हैदराबाद विमोचन आणि विसर्जन

विकिस्रोत कडून




हैदराबाद :
विमोचन आणि विसर्जन



लेखक
कै. प्राचार्य नरहर कुरुंदकर



संपादक
प्रा. द.पं. जोशी
(मराठी साहित्य परिषद, हैदराबाद)
}}


रजत प्रकाशन, औरंगाबाद.


◆ हैदराबाद विमोचन आणि विसर्जन ◆
कै. प्राचार्य नरहर कुरुंदकर
(Hyderabad : Vimochan Ani Visarjan)
Late Prin. Narhar Kurundkar
◆ प्रकाशन क्र. ३२ ◆
◆ सर्वाधिकार ◆
श्रीमती प्रभावतीताई नरहर कुरुंदकर,
५६, भाग्यनगर, नांदेड.
◆ प्रकाशिका   ◆ अक्षरजुळणी
सौ. अनिता अ. कुमठेकर   प्रविण ज. शिंदे
रजत प्रकाशन,    साई कॉम्प्युटर्स
४६२, आविष्कार कॉलनी,   ४७, नवभारत सोसायटी,
सिडको, एन-६, औरंगाबाद.   एन-८, सिडको, औरंगाबाद.


◆ मुद्रक    ◆ मुखपृष्ठ
राजमुद्रा ऑफसेट,   व्यंकटेश देशपांडे
जी-२४, एम.आय.डी.सी. चिकलठाणा,  १८ (अ), समाधान कॉलनी,
औरंगाबाद.     जिल्हा न्यायालयाच्या मागे,
      औरंगाबाद.
◆ प्रथम आवृत्ती : २३ मार्च १९८५ ◆
◆ द्वितीय आवृत्ती : ७ सप्टेंबर १९९८ ◆
◆ मूल्य २५० रुपये ◆



द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने

 कै. प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या "हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन" या ग्रंथाची दुसरी आवृत्ती वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. प्रकाशन व्यवसायात उतरल्यानंतर अल्पकाळात आम्हाला कुरुंदकर गुरुजींसारख्या प्रख्यात विचारवंताचा ग्रंथ प्रकाशनाची संधी मिळाली ही घटना आनंददायक आहे. कुरुंदकर गुरुजींचा जुना परिचय आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी असलेले आमचे जिव्हाळ्याचे संबंध यामुळेच हे शक्य झाले आहे.

 आमच्यासारख्या नवोदित प्रकाशकाच्या कामावर विश्वास ठेवून श्रीमती प्रभाताई कुरुंदकर वहिनींनी सरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे अधिकार आम्हाला देऊन दाखविलेला विश्वास, आम्हाला भविष्यात प्रेरणादायी ठरणार आहे. त्याचबरोबर मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेशचे प्रा. द. पं. जोशी व प्रा. डॉ. पद्माकर दादेगावकर यांनी प्रेमाने या आवृत्तीचे अधिकार आमच्याकडे सोपविण्याबद्दल संमती दर्शविली त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

 या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने काही गोष्टी प्रारंभीच स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते. त्या म्हणजे प्रा. द. पं. जोशी यांनी जो ग्रंथ संपादित केला तो आम्ही अगदी जसाच्या तसा पुनर्मुद्रित केला आहे. त्यात कुठेही फेरबदल केले नाहीत. यासंदर्भात श्री जोशी सरांशी चर्चा झाली तेंव्हा त्यांनी या विषयावर गेल्या १५ वर्षांत झालेल्या नवीन संशोधनाचा, प्रकाशित ग्रंथांचा आढावा घेऊन परिशिष्टात ती माहिती द्यावी म्हणजे नव्या परिस्थितीत जुने नवे संदर्भ अधिक स्पष्ट होतील असे सांगितले होते. हा आढावा त्यांनीच घेण्याचे मान्यही केले होते. परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने "त्यांनी सहा महिन्यात ही आवृत्ती संपून जाईल. आपण तिसऱ्या आवृत्तीत परिशिष्ट जोडू" असे सांगून सदिच्छाही व्यक्त केल्या.

 याशिवाय स्वातंत्र्य. सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी उदार मनाने आम्हाला सदिच्छा दिल्या. प्रा. भुजंग वाडीकर, प्रा. दत्ता भगत, प्रा. फ. मु. शिंदे, श्री. महावीर जोंधळे, श्री. चक्रधर दळवी, श्री. सूर्यकांत सराफ, श्री. भालचंद्र देशपांडे, अॅड. शेषराव मोरे, प्रा. सौ. श्यामल कुरुंदकर-पत्की, प्रा. सौ. तेजस्विनी देव, श्री. विश्वास कुरुंदकर (किर्लोस्कर, पुणे), श्री. सुरेश सावंत, प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, प्रा. माधव. कृष्ण सावरगावकर, श्री. प्रभाकर रावके, श्री. सुधाकर डोईफोडे, श्री. एल. के. कुलकर्णी, प्रा. राम जाधव, प्रा. भगवान काळे यांनी वेळॊवेळी प्रोत्साहन दिले. याशिवाय मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. प्रताप वांगर, उपजिल्हाधिकारी दिलीप शिंदे. स्वा. सै. नाथप्रसाद दीक्षित. प्रा. प्रकाश कामताकर, डा. मनसुख आचलिया यांनी अनमोल सहकार्य केल्यामुळेच हे ग्रंथरूप साकार झाले आहे. तसेच आमचे ग्रंथप्रकाशक व वितरक सर्वश्री निर्मलकुमार सूर्यवंशी, जयप्रकाश सुरनर, दत्ता डांगे, मधुकर कोटलवार, डी. बी. देशपांडे यांनी ग्रंथवितरणातील सहभागाची शाश्वती दिल्यामुळेच आम्हाला बळ मिळाले.

 यानिमित्ताने एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती ही की, या ग्रंथातील कुरुंदकर गुरुजींची भाषणे व लेख १९८१ पूर्वीची आहेत. गेल्या १५-१६ वर्षात हैदराबाद मुक्तिलढ्यावर अनेकांनी पुस्तके लिहिली, संशोधन केलेले आहे. त्याचा आढावा घेणे आम्हाला जमले नाही. मात्र कुरुंदकर गुरुजींनी त्या त्या काळात व्यक्त केलेले मत जसेच्या तसे आम्ही वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम केलेले आहे. वाचकांनीही गुरुजींचे विचार त्या त्या संदर्भात लक्षात घ्यावे ही विनंती. अभिप्रायात आदरणीय गोविंदभाईंनी म्हटल्याप्रमाणे नवीन माहिती पुढे आलेली असली तरी जुने विचार, संशोधन चिकित्सा याचे मूल्य घटत नसते हे खरे !

 आमचे मोठे दीर प्रा. डॉ. विलास कुमठेकर व जाऊबाई प्रा. सौ. ज्योती कुमठेकर यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांचे प्रयत्न नसते तर हे पुस्तक आम्ही प्रकाशित करू शकलो नसतो एवढे सांगितले तरी पुरेसे आहे. या ग्रंथाचे सुबक मुद्रण अल्पावधीत करून दिल्याबद्दल राजमुद्रा ऑफसेट परिवाराचे हार्दिक आभार. तसेच हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या व्यक्ति, संस्थांनी प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून मी हे निवेदन संपविते.

 आमचे काही हितचिंतक गेल्या १०-१२ वर्षांपासून समग्र कुरुंदकर वाङमय या प्रकल्पावर विचार करीत आहेत. प्रा. माधव कृष्ण सावरगावकर यांनी एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे कुरुंदकर गुरुजींचे एकूण साहित्य जवळजवळ सहा हजार पृष्ठांचे आहे. यातील बहुतांश ग्रंथ पुणे येथील ख्यातनाम ग्रंथ प्रकाशन संस्था देशमुख आणि कंपनी व इंद्रायणी साहित्य यांनी प्रकाशित केलेले आहेत. प्रस्तुत प्रकल्पात या संस्थांनी मनःपूर्वक सहकार्य केल्यास प्रकल्प सिद्धीस जाणे सहज शक्य आहे. या प्रकल्पासाठी जे संपादक मंडळ नेमण्याचा आम्ही विचार करीत आहोत त्यांत या संस्थांचे प्रतिनिधी तर असतीलच शिवाय गुरुजींना जाणणारे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील ख्यातकीर्त साहित्यिक असतील. हा प्रकल्प येत्या ५-६ वर्षांत सिद्धीस जावा अशी आमची परमेश्वरास प्रार्थना आहे. सदर ग्रंथाच्या रसिक वाचकांस आम्ही वरील प्रकल्पात सर्वतोपरी सहकार्य व आशीर्वाद देण्याची आम्ही अतिशय नम्रतेने प्रार्थना करीत आहोत.

 धन्यवाद!

सौ. अनिता अ. कुमठेकर
 
 (प्रकाशिका)
 


पहिल्या आवृत्तीच्या
प्रकाशकाचे निवेदन

 साधारण दीड वर्षापूर्वी नांदेड येथे कै. नरहर कुरुंदकरांच्या निवासस्थानी कागदपत्रांची छाननी करताना भांगडिया स्मारक व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे हस्तलिखित नजरेस आले. ही व्याख्याने कुरुंदकरांनी १९७८ मध्ये दिली होती व ती सेलू येथील मित्रांनी शब्दशः उतरून घेतली होती. मजकूर महत्त्वाचा होता. पण तो परिष्कृत करणे व कुठेतरी प्रसिद्ध होणे इष्ट एवढेच त्या क्षणी वाटले. याच विषयावर कुरुंदकरांनी वेळोवेळी केलेले स्फुट लेखन नजरेसमोर होतेच. मित्रांशी विचारविनिमय करताना हा लेखसंग्रह मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेने प्रकाशनासाठी घ्यावा ही कल्पना पुढे आली. या ग्रंथात कुरुंदकरांनी १९३८ पासूनच्या इतिहासाची मीमांसा केली आहे. १९२० - १९३८ या कालखंडाचा इतिहास परिषदेने वेगळा सिद्ध केला आहे व तोही याच ग्रंथाच्या समवेत प्रकाशित करण्याचे ठरत आहे. हे दोन्ही उपक्रम एकाच वेळी पूर्ण होऊन एक ऐतिहासिक कार्य परिषदेने पूर्ण केले आहे. मराठी वाचक तसेच जाणकार या उपक्रमाचे यथोचित स्वागत करतील असा भरवसा वाटतो.

 हा ग्रंथ सिद्ध करताना अनेकांचे साहाय्य घ्यावे लागले. ह्या पुस्तकाची कल्पना स्फुरण्यापासून ते त्याच्या पूर्ततेपर्यंत आमचे मित्र श्री.आनंद साधले यांनी भरपूर परिश्रम घेतले. विशेषतः ध्वनिफितीवरील व्याख्यानांचे परिष्करण त्यांनी प्रकृती ठीक नसतानाही शुद्ध प्रत तयार केली. त्याबद्दल परिषद त्यांची ऋणी आहे. सेलू येथील नूतन विद्यालयाचे प्राचार्य श्री.द.रा.कुलकर्णी यांनी व्याख्याने प्रसिद्ध करण्यास अनुमती दिली व ध्वनिफीत कागदावर उतरण्याची आरंभीची जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्री.जोगदंड (मुंबई) यांनी आमची निकड लक्षात घेऊन त्वरित मुद्रणप्रत करून दिली. या सर्वांचे आम्ही आभारी आहो.

 हा ग्रंथ प्रकाशनासाठी परिषदेकडे सोपविला याबद्दल आम्ही श्रीमती प्रभा कुरुंदकर यांचे ऋणी आहो.

गुढी पाडवा
द.पं.जोशी
 
२३ मार्च १९८५
कार्यवाह