सत्यार्थ प्रकाश/१. भूमिका

विकिस्रोत कडून



॥ ओ३म् सच्चिदानन्देश्वराय नमो नमः ॥

भूमिका[संपादन]


[पहिल्या आवृत्तीच्या अपेक्षा दुसर्या आवृत्तीचा महत्त्व][संपादन]

ज्यावेळी मी हा ‘सत्यार्थप्रकाश’ ग्रंथ तयार केला त्यावेळी आणि त्यापूर्वी संस्कृतमधून भाषण करण्याची आणि अध्ययन-अध्यापन देखील संस्कृतमधूनच करण्याची आणि माझ्या जन्मभूमीची भाषा गुजराती असल्याने (हिंदी) भाषेचे ज्ञान मला विशेष नव्हते. म्हणून भाषा अशुद्ध झाली होती. आताही भाषा बोलण्याचा व लिहिण्याचा मला अभ्यास झाला आहे. म्हणून या ग्रंथाची भाषा व्याकरणानुसार शुद्ध करून तो दुसऱ्यांदा छापविला आहे. काही काही ठिकाणी शब्द व वाक्यरचना यांत भेद झाला होता म्हणून तसे करणे उचित होते. कारण तसा भेद केल्याशिवाय भाषेची परिपाठी सुधारणे कठीण होते. तथापि अर्थामध्ये भेद केलेला नाही. प्रत्युत तो विशेषतेने लिहिला आहे. प्रथम छापण्यात कोठे कोठे ज्या चुका राहिल्या होत्या त्या काढून व सुधारून व्यवस्थित केल्या आहेत.


[प्रत्येक समुल्लासाचा विषय-निर्देश][संपादन]

हा ग्रंथ १४ समुल्लासात म्हणजे चौदा विभागात रचलेला आहे. त्यांतील १० समुल्लास पूर्वार्धात असून चार उत्तरार्धात आहेत. परंतु शेवटचे दोन समुल्लास आणि त्यानंतरचे स्वसिद्धांत काही कारणामुळे पहिल्या आवृत्तीत छापू शकले नव्हते. आता ते सुद्धा छापण्यात आले आहेत.

(१) पहिल्या समुल्लासात ईश्वराच्या ओंकार आदि नावांची व्याख्या;

(२) दुसऱ्या समुल्लासात मुला मुलींचे शिक्षण;

(३) तिसऱ्या समुल्लासात ब्रह्मचर्य, पठण-पाठण व्यवस्था, सत्यासत्य ग्रंथांची नांवे आणि शिकण्याची व शिकविण्याची पद्धति;

(४) चौथ्या समुल्लासात विवाह व गृहस्थाश्रम याचे आचरण;

(५) पाचव्या समुल्लासात वानप्रस्थ व संन्यास आश्रमांचे विधी;

(६) सहाव्या समुल्लासात राजधर्म;

(७) सातव्या समुल्लासात वेद ईश्वर विषय;

(८) आठव्या समुल्लासात जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय;

(९) नवव्या समुल्लासात विद्या, अविद्या, बंध व मोक्ष यांची व्याख्या;

(१०) दहाव्या समुल्लासात आचार, अनाचार आणि भक्ष्याभक्ष्य विषय;

(११) अकराव्या समुल्लासात आर्यावर्तीय मतमतांतरांचे खंडन-मंडन विषय;

(१२) बाराव्या समुल्लासात चार्वाक, बौद्ध आणि जैन मतांचे विषय;

(१३) तेराव्या समुल्लासात खिस्ती मताचा विषय;

(१४) चौदाव्या समुल्लासात मुसलमान मताचा विषय;

आणि चौदा समुल्लासांच्या शेवटी आर्यांच्या सनातन वेदविहित मताची विशेषेकरून व्याख्या लिहिली आहे. जिला मी सुद्धा यथावत मानतो.


[सत्यार्थ प्रकाश ग्रंथाची रचनाच्या मुख्य उद्देश][संपादन]

हा ग्रंथ लिहिण्याचे माझे मुख्य प्रयोजन सत्य-सत्य अर्थाचा प्रकाश करणे आहे. अर्थात जे सत्य आहे ते सत्य आणि जे मिथ्या आहे ते मिथ्याच म्हणून प्रतिपादन करणे सत्य अर्थाचा प्रकाश समजला आहे. सत्याच्या ठिकाणी असत्य व असत्याच्या ठिकाणी सत्य प्रकाश करणे हे सत्य म्हटले जात नाही परंतु जो पदार्थ जसा आहे त्याला तसा म्हणणे, लिहिणे व मानने सत्य म्हटले जाते.


[पक्षपाती मनुष्याचे स्वभाव][संपादन]

जो माणूस पक्षपाती असतो तो आपले असत्यही सत्य असल्याचे आणि आपल्या विरोधी मत असणाऱ्याचे सत्यही असत्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी उद्युक्त होतो. म्हणून त्याला सत्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणूनच उपदेश किंवा लिखाण यांच्या द्वारे सर्व लोकांसमोर सत्य-असत्याचे स्वरूप उलगडून दाखविणे हे विद्वान आप्तजनांचे मुख्य कार्य आहे. नंतर लोकांनी स्वत: आपले हिताहित ओळखून सत्यार्थ ग्रहण करावा आणि मिथ्यार्थ सोडून सदा आनंदात राहवे.


[मनुष्याचा आत्मा सत्यासत्य जाणणारा ][संपादन]

मनुष्याचा आत्मा सत्यासत्य जाणणारा आहे. तथापि आपला स्वार्थ, हट्ट, दुराग्रह आणि अज्ञान वगैरे दोषांमुळे तो सत्याला सोडून असत्याकडे वळतो परंतु या ग्रंथात असे काही करण्यात आलेले नाही आणि कुणाचे मन दुखवावे अथवा कुणाचे नुकसान करावे असे आमचे तात्पर्य नसून. मनुष्य जातीची उन्नती व उपकार व्हावा, माणसांनी सत्यासत्य ओळखून सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करावा. कारण सत्योपदेशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीने मनुष्य जातीची उन्नती होऊ शकत नाही.


[मानव जातीचे हितचिंतकांचे सत्य मत ग्राह्य][संपादन]

या ग्रंथामध्ये काही ठिकाणी अनवधानाने किंवा तपासण्यात व छापण्यात एखादी चूक राहून गेली असेल तर ती आमच्या लक्षात आली किंवा कोणी आमच्या लक्षात आणून दिली तर जे काही सत्य असेल त्याप्रमाणे सुधारणा करण्यात येईल. परंतु जर कोणी पक्षपाताने अथवा भलत्याच शंका-कुशंका काढून खंडन-मंडन करू पाहील तर त्याकडे लक्ष दिले जाणार नाही. अर्थात जर कोणी मनुष्यमात्राचा हितचिंतक बनून एखादी गोष्ट आमच्या लक्षात आणून देईल तर तिची सत्यासत्यता पडताळून पाहून त्याचे म्हणणे स्वीकारले जाईल.


[सत्याच्या स्थापनेचा सिद्धांत][संपादन]

प्रत्येक पंथामध्ये आजकाल पुष्कळ विद्वान आहेत. ते पक्षपात सोडून सर्वांना मान्य असणारे सिद्धांत अर्थात सर्वांना अनुकूल असणाऱ्या सत्य गोष्टींचा स्वीकार आणि परस्परविरोधी गोष्टींचा त्याग करून एकमेकांशी प्रेमाने वागतील व वागवतील तर जगाचे पूर्ण कल्याण होईल. कारण विद्वानांमधील विरोधामुळे अविद्वानांमधील वैमनस्य वाढते. त्यामुळे नाना प्रकारची दुःखे वाढतात आणि सुखाची हानी होते. स्वार्थी लोकांना ही हानी प्रिय असते. तिने सर्वमानवांना दुःखाच्या सागरात बुडविले आहे.


[सत्याचे विजय आणि असत्याचे पराभव][संपादन]

त्यांच्यापैकी जो कोणी सार्वजनिक हित लक्षात घेऊन पुढे सरसावतो त्याला विरोध करण्यास स्वार्थी लोक तयारच असतात. ते त्याच्या मार्गात अनेक प्रकारची विघ्ने उभी करतात. परंतु ‘सत्यमेव जयते नानृतं, सत्येन पन्था विततो देवयाना:’ [मुण्डक-उप॰ ३। १। ६],  म्हणजे नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. सत्यानेच विद्वानांचा मार्ग प्रशस्त होतो. असा दृढ निश्चय मनात बाळगल्यास आप्त लोक परोपकार करण्याच्या बाबतीत उदासीन न होता सत्य अर्थाचा प्रकाश करण्यापासून कधी दूर जात नाहीत.


[धर्म-प्राप्तीच्या कार्य परिणामे अमृतसारखेच][संपादन]

‘यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्।’ [श्रीमद्भगवद्गीता १८। ३७], हे गीतेचे वचन आहे. हा मोठा दृढ निश्चय आहे की त्याचा अर्थ असा की जी जी विद्या व धर्मप्राप्तीची कर्मे आहेत ती करताना प्रथम विषासारखी वाटतात व नंतर अमृतासारखी बनतात. या गोष्टी मनात ठेवून मी या ग्रंथाची रचना केली आहे. श्रोते आणि वाचक यांनी पहिल्यापासूनच याच्याकडे प्रेमाने पाहावे आणि या ग्रंथाचे खरेखुरे तात्पर्य जाणून घेऊन यथायोग्य ते करावे.


[सर्व पंथांमध्ये सत्य गोष्टींचा स्वीकार][संपादन]

या ग्रंथाची रचना करताना मी असे अभिप्राय मनासमोर ठेवले आहे की सर्व पंथांमध्ये ज्या-ज्या गोष्टी सत्य आहेत. त्यांच्या बाबतीत कोणाचाच विरोध नसल्यामुळे त्यांचा स्वीकार करून विविध मतमतांतरांमध्ये ज्या गोष्टी मिथ्या आहेत त्यांचा त्याग करावा. यात हा सुद्धा अभिप्राय आहे की सर्व पंथांमध्ये ज्या गुप्त किंवा उघड अशा गोष्टी आहेत त्या प्रकाशात आणून विद्वान व अविद्वान अशा सर्व लोकांसमोर त्या मांडल्या आहेत. त्यायोगे सर्वांकडून सर्व गोष्टींचा विचार केला जावा व त्यांनी परस्परांचे प्रेमी होऊन एका सत्याचे अनुसरण करावे.


[मनुष्याच्या लक्षणे][संपादन]

जरी मी आर्यावर्तात जन्मलो आणि येथेच राहतो. तरी पण या देशातील विविध पंथांच्या खोट्या गोष्टींचा पक्ष न घेता जे काही खरे आहे त्यावरच मी प्रकाश टाकतो. दुसऱ्या देशांतील वा पंथांतील लोकांच्या बाबतीतही माझे हेच अभिप्राय आहेत. स्वदेशातील लोकांशी मनुष्योन्नतीच्या बाबतीत माझे जे वर्तन आहेत सेच वर्तन परदेशी लोकांसाठी सर्व सज्जनांनीही वर्तन ठेवावे. कारण मीही जर कुणा एकाचा पक्षपाती झालो असतो तर आजकाल आपल्या मताची स्तुती, मंडन व प्रचार करून इतरांच्या मतांची निंदा, खंडन व प्रतिबंध करणारे जे लोक आपल्याला दिसतात त्यांच्या सारखाच मीही झालो असतो. परंतु असे करणे माणुसकीला सोडून आहे. कारण ज्याप्रमाणे पशु बलवान बनून निर्बलांना त्रास देतात आणि मारूनही टाकतात त्याप्रमाणे माणसे मानव शरीर मिळूनही तसेच वागू लागली तर ते मनुष्यस्वभावाला धरून नसून अशी माणसे पशुवत आहेत. या उलट जो बलवान बनून दुबळ्यांचे रक्षण करतो त्यालाच माणूस असे म्हणता येते. जो कोणी स्वार्थाने आंधळा बनून इतरांची हानी मात्र करतो तो पशूचा मोठा भाऊ आहे.


[११ व्या आणि १२ व्या समुल्लासविषये][संपादन]

आता आर्यावर्त याविषयी मी मुख्यत: अकराव्या समुल्लासापर्यंत लिहिले आहे. या समुल्लासांमध्ये जे सत्यमत मांडलेले आहे ते वेदोक्त असल्यामुळे मला सर्वथा ग्राह्य आहे आणि नवीन पुराणांतील व तंत्रादि ग्रंथातील ज्या गोष्टींचे मी खंडन केले आहे त्या सर्वस्वी त्याज्य आहेत.

बाराव्या समुल्लासात चार्वाकाच्या मताची चर्चा केलेली आहे. सध्या ते मत जवळजवळ अस्ताला गेले आहे. हा चार्वाक बौद्ध व जैन यांच्यापेक्षा अनीश्वरवादाशी अधिक संबद्ध आहे. तो चार्वाक सर्वांहून अधिक नास्तिक आहे. त्याच्या प्रयत्नांना आळा घालणे जरुर आहे. कारण मिथ्या गोष्टींना आळा घातला नाही तर जगात पुष्कळशे अनर्थ माजतील.

चार्वाकाचे जे मत आहे ते बौद्धजैन मतासारखेच आहे ते विवेचन बाराव्या समुल्लासात केले आहे. बौद्ध व जैन यांची मते चार्वाकाच्या मतांशी जुळणारी आहेत. थोडाफार विरोधही आहे. जैनमतही बहुतांशी चार्वाक व बौद्ध मतांशी मिळते-जुळते आहे तरी काही बाबतीत भेदही आहे. त्यामुळे जैनमत ही वेगळी शाखा समजली जाते. त्या मतातील वेगळेपणा बाराव्या समुल्लासात दाखवून दिला आहे. यथायोग्य तेथे समजून घ्यावे. बौद्ध व जैन या पंथांविषयीही लिहिले आहे.


[जैनमताचे मान्य ग्रंथ][संपादन]

यांपैकी बौद्धांच्या दीपवंशादि प्राचीन ग्रंथांमध्ये बौद्धमताविषयी ‘सर्वदर्शनसंग्रह’ मध्ये जे काही आले आहे त्याचा उल्लेख आम्ही केला आहे. जैनांचे सिद्धांत सांगणारे ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत—

४ मूलसूत्रे—

(१) आवश्यकसूत्र, (२) विशेष आवश्यकसूत्र, (३) दशवैकालिकसूत्र, (४) पाक्षिकसूत्र.

११ अंगे—

(१)आचारांगसूत्र, (२)सुगडांगसूत्र, (३) थाणांगसूत्र, (४) समवायांगसूत्र, (५) भगवतीसूत्र, (६) ज्ञाताधर्मकथासूत्र, (७) उपासकदशासूत्र, (८) अन्तगडदशासूत्र, (९) अनुत्तरोववाईसूत्र, (१०) विपाकसूत्र, (११) प्रश्नव्याकरणसूत्र.

१२ उपांगे—

(१) उपवाईसूत्र, (२) रावप्सेनीसूत्र, (३) जीवाभिगमसूत्र, (४) पन्नगणासूत्र, (५) जम्बुद्वीपपन्नतीसूत्र, (६) चन्दपन्नतीसूत्र, (७) सूरपन्नतीसूत्र, (८) निरियावलीसूत्र, (९) कप्पियासूत्र, (१०) कपवडीसयासूत्र, (११) पूप्पियासूत्र, (१२) पुप्यचूलियासूत्र.

५ कल्पसूत्रे—

(१) उत्तराध्ययनसूत्र, (२) निशीथसूत्र, (३) कल्पसूत्र, (४) व्यवहारसूत्र, (५) जीतकल्पसूत्र.

६ छेदे—

(१) महानिशीथबृहद्वाचनासूत्र, (२) महानिशीथलघुवाचनासूत्र, (३) मध्यमवाचनासूत्र, (४) पिंडनिरुक्तिसूत्र, (५) औघनिरुक्तिसूत्र, (६) पर्युषणासूत्र.

१० पयन्नसूत्रे—

(१) चतुस्सरणसूत्र, (२) पंचखाणसूत्र, (३) तदुलवैयालिकसूत्र, (४) भक्तिपरिज्ञानसूत्र, (५) महाप्रत्याख्यानसूत्र, (६) चंदाविजयसूत्र, (७) गणीविजयसूत्र, (८) मरणसमाधिसूत्र, (९) देवेन्द्रस्तवनसूत्र व (१०) संसारसूत्र शिवाय नन्दीसूत्र व योगोद्धारसूत्र ही देखील प्रमाणित मानली जातात.

५ पंचांगे—

(१) पूर्वीच्या सर्व ग्रंथावरील टिका, (२) निरुक्ति, (३) चरणी, (४) भाष्य, हे चार अवयव आणि सर्व मूळ ग्रंथ मिळून पंचांग म्हटले जाते.

(श्वेतांबर जैनांतील) ढूंढ्यापंथाचे लोक अवयव मान्यकरीत नाहीत. या व्यतिरिक्त इतरही अनेकग्रंथ जैन लोक मानतात. त्यासंबंधी विशेष मत बाराव्या समुल्लासात पाहावे.


[जैन ग्रंथांच्या विषये][संपादन]

जैनांच्या ग्रंथात पुनरुक्तीचे लाखो दोष आहेत. त्यांचा असाही स्वभाव आहे की आपला जो ग्रंथ इतर पंथांच्या लोकांच्या हातात असेल अथवा छापलेला असेल त्याला काही लोक अप्रमाणित मानतात. त्यांची ही गोष्ट चुकीची आहे. कारण एखाद्या ग्रंथाला कोणी मान्यता दिली अथवा नाही दिली म्हणून काही तो ग्रंथ जैन मताबाहेर होत नाही. ज्या ग्रंथाला कुणाचीच मान्यता नसेल व कुणाही जैनाने त्याला कधीच मान्यता दिली नसेल असा ग्रंथ अग्राह्य होऊ शकतो. परंतु ज्याला कोणत्याही जैनाची मान्यता प्राप्त झालेली नाही असा एकही ग्रंथ नाही. म्हणून जो कोणी जो ग्रंथ मानीत असेल त्या ग्रंथातील विषयाचे खंडन-मंडन त्याच्या साठीच आहे असे समजले जाते.

परंतु असे अनेक लोक आहेत की जे त्या ग्रंथासंबंधी जाणतात व त्याला मानतात, तरीही सभेत किंवा वाद विवादामध्ये बदलून जातात. यामुळेच जैन लोक आपले ग्रंथ लपवून ठेवतात. ते इतर मताच्या लोकांना देत नाहीत, ऐकवित नाहीत किंवा वाचू देत नाहीत. कारण त्या ग्रंथामध्ये अशा काही असंभव गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्यांची उत्तरे जैनांना देता येत नाहीत. खोटी गोष्ट सोडून देणे हेच तिचे उत्तर होय.


[१३ व्या आणि १४ व्या समुल्लासविषये][संपादन]

तेराव्या समुल्लासात ख्रिस्ती लोकांचे मत लिहिले आहे. हे लोक बायबलला आपला धर्मग्रंथ समजतात. त्या संबंधीचे खास विवेचन तेराव्या समुल्लासात पहावे आणि चौदाव्या समुल्लासात मुसलमानांच्या मतासंबंधी लिहिले आहे. हे लोक कुराणाला आपल्या मताचा मूळ ग्रंथ मानतात. त्यांच्याविषयी चौदाव्या समुल्लासात सविस्तर विवेचन पहावे आणि त्यानंतर वैदिक मताविषयी लिहिले आहे.


[वाक्यार्थाचा बोध होण्याची चार कारणे][संपादन]

या ग्रंथकर्त्यांच्या तात्पर्याकडे जो कोणी विरुद्ध मनभावनेतून पाहील त्याला काहीच माहिती होणार नाही. कारण वाक्यार्थाच्या बोधात चार कारणे असतात— आकांक्षा, योग्यता, आसक्तितात्पर्य या चारही गोष्टी ध्यानात ठेवून जो कोणी ग्रंथाचे वाचन करतो तेव्हा त्याला ग्रंथाचा अर्थ योग्य प्रकारे कळतो.

‘आकांक्षा’— कोणत्याही विषयावर वक्ता आणि वाक्यातील पदे यांची आकांक्षा परस्पर संबद्ध असते.

‘योग्यता’ — ती म्हटली जाते की ज्याच्याकडून जे काही होऊ शकते. उदाहरणार्थ, पाण्याने सिंचन करणे.

‘आसत्ति’— ज्या पदाचा ज्या अन्य पदाशी संबंध असतो त्याला त्या पदाच्या जवळ ठेवून बोलणे अथवा लिहिणे.

‘तात्पर्य’— ज्या हेतूने वक्ता शब्दोच्चारण करतो अथवा लेखक लेख लिहितोत्या हेतूशी त्याचे वचन अथवा लेखन संबद्ध करणे.


[हट्टी व दुराग्रही मनुष्यांचे व्यवहार][संपादन]

अनेक हट्टी व दुराग्रही लोक वक्ताच्या अभिप्रायाविरुद्धकल्पना करतात. विशेषत: एखाद्या विशिष्टमताचे किंवा पंथाचे लोक असे करतात. कारण एखाद्या मताच्या आग्रहामुळे त्यांची बुद्धी अज्ञानरूपी अंधकारामुळे नष्ट होते. म्हणून ज्याप्रमाणे मी पुराणे, जैनांचे ग्रंथ, बायबल व कुराण यांच्याकडे प्रथमच वाईट नजरेने न पाहता त्यांच्यातील गुणांचे ग्रहण व दोषांचा त्याग करतो आणि इतर मानवांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतो त्याप्रमाणे सर्वांनी करणे उचित होय.

या पंथांचे थोडेसेच दोष मी दाखविले आहेत. ते पाहून लोक सत्यासत्य मताचा निर्णय करू शकतील आणि सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करण्यास समर्थ बनतील. कारण मानव जातीला भडकवून, परस्परांविरुद्ध मत निर्माण करून एकमेकांना शत्रू बनवून कलह माजवणे ही गोष्ट विद्वानांच्या स्वभावा बाहेर आहे.


[सज्जनांचे मुख्य कर्तव्य][संपादन]

हा ग्रंथ वाचून अडाणी लोक उलटाच विचार करतील. तथापि बुद्धिमान लोक याचा योग्य तो अभिप्राय समजून घेतील. म्हणून माझे परिश्रम सफल झाले असे मी समजतो; आणि माझे म्हणणे सर्व सज्जनांसमोर मी ठेवतो. वाचकांनी हा ग्रंथ स्वत: वाचून व इतरांना वाचून दाखवून माझे परिश्रम यशस्वी करावेत. त्याचप्रमाणे पक्षपात न करता सत्यार्थाचा प्रकाश करणे हे माझे व इतर सर्व सूज्ञांचे मुख्य कर्तव्य आहे.

सर्वात्मा सर्वान्तर्यामी सच्चिदानन्द परमात्मा कृपा करून हा आशय विस्तृत व चिरस्थायी करो.

॥ अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वरशिरोमणिषु ॥

॥ इति भूमिका ॥

 

(स्वामी) दयानन्द सरस्वती

स्थान : महाराणाजींचे उदयपुर

भाद्रपद शुक्ल पक्ष, संवत १९३९