आलं पाहिजे. स्वतः भुकेला राहून कुणाची भूक भागवाल तर ते उच्चकोटीचे दान. अशा दानात परम संतोष भरलेला असतो. दुस-याचं दुःख आपलं वाटणं म्हणजे संवेदनशीलता. ती उसनी नाही घेता वा आणता येत. ती असायला हवी नि असते. ती जाणीवेतून येते. चमडी देगा लेकिन दमडी नहीं,' म्हणणारी माणसं नुसती कंजूष असत नाहीत तर ती निष्ठुरही असतात. ती स्वतःच्या इच्छा, आकांक्षाचे बळी देऊन जे धन जोडतात, त्याचा पायाच मुळी हिंसक असतो. मग त्याची परिणतीही हिंसक होते.
     तुम्ही दुस-याला साधने देता तेव्हा तो काही मोठा दानधर्म असतो, असे नाही. तुमचे दातृत्व लोक गृहीत धरून काही सामाजिक संकल्प करत असतील, उपक्रम हाती घेत असतील तर दातृत्व तुमची वृत्ती झाली आहे, असे समजायला हरकत नाही. दुस-याचे होणे हे स्वविसर्जन खरे उच्चकोटीचे दान. निसर्ग जसा असतो तसे माणसाने असायला हवे. 'देणा-याचे हात घेण्याची कल्पना हे जगातले सर्वोत्तम अनुकरण म्हणायला हवे. मिडास, कुबेर व्हायचं की कर्ण हे ठरवता आले पाहिजे. शत्रूवर हल्ला करताना आपण कदाचित मरू हे माहीत असूनही जो सैनिक प्राणाची बाजी लावतो, तो आपल्या जीवनाचा हेतूपूर्वक बळी देतो, म्हणून बलिदान श्रेष्ठ असते. अनाथ, अंध, अपंगांना दान चांगलेच पण, त्याहीपेक्षा त्यांना सनाथ करणे, प्रज्ञाचक्षु, दिव्यांग बनवणे लाख मोलाचे. ते केवळ देण्याने घडत नाही. ते होण्याने शक्य असते. आपणाला दुस-याचं कोणी होता आलं तर समजावं, ‘त्यांना जीवन कळले हो!' असं जीवनाचं आकलन होणं म्हणजे जीवन सार्थकी लागणं.



                            जाणिवांची आरास/१५४