वनस्पतिवर्णन भाग १

विकिस्रोत कडून

शालोपयोगी भारतवर्ष,
हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास.

 मराठी चवथे इयत्तेपासून म्याट्रिकच्या क्लासापर्यंत विद्यार्थ्यास उपयोगी पडेल, अशी याची रचना केली आहे. सर्व शाळाखात्यांत हल्ली हाच इतिहास चालू माहे. पूर्वीची आवृत्ति सुधारून तीत नवीन उपयुक्त माहिती पुष्कळ घातली आहे. शिवाय प्राचीन व अर्वाचीन हिंदुस्थानचे नकाशे घातले आहेत. हल्ली या पस्तकाची ८वी आवृत्ति विक्रीस तयार आहे. किं, १४ आणे.

--------------------
बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास.

 मराठी दुसरे इयत्तेपासून चवथे इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांस उपयोगी पडेल, असा हा महाराष्ट्र देशाचा इतिहास भरपुर माहितीसह सुलभ भाषेत बडोदे येथील राजपुत्र विद्यालयाचे शिक्षक श्रीयुत गोविंद सखाराम सरदेसाई बी.ए.यांनी तयार केला आहे, व तो शाळाखात्याने पसंत करून वहाडप्रांतांतील शाळांत हल्ली चालू झाला आहे. लहान मुलांस इतिहासाचा बोध चटकन सुलम रीतीने होईल अशा प्रकारे परिशिष्टे, वंशावळी, वगैरे देऊन तो उपयुक्त केला आहे. प्रत्येक शाळामास्तराने या इतिहासाचा उपयोग अवश्य करावा. किं. २ आणे.

--------------------

 ग्रीसदेशचा संक्षिप्त इतिहास.-विद्यार्थ्यांस ग्रीक देशाच्या इतिहासाची अवश्य ती माहिती थोडक्यांत व्हावी, अशा पद्धतीने हा इतिहास विद्यार्थ्यांच्या व सर्वसाधारण लोकांच्या उपयोगाकरितां रा. गोविंद सखाराम सरदेसाई, बी. ए. यांनी तयार केला आहे. किं. ८ आणे.

--------------------

मुहूर्तमाला -- ज्योतीषासंबंधाने जे अनेक संस्कृत ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाधारे हा ग्रंथ आर्यारूपाने मराठीत रा. बाळकृष्ण दत्तात्रय जोशी यांनी तयार केलेला आहे. या पुस्तकांत शुभाशुभप्रकरण, २.--------, ३ संस्कारप्रकरण, ४ घटितप्रकरण, ५ ग्रहप्रकरण, ६ कृषिप्रकरण, ७. -----प्रकरण याप्रमाणे मुख्य सात प्रकरणे घेऊन तत्संबंधी एकंदर

-------- बसावे ह्मणून आर्यारूपाने दिले आहेत. शेवटीं 

परिशिष्टे जोडली आहेत, किंमत ४ आणे, 

सुलभ-औद्योगिक ग्रंथमाला.
पुस्तक १ लें.
---------------
व्यापारोपयोगी
वनस्पतिवर्णन.
---------------
लेखक
गणेश रंगनाथ दिघे,
अ० मास्तर, शाळा महाड; चक्रवर्ति बादशहा पांचवे जॉर्ज
या पुस्तकाचे कर्ते.
---------------
प्रकाशक
दामोदर सांवळाराम आणि मंडळी.
प्रिंटर्स, पब्लिशर्स व एजंटस्-ठाकुरद्वार, मुंबई.
---------------
सन १९१३ इ.
---------------
सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे रजिस्टर करून या पुस्तकसंबं-
धाचे सर्व हक्क स्वाधीन ठेवले आहेत.
---------------
किंमत ४ आणे.







-----
हे पुस्तक घर नंबर ४३४, ठाकुरद्वार मुंबई, येथे "इंदुप्रकाश" छापखान्यांत
रा० रा० दामोदर सांवळाराम यंदे यांनी छापून प्रसिद्ध केले.
-----







प्रस्तावना
---------------

वाचकही आपला हा हिंदुस्थानदेश म्हणजे उद्भिज्ज संपत्तीचे केवळ माहेरघर आहे. विंध्य, सह्य, सातपुडा, हिमालय, इत्यादि नगपंक्तींनी विराजमान झालेली ही आर्यभूमि म्हणजे अखिल जगांतील वनस्पतींची जणू काय जन्मदात्री माताच आहे. पृथ्वीच्या इतर भागांत अशी एकही वनस्पति नाहीं की, जिची निपज हिंदुस्थानांत होत नाही. निरनिराळ्या प्रकारची धान्ये, वेगवेगळ्या तऱ्हेच्या शाकभाज्या, अनेक प्रकारची फळफळावळे, इमारती लांकडे, शेकडों प्रकारची गवतें, वेत, कळक वगैरेसारखी तंतुमय काष्ठेंं, गळिताचीं धान्ये, कापूस, ताग, वगैरे सारख्या वस्त्रोपयोगी वनस्पति, नानाप्रकारच्या औषधि सर्व कांही हिंदुस्थानांत उत्पन्न होते. आमची ही आर्यमाता एका हाताने जशी आम्हांला अशा रीतीने उद्भिज्ज संपत्तीचा भरपूर पुरवठा करीत आहे, तशीच ती आपल्या दुसऱ्या हाताने आम्हांला विपुल खनिज संपत्तीचा परवठा करीत आहे. अशा वैभवशाली आणि उदार मातेच्या उदरीं जन्म मिळाल्याबद्ल आम्हांला अभिमानच वाटला पाहिजे.

 वर लिहिल्याप्रमाणे उद्भिज्ज आणि खनिज संपत्तीने परिपूर्ण अशा हिंदुस्थानांत जन्म पावून आमच्या पदरी अठरा विसवे दारिद्र्य असावें ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. अथवा आलस्यांत कालक्षेप करून आपल्या ईश्वरदत्त बुद्धीमत्तेचा दुरुपयोग करणारे लोक दारिद्यपंकांत आकंठ रुतून राहिले तर त्यांत आश्चर्य तरी कसले ? आमच्या देशांत उत्पन्न होणारा हा विपुल कच्चा माल परदेशांतीळ धाडसी व्यापारी आपल्या देशांत नेतात आणि तेथील कल्पक त्याच मालाचे हजारों उपयोगी जिन्नस बनवून ते इतर देशांप्रमाणेच आमच्या देशांत पाठवून त्यापासून मिळणाऱ्या द्रव्याने सधन बनतात. सारांश आमचे दारिद्र्य हे आमच्याच आळसाचे आणि अज्ञानाचे फळ आहे, त्याबद्दल दुसऱ्यास दोष देणे रास्त नाहीं.


मी ह्या छोटेखानी पुस्तकांत आपल्या देशांत सामान्यतः सर्वत्र उत्पन्न होणाऱ्या ठळक ठळक अशा ४० वनस्पतींपासून नेहमीच्या उपयोगाचे असे कोणते जिन्नस कसे तयार करावयाचे, याची माहिती देण्याचा यथामति प्रयत्न केला आहे, व प्रत्येक वनस्पतीचा औषधाचे काम कसा उपयोग होतो, हें थोडक्यांत संस्कृत वैद्यकाचे आधार देऊन सांगितले आहे.

 ह्या लहानशा पुस्तकाचे लक्ष्यपुर्वक आणि सप्रयोग अध्ययन करणाऱ्या माणसास आपल्या कुटुंबांतील किरकोळ आजार डॉक्टरांच्या अथवा वैद्याच्या मदतीवांचून सहज बरे करता येतील, आणि कुटुंबांतील माणसांच्या मदतीने तुटपुंज्या भांडवलावर घर बसल्या एखादा लहानसा धंदा काढून आपला चरितार्थ चालविता येईल, अशी अनुभवावरून खात्री वाटते.

 हे पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या कामी इंदुप्रकाशाचे चालक रा. रा. दामोदर सांवळाराम यंदे यांनी जें सहाय्य केले ते केले नसते तर मला ते प्रसिद्ध करतांच आलें नसते. त्यांच्या साह्यानेच हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

 हे पुस्तक वाचून वाचकांपैकी एकाला जरी उपरि निर्दिष्ट फलप्राप्ति झाली. तरी संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि गुजराथी अशा अनेक ग्रंथांचे अवलोकन करून हे पुस्तक लिहिण्याच्या कामीं मी जे परिश्रम घेतले, त्याचे सार्थक झालें असे मला वाटेल. असो, शेवटी ज्या जगचालक प्रभूच्या कृपेने माझा हा अल्प यत्न सिद्धीस गेला, त्याला अनन्यभावें प्रणाम करून मी हा प्रास्ताविक लेख येथे पुरा करितों,

    महाड, ता० २० मार्च

     १९१३.        लेखक.


अनुक्रमणिका.
---------------
विषय. पृष्ठ.   विषय. पृष्ठ.
१ तुळस ... ... ... २१ बाभूळ ... ... ... ३०
२ टाकळा........ ... २२ दुध्याभोपळा ... ... ३१
३ बेल ... ... ... २३ पतंग ... ... ... ३२
४ भेंड ... ... ... २४ चिंच ... ... ... ३३
५ मांदार, रुई ... ... ... २५ केळ ... ... ... ३४
६ वड, पिंपळ ... ... ... २६ आवळी ... ... ... ३७
७ करडई ... ... ... ११ २७ वाळा. ... ... ... ३८
८ अननस ... ... ... १३ २८ डाळिंब ... ... ... ४०
९ फणस ... ... ... १४ २९ कोरफड ... ... ... ४१
१० कांचन ... ... ... १६ ३० पळस ... ... ... ४३
११ पारिजातक ... ... ... १७ ३१ कपिल ... ... ... ४५
१२ हरभरा ... ... ... १८ ३२ वेळू ... ... ... ४६
१३ कुडा ... ... ... १९ ३३ कवठ ... ... ... ५०
१४ सावर ... ... ... २१ ३४ आल ( सुरंगी ) ... ... ५१
१५ गुंजवेल. ... ... ... २२ ३५ बकूळ ... ... ... ५३
१६ ताड ... ... ... २५ ३६ हिरडी ... ... ... ५४
१७ मेंदी ... ... ... २६ ३७ एरंड ... ... ... ५६
१८ खैर ... ... ... २७ ३८ जवस ... ... ... ५८
१९. शाळू ... ... ... २८ ३९ नारळीचे झाड ... ... ६०
२० पोपया. ... ... ... २९ ५० केवडा ... ... ... ६२


--------------------



मिरज संस्थानचे चीफ, ( सीनियर )
श्रीमंत गंगाधरराव गणेश
ऊर्फ
बाळासाहेब पटवर्धन,
के. सी. आय. ई.
यांस,
त्यांचा विद्याव्यासंग, औद्योगिक शिक्षण प्रसाराचे कामी, तसेच
कलाकौशल्य व हुन्नर यांस उन्नतावस्था आणण्याचे कामी
त्यांनी चालविलेले प्रयत्न, त्यांचा शांत व प्रेमळ
स्वभाव इत्यादि गुणांचे द्योतक म्हणून हा लहानसा
ग्रंथ प्रकाशाकाकडून त्यांस प्रेमपूर्वक अर्पण
करण्यात येत आहे.



व्यापारोपयोगी
वनस्पतिवर्णन.
---------------
१ तुळस.
तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद्हं तीर्थभूतं हि नायांति यमकिंकराः ।।
    'पद्मोत्तरखंड.'

 कृष्णप्रिया जी तुळशी तिचें वास्तव्य आम्हां हिंदु म्हणविणाऱ्या प्रत्येक गृहस्थाचे घरी बहुतकरून असावयाचेंच, तुळशीला संस्कृतांत 'वृंदा ' असे नांव आहे, आणि त्या वरूनच ' वृंदावन ' हा शब्द झालेला आहे. कृष्णतुळस, रामतुळस, रानतुळस आणि बाबीतुळस ऊर्फ सबजा, अशा तुळशीच्या चार मुख्य जाति आपल्या इकडे प्रसिद्ध आहेत. याशिवाय ' तुकामिरीयन ' तुळस म्हणून तुळशीची पांचवी एक जात असल्याचे, रा ० रा० श्रीपाद केशव नाईक यांचे गेल्या आगष्ट महिन्यांत आर्यमहिला समाजामध्ये ' तुळस' या विषयावर झालेल्या व्याख्यानाचा जो सारांश वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाला आहे, त्यावरून दिसून येते. हिंदुधर्मशास्त्रदृष्ट्या तुळशीचे महत्त्व किती आहे, हे पद्मोत्तर- खंडांतील जो उतारा शिरोभागी दिला आहे, त्यावरून दिसून येईल, याच अर्थाचे तुलसीमाहात्म्य, नामदेवांनीही आपल्या एका अभंगांत वर्णिले आहे. नामदेव म्हणतात :--
  तुळस असे ज्यांचे द्वारी, लक्ष्मी वसे त्याचे घरीं ।
  येवोनी श्रीहरि, क्रीडा करी स्वानंदें ।।
  तुळसीशी मंजुळ येतां, पळ सुटे यमदूतां ।
  अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां, नासे दुरित चित्ताचें ।।
तसेच पुंडरीक कवि आपल्या तुलसीस्तोत्रांत म्हणतात.---
  तुलस्या नापरं किंचिद्दैैवतं जगतीतले ।।
अशाच प्रकारे आणखीही अनेक कवींनी आपापल्या काव्यांत ‘तुलसीमाहात्म्य' निरनिराळ्या प्रकारांनी वर्णिले आहे. आमच्या हिंदुधर्मशास्त्रात २.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

जसे तुळशीला महत्त्व मिळाले आहे, तसेच मुसलमानी व ख्रिस्ती धर्मांतही तुळशीला पुष्कळ महत्त्व आहे. ख्रिस्तीधर्मसंस्थापक येशूख्रिस्त याच्या पूज्य थडग्यावर कृष्णतुळस रुजली होती, यामुळे तेथील लोक तुळशीला फारच पूज्य मानतात. इतकेच नाही, तर 'सेंट बेसिल डे' म्हणून ग्रीस देशांत एक सणही पाळण्यात येतो. त्या दिवशी तेथील बायका तुळशीची फांदी हातात घेऊन उपाध्यायांकडे जातात व त्यांजकडून त्यावर पवित्र पाणी शिंपडवून परत घरी येतात; नंतर घरांतील सर्व मंडळी त्यांतील थोडा थोडा पाला खातात, व शिल्लक राहिलेला घरांत टांगून ठेवतात. त्यायोगाने घरांत चिलट, डांस, उंदीर वगैरेचा त्रास होत नाही, अशी तिकडे समजूत आहे. मुसलमान लोकांतही ज्या ठिकाणी दर्ग्याजवळ प्रेते पुरतात, तेथे ‘बाबी तुळस' ऊर्फ सबजा लावण्याची चाल आहे. अशा तऱ्हेनें आज जगांत विशेष प्रामुख्यानें प्रचलित असलेल्या तिन्ही धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे.

 आतां वैद्यकशास्त्रदृष्टया तुळशीचे किती महत्त्व आहे ते पाहूं. तुळस ही हवा शुद्ध करणारी वनस्पति आहे, ही गोष्ट हिंदुवैद्यकशास्त्रज्ञांस अति पुरातन काळापासून अवगत आहे; आणि याच तत्त्वावर तुळशीचे झाड दाराजवळ लावण्याची चाल बहुतकरून प्रचारात आली असावी. सन १९०९ सालीं भरलेल्या 'इम्पीरिअल मलेरिया कॉन्फरन्सने ' असे ठरविले की, कृष्णतुळशीच्या योगाने मलेरिया खात्रीने हटतो. तुळशीची झाडे घराजवळ असल्याने डांस, चिलटे वगैरे क्षुद्र जंतूंचा नायनाट होऊन हवा शुद्ध होते, हे तत्त्व आधुनिक विद्वानांनाही पसंत आहे. तुळशीचे रसांत मध घालून दिल्यास मुलाची ओकारी बंद होते, तुळशीचे बी गाईचे दुधात वांटून दिल्यास मुलांची हगवण बंद होते. तुळशीचे बुंधांतील माती व तुळशीची पाने एकत्र चोळून बुधवारी अगर रविवारी नायट्यांस लाविली असतां, नायटे बरे होतात. कृष्णतुळशीच्या पाल्याचा रस डोळ्यांत घातल्यास रातांधळे जाते, तूप, कळीचा चुना व तुळशीचे पानांचा रस, या तीन जिनसा काशाचे भांड्यांत एकत्र करून घोटून लावल्यास गजकर्ण जाते. तुळशीची पाने गुळाशीं खाल्ल्यास, किंवा पानांचा व सुंठीचा काढा करून घेतल्यास ताप बरा होतो. तुळशीचा व माक्याचा रस कानांत घातल्यास फुटलेला कान बरा होते. चाकू वगैरेच्या योगाने झालेल्या लहान जखमेवर रस पिळून चोथा बसविल्यास जखम भरून येते. सर्पदंशावरही तुळशीचा उपयोग होतो. सर्पदंश झालेल्या मनुष्यास तुळशीची मूठभर पाने चावून खाण्यास सांगावी आणि तुळशीची मुळे लोण्यांत वाटून ती दंशाचे जागी बांधावी. थोड्याच वेळांत हा वर लावलेला पांढरा लेप विष ओढून घेऊन काळाकुट्ट होतो. हेमगर्भासारख्या जालीम मात्रा तुळशीचे रसांत       तुळस.      

-----

उगाळून देतात. वगैरे या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. आतां या झाडापासून व्यापारोपयोगी असा कोणता जिन्नस तयार करता येतो ते पाहूं.

 हल्ली आपल्या देशांत चहापानाचे प्रमाण किती वाढले आहे हे कोणास सांगावयास पाहिजे असें नाहीं. मुंबई-पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांची गोष्ट तर एका बाजूलाच राहू द्या; परंतु दहा पांच घरांच्या वस्तीच्या गांवांतूनही नियमाने चहापान करणारी माणसे हल्ली नजरेस पडतात. चहाच्या व्यापाराचा सन १९११ सालचा अहवाल नुकताच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाला आहे, त्यावरून असे दिसून येते की, हल्ली हिंदुस्थानांत एकंदर चहाचे मळे चार हजार चारशे चवदा (४४१४) असुन त्यांप्रीत्यर्थ पांचलक्ष, चौऱ्याहत्तर हजार, पांचशे पंचाहत्तर एकर जमीन गुंतून राहिली आहे. सन १८८५ सालापासुन चहाच्या लागवडीच्या जमिनीचे प्रमाण शंकड़ा एकशे दोनने वाढले आहे. अहवालाच्या साली हिंदुस्थानांत एकंदर २६,८५,२६,१९७ रत्तल चहा उत्पन्न झाला. प्रसिद्ध झालेल्या या माहितीवरून आपल्या देशांत चहापानाचे प्रमाण कसे वाढत आहे, ते वाचकांस कळून येईल.

 अशाप्रकारे आपल्या चा हिंदुस्थान देशांतील केवळ चहाप्रीत्यर्थ दरसाल खर्च होणारे लक्षावधि रुपये वाचविण्याचे सामर्थ्य तुळशीच्या झाडाच्या अंगी आहे, हे खालील हकिकतीवरून वाचकांच्या ध्यानात येईल.

 तुळशीची झाडे मंजिऱ्यांंवर आली म्हणजे त्यांची पाने तोडून ती सावलीत सुकवून ठेवावी. तसेच रानतुळशीची पानेही सुकवून ठेवावी. नंतर या दोन्ही झाडांची हीं सुकलेली पाने एकत्र चुरावीं व डब्यांत भरून ठेवावी, आणि जेव्हा चहा करणे असेल, तेव्हां आधण आलेल्या पाण्यांत ही भुकटी टाकावी. भुकटी घालण्याचे प्रमाण दहा तोळे पाण्यात एक तोळा भुकटी हे असावें. भुकटी टाकताच वर झाकण ठेवून भांडे चुलीवरून खाली उतरावे. नंतर पांच सात मिनिटांनी वरचे झाकण काढून चहा गाळावा. त्यांत दहा तोळे दूध व पांच तोळे साखर घालून तो चहा घ्यावा. हा चहा घेतल्याने चहापान करणारांचे समाधान होऊन जीर्णज्वर, पडसे, अग्निमांद्य वगैरे विकार नाहीसे होतात, व शरीर निरोगी बनते. तरी चहापानभक्तांनी याचा अनुभव घेऊन खात्री पटल्यास चहाप्रीत्यर्थ खर्च होणारे बरेचसे पैसे वाचवावे. तसेंच हा धंदा करू इच्छिणाऱ्या माणसानेही बीनखर्चात मिळणारी चहाची पावडर तयार करून विक्रीस ठेवल्यास हा एक किफायतशीर धंदा होणार आहे. रानतुळशीचा पाला न मिळेल, तर नुसत्या तुळशीच्या पाल्याची पावडर तयार करून ठेवावी. तिचाही चहाचे कामी चांगला उपयोग होतो.

---------------------
४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.
-----
टांकळा.

 टांकळा ही वनस्पति विशेषतः कोकण प्रांतीं तर मुलांबाळांना सुद्धां माहीत आहे. पावसाळ्यांत गांवाच्या खतारीला व इतर ठिकाणी याची हजारों झाडे दरसाल उगवतात व वाढतात, आणि मार्गशीर्ष महिना आला म्ह्णजे जागच्याजागीं सुकून जातात. याच्या कोवळ्या पाल्याची भाजी, हाच काय तो याचा उपयोग कोंकणप्रांतांतील बहुतेकांस ठाऊक आहे. टाकळा ही सूर्य विकासिनी, वनस्पति आहे. म्हणजे सूर्यास्तास तिची पाने मिटतात, व सूर्योदयाचे वेळी ती मोकळी होतात. पावसाचे दिवसांत ज्या वेळी सूर्य अभ्राच्छादित असतो, त्या वेळी खेडेगांवांतील लोकांचे टांकळा हे एक घड्याळच आहे. टांकड्याची पाने मिटू लागली म्हणजे गुराखी मुलें सूर्यास्ताची वेळ नजीक आली, असे समजून आपले गुरांचे कळप घराकडे आणण्याच्या तयारीस लागतात, व शेतकरी लोक आपली शेतांतील कामे आटोपून घरी येण्याची तयारी करू लागतात, अशा तऱ्हेने खेडेगांवांतील लोकांना टांकळा ही वनस्पति घड्याळाप्रमाणे उपयोगी पडते. आमच्या देशी वैद्यकांतही टांकळ्याचे बरेच उपयोग सांगितले आहेत. टाकळ्याच्या अंगीं कफ, कुष्ठ, कृमी, दमा, ज्वर, मेह, खोकला वगैरे विकार बंद करण्याचे गुण आहेत. करंजाच्या बिया, टाकळ्याचे बी व कोष्ठ ही गोमुत्रांत वाटून त्यांचा लेप केला असतां कुष्ठनाश होतो, असे वाग्भटांत सांगितले आहे. या वनस्पतीचे दुसऱ्याही कांहीं रोगांवर अनेक उपयोग सदर ग्रंथांत सांगितले आहेत; पण या वनस्पतीचा व्यापारासंबंधी कसा उपयोग होण्यासारखा आहे, त्याबद्लचा येथे विचार करूं.

 चहापानाप्रमाणेच कॉफी-पानाचाही प्रघात आपल्या देशांत बराच वाढला आहे. सन १८९५ साली दोन लक्ष एक्यांयशी हजार एकर जमीन कॉफीचे पिकाकरितां गुंतली होती. आता यापैकी बरीच कॉफी परदेशी रवाना होते, हें जरी खरे आहे; तरी आपल्या देशांतही कॉफीचा खप कमी होतो असे नाही. अंगांतील सुस्ती व आळस घालवून रक्तवृद्धि करणे आणि जाग्रणापासुन होणारे उपद्रव कमी करणे, हे जे कॉफीच्या अर्काचे गुणधर्म तेच किंबहुना त्यापेक्षाही कांहीं ज्यास्त गुणधर्म टांकळीच्या बियांच्या अर्काचे अंगी आहेत.

 कार्तिक, मार्गशीर्ष या महिन्याच्या सुमारास टाकळीची झाडे सुकू लागतात, त्या वेळी सदर्हू झाडे कापून आणावी, (झाडे उपटू नयेत, कारण उपटल्याने टाकळीच्या शेंगा जास्त वाळलेल्या असल्यास आंतील बी गळून खाली पडण्याचा संभव असतो.) नंतर ती झाडे दोन चार दिवस उन्हात चांगली       बेल.      

-----

सुकू द्यावी. सुकल्यानंतर दांडक्याने त्याच्या शेंगा झोडाव्या, म्हणजे शेंगांतील बीं खाली पडते, ते गोळा करून एक दोन दिवस उन्हात वाळवावे म्हणजे त्याच्या अंगचा दमटपणा जाऊन ते चांगले टिकाऊ बनते. हे बी कॉफीच्या बियाप्रमाणे तुपांत तळून त्याची बारीक भुकटी करावी, व ज्यावेळी कॉफी करावयाची असेल, त्या वेळी सदर्हू भुकटी पाण्यांत चांगली उकळवून त्यांत दूध, साखर, जायफळ वगैरे घालून गाळून घ्यावी. हा टाकळीचा अर्क चवीला कॉफीप्रमाणे असून, फार गुणकारी आहे. अशा तऱ्हेने टाकळीचे बी उपयोगांत आणल्यास फुकट जात असलेली एक वस्तु उपयोगात आणल्यासारखें होऊन, कॉफीस लागणारा खर्च थोड्या तरी प्रमाणानें कमी लागेल, यात शंका नाहीं.. बी काढून घेतल्यानंतर जी झाडांची कोडे राहतात, त्यांचा सरपणाप्रमाणे जळणाच्या कामी उपयोग होतो. तरी धंदा करू इच्छिणाऱ्या माणसाने हा देशी कॉफीचा [ टाकळ्यांच्या बियांचा ] बिन भांडवली धंदा अवश्य करून पहावा, अशी शिफारस आहे.

---------------------
३ बेल.

बेलाचे झाड सर्वांना माहीत आहे. निदान आम्हां हिंदु म्हणविणाऱ्या लोकांना तरी ते पूर्ण माहितीचे आहे. कारण:--

  नित्य बिल्वदळे शिवासि वाहत ।
   त्याएवढा नाहीं पुण्यवंत ।।
  तो तरेल हे नवल नव्हे सत्य ।
  त्याच्या दर्शनें बहुत तरती ।। १ ।।
     शिवलीलामृत अध्याय २ रा.
 अशा तऱ्हेने बिल्वपत्र शंकराला प्रिय असल्यामुळे त्याच्या पूजेला चार दोन तरी बिल्वपत्रे मिळवून ती त्याला अर्पण करण्याचा आमचा नित्य क्रम असतो आणि म्हणूनच बेलाचे झाड परसांत लावण्याचा हिंदुलोकांचा परिपाठ आहे. कांहीं खेडेगांवांतून तर बेलाच्या झाडांचे मोठमोठे बागच आहेत. परंतु बिल्वपत्रे शंकराला वाहण्यापलीकडे त्या झाडांचा दुसरा कांहीं उपयोग होत असल्याचे ऐकिवांत नाहीं.

 बेलाचे झाडाला गुजराथेंत 'बीली' संस्कृतांत ‘बिल्व' आणि हिंदुस्थानीत 'बेला' अशी नावे आहेत. बेलाचे झाडाला त्रिशूलाकार तीन दळाचे पान ६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

येते. याचे फूल हिरव्या रंगाचे असून फळ कठीण कवचाचें ब सुमारे आंब्याएवढे मोठे असते. त्याला बेलफळ असे म्हणतात. दशमूळाचे काढ्यामध्ये बेलमूळाची योजना केलेली आहे. तसेच मेदोरोगावर जो बिल्दादि काढा देतात, त्यामध्येही बेलमूळाची योजना केलेली असते; हे खालील श्लोकावरून दिसून येईल.

  बिल्वोऽग्निमंथः श्योनाकः काश्मरी पाटला तथा।
  क्वाथ एषां जयेन्मेदोदोषं क्षौद्रेण संयुतः ॥ १ ॥
       शार्ङगधर.

 म्हणजे बेल, ऐरण, टेंटू, शिवण, व पाडळ, या पांच औषधांचा काढा मध मिळवून घेतला असता मेदोरोग दूर होतो. बेलफळांतील गर गुळाबरोबर खाल्ल्यास आमांशाचा विकार बंद होतो. असे या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत; परंतु त्यासंबंधाने विशेष विचार न करितां आतां आपण बेलाच्या झाडाला दरवर्षी जी हजारों फळे येतात, आणि ती पिकल्यानंतर झाडाखाली पडून जागच्या जागी सुकून कुजून जातात, त्या वेलफळांपासून औषधाशिवाय कोणते उपयुक्त जिन्नस मिळण्यासारखे आहेत ते पाहूं.

 बेलफळे कोंवळी असतात, तेव्हा त्याची भाजी व लोणचे करतात. गरीब लोक फळे पिकल्यावर आंतील गर खातात. तो गुळमट असतो. मातीच्या चित्रांना रंग देण्याकरितां जे रंग तयार करतात, ते तकाकण्याकरितां त्यांत डिंकाचे पाणी घालावे लागते. रंगाला तकाकी आणण्याचे हे काम बेलफळापासूनही होण्यासारखे आहे. चांगली पक्व झालेली बेलफळे घेऊन ती कापून त्याची दोन दोन शकले करून ती रुंद ताटांत अगर परातीत उपड़ीं घालन ठेवावी, म्हणजे थोड्याच वेळात त्यांतील चिकट रस भांड्यांत जमतो. तो काढून डिंकाचे पाण्याचे ऐवजी रंगांत घालून तो रंग चित्रांना दिल्यास रंग चांगला तकाकतो. अशा प्रकारे फुकटांत मिळणाऱ्या या रसाचा रंगाचे काम उपयोग करून घेतल्यास डिंकास लागणारा खर्च वाचविता येईल. तरी मातीची चित्रे रंगवणारांनी याचा अनुभव घेऊन पहावा. याशिवाय बेलफळांचा व्यापारसंबंधी दुसराही एक मोठाच उपयोग होण्यासारखा आहे. बेलफळे पिकल्यानंतर ती झाडावरुन काढावी; नंतर सुरीने प्रत्येक फळांची दोन दोन शकले करून त्यांतील गीर व बी साफ काढून टाकावे. आणि ती शकले सुकू द्यावी. सुकल्यानंतर त्यांच्या आकाराच्या मानाने डब्या, वाट्या, चमचे, मुलांचे खुळखुळे व वाजविण्याची भिरभिरी वगैरे जिनसा कराव्या. सदर्हू जिनसांना रंग देऊन वेलबुट्टी वगैरे काढल्यावर त्या       भेंड.      

-----

फारच सुरेख दिसतात. बेलफळाच्या या डब्यांचा व वाट्यांचा देव्हाऱ्यांत पंचपाळ्या ऐवजी हळद, कुंकु, अबीर, कापूर, गंधगोळ्या, गंधाचे रवे, भस्म वगैरे ठेवण्याचे काम चांगला उपयोग होतो. सदर्हू जिनसा तयार करण्याला खर्चही बेताबातानेच येतो. बेलफळांच्या जिनसांचा अफगाण लोकांत फार खप आहे. पेशावर येथे सदर्हू जिनसांचा मोठा व्यापार चालतो. बेलफळाचे पोटांत जो डिंक असतो, त्यांत चुनां घालुन एकप्रकारचे लुकण तयार करतात, तें चिनीमातीची फुटकी भांडी जडविण्याचे काम येते. बेलफळांचा मुरंबाही करतात.

--------------------
४ भेंड.

 भेंड्याचे झाड दहा फूट पर्यंत उंचं वाढते. त्यात प्रथम पिवळ्या रंगाची फुले येतात; नंतर ती तांबडी होत जातात. या फुलांत एक विशेष गुण आहे, तो असा की, प्रत्येक फुलास फळ धरते. या झाडास वांझ फूल येत नाही. योग्यवेळी पाणी व खत मिळेल तर त्यास फूटभर लांबीचा देखील भेंडा येतो. भेंडा हे फळ स्वच्छ असून पौष्टिक आहे. भेंड्याची भाजी, कचऱ्या, भजी, असे अनेक पदार्थ करितात. भेंडा पौष्टिक असल्यामुळे कित्येक लोक सकाळच्या प्रहरी तो हिरवा सुद्धा खातात.

 अंबाडीप्रमाणे भेंड्याच्या झाडांपासूनही वाख निघतो, ही गोष्ट आमच्या इकडील बऱ्याच लोकांस माहीत आहे, परंतु भेंड्याचा वाख काढून तो उपयोगांत आणल्याचे मात्र फारसे कोठे दिसुन येत नाही. भेंड्याची झाडे सुकण्याचा हंगाम आला म्हणजे ती उपटून त्यांच्या लहान लहान जुड्या बांधाव्या. नंतर त्या जुड्यांचे मोठमोठे भारे बांधून ते भारे चार सहा दिवसपर्यंत पाण्याच्या डोहांत कुजत घालून ठेवावे. पांचवे सहावे दिवशी भारे पाण्यातून काढून त्यांतील जुड्या पाण्यात धुवून साफ कराव्या. नंतर त्यांचे बुडखे थोड़े रुंद करून त्या उभ्या करून ठेवाव्या. थोड्या सुकल्या म्हणजे जुड्या सोडून त्यांतील प्रत्येक झाडाची साल सोलून काढावी. नंतर ते धागे पाण्यांत स्वच्छ धुऊन उन्हांत सुकत टाकावे. सुकले म्हणजे वाख तयार झाला. घागे सोलून काढल्यानंतर ते स्वच्छ धुण्यासंबंधाने विशेष काळजी घ्यावी. म्हणजे वाख पांढरा व तजेलदार होतो. भेंड्यांचा हा वाख अंबाडीच्या वासाइतका मजबूत नसतो, तथापि अंबाडीच्या वाखाप्रमाणेच जनावरांचीं दावी, दोरखंडे, शिंकी वगैरे अनेक प्रकारच्या जिनसा करण्याच्या कामी याचा उपयोग होतो. अंबाडीच्या व भेंड्याच्या वाखांत इतकें सादृश्य असतें कीं, नवख्या माणसाला सहसा हा अंबाडीचा वाख नव्हे असे म्हणता येणार नाही. आमच्या इकडे खेडेगांवां४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

तून व साधारण प्रतीच्या शहरांतून सुद्धा पावसाळ्यांत प्रत्येकाच्या परसांत निदान पांच पन्नास तरी भेंड्याची झाडे लाविलेली असतात; परंतु भाजीपलीकडे त्या झाडांचा कोणी उपयोग करून घेत नाही. भेंड्याच्या झाडांचा वाख काढून घेतल्यानंतर ज्या सणकाड्या राहतात. त्यांचे लहान लहान तुकडे पाडून त्यांची टोके गंधकांत बुडवन ठेवावी, म्हणजे बीनखर्चात आगकाड्यांप्रमाणे विस्तव पेटविण्याचे कामी त्यांचा उपयोग होतो.

--------------------
५ मांदार व रुई.

 मांदार व रुई ही झाडे एकाच वर्गातली असून या दोहोंमध्ये विशेष फरक नाही. मांदाराचे झाड पांढरे व भुरकट असते, त्यास पांढरी फुलें येतात आणि रुईच्या झाडाला पांढरी जांभळट फुले येतात. यापेक्षां या दोन्ही जातीच्या झाडांत फारसा भेद नाहीं. रुईच्या झाडाला हिंदधर्मशास्त्रांत बरेच महत्त्व आहे. एखाद्या पुरुषाला तिसरा विवाह कर्तव्य असेल, तर त्याने प्रथम अर्कविवाह ( रुईच्या झाडाशी लग्न ) करुन नंतर इच्छित वधूशी विवाह करावा असे धर्मशास्त्र आहे. आणि याची सत्यता खालील उताऱ्यावरून वाचकांच्या लक्षांत येईल.

  त्रिलोकवासिन् सप्ताश्व छायया सहितो रवे ।
  तृतीयोद्वाहजं दोष निवारय सुखं कुरु । १ ।।
तसेंचः-
  नमस्ते मंगले देवि नमः सवितुरात्मजे ।
  त्राहि मां कृपया देवि पत्नी त्वं म इहागता ।।
  अर्क त्वं ब्रह्मणा सृष्टः सर्वप्राणिहिताय च ।
  वृक्षाणामधिभूतस्त्वं देवानां प्रीतिवर्धनः ।।
  तृतीयोद्वाहजं पापं मृत्यु चाशु विनाशय ।।
      'धर्मसिंधु'
 अर्कविवाहामुळे रुईच्या झाडाला धर्मशास्त्रात कसे महत्त्व आले आहे, याची कल्पना वाचकांना वरील उताऱ्यावरुन होण्यासारखी आहे. तसेच हिंदू म्हणविणाऱ्या कांहीं जातींत विवाहसमयीं वधूने वराला रुईच्या फुलांची माळ घालण्याची रूढी असल्याचेंहि वाचकांना माहीत असेलच. धर्मशास्त्राप्रमाणेच वैद्यशास्त्रांतही रुईचे झाडाला पुष्कळ महत्त्व आहे. रुईची पक्की पाने व सैधव यांची भट्टी लावून त्यापासून तयार होणाऱ्या औषधीचा दमावर चांगला उपयोग होतो.       वड, पिंपळ व नांद्रूक.      

-----

उन्हाळ्यांत रुईच्या झाडाची मुळे काढून आणून त्यावरील साल काढून घ्यावी. नंतर ती साल उन्हात वाळवून तिचे चूर्ण करून ठेवावे. या चूर्णाचा वातरक्त, उपदंश, ज्वर, वगैरे विकारांवर उपयोग करतात. हे चूर्ण व जेष्ठमध एकत्र करून घेतल्यास खोकला, ग्रंथी व त्वचारोग नाहीसे होतात. रुईच्या पानाला तेल, तूप अगर एरंडेल लावून अंग शेकण्याचे काम त्याचा उपयोग करतात. कान ठणकत असेल तर पानाचे रसाचा ठिपका कानांत घालतात. सुवर्णादि धातुंचीं भस्में करण्याचे कामीं रुईचे चिकाचा उपयोग होतो. असे या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत.

 आतां या झाडाचे व्यापारसंबंधी काय उपयोग आहेत ते पाहू. या झाडाच्या सालीचे तंतु काढून त्याचे दोर तयार करतात. तंतू काढण्याचे काम फारसे अवघड नाहीं. झाडे कापून आणून त्यांस एक दोन उन्हें द्यावी. म्हणजे वरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून व स्वच्छ धुवून पांढरी करावी. नंतर तिचे बारीक बारीक धागे मोकळे करावे, हेच याचे सुत. या सुताचे दोर पाण्यांत लवकर कुजत नाहीत आणि म्हणूनच मासे धरण्याच्या गळास कांही लोक या दोरांचा उपयोग करतात. मांदाराच्या सुताला बाजारांत चांगला भाव मिळतो. पंजाब, मद्रास, वगैरे ठिकाणी सालीच्या आंतील भागाचा कागद करण्याकडे उपयोग करतात. रुईच्या झाडाला जी बोंडें येतात, त्या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस निघतो. लंडनमध्ये या कापसाची फ्लानेल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मांदार व रुई यांचा कापूस सावरीचे कापसापेक्षाही थंड आहे, असे म्हणतात. या झाडाच्या चिकाचा चामडी रंगविण्याकडे उपयोग करतात. हाच चीक उकळवून घट्ट केला असतां गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ तयार होतो. रबर करण्याचे कामीं या चिकाचा उपयोग होण्यासारखा आहे. या झाडांच्या लाकडाचा कोळसा हलका असल्यामुळे आतषबाजीची दारू तयार करण्याचे काम त्याचा उपयोग होतो. या झाडाचे व पानाचे खत वाळवीचा नाश करणारे आहे.

--------------------
६ वड, पिंपळ व नांद्रूक.

 वड व पिंपळ ही झाडे आपल्या देशांत सर्वत्र असुन त्यांची सर्वांना ओळख आहे. निदान आम्हां हिंदूलोकांस तरी ती पूर्णपणे ठाऊक आहेत. कारण आम्हां हिंदूलोकांच्या बायका वड व पिंपळ या झाडांची पूजा करतात. ज्येष्ठ मासांतील पूर्णिमा हा वटवृक्षाच्या पूजेचा दिवस व श्रावणी शनिवार हा अश्वत्थवृक्षाच्या पूजेचा दिवस. तसेच गीता अ० १० श्लोक २६ यांत भगवान १०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात 'अश्वत्थः सर्ववृक्षाणाम् ' अशा तऱ्हेने हे दोन्ही वृक्ष पूजनीय असल्याकारणाने आमच्यांतील लहान थोर स्त्रीपुरुषांस यांची पूर्ण ओळख आहे. उपरि निर्दिष्ट केलेल्या झाडांचे जर कोणी लक्षपूर्वक अवलोकन करील, तर त्यात कधी कधी सदर्हू झाडांच्या कांहीं कांहीं फांद्या तांबड्या रंगाने माखल्या आहेत, असे दिसून येईल. तरी हा प्रकार काय आहे, याजबद्दलची थोडीशी माहिती या भागांत वाचकांना करून देण्याचा विचार आहे.

 वड, पिंपळ, पाइर, नांद्रुक, वगैरे झाडांच्या फांद्यांवर 'कोकस-लाका ' (Coccus-Lacca) नांवाचे एका जतीचे बारीक किंडे असतात. हे किडे सुईच्या अग्राएवढे लहान असतात. परंतु सदर झाडांच्या फांद्यांवर त्यांची असंख्य प्रजा वाढून त्या योगाने त्या फांद्या अगदी आच्छाद्न जातात. या किड्यांच्या शरीरांतून एक चिकट पदार्थ बाहेर पडत जाऊन सर्व किड्यांवर त्याचे आच्छादन होते. नंतर त्यावर हवेचे कार्य घडून ते कठीण बनते, व यामुळेच त्या फांद्या तांबड्या दिसू लागतात. यांतच लाखेची उत्पत्ति आहे. या कवचांतील किडे बाहेर जाण्यापूर्वीच त्या फांद्या तोडून आणून उन्हांत वाळवितात, म्हणजे आंतील किडे मरतात. नंतर फांद्यांवरील तो तांबड़ा पदार्थ खरडून काढितात. याला कच्ची लाख असे म्हणतात. फार लाल रंगाची जी कच्ची लाख असते, ती रंगाच्या कामास उपयोगी पडते आणि फिक्कट रंगाची भोके असलेली व्हार्नीसें वगैरे करण्यास उपयोगी पडते. लोकर रंगविण्यास, लाकडावर रंग चढविण्यास व कातडी रंगविण्यास कच्च्या लाखेचा उपयोग करतात. याशिवाय तुरटी, लाख व चिंचेचे पाणी, या तिहींच्या मिश्रणाने सुती कापडाला किरमिजी रंग देण्याचा प्रघात आहे.

 अनिलाइन रंग निघाल्यापासून लाखेचा रंगाच्या कामी फारसा उपयोग होत नाहीं. हल्ली मोहरेची लाख, व व्हार्निसें करण्याचे काम याच लाखेचा उपयोग होतो. कच्ची लाख ठेचून ती पापडखाराच्या पातळ द्रवांत भिजत घालतात, म्हणजे त्यांतील लाल दुव्य विद्रुत होते. हा द्रव आटवून वड्या तयार करितात, व तो लाखी रंग म्हणून विकावयास पाठवितात; त्यांतून जो अविद्राव्य शेष राहील, तो वाळवून चपडी लाख म्हणून विकतात. ही लाख कापडाच्या पिशवीत घालुन ती पिशवी विस्तवावर धरतात, लाख वितळली म्हणजे तो रस गुळगुळीत् दगडाच्या फरशीवर पाडतात. नंतर फळीने दाबून तिचे पातळ पत्रे बनवितात. हिलाच पत्री लाख असे म्हणतात.

--------------------
      करडई.      ११
-----
७ करडई.

 कोंकणांत राहणाऱ्या इसमास करडईच्या झाडाबद्ल विशेष माहिती नसेल. कदाचित पुष्कळ इसमांनी हे झाड पाहिलें सुद्धां नसेल. गुजराथेत, देशावर व कर्नाटकांत करडईचे पीक होत असल्यामुळे तिकडे आबालवृद्धांत हें ठाऊक आहे. ही झाडे सुमारे दोन अडीच फूट उंच वाढतात. या झाडाची पाने लांबट असुन त्यांस कातरा असतो. करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी करितात. या झाडास पिवळ्या व नारिंगी रंगाचे फूल येते. त्यांत केशरासारखे तंतु असतात. फुलाच्या मागे बोंड असते, त्यांत करडईचे बी तयार होते. हे करडईचे बी पांढऱ्या रंगाचे असते. ते गुरांस खावयास घालतात व त्याचे तेल काढतात. हे करडईचे तेल खाण्यास व जाळण्यास उपयोगी पडते. करडईची पेंड गुरांस व खतास उपयोगी पडते. करडईच्या पिकाने जमीन लवकर निःसत्त्व होते, यामुळे करडईचे स्वतंत्र शेत बहुधा कोणी करीत नाहीं. जोंधळा, गहुं, वगैरे धान्याबरोबर मोगण करून करडई पेरण्याची पद्धत आहे. करडईच्या झाडाला व बोंडाला कांटे असतात. तेव्हां ही झाडे सभोंवतीं असल्याने गव्हाच्या व जोंधळ्याच्या शेताला जनावरांचा फारसा उपद्रव होत नाही. म्हणून सदर शेतांचे सभोंवतीं करडईच्या स्वतंत्र एक दोन पाभारी पेरण्याची देशावर पद्धत आहे. करडईत बीन काट्याची करडई म्हणूनही एक जात आहे. तिला कुसुंबी असे म्हणतात. करडईची झाडे फुलू लागली म्हणजे फुलांच्या त्या मनोहर रंगामुळे शेतास एकप्रकारची विशेष शोभा येते, व शेताचे कडेने जाणाऱ्या इसमास तो मनोहर देखावा घटकाभर पाहण्याची साहजिक इच्छा उत्पन्न होते. करडईच्या फुलापासून कुसुंबा तयार करतात, व त्याबद्लचीच माहिती या ठिकाणी प्रमुखत्वाने द्यावयाची आहे. करडईच्या झाडाला सुमारे तीन महिन्यांनी फुले येतात, फुलांचा बार आला म्हणजे फुलांच्या पाकळ्या वरून पांच बोटांत धरून काढून घ्याव्या. पाकळ्या काढतांना खालच्या बोंडांस धक्का न लागू देण्याविषयी खबरदारी घेतली पाहिजे. एका बाराची फुले काढल्यानंतर सात आठ दिवसांत दुसरी बार येतो. त्याचीही फुलें याप्रमाणेच काढावी. अशा तऱ्हेने तीन चार बारांची फुले काढून घ्यावी. फुले काढल्याने करडईचे पिकास फारसा धोका येत नाही. फुलें काढल्यानंतर ती एक दिवस उन्हांत व दोन दिवस सावलीत सुकू द्यावी. नंतर उखळांत अगर खलबत्त्यांत घालून चांगली कुटावी, व चाळणीने चाळावी. म्हणजे कच्च्या रंगाची पूड तयार झाली. परदेशात पाठविण्याकरितां रंग करावयाचा असेल, तर फुले सुकविल्यानंतर ती पोत्यात घालून त्यावर पाणी शिंपडून पायांनी १२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

खूप तुडवितात, ( फुलांतील पिवळा रंग धुपून जाऊन त्यांतून स्वच्छ पाणी निघेतोपर्यंत हे तुडविण्याचे काम करावे लागते. ) हे तुडविण्याचे काम पांच सहा दिवसपर्यंत सतत करावे लागते. प्रत्येक दिवशी धुण्याचे काम आटोपलें म्हणजे रंगाचा गोळा सावलीत सुकवितात. याप्रमाणे सहा दिवस कृति केल्यानंतर त्याचे लहान लहान गोळे, अगर वड्या तयार करून त्या विकावयास पाठवितात. पहिल्या व शेवटच्या बाराच्या फुलांचा रंग चांगला होत नाहीं. मधल्या बारांचा रंग चांगला होतो. फुलें काढून ती तशीच पडू दिली तर लवकरच उबून खराब होतात, व त्यापासून कमी दर्जाचा रंग होतो. तसेच फुले झाडावरही पक्की होईपर्यंत ठेवीत नाहीत. कारण उन्हाने रंग नाहीसा होतो. दर एकरास सरासरी पांच सहा मण फुले निघतात, व त्यापासून दीडमणपर्यत कुसुंबा होतो. कुसुंब्याला दरमणीं पंचवीस रुपयेपर्यंत किंमत पड़ते. गुजराथेंत कुसुंबा चांगला उतरत नाही, यामुळे तेथील कुसुंब्यास दरमणी आठ रुपयेपर्यंत भाव येतो. कुसुंब्यामध्ये लाल व पिवळे अशी दोन रंगीत द्रव्ये असतात. लाल द्रव्यास रासायनिक भाषेत " कार्थेमिन " असे म्हणतात. हे पाण्यांत अविद्राव्य असते व याचाच उपयोग रंगाचे काम होतो. पिवळे द्रव्य विद्राव्य असल्यामळे रंगाच्या कामी त्याचा कांही उपयोग नाही, आणि म्हणूनच पिवळा रंग धुवुन साफ घालवावा लागतो. परदेशांत पाठविण्याकरितां कुसुंब्याच्या वड्या अगर गोळे कसे तयार करतात, याची रीत वर दिली आहे. आता स्थानिक उपयोगाकारितां कुसुंब्याचा रंग कसा करितात, त्याची माहिती सांगून हे प्रकरण पुरे करू. सांगली, मिरज, तासगांव वगैरे ठिकाणी पागोट्यांस चांगले रंग देतात. त्यांपैकी सांगली येथे ज्या रीतीने पागोट्यांना निरनिराळे रंग देतात, त्याची माहिती थोडे वर्षांपूर्वी एका मासिकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तिचाच सारांश येथे देतो.

 सांगली शहरीं पागोट्यांना दहा निरनिराळ्या प्रकारचे रंग देतात. सुमारे चाळीस हात लांब अशा पागोट्यास कुसंबी रंग देणे असेल तर, चार पायाच्या व दोन हात उंचीच्या लांकडी चौकटीला कपडा झोळीसारखा टांगून त्यांत पक्का एक शेर कुसुंब्याची फलें घालतात, व त्यावर घागरभर पाणी ओततात, फुलांतून पाणी खाली गळून फुले भिजली म्हणजे ती हाताने चांगली कुसकरून त्यावर पुन्हा घागरभर पाणी ओततात. म्हणजे तांबूस रंगाचे पाणी खाली पडू लागतें. नंतर फुलांतील पाणी अगदी पिळून टाकून त्याचा कोरडा चोथा करितात. नंतर त्यांत चार तोळे पापडखार मिश्र करून ते मिश्रण झोळीत घालून यात सुमारे अर्धा घागर पाणी ओततात. यावेळी जें लाल रंगाचे पाणी गळतें तो रंग होय. हे पाणी धरून एकीकडे ठेवितात. नंतर झोळींत पुन्हा दोन तांबे पाणी       अननस.      १३

-----

ओतून जें रंगांचे पाणी खाली गळते, त्यांत एक तोळा हळदीची पूड आणि वीस तोळे लिंबाचा रस मिसळतात, या मिश्रणांत पागोटें भिजवून पिळतात. नंतर पूर्वी एकीकडे ठेवलेल्या लाल रंगांत सुमारे पक्का पाऊणशेर म्हणजे साठ तोळे लिंबाचा रस मिसळून त्यांत पागोटे बुडवून काढून पिळून वाळवितात. रंग चांगला लाल झाला नाही असे वाटल्यास, पुन्हा एकवार पागोटे त्या रंगाचे पाण्यांत बुडवून चाळवितात. अशाच तऱ्हेनें गुलाबी, प्याजी, मोतिया, वगैरे निरनिराळे रंग पागोट्यांस देतात. मात्र प्रत्येक रंगाचे वेळी फुलांचे व लिंबाच्या रसाचे प्रमाण वेगवेगळे असते. गुलाबी रंग देणे असेल तर हळदीची पूड घालावी लागत नाही.

--------------------
८ अननस.

 अननसाचे झाड केतकीच्या झाडासारखें, परंतु लहान झुबकेवजा असते. हे झाड बऱ्याच लोकांना ठाऊक आहे; परंतु फळाशिवाय या झाडाचा दुसरा उपयोग फारच थोड्या लोकांस माहीत असेल. हिरवे अननस रुचिकर, हृद्य, गुरु, कफपित्तकारक, अरोचक व श्रमनाशक असतात, तेच पिकले असतां गोड, पित्तनाशक आणि उन्हापासून झालेले विकार यांचा नाश करणारे असतात. अननस चांगले पक्व झाल्यावर साल सोलून गाभ्याशिवाय मगजाच्या कापट्यांस साखर, मिरपूड व मीठ लावून खाल्ले असतां फार चवदार लागतात. अशक्त गरोदर स्त्रियांनी या जास्ती खाल्ल्यास गर्भपात होतो असे म्हणतात. अननसाचा मुरंबा करतात. अननसाच्या झाडाच्या पातींचे बारीक रेशमाप्रमाणे फार बळकट धागे निघतात. आपल्याकडे याबद्लचा विशेष प्रयत्न कोणी केलेली नाही. परंतु जावा वगैरे बेटांतून याचे धागे काढण्याचे अनेक कारखाने आहेत. या धाग्यांपासून निरनिराळ्या प्रकारची मौल्यवान वस्त्रे तयार करतात, आपल्या इकडे कांही थोड्या ठिकाणी याचे धागे काढितात. व या धाग्यांचा घायपातीच्या दोराप्रमाणे मंगळसूत्र वगेरे ओवण्याचे काम उपयोग करतात. कारण हे रोज भिजले तरी कुजत नाहीत, पातीचे धागे काढण्याचे काम फार सोपं आहे. पात, फळीवर अगर पाटावर घेऊन ती बोथट सुरीने खरडावी म्हणजे धागे मोकळे होतात ते काढून घ्यावे. नंतर पात उपडी घालून दुसऱ्या बाजूचेही धागे पूर्ववत् काढून घ्यावे. काढलेल्या धाग्यांना पातींतील मगज लागलेला असतो तो पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. आणि धागे उन्हांत सुकवावे. धागे काढण्याची दुसरीही एक रीत आहे. ती अशीः - पाती कांही वेळ उन्हात वाळवाव्या म्हणजे आंतील रस थोड़ा सुकतो. नंतर या पाती पाण्यात भिजवून मोगरीने हळू हळू ठेचाव्या, म्हणजे आंतील धागे १४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----
मोकळे होतात. ते काढून घेऊन उन्हांत वाळवावे. या रीतीने धागे काढले असतां ते फार कमी निघतात, सबब धंदा करू इच्छिणाऱ्या गृहस्थाने पहिल्या रीतीनेच धागे काढावे.
--------------------
९ फणस.

 फणसाचा वृक्ष मोठा होतो. कधी कधी या झाडाची उंची चाळीस फूट पर्यंतही भरते. जगामध्ये जितक्या म्हणून फळांच्या जाति आहेत, त्या सर्वांमध्ये फणसाचे फळ मोठे आहे. कांहीं कांहीं फणस एका गड्याच्या ओझ्याचे सुद्धा असतात, आणि अशाप्रकारे हे फळ वजनदार असल्यामुळे सृष्टिकर्त्या परमेश्वराने ही फळे झाडाच्या बुंध्याला किंवा मोठ्या फांदीला जेथे लहान फांदी फुटते, त्या सांध्यावरच लागण्याची योजना केलेली आहे. इतर वृक्षांप्रमाणे फांदीच्या शेवटाला ही फळे कधीच लागत नाहीत. यावरून जगचालक परमेश्वराच्या लहान थोर कृतीचे जो जो आपण बारकाईने अवलोकन कराल तों तों त्याच्या प्रत्येक कृतीबद्ल आपल्याला कौतुक वाटल्यावांचून खास राहणार नाही. फणसाचे फळ ज्याला आपण फणस असे म्हणतो ते एका फुलापासून झालेले एकच फळ नसून, त्यांतील प्रत्येक गरा हा वेगवेगळ्या एक एक फुलापासून झालेले एक एक फळ आहे. या झाडाला फुलांचे मोठाले झुबके येतात. त्यांत पांढऱ्या रंगाची वेगवेगळाली लहान लहान फुले असतात. त्यांतील जितक्या स्त्री-केसराच्या फुलांशी परागाचा संयोग होतो, तितक्या फुलांची प्रथम वेगवेगळी फळे बनू लागतात; ही फळे म्हणजेच फणसांतील गरे होत. झुबक्यांतील फुले अगदी जवळ जवळ असतात म्हणून त्यांची फळे जसजशी मोठी होत जातात, तसतशी ती एकमेकांस चिकटून जाऊन त्यांचे एक फळासारखे दिसणारे फळ बनते, त्यासच आपण फणस म्हणतो. याबद्लची विशेष माहिती रा० ब: गोखले यांच्या " बगिच्याचे पुस्तकांत " प्रसिद्ध झालेली आहे. फणसामध्ये 'कापा ' व ‘बरका ' अशा दोन जाती आहेत. यांशिवाय ‘रानफणस' आणि विलायतीफणस अथवा ब्रेड-फूट-टी अशा आणखी दोन वेगवेगळ्या जाती आहेत. रानफणस ही जंगलांत होणारी फणसाची एक जात आहे; तिला कोणी कोणी पाटफणस असेही म्हणतात. या रानफणसाची पाने मोठमोठाली असतात. त्याची फळे बहुतकरून कोणी खात नाही; परंतु त्याचे लाकूड टिकाऊ असल्यामुळे त्याच्या होड्या व दरवाजे वगैरे करतात. व त्याच्या रसाचे एक प्रकारचे लुकण तयार करतात. ते मेणाप्रमाणे चिकट असते ते ऊन करून त्याने मातीची व दगडाचीं फुटकी भांडी सांधतात. विलायतीफणस म्हणून जी जात सांगितली, त्याची लागवड दक्षिण-हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश       फणस.      १५

-----

येथे करितात. मुंबई येथील राणीचे बागेत या जातीचीं कांही झाडे आहेत, असे समजते. विलायतीफणसाची पाने मोठाली असून ती कातरल्यासारखी असतात. याचे लाकूड ठिसळ असते, व याच्या फळांत बी नसते. ही फळे भाजून भाकरी प्रमाणे खातात, आणि म्हणूनच याला ब्रेड़-फ्रूट-ट्री असे म्हणतात. या झाडापासून गोंद निघतो. आपल्या इकडे होणाऱ्या 'कापा' आणि ' बरका' अशा ज्या दोन जाति सांगितल्या, त्यांचे लाकूड पिवळे अथवा थोड्या तपकिरी झांकीचे पिवळे असते. हवा लागल्यावर ते काळसर होते. रंध्याने हे लाकूड चांगले सफाईदार होते आणि म्हणून सुतारकामाला याचा चांगला उपयोग होतो. याच्या पेट्या, पाट, दरवाजे वगैरे अनेक जिनसा करितात. फणसाचा बुंधा नऊ फूट परिघाचा झाला म्हणजे त्या झाडाला फळे येण्याचे बंद होते असे म्हणतात. फणसांतील गऱ्यांची खीर, कढी, फणसपोळ्या वगैरे पदार्थ करतात. तसेच त्यांतील आठळ्यांची खीर, भाजी वगैरे निरनिराळे पदार्थ करण्याची वहिवाट आहे. फणसाची चिवरे गरे मोठ्या आवडीने खातात, व तेणेंकरून ती ज्यास्त दूध देतात. हिरव्या फणसाची भाजी होते व पानांच्या पत्रावळी होतात. वगैरे फणसाच्या झाडाचे सामान्य उपयोग सर्वांना माहीतच आहेत. आतां या झाडाचे जे दुसरे कांहीं उपयोग आहेत, ते सांगून हा भाग पुरा करू. फणसाच्या बुध्यांवर जी आळंबी होतात, त्यांस ‘फणसांबी ' असे म्हणतात. थंडीने वगैरे तोंड फुटले असता त्यावर फणसांबे उगाळून लावितात. फणसाच्या सालीतून काळ्या रंगाचा चीक निघतो, तो पाण्यांत विरघळतो. त्याचे एक प्रकारचे लुकण तयार करतात. या चिकाचा रबर करतां येईल असे कित्येक विद्वान् लोकांचे मत आहे. हल्ली पक्षी धरण्याचे कामी त्याचा उपयोग करतात. कमाऊन प्रांतांत फणसाच्या सालीचा वाख काढतात. फणसाचे लाकूड करवतल्या नंतर त्यांतून जो बारीक भुसा पडतो, तो उकळवून त्यापासून पिवळा रंग करितात. ब्रह्मी लोकांच्या उपाध्यायांचे झगे याच पिवळ्या रंगाने रंगविलेले असतात. हा रंग पक्का होण्यासाठी त्यांत हळद आणि तुरटी मिसळतात. याच रंगांत नीळ घातली म्हणजे हिरवा रंग होतो. फणसाचा व मुळ्यांचाही रंगाचे कामी उपयोग होतो. करटें, गळवें वगैरे लवकर फुटावी म्हणून या झाडाचा चीक त्यावर लावितात. त्वचारोगावर याच्या पानांचा उपयोग होतो व मुळ्या अतिसारावर देतात. असे या झाडाचे कांहीं औषधी उपयोगही आहेत.

--------------------
१६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.
-----
१० कांचन.

 कांचन आणि आपटा ही एकाच वर्गांतली झाडे असून, या दोहोंमध्ये पुष्कळ साम्य आहे. ह्या झाडांची पानें जोड़गीर म्हणजे द्विदल असतात. कांचनाचे पान आपट्याच्या पानासारखेच परंतु त्याहून थोडे मोठे व पातळ असते, कांचनांत, पांढरा तांबडा आणि पिवळा अशा तीन जाती आहेत. या जाति फुलावरून मात्र ओळखल्या जातात. कांचनाची फुले देवास वाहतात, व याच्या कोवळ्या कळ्यांची भाजी होते. कांचनाची साल व फळे औषधी आहेत. तांबडा कांचन गंडमाळा, रक्तपित्त, कुष्ठ व कफ यांचा नाश करणारा आहे. पांढऱ्या कांचनाचा दमा, खोकला वगैरे विकारांवर उपयोग करतात. कांचनादि काढा व कांचनार गुग्गुळ ही औषधे गंडमाळा या विकारांवर अप्रतिम असल्याचे शाङ्गन्धरांत वर्णन आहे.

  कांचनारत्वचः क्वाथः शुंठीचूर्णेन नाशयेत् ।
  गंडमालां तथा क्वाथः क्षौद्रेण वरुणत्वचः ।। १ ।।
      शार्ङ्ग्धर.
 म्हणजे कांचनवृक्षाच्या सालीचा काढा सुंठीचे चूर्ण मिळवून प्राशन केला असतां गंडमाळा दूर होतात. कांचनार गुग्गुळ घेतल्याने तर कसल्याही दुर्धर गंडमाळा असल्या तरी त्या बऱ्या होतात. अशाबद्दल सदर ग्रंथांत बरेच वर्णन आहे. कांचनाचे लाकूड फार् चिवट असते, यामुळे त्या लाकडाच्या हातांत धरण्याच्या काठ्या करितात. या काठ्या वजनदार, मजबूत आणि चिवट असून पॉलिश केल्याने फारच सुरेख होतात. काठ्या वापरण्याची चाल हल्ली किती प्रचारांत आली आहे, हे कोणास सांगावयास पाहिजे असे नाही. तर अशावेळी जेथे कांचनाची झाडे पुष्कळ आहेत, तेथील एखाद्या उद्योगी माणसाने या काठ्या तयार करण्याचा कारखाना सुरू केल्यास बराच फायदा होण्याचा संभव आहे. कांचनाचे लाकुड रंगाच्याही उपयोगी आहे. लाकडापासून रंग काढण्याची कृति खालीलप्रमाणे आहे :-

 कांचनाच्या चांगल्या जुनाट झाडाच्या ढपल्या उखळांत घालून ओबड धोबड कुटाव्या. नंतर त्या कुटलेल्या ढलप्या पातेल्यांत घालून त्यांत पाणी घालावे व चार प्रहरपर्यंत ते पातेलें तसेच राहूं द्यावे. नंतर चुलीवर ठेवून यांतील निम्मे पाणी आटवावे, म्हणजे त्यास साधारण तांबूस रंग येईल. त्या पाण्यांत पापडखार घालून पुन्हा ते पाणी आटवावे आणि आपणास पाहिजे तसा रंग आला म्हणजे पातेलें चुलीवरून खाली उतरावे; कपडे       पारिजातक.      १७

-----

रंगविण्याचे कामीं या रंगाचा उपयोग होतो; आरारोट, तांदुळाचे अथवा नाचणीचे पीठ, यांस या रंगाची चार पुटे दिली असतां गुलाल तयार होतो. आरारोट महाग असल्यामुळे, गुलाल करण्यास तांदुळाचे पिठाचा उपयोग करणे हे फायदेशीर आहे. आपल्या इकडे बहुतकरून पतंगाचे रंगापासून गुलाल तयार करितात; सबच गुलाल करण्याच्या कृतीचे सविस्तर विवेचन पुढे ' पतंग' वृक्षाच्या वर्णनाबरोबर केले आहे, ते वाचकांनी अवश्य वाचावे. कांचनाच्या लाकडाच्या काळ्या तयार करण्याचा कारखाना असेल, तर काठ्या तयार करतेवेळी सदर लाकडाच्या ज्या निरुपयोगी ढपल्या पडतील, त्यांचा रंगाचा गुलाल करण्याच्या कामी उपयोग करून घेतल्यास एकांतएक दोन कारखाने सहज चालण्यासारखे आहेत. कांचनाची सालहीं रंगाच्या आणि चामडी कमविण्याच्या कामी येते. कांचनाचे झाडापासून गोंद निघतो, त्यांना 'सेमळा गोंद असे म्हणतात.

--------------------
११ पारिजातक.

 अति पुरातन काळी देव आणि दैत्य या उभयतांनी मिळून समुद्रमंथन केले, तेव्हां त्यांतून लक्ष्मी, कौस्तुभ, आदिकरुन चौदा रत्ने निर्माण झाली. त्यापैकी पारिजातक हे तिसरे रत्न होय; ही पौराणिक कथा वाचकांना माहीत असेलच. अशा ह्या प्राचीनतम आणि पुराणांतरी ज्याची महती वर्णन केली आहे, त्या पारिजातक वृक्षाचे सध्याच्या या औद्योगिक काळांत काय उपयोग होण्यासारखे आहेत, याजबद्दलचा या भागांत विचार करावयाचा आहे. पारिजातकाची पाने खरखरीत असतात, यामुळे पॉलिश करण्यासाठी त्याच्या जून पानांचा उपयोग करतात. पारिजातकाचे पानांचा काढा तापावर गुणकारी आहे. या झाडाची साल कातडी कमाविण्यास उपयोगी पडते. सर्पाचे विषावर व कफविकारावरही या सालीचा उपयोग होतो. पारिजातकास पांढऱ्या रंगाची फुले येतात. या फुलांच्या पाकळ्यांचा जांभळा रंग होतो. पारिजातकाच्या फुलाचे दांडे नारिंगी रंगाचे असतात. या दांड्यांचा, केशरी व नारिंगी रंग करितात. हा रंग तयार करणे अगदी सोपे आहे. पारिजातकाची फुले वेचून आणून त्यांचे दांडे खुडून ते उन्हांत वाळवून ठेवावे, आणि ज्यावेळी रंग करावयाचा असेल, त्या वेळी ते दांडे उकळत्या पाण्यात टाकून थोडावेळ उकळू द्यावे. नंतर फडक्याने गाळून पिळून काढावे म्हणजे रंग तयार झाला. जें रेशीम रंगवावयाचे असेल तें प्रथम पाण्यात भिजवून पिळून काढावे, आणि नंतर ह्या रंगांत बुडवून काढून सावलीत वाळवावे. रंग फिक्का वठल्यास पुन्हा रंगांत भिजवून वाळवावे. हा रंग लवकर उडून जातो, यासाठी फटकी अगर चुन्याचे पाणी १८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

रंगांत घालावे म्हणजे रंग टिकाऊ होतो. हा रंग सुती धुपट कपड्यांस दिला असतां उत्तम केशरी रंग होतो. कागदावर काढलेल्या चित्रांना पिवळा रंग देण्याच्या कामीं कोणी कोणी या रंगाचा उपयोग करतात. सुकविलेल्या दांड्यांप्रमाणे ओल्या दांड्यांचाही रंग होतो. पारिजातकाचे फुलांपासून अत्तर काढितात. या झाडाला वाटोळ्या व अगदी चपट्या बिया येतात. कांहीं कांहीं औषधांत या बियांचा उपयोग करतात.

--------------------
१२ हरभरा.

 हरभऱ्यांचे ( धान्याचे ) उपयोग सर्वांना महशूर आहेतच. त्याबद्लच माहिती कोणास सांगितली पाहिजे असे नाही. या भागांत फक्त हरभऱ्याचे झाड़ासंबंधानें कांही माहिती सांगावयाची आहे. पौष व माघ महिन्याचे सुमारास हरभरा फुलू लागतो. फुले येण्याचे पूर्वी हरभऱ्याचे झाडाचा कोंवळा पाला खुडून त्या ओल्या पाल्याची अथवा तोच पाला वाळवून त्या वाळलेल्या पाल्याची भाजी करितात. पाला खुडल्याने झाड कमजोर न होतां उलट जास्त जोरदार होते; म्हणजे पाला खुडणे हे फायदेशीर आहे. हरभऱ्याची झाडे घाट्यास आली म्हणजे त्याची आंब धरितात. ही हरभऱ्याची आंब फार औषधी आहे. आंब जितकी ज्यास्त जुनाट असेल तितकी गुणाला ज्यास्त असते. आंब जो जो जुनाट होत जाते, तों तो तिला ज्यास्त तांबडा रंग येत जाते. हरभऱ्याची आंब अग्निदीपक, रुच्य, आत आंबट व दांतांना आंबवणारी असून, पटकी, अजीर्ण, पोटदुखी यांवर फारच वस्ताद आहे. अजीर्ण झाले असतां रोग्याचे शक्तीचे मानाने एक तोळापर्यंत आंब घेतल्याने ताबड़तोच गुण येतो. दुसरे कोणतेही औषध घेण्याची गरज नाहीं. पारा एक भाग, गंधक दोन भाग, लोभस्म अर्धा भाग, पिंपळी अर्धा भाग, पिंपळमुळ सव्वा भाग, लवंग अर्धा भाग, संचल एक भाग, स्वागी दोन भाग, व मिरी दोन भाग, या सर्वांचे एकत्र चूर्ण करून हरभऱ्याचे आंबीत सात दिवस खल करून त्याच्या तीन वालांची एक गोळी, अशा गोळ्या करून ठेवाव्या; यांपैकी एक गोळी उष्णोदकांत दिल्याने अग्निमांद्य, अजीर्ण, विषुचिका वगरै विकार ताबडतोब नाहीसे होतात, असे रा ० दीक्षित हे आपल्या वैद्यकलानिधी नामक पुस्तकांत लिहितात. अशाप्रकारे आंब ही औषधी वैद्यकशास्त्रांत फार महत्त्वाची मानली आहे. हरभऱ्याचे झाडावरीळ आंब धरणें हें काम थोडे कठीण आहे. कारण आंबीचे फडके हाताने पिळल्यास आंबीच्या या हाताची त्वचा जळल्यासारखी होऊन चटका बसतो, आणि हातास घरे पडतात. तसेंच आंब धरण्याकरिता शेतांत जातांना अंगावरील कपडे नीट आवरून       कुडा.      १९

-----

धरावे लागतात, नाहींपेक्षा आंबीने कपड्यांचे तुकडे पडतात. सबब आंब धरणे ती फार सावधगिरीनें खालील कृतीने धरावीः-

 हरभऱ्याचे झाडांना घाटे धरू लागले म्हणजे अरुणोदयापूर्वी उठून स्वच्छ कापडाचे मोठेमोठे रुमाल पाण्यात भिजवून चांगले पिळून काढावे, व झटकून मोकळे करावे; आणि एका लांब कळकाचे काठीचे शेवटास रुमालाचे एक टोंक बांधून ती काठी हातांत धरून हरभऱ्याचे झाडांपासुन तो रुमाल फिरवावा. म्हणजे त्या झाडावरील दंवाचे योगाने धरलेल्या आंबीने रुमाल चांगला भिजतो. तो काचेचे पात्रांत पिळून घेऊन पुन्हां झाडांवरून फिरवावा, अशा तऱ्हेने आंब धरून ती बाटल्यांत भरून ठेवावी. कोणी कोणी रुमाल प्रथम पाण्यांत न भिजवितां कोरडाच काठीला बांधतात. असे केल्याने आंबीत, पाण्याचा अंश येत नाही. तसेच कांहीं लोक रुमाल रात्रीच झाडावर टाकून ठेवतात व सकाळी त्यांतील आंब पिळून घेतात. आंबीने भिजलेले रुमाल पिळणे ते हाताने न पिळतां चिमट्यानें अगर कामटीने धरून पिळावे. हाताने पिळल्यास वर सांगितल्याप्रमाणे हाताला घरे पडतात. आंबीचे औषधी उपयोग वर सांगितले आहेतच; शिवाय आंबीची पांच सात पुटे दिलेले कोणतेही बी, जमिनीत पेरून त्यावर पाणी शिंपलें असतां, ते बी चार घटकेत रुजते, गारुडी लोक कधी कधी असले प्रयोग करून लोकांस आश्चर्यचकित करून सोडतात.

--------------------
१३ कुडा.

 कुड्याची झाडे कोंकण प्रांतीं पुष्कळ आहेत. कुड्याचे झाडाचा कोणताच भाग फुकट जात नाही. कारण त्याचे मूळ, पान, फूल, साल, लाकूड आणि बीं हीं सर्व निरनिराळ्या प्रकारांनी मनुष्याच्या उपयोगी पडतात. यावरून कुड्याचे झाडाचा जन्म केवळ परोपकारासाठीच आहे, असे म्हणावे लागते. कड्याचे मूळ लहान मुलांना घुटींत उगाळून देतात, त्या योगाने मुलांना जंतांचा उपद्रव होत नाही. अतिसारादि विकारांवर कुडेपाक फारच गुणकारी असल्याचे शारङ्गधरातील खालील उताऱ्यावरून दिसून येते.

  तत्कालाकृष्टकुटजत्वचं तंदुलवारिणा ॥
  पिष्टां चतुःपलमितां जंबुपल्लववेष्टिताम् ॥
  सूत्रेण बद्धां गोधूमं पिष्टेनोपरिवेष्टिताम् ॥
 लीप्तां च घनपंकेन गोमयैर्वह्निना दुहेत् ॥
  अंगारवर्णा च मृदं दृष्ट्वा वहेः समुद्धरेत् ॥
२०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

  ततो रसं गृहीत्वा च शीतं क्षौद्रयुतं पिबेत् ॥
  जयेत्सर्वानतीसारान् दुस्तरान् सुचिरोत्थितान् ॥
       'शारङ्गधर.'
 याचा भावार्थ असा की, सोळा तोळे कुड्याची साल आणून ती त्याच वेळेस तांदुळाच्या धुणांत वाटून त्याचा गोळा करावा. तो गोळा जांभळीच्या पानांत गुंडाळून सुताने बांधून त्यावर कणीक लावून वर दाट मातीचा लेप करावा. नंतर त्या गोळ्याचे खाली-वर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घालून गोळयाची माती तांबडी होईतोपर्यंत आंच द्यावी. नंतर तो गोळा बाहेर काढून पाने व माती काढून टाकून पिळून रस काढावा. तो रस थंड झाल्यावर मध मिळवून घ्यावा. तेणेकरून बहुत काळचे दुर्घट अतिसार दूर होतात. कुष्ठरोगावर कुड्याची साल, चित्रक, कडूलिंब, बाहव्याचा मगज, खैर, असाणा, व सात्वीण, यांच्या काढ्यांत हिरडे शिजवून ते मध-तुपाबरोबर खाल्ल्याने गुण येतो; असे अष्टांगहृदयांत वर्णन आहे. कुड्याच्या शेंगांची व फुलांची भाजी करतात. ही भाजी कृमिनाशक आहे. कुंड्याच्या शेंगेत ज्या लांबट बिया असतात, त्यांस ' इंद्रजव ' असे म्हणतात. आणि यावरूनच गुजराथेंत या झाडाला 'इंदर जवनुं वृक्ष' असे नांव आहे. कुड्याच्या पानाच्या पत्रावळी करितात; परंतु त्या वाळवून ठेवण्यासारख्या नसतात. रोजच्या चालू कामाला मात्र त्यांचा उपयोग होतो. कुड्याचे बियांचा म्हणजे इंद्रजवाचा-ताप, अतिसार, कृमि, रक्तातिसार, उल्टी, अजीर्ण वगैरे विकारांवर उपयोग करतात; परंतु त्या सर्वांचे वर्णन या छोटेखानी पुस्तकांत देतां येणे शक्य नाही. आता फक्त कुड्याचे पानांचा जो विशेष उपयोग होण्यासारखा आहे, तो सांगून हा भाग पुरा करूं. कुड्याचे पानांत तंबाखूची विडी करून ओढणे, हे इतर पानांच्या विड्या करून ओढण्यापेक्षा हितकारक आहे असे म्हणतात. याबद्दल आपला अनुभव कोणी प्रसिद्ध केल्यास धूम्रपान करणाऱ्या लोकांचा आरोग्यशास्त्रदृष्ट्या थोडासा फायदा होणार आहे. कारण हल्ली बाजारात विक्रीकरितां ज्या विड्या ठेवलेल्या असतात, त्यांपैकी बऱ्याच विड्या टेंभुरणीच्या पानांच्या असतात. टेंभुरणीच्या पानाची विडी ओढल्याने हृदयांत पिवळा डाग पडतो, इतकंच नव्हे, तर या पानांच्या विडीचें ज्यास्त सेवन केल्यास घशाजवळ कफाची गोळी येऊन कंठशोष होतो, असा एके ठिकाणी लेख आहे; आणि याचा प्रत्यय पाहणे असल्यास टेंभुरणीच्या पानाची विङी मुठीत धरून ओढावी म्हणजे दातास पिवळा डाग पडलेला दिसेल, असेही त्या लेखकाचे म्हणणे आहे. खरोखरच अशा तऱ्हेचा अपाय टेंभुरणीच्या विडीपासन होत असेल, व कुड्याचे पानाची विडी खरोखरच हितकारक असेल, तर टेंभूरणीच्या पानाऐवजी कुड्याची पाने विड़ीकरितां वापरावी हें बरे.

--------------------
      सांवर.      २१
-----
१४ सांवर.

 सांवरीचा वृक्ष फार मोठा होतो. वेदामध्ये याला 'यमद्रुम ' हे नांव आहे. सांवरीमध्ये पांढरी व तांबडी असे दोन भेद आहेत. सांवरीचे लाकूड पाण्यांत जास्त टिकते आणि म्हणूनच बहुतेक सर्व कोंकण प्रांती सांवरीचे बुंधे पोखरून त्यांच्या होड्या वगैरे करतात. सांवरीच्या झाडापासून उदी रंगाचा व तुरट असा एक चिकट पदार्थ स्रवत असतो, त्याला ' मोचरस' असे म्हणतात. या मोचरसाला, बाजारांत एका सुरती मणाला चार रुपये पर्यंत भाव येतो. मोचरस कामोद्वीपक, शक्तिवर्धक व रक्तस्राव बंद करणारा आहे आणि यासाठीच फाजील ऋतुस्राव, आमांश, वगैरेवर हा देतात. शक्ति येण्याकरितां मोचरसाचे चूर्ण दुधांत घालून पितात. सांवरीच्या मुळ्यांना ' मुसळी सिमूल' असे म्हणतात, या मुळ्या हलक्या असून त्यांवर पातळ साल असते. या पौष्टिक आहेत. परंतु ज्यास्त प्रमाणाने घेतल्यास उलट्या होतात. या मुळ्या सावलीत वाळवून इंद्रियशिथिलतेवर देतात. सांवरीची वाळलेली फुलें, खसखस, शेळीचे दूध आणि साखर हीं एकत्र करून शिजवून घट्ट करून त्याचे दोन द्राम दिवसांतून तीन वेळ याप्रमाणे घेतल्यास मूळव्याध बरी होते. सांवराच्या आतल्या सालीचे दोरखंडे करण्यासारखे तंतु निघतात. सांवरीच्या लाकडाच्या पेट्या, डबे, मुलांची खेळणी, वगैरे जिनसा करितात. परंतु या झाडाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे या झाडापासून मिळणारा कापुस हा होय. आमच्यापैकी बऱ्याच लोकांना या कापसाचे विशेष महत्त्व वाटत नाही, आणि यामुळेच या झाडाचा बहुतेक कापूस जागच्या जागी झाडाखाली पडुन फुकट जातो. रत्नागिरि जिल्ह्यांत हा कापूस गोळा करून विक्रीकरितां मुंबईस पाठविण्याचा थोड़ा बहुत धंदा चालू असतो. आमच्या देशांत जरी या कापसाचे कापड तयार होत नाही, तरी परदेशांत याच कापसाचे उंची कापड तयार होऊन ते आमच्या देशांत दरसाल हजारों रुपयांचे खपत आहे. याच्या अंगच्या विशेष मऊपणामुळे याला चिकटपणा रहात नाही, आणि म्हणून या कापसाचे स्वतंत्र वस्त्र विणतां येत नाही. परंतु कापसाच्या वस्त्रास रेशमी वस्त्राप्रमाणे तकाकी येण्यासाठी हा सांवरीचा कापूस त्यांत मिसळतात. अशा प्रकारचे तयार झालेले कापड आपल्या इकडे कांहीं जातींच्या हिंदु स्त्रियांच्या अंगावर व नाटकांतून वगैरे दृष्टीस पडते. हें सर्व कापड परदेशांत तयार होत असल्यामुळे, परदेशांतच या कापसाचा खप होतो. सबब धंदा करू इच्छिणारे माणसाने हा सांवरीचा कापूस गोळा करून मुंबईसारख्या ठिकाणी विक्रीकरितां पाठविल्यास पुष्कळ फायदा होईल. गाद्या, गिरद्या, उशा, वगैरे बिछान्याचे व बिछायतीचे सामान भरण्याला हा कापूस २२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

फार उपयोगी आहे. तो फार थंड असल्यामुळे वाटल्यास शीत प्रकृतीच्या माणसाने या वस्तूंचा फारसा उपयोग करू नये. या कापसाच्या अंगी स्थितिस्थापकता हा गुण विशेष असल्यामुळे कपाशीच्या कापसाप्रमाणे वर दाब पडल्यावर हा गोळा होत नाही. पांढऱ्या सांवरीच्या कापसांतील बियांचे तेल निघते. गरीब लोक या बिया खातात. यावरून याचे तेलही खाण्याजोगें असेल असे वाटते. पांढऱ्या सांवरीचे लाकूड चामडी रंगविण्याचे उपयोगी पडते. पांढऱ्या सावरीचा मूठभर कोवळा पाला वाटून तो ताकांत मिश्र करून रोज सकाळी घेतल्यास नवीन जडलेला परम्याचा विकार जातो. तामिली लोक पांढऱ्या सांवरीची झाडे आपल्या देवालयाभोंवतीं लावितात. बालेघाटाकडील रानटी लोक सांवरीच्या फुलांच्या कळ्या खातात. तिकडे दरसाल सुमारे पांच हजार मण फुलांच्या कळ्या खाण्याकडे खपतात, असा एके ठिकाणी उल्लेख आहे.

--------------------
१५ गुंजवेल.

 गुंजांचा वेल असतो. या वेलाला चिंचेच्या पानांसारखी लांबट व लहान पाने येतात. या वेलांना पांढऱ्या गुलाबी व काळ्या रंगाची फुले येतात. त्यांना लहान लहान शेंगा येऊन त्यांत गुंजांची उत्पत्ति होते. गुंजांमध्ये मुख्य तीन जाती आहेत. पहिली-बिया तांबड्या असून एका अंगास काळा ठिपका असतो. या जातीच्या वेलांना तांबड़ी फुले येतात. दुसऱ्या जातीच्या वेलांची फुले व बिया पांढऱ्या असतात. तिसऱ्या जातीच्या बिया काळ्या असून वर पांढरा ठिपका असतो व या वेलाला फुलें काळी येतात. पूर्वी गुंजेच्या वेलाच्या मुळ्या व्यापारी लोक जेष्ठमधाच्या मुळ्या म्हणून बाजारांत विकीत असत; परंतु अलीकडे हा प्रघात बराच कमी झाला आहे. आणि याचे कारण गुंजेच्या मुळीला जेष्ठमधाच्या मुळीपेक्षां गोडी कमी असते हे होय, असे डॉक्टर बिडी साहेबांचे म्हणणे आहे. गुंजांच्या या मुळ्या काष्ठमय, वक्र, पुष्कळ फाटे फुटलेल्या आणि सुमारे अर्धा इंच जाडीच्या असतात. त्यांची साल पातळ तांबूस रंगाची असून लांकुड पिवळट पांढरे असते. त्याला रुचि प्रथम कडू व मग गोड असते. वरील तिन्ही जातींपैकी पांढऱ्या गंजेच्या मुळीला गोडी ज्यास्त असते, आणि म्हणूनच या मुळ्यांचा जेष्ठमधाचे मुळ्यांऐवजी विशेष खप होत असे. गुंजवेलाचे च गुंजांचे अनेक औषधी उपयोग आहेत. मोहराच्या कढत तेलांत गुंजेची पाने भिजवून ती संधिवाताने सांधे धरलं असतील, त्यावर बांधतात. शरीराचा एखादा भाग सुजून दुखत असेल, तर प्रथम त्यावर थोडें एरंडेल लावून गुंजेची पाने ऊन करून बांधतात. मेंदूसंबंधी विकारावर गुंजा पोटांत देतात. आणि त्वचारोग, व्रण,       गुंजवेल.      २३

-----

वगैरेवर वरून लावण्याच्या औषधांत गुंजांचे चूर्ण करून त्यांचे ' गुंजाभद्ररस' या नांवाचे एक औषध तयार करतात. त्याची कृति खालील प्रमाणे आहे :-

  निष्कत्रयं शुद्धसूतं निष्कद्वादश गंधकम् ।
  गुंजाबीजं च षण्णष्कं निम्बवीजं जया तथा ॥
  प्रत्येक निष्कमानं तु निष्कं जैपालबीजकं ।
  जयाजम्बीरधत्तुरकाकमाचीद्रवैर्दिनम् ।
  भावयित्वा वटीं कृत्वा दद्याद्वूंजाचतुष्टयम् ।
  गुंजाभद्ररसो नाम हिंगुसैधवसंयुतः ।
  शमयत्युल्बणंं दुःखमुरुस्तम्भं सुदारुणम् ॥
      'रसेंद्रसारसंग्रह.'
 जुलाब होण्यासाठी कोणी गुंजांचा उपयोग करतात, परंतु ते करणे हितावह नाहीं. कारण गुंजा विशेष दिल्यास पटकीच्या विकाराप्रमाणे जुलाब होतात. गुंजांवर जें तांबडे टरफल असते, ते विषारी असते आणि यामुळेच तांबड्या गुंजांची उपविषांत गणना आहे. डॉक्टर वॉर्डन यांनी गुंजेच्या अंगच्या विषाची परीक्षा पाहुण्याकरिता जे प्रयोग करून पाहिले, त्यांवरून असे अनुभवास आलें कीं, थोडक्या पाण्यात सुमारे अर्धी गुंज उगाळून मांजराच्या मांडीत त्याची पिचकारी मारिली, तर चोवीस तासांत मांजर मरते. पंजाब, बहार, वगैरे प्रांतांत व आपल्या इकडेही काही भागांत जनावरांना मारण्याकरिता मांग, महार, वगैरे लोक गुंजांचे विषाचा उपयोग करतात, अशाबद्ल वऱ्याच ग्रंथांतून आधार आहेत. रा. त्रिभुवनदास मोतीचंद शाह, एल. एम. चीफ मेडिकल ऑफिसर जुनागड स्टेट, हे आपल्या 'शरीर आणि वैद्यक' नांवाच्या गुजराथी ग्रंथांत लिहितात की, 'उत्तर-हिंदुस्थान आणि पंजाब वगैरे भागांतील मांग लोक ढोरांना मारण्याकरितां गुंजांची साल काढून त्यांचे बी पाणी घालून कुटतात किंवा वाटतात, व त्याच्या सुईसारख्या अणकुचीदार कांड्या तयार करून त्या सुकवून ठेवतात; आणि ज्या ढोराला मारावयाचे असेल त्याच्या कातडीत ती कांडी भोंसकतात. त्याच्या योगाने कातडीला तीक्ष्ण जखम होऊन ढोर मरण पावते. गुंजा हिरव्याच खाल्ल्या तर विषारी आहेत, परंत शिजवून खाल्ल्या तर त्यांचा विषारीपणा नाहीसा होतो, आणि म्हणूनच ईजिप्त देशांत बऱ्याचशा गुंजांचा उपयोग खाण्याकडे होती. गुंजांच्या अंगच्या विषाचे तत्त्व सार्द्र उष्णतेने साफ नाहीसे होते म्हणून गुंजा, तशाच खाल्ल्या तरी जठरांतल्या उष्णतेने व आर्द्रतेने त्यांतील विषारी गुण नाहीसा होतो. सेंटिग्रेड शंभर २४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----
अंशाची उष्णता मिळाल्याने गंजेच्या अंगचे विष साफ नाहीसे होते. व्हिनीगर दोन भाग, साखर तीन भाग आणि लिंबाचा रस एक भाग, या सर्वांचे मिश्रण गुंजांचे विष उतरण्याला देतात. गुंजेच्या मुळीचे चूर्ण व सुंठीचे चूर्ण एकत्र करून खोकल्यावर देतात. टक्कल पडलेल्या जागीं गुंजांचा रपटा लावल्याने पुन्हां केस येतात. गुजराथेत गुंजेला ‘चणोठी' असे नाव आहे. त्या प्रांतीं ‘चणोठी पाक' या नावाचा पांढऱ्या गुंजांचा पाक तयार करतात. पांढऱ्या गुंजा भरडून त्यांची डाळ तयार करतात, नंतर त्या डाळीवरील भूस पाखडून टाकुन डाळ दळतात. गुंजांच्या या पांच शेर पिठांत पांच शेर दूध घालून ते शिजवून त्याचा खवा तयार करतात. नंतर साखरेचा पाक करून त्यांत तो खवा, वेलची, जायफळ, वगैरे पदार्थ घालून ढवळतात; म्हणजे चणोदीपाक तयार झाला. हा पाक वीर्यपौष्टिक आहे. असे या वनस्पतींचे अनेक औषधि उपयोग आहेत. आपल्या इकडे वजन करण्याच्या कामी गुंजांचा उपयोग करतात, हे सर्वांना ठाऊकच आहे. एक गुंज सुमारे पावणेदोन ग्रेन वजन भरते. जगविख्यात 'कोहिनूर हिरा प्रथम गुंजा घालूनच वजन केला होता असे म्हणतात. गुंजांत ‘रती ' असेही म्हणतात. या रती शब्दावरूनच आरबी भाषेत ' किरात' हा शब्द झाला, व त्यावरून इंग्रजीमध्ये ‘क्यारट ' ( सोने, हिरे वगैरे मौल्यवान जिन्नस तोलण्याचे वजन ) हा शब्द झाला असावा, असे काही ग्रंथकारांचे मत आहे. एक क्यारट वजन म्हणजे जवळ जवळ दोन रती किंवा ३/ ग्रेन होतात. लहान मुले व कांहीं रानटी जातीचे लोक गुंजांच्या माळा व कर्णभूषणे करून अंगावर घालतात. गुंजांच्या माळा करून त्या गळ्यांत चालण्याची चाल बरीच प्राचीन असावी, असे 'वनसुधेतील ' वामनपंडितांच्या खालील उताऱ्यावरून दिसून येते.

  स्वकौशल्य ज्या गुंजमाळांत नाना ।
  गळां घालिती ते करीती तनाना ॥
  शिरीं बांधती मोरपत्रे विचित्रे ॥
  शरीरावरी रेखिती दिव्य चित्रे ॥
      'वनसुधा.'
 श्रीकृष्ण परमात्मा गोकुळांत नंदगृही असतां नंदाची गुरे राखावयास रानांत गेल्यावेळी आपल्या संवगड्यांबरोबर त्यांनी ज्या अनेक बाललीला केल्या, त्या लीलांचे हे वर्णन आहे. लहान लहान पेट्या, टोपल्या, सुपल्या, वगैरे जिनसांवर गुंजा निरनिराळ्या आकृतीमध्ये बसविल्याने त्या जिनसांना विशेष शोभा यऊन त्यांनी किंमतही चांगली येईल, तरी हौशी मनुष्याने हा प्रयत्न करून पहावा.

--------------------
      ताड.      २५
-----
१६ ताड.

 आपल्या देशांतील सर्व झाडांत ताडाचे झाड उंच आहे. ताडाच्या प्रत्येक भागास निरनिराळी नावे आहेत. आणि प्रत्येक भागाचा कांहींना कांही उपयोग आहेच. तामिल भाषेत 'तालविलास' नांवाचा ताडवृक्षाच्या वर्णनाचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. त्या ग्रंथांत ताडवृक्षाचे आठशे उपयोग सांगितले आहेत. ताडाच्या झाडापासून गोंद निघतो. हा गोंद काळा व तकतकीत असतो. पानाच्या देठापासुन तंतु काढतात, त्याच्या दोऱ्या करितात. सिलोन बेटांत शेतकीस लागणारी सर्व दोरखंडे या धाग्याचींच असतात. ताडाच्या झावळ्यांनी लहान लहान झोपड्या शाकारितात. ताडाच्या पानांचे पंखे, छत्र्या, इरली, चटया, टोप्या, टोपल्या, मुलांची निरनिराळी खेळणी, वगैरे शेंकडों जिनसा करितात. 'ताडपत्रवृक्ष' या नांवाची ताडाची जी जात सिंहलद्वीपांत होते, तिची उंची सवाशें हात असून झांवळ्या पंधरा वीस हात लांब असतात. हा 'वृक्ष' सुमारे पाऊणशे ऐशी वर्षे वाचतो आणि इतक्या काळांत एकदांच फळास येतो. याचे फळ हृत्तीच्या मस्तकाएवढे असून त्यांत ताडगोळ्यासारखा गीर असतो, तो खातात. प्राचीन काळीं कागद करण्याची कृति लोकांस माहीत नव्हती, तेव्हा या वृक्षाच्या झावळ्यांची पुस्तकें लिहिण्यास उपयोग करीत असत. तेलंगणांत व ओरिसा प्रांतांत ताडपत्रावर ग्रंथ लिहिण्याची चाल हल्लीही आहे. ताडपत्रावर लिहिलेले जुने ग्रंथ अद्यापिही पाहण्यात येतात. ताडपत्रे लिहिण्याच्या कामांत आणण्यापूर्वी ती पानें दूध-पाण्यात उकडून काढितात, नंतर लोखंडी टाकानें त्यावर अक्षरे खोदून त्यांत शाई भरतात, व वरून गोंद सारवितात. ताडाचे झाडापासून ताडी काढितात, हे सर्वांना विदितच आहे. हा रस शिजवून त्यापासून गुळ, साखर, वगैरे पदार्थ करितात. तीन शेर रसाचा सरासरी अर्धाशेर गुळ होतो. ताडाचे लांकूड उभे चिरून त्याचे पन्हळ करतात. शिंपीचा चुना, कोंबडीच्या अंड्याचा बलक आणि ताडाचा रस, ही एकत्र मिसळून उत्तम प्रकारच्या संदलाचा चुना तयार करतात. या संदल्याने इतकी झिलई येते की, पांढरा संगमरवर आणि या संदल्यानें घोटलेले काम, यांतला भेद ओळखतां येत नाही. आपल्या इकडे ताडाच्या लांकडाचे घोटे करण्याचा विशेष प्रघात आहे. जलोदरावर ताडाचा रस पाजतात. प्लीहारोगावर ताडाच्या पोया जाळून त्याची राख देतात. ताडाचे रसांत तांदुळाचे पीठ कालवून त्याचे पोटीस जखम, करट, व्रण, इत्यादिकांवर बांधल्याने गुण येतो, ताडाच्या झाडाला जी फळे येतात, त्यांस ताडगोळे म्हणतात. ही फळे थंड आहेत, म्हणून उन्हाळ्यांत थंडाईकरिता ती खातात. ही फळे कोवळी असतांना फार रुचकर लागतात. ताडगोळ्याच्या मगजांत पीठ आणि साखर घालून पोळ्या करितात, व त्या पोळ्या तुपांत किंवा २६.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

मोहरीच्या तेलांत तळून खातात. त्यांस ‘पाताळी' अथवा 'पिठा' म्हणतात. हें ताडाचे सर्वसाधारण उपयोग सांगितले. याशिवाय आणखीही शेंकड़ों उपयोग आहेत, ते सर्व सांगावयाचे म्हटल्यास एक स्वतंत्र ग्रंथच होईल. तथापि ताडीचा जो एक विशेष उपयोग आहे, तो सांगूनं हे ताडवर्णन पुरे करू. छापण्याच्या शिळेवर कॉपी वठविण्यात ताडीचा उपयोग करतात. कॉपी लिहून तयार झाल्यावर लिहिलेली बाजू खाली करून कोरी बाजू वर करावी, नंतर स्पंज ताडीत भिजवून हलक्या हाताने त्या कॉपीवरून फिरवावा. नंतर ती कॉपी तशीच शिळेवर ठेवून यंत्राने दाबावी, म्हणजे ताडीचे योगानें कागदावरील अक्षरं शिळेवर वठतात. भेरली जातीच्या तांडाच्या बुंधापासून हलक्या प्रतीचा साबूदाणाही तयार करतात.

--------------------
१७ मेंदी.

 आपल्या इकडे व्यापाराकरितां म्हणून कोणी मेंदीची लागवड करीत नाही; परंतु सिंधमध्यें व पंजाबांत जमिनीची चांगली मशागत करून व्यापाराकरितां म्हणूनच या वनस्पतीची तिकडे मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. आमच्या इकडे बागेला व शेताला कुंपण करण्याकरितां हिची लागवड होत असते. ही झाडें सुमार पुरुष दीड पुरुष उंच वाढतात. झाड दोन वर्षाचे झाले म्हणजे त्यास फुलें येऊ लागतात. चैत्र, वैशाख व ज्येष्ठ या महिन्यांत फुलांचा भर असतो. या फुलांचा दुरून चांगला वास येतो. यासाठी मेंदीचा ताटवा लावणे तो बागेच्या पश्चिम आंगात लावावा म्हणजे चैत्र-वैशाखांतील मंद शीतल वासंतिक वायु त्यावरून वाहत येऊन फुलांतील सुगंधाने मन सुप्रसन्न करतो. या झाडाला बारीक फळांचे मोठमोठे घोस येतात, त्यास 'इसबंद' असे म्हणतात. मुलांची दृष्ट काढावयास हा घेतात. इसबंद थंड आहे. उष्णतेमुळे उठलेल्या गांठींवर मेंदीचा पाला वाटून त्याची वडी करून बसवावी. उष्णतेच्या कोणत्याहि विकारावर मेंदीचा पाला गुणावह आहे. डोकींत खवडा पडला असेल, तर मेंदीचा पाला बारीक वाटून त्याचा एक अंगुळ जाडीचा खवड्यावर लेप करून वर पट्टा बांधावा. चार प्रहरानंतर पट्टा सोडून लेप धुवून खवड्याचे जागी नारळाच्या शेंडीची राख तिळाचे तेलांत खलून लावावी. म्हणजे गुण येतो. याशिवाय आणखी काही औषधी उपयोग या झाडाचे आहेत. गुजराथी व मारवाड़ी लोकांच्या बायका मेंदीचा पाला वाट्न तो हाताच्या व पायांच्या नखांवर बांधून त्यांने नखे रंगवितात. उत्तर-हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या बायकाही, नख व हात रंगविण्यासाठी या पानांचा फार उपयोग करतात. रजपूत लोक रुमालाना वगैरे मेंदीने बदामी रंग देतात. परंतु व्यापारसंबंधीं या झाडाचा मुख्य       खैर.      २७

-----
उपयोग म्हटला म्हणजे मेंदीच्या फुलांपासून अत्तर काढितात, हा होय. या अत्तराला 'हीना' असे म्हणतात. मेंदीसारख्या क्षुल्लक वनस्पतीपासून ' हीन्या ' सारखें उंची अत्तर होते, हे पाहून परमेश्वराच्या अतर्क्य लीलेचे व मनुष्याच्या शोधक कृतीचे मोठे कौतुक वाटते.
--------------------
१८ खैर.

 खैर हा अरण्यवृक्ष आहे. सह्याद्रीच्या खालच्या प्रदेशांत ही झाडे पुष्कळ आहेत. या झाडाला बारीक तीक्ष्ण कांटे असतात, आणि पाने शमीच्या पानांसारखी बारीक असतात. खैराचे लाकूड फार घट्ट, कठीण, बळकट व टिकाऊ असते, यामुळे साधारण धारेचे हत्यार यावर चालत नाही. खैराचे लाकूड जळण्याला बाभळीच्या लाकडापेक्षाही कणखर असते. या लाकडाचा निखारा लवकर विझत नाही. खैराचे ओले लाकूड सालीसुद्धां बारीक फोडून अर्क काढितात. हा अर्क इमारतीचे चुन्यांत घातला असतां, चुना इतका मजबूत होतो की, त्यास तोफेचा गोळा सुद्धां लागू होत नाही. खैराचे लांकूड रेतीत कितीही वर्षे राहिले तरी कुजत नाहीं. तंबूच्या मेखा, सोटे, वगैरे या लाकडाचे करितात. फाजील श्रमामुळे मनुष्याच्या छातीत रक्त गोठते. त्यावर खेराच्या सालीच्या रसांत हिंग घालून देतात. हाच विकार गुरांस झाला असतां खैराचे सालीचे रसांत नारळाचा अंगरस, तुरटी, हळदीची पूड व मिरपूड घालुन तो रस पाजावा. खैराच्या कोवळ्या तुबऱ्या चार पैसे भार व जिरें एक पैसाभार, ही एकत्र बारीक वाटून ते मिश्रण गाईच्या दुधांत कालवावे, आणि वस्त्रगाळ करून त्यांत खडीसाखरेची पूड घालून रोज सकाळी व सायंकाळी घेतल्यास प्रमेहाचा विकार जातो. याला पथ्य अळणी, तुरीचे वरण, तूप, गव्हाची भाकरी, हें आहे. सदर्हू औषध विशेष गुणावह असल्याबद्दल एका जुनाट पुस्तकांत लेख आहे, सबब तो येथे नमूद केला आहे.

  खदिरात्रिफलाक्काथो महिषीघृतसंयुतः ॥
  विडंगचूर्णयुक्तश्च भगंदरविनाशनः ॥
      'शाङ्गन्धर.'

 खैरसाल, बेहडा, आवळकाठी व हिरडा, या चार औषधांचा काढा, म्हशीचे तूप व वावाडिंगाचे चूर्ण मिळवून घेतला असतां भगंदर रोग दूर होतो. अशाप्रकारचे या झाडाचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत, परंतु या झाडाचा व्यापारसंबंध मुख्य उपयोग झाडापासून मिळणारा कात हा होय. कात करण्याची रीत तालीलप्रमाणे आहे. खैराचे जून झाड तोडून त्याची साल व आंतील गाभ्याचे बारीक बारीक तुकडे करून ते तुकडे मडक्यांत भरून त्यांत पाणी घालतात व कढवितात; २८.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

निम्में पाणी आटले म्हणजे मातीच्या उथळ परळांत ओतून पुन्हा कढवितात, सुमारे एक-तृतीयांश द्रव शिल्लक राहिला म्हणजे, ते परळ एक दिवसपर्यंत थंड जागेत ठेवितात. नंतर दुसरे दिवशीं परळ उन्हांत ठेवून तो द्रव वरचेवर ढवळतात. अशा तऱ्हेने तो द्रव बराच घट्ट झाला म्हणजे, जाड खादीवर पसरतात, व दोरीने त्याच्या वड्या कांपतात. खास कात चिकटू नये म्हणून द्रव खादीवर ओतण्यापूर्वी त्या खादीवर गाईच्या शेणीची राख पसरून ठेवितात. हा कात रंगाच्या, कांतडी कमाविण्याच्या वगैरे कामांत उपयोगी पडतो. खाण्याकडे या काताचा उपयोग करीत नाहीत. बाजारांत हा काळा कात या नावाने विकतात. हा ठिसूळ, काळसर तपकिरी रंगाचा असून याला वास नसतो. चवीला हा कात तुरट असून कढत पाण्यांत विद्राव्य आहे. वर सांगितल्याप्रमाणे लांकडांचा द्रव नियमित मर्यादेपर्यंत आटवून मग आटविण्याची क्रिया बंद करितात, व त्या द्रवांत झाडाच्या फांद्या घालून ठेवितात, म्हणजे त्या फांद्यांवर द्रवांतील कात थिजून जमतो. हा कात फिक्कट व पांढरा असुन त्याचा उपयोग खाण्याकडे व औषधाकड़े करतात.

--------------------
१९ शाळू ( जोंधळा. )

 आमच्या इकडे देशावर व गुजराथ वगैरे प्रांतांत मुख्य उत्पन्न म्हटले म्हणजे जोंधळ्याचे. जोंधळा या धान्याचे उपयोग सर्वांना महशूर आहेत. त्या संबंधाने येथे काही सांगावयाचे नाही. येथे फक्त जोंधळ्याच्या ताटांचा एक विशेष उपयोग सांगावयाचा आहे. जोंधळ्याची कणसे काढून घेतल्यानंतर जी ताटें राहतात, त्यांचा उपयोग गुरांचे वैरणीकडे होतो, त्यास कडबा असे म्हणतात. अमेरिकेत या ताटांचा उपयोग साखर करण्याकडे करतात. तिकडे हे कारखाने दिवसेंदिवस ज्यास्त भरभराटीस येत आहेत. आमच्या इकडे गुजराथप्रांती जोंधळ्याच्या ओल्या ताटांचा रस काढून तो साखरेऐवजी खिरींत घालितात, यावरून इकडील जोंधळ्याच्या ताटांतही अमेरिकेतील ताटाइतकीच गोडी असली पाहिजे, हे उघड आहे. करितां आमच्या इकडील विद्वान् लोकांनी या कामांत लक्ष घालून जोंधळ्याच्या ताटापासून साखर करण्याचा प्रयत्न करून पाहिल्यास यश आल्यावांचून राहणार नाही, अशी आमची खात्री आहे. जोंधळ्याप्रमाणेच मक्याच्याहि ताटांचा उपयोग साखर करण्याच्या कामी होतो. जोंधळ्याचे किंवा मक्याचे ताटाचा साखर करण्याकडे उपयोग केल्यास माणसाचे किंवा गुराचे पोटावर पाय येण्याचा मुळीच संभव नाही. कारण कणसे भरल्याशिवाय जोंधळा व मका चरकांत घालण्याच्या स्थितीत येतच नाही. तसेच यातील साखरेचा अंश काढून घेतल्यानंतर जी चिपाडे राहतात, त्यांचा वैरणी      पोपया.      २९

-----

प्रमाणे उपयोग होतो. देशावर शाळेत जाणारी लहान मुलें बोरूऐवजी शाळूच्या ताटांचा लेखण्या करण्याचे कामीं उपयोग करतात.

--------------------
२० पोपया.

 पोपयाची झाडे उष्ण प्रदेशांत पाहिजे त्याठिकाणी होतात. पोपयाचे मूलस्थान अमेरिकाखंड असावं, असा विद्वान् लोकांचा तर्क आहे. ही झाडे उकिरड्यावर सुद्धा आपोआप वाढतात. हे झाड दहा बारा हातपर्यंत नीट, सरळ वाढत जाते. त्यास आडव्या तिडव्या डाहळ्या फुटत नाहींत, शैड्याला एरंडाच्या पानाच्या आकाराची, परंतु त्यापेक्षां फार मोठमोठाली व लांब पोकळ देठाची अशी पाने येतात. पोपयाचे लाकूड फारच ठिसूळ आहे. यामुळे तें कोणत्याही कामास उपयोगी पडत नाही. या झाडांत स्त्री आणि पुरुष अशा दोन जाती आहेत. त्यापैकी स्त्रीजातीच्या झाडाला मात्र फळे येतात. नरमादी एकत्र असली म्हणजे मादीला फार फळे येतात. ही फळे नारळासारखी पानांच्या खाली लागतात. झाड लावल्यापासून तीन वर्षांनी फळे येऊ लागतात. ही फळे बारमहा येतात. हिरव्या फळाची भाजी करतात. पिकलेली फळे खाण्याच्या उपयोगी पङतात. ही फळे फार खाल्ली असतां खरूज वगैरे विकार उत्पन्न होतात. उन्हाळ्यांतील फळे रुचकर असतात. सिद्धी लोक कपडे धुण्याकरितां साबणाऐवजी पोपयाच्या पानांचा उपयोग करतात. पानथरीवर व काळीज फुगले असता त्यावर पोपयाच्या फळाचे पोटीस करून बांधावे व फळांच्या सालीतून निघणारा पांढरा चीक चमचाभर साखरेत मिश्र करून दिवसांतून तीन वेळ याप्रमाणे दिल्यास खात्रीने गुण येतो. असा डॉक्टर इव्हस यांचा अनुभव आहे. याच पांढऱ्या चिकाने पोटांतील कृमींचा नाश होतो. हा चीक देणे तो मोठ्या मनुष्यास मधाबरोबर दोन चमचेपर्यंत व लहान मुलांस दोन चार थेंब दिले म्हणजे पुरे होतात. जरूर तर वर थोडेसे एरंडेल पाजावे. पोपयापासून अन्नपाचक व पौष्टिक असे ' पेपसिन ' नांवाचे औषध तयार करतात. औषधासंबंधांत या झाडाचे आणखीही दुसरे उपयोग आहेत. परंतु याचा एक विशेष उपयोग आहे, तो सांगून हा भाग पुरा करू. कोणत्याही जनावराचे मांस शिजत नसले तर पोपयाच्या फळांतून दुधासारखा जो पांढरा चीक बाहेर येतो; तो त्या मांसांत मिश्र करून मग तें मांस शिजवावे. म्हणजे कसलेही न शिजणारे मांस असले तरी ते इतके नरम होते की, मांसाचे तंतु भांड्यांत गळून पडतात. चिकाऐवजी पोपयाच्या फोडी करून टाकल्यानेही वरील कार्य होते, मात्र पिकलेल्या ३०.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

पोपयाच्या फोडी टाकल्यास मांसाची रुचि बिघडते. मांस लवकर शिजण्यासाठी ते पोपयाच्या पानांत बांधून ठेवितात; अगर त्याच्या झाडाला टांगून ठेवितात.

--------------------
२१ बाभूळ.

 बाभळीची झाडे कोंकणांत फारशीं नाहींत. कारण काळ्या जमिनीशिवाय बाभळीचे झाड होत नाही. कोकणांत जेथे काळवट जमीन आहे, तेथे मात्र ही झाडें नजरेस पडतात. देशावर सर्वत्र ही झाडे आहेत. बाभळीचे लांकुड मजबूत असून जळण्याला कणखर आहे. ते इमारतीच्या व शेतकीच्या औतांच्या उपयोगी पडते. देशावर कुळवाची दिंडे, नांगरांचे आंकडे, वगैरे याच लाकडांचीं करितात. बाभळीच्या झाडाला लांब व अणकुचीदार कांटे असतात. यामुळे या झाडाचे डहाळ कुंपणाला लावतात. डहाळ तोडल्याने झाड कमजोर न होतां उलट ज्यास्त जोराने वाढत जाते. बाभळीचे लाकूड फार घट्ट व चिवट असून पाणी खाल्लेले असले म्हणजे त्यास कीड अगर वाळवी लागत नाही. म्हणून गाड्यांची चाके, उसाच्या घाण्यांची मुसळे, खुंट्या, वगैरे जिनसा या लांकडाच्या करितात. बाभळीच्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. या झाडाच्या शेंगा लांब व करवे पडलेल्या असतात. कोवळ्या शेंगांची भाजी व लोणचें करितात, कातडी कमविण्यास व रंगविण्यास बाभळीच्या सालींचा व शेगांचा उपयोग करतात. या सालीमध्ये टॉनिक व ग्यालिक अॅसिड असून शिवाय एक प्रकारचे रंगीत द्रव्य असते. वरील दोन्ही अॅॅसिडांचा कातडी कमाविण्याचे कामी फार उपयोग होतो. चामड्यांतील प्राणिज द्रव्ये ओली असतां लवकर कुजतात; परंतु तीच या सालींतील अॅॅसिडाने पाण्यांत अविद्राव्य अशी होऊन कच्च्या चामड्याचे टिकाऊ व मजबूत असे कमाविलेले कातडे बनते. कानपूर, आग्रा, वगैरे ठिकाणी कातडी कमाविण्याचे जे कारखाने आहेत, त्यांतून याच सालीचा उपयोग करतात. बाभळीच्या शेंगांतील बी व त्यावरील साल, यांचे भिन्न भिन्न रंग होतात. बियांमध्ये मुख्यत्वेकरून लाल रंगीत द्रव्य असते, व त्याचा चामड्यास लाल रंग देण्याकरिता उपयोग करतात. बाभळीच्या सालींत व शेंगांत जे हे विशेष गुण आहेत, ते आमच्याकडील अशिक्षित लोकांस माहीत नसल्यामुळे, दरसाल हजारों खंड्या बाभळीचे लाकूड तुटून ते फक्त जाळण्याच्या उपयोगास लागत आहे. बाभळीची लांकडे तोडणे ती, रस सालीत चढल्यावर चैत्र महिन्याच्या सुमारास तोडावी; नंतर कुऱ्हाडीने सालींत आडवे कच सुमारे दोन दोन हातांच्या अंतराने पाडुन ते सालीचे तुकडे लाकडापासून सोडवावे, व उन्हांंत उभे करून सुकूंं द्यावे. सुकल्यानंतर त्यांचे गठ्ठे बांधून विक्रीकरितां कातडी       दुध्याभोपळा.      ३१

-----

कमाविणारे कारखानदारांकडे पाठवून द्यावे. असे केल्याने दुहेरी फायदा होणार आहे. बाभळीच्या झाडाचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हटला म्हणजे या झाडापासून मिळणारा डिंक हा होय, खैर, शेवगा, वगैरे झाडांपासूनही डिंक निघतो; परंतु त्या सर्वांत बाभळीचा डिंक पहिल्या प्रतीचा आहे. हा डिंक पांढरा असतो, बाभळीच्या झाडास स्वाभाविकरीत्या पडलेल्या व मुद्वाम पाडलेल्या चिरांतून हा डिंक वाहत असतो. प्रथम तो दाट रसासारखा असतो; परंतु लागलाच हवेने घट्ट होतो. हा डिंक प्रकाशभेद्य असून, थंड पाण्यात विद्रुत होतो. रंगाच्या व चिकटविण्याच्या कामी याचा उपयोग होतोच, परंतु विशेषतः खाण्यासाठी याचा फार खप होतो. हा डिंक पौष्टिक असल्यामुळे, बाळंत झालेल्या बायकांना याचे लाडू करून देण्याची आपल्या इकडे फार वहिवाट आहे. बाभळीचे ओलें काष्ठ दंतधावनास घेतात. बाभळीची व जांभळीची आंतली साल यांचा काढा करून त्यांत तुरटीची लाही घालून गुळण्या केल्यास मुखरोग बरे होतात. सर्पाचे मेंगेस बाभळीचा गोंद लावून त्याची पट्टी बदावर दिल्यास गुण येतो. बाभळीच्या बियांचे चूर्ण तीन दिवस मधाशी खाल्ले असतां अस्थिभंग दूर होऊन अस्थि वज्राप्रमाणे बळकट होतात. निष्कंटक बाभळीच्या पानांचा अंगरस काढून तो घेतल्यास अनेक प्रकारचे अतिसार दूर होतात. असे या झाडाचे अनेक उपयोग आहेत.

--------------------
२३ दुध्याभोपळा.

 दुध्या भोपळा सर्वांच्या माहितीचा आहे. यास कोणी कोणी पांढरा भोपळा असेही म्हणतात, गोमंतकाकडे यास कोकणदुधी असे नांव आहे. संस्कृतांत अलाबु, इक्ष्वाकु, वगैरे जी नांवे आहेत, ती याच फळाची. हे भोपळे बारमहा होतात, परंतु मार्गशीर्षापासून ज्येष्ठापर्यंत यांचा हंगाम विशेष असतो. लांबोडी, चपटी, तुंबडी, तंबुऱ्या अशा याच्या आकारावरून चार पांच जाति मानितात. याशिवाय कडू भोपळा म्हणून याची आपोआप होणारी एक जात आहे. या जातीची फळे अगदी कडू असतात. त्यांचा खाण्याच्या कामी उपयोग होत नाहीं. दुध्या भोपळ्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या व खिरी करितात. हें सर्वांना विदितच आहे. दुध्या भोपळा धातुवर्धक व पौष्टिक असल्यामुळे याचा हलवा करुन खातात. दुष्या भोपळ्याच्या पाल्याचा रस काढून मूळव्याधीवर त्याचा लेप करतात. याशिवाय वनस्पतीचे महत्त्वाचे असे दुसरे काहीं औषधी उपयोग नाहींत. दुध्या भोपळा फोडला म्हणजे आंतील कोंवळ्या बिया चुईमध्ये ओंवून त्या निखाऱ्यावर भाजून मुले मोठ्या आवडीने खातात. खाण्याशिवाय दुसऱ्याही अनेक कामीं या फळांचा उपयोग होतो. भोपळे ३२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

पिकून जून झाले म्हणजे त्यांतील जे वाटोळ्या आकाराचे असतात, त्यांचे तंबुरे व भंडारी लोक तुंबे करितात. या तुंब्याचा ताडी काढण्याच्या कामीं उपयोग करतात. एका अंगाला फुगीर व एका अंगाला लांबट, अशा आकाराचे जे भोपळे असतात, त्यांचे गारोडी वगैरे लोक ' नागशूर ' म्हणून एक प्रकारचे तोंडाने वाजविण्याचे वाद्य तयार करतात. याचे सुराला सर्प भुलतात. गोसावी, बैरागी, वगैरे लोक ताक, पाणी, वगैरे ठेवण्याच्या कामी भांड्यांऐवजी या फळांचा उपयोग करतात. प्राचीन काळी होड्या, नांवा वगैरे जलप्रवासाची साधने जेव्हां विशेष अस्तित्वात नव्हती, तेव्हां व सध्यांही ज्या ठिकाणी मोठाले ओढे व नद्या यांतून पलीकडे जाण्याला होडी, साकू वगैरे कांहीच साधन नसते. या ठिकाणी या भोपळ्यांचा फारच चांगला उपयोग होतो. अशा ठिकाणी या भोपळ्यांचे पेटे व सांगडी करुन त्यांच्या साह्याने लोक परतीराला जातात. पेटे व सांगडींकरितां भोपळे घेणे ते मोठे व जून असे पाहून घ्यावे. या कामासाठी कडू भोपळे वापरणे बरे. हे भोपळे मोठे व फार हलके असून त्यांची साल कठीण असते. दोन्ही काखेंत भोपळे धरून नदी उतरून जाण्याचे जे साधन त्यात 'पेटा' म्हणतात, आणि पांच सात भोपळे मजबूत सणाच्या दोरीनें मध्ये वीत दीडवितांचे अंतर ठेवून एकमेकांसमोर बांधून जें जलवाहन तयार करितात, त्यात सांगड असे म्हणतात. हिच्या साह्याने पोहणी न येणारा मनुष्यही चार दोन मणांचं ओझं घेऊन सांगडीवर बसून नदी उतरून पैलतीरास जाऊं शकतो. पेटे किंवा सांगडीचे भोपळे जोपर्यंत जवळ आहेत, तोपर्यंत मनुष्याला बुडण्याची धास्ती बाळगावयास नको. कडू व निरुपयोगी वाटणाऱ्या अशा वनस्पतींपासूनही अशा प्रकारचे महत्त्वाचे उपयोग होतात.

--------------------
२३ पतंग.

 मलबार, सिलोन, मद्रास, मुंबई, सयाम, ब्रह्मदेश वगैरे प्रांतीं पतंगाची झाडे पुष्कळ होतात. पतंगाच्या लाकडाचे तुकडे एक रत्तल व अधणाचे पाणी एक ग्यालन घेऊन निष्कर्ष करून तो प्रमाणाने अतिसार व श्वेतप्रदर यांवर दिल्यास गुणावह आहे, असे डॉक्टर बेरिंग साहेबांचे म्हणणे आहे. दंतमंजनामध्ये पतंगाचे लांकडाचा उपयोग होतो, असे डॉ० शाह आपले ग्रंथांत वर्णन करतात. पतंगाचे झाडाचा विशेषेकरून रंगाच्या कामी उपयोग होतो. हे झाड पक्वदशेला येण्याला सुमारे चवदा पंधरा वर्षे लागतात. रंगारी लोक पतंगाच्या लांकडाचे ढलपे काढून, ते ढलपे, लाख व तुरटी हे तिन्ही जिन्नस एकत्र करून दोन दिवसपर्यंत पाण्यात भिजत घालतात, दोन दिवसांनंतर ते मिश्रण कढवितात. म्हणजे तांबडा रंग तयार होतो. ज्या कपड्यांस हा रंग द्यावयाचा असेल तो कपडा पलंगाची झाडे ल्यास गुणावह निष्कर्ष करून तोकडे एक रत्तली       चिंच.      ३३

-----

प्रथम तुरटीचे पाण्यात भिजवून नंतर या रंगांत बुडवून काढतात. कपड्याला सर्वत्र सारखा रंग लागला म्हणजे तो कपडा साधारण पिळून वाळवितात. रंग पक्का बसण्याकरिता कपडा रंगांत भिजवून वाळविण्याची क्रिया अनेक वेळा करावी लागते. पतंगाच्या लाकडाच्या कषायावर निरनिराळ्या रासायनिक पदार्थांची निरनिराळी कार्ये होतात. परंतु त्यासंबंधाची माहिती येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. आता फक्त पतंगाच्या लाकडापासुन व्यापारोपयोगी तयार होणारा जिन्नस जो गुलाल त्यासंबंधाची माहिती या भागांत सांगावयाची आहे. गुलाल तयार करण्याकरितां तांदुळाचें अगर नाचणीचे पीठ किंवा आरारूट या जिनसांचा उपयोग करतात, हे पूर्वी सांगितलेच आहे. आपल्या इकडे आरारूट महाग मिळत असल्यामुळे, तांदुळाचे अगर नाचणीचे पीठ घेणेच फायदेशीर आहे. तांदुळाच्या कण्या प्रथम धुवून वाळवाव्या. वाळल्यानंतर दळून त्वांचे पीठ तयार करावे. नंतर शेरभर कण्यांचे पिठांत दोन तोळे पापडखाराचे पाणी करून त्यांत ते पीठ भिजवून गोळे बांधावे; व ते गोळे सावलीत वाळवावे नंतर पतंगाच्या लांकडाचा वर सांगितल्याप्रमाणे रंग तयार करुन ते गोळे फोडून त्याचे पीठ करून त्या रंगांत भिजवावे आणि ते मिश्रण सावलीत वाळवावे, अशा तऱ्हेनें जितकी ज्यास्त पुटें द्यावी, तितका गुलाल ज्यास्त रंगदार होतो.

--------------------
२४ चिंच.

 चिंचेची झाडे आपल्या देशात सर्वत्र आहेत; परंतु त्यांत तांबडी चिंच म्हणून जी जात आहे, ती मात्र फारशी कोठे आढळत नाहीं. चिंचेचे झाड घरानजीक असल्यास त्या घरात राहणाऱ्या लोकांस नेहमी सरदीचे विकार भोगावे लागतात, यामुळे ही झाडे बहुधा कोणी घराजवळ लावीत नाहींत. परंतु सिलोन बेटांतील लोक आपली घरे मुद्दाम या झाडाच्या गारव्याला बांधतात. चिंचेच्या झाडाचा बुंधा मोठा असून त्याचा विस्तारही पुष्कळ होतो चिंचेच्या झाडाला आठ नऊ वर्षांनी चिंचा येऊ लागतात. चैत्राच्या समारास या झाडाला नवी पालवी फुटून, त्याच वेळी फुलेही येऊ लागतात. माघ महिन्याचे सुमारास चिंचा पिकून तयार होतात. पिकलेल्या चिंचेचा एकेक आंकडा वीत पाऊणवीत लांब असतो. चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी करितात, परंतु ती फार आंबट असते. चिंचेच्या फुलांची चटणी करितात. चिंचेचे लांकड फार चिवट आहे, यामुळे त्याच्या उखळ्या, चोपणी, चरक, तेलाचे घाणे वगैरे जिनसी करितात. हत्यारांना दांडे घालण्याच्या कामही या लाकडाचा उपयोग होतो. चिंचेच्या झाडाला जी बाहेरून खरबरीत काळी साल असते, तिचे वस्त्रगाळ चूर्ण करून ते प्रत्येक वेळी दोन तोळे या प्रमाणाने रोज सकाळ सायं३४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

काळ गाईचे अदमुऱ्या दह्यांतून घेतल्यास रक्तीमूळव्याध जाते. तींच सालें जाळून त्यांची राख प्रत्येक वेळी सहा मासे याप्रमाणे नवटांक नारळाचे आंगरसांत पांच दिवसपर्यंत शीतप्रमेहावर दिल्यास गुण येतो. सदर्हू औषध चालू असतां अळणी खाल्ले पाहिजे. तीच राख दर खेपेस चार तोळेपर्यंत शेळीचे मूत्रांतून पंडुरोगावर देण्याची वहिवाट आहे. चिंच रक्त शुद्ध करणारी असून पाचक आहे. तांबे, रुपे वगैरे धातूंच्या जिनसा निर्मळ करण्याकरितां चिंचेने घासतात. पावसाळे दिवसांत चिखलाचे योगानें पायांच्या बोटांची बेचके कुजून जो ‘चिखली' म्हणून रोग होतो, त्यास चिंच लावल्याने गुण येतो. पाकशास्त्रांतील चिंचेचे उपयोग सर्वांना पूर्णपणे अवगत आहेतच, तेव्हां ते सांगण्याची आवश्यकता नाही. आता फक्त चिंचेच्या बिया ज्यांस चिंचोके असे म्हणतात व जे अगदी निरुपयोगी असे समजून आपण फेकून देतो, त्यांजबद्दलची थोडीशी माहिती देऊन हे वर्णन पुरे करू. गरीब लोक चिंचोके भाजून व शिजवून खातात. चिंचोक्याचे भुकटींत सरस घालून त्यांचा रांधा केला असतां, त्यापासुन लांकडासाठीं एक प्रकारचे उत्तम लुकण तयार होते. चिंचोक्याची खळ करितात. ती कापड व कागद चिकटविण्याचे कामी येते. धनगर लोक चिंचोक्याचा रांधा करून खळ करितात, आणि ती घोंगड्या, बुर्णूस, कांबळी इत्यादिकांस देतात. या खळीचे योगाने त्यांस ताठपणा येतो. तांबडी चिंच म्हणून जी चिंचेची एक जात वर सांगितली, तिच्या चिंचोक्यापासून उत्तम प्रकारचे तेल निघते. आपल्या इकडील चिंचेच्या चिंचोक्यांपासूनही तेल निघेल, असे एका ग्रंथकाराचे म्हणणे आहे; तरी उद्योगी माणसाने हा प्रयत्न अवश्य करून पहावा. तेलंगणांत चिंचेचे झाड ज्याच्या दाराजवळ असेल, तो मोठा सुखी असे समजतात.

--------------------
२५ केळ.

 केळीची झाडे हिंदुस्थानांत बहुतेक सर्वत्र होतात. त्यांत समुद्रकिनाऱ्यास विशेष होतात. हे झाड साधारणपणे आठ दहा फूट उंच वाढते, तथापि कांहीं जातींची झाडे तीन चार फुटांपेक्षां ज्यास्त उंच वाढत नाहीत व कांही जातींचीं पंधरा फूटपर्यंतही वाढतात. सर्व वनस्पतिवर्गात केळीच्या पानाइतके मोठे पान कोणत्याच वनस्पतीचे नाही. या झाडाच्या मधल्या गाभ्यास ‘कालें' व वरील वेष्टवास ' सोपट' अशी नावे आहेत. या झाडाला जें फूल येते, त्यास ' केळफूल' व फळाच्या घडाला ' लोंगर' अशी नावे आहेत. केळीच्या सुमारे वीस जाति आहेत. त्याशिवाय रानांत आपोआप वाढणारी केळीची एक जात आहे, तिला 'चवेण ' किंवा 'रानकेळ' असे म्ह्ण      केळ.      ३५

-----

तात. केळ लाविल्यापासून सुमारे बारा महिन्यांनी विते व पुढे सुमारे तीन महिन्यांनी केळी पिकावयास लागतात. लोंगर चांगले असेल, तर एकेका लोंगरांत तीनशेपर्यंत केळी असतात. केळफुलाची, काल्याची व हिरव्या केळ्यांची भाजी करितात. हिरव्या केळ्यांच्या कापट्या करून वाळवितात. त्या बरेच दिवस टिकतात. या कापट्या कुटून त्यांचे पाठ करतात. त्यांच्या भाकरी सुद्धा होतात. पिकलेली केळी खाण्यास उपयोगी पडतात. त्यांची निरनिराळी पक्वान्ने करितात. राजेळी म्हणून जी जात आहे, त्या जातीची केळीं सुकवून ‘सुकेळीं' करितात. वसईजवळ आगाशी येथील लोकांचा सुकेळीं तयार करणे हा एक धंदाच आहे. या धंद्यावर तेथील शेकडों लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. केळ्यांशिवाय या झाडाचे दुसरेही पुष्कळ महत्त्वाचे उपयोग आहेत. आणि त्यांसंबंधानेच या भागांत विशेष माहिती सांगावयाची आहे. भोजनसमारंभांत केळीच्या पानांचा व द्रोणांचा किती उपयोग होतो, हे सर्वांना ठाउकच आहे. आमच्या या देशांत सुवर्णपात्राप्रमाणे केळीच्या पात्राची योग्यता मानिली जाते. पुणे-मुंबई सारख्या मोठाल्या शहरानजीकचे लोक केवळ पानांकरितांच केळीच्या झाडांची लागवड करून त्यांवर शेंकडों रुपये मिळतात. केळीच्या पानांचे दांडे ( ताटोळे ) वाळवून जाळले असता त्यापासून जी राख होते, तीमध्ये क्षार असल्यामुळे साबणाऐवजी कपड़े धुण्याकडे तिचा उपयोग करतात. केळीची वाळलेली सोंपटें तपकीर वगैरे जिनसांचे पुडे बांधण्याकरितां उपयोगांत आणतात. धनगर व कोष्टी लोक सोपटें जाळून त्यांची राख सुत रंगविण्याकरितां घेतात. बंगाल्याकडे तर कित्येक गरीब लोक मिठाऐवजी या राखेचा उपयोग करतात, असे म्हणतात. केळींची सोपटें हत्ती मोठ्या आवडीने खातात. केळीच्या ताज्या जाड सोपटांचे पाणी काढून त्यांत पापडाचे पीठ भिजविण्याची चाल आपल्या देशांत पुष्कळ ठिकाणी आहे. केळीच्या या रसाचा 'मार्किंग इंक ' प्रमाणे काळा रंगही तयार करतात. अशा प्रकारचे या झाडापासून अनेक उपयोग आहेत. याशिवाय व्यापारसंबंधी या झाडाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे सोपटापासून जे धागे निघतात, त्यांचे दोर, कागद व कापड करण्याचे जे निरनिराळे प्रयोग करून पाहण्यांत आले, त्यांचा निकाल समाधानकारक होऊन, त्याचें कांहीं कापड तर रेशमापेक्षाही चांगले दिसत होते; अशा तऱ्हेचे रिपोर्ट हल्ली प्रसिद्ध झाले आहेत. केळीचा वाख काढण्याची जी कृति नुकतीच कांहीं मासिकांतून व वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली आहे. तिचा सारांश आम्ही आपले वाचकांकरितां यासाठी देत आहों.  " केळीच्या सोपटांचें वास काढण्याचे एक यंत्र उटकमंडचे प्राउडलॉकसाहेब यांनी शोधून काढले आहे. या यंत्राची रचना अगदी साधी आहे. ३६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

जामिनीत दोन लांब उभे पुरुन त्यावर चार फूट लांब, चार इंच जाड, व सहा इंच रुंदीचें एक आडवें लांकूड बसविलेले असते व या लाकडावर एक बोथटशी सुरी तिची धार खाली करून बसविलेली असते. सुरीच्या मुठीला एक दोरी बांधलेली असून, दोरीचे दुसरे टोंक एका लांबशा बांबूला बांधलेले असते. तेणेकरून पायाने दाबून काम करतांना सुरी उचलता येते. या यंत्राची किंमत तीन रुपये आहे. थोड्या दिवसांच्या अनुभवाने एक मनुष्य रोज या यंत्रावर दहा केळीच्या सोपटांचा वाख काढू शकतो. सोपटाच्या दीड दीड इंचांच्या चिरफळ्या करण्याकरितां व इतर तऱ्हेने मदत करण्याकरितां वगैरे त्याच्या मदतीला एक मुलगा दिला म्हणजे बस्स आहे. एका केळीच्या झाडापासून सुमारे दीड पौंड वाख निघतो. एका गड्याची व मुलाची मिळून रोजची मजुरी आठ आणे धरून व रोज पंधरा पौंड वाख निघेल असे मानून, हिशेब केल्यास एक टन वाख काढण्याला सुमारे पंचाहत्तर रुपये खर्च येईल. गठ्ठे बांधणे, वाहतुक, व्यापारबट्टा, विमा वगैरे बाबींबद्ल टनाला सरासरी पंचेचाळीस रुपये खर्च येतो म्हणजे एक टन वाख लंडनचे बाजारांत जाऊन पडेपर्यंत सुमारे एकशेवीस रुपये खर्च येतो. लंडनचे बाजारांत या वाखाला तीनशे रुपये टनपर्यंत भाव येतो. या बाजारभावांत थोडा चढ-उतार होणे शक्य आहे. तथापि सरासरीच्या मानाने हिशेब करितां असे निष्पन्न होते की, टनामागे एकशे ऐशी रुपये नफा राहील. वरील हिशेब केळीचे खुंट फुकट मिळतील, अशा समजुतीने केलेला आहे, परंतु एक टन वाख काढण्यास लागणाऱ्या पंधराशें खुंटांची किंमत तीस रुपये धरली, तरीही टनामागे दीडशे रुपये निव्वळ फायदा राहील.”

 सारांशरूपाने वर दिलेल्या उताऱ्यावरून आपणांस अगदी निरुपयोगी वाटणाऱ्या केळीच्या सोपटापासूनही केवढा महत्त्वाचा उपयोग होत असतो व व्यापारी दृष्टीने केळीची सोपटें किती फायदेशीर आहेत, याची कल्पना होईल.

 चवेण म्हणून केळीची जी एक रानटी जात सांगितली, तिचीहि पाने जेवणाच्या उपयोगी पडतात. केळीप्रमाणेच चवेणीच्या काल्याची व केळफुलाची भाजी होते. चवेणीची केळी मात्र खाण्यासारखी नसतात. कातकरी वगैरे लोक चवेणीचे कांदे वाळवून, त्याच्या पीठाच्या भाकरी करून खातात.

 केळीच्या सोपटाचे पाणी काढून ते तीन ते पांच तोळे घेऊन त्यांत पातळ केलेलें तूप १ ते २ तोळे मिश्र करून पाजल्यासं, मूत्राघाताचा विकार बरा होतो. या औषधाचा असा चमत्कार आहे की, केळीच्या पाण्याशी तुपाचा संयोग होऊन पोटांत गेलेले तूप मूत्रद्वारे फार त्वरित निघून जाते व त्यायोगाने मूत्र द्वार मोकळे होऊन लघवी मुटते. पुरुषापेक्षां स्त्रियांना हे औषध लवकर लागू       आंवळी.      ३७

-----

पडते. पिकलेलें केळे मधांत कालवून खाल्ल्यास कामीण बरी होते. केळीचा कांदा कंबरेस बांधल्याने अडलेली स्त्री लवकर प्रसूत होते. प्रसूत झाल्याबरोबर कांदा सोडुन टाकावा. केळीची कोवळी पाने भाजलेल्या जागी बांधल्यास दाह कमी होतो. पिसाळलेले कुत्रे चावलें असतां रानकेळीचे बी पोटांत देतात व जखमेवर वाटून बांधतात. रानकेळीच्या पानांची राख एक मासा व मध एक तोळा ही एकत्र करून दिल्यास उचकी बंद होते. अशाच प्रकारचे केळीच्या झाडाचे आणखीही कांही औषधि उपयोग आहेत.

--------------------
२६ आंवळी.

 आंवळीचे झाड आपल्या इकडे आबालवृद्धांस ठाऊक आहे. तेव्हां त्याबद्वलची विशेष ओळख करून द्यावयास नका. आंवळीमध्ये रायआंवळी, साधी आंवळी, रान आंवळी व पान आंवळी असे. चार भेद आहेत. आंवळीचे लाकूड कणखर असून पाण्यात कुजत नाही, आंवळीचे लाकडांत व फळांत टॉनिक अॅसिड पुष्कळ असते, यामुळे याच्या कषायाचा उपयोग कातडी कमविण्यासाठी व कात करण्यासाठी होतो. हा आंवळीचा कात पांढऱ्या रंगाचा असतो. आंवळीचा कात करण्याची कृति खेराचा कात करण्याचे कृतीसारखीच आहे. खैराचा कात करण्याची कृति मागे अठराव्या भागांत 'खैर ' या प्रकरणांत दिली आहे, ती पहावी. आंवळीच्या झाडाला जी फळे येतात, त्यांस आंवळे असे म्हणतात. आंवळे सुकविले म्हणजे त्यांची आंवळकटी होते. आवळकटीचे आणि आंवळ्यांचे अनेक औषधि उपयोग वैद्यकशास्त्रांत सांगितले आहेत. हिरडा, बेहडा आणि आवळकटी या तीन पदार्थांस वैद्यकशास्त्रांत त्रिफळा अशी संज्ञा आहे. आवळकटी जाळून ती तेलांत खलून लावल्यास खरूज बरी होते. आवळकटीचे चूर्ण केळीच्या कांद्याच्या रसांत दिल्याने आम्लपित्ताचा विकार नाहीसा होतो. चार मासे आवळकटी रात्रौ कल्हईच्या भांड्यांत भिजत घालून ठेवावी, दुसरे दिवशी ती वाटून गाईच्या पावशेर निरशा दुधांत कालवून, त्यांत खडीसाखरेची पूड तीन तोळे व जिऱ्याची पूड दोन मासे घालून, ते मिश्रण सतत सेवन केल्यास पित्तशमन होते; व घेऱ्या, अरुचि, कपाळ दुखणे वगैरे विकार साफ नाहीसे होतात. सर्व प्रकारच्या ज्वरांवर आमलक्यादि चूर्ण गुणावह असल्याचे सालील श्लोकावरून दिसून येते.
  आमलकं चित्रकः पथ्या पिप्पली सैधवं तथा ।
  चूर्णितोऽयं गणो ज्ञेयः सर्वज्वरविनाशनः ॥
      'शार्ङ्गधर.' ३८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

म्हणजे आवळकटी, चित्रक, बाळहिरडे, पिंपळी व सैंधव ही पांच औषधे समभाग घेऊन त्यांचे चूर्ण करून घेतले असतां सर्व प्रकारचे ज्वर दूर होतात. आवळीचे आंतल्या सालीचा रस तीन तोळे काढून, त्यांत मध व हळदीची पूड घालून घेतला असतां प्रमेहाचा विकार नाहींसा होतो; या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. आवळीच्या बियांची बारीक भुकी करून ती दुधांत अगर पाण्यात कालवून डोकीला लावण्याची हिंदू स्त्रियांची चाल आहे. हिच्या योगाने मस्तकास थंडावा येऊन केस मृदू होतात. आंवळ्यांना पाड लागला म्हणजे ते झाडावरून उतरून त्यांचा मोरआवळा करितात; मोरावळा स्वादिष्ट असुन पित्तशामक आहे. आंवळ्याचे लोणचें करितात, ते फार दिवस टिकत नाही, परंतु आंवळ्याच्या वड्या किंवा आंवळ्याची कोचकई म्हणून जो पदार्थ करितात, तो रुचकर व पाचक असून पुष्कळ दिवस टिकतो. आवळेवड्या किंवा कोचकई खाली लिहिलेल्या रीतीने करतात. चांगले इरसाल आंवळे घेऊन शिजवावे; नंतर त्यातील बिया काढून त्याची टरफले बारीक वाटावी. नंतर त्यांत जिरें, मिरची अथवा मिरी, सुंठ, सैंधव, पादेलोन, मीठ हे जिन्नस वाटून घालावे व त्याच्या वड्या थापून वाळवाव्या. कित्येक लोक जेवण झाल्यानंतर सुपारीएवजी या वडीचा उपयोग करतात. तेणेकरून तोंडास रुचि येते. आवळ्याचे तेल काढितात, त्यास आवळेल असे म्हणतात. खोबरेलाऐवजी हे तेल मस्तकास चोळल्याने त्यास थंडावा येऊन कपाळ दुखणे वगैरे विकार नाहीत होतात, आंवळ्याची शाई व काळा रंगही होतो.

--------------------
२७ वाळा.

 वाळा ही तृणवर्गातील वनस्पति आहे. वाळ्याचें बेट एकदां झालें म्हणजे ते बरेच वर्षे टिकते; आणि म्हणनच वनस्पतिशास्त्रांत "बहुवर्षायू " वनस्पतीत याचा समावेश केलेला आहे. कारोमांडल किनारा, बंगाल इलाखा, ब्रह्मदेश, संयुक्त प्रांत वगैरे भागांत या गवताची उत्पत्ति फार होते. कटक प्रांतामध्ये तर बहुतेक सर्व पडजमिनीत या गवताची आपोआप वाढ होते. आपल्या इकडे मात्र या गवताचे विशेष उत्पन्न नाही, तरी कांही हौशी लोक आपल्या मळ्यांतून याची बेंटे मुद्दाम लावितात. वाळ्यामध्ये पांढरा व काळा अशा दोन जाती आहेत. काळा वाळा कराचीकडे विशेष होतो. वाळ्याचा फांट ज्वरावर देतात. फांट करण्याची रीतः-वाळा जाड़ा भरडा कुटून त्याच्या वजनाच्या तिप्पट कढत पाण्यात बारा तासपर्यंत मडक्यांत भिजत घालून ठेवावा, नंतर तें पाणी चांगले ढवळून वस्त्राने गाळून घ्यावे. पित्तविकारावर वाळ्याचे चूर्ण गुणावह आहे. उष्णतेने अंगाचा दाह होत असल्यास, वाळ्याची उटी अंगाला       आंवळी.      ३९

-----

लावितात. कॉलऱ्याच्या विकारांतील उलट्या बंद होण्याकरितां वाळ्याचे थोडेसे अत्तर पिण्यास देतात. डोके दुखत असल्यास वाळा व ऊद एकत्र करून त्याची विडी करून ओढतात. अशा प्रकारचे पांढऱ्या वाळ्याचे आणखीहीं कांहीं औषधि उपयोग आहेत. हिंदुस्थानामध्ये वाळ्याला 'खस' असे म्हणतात, याचे अत्तर पाण्याच्या मदतीने काढावे लागते. अजमिराकडे वाळ्याचे अत्तर काढण्याचे कारखाने आहेत. आपण वाळा म्हणून जो वापरतों, तो या गवताच्या मुळ्या होत. या मुळ्या शीतल असून फारच, सुगंध आहेत. वाळ्याच्या मुळ्यांचे पडदे, पंखे, करंड्या वगैरे अनेक व्यापारोपयोगी जिन्नस तयार करतात. या जिनसांना किंमतही चांगली येते. सदर्हू जिनसा तयार करण्याला विशेष कसब नको. कल्पक मनुष्याने त्यांचे नमुने एक दोन वेळ पाहिल्यास त्यास या जिनसा सहज करता येतील. वाळा सुवासिक असल्यामुळे उदबत्त्या वगैरे सुगंधि जिन्नस तयार करण्याच्या कामी याचा उपयोग होतो. उदबत्ती करण्याचे काम फारसे अवघड नाही. तिच्या उंची, मध्यम च हलकी अशा निरनिराळ्या प्रकारांमध्यें मसाल्याचे प्रमाण निरनिराळे असते, ते माहित असले म्हणजे कोणालाही उदबत्त्या करता येतील. मध्यम प्रतीची उदबत्ती करण्यास . मसाल्याचे जिन्नस खालील प्रमाणाने घ्यावे.

भाग-जिनसाचें नांव. भाग-जिनसांचें नांव. भाग-जिनसांचे नांव.
१८ चंदन.  नागरमोथे.  दालचिनी.
 ऊद.  जायफळ. १३ मैदालकड़ी.
 कृष्णागर.  जायपत्री. १० कोळसा.
 वाळा.  वेलदोडे.  शिलारस.
 धूप.  दवणा. १० गूळ.
 गुलाबकळी.  कापुरकाचरी.

 वरील प्रमाणाने सर्व पदार्थ घेऊन ते ( शिलारस व गूळ शिवाय) निरनिराळे कुटून वस्त्रगाळ करावे. वाळा व चंदन हे दोन जिन्नस कितीही कुटले, तरी त्यांचे चारगट फार राहते; म्हणून राहिलेले चारगट जात्यानें दळून वस्त्रगाळ करावे. नंतर कढत पाणी घेऊन त्यांत कोळशाशिवाय वरील सर्व जिनसांचे चूर्ण, गूळ व शिलारस ही घालून तो सर्व मसाला एकत्र कालवून कणकीचा जसा चिकट गोळा होता, तसा त्याचा गोळा करावा. नंतर सुमारे एकोणीस बोटें लांबीच्या काड्या किंवा चोया, एक गुळगुळीत पाटा, कोळशाची वस्त्रगाळ केलेली पूड व तो मसाल्याचा गोळा, इतक्या जिनसा जवळ घेऊन बसावे. नंतर कोळशाची थोडीशी पूड पाटावर टाकावी आणि मसाल्याच्या गोळ्यांतून थोडासा मसाला घेऊन, तो एका काडीच्या मधोमध लावावा आणि ती काडी पाटावर ४०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

टाकलेल्या कोळशाचे पुडीवर ठेवून हाताने उदबत्ती वळावी व सावलीत वाळत ठेवावी. सगळ्या उदबत्त्या सावलीत चांगल्या वाळल्यावर मग त्यांस उन्हें द्यावी. उन्हाचा ताप जितका बसेल तिकके चांगले; त्यामुळे वास खुलतो. ओली उदबत्ती उन्हांत घालू नये. घातल्यास चिरा पडतात. तीनचार उन्हें दिल्यानंतर उदबत्त्यांचे निरनिराळ्या वजनाचे पुडे बांधून विक्रीस ठेवावे. या उदबत्तीला बाजारांत दोन रुपयेपर्यंत भाव येतो. यापेक्षां उंची उदबत्ती करावयाची असेल, तर त्यांत कस्तुरी वगैरे जिन्नस घालावे लागतात. वाळ्याच्या मुळ्यांशिवाय त्याच्या गवताचाही उपयोग फार आहे. या गवतानें छपरे शाकारितात, जाड़ पातीच्या केरसुण्या व कुंचे करतात; शिवाय कोवळ्या गवताची गुरांना चांगली वैरण होते. काळ्या वाळ्याची वैरण तर गुरे फारच आवडीने खातात. जुनाट झाल्यावर मात्र हे गवत गुरांना निरुपयोगी होते. वाळ्याच्या या वैरणीमध्ये एक विशेष गुण आहे; तो असा की, या गवताची गंज चांगली रचून ठेवली, तर हे गवत दहा बारा वर्षांपर्यंत टिकते व दुष्काळासारख्या खडतर प्रसंगी गुरांना त्यांचा चांगला उपयोग होतो. दुभत्या जनावरांनी हे गवत खाल्ले तर त्यांच्या दुधाला वाळ्याचा वास येतो. वाळ्याच्या उत्पन्नाने जमीन नापीक होते; याकरितां वाळा लावण्यास पङजमिनी उपयोगात आणणे बरे. काळा वाळा तर निर्जल जमिनीत सुद्धा होतो. हा काळा वाळा रक्तशुद्धि करणारा असून, खोकला, धनुर्वात, अग्निमांद्य वगैरेवर गुणकारी आहे. धनुर्वात व संधिवात या विकारांत घाम घेण्याकरितां याचा विशेष उपयोग करतात.

--------------------
२८ डाळिंब.

 डाळिंबीचे झाड सर्वांच्या माहितीतील आहे. त्यासंबंधाने विशेष वर्णन द्यावयास नको. मुंबई इलाख्यांत काठेवाड, भावनगर व धोलका येथे उत्तम डाळिंबे होतात; तथापि अरबस्थानांतील मस्कत येथील डाळिंबांसारखी डाळिंबे आपल्या देशांत होत नाहींत. मस्कत येथील डाळिंबांत एक विशेष आहे; तो असा की, त्याची साल जरी वरून अगदी वाळलेली अशी दिसते. तरी आंतील दाणे अगदी ताजे टवटवीत असतात. तसेच दाण्यांतील बी फार बारीक व अगदी नरम असते. डाळिंबेच्या झाडांत दोन जाति आहेत. एका जातीच्या झाडांना फक्त फुलेच येतात, त्यास गुलनार असें नांव आहे. दुसऱ्या जातीच्या झाडांना फळे येतात. फळे येणाऱ्या झाडांत दोन पोटजाती आहेत. एका जातीच्या फळातील दाणे पांढरे व दुसऱ्या जातीच्या फळांतील दाणे तांबडे असतात. डाळिंबीचे मूळ, पान, साल, फूल, व फळांची साल या सर्वांचे वैद्यकशास्त्रात अनेक उपयोग सांगितले आहेत. ग्रीक आणि रोमन लोक तर पूर्वी डाळिंबीचे       कोरफड.      ४१

-----

झाड ही मोठी दिव्यौषधि असें मानून, या झाडाची फार जोपासना करीत. डाळिंबीच्या झाडाची व मुळाची साल यांचा काढा करून जंतविकारावर देतात. डाळिंबीच्या फळांची टरफलें फार तुरट असतात. या टरफलांचा वैद्य शाखांत खालीलप्रमाणे उपयोग दिला आहे.

  दाडिमी द्विपला ग्राह्या खंडा चाष्टपलापि च ।
  त्रिगंधस्य पलं चैकं त्रिकुटं स्यात्पलत्रयम् ।
  एतदेकीकृतं सर्वं चूर्णंं स्याद्दाडिमाष्टकम् ।
  रुचिकृद्दीपनं कंठ्यं ग्राहि कासज्वरापहम् ॥
      ' शांर्ङगधर '
 वरील श्लोकांत-डाळिंबसाल आठ तोळे, खडीसाखर बत्तीस तोळे, त्रिगंध (दालचिनी, विलायची आणि तमालपत्र ) एक पळ व त्रिकटु ( सुंठ, मिऱ्येे, पिंपळी) एक पळ घेऊन, त्या सर्वांचे चूर्ण करावें; याला 'दाडिमाष्टक' म्हणतात. हे चूर्ण घेतल्याने तोंडास रुचि येऊन अग्नि प्रदीप्त होतो. हे चूर्ण कंठास हितकारक असुन याने मलाचा अवष्टंभ होतो; व यापासुन कास व ज्वर यांचा नाश होतो;- असे सांगितले आहे, डाळिंब खाण्यास चवदार व शरिरास हितकारक असे आहे. हे खाल्ल्याने शरिरास हुशारी चेऊन तहान मोडते. रोगी माणसालाही डाळिंब खावयास देतात. डाळिंबाच्या दाण्याच्या रसाचा पाक करतात. त्याला डाळिंबपाक असे म्हणतात. डाळिंबाचा रस पित्तशामक आहे. या रसाचा शिरका करतात. डाळिंबपाकाचा औषधांत उपयोग होतो. आंबट, तुरट आणि कडवट अशा डाळिंबाचे सरबत करतात. असे या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. व्यापारसंबंधी या झाडाचा फळाशिवाय दुसरा उपयोग म्हटला म्हणजे या झाडाची व मुळाची साल आणि फळांची टरफलें पिवळा रंग करण्याचे कामीं येतात. मोरक्को लेदरला हाच पिवळा रंग देतात.

--------------------
२९ कोरफड.

 कोरफडीला संस्कृतांत घृतकुमारी किंवा कुमारी असे नांव आहे. कोरफडीची पाने खड्गाकार, जाड, दळदार व फिट हिरव्या रंगाची असतात. कोरफडीची लागवड फारच जलद होते. जमीन खराब असून अतिशय कोरड असली, तरी तशा जमिनींतही कोरफडीची वाढ जोराने होते. इतकंच नाही, तर कोरफड निवळ हवेवर टांगून ठेविली, तरीही तिची थोडथोडी वाढ होत असते. कार्तिक मार्गशीर्ष या महिन्याच्या सुमारास कोरफडीला मधून दांडा फुटून वर तुरे येतात. ४२.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

या दांड्यास शेलार असे म्हणतात. हे सोलून याची भाजी करतात व तुरे तुपांत तळून खातात. गुजराथी लोक कोरफडीचे लोणचे करून खातात. कोरफडीचे पानाची वरची साल तासुन काढिली म्हणजे आंत चिकट, बुळबुळीत व कडू रस निघतो. या रसाला आरंभी रंग नसतो; परंतु हृवा लागल्यावर त्यावर पिवळ्या रंगाची झांक मारू लागते. झाडाचा जुनाटपणा आणि पाती कापण्याचा हंगाम यांवर रसाचे कमज्यास्त गुण अवलंबून असतात. कोरफडीचे जें चूर्ण करतात, ते हिरवट पिवळ्या रंगाचे असते. कोरफडीचा बलक पाण्यांत विरघळवून त्यांत ‘टिंकचर ऑफ आयोडाइन ' किंवा 'क्लोराइड ऑफ गोल्ड ' घातल्याने त्या मिश्रणाला सुंदर गुलाबी रंग येतो. कोरफडीच्या ज्या दुसऱ्या पोटजाती आहेत, त्यांच्याशी हा संयोग केला असता त्या मिश्रणास सदर रंग येणार नाही. कोरफडीचा बलक खोकला, दम वगैरे विकारांवर उत्तम बालोपचारीं औषध आहे. कोरफडीच्या या रसाने जुलाब होऊन मळावाटे कफ पडून जातो व कोठा साफ होतो. वाघचवडा झाला असतां कोरफडीचे पान हळद घालून ऊन करून बांधतात. गळू, करट वगैरेवर कोरफडीचा मगज बांधतात. कोरफडीचा अंगरस हळदीचे चूर्ण घालून प्राशन केला असता, त्यापासून पांथरी व अपची ( गंडमाळा ) हे रोग दूर होतात; असे शार्ङगधराच्या खालील श्लोकावरून दिसते.

  निशाचूर्णयुतः कन्यारसः प्लीहाऽपचीहरः ॥
 कोरफडीचा ताजा रस काढून तो उन्हांत वाळवून ठेवतात; त्याचा अनेक औषधांत उपयोग होतो. रस काढून घेतल्यानंतर जो पानांचा चोथा राहतो, त्यापासून उत्तम प्रकारचे तंतू निघतात. कोरफडांच्या बलकापासून ‘क्रिसामिक असिड ' तयार करतात. क्रिसामिक अॅसिडाच्या योगाने सुती, रेशमी, लोकरीचे व तागाचे कपड्यांना जांभळा, प्याजी, नारिंगी, पिवळा, तपकिरी, करडा वगैरे निरनिराळे रंग देतां येतात, क्रिसामिक अॅसिड खालील रीतीने तयार करतात. कोरफडीच्या पातीं मुळाजवळ कापाव्या म्हणजे त्यांतून दाट रस बाहर पडतो. हा रस एक भाग व नैट्रीक अॅसिड आठ भाग या दोहोंचे मिश्रण तांब्याच्या किंवा दुसऱ्या ओतीव भांड्यांत कढवावे. मिश्रण कढू लागताच त्यावर, तीव्र, रसायनकार्य सुरु होते. ते कार्य बंद झाल्यावर तो द्रव आटवावा व थंड होऊ द्यावा. म्हणजे पिवळी पूड तळी बसते. या पुडीत ' अलोएटिक' आणि ' क्रिसामिक' या दोन अॅसिडांचे मिश्रण असते. सदर पूड थंड पाण्याने धुवून कढत्या अल्कोहालांत टाकली म्हणजे अलोएटीक असिड मात्र त्यांत विद्रुत होते. नंतर तो द्रव थंड होऊ दिला म्हणजे नारिंगी पिवळ्या रंगाची पूड तळी बसते; आणि तोच द्रव नैट्रीक असिडांत घालून       पळस.      ४३

-----

पुष्कळ वेळ कढविला म्हणजे त्याचे क्रिसामिक अॅसिडांत रूपांतर होते. नैट्रिक अॅसिडांत कोरफडीचा बलक घालून त्यावर अॅसिडाचे कार्य होण्याचे बंद होईपर्यंत त्यास तसेच ठेवावे; व त्यांतील बहुतेक नैट्रिक अॅसिड वाफेच्या रूपाने घालवावे; आणि शेष राहील तो थोड्या पाण्याने धुवून त्यास तेवढ्याच वजनाच्या नैट्रिक अॅसिडांत भिजत घालून ठेवावे. नंतर त्यांत पाणी घातले म्हणजे जो पिवळा साका बसतो. तो त्यांतून जांभळे पाणी जाण्याचे बंद होईपर्यंत कढत पाण्याने धुवावा. म्हणजे क्रिसामिक असिड तयार होते. क्रिसामिक असिडांत निरनिराळे दंशक पदार्थ (सेंद्रिय तंतूंना किंवा त्यांच्या पदार्थांना आपोआप पक्के बसणारे असे रंग फारच थोडे आहेत, जे रंग आपोआप पक्के बसत नाहीत, त्यांस ज्या विशेष पदार्थांच्या उपयोगाने पक्के बसवतां येतात, अशा पदार्थास इंग्रजीत मार्डंंट मराठीत दंशक असे नांव आहे ) मिश्र केल्याने निरनिराळे पक्के रंग देतां येतात; आणि एकाच दंशक पदार्थाचा उपयोग करून, निरनिराळ्या कपड्यांवर रंगाच्या अनेक झांकी आणितां येतात. त्या सर्वांची सविस्तर माहिती या पुस्तकांत देतां येणे शक्य नाहीं. कोरफडीचे झाडापासून एक प्रकारचा बोळही तयार करतात.

--------------------
३० पळस.

 पळसाची झाडे देशावर फारशीं नाहींत, परंतु कोंकणांत व गुजराथेत दमण, भडोच, सुरत, गणदेवी, वगैरे ठिकाणी पुष्कळ होतात. ही झाडे फार उंच वाढत नाहींत. संस्कृतामध्ये पळसाला पलाश, किंशुक वगैरे नांवे आहेत, पळसाच्या झाडाला हिंदुधर्मशास्त्रांत बरेच महत्त्व आहे. मौजीबंधनाच्या वेळी ब्राह्मणाने बेलाचा अथवा पळसाचा दंड धारण करावा, असे वचन आहे.

  ब्राह्मणो बैल्वपालाशौ क्षत्रियो वाटखादिरौ ॥
  पैलवौदम्बरौ वैश्यो दंडानंर्हति धर्मतः ॥
      'मनुस्मृति अध्याय'२.
 धर्मशास्त्राप्रमाणे वैद्यकशास्त्रांतही पळसाच्या झाडाला बरेच महत्त्व आहे. पळसाच्या झाडाला तांबड्या रंगाची फुले येतात. झाड फुलले म्हणजे त्याची शोभा अवर्णनीय असते. ही फुलें स्वादु, कडू, उष्ण व वातुळ असून, तृषा, दाह, पित्त, कफ, रक्तदोष, कुष्ठ आणि मूत्रकृच्छ्र यांचा नाश करणारी आहेत. पळसाच्या बिया चापट व तांबड्या रंगाच्या असतात; त्यांस 'पळसपापडी ' असे म्हणतात. या बिया कफ आाण कृमी यांचा नाश करणाऱ्या आहेत. ४४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

पळसपापडी निंबूच्या रसांत उगाळून कढवून लेप केल्यानं गजकर्ण बरे होते. राख करुन ती पाण्यांत कालवून ते पाणी वंध्या स्त्रीला पाजल्यास गर्भधारणा होते. असे या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. आतां औषधिकल्पलता नामक ग्रंथांत या वनस्पतीचे जे अनेक आश्चर्यकारक उपयोग सांगितले आहेत, त्यांपैकी एक दोन उपयोग सांगून नंतर या वनस्पतीचा व्यापारसंबंधी कोणता उपयोग होतो, त्याचबद्दलचा विचार करू.

  पातालंयन्त्रमाहृत्य पलाशतरुबीजकम् ॥
  निष्कद्वयमितं तैलं मध्वाज्येन समं पिबेत् ॥
  मासमात्रेण योगींद्रो नक्षत्राण्यपि पश्यति ॥
  अनेककालजीवी स्यात् प्रियमाणः सुरासुरैः ॥
      'श्री औषधी कल्पलता'
 याचा भावार्थ असा की, पळसाच्या बियांचे पाताळयंत्राने तेल काढून त्यापैकी आठमासे तेल, तूप व मध याबरोबर प्यावे, याप्रमाणे एक महिना केले असतां, योगीन्द्र दिवसा नक्षत्रे पाहूं शकतो; व पुष्कळ कालपर्यंत जगणारा असा होऊन देवदानवांना प्रिय होतो. अशाच प्रकारचे या वनस्पतीचे आणखी अनेक आश्चर्यकारक उपयोग सदर ग्रंथांत वर्णन केले आहेत.

 पळसाच्या मुळ्या ठेचल्याने त्यापासून एक प्रकारचे बळकट तंतु निघतात. मराठे लोक त्यास ' चवर ' असे म्हणतात. ते लोक या चवराचे उत्तम त-तऱ्हेचे गोंड़े बांधून ते बैलाच्या शिंगांना व इतर जनावरांच्या गळ्यांत वगैरे हौशीनें बांधतात. रंग, सफेती वगैरे देण्याकरितां या मुळ्यांचे कुंचे करितात. पळसाची पाने पावसाने लवकर कुजत नाहीत, म्हणून शेतकरी लोक या पानांनी विरलीं शाकारितात. पळसाच्या पानांचे द्रोण व पत्रावळी फारच चांगल्या होतात. द्रोण-पत्रावळींचा धंदा दिसण्यांत जरी अगदी शुल्क दिसतो, तरी तो बिनभांडवलाचा असून, पुष्कळ फायदेशीर आहे. सदर धंद्याला विशेष कौशल्यही लागत नाहीं. हात व दृष्टि ही दोन्ही शाबूत असून, उद्योग करून पैसा मिळविण्याची जर इच्छा असेल, तर कोणाही मनुष्यास बिन भांडवलाने या द्रोण-पत्रावळीच्या धंद्यावर शेकड़ों रुपये मिळविता येतील. गोमांतक, मालवण, वेंगुर्ले, सुरत वगैरे ठिकाणी पत्रावळींचे धंद्यावर शेकडों लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. पत्रावळी लावण्याला जरी विशेष कौशल्य लागत नाही, हे खरे आहे; तथापि कल्पक मनुष्य असल्यास त्यांतल्या त्यांत तो आपलें बुद्धिकौशल्य खर्च करून इतरांपेक्षां ज्यास्त नफा खात्रीनें       कपिल किंवा कुंकुमफल.      ३७

-----

मिळवील. उदाहरणार्थ, लग्नसमारंभासारख्या हौशांचे समारंभांत ज्या पत्रावळी वापरावयाच्या, त्यांवर यजमानाच्या मनातून नूतन वधूवरांची नांवे घालावयाची असल्यास, कुशल मनुष्य केवळ चोंयांच्या टाक्यांनी सदर नांवे यजमानांच्या इच्छेप्रमाणे पत्रावळीवर काढू शकेल, व अशा पत्रावळींना हजारी चार दोन रुपये तरी भाव खात्रीने ज्यास्त मिळेल. पत्रावळी करणे त्या फणसाच्या, वडाच्या, मोहाच्या, माहुलीच्या, पळसाच्या किंवा कुंभ्याच्या पानांच्या कराव्या; ही पाने टिकाऊ असतात. पळसाच्या फुलापासून नारिंगी रंग होतो. रंगपंचमीचे दिवशी पुष्कळ लोक ही फुलें पाण्यात उकळवून रंग तयार करतात व एकमेकांच्या अंगावर रंग उडविण्याचे काम याच रंगाचा उपयोग करतात. याशिवाय पळसाच्या झाडाचा दुसराही एक व्यापारसंबंधी उपयोग आहे. पळसाच्या झाडाच्या चिकापासून गोंदासारखा एक पदार्थ तयार करितात. आपल्या इकडे त्याचा उपयोग सुती कपडे रंगविण्यासाठी करितात. या गोंदाला हिंदी भाषेत 'कुअरकुसळ ' व इंग्रजीत 'किनो' अशी नावे आहेत. या पळसगोंदांत शेकडा सुमारे ७० भाग ट्यॉनिक अ‍ॅसिड असते. यामुळे रंग देण्यास व कातडी कमाविण्यास याचा चांगला उपयोग होतो. पळसाच्या झाडाच्या बुंध्याला त्रिकोणावर चिरा पाडिल्या, म्हणजे त्यांतून एकप्रकारचा चीक निघतो; तो वाळविला म्डणजे त्यापासूनच वर सांगितलेला दुधासारखा पांढरा, ठिसूळ, तुरट व रांपट असा ' किनो' गोंद तयार होतो.

--------------------
३१ कपिल किंवा कुंकुमफल.

 कपिल हें हिंदी भाषेतील नांव आहे. संस्कृतात यात कुंभ, पुन्नाग, सुरपुन्नाग इत्यादि वेगवेगळी नावे आहेत. वनस्पतिशाखांत या झाडास (Rottlera Tinctoria) रॉटलेरा टिंक्टोरिया व मराठींत सुरंगी किंवा गोडी उंडण असेही म्हणतात. ही झाडे हिंदुस्थानांत बऱ्याच ठिकाणी आढळतात. उंडण आणि सुरंगी ही एकाच वर्गातली झाडे आहेत. यांची पाने लांबट बदामी आकाराची असतात. या झाडाला हिवाळ्याच्या सुमाराला फुले येतात व नंतर फळे येतात. याच्या फळावरील व पानावरील बारीक भुगा खरडून तो चाळणीने चाळून कपिल या नांवाने बाजारात विक्रीकरितां ठेवतात. याचा उपयोग विशेषतः रेशीम रंगविण्याकडे होतो. कपिलाचा रंग पक्का बसण्याकरितां त्यांत दंशक पदार्थ घालण्याची जरूर नाहीं. कपिलाच्या वजनाच्या निम्मे पापडखार घेऊन तो पाण्यांत विद्रुत करून त्यांत कपिलाची पूड टाकिली म्हणजे रंग तयार होतो. नुसत्या भुकटीचा रंग काळसर विटकरी असतो. पाण्यांत आल्केली मिसळून त्यांत कपिलाची भुकटी घालून ते मिश्रण कढविले म्हणजे उत्तम रंग तयार होतो. ४६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----
आल्कोहोल व इथर यांमध्ये हा रंग त्वरित विद्रूत होतो. आल्केलीच्या

द्रवांत कपिल विद्रुत करून त्या मिश्र रंगीत द्रवांत सल्फ्युरिक, नैत्रिक किंवा हैड्रोक्लोरिक यांपैकी कोणतेही खनिज अ‍ॅसिड मिळविले म्हणजे पिवळ्या रंगाचा दाट सांका वेगळा होतो. हा सांका हवेत राहिल्याने पिवळा रंग ज्यास्त जुळतो. रंग देणारे लोक याच कृतीने हवेच्या कार्याने रंग खुलवितात. दक्षिणेत कपिलाचा रंग रेशमास देण्याची कृति खालीलप्रमाणे आहे. चार भाग कपिलाची पूड, एक भाग तुरटीची पूड आणि दोन भाग सोडाखार या तीन जिनसा तिळाचे तेलांत खलून नंतर पाण्यात कढवितात. परंतु असे न करितां कपिलाची पूड व पापडखार एकत्र करून ते मिश्रण वर सांगितल्याप्रमाणे कढविल्यानेही रंग तयार होतो. अमृतसर येथे सोडासाराच्या ऐवजी एका झाडाच्या राखेचा उपयोग करतात. या राखेत पोट्याशिअम कार्बोनेट असतो. पाव शेर पाण्यांत छटाक राख मिसळून, नंतर त्यांत कपिलाची पूड टाकतात व ते मिश्रण कढवितात, बरेंच कढविल्यावर त्यांतील सर्व रंगीत द्रव्य वेगळे करण्याकरितां त्यांत थोडा चुना टाकतात; म्हणजे रंगीत द्रव तयार होतो. हा रंग पक्का बसण्याकरितां या द्रवांत कोणी कोणी तुरटी अगर थोडा डिंक मिसळतात. हे जिन्नस त्यांत टाकले नाहीत, तरीही हरकत नाही. मात्र रंग द्यावचाचा रेशमी कपडा त्या रंगीत द्रवांत दोन तीन वेळ बुडवून वाळविल्याशिवाय रेशमावर पिवळा रंग चांगला खुलत नाहीं. कपिलाची पूड फार महाग असते. या झाडाच्या सुकलेल्या फुलांचा व कळ्यांचाही तांबडा रंग होतो. ही फळे फार सुवासिक असतात, यामुळे यांचे अत्तरही काढतात, त्यास ‘सुरंगी अत्तर ' असे म्हणतात. सुरंगांच्या लांकडाच्या फळ्या चांगल्या निघतात. हे लांकूड़ इमारतींच्या व डोलकाठ्यांच्याही उपयोगी पडते. कपिलाची पूड पोटांत घेतल्यास रेच होऊन जंत पडतात. खरजेवरही या पुडीचा उपयोग करतात.

--------------------
३२ वेळू.

 वेळूला संस्कृतांत वंश असे नांव आहे. वेळूमध्ये कांटेरी व गोडा अशा दोन मुख्य जाति असून, शिवाय माणगा, चिवा, मेस, बांबू वगैरे अनेक पोटजाति आहेत. कांटे कळक जाड असून, सुमारे पन्नास साठ हात पर्यंत उंच वाढतात. गोडा कळक बारीक असून वीस पंचवीस हात उंच वाढतो. धातूमध्ये जसे लोखंड अत्यंत उपयोगी, तसा वृक्षांमध्ये वेळू अतिशय उपयुक्त आहे. वेळूची बेटें हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व भागांत आहेत. सह्याद्रीच्या तळ-प्रदेशात वेळूची जी मोठमोठाली बेटें आहेंत, ती इतकी दाट आहेत की, त्यांत पक्षांचाही शिरकाव होणे कठीण आहे. वेळूचीं कांहीं कांहीं बेटे इतकी कठीण असतात       वेळू.      ४७

-----

की, त्यांवर तोफेच्या गोळ्यांचाही मारा लागू होत नाही. वेळू ही तृणवर्गातीलच वनस्पति आहे. ही गोष्ट कदाचित् कांहीं लोकांस चमत्कारिक वाटेल, परंतु सुक्ष्म विचाराअंती त्यांस कळून येईल की, तृणाचे आणि वेळूचे पुष्कळ गोष्टींत सादृश्य आहे. उदाहरणार्थः– गवत, बोरू, लव्हा, यासारखाच वेळू अंतर्वर्धक असून सरळ वाढत जातो. तसेच कोणत्याही तृणजातीय वनस्पतीस बीं आलें म्हणजे जसा त्याचा शेवट होतो, तसा वेळूला बी आले म्हणजे वेळूचा शेवट होतो. फरक इतकाच की, वेळूला सुमारे साठ वर्षांनी बी येते आणि तृणजातीय बाकीच्या वनस्पतींना एक वर्षाच्या आंत बी येऊन त्यांचा शेवट होतो. रामेश्वर, गोकर्ण, कर्नाटक वगैरे भागांत वेळूची राने पांच पांच सहा सहा कोस एकसारखी लागलेली आहेत. वेळूला बीं आलें म्हणजे कांटा फुलला असे म्हणतात. बीं येण्याच्या सुमारास वेळूच्या दर कांड्याला सुमारे चार चार अंगुळे गुच्छ येतात. आणि आंत गव्हासारखा दाणा उत्पन्न होतो, तो दाणा पिकला म्हणजे वेळू मरूं लागतात. वेळूला हे जे बी येते, त्याचा गरीब लोक दुष्काळासारख्या खडतर प्रसंगी धान्याप्रमाणे उपयोग करतात. असे रा० गोविंद नारायण यांनी आपल्या 'उद्भिज्जन्य पदार्थ' नामक पुस्तकांत नमूद करून ठेविलें आहे. ते लिहितात, -' वेळूचे बी जमा करण्याची कृति अशी आहे की, बी पिकू लागले म्हणजे त्या बेटाच्या आसपास कुंपण घालितात आणि त्या कुंपणाच्या आंत जे बी गळून पडते, ते गोळा करून आणितात; व जरूर लागेल तेव्हां त्याला सड देऊन ते दळतात. आणि त्याच्या भाकरी, पोळ्या वगैरे पदार्थ करितात. सन १८१८ साली कोकणांत वेळूला कांटा आला होता, त्यावेळी शेंकडों खंडी वेळूचे बी लोकांनी सांठवून ठेविलें व दुष्काळाच्या प्रसंगी हजारो लोकांनी त्यावरच निर्वाह केला. सध्यांच्या सुधारलेल्या व यांत्रिक कलेच्या उत्कर्षाच्या काळांत वेळूच्या बियासारख्या अगदीं निःसत्व धान्याचा उपयोग करण्याची पाळी येण्याचा विशेष संभव नाहीं; हे जरी खरे आहे, तरी पूर्वी वेळूच्या बियाचा धान्याप्रमाणे लोक उपयोग करीत असत, हे वरील अवतरणांतील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात येईल. बांबूच्या अनेक वस्तु करितात व तो पुष्कळ कामांत उपयोगी पड़तो. बांबूचें ओमण घराला घालितात व भिंतीऐवजी कूड करण्याकडे त्याचा उपयोग करितात. टोपल्या, सुपे, पंखे, हारे, हातऱ्या, विरल्यांचे सांगाडे, हातांत धरण्याच्या काठ्या वगैरे अनेक उपयुक्त वस्तु बांबूच्या करितात, हे सर्वांना विदितच आहे. चीन देशांत खुर्च्या, कोचें, पलंग वगैरे नानाप्रकारचे जिन्नस बांबूचेच करितात. पालख्यांना ज्या दांड्या असतात, त्या बांबूच्याच करतात. वेळूच्या कोवळ्या कोंबाला वासोटे असे म्हणतात. या वासोट्याची भाजी व ४८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

लोणचें करितात. वैद्यकशास्त्रांत ' वंशलोचन' म्हणून जी महत्त्वाची औषधि सांगितली आहे, ती वेळूपासूनच मिळते. वेळूच्या झाडाच्या गांठीच्या ठिकाणी रस सुकून त्या रसाचा दगडासारखा एक पांढरा घट्ट पदार्थ बनतो, त्यासच ' वंशलोचन ' असं म्हणतात. कागद करण्याच्या कामींही बांबूचा उपयोग होतो. बांबपासून कागद करण्याचे जे अनेक प्रयोग आजपर्यंत करून पाहिले, त्या सर्वांत अमेरिकेतील थॉनस रूटलेज नांवाच्या गृहस्थाचे प्रयत्नास चांगले यश आले आहे. ते म्हणतात की, ' कोवळे बांबू घेऊन कागद करण्याचे कामीं त्यांचा उपयोग केल्यास खात्रीने उत्तम प्रकारचा कागद तयार होतो. जून बांबूमध्ये वालुकामय पदार्थ फार असतो व तो नाहीसा करण्याचे काम फार अवघड आहे, यासाठी कागद करण्यास कोवळ्या बांबूचाच उपयोग करावा. ' कागद करण्याचे काम फार अवघड आहे, यासाठी ते करण्याचे काम बांबूंचा उपयोग करणे असेल, तेव्हां कोवळे बांबू घेऊन ते चुन्याच्या पाण्यांत कांही दिवस भिजत घालावे म्हणजे बांबूंच्या वरील कठीण कवच मऊ होते. आणि त्यायोगाने त्याचा कुट्टा करण्यास सोपे पडते. चीनमध्ये हल्ली याच रीतीने कागद तयार करतात. रूटलेजने अशी रीति काढिली आहे की, पुष्कळ दाबाने दोन रूळांतून बांबू प्रथम चिरडून काढावेत आणि नंतर त्यांत एकादा क्षार घालून शिजवावे. ओल्या व कोवळ्या बांबूंत शेकडा ७५ भाग ओलावा असतो आणि शिल्लक राहिलेल्या चौथ्याचाहि शेकडा साठ भाग कागद उतरतो. या करितां ज्या ठिकाणी बांबूची पुष्कळ उत्पत्ति होते व त्याच ठिकाणी कागद तयार करण्याजोगा कुट्टा तयार करून नंतर तो कुट्टा कागद तयार करण्याचे कारखान्यांत पाठवावा, म्हणजे बांबू नेण्याचा खर्च पुष्कळ कमी पडेल. ' कुट्टा तयार झाल्यानंतर त्याचा हाताने कागद करण्याची हिंदुस्थानांतील रीति खालील प्रमाणे आहेः--

 प्रथम कुट्टा नदीवर नेऊन धुतात, नंतर त्यांत चुन्याचे पाणी घालून सात आठ दिवसपर्यंत त्याची रास करून ठेवतात. सात आठ दिवसांनंतर पुन्हां कुटून चार दिवस राहू देतात. चार दिवसानंतर पुन्हां धुतात. नंतर मणभर कुट्यांत सव्वाशेर पापडखार या प्रमाणाने पापडखार मिसळून ते मिश्रण कुटून एकरात्र तसेच राहू देतात. व दुसरे दिवशी पुन्हा धुऊन आणितात. पुन्हा दरमणी एक शेर खार घालून उन्हांत ओपून तीन चार वेळ कुटतात. नंतर एकरात्र पाण्यात ठेवून दुसरे दिवशीं धुऊन आणितात. नंतर दरमणी दीड शेर गांवठी साबण घालून उन्हांत ओपतात. नंतर विशेष मेहनतीने पुन्हा एकवार धुऊन आणितात. या प्रमाणे धुण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर तो कुट्टा एका चुनेगच्ची हौदांत घालुन त्यांत ज्या मानाने कागद जाड किंवा पातळ करणे असेल, त्या मानाने पाणी       वेळू.      ४९

-----

कमज्यास्त घालतात, आणि तारेचा विणलेला पत्रा एका चौकटीत बसवलेला असतो. ती चौकट दोन्ही हातांत धरून त्या हौदांतील पाण्यात बुचकळून वर कांढतात. म्हणजे पाणी तेवढे तारांतील भोकावाटे गळून जाते व कुटयाचा थर त्या पत्र्यावर बसतो; तोच कागद होय. नंतर तो कागद काढून एका फडक्यावर किंवा बुरणसाच्या तुकड्यावर टाकतात. याप्रमाणे एकावर एक बरेच कागद रचले म्हणजे त्याजवर फडके घालून वर लाकडाची फळी ठेवून तीवर वजनाकरितां मोठमोठे दगड ठेवतात. या वजनाने त्यांतील थोडेसे पाणी निचरून गेले म्हणजे वरील दगड काढून टाकतात. आणि फळीनें कागदाचा गठ्ठा दाबितात. नंतर त्यांतील एकेक कागद सोडवून भिंतीवर थापून वाळवितात. वाळल्यानंतर त्यास गव्हाची खळ बुरणसाच्या फडक्याने लावितात. आणि वाळल्यावर लाकडाचा उत्तम पॉलिश केलेला तक्ता घेऊन त्यावर तो कागद हांतरतात आणि मोठमोठ्या कवड्यांनी किंवा गुळगुळीत अशा अकिक नांवाच्या दगडांनी घोटून तकाकी आणितात. म्हणजे कागद तयार झाला. इंग्लडमध्येही हाताने कागद करण्याची रीति बहुतेक वरील प्रमाणेच आहे. फरक इतकाच की, आपल्या इकडे कागद वाळण्याकरिता भिंतीवर चिकटवून ठेवतात, व इंग्लंडमध्ये कागद दोरीवर वाळत घालतात. तसेच इंग्लंडमध्ये गव्हाचे खळीऐवजी सरसाचे खळीचा उपयोग करतात. आणि कागद ग्लेझ करण्याकरिता कवड्यांऐवजी पॉलिश केलेल्या तांब्याच्या पत्र्याचा उपयोग करतात. असो, अशाप्रकारे आपल्या नेहमीच्या परिचयांतली जी 'वेळू 'वनस्पति तिचे गृहकृत्यांत व व्यापारसंबंधांत किती महत्वाचे उपयोग आहेत, याची कल्पना वरील विवेचनावरून वाचकांना सहज होण्यासारखी आहे. आता या वनस्पतीचे एक दोन औषधी उपयोग सांगून हें प्रकरण परें करूं.' वंशलोचन' म्हणून जो पदार्थ वेळूच्या आतल्या भागांत सांपडतो, म्हणून वर उल्लेख केला, त्या वंशलोचनाचे वैद्यकशास्त्रांत शेकड़ों उपयोग सांगितले आहेत, कास, क्षय, श्वास इत्यादि विकारांवर अत्यंत गुणावह असे जे सीतोपलादि चूर्ण करितात, त्यांत हे वंशलोचन मुख्य आहे.

  सीतोपला षोडश स्यादृष्टौ स्याद्वंशलोचना ।
  पिप्पली स्याच्चतुःकर्षा स्यादेला च द्विकार्षिकी ॥
  एककर्षस्त्वचः कार्यश्चूर्णयेत्सर्वमेकतः ।
  सीतोपलादिकं चूर्ण मधुसर्पिर्युतं लिहेत् ॥
      ' शार्ङ्गधर '
५०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

 खडीसाखर सोळा तोळे, वंशलोचन आठ तोळे, पिंपळी चार तोळे, वेलची दोन तोळे, दालचिनी एक तोळा, ही सर्व औषधे कुटून त्यांचे जें चूर्ण करतात, त्यास सीतोपला चूर्ण असें म्हणतात, हे चूर्ण मध व तूप यांमध्ये मिश्र करुन सेवन करावे; लहान मुलांना डांग्या खोकला म्हणून जो भयंकर खोकला होतो, त्यावर वंशलोचनाचे चूर्ण मधाशी द्यावे किंवा वेळूची गांठ पाण्यांत उगाळून पाजावी. पारा अंगांत राहिला, तर वेळूच्या पाल्याच्या ४ पैसे भार रसांत पैसाभार साखर घालून तो रस पाजावा. वेळूच्या पाल्याचा रस काढण्याचे काम मात्र बरेच कठीण आहे. वेळूचा पाला हातावर चोळल्याने किंवा ठेचल्यानेंही पाण्याचे साह्यावांचून त्याचा रस निघत नाही. वेळूचा पाला गाई, म्हशी, बकरी वगैरे जनावरे मोठ्या आवडीने खातात.

--------------------
३३ कंवठ.

 कंवठाची झाडे विशेषतः महाराष्ट्रांत व गुजराथेंत होतात. या झाडाला आठवे वर्षी फळे येऊ लागतात. त्यांस कंवठे असे म्हणतात. ही फळे उदी रंगाची असून आंब्याएवढी मोठालीं असतात. कंवठाचा हंगाम कार्तिकापासुन चैत्रापर्यंत असतो. ही फळे हत्ती व वानर फार आवडीने खातात. कंवठाचे फूल विषनाशक असून, पाने वांति, अतिसार आणि उचकी यांचा नाश करणारी आहेत. कंवठाचे कवच बेलफलाप्रमाणे कठीण असते. पिकलेले कवठाचा मगज मऊ आणि गुळमट असतो. हिरवे कंवठाचा मगज पांढरा असून तो तुरट लागतो. अंगावर पित्ताच्या गांधी उठून दाह होत असेल, तर कंवठाचे पानाचा अंगरस काढून तो अंगास चोळावा व थोडी खडीसाखर घालून पिण्यास द्यावा, म्हणजे गांधी मावळून दाह शांत होतो. कंवठाचा मगज साखर घालून सेवन केला असता त्याने पित्तशमन होते. पिकलेल्या कंवठाच्या मगजाचा मुरंबाही करतात. किंतीएक लोक पिकलेलें कंवठ नुसतेच साखर किंवा गूळ घालून खातात. हिरव्या कंवठाच्या मगजाचे सार, कोशिंबीर, चटणी वगैरे पदार्थ करतात. सापसंद, द्राक्षे, पांढरी किन्हीं व दैतीमुळ ही औषधे एक एक भाग आणि तुळशीची पाने, कंवठ, बेल व डाळिंब हीं अर्धा अर्धा भाग घेऊन त्यांचा अगद मधांतून दिला असता तो विशेषतः मंडली सापाच्या (कवड्या साप) विषावर गुणकारक असल्याचे अष्टांगहृदयांत वर्णन आहे. कंवठाच्या बियांचे तेल काढितात. हे तेल उंदराच्या विषावर गुणावह आहे. फळाचे बेलीचा दारुकामांत फार उपयोग करतात. तसेंच बेलफळाच्या कवचाचाही डब्या, मुलांची खेळणी वगैरे जिनसा कर      आल-सुरंजी.      ५१

-----
.

ण्याचे कामीं उपयोग होतो. कंवठाचे झाडापासून उत्तम गोंद निघतो, त्याजपासून काळी शाई करितात.

--------------------
३४ आल ( सुरंजी. )

 ही झाडे हिंदुस्थानांत पाहिजे त्या ठिकाणी होतात. मुंबई इलाख्यांत खानदेश, सोलापूर आणि गुजराथ या भागांत या झाडांची विशेष लागवड करतात. नेमाड प्रांतांतील " आली " जातीच्या लोकांना या झाडांची लागवड हे एक उपजीविकेचे मुख्य साधनच आहे. या वृक्षाला संस्कृतांत अच्युतवृक्ष, मुसलमानीत सुरंजी, गुजराथी व हिंदी भाषेत आल, मद्रासेकडे तेलगू भाषेत तोगरू व आपल्या इकडे मराठी भाषेत नागकुड़ा अशी नावे आहेत. या झाडाच्या मुळ्यांत व सालींत तांबडा रंग असतो. या रंगाने कापसाचे कपडे, सुत व खारवे रंगवितात. बंगाल प्रांतांत तर रेशीम रंगविण्यालाही याचा उपयोग कारितात. सालींतील रंग मुळ्यांच्या रंगासारखा चांगला नसतो, त्यांत पिवळट रंगाची झांक ज्यास्त असते. यामुळे सालीचा रंग फारसा काढीत नाहीत. म्हैसूर व बुंदेलखंड येथील झाडें रंगाचे कामीं उत्तम असे समजतात. हे झाड चांगले वाढण्यास तीन साडेतीन वर्षे लागतात. त्यावेळी याची उंची दोन सवादोन फूट असते, ज्यास्त मुदतपर्यंत झाडे राहिल्यास त्यांचा रंगाचे काम चांगला उपयोग होत नाहीं. सुरंजीच्या रंगानें कपडे व सुत रंगविण्याच्या निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळया रीति आहेत. सुरंजीच्या मुळ्यांची पूड करण्याची रीतः- पक्के सहा शेर सुरंजीच्या मुळ्या घेऊन त्या ठेचून त्यांची बारीक पूड करितात; त्या पुडीत पावशेर तिळाचे तेल घालून ती कुटतात; नंतर पुन्हा एकवार पावशेर तेल घालून कुटतात म्हणजे रंगीत द्रव्याची बारीक पूड तयार होते. सुत किंवा कपडा धुण्याची रीत खाली लिहिल्याप्रमाणेः

 सूत अथवा कापड प्रथम स्वच्छ पाण्यांत चांगले धुऊन टाकावे. नंतर एरंडेल आणि पापडखाराच्या पाण्यांत ते भिजत घालून ठेवावे. दुसरे दिवशी ते साफ धुऊन सात आठ तासपर्यंत उन्हांत वाळवावे. नंतर पुन्हा पाण्यात भिजवून दांडक्याने बडवून तो गोळा रात्रभर तसाच ठेवावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्ववत वाळवावा. याप्रमाणे आठ दिवसपर्यत कृति करून नंतर नववे दिवशीं तें सूत अथवा कापड स्वच्छ धुऊन वाळवावे. नंतर तुरटीचे पाण्यांत सुरंजीच्या मुळ्यांची पूड टाकून त्या मिश्रणांत ते सुत अगर कापड चार दिवसपर्यंत भिजत घालावे. मधून मधून कापड खाली-वर करीत जावें. पांचवे दिवशी ते स्वच्छ धुऊन वाळवावे आणि सरते शेवटी पापडखाराच्या पाण्यात भिजवून वाळवावे. पापड़वाराने रंगास तकाकी येते, ५२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----
शहापुराकडील रंगाची कृति.

 सुताची चोवीस चिवटे घेऊन त्यांतील तीन तीन चिवटे एकमेकांस जोडून त्यांची एक एक पेळ अशा आठ पेळा करतात. नंतर केळीच्या सोपाची राख पांच शेर घेऊन ती एका डोणीत टाकतात. त्यांत घागरभर पाणी ओतून ते चांगले ढवळून एक तास तसेंच राहूं देतात. म्हणजे सर्व राख तळीं बसून निवळ पाणी वर येते. त्यांतील सुमारे तीन शिसे पाणी एका मोठ्या पातेल्यांत घालून त्यांत पांच तोळे बकऱ्याच्या लेंड्या आणि सवाशेर तिळाचे तेल मिसळतात. नंतर या मिश्रणांत सुताची एकेक पेळ भिजवून न पिळतां एकावर एक अशा आठही पेळा रचून ठेवितात व त्यांस हवा वगैरे लागू नये म्हणून गोणपाटाच्या तुकड्यांनी चांगल्या आच्छादून दोन दिवसपर्यंत ठेवितात. तिसऱ्या दिवशी केळाच्या सोपाची राख घागरभर पाण्यांत वर सांगितल्याप्रमाणे मिसळून त्यांतील निवळ पाणी तीन शिसे एका डोणीत घालून त्यांत दोन दोन पेळा दरवेळी घालून तुडवितात आणि त्यांतील तेल घालवितात. नंतर पेळा काढून न पिळतां फरशीवर उन्हांत टाकतात. पेळा एकमेकांवर न ठेवता वेगवेगळ्या वाळवितात व त्या फार वेळ उन्हांत ठेवीत नाहीत. नाहीतर त्यांत अपोआप अग्नि उत्पन्न होतो असे म्हणतात. पेळा साधारण ओलसर असतां सावलीत नेऊन पसरून ठेवतात. नंतर पुन्हा उन्हांत चार तासपर्यंत वाळवितात. वाळल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे डोणीत पाणी घालून त्यांत केळीच्या सोपाची राख घालून ढवळतात व राख साली बसून निवळ पाणी वर आले म्हणजे त्यांत त्या पेळा बुडवून पूर्वीप्रमाणे सर्व कृति करितात. याप्रमाणे पांच सहा वेळ केल्यानंतर ते सूत ओढ्यावर किंवा नदीवर नेऊन धुतात आणि फरशीवर वाळवितात. इतके झाल्यानंतर ते सूत रंगविण्यास योग्य होते. नंतर सुरंजीच्या मुळ्यांची पूड सोळा तोळे आणि अर्धा तोळा तुरटी हीं सुताची एक पेळ भिजेल इतक्या पाण्यांत मिश्र करुन त्या मिश्रणांत एकेक पेळ बुडवून काढितात आणि दुसऱ्या भांड्यांत ठेवितात. याप्रमाणे सर्व पेळा बुडवून काढल्यानंतर त्या एक रात्र तशाच राहू देतात. दुसऱ्या दिवशी त्या नदीवर नेऊन धुतात; व फरशीवर उन्हांत वाळवितात, रंग पक्का होण्याकरितां पांच शेर पापडखार व पाव शेर तुरटी यांची एकत्र बारीक पूड करतात. पूड करत असतां त्यांत अडीच शेर तिळाचे तेल मिसळतात. अशा तऱ्हेने तयार केलेली सुमारे वीस तोळे पूड घेऊन ती एक पेळ भिजण्यापुरत्या पाण्यात मिसळतात. नंतर त्या मिश्रणांत पेळ बुडवून बाहेर काढितात आणि न पिळतां रात्रभर तशीच ठेवतात. दुसऱ्या दिवशी त्या पेळा एका भांड्यांत घालून ते भांडे विस्तवावर ठेवितात आणि पेळा पाण्याच्या पृष्ठभागाखाली एक इंच राहतील इतके त्यांत पाणी घालून ते कढ      बकूळ.      ५३

-----

वितात. पेळा कढत असतां त्यांसभोवती वर उचलण्याकरितां जी दोरी बांधलेली असते, त्या दोरीत काठी घालून वर उचलतात. जरूर वाटल्यास ज्यास्त पाणी आंत ओततात. याप्रमाणे दोन तास कढ दिल्यानंतर पेळा बाहेर काढून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी नदीवर नेऊन धुतात व फरशीवर उन्हात वाळवितात. अशा रीतीने दिलेला रंग पक्का बसतो. या पक्कया रंगविलेल्या सुताचा मुख्यत्वे लुगडी व चोळखण विणण्याच्या कामी उपयोग करतात. सत्रंज्या व खारवे रंगविण्याचे काम सुरंजीच्या रंगाचा विशेष उपयोग कारतात. एक एकर जमिनीत सुरंजीच्या मुळ्या सुमारे बारा मणपर्यंत सांपडतात. बाजार तेजीचा असेल तर या मुळ्यांना मणी बारा रुपयेपर्यंत भाव येतो. जाड्या मुळ्यांपेक्षां बारीक मुळ्यांना भाव चांगला मिळतो. कारण बारीक मुळ्यांचा रंग चांगला होतो.

--------------------
३५ बकूळ.

 बकुळीचा वृक्ष भरतखंडांतील बहुतेक सर्व भागांत होतो. कोणी कोणी यास ओवळ असेही म्हणतात. या झाडास पांचवे वर्षी फुले येऊ लागतात. याची फुले लहान, पांढऱ्या रंगाची असुन चक्राकृति असतात. त्याच्या मध्यभागी छिद्र असते. या फुलांना मधुर वास येतो; व फूल वाळल्यानंतर तो कांहीं दिवसपर्यंत कमी कमी प्रमाणात येत असतो. लहान मुली या फुलांच्या माळा करून डोकीत घालतात. या फुलापासून उत्तम प्रकारचे सुगंधि अत्तर काढितात. ही फुले मृदु व सुवासिक असल्यामुळे हौशीलोक उशांत व गिरद्यांत कापसाप्रमाणे भरतात. अगरबत्तीकरितां जो मसाला तयार करितात, त्यांत बकुळीची फुले असतात, बकुळीच्या झाडाला जी फळे येतात. ती पिकली म्हणजे शेंदराप्रमाणे तांबडी होतात. बकुळीच्या फळांचे अंगी तुरटपणा असल्यामुळे ही फळे आवडीने फार करून कोणी खात नाहींत. बकुळीच्या बियांचे तेल निघते, ते जाळण्याच्या, खाण्याच्या व औषधाच्या उपयोगी आहे. आमच्या इकडे लहान मुले ' एकी बेकी' खेळण्याकरिता या बियांचा उपयोग करतात. यापेक्षां या बियांचा कोणी फारसा उपयोग करून घेत नाही. तरी उद्योगी माणसाने या बियांचे तेल काढण्याचा प्रयत्न करून पाहिल्यास फुकट जाणारी एक वस्तू उपयोगात आणल्यासारखें होणार आहे. बकुळीचे लांकुड मजबूत असून ते खाऱ्या पाण्यांत पुष्कळ दिवस टिकते. या लाकडाच्या पेट्या वगैरे घरगुती जिनसा होतात. याशिवाय बकुळीच्या झाडाचा दुसरा एक व्यापारसंबंधी ५४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

उपयोग होण्यासारखा आहे. बकुळीच्या लांकडांतील जुनाट नाराला उत्तम प्रकारचा सुगंध येतो. यामुळे कांहीं लोक या लाकडाचा चंदनाप्रमाणे, उपयोग करतात. बकुळीच्या खोडामध्ये सुगंध आहे, ही गोष्ट पुष्कळ लोकांना ठाऊक नसल्यामुळे ते त्याचा फायदा घेत नाहीत. तरी ज्या ठिकाणी ही झाडे पुष्कळ असतील, तेथील उद्योगी माणसाने ही खोडे कापून विक्रीकरितां बाजारांत ठेवल्यास बराच फायदा होईल. खोडाकरितां लाकूड कापणे तें जुनाट असावे. कारण कोवळ्या खोडाला चांगला वास येत नाही.

 आतां या झाडाचे औषधी उपयोग काय आहेत ते पाहूं. अतिसाराचा उपदुव झाला असतां बकुळीच्या बिया थंड पाण्यात उगाळून देतात. बकुळीच्या बिया व अळूच्या बिया पाण्यांत उगाळून दिल्या असतां, मोडशींचा विकार नाहीसा होतो. दांत घट्ट होण्याकरितां बकुळीच्या सालीच्या गुळण्या करितात किंवा सालीची भुकटी करून दांतांस चोळतात. पंजाबांत वांझपण जाण्याकरता बकुळाची साल बायकांस देतात असे म्हणतात. बकळीच्या वाळलेल्या फुलांचे चूर्ण करून ओढल्यास मस्तकशुळाचा विकार नाहीसा होतो. असे या झाडाचे आणखीही कांहीं औषधि उपयोग आहेत.

--------------------
३६ हिरडा.

  हिरड्याची झाडे मालवण, राजापुर, गुजराथ व घाटमाथ्यावरील मावळप्रांत येथील जंगलांत आपोआप होतात. ही झाडे बरीच मोठी वाढतात. याचे लाकूड मजबुत असल्यामुळे लहान सहान घरांना या लांकडाचा उपयोग हातो. हिरड्यास संस्कृतांत हरीतकी असे नांव आहे. जो हिरडा कठीण, लवकर न तुटणारा, जाड, लांबट, टोकदार, पाण्यांत बुडणारा आणि दोन किंवा दोहोंहून ज्यास्त तोळे वजनाचा असतो; त्यास सुरवारी हिरडा अस म्हणतात. तो फार गुणकारी आहे. कोवळे हिरडे काढून वाळवितात, त्यास ' बाळ हिरडे' व साधारण इतर हिरड्यांस जंगली हिरडे म्हणतात. "नास्ति यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी" या वचनावरून वैद्यकशास्त्रांत हिरडयाची योग्यता किती आहे, याची वाचकांना बरोबर कल्पना होईल. हिंद वैद्यकशास्त्रकारांनी हरीतकांचे १ अभया २ चेतकी ३ पथ्या ४ पूतना ५ हरीतकी ६ जया आणि ७ हेमवती असे एकंदर सात प्रकार सांगितले आहेत. त्यांत अभया ही वाटोळी अंगुळभर लांब व पाच रेषांनी युक्त अशी असते. चेतकी ही सात अंगुळे लांब असून ऊध्वरेषायुक्त असते व ही हातांत धरल्यानंही रेच होतात. पथ्या हा पांच अंगुळे लांब व पांच रेषांनी युक्त अशी असते. ही कृमिनाशक आहे. पूतना       हिरडा.      ५५

-----

सहा अंगुळे लांब असते. हरीतका त्रिदोषाचा नाश करणारी आहे. जया ही गुल्म व रक्तातिसार यांचा नाश करणारी आहे आणि हैमवती ही बालव्याधींचा नाश करते. अशा प्रकारे हरीतकीच्या निरनिराळ्या प्रकारांचे निरनिराळ्या विकारांवर अनेक उपयोग होतात. हिरड्यांच्या ज्या सात जाती वर सांगितल्या, त्यांपैकी कांहीं जातींचे हिरडे खाल्ल्याने, कित्येकांचा वास घेतल्याने, कित्येकांचा स्पर्श केल्याने आणि कित्येकांच्या दर्शनानेच रेच होतात. मनुष्य, पशु, पक्षी वगैरे कोणताही प्राणी चेतकीच्या छायेखाली गेला, तर त्यास तत्काल रेच होतात. चेतकी जितका वेळपर्यंत हातांत धरावी, तितका वेळपर्यंत रेच झालेच पाहिजेत, असा वैद्यशास्त्रांतील सिद्धांत आहे. नाजूक प्रकृतीच्या व ज्यांची शक्ति क्षीण झाली आहे, अशा लोकांना चेतकीचा रेच सुखावह आहे. हिरड्याच्या मज्जेत मधुर, शिरांत आम्ल, देठांत तिखट, सालींत कडू आणि आठीत तुरट रस असतो. हिरडा चावून खाल्ला तर अग्नि प्रदीप्त करतो. चूर्ण करून खाल्ला तर रेच करणारा होतो. पक्व करून घेतला, तर मलस्तंभक आणि शेकून घेतला तर त्रिदोषनाशक आहे. हिरडा, बेहडा व आवळकाठी या तीन जिनसांना 'त्रिफळा ' असे नांव आहे. व ह्या तिहींच्या चूर्णाला त्रिफला चूर्ण म्हणतात.

  त्रिफला शोथमेहघ्नी नाशयेद्विषमज्वरान् ।
  दीपनी श्लेष्मपित्तघ्नी कुष्ठहंत्री रसायनी ॥
      'शार्ङ्गधर '
 या वरील प्रलोकावरून सुज, मेह, विषमज्वर, कफ, पित्त व कुष्ठ या रोगांचा नाश करून अग्नि प्रदीप्त करणारी त्रिफला ही एक रासायनीच आहे, असे दिसून येते. लहान मुलांना ‘आंकडी' म्हणून जो रोग होतो, त्यावर मोठा हिरडा उगाळून हिरड्यांस लावावा. तेवढ्याने गुण न आल्यास हिरडा, आवळकाठी, व खडीसाखर पाण्यात उगाळून अंजन करावे. सुरवारी हिरडा व खडीसाखर या दोन जिनसा पाण्यात उगाळून डोळ्यांत घातल्यास सर्व प्रकारचे नेत्ररोग बरे होतात. अशाप्रकारचे हिरड्याचे अनेक औषधि उपयोग वैद्यकशास्त्रांत सांगितले आहेत. असो, आता आपण व्यापारसंबंधी उपयोगांकडे वळू.

 हिरडीच्या कोवळ्या पानांना एक जातीचे किडे आहेत, ते टोंचून भोंके पाडतात व त्या ठिकाणी आपली अंडी घालतात. या अंड्यांभोंवतीं पानांतील रस जमून त्याचे मोठमोठे फोड बनतात, त्यांची उत्तम शाई होते. त्यांत तुरटी मिसळल्याने त्या मिश्रणाचा चांगला टिकाऊ पिवळा रंग होतो, परंतु अशा प्रकारचे फोड आपल्या इकडच्या भागांतील झाडांच्या पानांवर फारसे आढळून येत नाहीत. आपल्या इकडे हिरडीच्या फळांचा म्हणजे हिरड्याचाच रंग देण्यास व कातडी कमावण्यास फारच मोठा ५६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

उपयोग होतो. आणि याच कामासाठी आपल्या देशांतून दरसाल हजारों खंडी हिरडा परमुलखी रवाना होत आहे. मायफळापेक्षां हिरड्यांत ट्यॅनिक अॅसिडाचे प्रमाण ज्यास्त असते आणि या कारणामुळेच हल्ली मायफळाचे ऐवजी हिरड्याचाच खप होऊ लागला आहे. सुती कपड्यांवर गडद काळा रंग देण्याकरितां लोखंडाचा सल्फेट (हिराकस) त्यांत मिश्र करतात. तुरटी व हिरड्याची पूड यांच्या मिश्रणाने छिटांना पक्का पिवळा रंग देता येतो. हिरड्याच्या कषायात हळद मिसळल्याने हिरवा, काताने तांबूस आणि देशी पतंगाने लाल रंग होतो. हिरड्याचा कषाय करतांना हिरड्यांतील बिया काढून टाकाव्या लागतात. मंजिष्ठाचा रंग देण्यापूर्वी कपड़ा हिरड्याच्या द्रवांत प्रथम बुडवून काढावा लागतो. हिरड्यापासून उत्तम उत्तमप्रकारची काळी शाई करितात, हिरडे फोडून त्यांची टरफलें लोखंडाच्या भांड्यांत पाणी घेऊन त्यांत टाकतात व ते भांडे चार दिवस तसेच ठेवितात, नंतर त्यांत हिराकसाची पूड टाकून तो द्रव गाळतात, म्हणजे काळी शाई तयार होते. हिराकसाची पूड न टाकल्यास शाई फिक्कट होते. शाई बोळू नये या करितां त्यांत कार्बालिक अॅसिडाचे कांहीं थेंब टाकावे.

  हरीतकीशंखधनद्रवांबुभिर्गुडोत्पलैः शैलकमुस्तकान्वितैः ।
  नवांतपादादिविवर्धितैः क्रमात् भवंति धूपा बहवो मनोहराः॥ १॥
 हा श्लोक उदबत्ती संबंधाच्या माहितीच्या एका जुनाट ग्रंथांतील आहे. ह्यावरुन पाहतां निरनिराळ्या प्रकारचे मनोहर असे धूप तयार करण्याचे कामींही हरीतकीचा म्हणजे हिरड्यांचा उपयोग विशेषतः करतात. असे दिसून येते.

--------------------
३७ एरंड.

 एरंडामध्ये कडवा आणि गोडा अशा दोन मुख्य जाति आहेत. गोड्या एरंडास सुर्ती एरंड व कडव्यास मोगली एरंड असे म्हणतात. कडव्या एरंडाचा फारसा उपयोग नाही. त्याचा उपयोग विशेषतः कुंपणाकरितां होतो. आपण प्रथम गोड्या म्हणजे सुर्ती एरंडाबद्दलच विचार करु, सुर्ती एरंडामध्यें तांबडा व पांढरा अशा दोन पोटजाति आहेत. तांबड्या एरंडाचा दांडा व फूल तांबडे आणि पांढऱ्याचा दांडा व फूल हिरवट पांढरे असते. एरंडाचे झाड सरासरी पुरुषभर उंच वाढते. हे झाड पोकळ व ठिसूळ असल्यामुळे याचा विशेष उपयोग होत नाही. गुळाच्या भट्टीखाली जाळण्यास कांहीं लोक या झाडांचा उपयोग करतात. या झाडाचा कोळसा हलका असल्यामुळे दारू तयार करण्या कामी त्याचा उपयोग होतो. या झाडाची पाने मोठी असून त्यात कात्रे असतात, झाडाला सुपारीएवढालीं फळे येतात. त्यावर मऊ कांटे असतात. या फळात       एरंड.      ५७

-----

बी असते. त्यास एरंड्या असे म्हणतात. एरंडीचा व्यापार हल्ली फारच वाढला आहे. सन १८९७|९८ साली हिंदुस्थानांतून ७६ लक्ष रुपयांची एरंडी व २६ लक्ष रुपयांचे एरंडेल परदेशांत गेले. ह्या वरील आंकड्यावरुन एरंडीचा व्यापार हल्ली किती वाढला आहे, याची कल्पना सहज होण्यासारखी आहे. एरंडीच्या बियांचे तेल काढितात, त्यास एरंडेल असे म्हणतात. गुजराथेकडे या तेलास दिवेल असेही म्हणतात. तेल काढणे ते एरंड्या घाण्यांत घालुन काढतात; थोड्या एरंड्या असल्यास त्या वाटून पाण्यात घालून शिजवितात म्हणजे तेल वर येते, ते काढून काचेच्या भांड्यांत भरून ठेवतात. चार शेर एरंड्यांपासून सुमारे एक शेर तेल निघते. हे तेल औषधी असून जाळण्याचे कामही याचा चांगला उपयोग होतो. इतर सर्व तेलांपेक्षा हे तेल फारच थंड जळते. आणि ह्यापासून काजळही फार पडत नाही. हा या तेलाच्या अंगचा एक विशेष गुण आहे. मात्र हे तेल मातीच्या पात्रांत जाळावे लागते. धातूच्या पात्रात चांगलें जळत नाही. जुलाब होण्याकरिता एरंडेलाचा उपयोग करतात, हे सर्वांना विदितच आहे. कातडी कमाविण्यास या तेलाचा उपयोग होतो. मोरक्को लेदर याच तेलाने कमावितात. यंत्रांना व गाडीच्या चाकांना लावण्याला या तेलाचा उपयोग होतो, साबण व मेणबत्त्या करण्याकरिता अलीकडे या तेलाचा फार खप होऊ लागला आहे. आगगाडीच्या चाकांनाही याच तेलाचे वंगण करतात. एरंडीची पेंड खताच्या व जाळण्याच्या उपयोगी पडते. अलीकडे ग्यास तयार करण्याचे कामही या पेंडीचा उपयोग करू लागले आहेत. वृश्चिकदंशावर एरंडाचे पानांचा उपयोग करतात. एरंडाच्या पानांचा रस काढून तो शरिराच्या ज्या भागाला देश झाला असेल, त्याच्या विरुद्ध बाजूच्या कानांत घालावा. याप्रमाणे तीन वेळ कृति करावी. सर्पदंशावरही याचा उपयोग करतात. दंश होताच चार चमचे रसांत एक चमचा पाणी घालून ते पाजावे व पाला वाटून दंशावर लावावा वमन होऊन वीष उतरेल एरंडाची मुळे ही औषधी आहेत.

  एरंडमूलं द्विपलं जलेऽष्टगुणिते पचेत् ।।
  तत्क्वाथों यावशूकाढ्यः पार्श्वहृत्कफशूलहा ॥ १ ॥
      "शार्ङगधर "
 म्हणजे-एरंडमूळ आठ तोळे घेऊन त्यांत आठपट पाणी घालून त्याचा अष्टमांश काढ़ा करुन त्यांत जवखार घालून तो काढा सेवन केल्यास उदरामध्ये व पाठीमध्ये होणारा कफशूल बरा होतो. कानांत गोमाशी वगैरे गेल्यास जुनेदाट झालेले एरंडेल १।२ दिवस कानांत घालावे. ५८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

म्हणजे गोमाशी मरते. मग ती युक्तीनें, बाहेर काढावी. एरंडमूळ व पळसमूळ तांदळाचे धुणांत उगाळून त्याचा लेप दिल्याने गंडमाळा बऱ्या होतात. अशा प्रकारचे या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. आतां कडव्या म्हणजे मोगली एरंडाचे कांही उपयोग सांगून हा भाग पुरा करू. मोगली एरंड बहुतकरून कुंपणांत लावितात. याचे काष्ठ दंतधावनास घेतात. हे झाड जेपाळाच्याच वर्गातील आहे. याच्या बिया पोटात गेल्यास वांत्या व जुलाब होतात. यासाठी याचा उपयोग जपून करावा. या झाडाला चीक पुष्कळ असतो, हा चीक हातावर चोळल्याने साबणाप्रमाणे त्याचा फेस होतो. हा फेस साधारण घट्ट झाला म्हणजे चार पांच वेळ वृश्चिकदंशावर लावावा, तेणेकरून गुण येतो. या एरंडाचा चीक लोखंडी तव्यांत काढून त्यांत पारोसा थुंका घालून त्या मिश्रणात रसकापुराचा खडा उगाळून त्याचा लेप गमींचे चट्यावर केला असतां चार-दोन दिवसांतच गुण पडू लागतो. या एरंड्याच्या बियांचेही तेल निघते. सुरती एरंड्यांच्या बियांचेही तेल निघते. सुरती एरंड्यांचे थोड्या प्रमाणांत तेल काढण्याची जी रीति मागे दिली आहे, त्याच रीतीनें या एरंड्याचेही तेल निघते. या तेलाचा फुटलेल्या बदांची क्षते भरून येण्याला चांगला उपयोग होतो. महारोगावर व भगेंद्रादि दुर्धर व्रणांवरहीं या तेलाचा उपयोग करतात. महारोगी मनुष्याच्या अंगाला हे तेल दिवसांतून चार पांच वेळ जिरवावे. या तेलांत कापसाची वडी भिजवून ती भगेंद्रादि व्रणांवर बसवितात. तेणेकरून व्रण भरून येतो. गुरांना हरीक लागल्यास या एरंडाच्या पानांचा रस काढून जनावरांच्या शक्तीच्या मानाने दीड शेर पर्यंत दिला असतां एक प्रहरांत माज उतरतो. अशा प्रकारचे कांहीं आश्चर्यकारक गुण या निरुपयोगी वाटणाऱ्या मोगली एरंडामध्ये आहेत. या एरंडाची बी काळ्या कवचाची असते, ते कवच फोडून टाकतांच आंत हुबेहुब भुईमुगाच्या दाण्याप्रमाणे पांढरा दाणा निघतो. या दाण्यांत तेल असते, यामुळे मासे वगैरे मारणारे लोक या बिया काठीमध्ये टोचून त्यांच्या दिवट्या बनवितात व रात्रीच्या वेळीं चुडीऐवजी या दिवट्यांचा उपयोग विशेषतः करितात.

--------------------
३८ जवस.

 जवसाला गुजराथेत अळशी असे म्हणतात. अळशीचे झाड हात दीड हात उंच वाढते. हे झाड सुमारें करांगळीइतके जाड होते. या झाडाला लहान लांबट पाने येतात. ही पाने खोकला, कफ व वायु यांचा नाश करणारी आहेत, या झाडाला वाटोळे व अणकुचीदार बोंड येते व यांतच अळशीचे बी असते. त्यास जवस असे म्हणतात. जवसांचा रंग तपकिरी असून ते       पोपया.      ५९

-----
फारच गुळगुळीत असतात; जवस मधुर, स्निग्ध, गुरु उष्ण, बलप्रद्, पाककाळी तिखट व कडू असून कफ, वात, व्रण, पृष्ठल, सूज, पित्त, शुक्रधातु यांचा नाश करणारे आहेत. जवसाला फार पाऊस सोसत नाही, यामुळे कोंकणांत आणि मावळांत जवसाचे पीक होत नाहीं. जवस हे धान्य खाण्याचे उपयोगी नाही. तथापि गोरगरीब लोक वेळ पडल्यास जवस भाजून खातात. जवसाची चटणी करतात. जवसाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे त्यापासून मिळणारे तेल हा होय. इंग्लंड व फ्रान्समध्ये वाफेच्या यंत्राच्या साह्याने जवसाचे तेल काढितात. त्यात 'बेलतेल ' असे म्हणतात. सन १८९३।९४ साली साडेसात कोट रुपयांचा जवस हिंदुस्थानांतून निर्गत झाला. इंग्लंडमध्यें जवस घोड्यांना घालतात. जवसाचे तेल रोगणास व यंत्रांस लावण्यास खपते. जवसाची पेंड जनावरांना खाण्याला व खताला उपयोगी पडते. जवसाच्या झाडापासून उत्तम प्रकारचा वाख निघतो. ‘लिनन ' आणि ' क्यांंब्रिक ' नांवाचे बारीक कापड याच वाखाचें करितात. परंतु आपल्या इकडे जवसापासुन वाख काढण्याचा प्रयत्न फारसा कोणी करीत नाही. ज्या झाडांचा वाख चांगला निघतो, त्या झाडांस बी कमी येते. अशी आपल्याकडे समजूत आहे; परंतु रशियांत एकाच झाडापासून हे दोन्ही हेतु चांगले साधतात, असा तिकडे अनुभव आहे. जवसाचा वाख आंतील सळ्या यांपासून कागद तयार करतात. हाताने कागद करण्याची कृति मागे बत्तिसाव्या भागात " वेळू " या प्रकरणांत दिली आहे. आमच्या इकडे हाही प्रयत्न आजवर झाल्याचे दिसुन येत नाही. जवसाच्या झाडाचे असे महत्वाचे उपयोग होण्यासारखे असून, आमच्या इकडील शेतकरी लोक ती झाडे निवळ फेकून देतात. तरी जवस पिकणाऱ्या भागांतील कल्पक लोकांनी हे प्रयत्न अवश्य करुन पहावे, विशेषतः धाग्यासाठी जवसाची लागवड करणे असेल तर जवसाचे बी दाद पेरावे म्हणजे झाडे सरळ वाढून त्यापासून चांगले धागे निघतात. पेरण्याकरितां बी घ्यावयाचे ते परदेशांतील घ्यावे, कारण त्या बीजापासून होणाऱ्या झाडाचे दांडे जाड व नरम असतात व त्यामुळे त्यांचा वाख काढण्यास सुलभ पडते. बी पिकून तयार होण्यापूर्वी जवसाची झाडे मुळासकट उपटावी. नंतर दुसरे दिवशी त्यांवरील जवसाची बोंडे काढून घ्यावी आणि तिसऱ्या दिवशी झाडांचे भारे बांधून पाण्यात भिजत घालावे. बोंडे तीस तासपर्यंत सांवलीत ढीग करून ठेवावी म्हणजे त्यांस चांगली ऊब येते. नंतर ती उन्हांत वाळवावी म्हणजे बोंडे तडकून त्यांतील बी काढण्यास सोपे जाते. जवसाच्या लागवडीबद्दलच्या या विशेष सुचना बेलजियममधील एका तज्ज्ञ गृहस्थाने बंगाल्यांत आल्यावेळी केलेल्या आहेत. जवसाचे तेल ६०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.
-----

औषधि आहे. झोप येत नसल्यास जवसाचे व एरंडबीजाचे तेल समभाग एकत्र करून काशाचे पात्रांत काशाचे पात्रानेच खलून, त्याचे अंजन करावें म्हणजे झोप येते. जवसाचे तेल व चुन्याची निवळी एकत्र करून अग्निदग्ध व्रणावर लावल्यास तत्काल गुण येतो. जवसाचे पिठाचे पोटीस करून बद व गळू वगैरेवर बांधतात, मुत्रदाहावर जवसांचा उपचार फार गुणावह आहे.

--------------------
३९ नारळीचे झाड.

 हिंदस्थानचा पश्चिम आणि पूर्वकिनारा हें नारळाच्या झाडाचे उत्पत्तिस्थान होय. कोंकण प्रांती यास माड असे म्हणतात. हिंदुस्थानांत सुमारे पांचलक्ष एकर जमीन या झाडांच्या लागवडीकडे गुंतलेली आहे. नारळाचे झाड चाळीस पन्नास हात उंच वाढते; त्याला आडव्यातिडव्या डाहळ्या फुटत नाहीत. त्याच्या शेंड्याला मात्र झावळ्या येतात. त्या पांच सहा हात लांब व तीन चार हात रुंद असतात. त्या वाळल्या म्हणजे गळून पडतात मग दुसऱ्या येतात. जुन्या झावळ्या जेथून गळून पडतात. तेथे झाडास कंगोरा पडतो. नारळाचे झाड सात आठ वर्षांनी लागास येते. माड लागास आला म्हणजे झावळ्यांत एक मोख येतो. त्यास पोय किंवा पोगी असे म्हणतात. पोय सुमारे पंध्रा दिवसांनी फुलू लागते. त्यांतील बरीचशी फुलें गळून पडतात. आणि कांहीं थोड्या फळांना नारळ धरतात, नारळ पांच सहा महिन्यांचा झाला म्हणजे त्यास शहाळे व जून नारळास रुमडा असे म्हणतात. रुमड्याच्या बाहेरच्या भागात सोडण किंवा चवड व चवडाच्या आतील तंतूस काथ्या अशी नांवें आहेत. काथ्याच्या आतील अंगास नारळ असतो. जमीन चांगला असेल, तर नारळीचे प्रत्येक झाडापासून दरसाल चार पांचशे देखील नारळ निघतात. नारळ सर्वांनी पाहिलेला आहेच; करितां ज्यास्त माहिती देण्याचे कारण नाही.

 नारळाचे झाड अत्यंत उपयोगी आहे. ते इतके की, त्यांचा कोणताही भाग टाकाऊ नाही, आणि हे त्याचे उपयोग लक्षात आणूनच एका ग्रंथकाराने त्यास भू-लोकचा ' कल्पवृक्ष ' असे नांव दिले आहे. नारळीचे लाकूड बळकट व चिवट असल्यामुळे गरीब लोक या झाडाच्या सोटाचे खांब. तुळया, वासे, ओमण वगेरे करितात. हा सोट सरळ असतो, यामुळे तो कोरून बागेतून व मळ्यातून याचे पन्हळ करितात. झावळ्याच्या पाणी विणून त्याचे झाप करितात. या झापांनी मांडव व हंगामी वखारी शाकारितात. पातीच्या हिराचे सराटे करितात. वळीचा मधला दांडा ज्यास पिढा म्हणतात, त्याच्या वरची साल काढून तिचा वाख करितात, आणि आंतील       नारळीचे झाड.      ६१

-----

गिराच्या चोया करितात. पत्रावळी करण्याचे कामीं त्यांचा चांगला उपयाग होते. पोईच्या बाहेरुन जी पिसुरडी निघते, ती तेलाशिवाय मशालीसारखी जळते. नारळाच्या वरची सोडणे पाण्यांत कुजवून ती ठेचून त्यापासून जे तंतु काढतात, त्यांस काथ्या म्हणतात. या काथ्याने लोडें, गाद्या, तक्के वगैरे भरितात व याच्या चटया विणतात. त्यांसच ‘काॅॅयर म्याटिंग' असे म्हणतात, काथ्या वळून त्याचे लहान मोठे दोर, चऱ्हाटें, दावी, शिंकी वगैरे अनेक वस्तु करतात. काथ्याची दोरखंडे खाऱ्या पाण्यांत लवकर कुजत नाहींत. काथ्याशिवाय सोडणाचा जळणाच्या कामही चांगला उपयोग होतो. या जळणाच्या सोडणांना हजारीं तीन साडेतीन रुपये पर्यंतही भाव येतो. नारळाच्या डोक्याचे ठिकाणी भोक पाडून आतील गीर काढतात आणि त्याचे गुडगुडीचे सुंदर बेले करितात, तसेच त्याचे पेले व दुसरी पात्रे करून त्यांवर उत्तमप्रकारची नक्षी काढितात. गरीब लेाक करटीचे डवले करून पळी ऐवजी त्यांचा उपयोग करितात. जिलबी पाडण्याकरिता जिलबी पात्र मिळण्यासारखें नसेल तर नारळाच्या बेलीनेही जिलब्या पाडण्याचे काम करितां येते. करट्या जाळून त्याचे दांतवण करितात. दांत दुखत असल्यास करटीचे तेल लावल्याने गुण येतो. हे तेल पाडण्याची रीत अगदी सोपी आहे. करटी चुलीत टाकावी आणि तिने पेट घेतला म्हणजे ती जळती करटी बाहेर काढून उपट्या ताटावर अगर पितळीवर तशीच जळू द्यावी. थोड्याच वेळांत करटींतील तेल ताटाचे पष्ठभागावर जमू लागते, तेल पड़तांच ते बोटावर घेऊन दातांस चोळावे. करटीचे उष्णतेने ताट बरेच तापते; यासाठी तेल बोटावर घेतांना थोड्या सावधगिरीने घ्यावे. नाहींपेक्षां बोट भाजण्याचा संभव असतो. या तेलांत असेटिक आसिड व डामर असल्यामुळे गजकर्ण व नायटे यांस हें तेल लाविल्याने गुण येतो. सोडणाप्रमाणे करट्याही जळणाच्या उपयोगी पडतात. नासकें खोबरें महाग असते, तेव्हां हिलालामध्ये करट्या जाळण्याचीही काही ठिकाणी पद्धत आहे. करटीचा कोळसा हा फार तलख असतो, यामुळे गोमांतक व कर्नाटक या भागांत सोनार, कासार, लोहार वगैरे लोक याच कोळशाचा उपयोग करतात. करटीची बटणे फार चांगली होतात. वेंगुर्ले, रत्नागिरी वगैरे ठिकाणी ही बटणे तयार होतात. उद्योग माणसाने करटीची बटणे करण्याचा प्रयत्न अवश्य करुन पहावा. झाडांतील गाभ्याची व फांदीच्या अगदी कोवळ्या शेंड्याची भाजी करतात. माडाच्या झाडापासुन " माडी " काढितात, ती पितात; अगर तिजपासून दारू व गूळ करतात. माड़ी काढल्याने नारळाचे पीक जरी कमी होते, तरी माडी काढावयास दिलेल्या प्रत्येक माडाचे गोमांतकाकडे दरसाल तीन रुपयेपर्यंत आणि ६२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

मुंबईच्या आसपास तर दाहा बारा रुपयेपर्यंत उत्पन्न येते. नारळांतील खोबऱ्याचे उपयोग सर्वांना महशूर आहेतच, ते सांगण्याची आवश्यकता नाही. खोबऱ्याचे तेल काढितात त्यास ' खोबरेल ' असे म्हणतात. या तेलाचा अलीकडे साबण व मेणबत्त्या करण्याकडे उपयोग करू लागले आहेत. लोखंडी यंत्रे साफ करण्याकरितां या तेलाचा उपयोग होतो. खोबऱ्याचा ( ओल्या अगर वाळलेल्या ) कीस दोन तासपर्यंत उन्हांत सुकवून अगर तव्यावर थोडावेळ तापवून तो पिळून जें तेल काढितात त्यास 'मुठेल ' असे म्हणतात. मुठेल मस्तकास चोळल्याने त्यास थंडावा येतो. कोणत्याही प्रकारच्या घायावर मुठेल लाविल्यानें घाय बरे होतात. चिंव्या, वस्तरा वगैरे उतल्यास खोबरें उगाळून अगर जाळून लावितात. नारळाच्या शेंडीची राख मधांतून दिली असतां उचकी व वांतीचा विकार नाहीसा होतो. पाण्याचा नारळ घेऊन त्यास भोंक पाडितात त्यांत मीठ भरून बाहेरून माती लावून वाळवून शेणीच्या विस्तवांत भाजतात; नंतर त्याचे बारीक चूर्ण करून ठेवतात; यास 'नारीकेल क्षार' असे म्हणतात. हे चूर्ण पिंपळीचे चूर्णाबरोबर शक्तिमानाप्रमाणे दिल्यास वात, पित्त, कफ, सन्निपात यांपासुन झालेला शूल यांजवर दिलें असतां गुण येतो, असे या झाडाचे अनेक औषधी उपयोगही आहेत.

--------------------
४० केवडा.

 केवड्याची झाडे पुष्कळ ठिकाणी बहुधा आपोआपच होतात. अल्लिबाग, रत्नागिरी, मालवण, राजापूर, कर्नाटक वगैरे ठिकाणी ही झाडे पुष्कळ आहेत. या झाडाची मोठमोठाली बेटे असतात. या झाडामध्ये पांढरा व पिवळा अशा दोन जाती आहेत. पांढऱ्या जातीस केवडा व पिवळीस केतकी असे म्हणतात. केतकीला केवड्यापेक्षां ज्यास्त वास येतो. केवड्याच्या झाडाला दोन अडीच हात लांबीचे पान येते. या पानाच्या दोन्ही बाजूस तीक्ष्ण काटे असतात. केवड्याच्या पानांच्या रसांत जिरें वांटून त्यांत साखर घालून तो रस सात दिवसपर्यंत घेतल्यास उष्णतेपासून होणारे सर्व प्रकारचे रोग नाहींसे होतात. हे औषध चालू असतां पथ्याकरितां ताकभात अळणी खाल्ला पाहिजे. केवड्याची मुळी पाण्यात उगाळून त्यांत खडीसाखर घालून तो रस दिला असतां रक्तप्रदराचा विकार नाहीसा होतो. गुरांना मुसक्या म्हणून जो रोग होतो, त्यावर केवड्याच्या कांद्याचा रस पाजल्याने गुण येतो. अशा प्रकारचे या झाडाचे आणखीही कांहीं औषधी उपयोग आहेत. आता या झाडाचे व्यापारसंबंधी काय उपयोग आहेत, त्याबद्दल विचार करू.       केवडा.      ६३

-----

कातारी लोक केवड्याच्या पानांनी लाकडावर बसविलेला लाखेचा रंग सारखा करतात. कर्नाटकांत या पानांच्या हातऱ्या, छत्र्या वगैरे जिन्नस करतात. केवड्याच्या पानांपासून धागेही निघतात. या धाग्यांचे दोर, जाळीं, पोती वगैरे जिनसा तयार करतात. केवड्याच्या अंतरिक्ष मुळयांचे रंग देण्याकरितां कुंचे करतात. केवड्याच्या झाडाला जे तुरे येतात, त्यांत त्याचे कणीस किंवा फूल असते. कातगोळ्या सुवासिक करण्याकरितां त्या केवड्याच्या कणसांत घालून ठेवतात. या कणसाच्या आंत खसखशीसारख्या बियांचे तुरे येतात. त्यांस कांजीण असे म्हणतात. या कांजिणीची भाजी करितात, केवड्याची कणसे काढणे हे काम बऱ्याच त्रासाचे आहे. कारण एक तर या झाडाच्या पातींना तीक्ष्ण कांटे असतात; शिवाय केतकीच्या बनामध्ये सर्पांची वस्ती असते; सबब कणसे काढणारांनी वरील दोन्ही गोष्टीबहुल विशेष सावधगिरी ठेवून कणसे काढावी, उंची कपड्यांना सुवास येण्याकरितां त्यांत केवड्याच्या कणसाच्या पाती घालून ठेवण्याची पद्धत आहे. केवड्याच्या कणसापासून उत्तम प्रकारचे सुवासिक अत्तरहि काढितात; त्यास केवड्याचे अत्तर असे म्हणतात.

 अशा प्रकारे केवड्याच्या झाडापासून व्यापारोपयोगी अनेक जिन्नस तयार करितां येतात. आमच्या इकडे बऱ्याच लोकांना ज्या वनस्पति दिसण्यांत अगदी क्षुल्लक व निरुपयोगी वाटतात, अशा वनस्पतींपासूनही उद्योगी मनुष्याला अल्प भांडवलाने व्यापारोपयोगी जिन्नस कसे तयार करता येतील हे दाखविण्याचा या छोटेखानी पुस्तकांत जो अल्प प्रयत्न मी केला आहे, त्या दिशेने वाचकवर्गापैकीं कांही इसम तरी जर प्रयत्न करून पाहतील, तर माझ्या या श्रमाचे सार्थक झालें असेंच मी समजेन.

 असो. शेवटीं ज्या दयाघन प्रभूच्या कृपेने हें छोटे पुस्तक पुरे करून वाचकांना सादर करतां आलें, त्या जगन्नियंत्याचे चरणी अनन्यभावें लीन होऊन तूर्त वाचकांची रजा घेतो.




याच ग्रंथकाराने तयार केलेले ग्रंथ.
दोन हजार वर्षांची सुलभ जंत्री.

 या जंत्रीच्या सहाय्याने इ० सनाचे आरंभापासुन दोन हजार वर्षांपैकी कोणत्याही सालांतील तारखेवरून वार व शालिवाहन, हिजरी, फसली किंवा आर्बी या सालांतील तिथी अगर तारीख अगदी थोडक्या वेळांत थोडक्याशा गणिताने काढता येते. तसेच शालिवाहन शकांतील मिति आणि आर्बी फसली वगैरे सनांतील तारीख यावरून इसवी सन, महिना, तारीख व वार काढता घेतो. अशा तऱ्हेचे पुस्तक मराठीत हें पहिलेच आहे. ऐतिहासिक गोष्टींचा काल निश्चित करण्याचे कामी या जंत्रीचा विशेष उपयोग होणार असून दिवाणी व मुलकी कामदार, वकील लोक, शाळामास्तर, यासही तारखांचा निर्णय करण्याचे कामी तिचा उपयोग होणार आहे. जंत्रीचा फायदा सर्वांना घेता यावा म्हणून किंमत अगदीच थोडी म्हणजे फक्त आठ आणे ठेवणार असून आगष्ट १९१३ अखेरपर्यंत आगाऊ नांवे नोंदविणारांस तर सदर्हू जंत्री पाऊणपट किंमतीस देण्याची विशेष सवलत ठेविली आहे; तरी ग्राहकांनी आगाऊ नांवे नोंदविण्याची त्वरा करावी.

--------------------
व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन
पुस्तक २ रें.

 सुलभ-औद्योगिक-ग्रंथमालेपैकी हे दुसरे पुस्तकही लिहून तयार आहे. आगाऊ पांचशें वर्गणीदार मिळताच पुस्तकें छापण्यास सुरुवात करणार आहों. किंमत ४ आणे.

--------------------
शाळाखात्याने मंजूर केलेले
चक्रवर्ती बादशहा पांचवे जॉर्ज.

 सदर्हू पुस्तक सन १९११ सालच्या दिल्ली-दरबारचे मंगल प्रसंगाचे स्मरणार्थ मुद्दाम मुलांकरितां छापून तयार केले आहे. सुप्रसिद्ध वर्तमानपत्रे. मासिक पुस्तकें व विद्वान् लोक यांचे उत्तम अभिप्राय आहेत, किंमत २ आणे. सर्व पुस्तकांस टपाल खर्च निराळा पडेल.

पत्ता -गणेश रंगनाथ दिघे,
   महाड, जिल्हा कुलाबा.
--------------------

ग्रंथसंपादक व प्रसारक मंडळीचा
किताबखाना
ठाकुरद्वाररोड-मुंबई.

 या किताबखान्यांत श्रीमंत गायकवाड सरकार, डेक्कन व्हरनाक्यूलर ट्रान्सलेशन सोसायटी, सत्कार्योत्तेजक समाज धुळे, मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी, विविधकला ग्रंथप्रसारक मंडळी, निर्णयसागर छापखाना, चित्रशाळा प्रेस, न्यु किताबखाना, गोंधळेकर, पोतदार, बाबाजी सखाराम आणि कंपनी, पाठक ब्रदर्स, गुर्जर, ढवळे, पुरंदरे, हिंद एजन्सी, इत्यादि वेगवेगळ्या संस्थांनी आणि प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेले सर्व प्रकारचे मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत ग्रंथ, व लहान मोठी सर्व विषयांवरील पुस्तके, वाजवी भावाने विकत मिळतात.

शालोपयोगी सर्व प्रकारची पुस्तकें व सामान

याचा संग्रह केलेला असून, शाळाखात्यात मराठी पहिले इयत्तेपासून ते सातवे इयत्तेपर्यंत आणि इंग्रजी मॅॅट्रीकपर्यंत लागणारी सर्व पुस्तके, व ड्रॉइंग वगैरेचे सामान, देशी कागदावरील एक्झरसाईज व कॉपीबुके वगैरे वगैरे माफक भावाने मिळतें. शाळामास्तर, लायब्ररी व घाऊक खरेदी करणारे व्यापारी, यांस योग्य व भरपूर कमिशन दिले जाते. आमच्या किताबखान्यांत हल्ली विक्रीस तयार असलेल्या यादी सागवावी, फुकट पाठवू. नाटपेड पत्रे घेतली जात नाही. खुलासा पाहिजे असल्यास उत्तराकरितां टिकीट पाठवावे. सर्व पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करावा :-

दामोदर सावळाराम आणि मंडळी,
प्रिंटर्स, पब्लिशर्स आणि एजंटस् ठाकुरद्वार, मुंबई.