मनू बाबा/जन्मभूमीचे दर्शन

विकिस्रोत कडून
ज न्म भू मी चे
द र्श न

♣ * * * * * * ♣







 सोनी व रामू यांचा नवा संसार सुरू झाला. मनूबाबा आता काम करीत नसत. मागाचे खटक खटक आता बंद झाले. त्यांच्या जीवनाचे वस्त्रही आता बहुतेक पुरे होत आले होते.

 एके दिवशी सायंकाळी सोनी व मनूबाबा फिरायला गेली होती. मनूबाबा एका शिलाखंडावर बसले होते. त्यांच्या पायांशी सोनी होती.

 "बाबा, सूर्य मावळला. आता लवकर अंधार पडेल."

 "माझाही जीवनसूर्य आता लवकरच मावळेल."

 "का असं म्हणता बाबा ? आम्हांला कंटाळलेत ?"

 "नाही बेटा. परंतू एक दिवस बोलावणं येईलच. माझ्या झोपडीतील माग बंद झाला. जीवनाचाही माग आता बंद होईल. तुम्ही सुखानं नांदा. सोन्ये, अलीकडे माझ्या मनात एक तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे."

 "कोणती बाबा ? आम्ही ती पुरी करू."

 "इच्छा एवढीच की, जन्मभूमी पुन्हा एकदा पाहून यावं. सोन्ये, तीस-पस्तीस वर्षे झाली. माझी जन्मभूमी सोडून मी या रायगावी आलो. मी आलो त्या वेळेस जीवनात अंधार होता. जगात न्याय नाही, सत्य नाही, प्रेम नाही, स्नेह नाही, देव नाही, धर्म नाही असं मला वाटू लागलं होतं. मी माझी जन्मभूमी सोडली. तिचा विचारही कित्येक वर्षे माझ्या मनात आला नाही. परंतु तू सारं मला पुरतं दिलंस, तू माझ्या जीवनात पुन्हा प्रकाश आणलास, श्रद्धा आणलीस. माझ्या जन्मभूमीचा निराशेच्या भरात मी त्याग केला. आज जीवनात आशा आहे. तर ती जन्मभूमी मला पुन्हा पाहून येऊ दे. येऊ का जाऊन ?"  "बाबा, कशी आहे तुमची जन्मभूमी ?"

 "सुंदर आहे. सायगाव माझ्या जन्मभूमीचं नाव. गावाभोवती सदैव वाहाणारी बहुळा नदी आहे. किती निर्मळ व गोड तिचं पाणी. आमच्या गावात भांडणतंटा होत नसे. द्वेषमत्सर नसत. कोर्टकचेरीत कधी कोणी गेलं नाही. 'हा अपराध करणारा, हा पाप करणारा,' एवढंच देवळात जमून सर्व जण मिळून पुरावा पाहून ठरवीत. दुसरी शिक्षा नसे. 'पाप करणाराचं मन त्याला खातच असतं. निराळी शिक्षा कशाला ?' असं माझा गाव म्हणे. पाहून येईन तो गाव पुन्हा. किती विस्तृत मैदानं, कशी आंबराई, कशी स्वच्छ सुंदर घरं ! येऊ का जाऊन ? देवाकडे जाण्यापूर्वी एकदा जन्मभूमी पाहून येईन, मातृभूमी पाहून येईन."

 "तुम्ही का एकटेच जाणार ?"

 "एकट्यालाच जाऊ दे. माझ्या भावना, माझ्या स्मृती. तुम्हांला त्यात मजा वाटणार नाही. खरं ना ?"

 "मग या जाऊन. परंतु पायी जाऊ नका. तुम्ही आता वृद्ध झाला आहात. अशक्त आहात. गाडी घोडा करून जा. तुम्ही आम्हांला पुष्कळ दिवस हवेत."

 मनूबाबा पुन्हा आपल्या सायगावला आले. परंतु सायगाव पूर्वीचा राहिला नव्हता. कोठे आहे ती आंबराई ? कोठे आहेत ती विस्तृत मैदाने ? आता जिकडे तिकडे धुराच्या चिमण्या दिसत होत्या. सायगाव उद्योगधंद्याने गजबजलेले होते. सारी गडबड. त्या विस्तृत मैदानात मोठेमोठे कारखाने उघडण्यात आले होते. आंबराई जाऊन तेथे नवीन घरे बांधण्यात आली होती. ठिकठिकाणी वकिलांच्या पाट्या होत्या. कोर्टकचेरी गावात आली होती. मनूबाबांना स्वतःचे घरही कोठे दिसले नाही, त्यांचा मित्र दिनू तोही दिसला नाही. मनूबाबा सर्वत्र पाहात राहिले त्यांना ओळखीच कोणी भेटेना आणि त्यांनाही कोणी ओळखीना. साऱ्या सायगावात ते भटकले. शेवटी ते बहुळा नदीच्या तीरावर आले. परंतु बहुळेच्या पाण्यात आता गावातील गटारे सोडण्यात आली होती ! ती लोकमाता लेकरांची सारी घाण धुऊन नेत होती. मनूबाबास वाईट वाटले. ते हिंडत हिंडत वरच्या बाजूस गेले. जेथे पाणी निर्मळ



सायगाव उद्योगधंद्याने गजबजलेले होते.

होते तेथे गेले. तेथे ते बसले. बहुळेचे निर्मळ मधुर असे पाणी ते ओंजळीने प्यायले. त्या बहुळेचे पाणी पिऊन 35 वर्षांपूर्वी ते मध्यरात्री निघून गेले होते. पुन्हा तिचे पाणी पिऊन ते उठले. त्यांनी बहुळेला प्रणाम केला. पुन्हा मनूबाबा उठले. आता सायंकाळ होत आली होती. अंधार पडू लागला होता. मनूबाबा गावात आले. गावात जिकडे तिकडे

जन्मभूमीचे दर्शन * ७५

विजेच्या दिव्यांचा लखलखाट होता. म्हाताच्या मनूबाबांचे डोळे दिपून गेले. सायगावला प्रणाम करून ते परत फिरले.

 त्या दिवशी सायंकाळी रामू व सोनी फिरायला गेली होती. तो क डून कोणी तरी येत आहे असे त्यांना दिसले. दोघेजण धावत गेली.

 "बाबाच ते. चालत येत आहेत. "

 हो. ते मनूबाबाच होते. पाठीवर लहानसे गाठोडे होते. हातात काठी होती. ते वाकले होते. हळूहळू येत होते. सोनी धावतच गेली व तिने गाठोडे घेतले.

 "बाबा, चालत कशाला आलेत ?”

 गाडीनेच आलो. परंतु गाव दिसू लागल्यावर उतरून आलो. गाडीवानाला दुसरीकडे जायचे होते. कशाला त्याला हिसका ? आता सायंकाळ होत आली. मला आता एकट्यानेच जायचे आहे. माझ्या पापपुण्याची काठी हातात घेऊन देवाकडे जायचे आहे. खरे ना ?"

 "बाबा, तुमच्या जन्मभूमीहून आम्हांला काय आणलंत ? "

 "कर्तव्य नि प्रेम. ह्या दोन वस्तू मी तुम्हांला देतो. ह्या माझ्या शेवटच्या देणग्या. रामू , सोन्ये, सुखाने संसार करा. जपून वागा. संसार म्हणजे सर्कशीचा खेळ. तारेवरून चालणे. तोल सांभाळावा लागतो. संयमाची छत्री हातात धरून चाला, म्हणजे तारेवरून चालणे. तोल सांभाळावा लागतो. संयमाची छत्री हातात धरून चला,म्हणजे तारेवर पडणार नाहीत. परस्परांस सांभाळा. शेजा-यापाजा-यांना मदत करा. परावलंबी होऊ नको, चैन करू नका. कंजूषपणाही नको. सारं प्रमाणात असावं, प्रमाणात सौंदर्य आहे ! समजलं ना ? "

 "बाबा, तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागू. तुमचा आशीर्वाद आम्हांला सांभाळील."

 “परंतु तुम्ही आम्हांला अजून पुष्कळ दिवस हवेत.” सोनी म्हणाली.

 "ते का आपल्या हाती ? ते बघ दूर दिवे चमकताहेत.". मनूबाबा म्हणाले.

स मा प्त


७६ * मनूबाबा