बहु असोत सुंदर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> बहु असोत सुंदर संपन्‍न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे तेथ अडे काय जलाशय नदाविणे ? पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरे रत्‍नां वा मौक्‍तिकांहि मूल्य मुळी नुरे रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा

नग्‍न खड्ग करी उघडे बघुनि मावळे चतुरंग चमूचेही शौर्य मावळे दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले भासत शतगुणित जरी असति एकले यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती जरिपटका भगवा झेंडाहि डोलती धर्म-राजकारण समवेत चालती शक्‍तियुक्‍ति एकवटुनि कार्य साधिती पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.