बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/शेवट

विकिस्रोत कडून
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 175 crop)

भाग १० वा.
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 175 crop) 2
शेवट.

 बंडाची परिसमाप्ति होऊन सर्वत्र शांतता झाल्यानंतर महाराणी बायजाबाईसाहेब ह्या ग्वाल्हेर मुक्कामींच महाराज जयाजीराव शिंदे ह्यांच्याजवळ राहिल्या होत्या. बायजाबाईसाहेबांचे वय पाऊणशें वर्षांपर्यंत पोहोचलें असून, दिवसेंदिवस वार्धक्याचा अंमल त्यांच्या शरीरावर सृष्टिधर्माप्रमाणें जास्त जास्त येत चालला होता. तथापि त्यांचा नित्यक्रम, पूजाअर्चा, कथापुराण वगैरे सर्व गोष्टी सुयंत्रित चालल्या होत्या. दिवसेंदिवस त्यांची देहयष्टि शक्तिहीन होत चालल्यामुळें त्यांचा घोड्यावर बसण्याचा व्यासंग कमी झाला होता. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांची ह्या वृद्ध व पूज्य महाराणीवर केवळ मातेप्रमाणें भक्ति असून, त्यांनी त्यांच्या शुश्रूषेत किंवा सन्मानांत यत्किंचितही अंतर पडू दिले नाही. महाराज जयाजीराव हे बायजाबाईसाहेबांची वारंवार भेट घेत असत व त्यांच्याशी दोन प्रेमळ शब्द बोलून त्यांच्या मनास समाधान देत असत. अशा रीतीने बंडानंतर सुमारे तीन चार वर्षें लोटलीं.

 पुढे बायजाबाईसाहेबांची प्रकृति पिकल्या पानाप्रमाणें अगदीं क्षीण होत जाऊन इ. स. १८६३ च्या मे महिन्यांत त्या फारच अशक्त झाल्या, व त्यांचा काल अगदीं समीप आल्याची चिन्हें दिसूं लागलीं. त्यामुळें महाराज जयाजीराव ह्यांस विशेष चिंता उत्पन्न होऊन, त्यांच्या आयुर्वृद्धीकरितां त्यांनी दैवी व मानवी उपाय सुरू केले; व तत्प्रीत्यर्थ पुष्कळ द्रव्य खर्च करण्याचा संकल्प केला. ह्या समयाची हकीकत ता. ८ जून इ. स. १८६३ च्या 'ज्ञानप्रकाश' वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. ती वाचली ह्मणजे बायजाबाईसाहेबांच्या अंतकालीं महाराज जयाजीराव ह्यांनी त्यांच्याविषयीं आपली भक्ति कशी व्यक्त केली, हें दिसून येतें. ती हकीकत येणेंप्रमाणें :-

 "श्रीमंत बायजाबाईसाहेब शिंदे यांस कितीएक दिवस दुखणें लागून त्यांची प्रकृति हल्ली फारच बिघडली आहे. वैद्य व हकीम, अनुष्ठानें करणारे भट, ग्रहांची पीडा घालविणारे जोशी, देवऋषी, पंचाक्षरी वगैरे लोकांचा रोजगार पिकून हजारों रुपयांची त्यांस प्राप्ति होत आहे. श्रीमंत शिंदे सरकार व त्यांचे कारभारीमंडळ बाईसाहेबांच्या शुश्रूषेंत व काळजींत निमग्न झाल्यामुळे आठ दहा दिवस दरबार नाहींसें झालें आहे. बाईसाहेबांची प्रकृति अत्यावस्थ झालेली पाहून अलिजाबहादुर जयाजीराव यांणीं सर्वांसमक्ष त्यांस विनंति केली की, "आपण मनास वाटेल तितका दानधर्म करावा. या कामांत जो पैसा लागेल तो खजिन्यांतून मागून घ्यावा." व त्याच वेळेस महाराजांनीं एक लाख रुपये आणून दाखल केले; आणि असेंही सांगितलें की, “उज्जन परगणा आपला आहे. हा आपण कोणास बक्षीस देण्यास इच्छित असल्यास तसें करावें. त्यांत माझा नकार नाहीं. मी सर्वस्वीं आपला अंकित आहे.” हे भाषण ऐकून बाईसाहेबांस मोठा गहिंवर आला; आणि मोठ्या ममतेने त्यांनी महाराजांचे मुखावरून हात फिरवून सांगितले कीं, तुह्मांस जसें नीट दिसेल तसें करावें. श्रीमंत चिमणाराजा-शिंदे सरकारचें कुटुंब-यांचे नांवाने सर्व मालमत्ता व उज्जनी परगणा देण्याचा आपला मानस बाईसाहेबांनी प्रकट करून, त्या गोष्टीस कांहीं अंशीं इंग्रज सरकारची मंजुरी जरूर असल्याकारणानें, मेजर मीडसाहेब मध्य हिंदुस्थानचे एजंट यांजकडे वकील रवाना केले. आजी व नातू यांचे हें वास्तविक प्रेम पाहून फार संतोष वाटतो."

 ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेब ह्यांच्या अस्वस्थतेचें वर्तमान सर्वत्र प्रसिद्ध होतांच, त्यांचा समाचार घेण्याकरिता त्यांच्या परिचयाचे व त्यांच्याविषयीं पूज्यबुद्धि बाळगणारे अनेक लहानमोठे लोक ग्वाल्हेरीस आले. इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर ह्यांची बायजाबाईसाहेबांविषयीं फार पूज्यबुद्धि असल्यामुळें, त्यांनी त्यांच्या अस्वस्थेतेचें वृत्त ऐकतांच, आपले बंधु काशीराव दादा ह्यांस मुद्दाम ग्वाल्हेरीस बाईसाहेबांच्या समाचाराकरितां पाठविलें. त्याचप्रमाणें ग्वाल्हेर येथील रेसिडेंट व इतर युरोपियन लोक बाईसाहेबांच्या समाचाराकरितां येऊं लागले. ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांविषयीं जिकडेतिकडे सहानुभूति व्यक्त होऊन, त्यांच्या प्रकृतींस आराम पडावा अशी इच्छा सर्वत्र दिसूं लागली. त्या इच्छाप्रभावानें ह्मणा, किंवा औषधिगुणामुळे ह्मणा, परंतु बाईसाहेबांस मध्यंतरीं आठ पंधरा दिवस चांगला आराम पडला. हें पाहून महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस व अखिल नागरिक जनांस अत्यंत आनंद झाला. त्याच संधीस शिंदे सरकारास पुत्ररत्न प्राप्त होऊन तो आनंद द्विगुणित झाला. त्यामुळें महाराजांनीं गंगा दशहाराचा उत्सव फार थाटानें केला; व मुद्दाम ब्रह्मवर्तास जाऊन तेथें ब्राह्मणभोजनें व सुवर्णदानें केली. ह्याप्रमाणे मध्यंतरीं कांहीं दिवस बाईसाहेबांबद्दलं पुनः आशा उत्पन्न झाली. परंतु ती आशा अगदीं अल्पकालिक होऊन कविकुलगुरु कालिदास ह्यांच्या उक्तीप्रमाणें 'मरणं प्रकृतिः शरीरिणाम्' ह्मणजे जन्मास आलेला प्राणि हा हें नाशवंत जग सोडून जावयाचाच, ह्या नियमाप्रमाणें, बायजाबाईसाहेब ह्यांच्या निधनकालाचा प्रसंग लयकरच प्राप्त झाला. ता. २७ जून इ. स. १८६३ रोजीं, ही ग्वाल्हेरच्या इतिहासांत एकसारखी गाजत असलेली राजकारस्थानी व शहाणी स्त्री हा नश्वर देह सोडून कैलासपदीं गेली. ह्या दिवशीं हिंदुलोकांचा अत्यंत पवित्र व पुण्यकर असा महाएकादशीचा (ह्मणजे आषाढ शुद्ध एकादशी शके १७८६ हा) दिवस होता. त्या दिवशीं अत्यंत समाधानानें ही राजस्त्री मृत्यु पावली. त्यामुळें सर्व प्रजाजन दुःखाने फार हळहळले. त्यांच्या मृत्यूबद्दल दुःखप्रदर्शनार्थ ग्वाल्हेर येथील झांशीबाजार तीन दिवस बंद ठेवण्यात आला होता.

 महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांच्या मृत्यूनें महाराज जयाजीराव ह्यांस फार दुःख झाले. त्यांनी आपल्या घराण्याच्या व ह्या राजस्त्रीच्या मोठेपणास साजेल अशा रीतीनें त्यांचा अंत्यविधि केला. महाराजांनी बाईसाहेबांच्या इच्छेप्रमाणें बहुत दानधर्म केला, व त्यांच्या उत्तरकार्याचे दिवशीं हिंदुस्थानांतील सर्व क्षेत्रांमध्ये एक लक्ष ब्राह्मणभोजन घातलें. त्याचें स्मरण क्षेत्रोक्षेत्रीं अद्यापि जागृत आहे. ह्याप्रमाणें ह्या स्त्रीच्या पुण्याईनें तिचा शेवट उत्तम प्रकारचा झाला. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनी बायजाबाईसाहेबांची ग्वाल्हेर येथे छत्री बांधिली असून, तत्प्रीत्यर्थ कांहीं कायमचें उत्पन्नही करून दिले आहे. ही छत्री कै. दौलतराव शिंदे ह्यांचे छत्रीजवळ असून, तेथें बायजाबाईसाहेबांची उत्तम शिल्पकाराकडून तयार केलेली संगमरवरी दगडाची मूर्ति स्थापन केली आहे. तिची पूजाअर्चा व वार्षिक उत्सव अद्यापि चालत आहे. ह्याशिवाय पंढरपूर येथेंही द्वारकाधीशाच्या देवालयामध्यें बायजाबाईसाहेबांची एक मूर्ति असून तिच्याही पूजानैवेद्य वगैरे नित्यखर्चाबद्दल शिंदे सरकाराकडून स्वतंत्र उत्पन्न व वर्षासन अद्यापि चालत आहे. ह्याप्रमाणें ही स्त्री मृत्युपश्चात् देखील सर्वांच्या पूजेस व वंदनास पात्र झाली आहे.

 महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांची कीर्ति हिंदुस्थानामध्यें सर्वत्र पसरलेली असून, जुन्या व वृद्ध लोकांच्या तोंडून त्यांचे वर्णन ऐकू येतें. परंतु त्यांच्या खऱ्या चरित्राच्या किंवा इतिहासग्रंथाच्या अभावामुळें त्यांचें यश दंतकथांच्या योगानें मंद मंद होत चाललें आहे. तथापि, कांहीं पाश्चिमात्य ग्रंथकारांनीं व रसिक विद्वानांनी त्यांच्याबद्दल जे उद्गार काढिले आहेत, ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करीत आहेत. ग्वाल्हेरचे जुने रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी बाईसाहेबांच्या राज्यकारभाराची प्रशंसा केली असून, दौलतराव शिंद्यांनी त्यांच्याबद्दल "शहाणी बायको" (a woman of sense ) ह्मणून जे उद्गार काढले होते, त्याचा वेळोवेळी मोठ्या कौतुकानें उल्लेख केला आहे. शिंद्यांच्या दरबारचे दुसरे रेसिडेंट मेजर सदरलंड ह्यांनी त्यांच्यासंबंधानें "चतुर व स्वाभिमानी बायको" ह्मणून त्यांची स्तुति केली आहे. शिंद्यांच्या दरबारचे युरोपियन डाक्टर मि. होप ह्यांनी, "त्या काळची फार नामांकित स्त्री" ह्मणून आनंदभराने त्यांचा गौरव केला आहे. मिसेस ड्युबर्ली नामक आंग्ल युवतीनें, "बायजाबाई ही फार कार्यक्षम व साहसी असून हिंदुस्थानांतील फार प्रख्यात स्त्री आहे" असे ह्मटलें आहे. आणि मिसेस फेनी पार्क्स ह्या बाईनें, "बायजाबाईसारखी कृपाळू व सुस्वभावी स्त्री पाहिली नाही" असा स्तुतिपर उल्लेख आपल्या रोजनिशींत नमूद करून ठेविला आहे. त्या वेळच्या वर्तमानपत्रांतूनही बायजाबाईसाहेबांसंबंधानें प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले होते. 'मुंबई ग्याझेट' पत्रांत बायजाबाईसाहेबांचे मृत्युवृत्त आलें असून, त्यांत असे ह्मटलें आहे कीं, "बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी, आणि भोपाळची बेगम ह्या सुप्रसिद्ध स्त्रियांप्रमाणे ही राजस्त्रीही, आपल्या परीनें, प्रख्यात असून, हिनें अनेक वेळां आपल्या देशाच्या शत्रूंशीं घोड्यावर बसून टक्कर दिली होती." अशाप्रकारें ह्या महाराणीच्या संबंधाने सर्वत्र स्तुतिपर उल्लेख दृष्टीस पडतात. ह्यावरून ह्या राजस्त्रीनें कुवि तुलसीदास ह्यांच्या

दोहा.
सुरतसे कीरत बडी बिनपंख उड़ जाय।
सुरत तो जाती रही, कीरत कबहू न जाय ॥ १ ॥
ह्या उक्तीप्रमाणे आपल्या पश्चात् आपली कीर्ति हिंदुस्थानांत दुमदुमत ठेविली आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. असे स्त्रीरत्न ज्या शिंदे कुलामध्ये प्रसिद्ध झालें, त्या कुलास व एकंदर राष्ट्रास ते ललामभूत होय, ह्यांत शंका नाहीं.

 बायजाबाईसाहेबांनी ज्या ग्वाल्हेर संस्थानचा राज्यकारभार चालविला, त्याची सांप्रत सर्वप्रकारें सुधारणा होऊन तें चांगल्या भरभराटीच्या स्थितीप्रत पोहोचलें आहे. त्याचें क्षेत्रफळ २९,०४६ चौरस मैल असून त्याची लोकसंख्या ३०,३०,५४३ आहे. ह्या संस्थानचे अधिपति श्रीमंत महाराज अलिजाबहादुर माधवरावसाहेब शिंदे हे आहेत. हे बायजाबाईसाहेबांचे पणतू होत. ह्यांजवर ब्रिटिश सरकारची पूर्ण मेहेरबानी असून, त्यांस त्याजकडून के. सी. एस्. आय्. ही बहुमानाची पदवी मिळालेली आहे. ह्यांच्याजवळ ५५०४ स्वार, ११०४० पायदळ व ४८ तोफा इतकें सैन्य आहे. ह्यांनीं दक्षिण आफ्रिकेंतील व चीन देशांतील युद्धप्रसंगीं द्रव्यरूपानें व सैन्यरूपानें सार्वभौम सरकारास चांगले साहाय्य केलें आहे. ह्यांच्या हातून उत्तमप्रकारें राज्यकारभार चालून प्रजा सदैव सुखानंदांत राहो, व शिंदे घराण्याचा लौकिक व उत्कर्ष शुक्लेंदुवत् वर्धमान होवो, अशी परमेश्वराजवळ अनन्यभावें प्रार्थना करून हा चरित्रग्रंथ संपवितों.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 180 crop)