E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2)/'''पक्ष्यांची उपयुक्तता '''

विकिस्रोत कडून

पक्ष्यांची उपयुक्तता

कधी कधी असे म्हटले जाते की मानवाशिवाय पक्षी जगू शकतात पण ह्या पृथ्वीतलावर पक्षी नसतील तर मानवाला जगणे मुश्कील होऊन जाईल. मानवासाठी पक्ष्यांची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे.

कीडनियंत्रक

जगात कीटकांच्या लक्ष्यावधी प्रजाती असून त्यांचा प्रजनन दर एवढा जलद असतो की पक्ष्यांच्या अनुपस्थितीत केवळ एका वर्षात कीटक व त्यांचे सुरवंट संपूर्ण जगातील हिरवळ संपवून टाकू शकतात. किटक व त्यांचे सुरवंट पक्ष्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक होत. एक चिमणीची जोडी दिवसभरात २२० ते २६० कीटक-अळ्या पिल्लांना भरविते असे आढळून आले आहे. कीटक व त्यांचे सुरवंट उभ्या पिकांचा फन्ना उडवितात व जगातील शेतीउत्पन्नाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान करतात. शेतात नांगरणी चालू असताना अनेक बगळे, कोतवाल तसेच नीळकंठ पक्षी उडणाऱ्या किटकांना संपवतात.

उपद्रवी जीवांचे संहारक

घुबड, पिंगळे, नारझीनक (Kestrel), कापशी, शिक्रा, बाज, गरुड इ. प्रजातीचे मांसाहारी शिकारी पक्षी शेतीप्रदेशातील उंदरांचा संहार करतात. म्हणूनच भारतीय पुराणात विशेषतः घुबडांना लक्ष्मिचे वाहन मानले गेले आहे. एका उंदरांची जोडी वर्षभरात ८८० उंदरांची प्रजनन करू शकते. उंदीर भारतात फार मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करतात. दुर्दैवाने आपल्या देशात विविध अंधश्रद्धा व जादूटोण्याच्या नावाखाली घुबडांचे शिरकाण केले जाते. अनेक युरोपिअन (नेदरलँड्स, इंग्लंड, स्वीडन) तसेच मध्य-पूर्व एशियाई (इस्त्रायल, सौदी अरेबिया) देशांमध्ये घुबडांनी शेतात राहावे म्हणून त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी बसविली जात आहेत. त्यामुळे त्यांचा शेतातील उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. जगात उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांचा उच्छाद नियंत्रित करण्यासाठी विविध विषारी औषधांच्या खर्चापायी करोडो रुपये खर्च केले जातात.


निसर्गाचे सफाई कामगार

गिधाडे, घारी व कावळे निसर्गाचे सफाई कामगार होत. गावकुसाबाहेर फेकलेले मृत जनावर गिधाडे काही तासात फस्त करून टाकत. उकीरड्यावरचे इतर खरकटे अन्नपदार्थ संपवायचे कार्य घारी, कावळे करतात. गिधाडांची संख्या रोडावल्या मुळे बगळे, साळुंक्या, पारवे (कबुतर), एवढेच नव्हे तर चिमण्यासुद्धा उकिरड्यावर दिसायला लागल्या आहेत. पक्षी नसते तर अशा उकीरड्या द्वारा व मृत जनावरांद्वारा अनेक संसर्गजन्य रोग पसरू शकतात.

फुलांचे परागीभवन

फुलांमधील मधुरस चाखणारे विविध प्रजातीचे पक्षी फुलांना भेटी देत फिरत असतात. पक्षी मधुरस चाखत असतात तेव्हा फुलातील परागकण त्यांच्या चोचीला, कंठाला अथवा मानेला चिकटून दुस-या फुलापर्यंत पोचतात. अशा प्रकारे फुलांचे पर-परागीभवन (Cross-pollination) घडते. पर-परागीभवनामुळे निसर्गात गोड पक्व फळं तर तयार होतातच तसेच वनस्पतींच्या नवीन प्रजातींची उत्क्रांती सुध्दा होते. पक्षी आणि फुलांचे निसर्गात फार महत्त्वाचे संबंध असून त्यांनी एकमेकांसाठी स्वतःला उत्क्रांत करून घेतले आहे, जसे फुले जास्त भडक झाली व पक्ष्यांच्या चोची बाकदार व धारदार झाल्या.

बीजप्रसारक

अनेक प्रकारची फळे खाल्ल्यानंतर फळांचे बीज पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे दूरपर्यंत जाऊन पडते. काही झाडांच्या बीजाला जाड कवच असते. ते कवच केवळ पक्ष्यांच्या पोटात विरघळते व नंतरच ते बीज उगवते, अन्यथा नाही. वड, पिंपळ, उंबर आदी झाडांची बीजे पक्ष्यांच्या पचनक्रियेतून गेल्याशिवाय रुजत नाहीत. बुलबुल, कोकीळ, धनेश (Hornbil), तांबट, हळद्या, मैना इ. अनेक प्रजातीचे फलाहारी पक्षी बीज प्रसाराचे काम करतात. असे म्हणतात की फलाहारी पक्षी ‘वनीकरणाचे' काम करतात. फलाहारी पक्ष्यांमुळेच घाणेरी सारख्या वनस्पतीचा जगभर प्रसार झालाय.

पक्ष्यांपासूनची उत्पादने

पूर्वी भारतात बगळ्यांच्या पंखाचा फार मोठा व्यापार होत असे. स्त्रियांच्या विविध प्रकारच्या टोप्या तसेच वस्त्रप्रावारणांमध्ये या पिसांचा उपयोग होत असे. अजूनही आपल्या देशात


मोराच्या पिसांची फार मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. हिंदी महासागरातील बेटांवर घरटी करणाऱ्या पाकोळ्यांच्या (Edible Nest Swiftlet) घरट्यापासून सूप तयार करतात. ह्या सूपला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी आहे. या पाकोळीची पिल्लं मोठी होऊन उडून गेल्यानंतर रिकामी झालेली घरटी काढून घेतली जातात.

पक्ष्यांच्या विष्ठेपासून उच्चप्रतीचे खत तयार होते. विशेषतः ज्या ठिकाणी हजारो पक्ष्यांच्या सामुहिक वीण वसाहती (जसे करकोचे, पाणकावळे आदींचे सारंगागार) आहेत त्या ठिकाणी विष्ठा जमवून विकल्या जाते.

पक्षी पर्यटन (बर्ड टुरिझम): वन संवर्धनाचा नवा मंत्र

पक्षी निरीक्षणाचा छंद जगात झपाट्याने वाढत असून केवळ पक्षी बघण्यासाठी, पक्ष्यांचे छायाचित्रण करण्यासाठी तसेच संशोधनासाठी प्रवासाला निघणाऱ्यांची संख्या आता प्रचंड वाढली आहे. त्यासोबतच पक्षी व रानवाटा दाखविणारे स्थानिक वाटाडे, पक्षीतज्ञ, महत्त्वाच्या ठिकाणी राहण्याची सुविधा, खानपानाची सुविधा ह्या सर्व गोष्टींची गरज निर्माण झाली. त्यासोबतच संपूर्ण जगातच पक्षी पर्यटनाची लहर आलेली आहे. आपल्या देशात असलेल्या प्रचंड पक्षी वैविध्यामुळे देशांतर्गत तसेच विदेशातील आंतरराष्ट्रीय पक्षी प्रेमी पर्यटनाला येत असून त्याद्वारा हजारो रोजगार उपलब्ध झाले आहेत. पक्षी पर्यटनाला चालना मिळाल्यामुळे स्थानिक लोकांचा वन वनसंवर्धनाला जोरकस पाठींबा मिळविणे सोपे झाले आहे. पक्ष्यांना मारुन खाण्यापेक्षा जंगल (व त्यातील पक्षी) वाचवून आपल्याला जास्त व अखंड आर्थिक उत्पन्न मिळू शकते याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. त्यामुळे अतिशय दुर्गम भागात सुध्दा वन-व्यवस्थापन समित्या स्थापन होऊन स्थानिक लोकच वन संवर्धनाचे काम करू लागले आहेत.