शेतकऱ्याचा असूड/पान २

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

दर चैत्नमासीं वर्षप्रतिपदेस भटब्राह्यण शेतकर्‍यांचे घरोघर वर्षफळ वाचून त्यांजपासून दक्षिणा घेतात. तसेंच रामनवमी व हनुमंतजयंतीचे निमित्तानें भटब्राह्यण आपले आळींत एकादा सधन शेतकरी असल्यास त्याजपासून अगर गरीबच सर्व असल्यास त्यांजपासून आळीपाळीनें वर्गण्या जमा करून तूपपोळयांची ब्राह्यणभोजनें घेतात.

जेजुरीचे य़ात्नेंत शेतकरी आपल्या मुलांबाळांसह तळें वगैरे ठिकाणीं अंचोळी करिते- वेळीं भटब्राह्यण तेथें संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एकेक शिवराई दक्षिणा घेतात. ही यात्ना सुमारें पाऊण लाखाचे खालीं नसते ; व त्यांपैकीं कित्येक अल्लड सधन शेतकर्‍यांचे मांडीवर खल्लड मुरळया बसतांच त्यांजपासून देवब्राह्यण सुवासिनीचे निमित्तानें तूप-पोळयापुर्ते द्रव्य उपटतात. शिवाय शेतकर्‍यांचें भंडारखोबरें, खंडोबा देवापुढें उधळण्या-करितां खरेदी करितेवेळीं, भटब्राह्यण वाण्याबरोबर आंतून पाती ठेवून त्यास बरेंच नाडितात.

दर आषाढमासीं एकाद्शीस भटब्राह्यण शिधे देण्याची ऐपत नसणार्‍या कंगाल शेतकर्‍यापासूनसुद्धां निदान एक पैसातरी दक्षिणा घेतात. पंढरपुरीं एकंदर सर्व शेतकरी आपल्या स्त्निया व मुलेंबाळें यांसहित चेद्रभागेंत स्नान करितेवेळीं भटब्राह्यण नदीचे किनार्‍यावर उभें राहून, संकल्प म्हणून त्या सर्वांपासून एकेक शिवराई दक्षिणा घेतात. ही यात्ना सुमारें एक लक्षाचे खालीं नसते ; व त्यापैकीं कांहीं शेतकर्‍यांपासून दहा सुवासिनीब्राह्यणांस व कांहीं शेतकर्‍यांपासून निदान एक सुवसिनीब्राह्यणास तूपपोळयांचे भोजन देण्यापुरत्या रकमा उपटून माजघरांत आपले घरची मंडळी पात्नावर बसविलेली असते, तेथें प्रत्येक शेतकर्‍यास निरनिराळें नेऊन म्हणतात कीं, "हे पहा तुमच्या सुवासिनीब्राह्यण जेवावयास बसत आहेत. त्यांस कांहीं, दक्षिणा देण्याची मर्जी असल्यास द्या, नाहींतर त्यांस दुरून नमस्कार करून बाहेर चला म्हणजे ते देवास ( विठोबास ) नैवेद्य पाठवून जेवावयास बसतील." असे प्रामाणिक धंदे करून पंढरपुरांतील शेंकडों ब्राह्यण बडवे श्रीमान झाले आहेत.

दर श्रावणमासी नागपंचमीस बिळात शिरणार्‍या मूर्तिमंत नागाच्या टोपल्या बगलेत मारून शेतकर्‍यांचे आळोआळीने, नागकू दूध पिलाव, "नागदक्षिणां समर्पयामि" म्हणून पैसा गोळा करीत फिरण्याची भटब्राह्यणांची वडिलोपार्जित वृत्ति, वैदू व गारोडयांनीं बळकाविली असता त्याजवर ते नुकसानीबद्दल फिर्याद न करिता, केवळ दगडाच्या किंवा चिखलाच्या केलेल्या नागांच्या पुजा करून अज्ञानी शेतकर्‍यापासून दक्षिणा घेतात.

पौर्णिमेस श्रावणीच्या निमिताने महाराच्या गळयांतील काळया दोर्‍यांची खबर न घेता कित्येक डामडौली कुणब्यांचे गळयांत पांढर्‍या दोर्‍याची गागाभटी १ जानवीं घालताना शिधादक्षिणेवर घाड घालितात. एकंदर सर्व शेतकर्‍यांचे हातात राख्यांचे २ गंडे बांधून त्यांजपासून एकेक पैसा दक्षिणा घेतात. वद्यप्रतिपदेस भटब्राह्यण बहुतेक सधन शेतकर्‍यास सप्ताहाचा नाद लावून त्यांचे गळयांत विणे घालून त्यांचे इष्टमित्नांचे हातांत टाळ देऊन त्या सर्वास मृदंगाचे नादात पाळीपाळीने रात्नंदिवस पोपटासारखी गाणी गाऊन नाचता नाचता टणटणा उडंया मारावयास लावून आपण त्यांचेसमोर मोठया डौलाने लोडाशी टेकून त्यांच्या गमती थोडा वेळ पाहून, दररोज फराळाचे निमित्ताने त्याजपासून पैसे उपटून गोकूळ अष्टमीचे रात्नीं हरिविजयातील तिसरा अध्याय वाचून यशोदेचे बाळंतपणाबद्दल चुडेबांगडयांची सबय न सांगता, शेतकर्‍यापासून दक्षिणा उपटतात. प्रातःकाळीं पारण्याचे निमित्तानें शेतकर्‍यांचे खर्चाने करविलेलीं तुपपोळयांची जेवणें आपण प्रथम सारून उरलेले शिळेपाके अन्न शेतकर्‍यासहित टाळकुटे मृदंगे वगैर्‍यांस ठेवून घरी निघून जातात.

शेवटी श्रावण महिन्यांतील सरते सोमवारी भटब्राह्यण बहुतेक देवभोळया अज्ञानी शेतकर्‍यापासून तूपपोळयांची निदान एकतरी सुवासिनीब्राह्यणभोजन घालण्याचे निमित्ताने यथासांग शिधेसामार्‍या घेऊन, प्रथम आपण आपल्या स्त्निया मुलांबाळांसहित जेवून गार झाल्यावर प्रसादादाखल एकदोन पुरणपोळया व भाताची मूद भलत्यासलंत्या इस्तर्‍यावर घालून, दुरून शेतकर्‍यांचे पदरात टाकून, त्यांच्या समजुती काढितात.

१ शूद्र लोकांत जानवीं घालण्याचा प्रथम प्रचार नव्हता. गागाभट याने शिवाजीराजापासून सुवर्णतुला दान घेऊन त्यास जानवें घातले, तेव्हापासून ही चाल पडली आहे. २ या राख्या सुताच्या असून एक पैशास सुमारें २५ मिळतात. दर भाद्रपदमासीं भटब्राह्यण हरतालिकेचे मिषानें अबालबृद्ध शेतकरणीपासून एकेक, दोनदोन पैसे लुबाडितात. गणेशचतुर्थीस शेतकर्‍यांचे घरांत गणपतीपुढें टाळया वाजवून आरत्या म्हणण्याबद्दल त्यांजपासून कांहीं दक्षिणा घेतात. ऋषिपंचमीस रांडमुंड शेतकरणी स्त्नियांस पाण्याचे डबकांत बुचकळया मारावयास लावून भटब्राह्यण, शेतकर्‍यांचे जिवावर गणपतीचे संबंधानें दिवसा मोदकांसह तूपपोळयांचीं भोजनें सारून वरकांति कीर्तनें श्रवणकरण्याचे भाव दाखवून आंतून अहोरात्न नामांकित कसविणांच्या सुरतीकडे मंगळ ध्यान लावून त्यांचीं सुस्वर गाणीं ऐकण्यांत चूर झाल्यामुळे, शेतकर्‍यांचे घरांतील कुंभारी गौरीच्या मुखाकडे ढुंकूनसुद्धां पहात नाहींत.

चतुर्दशीस अनंताचे निमित्तानें शेतकर्‍यांपासून शिधेदक्षिणा घेतात. पितृपक्षांत भट-ब्राह्यण एकंदर सर्व शेतकरी लोकांत पेंढारगर्दी उडवून त्यांच्यामागें इतके हात धुवून लागतात कीं, त्यांच्यांतील मोलमजुरी करणार्‍या दीनदुबळया निराश्रित रांडमुंड शेतकरणींपासूनही त्यांच्या गणपतीच्या नांवानें त्यांजपासून निदान सिधे, दक्षिणा व भोपळयाच्या फांका घेऊन आपल्या पायांवर डोचकीं ठेवल्याशिवाय त्यांच्या सुटका करीत नाहींत. मग तेथें भोंसले, गायकवाड, शिंदे आणि होळकर यांची काय कथा ? तशांत कपिलषष्ठीचा योग आला कीं, भटब्राह्यण कित्येक सधन शेतकर्‍यांस वाई, नाशिक वगैरे तीर्थांचे ठिकाणीं नेऊन त्यांजपासून दानधर्माचे मिषानें बरेंच द्रव्य हरण करितात व बाकी उरलेल्या एकंदर सर्व दीनदुबळया शेतकर्‍यांपासून स्नान करतेवेळीं निदान एकएक पैसा तरी दक्षिणा घेतात. शेवटीं अमावास्येस भटब्राह्यण शिधेदक्षिणांचे लालचीनें शेतकर्‍यांचे बैलांच्या पायाच्या पुजा करवितात. विजयादशमीस घोडे व आपटयांचीं झाडें पूजनाचे संबंधानें शेतकर्‍यांपासून दक्षिणा घेऊन कोजागिरीस त्यांचा हात चालल्यास शेतकर्‍याचे दुधावर सपाटा मारितात.

अमावास्येस लक्ष्मीपूजन व ह्या पूजनाचे संबंधानें शेतकर्‍यापासून लाह्या बत्ताशांसह दक्षिणा घेतात. दर कार्तिकमासीं बलिप्रतिपदेस भटब्राह्यण मांगामहाराप्रमाणें हातांत पंचार्त्या घेऊन शेतकर्‍यास ओवाळतां ओवाळतां "इडापिडा जावो आणि बळीचें राज्य येवो" हा मूळचा खरा अशिर्वाद देऊन शेतकर्‍यांच्या ओवाळण्या न मागतां, हातावर शालजोडया घेऊन त्यांस यजमानाचीं नातीं लावून शेतकर्‍यांचे घरोघर माली मागत फिरतात.

आळंदीचे यात्नेंत शेतकरी आपल्या कुटुंबासह इंद्रायणींत स्नानें करीत असतां भटब्राह्यण त्या सर्वांपुढें संकल्प म्हणून त्यांजपासून एकेक पैसा दक्षिणा घेतात. ही यात्रा सुमारें पाऊण लक्षाचे खालीं नसते. नंतर द्वादशीस देवब्राह्यणसुवासिनीचे निमित्ताने कित्येक देवभोळया शेतकर्‍यांपासून तूपपोळयांचीं व त्यांतून कोणी फारच दरिद्री असल्यास त्याजपासून साधा सिधा घेऊन आपापले कुटुंबासह भोजनें करून त्या सर्व अज्ञानी भाविकांस तोंडी पोकळ अशिर्वाद मात्न देतात.

शिवाय भोंवर गांवातील अज्ञानी शेतकर्‍यास पंधरवडयाचे वारीचे नादीं लावून त्या सर्वांपासून बारा महिने दर द्वादशीस पाळीपाळीनें तूपपोळयांचीं ब्राह्यणभोजनें काढितात. इतकेंच नव्हे परंतु कित्येक परजिल्ह्यांतील सधन शेतकर्‍यांस चढी पेटवून त्यांपासून तूपपोळयांचीं सहस्रभोजनें घालवितात. शेवटीं परगांवचे शेतकर्‍यांचे पंचांनी अदावतीनें गुन्हेगार ठरवून पाठविलेल्या शेतकर्‍यांचें क्षौर करवून त्यांस प्रायश्चित्ताचे निमित्तानें थोडें का नागवितात ?

वद्य द्वादशीस भटब्राह्यण शेतकर्‍यांचे आंगणांतील तुळशीवृंदावनासमोर धोत्राचा अंतरपाट धरून मंगलाष्टकाचे ऐवजीं दोन चार श्र्लोक व आर्या म्हणून तुळशींचीं लग्ने लावून शेतकर्‍यापासून आरतीचे पैशासह ओटीपैकीं कांहीं सामान हातीं लागल्यास गोळा करून जातात.

दर पौषमासीं मकरसंक्रांतीस भटब्राह्यण शेतकर्‍यांचे घरीं संक्रांतफळ वाचून त्यांजपासून दक्षिणा घेतात व कित्येक अक्षरशून्य देवभोळया शेतकर्‍यांस अगाध पुण्यप्राप्तीची लालूच दाखवून त्यांजकडून मोठया उल्हासानें त्यांचीं उसांचीं स्थळें भटब्राह्यणांकडून लुटवितात.

दर माघमासीं महाशिवरात्नीस भटब्राह्यण कित्येक शेतकर्‍यांचे आळींतील देवळांनीं शिवलीलामृताच्या अवृत्त्या करून सूर्योदयाचे पूर्वी समाप्ति करतेवेळीं त्यांजपासून ग्रंथ वाचण्याबद्दल शिधेदक्षिणा उपटून नेतात. दर फाल्गुनमासीं होळीपूजा करितांच, शेतकर्‍याजवळचें द्रव्य उडालें यास्तव म्हणा, अगर हिंदूधर्माचे नांवानें ठणाणा बोंबा मारितात, तरी हे भटजीबुवा त्यांजपासून कांहीं दक्षिणा घेतल्याविना त्यांस आपापल्या डोचक्यांत धूळमाती घालण्याकरितां मोकळीक देत नाहींत.

सदरीं लिहिलेल्या प्रतिवर्षी येणार्‍या सणांशिवाय मधूनमधून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण व ग्रहांचे उलटापालटीचे संबंधानें शेतकर्‍यापासून भटब्राह्यण नानाप्रकारचीं दानें घेऊन एकंदर सर्व पर्वण्या पाळीपाळीनें बगलेंत मारून, व्यतिपात भाऊबळानें शेतकर्‍यांचे आळोआळीनें भीक मागत फिरतात. शिवाय शेतकर्‍यांचे मनावर हिंदुधर्माचें मजबूत वजन बसून त्यांनीं निःसंग होऊन आपले नादीं लागार्वे म्हणून, सधन शेतकर्‍यांचे घरोघर रात्नीं भटब्राह्यण कधीं कधीं पांडवप्रताप वगैरे भाकड पुराणांची पारायणें करून त्यांजपासून पागोटयाधोत्नासह द्रव्यावर घाला घालून, कित्येक निमकहरामी भटब्राह्यण आपल्या शेतकरी यजमानाच्या सुनाबाळांस नादीं लावून त्यांस कुकूचकू करावयास शिकवितात. त्यांतून अधींमधीं संधान साधल्यास शेतकर्‍यांचे घरीं भटब्राह्यण सत्यनारायणाच्या पूजा करवून प्रथम शेतकर्‍यांचे केळांत सव्वा शेरांचे मानानें निर्मळ रवा, निरसें दूध, लोणकढें तूप, व धुवासाखर घालून तयार करविलेले प्रसाद घशांत सोडून नंतर आपल्या मुलांबाळांसहित तूपपोळयांचीं भोजनें सारून, त्यांजपासून यथासांग दक्षिणा बुचाडून, उलटें शेतकर्‍यांचे हातीं कंदिल देऊन घरोघर जातात.

इतक्यांतून शेतकर्‍यांपैकीं कांहीं दुबळे स्त्नी-पुरुष चुकून राहिल्यास भटपुराणिक त्या सर्वांस भलत्या एकाद्या देवळांत दररोज रात्नीं जमा करून त्यांस राधाकृष्णाची लीला बगैरेसंबंधीं पुराणें श्रवण करण्याचे नादीं लावतात. समाप्तीचे समयीं त्या सर्वांस चढा-ओढींत पेटवून त्यांजपासून तबकांत भल्या मोठया महादक्षिणा जमा केल्यानंतर, शेवटीं त्यांच्या निराळया वर्गणीच्या खर्चानें आपण मोठया थाटानें पालख्यांत बसून एकंदर सर्व श्रोतेमंडळीस मागेंपुढें घेऊन मिरवत मिरवत बरोबर जातात.कित्येक अक्षरशत्नु भटब्राह्यणांस पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळें ते आपल्यापैकीं एखाद्या बेवकूब ठोंब्यास ढवळयाबुवा बनवून त्याचे पायांत खडावा व गळयांत विणा घालून त्याजवर एकाद्या शद्राकडून भली मोठी छत्नी धरवून बाकी सर्व त्याचेमागें झांज्या, ढोलके ठोकीत "जे जे राम, जे जे राम " नामाचा घोष करीत अज्ञानी शेतकर्‍यांचे आळोआळीनें प्रतिष्ठित भीक मागत फिरतात.

कित्येक भटब्राह्यण मोठमोठया देवळांतील विस्तीर्ण सभामंडपांत आपल्यापैकीं एखाद्या देखण्या ज्वानास कवळेबुवा वनवून त्याचे हातांत चिपळयाविणा देऊन बाकी सर्व त्याचेमागें ओळीनें तालमृदुंगाचे तालांत मोठया प्रेमानें " राधा कृष्ण राधा " म्हणतां म्हणतां नाच्यापोरासारखे हावभाव करून दर्शनास येणार्‍या जाणार्‍या सधन रांडमुंडीस आपले नादीं लावून आपलीं पोटे भरून मोठया मौजा मारितात. कित्येक मतिमंद भटब्राह्यणांस भटपणाचा धंदा करून चैना मारण्यापुरती अक्कल नसल्यामुळें ते आपल्यापैकीं एखाद्या भोळसर कारकुनास देवमहालकरी बनवून बाकीचे ब्राह्यण गांवोगांव जाऊन अज्ञानी शेतकर्‍यांपासून देवमहालकर्‍यास नवस करवून त्यास त्यासंबंधानें बरेंच खोरीस आणितात. कित्येक भटब्राह्यणास वेदशास्त्नांचे अध्ययन करून प्रतिष्ठेनें निर्वाह करण्याची ताकद नसल्यामुळें ते आपल्यापैकीं एखाद्या अर्धवेडया भांग्यास बागलकोटचे स्वामी बनवून बाकीचे भटब्राह्यण गांवोगांव जाऊन " स्वामी सर्वांचे मनांतील वासना मनकवडया-सारख्या जाणून त्यांपैकीं कांहीं पूर्ण होण्याविषयीं अन्यमार्गानें बोलून दाखवितात." अशा नानाप्रकारच्या लोणकढया थापा अज्ञानी शेतकर्‍यांस देऊन त्यांस स्वामीचे दर्शनास नेऊन तेथें त्यांचें द्रव्य हरण करितात.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.