प्रशस्ती

विकिस्रोत कडून






 
प्रशस्ती
डॉ. सुनीलकुमार लवटे




पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना

लेखकांसाठी

प्रशस्ती, पुरस्कारासारख्या असतात

अन् लेखनासाठी असते,

प्रोत्साहन, उत्तेजन!

वाचकांसाठी असतात

मार्गदर्शन अन् जाणीव जागृतीचा

एक अनुकरणीय उपक्रम!!





प्रशस्ती

(प्रस्तावना संग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे
संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ ०० ९३
drsklawate@gmail.com www.drsunilkumarlawate.in

दुसरी आवृत्ती २०१८

© डॉ. सुनीलकुमार लवटे

प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com

मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य र ३७५/‘प्रशस्तीच्या निमित्ताने...


 लेखनाच्या प्रवासात आपणास कधी एखाद्या पुस्तकास प्रस्तावना लिहावी लागेल असे मनात पूर्वी केव्हाही आल्याचं आठवत नाही. सन १९८८ साली माझे विद्यार्थी, सहकारी असलेले प्रा. डॉ. बाबासाहेब पोवार आपल्या एकांकिकांचा संग्रह घेऊन आले नि दोन शब्द प्रस्तावनापर लिहा म्हणून आग्रह करते झाले. त्यांनी असं करण्यामागे लेखन, वाचन, व्याख्यान, अध्यापनसंबंधी माझी काहीएक पाश्र्वभूमी होती. मी बी.ए., एम.ए. च्या वर्गांना हिंदी शिकवत असताना नाटक शिकवत असे. नंतर मी शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचा स्वीकृत सदस्य असतानाच्या काळात शंकर शेष हे नाटककार ‘विशेष लेखक' म्हणून निवडून त्यांची ‘फंदी' नि ‘खजुराहो का शिल्पी' ही दोन नाटके पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती नि ती मी शिकवितही होतो. शंकर शेष यांच्या जीवन आणि साहित्यावर तोवर हिंदीत अवाक्ष ही लिहिले गेले नव्हते. प्रायश्चित्त म्हणून प्राध्यापकांच्या गहजबानंतर मी ‘नाटककार शंकर शेष' हे पुस्तक लिहिले होते. (१९८३) ते माझे पहिले पुस्तक. त्या पुस्तकाने मला लौकिकार्थाने लेखक केले होते. नाटक चळवळीशी माझा संबंध प्रेक्षक म्हणून सुरू झालेला. तो दिग्दर्शन, समीक्षक, संशोधक, अभ्यासक म्हणून विस्तारेल असे कधी वाटले नव्हते. प्रा. बाबासाहेब पवार यांनी आपल्या ‘सुगंधी काटे' या एकांकी संग्रहास प्रस्तावना मागण्यामागे हा इतिहास होता. त्या प्रस्तावना लेखनाने मी लेखकाचा प्रस्तावनाकार झालो. त्या घटनेलाही आता तीन दशकांचा काळ लोटला. या कालावधीत मी सुमारे सत्तर प्रस्तावना लिहिल्या. त्याचे पुस्तक करावे ही सूचना ‘आई। समजून घेताना', फिरस्ती' इ. लिहिणारे ‘सकाळ'चे माजी समूह संपादक, लेखक, वक्ते आणि माझे माणूस-मनस्वी मित्र उत्तम कांबळे यांची. त्यांनी माझ्या वेळोवेळी लिहिलेल्या प्रस्तावना वाचल्या होत्या नि एका प्रस्तावनेच्या निमित्ताने ते फोनवर दीर्घकाळ बोलत राहिले नि प्रस्तावना संग्रह का आवश्यक ते त्यांनी मला पटवून सांगितले होते. त्याची फलश्रुती म्हणजे हा प्रशस्ती' प्रस्तावना शिर्षक होय.
 गेल्या तीस वर्षांत मी कथा, कादंबरी, भाषणसंग्रह, काव्यसंग्रह, आत्मकथन, बालकविता, वैचारिक, लेखसंग्रह, सत्यकथा, स्मारक ग्रंथ, चरित्रे, चरित्रमाला, दैनंदिनी, समीक्षासंग्रह, संशोधन प्रबंध, आठवणी, ललित लेखसंग्रह, मार्गदर्शिका, अनुभवकथन, भाषांतर, अग्रलेख संग्रह, सौंदर्यशास्त्र, विनोदी लेखसंग्रह अशा विविध साहित्यरूप, कृतींना प्रस्तावना लिहिल्या. काहींना शुभेच्छा अभिप्राय लिहिले. काही पुस्तकांचे मलपृष्ठ मजकूर लिहून समृद्ध केले. या निमित्ताने माझ्यातला वाचक, विचारक, समीक्षक समृद्ध होत गेला. प्रस्तावना लिहायची म्हणून आलेला मजकूर मुद्रणपूर्व रूपात असतो. ब-याचदा ते हस्तलिखित असतं, कधी टंकित प्रत तर कधी तरल प्रत (सॉफ्ट कॉपी) ई-मेलवरूनही येत असते. तशी ती सर्वार्थाने अशुद्ध, असमृद्ध प्रत हाती असते. प्रस्तावना मात्र शुद्ध, समृद्ध अपेक्षित असते. लेखक, लेखिकांच्या लेखी झटपट प्रस्तावना म्हणजे ‘यादी पे शादी' किंवा 'झट मँगनी, पट शादी' असाच सारा व्यवहार असतो. जर ते त्या लेखक, लेखिकेचे पहिले पुस्तक असेल तर मग विचारूच नका. त्याला प्रस्तावनाकार म्हणजे त्याच्या प्रस्तावनेसाठीच जन्मलेला प्राणी वाटत असतो. शिवाय याला प्रस्तावना लिहिण्याशिवाय दुसरा कोणता उद्योग नसावा असा समज असल्याने त्यांच्या जिभेवरचा तीळ भिजायच्या आत प्रस्तावना हवी असते. हे अबोधपण, ही अधीरता नवलेखक म्हणून स्वाभाविकच म्हणायला हवी.
 मराठी साहित्य, समीक्षेच्या प्रांतात प्रस्तावनेच्या अनुषंगाने विपुल लेखन झालेले आहे. वि. स. खांडेकर आपल्या साहित्य कृतींना आवर्जून प्रस्तावना लिहीत. त्या ब-याचदा विस्तृत असत, संक्षिप्त प्रस्तावना अपवाद! शिवाय त्यांनी अन्यांच्या पन्नास एक पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना मी संदर्भासाठी वाचल्या आहेत. शिवाय त्यांचे पुस्तक करायचे संकल्पित असल्याने त्या संग्रहीपण आहेत. कुसुमाग्रजांनी वि. स. खांडेकरांनी स्वतःच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांचा एक संग्रह संपादित केला असून तो ‘विचारधारा' शीर्षकाने प्रकाशित झाला आहे. तोही संग्रही आहे, वाचला आहे. वि. ग. कानिटकर संपादित 'गाजलेल्या प्रस्तावना बहुचर्चित आहे. अनिल सहस्त्राबुद्धे लिखित ‘प्रस्तावना : संकल्पना व स्वरूप' मध्ये प्रस्तावनेचे स्वरूप, रचना विशद करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी पण अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या असून त्यावर आधारित 'यशवंतरावांच्या प्रस्तावना', 'प्रस्तावनाकार यशवंतराव चव्हाण' सारखी पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तावना म्हणजे एखाद्या लेखनाचा दुसऱ्याने केलेला पुरस्कारच असतो. लेखक जेव्हा स्वतःच्या साहित्यकृतीस प्रस्तावना लिहितो तेव्हा तर तो आपल्या लेखनाचा उगम, प्रेरणा, शैली, आशय, विषय, दृष्टिकोन, विचार इत्यादीबद्दलचे आपले अंतरंगच उघडे करीत असतो. चेहऱ्यामागचा चेहरा म्हणून इंग्रजीत त्याला 'पूर्वरूप' या अर्थाने 'Preface' शब्द आहे. अठराव्या शतकातील इंग्रजीतील प्रसिद्ध कवी, पत्रकार, कोशकार, समीक्षक मॅन्युअल जॉन्सन (१७०९-१७८४) यांनी आपल्या 'डिक्शनरी' (१७५५) या कोशास लिहिलेली प्रस्तावना जगप्रसिद्ध आहे. या प्रस्तावनेने भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती, विविध अर्थछटा, शुद्धता इत्यादींसंदर्भात वैश्विक परिमाणे निश्चित केली आहेत असे मानले जाते. तीच गोष्ट शेक्सपिअरची. त्याने आपल्या नाटकांना लिहिलेल्या प्रस्तावना नाटकांइतक्याच वाचनीय, विचारणीय मानल्या गेल्या आहेत. त्यांच्या काही नाटकांच्या प्रस्तावना तर नाटक संहितेपेक्षा मोठ्या आहेत. हार्ले ग्रॅनविलेलिखित 'प्रिफेस टू शेक्सपिअर' हा चतुष्खंडी ग्रंथराज (१९२७- ४८) म्हणजे प्रस्तावना साहित्यातील दीपस्तंभच! इंग्रजी भाषेत प्रस्तावनेस तिच्या स्वरूपावरून वेगवेगळे शब्द वापरण्याचा प्रघात आहे. म्हणजे असे की 'Introduction' म्हणजे एखाद्या पुस्तकाची ओळख करून देणे होय ( पुस्तक परिचय ). 'Forward' म्हणजे दुसऱ्याच्या साहित्य वा पुस्तकाच्या पुरस्कार, प्रशस्ती, प्रशंसेसाठी केलेले लेखन; तर 'Preface' म्हणजे स्वतःच्या साहित्यकृती वा पुस्तक समर्थनार्थ केलेला लेखनप्रपंच वा खटाटोप होय. माझे हे प्रस्तावना लेखन स्वप्रशस्ती होय. आत्मश्लाघा, आत्मस्तुती, आत्मकथन असं जे काही आत्मपर लेखन असते, ते लेखनातील 'नार्सीझम'चे रूप होय. हे माहीत असतानाही मी हे लिहिण्यास धजावतो आहे, त्याची कारणमीमांसा करणे मला आवश्यक वाटते.
 नवोदित लेखकास प्रारंभीच्या काळात कुणी तरी प्रोत्साहन, उत्तेजन देण्याची गरज असते. ते कार्य रुळलेला लेखक करीत असतो. दुसऱ्यांच्या साहित्यकृतीस प्रस्तावना लिहीत प्रस्तावनाकार बहुश्रुत, बहुआयामी बनत स्वतः समृद्ध होतो. प्रस्तावना लिहिणे म्हणजे लक्ष्य कृतींचं समग्र आकलन करणे. त्याशिवाय कुणासच प्रस्तावना लिहिता नाही येणार. शिवाय ती संक्षेपाने लिहिणे अपेक्षित असल्याने तिची साक्षेपी व संक्षेपी शैली म्हणजे

'गागर में सागर' भरण्याचा भगीरथ प्रयत्न असतो. 'प्रशस्ती ' मध्ये नवोदितांसाठीचं लेखन अधिक असणे हे माझ्या लेखकाचे सामान्यत्व सूचित करते. त्याचे विविधांगी असणे माझ्या लोकसंग्रहाचे निदर्शक होय. यातील अनेक रचना समाजलक्ष्यी असणे माझ्या समाजशील संपर्काची फलश्रुती म्हणायला हवी तर यातल्या साहित्य कृती माझ्या साहित्य व्यासंगाची परिणती म्हणावी लागेल. या लेखनाने माझी साहित्य कक्षा आणि क्षितिज विस्तारले, रुंदावले हे जरी खरे असले तरी त्याच्या खोलीच्या मर्यादा नि वैगुण्याची मला जाणीव आहे, त्याचे भानही आहे.
 'आमचा काय गुन्हा?', 'भंगार', 'कोंडलेले हुंदके', 'ठिगळ', 'अनवाणी', 'दुःखभोग', 'वास्तव', 'नाथा', 'आनंदाश्रम' अशा साहित्य रचनांना मी लिहिलेल्या प्रस्तावना म्हणजे माझ्या वंचित समाजाप्रती असलेल्या आस्था नि अस्मितेची प्रतिबिंबे होत. त्या प्रस्तावनांपेक्षा मूळ साहित्यकृती श्रेष्ठ होत. 'वास्तुपर्व' ची मी केलेली भलावण केवळ शाब्दिक नसून ती दृष्टिकोण विकासाची माझी धडपड होय. शिक्षण, समाज, साहित्य, चित्र, शिल्प, निसर्ग असा 'प्रशस्ती'तला फेर तुमचे जीवन जगणे प्रगल्भ करेल असा मला विश्वास वाटतो. 'नॉटपेड रिसीट' वाचली की विनोद किती जीवनलक्ष्यी असायला हवा याची तुम्हास खात्री पटेल. यातील संशोधन प्रबंधासाठी लिहिलेल्या प्रस्तावना लेखनाने माझे खांडेकरी साहित्याचे आकलन अधिक स्पष्ट झाले. त्यामुळे माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की प्रस्तावनाकार प्रस्तावना लिहून अन्य लेखकांना उपकृत न करता, ती त्या लेखकांनी प्रस्तावनाकारास आकलन विस्ताराची दिलेली संधीच असते. 'जलद आणि प्रभावी वाचन' सारख्या पुस्तकांनी मला वाचन हे वैज्ञानिक असते याची जाणीव करून दिली. त्यातून मला केवळ 'वाचन' विषयावर लिहिण्यास प्रवृत्त केले. ते लवकरच मेहता 'मेहता' त्यामुळे प्रस्तावना लेखन हा उभयपक्षी समृद्धीचा सोपान म्हणायला हवा. झाडू कामगार असलेले विजय शिंदे मुळात कवी असतात. सफाई हा त्यांचा पोटापाण्याचा उद्योग असला, तरी कविता करणे त्यांचे जीवन जगणे असते हे प्रस्तावना लेखनाने मला दिलेले शहाणपण होय.  अन्य अनेक साहित्य प्रकारांच्या प्रमाणे प्रस्तावनेची स्वतःची अशी एक स्वरूप रचना असते. प्रस्तावनेचा उद्देश लक्ष्यित ग्रंथ वा साहित्य कृतीचा परिचय करून देणे असतो. प्रस्तावनाकार आपल्या लक्ष्य ग्रंथातील नरम बिंदू (Weak Points) सूचकतेने सांगतो तर बलस्थाने अधोरेखित करतो. त्यासाठी तो प्रसंगी उदाहरणेही उद्धृत करतो. विशेषतः काव्यकृतींच्या

संदर्भात अशा उदाहरणांचे महत्त्व असाधारण असते. काही प्रस्तावनात खंडन मंडन असते तर काहीत उहापोह. काही तर आरोप-प्रत्यारोप, प्रश्नोत्तर अशा अंगांनीही विवेचन होत राहते. काही प्रस्तावना तर प्रश्नोत्तर शैलीतच लिहिल्या गेल्या आहेत. अण्णा भाऊ साठे यांची पहिली कादंबरी 'फकिरा' स वि. स. खांडेकरांनी लिहिलेली प्रस्तावना प्रश्नोत्तर शैलीचे आदर्श उदाहरण होय. राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' नाटकाला वि. सी. गुर्जरांची असलेली प्रस्तावना अनेक कारणांनी गाजली व पुढे या नाटकांसाठी आचार्य प्र. के. अत्रे, श्री. के. क्षीरसागर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना म्हणजे मूळ प्रस्तावनेच्या समीक्षा ठरल्या. प्रस्तावना सुबोध असतात, तशा दुर्बोधही. पण मूळ साहित्य कृतींचे सौंदर्य, आशय, विषय समजावणाऱ्या प्रस्तावना ग्रंथपूरक व ग्रंथप्रसारक ठरतात. काही प्रस्तावना वाचताना ही समीक्षा तर नाही ना, असे वाटून जाते. तेव्हा प्रस्तावना ही वाचक, मार्गदर्शक, प्रोत्साहक असायला हवी हे उघडच आहे. स्वकृतीस लिहिलेल्या प्रस्तावना लेखकाची विचारधारा, जीवनदृष्टी प्रगट करणाऱ्या ठरतात, हे 'विचारधारा' हा वि. स. खांडेकरांच्या कुसुमाग्रज संपादित प्रस्तावना संग्रह वाचताना लक्षात येते. प्रस्तावना हा साहित्य प्रकार सर्वसमावेशक नि विविधतेने नटलेला असतो असे कानिटकर संपादित 'गाजलेल्या प्रस्तावना' ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रा. डॉ. मनोहर आळतेकरांनी म्हटले आहे. मराठी प्रस्तावना लेखनाची परंपरा जयराम पिंडे यांच्या 'राधामाधवविलासचंपू' ग्रंथासाठी लिहिलेल्या वि. का. राजवाडे यांच्या प्रस्तावनेपासून मानली जाते. अवघ्या ४०-५० पृष्ठांच्या या काव्यास २००-२५० पानांची प्रस्तावना म्हणजे 'नमनास घडाभर तेल' नसून 'राईचा पर्वत' नसून, 'सुतावरून स्वर्गास जाता येते' असा आश्वासक, व्यासंगी वस्तुपाठ होय. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मराठीत न. चिं. केळकर, त्र्य. शं. शेजवलकर, वि. दा. सावरकर, प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, श्री. म. माटे, वा. म. जोशी, प्रा. नरहर कुरुंदकर प्रभृती मान्यवरांनी लिहिलेल्या प्रस्तावना वाचणे ब्रह्मानंदापेक्षा कमी नाही. 'प्रशस्ती' मात्र या पंक्ती नि मांदियाळीत खचितच बसवता येणार नाही. हा विनय नसून वस्तुस्थिती होय.

• डॉ. सुनीलकुमार लवटे

________________

अनुक्रम

१. समाज जाणिवेच्या प्रबोधक एकांकिका/११

२. पूर्व प्रबोधन/१४

३. बालकवितेची ही अंगत-पंगत, आहे खरी सुंदर संगत!/१७

४. कोंडलेले निःश्वास सोडताना/१९

५. चित्रपट सृष्टीतील झाकली माणकं/२१

६. ग्रामीण जीवनाच्या बोधक कथा/२५

७. दाटून येते तेव्हा.../२८

८. एक उद्ध्वस्त जग अनुभवताना/३२

९. उतराईचा असा जागर उरी - जिव्हारीही!/३८

१०. वाचनाची वैज्ञानिक मांडणी करणारा शैक्षणिक संदर्भ ग्रंथ/४३

११. हृदय परिवर्तनाशिवाय धर्म परिवर्तन व्यर्थ/४६

१२. 'माणूस' घडणीची सूक्ते /४९ ।

१३. विविधभावी कॅलिडिओस्कोप/५३

१४. ख-या अर्थाने धर्मबुद्धीवर आधारित सामाजिक न्याय कोणता ?/५७

१५. नव्या बालकवीच्या नव्या कविता/६१

१६. लोकव्यवहारातून समाजशिक्षण देणारा अनुभवकुंभ/६५

१७. समान शिक्षणाच्या सर्वंकष कायद्याची गरज/६८

१८. धर्मांतरित दलितांच्या वेदनेचा आत्मस्वर/७१

१९. कृतज्ञतेतून साकारलेले साग्र चरित्र/७४

२०. परिस्थितीवर मांड ठोकणारे आयुष्य /७९

२१. नॉट पेड रिसीट/८२

२२. रंगमंचीय एकांकिका/८८

२३. सकल सौंदर्याची ध्यासमय शब्दसाधना/९१

२४. गमावलेल्या इतिहास व संस्कृतीची नोंद/९५

२५. बालदीप जपणे म्हणजे भविष्य सोनेरी करणे/९८

२६. अश्वत्थाम्याची अस्वस्थ जखम दाखवणारे लेखन/१००

२७. नव्या ग्रामोद्याचे आश्वासक चित्रण करणारी कादंबरी/१०४ ________________


२८. जगणं समजावणारे हितगुज/१०७
२९. काल-चित्र उभे करणारी दैनंदिनी/११२
३०. शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचा मूलमंत्र /११४
३१. पूर्णपात्र समाजसेवेची सार्थक कहाणी/११८
३२. उद्याचे जग आज पाहता यायला हवं/१२१
३३. नाथा' जन्माला न येण्याचे शिवधनुष्य पेलूया!/१२४
३४. चांगल्याचे स्वागत नि वाईटाचा विरोध/१२७
३५. बालप्रतिभेची उजळली प्रभा/१३१
'
३६. गैराशी वैर करत लाभलेले गौरवी जीवन/१३३
३७. मूल्यशिक्षण रुजवणाच्या नाट्यछटा/१३६
३८. पालकांसाठी बालकांचे बायबल/१३९
३९. अस्वस्थ करणारी ग्रामीण कळ/१४५
४०. खांडेकरांच्या कथासाहित्याचे मूल्यनिष्ठ संशोधन/१५१
४१. विकासाच्या पाऊलखुणांचा राजमार्ग व्हावा/१५६
४२. हास्यामागील खंत जागवणारी ‘मिश्किली’/१५९
४३. निसर्गमित्र आणि लढवय्या बुलबुल/१६४
४४. रंजक कथा अभिजात व्हायला हव्यात/१६७
४५. पत्रकारितेच्या पाच दशकांचा अनुबोध पट/१७0
४६. चंद्रकलेला सरस्वतीचंद्रांचं तेज लाभावं/१७३
४७. लहान प्रसंगांतून महान विचारांची पेरणी/१७८
४८. समाजाच्या मंगल बदलाचे स्वप्न रंगवणाच्या कथा/१८२
४९. स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा समाज जागर घडविणाच्या कथा/१८५
५०. वास्तुशिल्पविद्येचा आस्वादक अध्याय/१९०
५१. मोहाच्या क्षणी विवेकाची कसोटी/१९५
५२. अनाथ, निराधारांच्या प्रश्नांविषयी भावसाक्षरता वाढवणाच्या आठवणी/१९८
५३. ध्येयवादी शिक्षकाचे अनुकरणीय चरित्र/२०३।
५४. शिक्षणविषयक जाणीव जागृतीचे समाजसंवेदी लेखन/२०८
५५. साध्या, भोळ्या जगण्याचे करुणाष्टक/२१३ ५६. जात पंचायतीविरुद्धचा जिहाद/२१६
५७. पुरोगामी समाज रचनेचा खटाटोप/२२१
५८. बाल-साहित्य वाचनाचा संस्कार/२२६
५९. उपजत कलेचे उपयोजित कलेत रूपांतर करणारे पुस्तक/२२९
________________

६०. विकास व माणूस घडणीच्या लक्ष लक्ष संभावना जागवणारे लेखन/२३४
६१. संवेदी हितगुजाचे मृत्युंजयी आविष्करण /२३९
६२. चिमुरड्या कवयित्रीच्या प्रगल्भ कविता/२४४
६३. वर्गीय समस्या भेदून एकात्म समाज निर्मिणारे
खांडेकरांचे कथात्म साहित्य/२४७
६४. नवसमाज निर्मितीची संजीवनी/२५०
६५. ‘टच स्क्रीन' हाच नव्या युगाचा परीस/२५४
६६. प्रतिकूलतेतही स्वतःचा सूर्य शोधणारी कविता/२५६
६७. पंख अडकलेल्या पाखराची तडफड/२६९
६८. अनुभवांचे युद्ध आणि अभिव्यक्तीची सुबोधता/२६२
६९. समाज संवेदी लेखन/२६५
७०. साध्या शब्दकळेतलं बिकट जीवनरूप/२६८
७१. प्राप्तकालाचे सुंदर स्वप्नरंजन!/२७१
• संदर्भ सूची/२७४

समाज जाणिवेच्या प्रबोधक एकांकिका  आधुनिक मराठी साहित्यात एकांकिका हा साहित्य प्रकार सतत नि वेगाने विकसित होऊन राहिला आहे. आजच्या मराठी एकांकिकेस सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असली तरी तिचे रूप हे गेल्या साठ वर्षांच्या सततच्या प्रयोगशीलतेतून साकार झाले आहे.
 रंगमंचावर अभिनित करण्याच्या उद्देशाने लिहिल्या जाणाऱ्या मराठी एकांकिकांचा इतिहास हा केवळ २५-३० वर्षांच्या अल्प सीमेत समाविष्ट असलेला इतिहास होय. आणि म्हणूनच मराठी एकांकिकांत इंग्लंडच्या 'ब्रिटिश ड्रामा लिग' किंवा अमेरिकेच्या 'लिटल् थिएटर' च्या एकांकिका, इतकी कलात्मकता आलेली नाही हे मान्य करायला हवे. आजची मराठी एकांकिका ही समकालीन ज्वलंत विषयांच्या संबंधीची तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून लिहिली जाते. तिच्यातील नाट्यगुणांपेक्षा ती आशयगर्भ कशी होईल इकडेच एकांकिकाकाराचे लक्ष राहात आल्याने एकांकीकेत नाटकामध्ये असलेला एकजिनसीपणा अभावानेच आढळतो. प्रा. बाबासाहेब पोवार यांचा 'सुगंधी काटे' हा एकांकिका संग्रह या सर्व पार्श्वभूमीवर पाहिल्यास फारशी निराशा होणार नाही.
 प्रा. बाबासाहेब पोवार हे लेखक म्हणून नंतर अभ्यासावे लागतील. कारण लेखक, नाटककार हा काही त्यांचा स्थायीभाव नव्हे. ते मूळचे नट

प्रशस्ती / १९

नि अभिनेते आहेत. अभिनयाची जाण असलेला त्यांच्यासारखा कलाकार जेव्हा 'मत्सर', 'पाउले चालती दुसऱ्याची वाट' व 'आक्रंदन' सारख्या एकांकिका लिहितो तेव्हा त्याच्या मानसिक रंगपटावर त्या अभिनित होतच साकारत असतात. त्यामुळे रंगमंचाच्या कसोटीवर त्या यशस्वी करण्यासाठी त्यांना वेगळे प्रयास घ्यावे लागत नाही. माझ्या दृष्टीने या एकांकिकांचा हा यशमय जन्म ही भावी यशस्वीतेची नांदी ठरत आला आहे. 'सुगंधी काटे' मधील या तीनही एकांकिका विषयाच्या दृष्टीने सामाजिक आहेत. 'मत्सर' एकांकिका मानवी मनाच्या भावविश्वाचे व विचार संघर्षाचे चित्रण करते. मत्सर हा स्त्री गुणविशेष मानला जातो. पण तो खरा तर स्त्री इतकाच पुरुषातही प्रभावीपणे विद्यमान असतो. प्रसंगोपात तो स्त्री इतकाच प्रक्षोभक रूपात प्रकट होतो. हे सांगणारी एकांकिका प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीस खिळवून ठेवेल यात शंका नाही. 'पाऊले चालती' माणसाच्या अंधानुकरण वृत्तीतून येणाऱ्या वैफल्याचे चित्रण करणारी एकांकिका. अंधानुकरणामुळे माणसाचे वर्तन विदुषकी होते. परिणामी येणारी हताशा वाचकास अंतर्मुखी करते. ती इतक्या माफक आशेनेच पाहायला हवी. कारण तिची प्रयोगक्षमता तशी माफकच म्हणावी लागेल. 'आक्रंदन' मात्र खऱ्या अर्थाने रंगमंचीय एकांकिका. प्रक्षोभक विषय, समकालीन संघर्ष, संवादातील जहालता, नाटकीयता सारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे ही वाचकांबरोबर प्रेक्षकांनाही आवडावी.
या संग्रहातील एकांकिका सामाजिक जाणिवेतून लिहिल्या गेल्या असल्याने त्यांचे सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने आगळे महत्त्व आहे. या एकांकिका वाचत असताना त्यांच्या मागील सहेतुकता पदोपदी जाणवते. एका विवक्षित उद्देशाने खरे तर उद्देश समोर ठेवूनच त्यांचे लेखन झाल्याने त्या उद्बोधन प्रधान झाल्या आहेत. एकांकिका संकलनाच्या मागे असलेल्या 'नम्र निवेदनातून' ही एकांकिकाराची सामाजिक तळमळ स्पष्ट होते. या एकांकिकांच्या प्रयोगांचे मानधन अनाथ, अपंग, अंध इ. चे संगोपन, पुनर्वसन करणाऱ्या सामाजिक संस्थांना द्यायच्या प्रयोजनामागे हीच जाण आहे. नाटककाराच्या पहिल्या धारेच्या या एकांकिकांना कलात्मकतेच्या कठीण कसोट्यावर कसणे क्रूरता होईल. परंतु त्यातील रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना, चमत्कृतीपूर्ण दृश्य (ट्रिक सीन), संक्षिप्त संवाद इ. दृष्टीने लेखकाचे बारीक लक्ष वाखाणण्यासारखे आहे.
 पुस्तकारंभी लिहिलेल्या अशा प्रस्तावना बहुधा प्रशंसापत्रच असते. प्रशंसापत्राचे एक बरे असते. ते लिहिणाऱ्याला व ज्याच्यासाठी ते लिहिले

प्रशस्ती/१२

जाते त्याला दोहोंना अकारण मोठेपणा देत असते. अशा अकारण मिळणाऱ्या मोठेपणाच्या मोहापासून सुटका करायची म्हणून ती लिहिणे टाळत होतो. तरी या एकांकिकामागील सामाजिक तगमगीनेच खरे तर मला लिहायला लावले. या निमित्ताने मराठी एकांकिका नाटकाबद्दल वाचायची व विचार करायची संधी मिळाली त्याबद्दल एकांकिकाराचे आभार. प्रा. बाबासाहेब पोवार नाट्यलेखनास क्षणिक प्रक्षोभ न मानता सततच्या रियाजाने ते अधिक परिणामकारक करत राहतील अशी आशा करतो. त्यांच्या या प्रयत्नांस मनःपूर्वक शुभेच्छा !


दि. २४ फेब्रुवारी, २०१८ जागतिक मुद्रण दिन. पूर्व प्रबोधन  चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकांपर्यंतचा सुमारे तीनशे वर्षांचा कालखंड हा युरोपच्या इतिहासात 'प्रबोधन पर्व' म्हणून ओळखला जातो. या कालखंडात पारंपरिक ग्रीक, रोमन संस्कृतीच्या मध्ययुगीन पारंपरिकतेच्या विरोधात कला, साहित्य, जीवन व्यवहाराच्या संदर्भात नवीन विचार मांडले गेले. या नवविचारांचा प्रारंभ इटलीत झाला. नंतर त्यांचा प्रसार युरोपात नि मग जगभर झाला. 'सर्व विश्वाच्या अस्तित्वाचा मानदंड मनुष्य 'होय' या ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटॅगोरसच्या 'मानवतावादी सिद्धांता'चा वैचारिक 'विकास म्हणजे 'प्रबोधन पर्व'. या नवमतवादी विचाराने जगास भौतिकाकडून अवकाशाकडे नेले. या कालखंडाने मानवी सर्जन व विचारशक्तीचा विधायक विकास घडवून आणला. यातून जगभर बुद्धी, प्रतिभा व मानवी आचरणास एक नवे परिमाण लाभले, नवी दिशा मिळाली. यातून मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. जाती, धर्मनिरपेक्ष एकात्म मानवी समाजरचनेच्या वर्तमान जीवनातील आग्रहाच्या मागे प्रबोधन पर्वातील विचार - विकासाचे मोठे योगदान आहे.
 महाराष्ट्रात 'प्रबोधन पर्व' उदयास आले ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास. 'दर्पण', 'ज्ञानोदय', 'विविध ज्ञानविस्तार', 'निबंधमाला'सारख्या नियतकालिकांतून प्रकाशित होणाऱ्या लेखांद्वारे धार्मिक व सामाजिक

प्रशस्ती / १४

सुधारणांसंबंधी विचार सुरू झाला. हिंदूंचा आचारधर्म, वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, बालविवाह, पुनर्विवाह, हुंडापद्धती, बहुभार्या प्रथा, स्त्री- शिक्षण संबंधी विचारातून तत्कालीन सुशिक्षित तरुणांत वर्तन-परिवर्तन घडून आले. त्यातून चातुर्वर्ण्य, जातिभेद, कालबाह्य रूढी विरोधी वातावरण तयार झाले. राजा राममोहन रॉय, म. फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडिता रमाबाई, महर्षी शिंदे, गाडगेमहाराज, म. गांधी प्रभृतींनी जोपासलेल्या समाज व विचार प्रबोधनाचा वारसा चालवणाऱ्या इतिहासाचार्य राजवाडे, साहित्यकार वि. द. घाटे, दुर्गा भागवत, मुन्शी प्रेमचंदांपर्यंतच्या प्रबोधन पर्वाचा आलेख प्रा. कुसुम कुलकर्णी यांनी आपल्या या लेखसंग्रहातून शब्दबद्ध केला आहे.
 'प्रबोधन पर्व' हा लेखिकेच्या पूर्व प्रकाशित विविध लेखांचा संग्रह. या ग्रंथ वाचनातून भेदातीत जीवन विकसित करण्याचा लेखिकेचा मनोदय तिच्या मनोगतात स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या दिंडीत सामील झालेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून झालेले हे लेखन होय. लेखिकेने ग्रंथरूपात ते संपादित करताना लेख प्रकाशनाच्या कालानुक्रमाने आपणापुढे ठेवले आहेत. ते इतिहास सापेक्ष ठेवले असते तर या ग्रंथाचे मोल अधिक वाढले असते. विचार विकासाच्या सुसंगतीच्या दृष्टीने ते आवश्यकच नाही तर अनिवार्यही होते. असे असले, तरी महाराष्ट्रातील समाज प्रबोधन पर्वाचा सम्यक विचार करणाऱ्यांना हा ग्रंथ संदर्भाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा असा झाला आहे यात शंका नाही.
 महाराष्ट्रातील समाजसुधारणांना संत साहित्याची व्यापक पार्श्वभूमी नि बैठक आहे. येथील वारकरी संप्रदायाने आपल्या भक्ती-आंदोलनाने संतांची विचार परंपरा आचरणाने वृद्धिंगत केली. यातून इथे उदयास आलेल्या वैचारिक उदारतेमुळे हमीद दलवाईसारखे समाजसुधारक, सत्यशोधक परंपरेविरुद्ध बंड करू शकले. या सर्वांमागील सामाजिक आशयाची उकल करणारा हा ग्रंथ प्राचीन ते अर्वाचीन प्रबोधनाचा साक्षेपी इतिहास होय. समाज, धर्म, साहित्य, संस्कृती, इतिहास, स्त्री शिक्षण इत्यादी अंगांनी लेखिकेने तो आपणापुढे उभा केला आहे. व्यक्ती व तिच्या कार्यातून केवळ जीवन चरित्रच रेखाटले जात नाही, तर बदलाच्या कालसापेक्ष नोंदीही त्यातून आपसूक येत असतात हे या ग्रंथाच्या वाचनात लक्षात येते. या ग्रंथाचे महत्त्व अशा अर्थाने आगळे आहे की हा प्रयत्न इतिहास लेखनाची केवळ द्विरुक्ती नाही. लेखिकेने समकालीन संदर्भात केलेली ती प्रबोधनाची चिकित्सादेखील आहे. त्या दृष्टीने 'प्रबोधन पर्व' महाराष्ट्राच्या

प्रशस्ती/१५

समाज सुधारणेचा समकालीन अभ्यास होय. त्यामुळे लेखसंग्रहापलीकडे त्याचे मोल आहे.
 प्रा. कुसुम कुलकर्णी या माझ्या शिक्षिका होत. शिक्षकाच्या ग्रंथास शिष्याने प्रास्ताविक लिहिण्याचे केलेले हे औद्धत्य नव्हे तर गुरू आज्ञेचे ते विनम्र पालन होय. या गुरू आज्ञेत 'शिष्यात् इच्छेत पराजय'ची उदारता आहे. महाराष्ट्र समाज सतत पुरोगामी राहिला याचे रहस्य व्यक्ती-व्यक्तींच्या अशा सततच्या नव आचरण शृंखलेत सामावलेले आपणास दिसून येईल. युरोपात सुरू झालेली प्रबोधन पर्वाची पहाट महाराष्ट्रात उदयास यायला आणखी तीनशे वर्षे लागली. पण इथे जेव्हा या प्रबोधनाचा विचार रुजला तेव्हा त्या विचारांनी येथील समाजमनात असे मूळ धरले की येत्या हजारो वर्षांत त्याचे उच्चाटन करणे केवळ अशक्य. एखादा विचार उशिरा की लवकर रुजतो हे महत्त्वाचे नाही; महत्त्व असते त्याच्या दृढीकरणाचे. 'प्रबोधन पर्व' या दृढीकरणाच्या प्रयत्नातील एक प्रभावी साधनग्रंथ म्हणून इतिहास त्याची नोंद घेईल अशी मला आशा आहे.

                                                                 ■■ 


दि. १८ एप्रिल, १९९९.

'अक्षय्य तृतीया'






प्रशस्ती/१६

बालकवितेची ही अंगत-पंगत,

आहे खरी सुंदर संगत !

बाल मित्र नि मैत्रिणींनो, 'गुड्डू' तुम्हाला भेटू इच्छितोय ! प्रतिभाताईंचा हा 'गुड्डू' खट्याळ, खोडकर आहे. तुमच्यासारखाच! अभ्यास नको, नुसतं खेळायला हवं त्याला ! प्रतिभाताईंनी लिहिलेल्या या कविता. खरं तर त्यांनी आपल्या नातवाच्या 'गुड्डू'च्या खोड्या पहात त्या लिहिल्यात. तुम्हाला पण त्या वाचायला आवडतील असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी त्या एकत्र केल्या. तुमच्यासाठी छापून त्याचं छान पुस्तक केलं. 'गुड्डू' हा खरं तर गोष्टींचा गठ्ठाच! फक्त प्रतिभाताईनी त्या सर्व गोष्टी कवितेतून सांगितल्यात. प्रतिभाताई शिक्षिका होत्या. मग आई झाल्या. आता त्या आजी आहेत. त्यांना 'गुड्डू'सारख्या तुम्हा नातवांशी बोलायला, त्यांना खेळावयला, हसवायला खूप खूप आवडतं बरं का! पण ते सर्व मात्र कवितेतून हं! 'गुड्डू'त चांगल्या पाच-पन्नास कविता आहेत. अगदी अलीकडे लिहिलेल्या. त्या अनेक वर्तमानपत्रात 'बालजगत मध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्या शिक्षिका होत्या म्हणून मी तुम्हाला वर सांगितलेच आहे. त्या शिकवून दमल्या. कंटाळल्या मात्र नाही हं! त्यांची ही कवितेची कवायत मग सुरू झाली.

प्रशस्ती/१७

 यात छान-छान कविता आहेत. त्या कवितात वाघोबा, ससोबा, बोकोबा, चांदोबा सगळे बाबा आहेत. शिवाय खारुताई, चिऊताई पण ! एवढेच काय ? पेपरवाला पण आहे. लपंडावाबरोबर क्रिकेटही आहे. मनीचा एकादशी दिवशीचा उंदराचा फराळ फर्मासच! पाहुण्यांच्या स्वागतातली छोटीशी फटफजिती ही सुंदर. खूप खूप आवडतील तुम्हाला या कविता. अशी आहे की कवितेची अंगत-पंगत सुंदर संगत!
 वाचा, हसा, खूष व्हा ! स्वतः वाचा. इतर मित्र-मैत्रिणींना वाचून दाखवा. वाढदिवसाला त्यांना हे पुस्तक भेट द्या. तुम्ही स्वतः पण कविता लिहा. तुम्हीही कवी होऊ शकता. मराठीत एका मोठ्या कवीचं नावच 'बालकवी' आहे. तुम्ही सर्व बालकवी व्हा ! असंच हा 'गुड्डू' तुम्हाला सांगेल. वाचाल तर वाचाल ! वाचा नि वाचा. भरपूर वाचा.
तुमचा,

सुनीलकाका
                                                                 ■■

दि. २६.१०.२००१







प्रशस्ती/१८


कोंडलेले निःश्वास सोडताना  'माझी आई' हा सौ. प्रतिभा साठम यांचा दुसरा कविता संग्रह. यापूर्वी त्यांनी 'गुड्डू' नावाचा एक बालकविता संग्रह हातावेगळा केला आहे. त्यांच्या या कविता प्रौढपणातील. त्यामुळे जीवन अनुभवांचे कडू-गोड सारे त्यात सामावले आहे. भारतीय रमीच्या जीवनात कडू स्मृतींच्या मालिकेस अंतच असत नाही. तसे या संग्रहातील कवितांचेही आहे. आईचं न सांगता निरोप घेणं हा त्यातलाच एक भाग. जीवनातली सारी नक्षत्रं कोरडी गेल्याचा विवाह या कवितेत आहे. कवयित्रीने जीवनभर जे पाहिले, देखिले त्यांचे शब्द झाले, अर्थ साकळला, जीवन आकळले, या सर्वांची झाली कविता.
 सौ. प्रतिभा साठ यांच्या कविता शब्दप्रभू नसल्या, तरी अनुभव समृद्ध खचितच आहे. त्यात जीवनाचं कठोर सत्य सामावलेलं आहे. जीवन विसंगतीवर प्रहार करण्याचं त्यात सामर्थ्य आहे. 'मतदान' सारखी कविता वाचली की हे लक्षात येते. त्यांना निसर्गाची चांगली जाण आहे. निसर्ग कविता अनुप्रास आपसूकच फेर धरतो. 'मामा' सारखी कविता वाचकांना भावविभोर करते, काळजाचा ठाव घेते. 'वैर' सारखी कविता खेड्यातला भारत हुबेहूब चित्रित करते. त्या कवितेतील लोकजीवनाचं चित्र विलक्षण प्रभावी वाटतं. काही कविता बोधप्रद आहेत. 'जगायचे

प्रशस्ती / १९

आहे तर' कविता या संदर्भात लक्षात येते. स्त्रीने कविता लिहिली नि तीत माहेर डोकावलं नाही असं कसं शक्य आहे? 'माझी आई' मधील कवितेत माहेर भावांचा एक अव्यक्त पिंगा सतत जाणवतो.
 सौ. प्रतिभा साठम आपल्या या कवितात जीवनाच्या सर्वांगांच चित्रण करतात. त्यांची कविता एका अर्थानं जीवन लक्ष्यी रचना आहे. 'आठवण', 'हास्य-क्लब' सारख्या कविता या पट्टीतल्या 'सोबत' पण याच वळणाची कविता. जीवनाच्या वृद्धावस्थेत वाट्याला येणाऱ्या अपेक्षेचं वर्णन करणारी त्यांची 'म्हातारी' तर घरी दारी सर्वत्र अनुभवायला मिळते. जीवनाचं मृगजळ सौ. साठम यांनी अनुभवलंय म्हणून समर्थपणे त्या ते प्रतिबिंबित करतात. अंधश्रद्धा, श्राद्ध, पत्रिका, पंचांग सारख्या गोष्टींचा कवयित्रीच्या मनावरचा पगडा तिची पारंपरिकता स्पष्ट करतो. वर्तमानाचं भान त्यांच्या कवितेस पुरत आहे हे 'कचेरी' या कवितेतून स्पष्ट होतं.
 सौ. प्रतिभा साठ यांचा 'माझी आई' कविता संग्रह म्हणजे त्यांचं जीवन संचित. त्यांनी भोगलं, अनुभवलं, पाहिलं, त्याची कविता झाली. त्यामुळे त्यांची कविता जीवनाचं छायाचित्र होऊन गेली. ते कृष्ण-धवल की बहुरंगी हे सांगणं कठीण. त्या कवितेत जीवनाचा कृष्ण पक्ष प्रबळ आहे नि तो स्वाभाविकही म्हणावा लागेल. त्या सतत लिहीत राहतील तर त्यांची अनुभव समृद्ध कविता कला समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. त्यांना, त्यांच्या धडपडीस हार्दिक शुभेच्छा. स्त्री संसाराच्या 'रांधा वाढा, उष्टी काढा' मधून मोकळा श्वास घेऊन शकते, मनातले दबले, कोंडलेले निःश्वास मोकळे करते, मनातलं प्रकट करते हे जीवन बदलाचं, स्त्री मुक्तीचंच लक्षण आहे. त्यांच्यासारखे पती इतरांना लाभतील, प्रोत्साहन देतील तर सर्व भगिनींचे भावकाव्य होईल. ते व्हावे ही अपेक्षा.

                                                                 ■■

दि. ३० ऑक्टोबर, २००१


प्रशस्ती/२०


चित्रपट सृष्टीतील झाकली माणके  'सिनेमाचा रंग वेगळा' हे चित्रपट सृष्टीतील संकलक म्हणून अनेक वर्षे कार्य केलेल्या श्री. माधवराव देशपांडे यांचे चंदेरी दुनियेतील कलंदरांच्या व्यक्तिचित्रांचे संकलन होय. ते त्यांनी आठवणींच्या अंगाने लिहिले आहे. त्यामुळे या पुस्तकास एक वेगळी रंगत आली आहे. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीची खरी राजधानी मुंबईच. या सृष्टीतील अनेक मातब्बरांचा राबता मुंबापुरीत असल्याने नशीब काढायला मुंबईत गेलेल्या माधव सरांना सृष्टीतील सामान्य व असामान्य दोहोंचा सहवास लाभला. या सहवासाच्या स्मृतिगंधाने माधवरावांना लिहिते केले.
 श्री. माधवराव देशपांडे तसे अल्पशिक्षित. पुस्तकातील 'स्वप्न माझे' मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे मुंबईत नशीब काढायला गेलेला हा तत्कालीन तरूण. हॉटेलच्या चहाची ऑर्डर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कचेरीत नेहमी घेऊन जाणारा चहावाला पोऱ्या. रोजच्या जाण्यायेण्यातून संवाद, भाषणे, शिबिरे यांतून त्याला अन्याय, अत्याचारांची जाणीव होते. आपल्या अशिक्षिततेचे त्याला भान येते. तो स्वप्रयत्नाने लिहायला, वाचायला शिकतो. आकडे लिहू लागल्यानंतर त्याला जुगाराचे आकडे घेणारा बेटिंग घ्यायची नोकरी देतो. पोलीस ठाण्याच्या प्रसादाने आपण करतो ती नोकरी गैर, अवैध असल्याचे लक्षात येताच तो आपला रहिवास, परिसर बदलतो.

प्रशस्ती / २१

योगायोगाने गंगाराम माथफोड सारख्या चित्रपट संकलकाची ओळख होते व जीवन स्वप्नासारखं बदलून जातं. पडेल ते काम करण्याच्या वृत्तीने माधव देशपांडे 'चहावाला पोऱ्या'चे 'चित्रपट संकलक' होतात. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, मास्टर विठ्ठल, बासू भट्टाचार्य, आशा भोसले, सुधीर फडके, जयवंत दळवी सारख्यांच्या सहवास, संपर्काने ते चित्रपट दिग्दर्शनाचे शिवधनुष्यही उचलतात. पण चित्रपट सृष्टी ही मायापुरी तशीच कुबेर नगरीही. हातावरचं पोट घेऊन जगणाऱ्या माधवरावांचं एक स्वप्न होतं. 'श्यामच्या आई नंतर असा चित्रपट काढायचा की त्यास 'ऑस्कर' मिळावं. या स्वप्नात भरारी असली तरी भाबडेपणाचाच भाग मोठा! बाळकृष्ण कुडाळकरांसारखे स्नेही प्रोत्साहन देत राहात. 'सकाळ' (कोल्हापूर) चे संपादक अनंत दीक्षित माधवरावांचा चित्रपट सृष्टीतील अनुभव जोखतात नि त्यांना लिहिते करतात. अशा वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे 'सिनेमांचा रंग वेगळा' होय. यात माधव देशपांडे मातब्बरांबरोबर सामान्यांनाही चित्रित करतात. पडद्यावर झळकणाऱ्यापेक्षा पडद्यामागे झाकोळलेल्या छोट्या तंत्रज्ञांविषयी ते आपुलकीने व भरभरून लिहितात. ही या पुस्तकाची मोठी जमेची बाजू होय. आजवर अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार इ. नी आपली कारकीर्द, आत्मचरित्र, आठवणी इ. अंगांनी लिहिली खरी पण चित्रपट सृष्टीचा त्यातून साकारणारा इतिहास एका अर्थाने पडद्यावरील व्यक्तींच्या कर्तृत्वाचाच आलेख बनून पुढे आला. चित्रपट निर्मिती ही सामूहिक प्रयत्न व कार्यांचं मूर्त रूप. तो बनवताना पडद्यावरील अभिनेत्यांना, भूमिका वठवणाऱ्यांनाच श्रेय द्यायचा आजवरचा प्रघात आहे. 'सिनेमाचा रंग वेगळा' मध्ये माधव देशपांडे यांनी ध्वनिमुद्रक, छायाचित्रकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, संकलक, दिग्दर्शक, संगीतकार इ. तंत्रज्ञांची विशेषतः त्यातील सामान्यांची असामान्य कामगिरी नोंदली आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीचा आजवर प्रकाशात न आलेला वेगळा रंग हे पुस्तक वाचकास दाखवते.
 'सिनेमाचा रंग वेगळा' मधील व्यक्तींच्या आठवणी, वैशिष्ट्ये, स्वभावचित्रे माधव देशपांडे यांनी तीन भागात चित्रित केली आहेत. 'पडद्यावर' 'पडद्यामागे' व 'उपेक्षित कलाकार' शीर्षक खंडांमध्ये लेखकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. पैकी 'पडद्यावर' भागात ४५ लेख संकलित आहेत. यातून चित्रपट सृष्टीतील मान्यवरांचे स्वभाव दर्शन, कार्यपद्धती, कर्तृत्व, योगदान इत्यादींचा स्मृतिपटल उभे राहते. माधव देशपांडे हे केवळ चित्रपट संकलक नव्हते तर चंदेरी दुनियेच्या संदर्भाचे ते

प्रशस्ती/२२

संग्राहकही होते हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवते. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, मृणाल सेन, सी. रामचंद्र, राजा ठाकूरसारखे या सृष्टीतील मान्यवर आपणास भेटतात. त्यांच्या आठवणी वाचताना माधव देशपांडे यांना चित्रपट सृष्टीचा इतिहास खडानखडा माहीत असल्याचं जाणवतं. चित्रपट तयार व्हायला प्रत्यक्ष किती रीळ फिल्म लागते, प्रत्यक्षात किती खर्च होते, त्यात वाया किती जाते, त्यामुळे परकीय चलनाचा अपव्यय किती होतो, हे सारं दिग्दर्शकाला संकलनाची तांत्रिक माहिती नसल्यानं कसं घडतं हे माधव देशपांडे विस्ताराने समजावतात, तेव्हा या लेखनामागील त्यांची तळमळ स्पष्ट होते. शासनाच्या कर परतीच्या योजनेचा बोजवारा धंदेवाईक निर्मात्यांनी कसा केला हेही नोंदवायला ते विसरत नाहीत. निर्माते, दिग्दर्शक अभिनेत्यांवर लाखो रुपये उधळतात पण तंत्रज्ञांना पैसे देताना मात्र ते हात आखडता घेतात हे अनेक लेखांतून स्पष्ट होतं. निर्माते, दिग्दर्शकांची ही असहिष्णुता तंत्रज्ञ व सहाय्यकांवर अन्याय करणारी जशी वाटते तशी ती चित्रपट निर्मिती 'समूह कार्य (टीम वर्क) असल्याने विस्मरण करणारी आहे या वर्मावर माधव देशपांडे बोट ठेवतात तेव्हा या लेखनाचं सामाजिक महत्त्व रेखांकित झाल्याशिवाय राहात नाही. माधव देशपांडे तंत्रज्ञांच्या संघटनेचे कार्यकर्तेही होते. संगठन कार्यातील त्यांचे अनुभव आजही बोधपट वाटतात.
 'पडद्यामागे' खंडात सहाय्यक दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक, नृत्य दिग्दर्शक, छायालेखक, संकलक, स्पॉट बॉय, रंगभूषाकारासारख्या छोट्या परंतु निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावणारे कलाकार आपणास भेटतात. ही मंडळी फक्त आपणास चित्रपटाच्या प्रारंभी असलेल्या श्रेयनामावलीत - तीही छोट्या अक्षरात, क्षणभर दिसली नाही तर नाही. चित्रपटाच्या मुहूर्ताच्या खेळास यांना बोलावण्याची उदारता फारच कमी निर्माते व दिग्दर्शक दाखवतात. अशांबद्दल माधव देशपांडे यांनी पहिल्यांदा लिहून चित्रपट इतिहास लेखनाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. बाळ मोहिते, डॉ. श्रीकांत नरूले, वाय. जी. भोसले, प्रकाश हिलगे, वसंत शेळके यांच्यासारख्या मंडळींची जीवनवृत्ते वाचताना व्यक्ती व कार्य म्हणून काही ते नगण्य वाटत नाही, पण चित्रपट व्यवसायाच्या पारंपरिक उतरंडीचे ते बळी ठरून उपेक्षित राहतात याचं वैषम्य नि विषाद वाटल्यावाचून राहात नाही.
 'उपेक्षित कलाकार' हा या पुस्तकाचा शेवटचा भाग म्हणजे चित्रपट, नाटक, नृत्य क्षेत्रात धडपडणाऱ्यांची संघर्ष गाथाच होय. ती हृदयाला

प्रशस्ती/२३
अधिक भिडते, ती कलाकारांची प्रतिकूल परिस्थितीतील प्रयत्नांची शर्थ पाहून. एक दीड पानात चितारलेली ही व्यक्तिचित्रे आकारांनी छोटी असली तरी मोठी आशयघन बनली आहेत.

 ‘सिनेमाचा रंग वेगळा' ग्रंथ निर्मितीस कला, क्रीडा, समाजकारणाची संवेदनशील जाण असणा-या अरुण नरके यांनी अर्थसहाय्याचे पाठबळ उभे केल्यानेच चित्रपट सृष्टीचा हा अनमोल ठेवा वाचकांपुढे येतो आहे. अशी कद्रदानी समाजात वाढेल तर अनेक झाकली माणकं प्रकाशात येतील व अनेक क्षेत्रातील झाकलेलं वास्तव वाचकांपर्यंत पोहोचेल. श्री. माधवराव देशपांडे यांचे हे लेखन त्यांच्या जीवनाच्या धडपडीस सुसंगतच होय. त्यांच्या धडपडीस शुभेच्छा! पुढेही त्यांच्या हातून असंच लिखाण व्हावं. अन्यथा इतिहासाचा एक अध्याय काळाच्या उदरात लोप पावेल. ती सांस्कृतिक हानी ठरेल. तसे होऊ नये म्हणून माधव देशपांडे यांनी हात थरथरत असले तर मन भरून लिहायला हवं.

दि. ९ ऑक्टोबर, २००३


वळणावरची वाट (कथासंग्रह)

शिवाजी पाटील

ओंकार प्रकाशन, कसबा वाळवे.

प्रकाशन - २00३

पृष्ठे - ८९ किंमत - रु. ४५/


ग्रामीण जीवनाच्या बोधक कथा


 श्री. शिवाजी पाटील हे योगायोगाने माझे विद्यार्थी. महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालं. तेथून ते हिंदी विषय घेऊन बी. ए. झाले. महाविद्यालयीन जीवनात ते नियमित शिकू इच्छिणारे, वाचणारे विद्यार्थी होते. नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये उपजतच आहेत. त्यांची वृत्ती समाजशील व समंजस आहे नि होतीही. म्हणून ते महाविद्यालयीन शिक्षण काळात आम्ही चालवत असलेल्या हिंदी साहित्य मंडळाचे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचं स्मरतं. त्या काळातील त्यांची उपक्रमशीलता अजून माझ्या लक्षात आहे. नंतर ते बी. एड्. झाले. शिक्षक झाले. त्यांच्या कार्य, कर्तृत्वाची सतत चढती कमान पाहताना त्यांचा शिक्षक असण्याचा आनंद मला नेहमी होत आला. पण एक दिवस चक्क ते आपला कथासंग्रह घेऊन आले नि माझ्या आनंदाची जागा अभिमानाने घेतली.

 माणसाचं लिहिणं त्याच्या अस्वस्थतेचं द्योतक असतं. अस्वस्थता त्याच्या संवेदनशीलतेची खूण असते. संवेदनशीलता सजग निरीक्षणाची निशाणी असते. माणूस शिळोप्याचा उद्योग म्हणून लेखन करतो असं मला वाटत नाही. श्री. शिवाजी पाटील शहरात शिकले तरी शिकवतात खेड्यात. खेड्यातच ते जन्मले, वाढले, गावाकडची माती जशी त्यांना माहीत आहे

तशी गावक-यांची नातीही. खेडं हे माणसाचं मोकळे मैदान असतं. राहणं, बोलणं सारं मोकळं! तिथं समाजजीवनाचे प्रश्न माणसाला जितक्या सहजपणे येऊन भिडतात, बिलगतात तितके शहरात नाही. शिवाजी पाटील त्यांच्यामध्ये सतत दडलेल्या शिक्षक कार्यकत्र्यानं आजूबाजूला जे घडतं त्याचं चौकस। भान ठेवलं. त्यामुळे त्यांना समाजाचे प्रश्न समजून भिडत गेले. त्यांना समजलेल्या प्रश्नांच्याच कथा झाल्या.

 ‘वळणावरची वाट' या कथासंग्रहात ‘संसार... संसार', 'वळणावरची वाट', 'बहुरूपी', ‘अतिलोभ', 'लग्नाचा वाढदिवस’, ‘आघात', 'देवदासी', ‘हरवलेले मंगळसूत्र', “जळीत', 'शेतकरी राजा' सारख्या कथा आहेत. कथा शीर्षकातूनच विषय वैविध्य लक्षात येतं. ब-याचशा कथा वर्णन शैलीने विकसित होत राहतात. जागोजागी कथाकारांनी संवादांची योग्य पेरणी केली आहे. कथा लिहिण्यामागे समाज समस्यांचे वर्णन करण्याची तळमळ दिसून येते. हे सारं करण्यामागे समस्या निराकरणाचा हेतू स्पष्ट दिसतो. त्या दृष्टीनं पाहिलं तर या सहेतुक कथा होत. साच्या कथांची पार्श्वभूमी ग्रामीणच. त्यामुळे कथांना नैसर्गिक सहजतेचं वरदान लाभलं आहे.

 ‘संसार... संसार' कथा ग्रामीण भागातील अष्टौप्रहर गरिबीची कथा

आहे. रामभाऊ गरिबीमुळे रोगग्रस्त पत्नी लक्ष्मीस जमिनीचा तुकडा विकला तरी वाचवू शकत नाही. पदरात दोन मुलं घेऊन विधुर बापाला जगण्याची वेळ येते तेव्हा आकाश असं फाटतं की टाका कुठं नि कसा घालावा हे। कळेनासं होऊन जातं! ‘बहुरूपी'स कथा म्हणण्यापेक्षा आपल्या सहयोगीसहका-यांचे बहुरूपी व्यक्तिचित्रण शोभावं! या व्यक्तीचित्रात्मक कथेत लेखकातील आस्वादक निरीक्षक ध्यानी आल्यावाचून राहात नाही. ‘वळणावरची गोष्ट' ही पारंपरिक प्रेमकथा. प्रेम जुळत आलं असताना गुंगारा देऊन लग्न केलेल्या प्रेयसीच्या हुरहुरीनं रंगलेली ही गुलाबी कथा. तीत तारुण्यसुलभ भाबडेपणाचं लेखकानं सुंदर वर्णन केलं आहे. प्रत्येकाच्या आकाशी मावळणारा सूर्य असतो' असं जीवनसूत्र सांगणारी ही कथा ‘अतिलोभ' ही ‘अति तेथे माती' सूत्र समजावणारी. हरामाने आलेल्या पैशाचा माज माणसाला मस्तवाल करतो पण जीवनात पायाखालची वाळू सरकवणारे घर कोसळण्यासारखे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा माणसाचे पाय जमिनीवर आपसूक येतात हे या कथेत लेखकाने परिणामकारकरित्या चित्रित केले आहेत. सुमन नि रवीन्द्राच्या पुनर्मीलनाची ही सुखान्त कथा लेखकाच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा परिचय देते.

 ‘लग्नाचा वाढदिवस' कथा संसाराच्या रहाटगाडग्याचं मार्मिक चित्र रंगवते. जीवनाचा उत्तररंग म्हणजे राहून गेलेल्या गोष्टीच्या परिपूर्तीचा दुसरा वसंतच. ‘आघात' मध्ये माधवी व संदीप या प्रेमी युगुलाची दर्दभरी दास्तान भेटते. फसगतीचे प्रायश्चित्त नेहमीच स्त्रीलाच घ्यावं लागतं हे। समजावणारी कथा स्त्री वेदना नि आघातांची रामकहाणी होय. 'देवदासी' ही समस्याकेंद्रित कथा. बोधप्रद व उद्देशप्रधान रूप ल्यालेल्या या कथेतील नायक देवदासीशी लग्न करून नवा मार्ग रूढ करू पाहतो तेव्हा ही कथा आदर्शवादी असल्याचं स्पष्ट होतं. हेतुपूर्वक लेखन झालेल्या या कथेत प्रेरक तत्त्वं भरलेली आढळतात. 'हरवलेलं मंगळसूत्र' वा अन्य कथा याच अंगानं जाणाच्या रूढ कथा होत.

{{gap}]‘वळणावरची वाट' कथासंग्रह विषयांची वळणं घेत कलेच्या अंगांनी म्हणाल तर सरधोपट मार्गाने लिहिलेला आढळतो. शिवाजी पाटील नवोदित कथाकार आहेत. उत्साहाच्या पहिल्या भरात बहरलेल्या या कथात कलात्मकता यायची तर लेखकांनी भरपूर वाचायला हवं. कथा हा साहित्य प्रकार रियाज म्हणून हाताळायला सोपा असला, तरी कलात्मकता रुजायला अत्यंत अवघड. याचं भान हा कथासंग्रह त्यांना भविष्यात देईल.

{{gap}]मी त्यांच्या धडपडीस शुभेच्छा देतो! त्यांच्या हातून भविष्यकाळात अधिक सरस कथांची अपेक्षा करतो.

▄ ▄


दि. ५ जुलै, २00३.

कोंडलेले हुंदके (सत्यकथा संग्रह)

श्रद्धा कळंबटे

स्पर्श प्रकाशन, पुणे

प्रकाशन - मार्च, २00४

पृष्ठे - १०३ किंमत - १00/



दाटून येते तेव्हा...


 ‘कोंडलेले हुंदके, सौ. श्रद्धा कळंबटे यांनी रत्नागिरी टाइम्स'मध्ये २००२-२००३ च्या सुमारास चालविलेल्या स्तंभलेखनाचं पुस्तकरूप होय. यात त्यांनी रत्नागिरी, कोल्हापूरसारख्या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात कार्य करणाच्या निरीक्षणगृह (रिमांड होम), कारागृह, बालगृह, महिलाश्रम, अनाथाश्रमांसारख्या बंदिस्त संस्थांतील लाभार्थीच्या कथा सांगितल्या आहेत. बंदिस्त संस्थांत दाखल होणा-या मुले, मुली, महिला, माणसांना हुंदके दाबून जगावं लागत असतं. संस्थांची स्वतःची एक बंदिस्त चौकट असते. तिथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी नि लाभार्थी यांच्यात अनेकदा छत्तीसचा आकडा असतो. जे संबंध असतात ते बहुधा लाभार्थी व कर्मचारी असेच. संस्थांशी समाज संपर्क कमी असतो. जो असतो तो औपचारिक, प्रासंगिक असाच. अशावेळी आपलं कुणीतरी असावं, मनातलं कुणाला तरी सांगावं असं त्या निराधार, आपद्ग्रस्त लाभार्थीना सतत वाटत । असतं. ‘दुधाची तहान ताकावर' या न्यायाने नाही म्हणायला ते आपल्या सहनिवासी सुहृदांशी आपसात बोलत राहतात. हा संवाद दोन समदु:खितांचं देणं-घेणं असतं, वाटून घेणंच असतं. अशा ‘त्या’ आपलं कुणीतरी ऐकावं, आपलं जिवाभावाचं कुणीतरी असावं असं वाटत असतानाच्या अवस्थेत सौ. श्रद्धा कळंबटे बंदिस्त तटबंदी ओलांडून लाभार्थीपर्यंत जाऊन पोहोचतात

ही त्यांच्या संवेदनशीलतेचीच पावती असते. एकविसावं शतक हे आत्मकेंद्री शतक! अशा काळात त्यांचं अनाथाश्रम, रिमांड होम, तुरुंगासारख्या तटबंद संस्थांत डोकावणं 'कोंडलेल्या हुंदक्यांना वाट करून देणं ठरतं. हे हुंदके ऐकायला, समजायला मात्र पाझरणाऱ्या हृदयाची गरज आहे खरी. वाचक ते सजगतेनं पचवतील अशी आशा आहे.

 मराठी साहित्यात कोंडलेले हंदके' ऐकू येण्याची, ऐकवण्याची परंपरा जुनी आहे. ‘उपेक्षितांचे अंतरंग' लिहून प्रा. श्री. म. माटे यांनी गावकुसाबाहेरचं जग दाखवलं. पुढे दलित साहित्याचा एक वेगळा प्रवाह महाराष्ट्रात निर्माण झाला. त्यात डॉ. शरणकुमार लिंबाळेचं ‘अक्करमाशी', 'डॉ. किशोर शांताबाई काळे यांचं ‘कोल्हाट्याचं पोर' या कृतींनी अनौरस संततीच्या वेदना जागवल्या. अलीकडच्या काळात अरुण खोरे यांनी ‘पोरके दिवस' लिहून संस्थातील लाभार्थीच्या पोरकेपणावर बोट ठेवलं. हे पुस्तक डॉ. दामोदर खडसे यांनी ‘भूले बिसरे दिन' या नावाने हिंदीत अनुवादितही केलं आहे. सौ. इंदुमती जोंधळे यांनी आपल्या ‘बिनपटाची चौकट' द्वारे निराधार मुलांची व वाताहत झालेल्या कुटुंबाची कथा शब्दबद्ध केली आहे. त्यांच्या आत्मकथेचा अनुवाद डॉ. शशिप्रभा जैन यांनी केला असून तो प्रकाशनच्या प्रतीक्षेत आहे. या दोन्ही आत्मकथा शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तके म्हणून अभ्यासल्या गेल्या. त्यांना अनेक पुरस्कार लाभले. या पुरस्कारांनी त्यांच्या हुंदक्यांचे मोती झाले. अलीकडेच या ओळी लिहिणाऱ्यानेही ‘खाली जमीन वर आकाश' लिहून ही परंपरा वर्धिष्णू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा समावेश लेखिकेने यातील एक हुंदक्याच्या रुपात केलाही आहे. १९९२-९३ च्या सुमारास दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र (नाशिक) आवृत्तीतून प्रदीप निफाडकरांनी ‘आभाळ पेलताना सदर चालवून संस्थातील अनाथ, निराधार व्यक्तींचं जिणं शब्दबद्ध केलं होतं. अशा पार्श्वभूमीवर मराठी समाज, वाचक अनाथ, निराधारांच्या जीवनाविषयी सजग होत असतानाच्या काळात लेखिकेनं लिहिलेलं सदर कोंडलेले हुंदके वंचित विश्वाच्या प्रकाश वाटेवरील एक असा दीप म्हणून पुढे येतं की, ज्यामुळे समाजमन भावसाक्षर होईल. बिकट वाट सुलभ करण्याच्या उद्देशाने केलेल्या या लेखनाचं असाधारण असं सामाजिक मूल्य आहे.

 ‘कोंडलेले हुंदके अनाथांच्या सत्यकथा आहेत. लेखिकेने लाभार्थीना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्याशी हितगुज करून केलेलं लेखन आहे. हे कष्टप्रद कार्य त्यांनी अनाथांची दया करण्याकरता केलेलं

नाही. या लेखनात सत्य कथनाद्वारे समाजास कृतिशील करण्याचा प्रयत्न आहे. कोंडलेले हुंदके' जे वाचतील त्यांना आपला हुंदका हलका वाटावा अशा असह्य सत्यकथा यात आहेत. त्यात दुःख आहे, भोग आहे, वेदना आहे तशी उभारी पण. यात अनेकांच्या यशोगाथाही आहेत. त्या समाजातील निराशितांना प्रेरणा देतील. संस्थेतील लाभार्थीना या कथा भविष्यात मार्गदर्शक ठरतील. हे हुंदके हरवलेल्या मानव अधिकारांचे शर्थीच्या प्रयत्नांनी केलेलं पुनःग्रहण होय. यात नियतीचा खेळ जसा आहे तशा झुंझारकथाही. जगायला जात हवीच?' असा सवाल करणारी यातील कथा जात, धर्म अशी काहीच नोंद नसलेल्या अनाथ मुलांच्या वेदनाही वेशीवर टांगते. ‘संध्याछायेतील एकाकी नातेसंबंधांच्या गुंत्यातून निर्माण झालेले गुंते घेऊन येणारे हंदके मनुष्य संबंधांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात. जीवनाची वाताहत करणारा ‘नरपशू' पण तुम्हास या हुंदक्यांच्या आड लपलेला दिसेल.

 किरण बेदींच्या 'व्हॉट वेंट राँग?' प्रमाणे यातील काही चरित्रं जेव्हा ‘माझं काय चुकलं?' अशी विचारणा करतात तेव्हा समाजमन हतबल होतं. एका अर्थाने हे मौन, ही हतबलता समाजाच्या अपराधीपणाची सूचक स्वीकृतीच असते. अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था केवळ छप्पर देणाच्या धर्मशाळा नसून वाट चुकलेल्यांना संस्कार, शिक्षण देऊन नवी। वाट, नवी दिशा देणाच्या त्या प्रयोगशाळाही असतात हे वाचून या पुस्तकाचे रचनात्मक मूल्य लक्षात येते. मराठी सारस्वतात अलीकडच्या काळात काही कार्यकर्त्यांची आत्मकथनं प्रकाशित झाली आहेत. अनुताई वाघांचं ‘दाभोणच्या जंगलातून', सिंधुताई सपकाळांचं ‘मी वनवासी', कुमुदताई रेग्यांचं 'वेगळ्या वाटेने जाताना', नसीमा हरजुकांचं ‘चाकाची खुर्ची' माझ ‘खाली जमीन वर आकाश', अविनाश टिळकांचं ‘आधारवड', सुमती संत यांचं ‘त्यांच्या कपाळी कलंक गोंदवू नका', 'समाजसेवा त्रैमासिक, पुणेचा ‘अनुभव कथन विशेषांक' (जाने-मार्च ९३) हे सारं साहित्य मराठी वंचितांच्या साहित्याचा एक नवा प्रवाह आणत आहे. या साहित्याची गती धीमी आहे. दलित साहित्यातला आक्रोश व आक्रस्ताळेपणा । त्यात नाही. जाती, धर्मापलीकडे वेदनेची अस्सल नाळ घेऊन येणारं हे। साहित्य समाजाच्या काळ्या रक्तांची कृष्णविवरं (ब्लॅक होल्स) होतं. अनाथ, निराधारांच्या जीवनातील पोकळी समाज निर्माण करत असतो. ती भरून काढण्याची जबाबदारी पण समाजाचीच असल्याचे रेखांकित करणारे हे ‘कोंडलेले हुंदके'. साहित्य सौंदर्य, शैली भाषेच्या अंगांनी बाळबोध

असले तरी त्यातल्या व्यथा, वेदनांचे अस्सलपण शहाण्णव कुळी व्यवस्थेची उतरंड रचणाच्या व साडेतीन टक्क्यांच्या संस्कृतीवर प्रहार करणा-या। पूर्वसुरीच्या साहित्य प्रकारांपेक्षा वेगळा ‘सा' लावणारे आहे हे मात्र नक्की.

 वेगळ्या वाटेनं दाटून आल्यावर केलेलं हे लेखन पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धीच्या पलीकडे केवळ मनुष्यधर्माची कास रुजवतं, माणुसकीची कूस उबवणारं हे लेखन म्हणून अक्षर, अक्षय लेखन ठरेल असा मला विश्वास वाटतो. लेखिकेच्या संवेदनशीलतेस सविनय सलाम!

▄ ▄

आमचा काय गुन्हा? (लेखसंग्रह)

रेणू गावस्कर

मनोविकास प्रकाशन, पुणे

प्रकाशन - मार्च, २00५

पृष्ठे - २०४ किंमत - १५0/



एक उद्ध्वस्त जग अनुभवताना


{{gap}]‘आमचा काय गुन्हा?' हे रेणू गावस्कर यांचे पुस्तक एकदा हाती घेतले की सोडवत नाही. मला तर या पुस्तकातील प्रत्येक मुलाच्या जीवनात माझेच प्रतिबिंब दिसले. 'डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल' नावाची एक संस्था मुंबईच्या माटुंगा उपनगरात आहे. तिथे बालगुन्हेगार, घर सोडून पळून आलेली, कुटुंब विभक्त झाल्याने निराधार झालेली, अनाथ, भटकी, उन्मार्गी, रेल्वे स्टेशनवर राहणारी, रस्त्यावर भटकणारी अशी शेकडो मुले सांभाळली जातात. मुंबईचे पोलीस प्रामुख्याने या मुलांना संस्थेत आणतात (पकडून!). साध्या भारतातील अशी मुंबईत येणारी मुलं या संस्थेत असतात. बांगला देश, नेपाळचीही मुलं तुम्हास इथं भेटतील.

 मुलं विभिन्न भाषी असतात. कधी छोटी, अशिक्षितही. ब-याच मुला-मुलींना आपण कोण? कुठले? नाव, पत्ता, आई-वडील काहीच सांगता येत नाही. बरीच मुलं-मुली मायानगरी मुंबईचं वर्णन वाचून आलेली. कुणी नट-नटी पाहायला, कुणी नशीब काढायला, तर कुणी पोट भरायला. सान्याच्या मुळाशी जगण्याचा जीवघेणा संघर्ष व आयुष्याचं उद्ध्वस्तपण असतं. डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल तर पूर्वी ‘बच्चों का जेल' म्हणूनच ओळखलं जायचं. कालपरत्वे संस्थेत बदलाचे वारे वाहिले तरी बाहेरचं जग नि ही संस्था यात आजही पन्नास वर्षांचे अंतर सहज असावं हे संस्थेत

पाय ठेवताच जाणवतं.

 ब्रिटिशांनी भारतात ज्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यात सामाजिक कायदे व त्यांची अंमलबजावणी करणारी संस्थात्मक रचना, यंत्रणा इ. चा समावेश करावा लागेल. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथल्या बालकल्याणाचा पाया ब्रिटिशांनी घातला हे एक निर्विवाद सत्य, उन्मार्गी मुलांना चांगले वळण लावून त्यांना जगण्याचं साधन, शिक्षण देऊन स्वावलंबी करायचं म्हणून सन १८५७ साली ‘डेव्हिड रिफॉमेंटरी स्कूल, माटुंगा' ची। स्थापना केली. महात्मा फुले, पंडिता रमाबाई, प्रार्थना समाज, महर्षी धोंडो केशव कर्वे प्रभृती व्यक्ती व संस्थांच्या कार्यामागे ब्रिटिशांच्या कार्याची प्रेरणा होती. डेव्हिड ससून रिफॉमेंटरीमध्ये मुलं अल्प काळासाठीच राहात. संस्थेतून बाहेर पडणाच्या मुलांचे पुनर्वसन व्हावं असं कर्नल लॉइडसारख्या संवेदनशील ब्रिटिश अधिका-याला वाटलं. त्यानं माटुंगा उपनगरातील तत्कालीन बी. आय. टी. ब्लॉक्समध्ये सन १९१६ मध्ये ‘शेफर्ड आफ्टर केअर असोसिएशन'ची स्थापना करून उन्मार्गी बालकांच्या पुनर्वसनास प्रारंभ केला. पुढे सन १९२४ ला इंग्लंडच्या धर्तीवर आपणाकडेही मुलांचा कायदा' (चिल्ड्रन अॅक्ट) लागू झाला. पण तो कागदावरच राहिला. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी ब्रिटिश समाज कार्यकर्ती मिस एम्. के. डेविस यांना मोठं अग्निदिव्य पार करावं लागलं. ती एक स्वतंत्र कथा आहे. त्यातून ‘चिल्ड्रन एड सोसायटी' नावाची बालकल्याण संस्था अस्तित्वात आली. मुलांच्या कायद्याच्या कार्यक्षम अंमलबजावणीच्या उद्देशाने ‘डेव्हिड रिफॉमेंटरी स्कूल'चं रूपांतर ‘डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल' करून तिला रिमांड होमचा दर्जा देण्यात आला. ते राज्यातलं पहिलं रिमांड होम. आजही ते राज्यातलं सर्वांत मोठं निरीक्षणगृह म्हणून कार्यरत आहे. हे इतकं मोठं आहे की महाराष्ट्र राज्यातल्या सर्व रिमांड होम्समध्ये जितकी मुले असतात तितकी एकट्या या संस्थेत असतात.

 रेणू गावस्कर मुंबईच्या साने गुरुजी विद्यालयात शिकल्या. शाळेनं त्यांना संस्कार व संवेदना दिली. माटुंगा रेल्वे स्टेशनच्या कडेलाच डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल आहे. मध्ये फक्त काय तो रस्ता. लोकलनी जाताना गाडी धिमी झाली की ससूनमधली ही सर्व सोसणारी मुलं गजाआडून हातवारे करत ‘आप तो आ जाव' म्हणून जाणाच्या येणा-याला बोलवत असतात. मुंबईच्या गती व गर्दीत फारच कमी लोकांना मुलांची ही गजाआडची गाज ऐकू आली. त्यापैकी रेणू गावस्कर या एक होत. सुमारे वीस वर्षांपूर्वी रोज खुणावणाच्या या मुलांनी एक दिवस रेणू गावस्कर यांना

इतकं बेचैन केलं की त्या संस्थेचा तो तुरुंगी दिंडी दरवाजा किलकिला करून प्रवेश करत्या झाल्या नि त्यांच्यापुढे उभं राहिलं ते बालपण हरवलेल्यांचं एक उद्ध्वस्त जग!

असं नसतं की, अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रम, वृद्धाश्रम, बंदिस्त संस्थांतील मुलं, मुली, महिलांतच उद्ध्वस्तपण, रितेपण असतं. भरल्या घरातही मी अनेक माणसं उद्ध्वस्तपण अनुभवत जगत असताना पाहिलीत. रेणू गावस्करांच्या जाणिवांनी त्यांना या संस्थेकडे ओढलं. मग रोजच्या जाण्यायेण्यातून त्यांना समजलं की ही मुलं प्रेमाची भुकेली आहेत. त्यांना आपणाशी कुणीतरी प्रेमानं वागावं असं वाटतं. त्यांना आपुलकीची मोठी भूक. तिकडे संस्थेतील अधिकारी कर्मचा-यांच्या लेखी ही मुलं म्हणजे बनेल, बनचुके, चोर, बदमाश! ‘लातों के भूत, बातों से नहीं मानते!' असा त्यांचा पक्का समज. सारा दिनक्रम म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट. ज्या वयात खेळायचं, बागडायचं त्या वयात चोवीस तास गजाआड जेरबंद! नाही म्हणायला खेळापुरता रिकामा श्वास! हे सारं पाहून रेणू गावस्कर हादरतात... हे जीवन त्यांच्या कल्पनेपलीकडचं असतं. सारंच हरवलं, गमावलेल्या या अश्राप मुलांसाठी काही करावं असं त्यांना वाटलं. त्या नियमित तास-दोन तास डेव्हिड ससूनमध्ये जाऊ लागतात. मुलांना गोष्टी सांग, नाटक बसव, बोलतं कर, प्रेमाची पाखर घाल. त्या मुलांशी मोकळेपणानं जिवाभावाचं बोलत राहतात. अनेक निमित्ताने उंचउंच भिंतीमुळे समाजापासून तुटलेल्या बेटाप्रमाणे राहणा-या या संस्थेत समाजातील समाजसेवक, स्वयंसेवक, अभिनेते, उद्योगपती, देणगीदार, धनिक, संवेदनशील तरुण-तरुणींना संस्थेत नेत संस्थेचा बंदिस्तपणा संवेदनक्षम सातत्याने मोडीत काढतात. या साच्या धडपडीत एक-एक दिवस मागे पडत कधी गेले ते कळलेच नाही. त्या दिवसांच्या धडपडीची कहाणी आहे ‘आमचा काय गुन्हा?'

 रेणू गावस्कर ह्या व्यासंगी वाचक आहेत. देशी-परदेशी साहित्याची त्यांना चांगली जाण आहे. त्यांनी जॉर्ज ऑर्वेलचा ‘एरिक ब्लेअर', चार्ल्स डिकन्सचा ‘डेव्हिड कॉपरफिल्ड', ख्रिश्चन अँडरसन्सचा ‘द मॅच ग्रिल' मधील हॅन्स, मार्क ट्रेनच्या 'द प्रिन्स अँड द पॉपर' मधील टॉम पॉपर व राजपुत्र एडवर्ड वाचला आहे. साने गुरुजी, अनंत काणेकर, आशापूर्णा देवी यांचं बालसाहित्य त्या जाणतात. त्यांच्या मुलांविषयीच्या या करुणाष्टकांचं रहस्य या साहित्यात सामावलेलं आहे. 'आमचा काय गुन्हा?' समजून घ्यायचे तर मराठीत वंचित साहित्याची मोठी परंपरा डोळ्याखालून घालावी

लागेल. प्रा. श्री. म. माटेंचे ‘उपेक्षितांचे अंतरंग', शरणकुमार लिंबाळेचे ‘अक्करमाशी', 'कोल्हाट्याचा पोर' (डॉ. किशोरी शांताबाई काळे), ‘बिनपटाची चौकट' (इंदुमती जोंधळे), ‘पोरके दिवस' (अरुण खोरे), ‘खाली जमीन वर आकाश' (डॉ. सुनीलकुमार लवटे), ‘आभाळ पेलताना (प्रदीप निफाडकर), 'कोंडलेले हुंदके' (श्रद्धा कळंबटे), ‘नावडती मुले (शं. वि. जोशीराव), 'अनुभव' (विजयाताई लवाटे), चाकाची खुर्ची' (नसीमा हुरजूक), ‘वेगळ्या वाटेने जाताना' (कुमुदताई रेगे), ‘मी वनवासी (सिंधुताई सपकाळ), ‘दाभोणच्या जंगलातून' (अनुताई वाघ), ‘आधारवड (अविनाश टिळक), ‘त्यांच्या कपाळी कलंक नोंदवू नका' (सुमती संत), ‘फिटे अंधाराचे जाळे' (भालचंद्र करमरकर), समाजसेवा त्रैमासिक (अनुभवकथन विशेषांक - जानेवारी-मार्च १९९३) अशी काही सहज सुचलेली नावे या यादीत घालता येणे यामुळे शक्य झाले की ही सारी पुस्तके, सदरे, स्तंभ, नियतकालिकांचे अंक रेणू गावस्करांच्या प्रमाणे असाधारण संवेदनांनी ओथंबलेले आहेत. एकदा का तुम्ही ते वाचाल तर ते आजन्म तुमची सोबत तर करतीलच शिवाय प्रत्येक वाचकाच्या मनात आपलं मणभर वाटणारं दुःख या साहित्यापुढे कणभरही नाही याची जाणीव निर्माण करेल. माझ्या दृष्टीने ‘डेव्हिड ससूनचे दिवस' चे ते मोठे सामाजिक योगदान ठरेल.

 आई, वडील, घर हरवलं तर परत भेटू शकतं पण बालपणच हरवलं तर त्याची भरपाई मात्र अशक्य असते. बालपण हरवणं म्हणजे अश्रूचं वरदान गमावणं. असं झालं की ‘गोष्टींपेक्षा’ ‘गॉसिप' लोभस वाटू लागतं. शिकण्यापेक्षा मिळवण्यात मजा वाटू लागते. मागून मिळत नाही तर मग चोरी पण बेहत्तर! 'पैसा फेको, तमाशा देखो' ही वाक्यं जीवनाचं तत्त्वज्ञान होऊन जातं. जगात आपणास कुणी ‘बिच्चारा' म्हणावं याची किळस नि लाज वाटू लागते. दुसरीकडे ‘जिंदगी में कोई बेचारा नहीं होता' असं निढवलेलं मन बजावू लागतं. हे निढवलेलं मन बालपण नाकारणाच्या समाजानं संस्थेतील मुलांना दिलेली देणगी असते. साच्या जगाचा खून करावा अशी प्रतिशोधाची जागणारी बालमनातील भावना जीवनच नाकारणाच्या समाजाविरुद्धचा मुग्धावस्थेतील एक स्वैर जिहादच असतो. गटर-नालीमध्ये वळवळणाच्या अळ्या-किड्यांत अनौरस म्हणून भिरकावणाच्या तमाम दुष्यन्त, शकुंतला, विश्वामित्रांबद्दल मुलांच्या मनातील आक्रोशास गैर कोण म्हणेल? ‘एक बार बदनाम तो जिन्दगीभर बदनाम अशी खूणगाठ बांधलेली मुलं-मुली आत्महत्येचा विचार आत्मविश्वासाने

पचवतात कारण या संस्थात्मक रौरवातही त्यांना रेणूसारखी ओअॅसिस गवसतात. आईच्या शोधासच कुलूप लावू मागणारी मुलं-मुली आपलं घर निर्माण करून समाजाचा विधायक प्रतिशोध घेतात. 'डेव्हिड ससूनचे दिवस' मध्ये तुम्हास भेटणारे विजय, महेंद्र, सत्य, सुनील, नारायण, मुन्ना, अर्जुन, नूर, दिनेश, पुंडलीक, भैरव महाराष्ट्रातील प्रतिवर्षी रिमांड होममध्ये शेकडोंच्या संख्येने दाखल होणाच्या मुला-मुलींचे प्रतिनिधी आहेत. इथं फक्त मुलांच्याच कथा लिहिल्या गेल्यात. सन १९८० ते २000 या कालखंडात मी महाराष्ट्रभरच्या अशा संस्थांतील मुली-महिलांचं जे जिणं पाहिलं, अनुभवलं आहे ते खचितच या मुलांचं जीवन फिकं, सुसह्य वाटावं असं भयंकर होतं.

 स्वातंत्र्याच्या सत्तावन्न वर्षांच्या प्रवासात महाराष्ट्र शासनास एकाही सरकारी रिमांड होमची इमारत बांधता आली नाही. यावरून हे कल्याणकारी राज्य ‘ही तर श्रींची इच्छा' म्हणूनच चालतं याची प्रचिती येते. ज्यांना मतं नसतात त्यांना राजकारणात महत्त्व असत नाही. अनाथ, निराधारांना अजून संस्थांत नावांऐवजी नंबर' असतात. संस्थेच्या लेखी ती एक ‘फाईल असते. पोलीस ठाण्याच्या लेखी ती 'वर्दी' असते तर समाजविज्ञान संस्थांना ती एक 'केस स्टडी' असते. महाराष्ट्र हे छत्रपती शाहू, म. फुले, डॉ. आंबेडकरांचं पुरोगामी राज्य असल्याने संस्थेतील मुलांना अजून नाव, गाव, शिक्षण, नोकरी सर्वांपासून वंचित राहावं लागतं. त्यांना आरक्षण, प्राधान्य द्यावं असं आपणास एकविसाव्या शतकात येऊनही वाटत नाही यासारखा या समाजाचा, शासनाचा नाकर्तेपणा तो दुसरा कोणता? असा प्रश्न ‘आमचा काय गुन्हा?' वाचताना माझ्या मनात निर्माण झाला. तो तुमच्याही मनात निर्माण झाला तर ते या पुस्तकाचं यश समजावं.

 रेणू गावस्कर यांनी डेव्हिड ससूनमध्ये केलेले प्रयोग मी प्रासंगिकपणे संस्थेत न जाता सर्ववेळ काम करून केले आहेत. त्यामुळे रेणू गावस्कर यांना डेव्हिड ससूनची तटबंदी किलकिली करताना काय यातायात सहन करावी लागली आहे याची कल्पना आहे. हे कार्य प्रासंगिक पाझरांचं नाही. संस्थांतील मुलांसाठी करायचं तर तुमचा मातृत्वाचा झरा अखंड झरत राहायला हवा. हे काम मोठ्या धीराचं, धैर्याचं नि संयमाचं! रेणू गावस्कर काही अनाथ नव्हत्या की उन्मार्गी. त्यांना या मुलांसाठी इतकं भरभरून करावंसं वाटावं याचं सारं श्रेय त्यांनी जपलेल्या माणुसकीच्या गहिवरासच द्यावं लागेल.

लेखिकेने ज्या आत्मीयतेने हे सारं लिहिलं त्याला आपणा सर्वांतर्फे ‘बालसलाम!

◼◼

दि. १९ फेब्रुवारी, २00५
शिव जयंती

वास्तव (व्यक्तिचित्र संग्रह)

प्राचार्य अरविंद सातवेकर

नलिनी प्रकाशन, कोल्हापूर

प्रकाशन - नोव्हेंबर २00५

पृष्ठे - १0८ किंमत - १00/



उतराईचा असा जागर उरी - जिव्हारीही!


 माणसाची घडण आजूबाजूच्या व्यक्ती आणि परिस्थितीने होत असते. आवती भोवती माणसं आपणास संस्कार, समज, संवेदन देतात. ती कधी जगण्याची उभारी देतात तर कधी संवेदना देतात. तर कधी निराशेच्या क्षणी हात, बोट धरून उभीही करतात. त्यांच्या प्रेरणा प्रोत्साहनाने मनुष्य अधिक उमेदीने काम करतो. ही माणसं शिक्षित असतात, तशी काही अशिक्षितही. शिक्षित माणसांची प्रभावळ आपणास बौद्धिकतेचे वरदान देते, तर अशिक्षित माणसे भाव भावनांनी कृतिशील आचार धर्मांनी पोसतात. त्यांचे सोसणं हे आपल्या जगण्याचं बळ बनतं! शिक्षित माणसं दिशा देतात. नवं क्षितिज दाखविणारी माणसं सतत आपणास भगीरथ बनवत राहतात. अशा सा-यांमुळे प्रतिकूल परिस्थितीत लढत झगडत मोठी होणारी माणसं आपल्या मनांत हात देणाच्या माणसाबद्दल एक कृती कुंभ उरी जिव्हारी जागवतात, साठवतात त्यातून एक 'वास्तव' तयार होतं. ते वास्तवपेक्षा प्रखर असते. म्हणून या 'वास्तव' मधील माणसं केवळ एका व्यक्तीच्या घडणीचे साक्षीदार न। राहता साच्या समाजासाठी ते दीपस्तंभ बनतात. हे वास्तव' मधील व्यक्तीचित्रे वाचत असताना प्रकर्षाने जाणवतं!

 प्राचार्य अरविंद सातवेकर प्रतिकूल परिस्थितीतून मोठे झालेले गृहस्थ त्यांच्या जिद्दीने जगण्याची कथा ‘घडण' या आत्मकथेमुळे मराठी वाचकांना

परिचित झालेली आहे. माझी ‘घडण' हा केवळ माझा पुरुषार्थ नाही, या साच्या घडणीत माझे आप्त, आत्मीय आद्यप्रेरक, समाजाचे आजीव सेवक, या सर्वांचा वाटा आहे, अशी कृतज्ञ भावना उरात घेऊन जगणाच्या 'वास्तव'च्या लेखकास आपल्या सभोवारची माणसं ऋणभार वाटतात. उतराईच्या भावनेतून लिहिलेल्या 'वास्तव'मधील शब्दचित्रांना भावचित्रांचे रूप येते. ते लेखकाच्या अंतःस्फूर्त कृतज्ञतेमुळे! 'वास्तव' या शब्दचित्र संग्रहातील काही व्यक्ती समाजपुरुष आहेत तर काही सामान्य असून असामान्यत्व धारण करणाच्या व्यक्ती आणि समाज जीवनाची सुंदर गुंफण करत लिहिलेल्या या व्यक्तिचित्रांमध्ये वाचकांना जगण्याची प्रेरणा प्रेरणाबळ देण्याची विलक्षण शक्ती आहे!

 लेखकाने ही व्यक्तिचित्रे उतराईच्या भावनेने लिहिली असली, तरी त्यात समाज शिक्षण, समाज प्रबोधनाची ताकद दिसून येते. 'वास्तव' आहे, दातृत्व, समाजसेवा, दलितोद्धार, शिक्षण विकास, शिक्षण प्रसार, माणुसकी, भूतदया, जगण्याची ऊर्मी, जीवनांची झुंज शिकविणा-या व्यक्तिचित्र संग्रह. लेखकास या सा-याचा निकट संपर्क संस्कार लाभला. त्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याचा कृतकृत्य भाव लेखकाचे मनी आहे. हा भाव वाचकांपर्यंत पोहचविताना तो समाजात कृतज्ञतेचं पाझर जिवंत राहावेत म्हणून धडपडत असल्याचे लक्षात येते.

 भारतीय शिक्षण व नियोजन क्षेत्रांतील अग्रगण्य पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक, विना अनुदान शिक्षण संस्कृतीचे प्रसारक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, आधुनिक कर्ण बनून समाजसेवकांचा संसार चालविणारे कै. प्रभाकरपंत कोरगावकर, अनाथांचा नाथ कै. अमरनाथ कांबळे, दीनदलितांचे कैवारी दलित मित्र बापूसाहेब पाटील, राजर्षी शाह महाराजांचे लोकोत्तर कार्य सामान्यप्रत पोहचविणारे व शाहशाहीर बिरुदावलीस पात्र ठरलेले माजी आमदार कै. पी. बी. साळुखे अशी एकीकडे समाजपुरुषांची मांदियाळी या 'वास्तव'मध्ये आहे. तर दुसरीकडे आप्तस्वकीयांतील आपणास मोठे करणाच्या भावाबहिणीस स्थान देऊन त्यांचं स्थान व्यक्तिगत जीवनांत वरील समाजपुरुषाइतकंच महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट केलं आहे!

 प्राचार्य अरविंद सातवेकरांची जडणघडण गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात झाली. सेवानिवृत्तीनंतर लेखक कोरगावकर ट्रस्टच्या सान्निध्यांत आले. त्या आधी पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांचे सान्निध्य लाभलेले त्यांचे जीवन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तरारले. डॉ. जे. पी. नाईक हे केवळ शिक्षणतज्ज्ञ, नियोजक नव्हते. तर माणसाची विलक्षण पारख असलेले

संवेदनशील पालक होते. स्वतःच प्रतिकूल परिस्थितीतून वर आले. त्यामुळे प्राचार्य अरविंद सातवेकरांसारखा त्यावेळचा ‘सुताराचा पोर' शिकतो म्हटल्यावर त्यांनी त्याच्यावर पितृत्वाची सतत पाखर धरली. अमरनाथ कांबळेसारखा माणूस हरिजन वाड्यातील चार पोरं पोटाशी धरून शिकवतो हे कळल्यावर श्री मौनी विद्यापीठात हरिजन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करून त्यास अमरनाथ कांबळेचं नाव दिलं! यांत डॉ. जे. पी. नाईकांची दीर्घपल्ल्याची समाजदृष्टी दिसून येते. या अमरनाथ कांबळे वसतिगृहाने, शिकत असताना दोन वेळची भाकरी मला पुरवली होती! हे माझ्या चांगले लक्षात आहे. डॉ. जे. पी. नाईकांचं सातवेकरांनी लिहिलेलं भावपूर्ण शब्दचित्र वाचत असताना जाणवलं की, त्यांनी हे हातचं राखून लिहिले आहे. डॉ. जे. पी. नाईकांचा त्यांना लाभलेला दीर्घ सहवास निकट सान्निध्य पाहता त्यांनी डॉ. जे. पी. नाईक यांचे सविस्तर चरित्र लिहावं! श्री मौनी विद्यापीठ, कोरगांवकर ट्रस्ट या कामी नक्की साहाय्य करतील.

 डॉ. जे. पी. नाईकाप्रमाणे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रांत फार मोठे कार्य केले आहे. सामान्यांच्या घरांपर्यंत शिक्षणाचा ओघ कसा येईल त्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणास लावली आहे. डॉ. जे. पी. नाईक व डॉ. डी. वाय. पाटील यांचे शिक्षणातले काम मोठे असले तरी दोघांच्या कार्याचे संदर्भ मूलतः भिन्न आहेत. लेखकांनी डॉ. डी. वाय. पाटील यांचे व्यक्तिचित्र व्यक्तिगत उतराईच्या भावनेने चित्रित केलं आहे, त्यामुळे त्याचे मोल वेगळेच आहे.

 कोरगावकर विश्वस्त संस्थेतर्फे लेखक संस्था सचिव म्हणून काम करीत असलेने ते कोरगावकर कुटुंबीयांच्या अगदीच सान्निध्यात होते. कै. प्रभाकरपंत यांचे जीवन व कार्य त्यांनी अगदी जवळून समजले. जे जे आपणास ठावे ते ते दुसन्यास सांगावे या ध्यासाने लिहिलेले 'वास्तव' मधील प्रभाकरपंतांचे व्यक्तिचित्र, व्यक्तिचरित्राजवळ जाणारे अधिक. व्यक्तिचित्र लिहायचं तर माणसाचा जिवंत सहवास अनिवार्य असतो. तो लेखकास लाभला नाही. पण प्रभाकरपंताबद्दलच्या अपार आदरामुळे त्यांनी या समाजपुरुषास 'वास्तव'मध्ये अत्यंत सुरेख उभे केले आहे! आज समाजात कृपणता रोज भूमितीच्या पटीने वाढत असताना हा दातृत्वाचा वसा वरदान वाटतो!

 दलितांबद्दल असाधारण आस्था असलेल्या अमरनाथ कांबळे व दलितमित्र बापूसाहेब पाटील यांची या संग्रहातील व्यक्तिचित्रे संग्रहाचे सामाजिक योगदान रेखांकित करतात. अमरनाथ कांबळे व बापूसाहेब

पाटील या उभयतांचे जीवन कार्य लेखकाने अगदी जवळून पाहिले आहे. अनुभवलेही आहे. त्यांनी ही दोन्ही कार्यकर्ती मंडळी जशी भावली तशी चितारली आहेत. दोघांच्या दलितोद्धाराच्या कार्याच्या दिशा स्वतंत्र आहेत. अमरनाथ कांबळेचा मार्ग रचनात्मक तर बापूसाहेबांचा तो संघर्षाचा. अमरनाथ सतत समाजशील राहिले. बापूसाहेबांचा मूळ पिंड चळवळीचा. विद्यार्थी दशेपासून ते संगठन, संघर्ष करीत राहिले. समाजकारणास बापूसाहेबांनी राजकारणाची जोड दिली. अमरनाथ ‘टिपिकल' तर बापूसाहेब ‘टिपिकल' समाजसेवक. प्राचार्य सातवेकरांनी दोहोतला फरक मोठ्या कौशल्याने चित्रित केला आहे.

 आजच्या सामाजिक व राजकीय जीवनातील कोणतंही भाषण राजर्षी शाह छत्रपती महाराज यांचे नाव वगळून करता येत नाही. पण सुमारे पन्नास वर्षांपूर्वी असं नव्हतं. छत्रपती शाहूंचे लोकोत्तर कार्य व कर्तृत्व समाजास प्रथमतः प्रकर्षाने व प्रभावीपणे जाणवून दिले ते पी. बी. साळुखे यांनी. त्यांनी शाहू जन्मशताब्दीच्या निमित्ताने संपादिलेला गौरवग्रंथ याचा पुरावा. पी. बी. साळुखे व्यासंगी अभ्यासक होते. तसे वक्तेही. समाजकारण व राजकारणाचं बेमालूम मिश्रण करून त्यांनी आपला बहुजनवाद कसा जोपासला हे शाहूशाहिराच्या या संग्रहातील व्यक्तिचित्रावरून लक्षात येते. कोल्हापूरच्या मोठ्या माणसांची यादी कै. पी. बी. साळुखेच्या अंतर्भावाशिवाय पुरी करता येत नाही. हे सदरचे शब्दचित्र वाचले की कळते नि पटतेही. हे सारं लेखकाच्या शैलीचे श्रेय!

 आपल्या ‘आक्का', 'नाना' नि ‘निवृत्ती' या कुटुंबीयांची ‘वास्तव मधील रेखाचित्रे ही मोठी जमेची बाजू आहे. आज एकविसाव्या शतकात कोण कुणाचं न राहण्याचा काळ जवळ येऊन ठेपत असताना विसाव्या शतकात माणसं आत्मिक आकांतांनी दुस-यासाठी, आप्तेष्टासाठी जीवाची कुरवंडी कशी करायची ते वाचलं म्हणजे 'गेलं शतक माणसांचं होतं, चालू शतक यंत्रांचं आहे. या विधानाचा प्रत्यय येतो. यातील ‘आक्का' वाचत असताना, माझ्यासारख्या कधी काळी अनाथ असलेल्यास आपणास अशी आक्का भेटती तर...' वाटणं हेच या व्यक्तिचित्राचे यश वाटतं. अनेक दोषांसह 'नाना'साठी लेखकाने केलेली पायपीट अन् शेवटचा ‘नाऽ ऽ ना' म्हणून फोडलेला टाहो प्रत्येक संवेदनशील वाचकाचे हृदय हेलावून सोडल्याशिवाय राहणार नाही. निवृत्तीची झेप! लक्षवेधी काही तरी करण्याची सुरसुरी उरी बाळगणाच्या तरुणांत नवा आशावाद जागवल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे!

 'वास्तव' शब्दचित्र संग्रहातील काही व्यक्तिचित्रे वाचत असताना मला हिंदी साहित्यातील ‘माटी की मूरते' व 'अतीत के चलचित्र' सारखे वाचकाची मनाची जबरदस्त पकड घेणारे संग्रह आठवले. मला वाटतं, यातच 'वास्तव'चे सारं यश सामावलेले आहे!

◼◼


दि. १२ ऑक्टोबर, २००५

विजया दशमी

जलद आणि प्रभावी वाचन (संशोधन ग्रंथ)

अशोक इंगवले
नलिनी प्रकाशन, कोल्हापूर

प्रकाशन - मार्च, २00६

पृष्ठे - २०७, किंमत - १२५/-



वाचनाची वैज्ञानिक मांडणी करणारा शैक्षणिक संदर्भ ग्रंथ


 ‘जलद आणि प्रभावी वाचन' हे पुस्तक वाचनासंबंधी प्रशिक्षण, अध्ययन, मूल्यमापन करू इच्छिणा-यांना मार्गदर्शक ग्रंथाचे कार्य करते. हे पुस्तक वाचेपर्यंत वाचनासंबंधी माझ्या मनात बरेच गैरसमज म्हणण्यापेक्षा अज्ञानच होते. आजवर मी वाचनास छंद समजत होतो. या पुस्तकामुळे वाचन ही एक मनोवैज्ञानिक, शारीरिक प्रक्रिया आहे हे लक्षात आले. वाचनासंबंधी अनेक अंगांनी विचार करता येतो याचे भान या पुस्तकामुळे आले. वाचनाचा वेग असतो, तो वाढवता येतो हे उमगले. शिवाय वाचनदोष असतात, ते दूर करता येतात याचाही शोध लागला. माझ्या दृष्टीने श्री. अशोक इंगवले यांनी अनेक वर्षे प्रयोग, संशोधन, चाचण्या, निरीक्षणे इत्यादीच्या आधारे तयार केलेला हा वैज्ञानिक ग्रंथ वाचनासंबंधी आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतो. हीच या ग्रंथाची खरी फलश्रुती, देणगी म्हणायला हवी.

 श्री. एडवर्ड फ्राय यांचे "Teaching Faster Reading' हे पुस्तक लेखकाच्या वाचनात आले नि त्याला या पुस्तकाने झपाटून टाकले. खरा, हाडाचा शिक्षक केवळ संवेदनशील नसतो तर तो प्रयोग, उपक्रमशील संशोधकही असतो. श्री. अशोक इंगवले शिक्षणाधिकारी झाले तरी त्यांचा मूळ पिंड हा शिक्षक, संशोधकाचा हे या पुस्तकामुळे लक्षात येते. ते

शिकवत असताना त्यांच्या विद्यार्थ्यांचे वाचनदोष त्यांच्या लक्षात आले. या दोषांमुळे त्यांच्यातील अस्वस्थ शिक्षकाचे बेचैन होणे स्वाभाविकच म्हणायला हवे. त्यातून त्यांनी प्रयोग, धडपड, चाचण्या घेतल्या व जे निष्कर्ष आपल्या हाती आले ते कृतिसंशोधनाच्या रूपात आपल्यापुढे मांडले. काही संशोधन करायचे म्हणून त्यांनी वाचन ही समस्या शोधली नाही तर समस्येतून संशोधनाकडे असा त्यांचा झालेला प्रवास हेच या पुस्तकाचे खरे बलस्थान आहे.

 लेखकाने ‘जलद व प्रभावी वाचन' ग्रंथ प्रशिक्षण व स्वयंअध्ययन अशा दोन अंगांनी, उद्देशांनी लिहिला आहे. यातील प्रशिक्षणाचा पैलू शिक्षक, वाचकांशी संबंधित आहे, तर स्वयंअध्ययन हे कुणाही वाचकाला स्वतःचा वाचनवेग, वाचनदोष, आकलन इ. अंगाने स्वतःचे वाचन कौशल्य विकसित करण्यास उपयोगी सिद्ध होईल. या दृष्टीने हे पुस्तक एकीकडे ‘वाचनासंबंधी शिक्षक हस्तपुस्तिका जशी आहे तशी ती वाचकांसाठी ‘स्वयं मार्गदर्शिका' म्हणूनही उपयुक्त झाली आहे.

 या पुस्तकात वाचनाच्या विविध अंगांचा ऊहापोह करणारी अकरा प्रकरणे आहेत. बारावे प्रकरण ‘अभ्यास करा करावा' या विषयाला वाहिलेले आहे. माणूस वाचन का करतो यावर लेखन कलेचा विकास झाल्यापासून अनेकांनी लिहिले आहे. परंतु वाचनासंबंधी संशोधनात्मक लेखन हे गेल्या शतकात झाले. वाचन, आकलन व अभ्यास या तीन स्वतंत्र शैक्षणिक प्रक्रिया होत. त्यांचा संबंध शरीरशास्त्र व मानसशास्त्राशी आहे. वाचन ही मन व शरीराच्या समन्वयातून होणारी कृती आहे. आकलन ही विशुद्ध मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे तर अभ्यासाचा संबंध उपयोजनांशी आहे. हे सर्व वाचनप्रक्रिया, वाचनवेग, वाचनदोष, प्रभावी वाचनाचे उपाय, आकलन कौशल्य वृद्धी इत्यादी अंगांनी लेखकाने सविस्तर मांडणी करून या ग्रंथाद्वारे समजाविले आहे. त्याचा प्रत्यय यावा म्हणून अनेक चाचण्या दिल्या आहेत. शेवटी उत्तरे देऊन हा ग्रंथप्रपंच प्रमाणित Standard केला आहे.

 वाचन प्रक्रियेची वैज्ञानिक मांडणी ही या ग्रंथाची मोठी जमेची बाजू होय. वाचन हे भाषिक कौशल्य होय. ते प्रयत्नपूर्वक विकसित करता येते. वाचनाचा वेग असतो. तो प्रयत्नाने वाढविता येतो. वाचनाचा नि दृष्टीचा, वाचनाचा नि मनाचा संबंध असतो. प्रत्येकाच्या डोळ्याचा नि मनाचा आवाका भिन्न असल्याने वाचन कौशल्य भिन्न होते, याची जाण हे पुस्तक देते. केवळ वाचन म्हणजे शिक्षण नव्हते. जोवर वाचनाचा संबंध आकलनाशी जोडला जात नाही तोवर शिक्षण होत नाही. केवळ वाचन हे मात्र मनोरंजन

असते, ती एक माहिती असते. माहितीचे रूपांतर ज्ञानात होणे व आकलनाद्वारे जीवन व्यवहारात वाचनाचे उपयोजन म्हणजे शिक्षण असा साक्षात्कार करणारे, देणारे पुस्तक सर्व शिक्षणविषयक प्रशिक्षण पाठ्यक्रमात अनिवार्य पाठ्यग्रंथ म्हणून अंतर्भूत व्हायला हवे. वाचन व्यवहार शिक्षणाचा मूलभूत घटक असल्याने प्रत्येक शिक्षकाला या व्यवहाराची वैज्ञानिक माहिती असणे गरजेचे आहे. ग्रंथलेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन!

◼◼


दि. १८ मार्च, २००६

बुद्धाची शांती, भीमाची क्रांती (काव्य)

विजय शिंदे

प्रज्ञा प्रकाशन, कोल्हापूर

प्रकाशन - जानेवारी, २00७

पृष्ठे - २१ किंमत - २0/-



हृदय परिवर्तनाशिवाय धर्म परिवर्तन व्यर्थ


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील भारतीय समाज परिवर्तन चळवळीचे प्रमुख पुढारी होते. त्यांनी दलित वर्गामध्ये जागृती केली. त्यांना हक्कांची जाणीव करून दिली. डॉ. आंबेडकरांच्या मते, हिंदू धर्म हा वर्ग-व्यवस्थेचा समर्थक होता. त्या धर्मात व्यक्तीस महत्त्व आहे. विषम वर्ग व्यवस्थेवर तो आधारलेला आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे हे हिंदू धर्म सांगत नाही. गुण आणि कर्म यांची तो विभागणी करतो. तो विषमतेवर आधारलेला आहे. एकास सज्ञानी करून दुसन्यास अज्ञानी ठेवत गुलाम बनवून ठेवणाच्या धर्माच्या ते विरोधी होते. एक वर्ग सशस्त्र करून ते दुसन्यास नि:शस्त्र करणारा धर्म हा अधर्म होय अशी त्यांची धारणा होती. ते धर्मापेक्षा धम्म मानत. धर्माचा आधार ईश्वर असतो तर धम्म मानवनिर्मित व समानता मानणारा असतो. म्हणून त्यांनी सन १९३५ ला धर्म परिवर्तनाची घोषणा केली पण प्रत्यक्षात त्यांनी १९५६ ला धर्म परिवर्तन केले. सतत २१ वर्षे प्रदीर्घ विचार करून मग डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्धांसारखा हा एक समाज बोधच होता. चालू वर्ष (२००६) हे या धर्म परिवर्तनाचे सुवर्ण जयंती वर्ष त्याचे औचित्य साधून कवी विजय शिंदे यांनी आपल्या २१ कवितांचा एक संग्रह ‘बुद्धाची शांती- भीमाची क्रांती' या नावाने रचला

आहे. तो सुवर्ण जयंती वर्षीच प्रकाशित होत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

 ‘बुद्धाची शांती-भीमाची क्रांती' मधील कविता वाचत असताना लक्षात येते की कवी विजय शिंदे हे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आराध्य मानतात. त्यांच्याबद्दल आदर या संग्रहातील कवितांत जागोजागी प्रतिबिंबित होणे स्वाभाविक आहे. धर्म परिवर्तनानंतरच्या गेल्या पन्नास वर्षांत दलित वर्गात काय परिवर्तन झाले याचे चित्रण संग्रहातील कवितात आहे. कवी विजय शिंदे यांना समकालीन घटनांचे चांगले भान आहे. त्यामुळे त्यांच्या कवितात साध्य होणाच्या आरक्षणाविरोधाचे जसे पडसाद आहेत, तसेच जागतिकीकरणाचेही या अंगाने कवीस समाजभान असल्याचे स्पष्ट होते.

 कवी विजय शिंदे यांनी यापूर्वी लिहिलेले ‘जयभीम गीतामाला', ‘जयभीम गीतधारा (९ भाग)', 'क्रांतिसूर्य (पोवाडा)', 'घटनेचे मारेकरी (काव्यसंग्रह)' मी वाचले आहेत. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांवर ‘शाहू राजे' हे खंडकाव्यही रचलं आहे. ते तर माझ्या हस्तेच प्रकाशित झाले याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. अशा कसलेल्या कवीच्या या कविता आहेत. आजवर पांढ-यावर काळे करणारा व डफावर थाप मारणारा हा कवी व शाहीर चित्रपट गीतकार, लावणीकार म्हणून मराठी श्रोत्यांपुढे येणार आहे. त्यांची सिनेगीतं नि लावण्या गाजल्या नाही तरच आश्चर्य!

 भीमाने दिलेल्या बळानं दलित लेकी-बाळात आलेल्या बळाचे वर्णन यातील नातं भीमाचं' कवितेत आहे. त्यांच्या काळजाच्या काठात असलेल्या डॉ. आंबेडकरांनी फुलवलेल्या निळ्या मळ्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. दलित वर्ग सुशिक्षित झाल्यानं माणसात आला. त्यामुळे आकाशही। वाकुल्या घेऊ लागलं याचा त्यांना इतका आनंद आहे की ‘पाव्हणं जयभीम बोला' म्हणत हा कवी डॉ. आंबेडकरांना रोज स्मरावं हे सुचवतो. या कवीच्या मनात दलितांचं दुःख शोधणारी आस्था आहे. म्हणून ती 'डोळे उघडे ठेवून जग पाहते. त्याचे वर्णन ते ‘उघडा ठेवून डोळा' कवितेत येणारे समकालीन समस्यांचे संदर्भ कवीस समाज मन पारखी सिद्ध करतात.

 युद्ध कशाला? हवी जगाला बुद्धाची शांती।
 मानवतेला शोभतीया भीमाची क्रांती।।
 असा उद्घोष करणारी ही कविता.संग्रहातील अन्य रचनांमधून
 स्वातंत्र्य मिळूनी देशाला झाली वर्षे साठ बाई।
 आमच्या आयुष्यात स्वातंत्र्याचा दिस उगवला नाई।।

 म्हणून जेव्हा आपली व्यथा व्यक्त करते तेव्हा लक्षात येते, बुद्ध नि आंबेडकर आले नि गेले तरी जोवर माणसांचे हृदय परिवर्तन होत नाही तोवर धर्म परिवर्तनास अर्थ उरत नाही. ही कविता माणसाचे मारीच होणं थांबवायचा आग्रह करते. ते जेव्हा होईल तेव्हाच कवी विजय शिंदे यांचा टाहो थांबेल.

 या पुस्तकाचे प्रकाशन प्रज्ञा प्रकाशनचे प्रा. शरद गायकवाड यांनी करून मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी या कवीचा ‘जयभीम गीतमाला' हा काव्यसंग्रह यापूर्वीच प्रकाशित केला आहे. प्रा. शरद गायकवाड हे प्रज्ञाशील असून, व्यथाशीलही असल्याचे त्यांच्या या अक्षर चळवळीवरून स्पष्ट होते. त्यांचे अभिनंदन!

◼◼


दि. १४ नोव्हेंबर, २००६
बालक दिन

व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे (क्रमिक पुस्तक)

डॉ. लता पाटील व सौ. सुलोचना भागाजे

प्रणव प्रकाशन, कोल्हापूर \ प्रकाशन - एप्रिल, २००७

पृष्ठे - १०९ किंमत - ६0/



'माणूस' घडणीची सूक्ते


 ‘व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे हे इयत्ता नववीसाठी लिहिलेलं मार्गदर्शक असं क्रमिक पुस्तक होय. लेखिका डॉ. लता पाटील व सौ. सुलोचना भागाजे यांनी ते संयुक्तपणे लिहिलं आहे. ते नव्या अभ्यासक्रमावर आधारित असून शैक्षणिक वर्ष २00६-२००७ पासून अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्याचा लाभ महाराष्ट्रभरच्या विद्यार्थी व शिक्षकांना होईल. हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकासास समर्पित असलं, तरी ते मानवाच्या 'माणूस' म्हणून घडण्यास उपयुक्त ठरेल.

 आजचं समाजजीवन विलक्षण संघर्षाचं झालं आहे. माणसास हरघडी अस्तित्वाची लढाई खेळणं अनिवार्य होऊन बसलं आहे. वाहतुकीच्या वाढत्या सोयी-सुविधा, वाहनांची रोज वाढणारी गती यामुळे माणसाची स्पर्धा प्रकाशाच्या गतीशी होते आहे. संगणक व माहिती-तंत्रज्ञानाच्या विकासामुळे व विशेषतः महाजालीय विस्तारामुळे (इंटरनेट) ज्ञानाला क्षितिज राहिलं नाही. जगाचं खेडं बनणं, अवकाश कवेत येणं, निसर्गाच्या रोज नव्या गूढाचं निराकरण होणं, विज्ञानाचे पराकाष्ठेचे शोध यांमुळे माणसाचं जीणं नि जीवन एकीकडे सुखकर, तर दुसरीकडे गुंतागुंतीचं होऊ लागलंय. गती, संघर्ष, समृद्धी, अस्तित्व स्पर्धा, जागतिकीकरण यामुळे जगण्याचे ताण वाढत आहेत. माणूस मूल्यांपेक्षा मालमत्तेस महत्त्व देऊ

लागल्याने कायदा, संस्कार, सचोटी याची त्यास चाड राहिलेली नाही. रोज कायदा हातात घेण्याची वृत्ती नवा दहशतवाद रुजवू पाहते आहे. मनुष्य समाजाचे वर्तन आणि व्यवहार यादवीकडे कूच करताना दिसतात. माणूस आपल्या हक्कांबद्दल जितका जागृत असतो, तितका तो कर्तव्य परायण, कार्यतत्पर असत नाही. त्याला दुस-याच्या डोळ्यांतलं कुसळ जितकं प्रकर्षाने दिसतं, तितकं स्वतःच्या डोळ्यात मुसळ असलं तरी न दिसणं, न जाणवणं हे केवळ दृष्टिमांद्य नसून वृत्तीमाजही आहे. असं माणसाचं ‘झापड जगणं' हे या शतकापुढचं खरं आव्हान आहे. ते पेलायचं, पचवायचं असेल तर माणसाचं ‘माणूस' होणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडण ही नव्या अंगांनी व नव्या घटकांवर आधारित होणं आज आवश्यक होऊन बसलं आहे. हे पुस्तक त्या दिशेनं केलेला एक जाणीवपूर्वक लेखन प्रपंच होय.

 सदर क्रमिक पुस्तकाच्या लेखनात लेखिकद्वयांनी पूर्वतयारी, नियोजन, वाचन, मनन, संदर्भ संकलन, मांडणी अशा अनेक अंगांनी पूर्व विचार केल्याचे हे पुस्तक वाचताना लक्षात येते. सुमारे १00 पृष्ठांच्या या ग्रंथात व्यक्तिमत्त्व विकासाची षड्सूत्रे निरुपित करण्यात आली आहेत. मूल्यशिक्षण, तणाव व्यवस्थापन, व्यावसायिक शिक्षण, मानव अधिकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, दहशतवाद प्रतिबंध व आपत्ती व्यवस्थापनासारख्या अत्याधुनिक संकल्पनांच्या आधारे व्यक्तिमत्त्व विकासाची मांडणी केली आहे. प्रत्येकासाठी स्वतंत्र प्रकरण करण्यात येऊन विषयाधिष्ठता सांभाळली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी संक्षिप्त मुद्दे दिले आहेत. आशयाचा विस्तार मर्मग्राहीपणे करण्यात आला आहे. प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय देऊन अभ्यासक्रमाचा उद्देश कृतिप्रवण करण्याचा प्रयत्न अनुकरणीय होय. आशयाची मांडणी उपशीर्षके देऊन मुद्देसूद करण्यात आली आहे. नववीच्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन करण्यात आलेली पुस्तक रचना, भाषा प्रयोग खासच उजवे झाले आहेत. छोट्या-छोट्या वाक्यांमुळे आशय व विषय दोन्ही सुबोध व सुलभ झालेत. हे या पुस्तकाचं खरं बलस्थान, आवश्यक तेवढेच मुद्यांचे विवेचन झाल्याने नेमकेपणा व नेटकेपणांनी हा ग्रंथ नटला आहे. विषय समजावताना लेखिकांनी केलेला हितगुज शैलीचा प्रयोग यामुळे या पुस्तकास संवाद नि समुपदेशनाचे (Dialogue and Counselling) स्वरूप प्राप्त झाले आहे. विषयातील आशय वा तथ्य समजाविण्यासाठी जागोजागी उदाहरणे, गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे विषयरूक्षता कमी होऊन आशय रंजकपणे विद्याथ्र्यांच्या मनी-मानसी, हृदयी पोहोचेल, याची मला खात्री वाटते. हे

पुस्तक मागील शतकात जन्मलेल्या मुलांसाठी (सन १९९० नंतर जन्मलेल्या) असले तरी ते एकविसाव्या शतकात जगणा-यांसाठी आहे. त्यामुळे उदाहरणे केवळ इतिहास, वेद, पुराणातील न देता ते अधिक परिणामकारक ठरले असते. काही ठिकाणी अशी उदाहरणे आहेत; पण ती अधिक असणे उचित ठरले असते. हा एक अपवाद वगळता सदरचे पुस्तक हे अभ्यासक्रम सापेक्ष झाले आहे, हे मान्य करायलाच हवे.

 ‘व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे' मध्ये लेखिकांनी ‘मूल्य शिक्षण प्रकरणात मूल्य व संस्कारांचे महत्त्व विशद केले आहे. नीटनेटकेपणा, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, स्त्री-पुरुष समानता, सौजन्यशीलता यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पुस्तक मूल्याधिष्ठित मनुष्य विकासाचा आग्रह धरते. दुस-या प्रकरणात करण्यात आलेला तणाव व्यवस्थापनाचा विचार कालसंगत वाटतो. संघर्ष व गतीचं तणाव हे अपत्य असतं. ते सांभाळायला व्यवस्थापनावर विचार करणे अनिवार्य असते. व्यक्तिमत्त्व संतुलित व संयमित राहायचं तर तणाव ही प्रक्रिया काय असते? तणाव कशामुळे निर्माण होतात? त्यांची वर्तनव्यवहारी लक्षणे कोणती? दूर करायचे उपाय कोणते याचा ऊहापोह विविध आकृत्यांद्वारे केल्याने तणावासारखा क्लिष्ट विषय सरस व सुकर होण्यास साहाय्य झाले आहे. काळ बदलतो तसा शिक्षणाचे स्वरूपही बदलते. पूर्वी अक्षर नि अंक ज्ञान म्हणजे शिक्षण होतं. गेल्या शतकात व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व वाढले ते जगाच्या व्यापारीकरण नि औद्योगिकीकरणाने. आज व्यक्तिमत्त्व विकास हेच शिक्षणाचे ध्येय नि उद्दिष्ट ठरते आहे. जगायला शिकवणारे शिक्षणच खरे. व्यावसायिक कौशल्य विकासावर सविस्तर माहिती देऊन पुस्तक उपयोगी कसे होईल, हे पाहिले आहे. मानव अधिकार संरक्षणासारखा अत्यंत नवीन; परंतु आवश्यक होऊ पाहणारा विषय अंतर्भूत झाल्याने पुस्तकाच्या विषयास पूर्णत्व प्राप्त झाले आहे. हे शतक मानवाधिकारांचे राहणार यात तिळमात्र शंका नाही. नव्या विद्याथ्र्यांत अधिकार साक्षरता येईल, तरच ते कर्तव्यतत्पर राहतील, असा होरा ठेवून अंतर्भूत केलेले हे। प्रकरण पुस्तकास नावीन्यपूर्ण व अत्याधुनिक विचारसरणीचे समर्थक बनवते. भ्रष्टाचार शिष्टाचार होऊ पाहात असलेल्या समाज संक्रमण काळात जर आपण विद्यार्थ्यांत त्याविषयी घृणा निर्माण करू शकलो, तर भारत सन २०२० पर्यंत मूल्याधारिक महासत्ताक देश बनल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे, कर्तव्यतत्पर व प्रामाणिक पोलीस अधिकारी डॉ. किरण बेदी, सेवापरायण मदर तेरेसा,

पर्यावरणप्रेमी सुंदरलाल बहुगुणा, नर्मदा बचाव'च्या मेधा पाटकर, अवकाशयात्री कल्पना चावला यांची चरित्रे व ‘फिटे अंधाराचे जाळे', ‘चाकाची खुर्ची’, ‘खाली जमीन वर आकाश', ‘पोरके दिवस’, ‘बिनपटाची चौकट' सारखी आत्मचरित्रे व्यक्तिमत्त्वाचा खरा विकास घडवू शकतील. अशा क्रमिक पुस्तकांच्या अध्यापनासाठी मूल्य संस्कार, मूल्य संवर्धनार्थ पूरक वाचन म्हणून वरील काही ग्रंथ सुचवणे आवश्यक वाटते. सैद्धांतिक शिक्षणापेक्षा अनुभवजन्य शिक्षण, वाचन हे परिणामकारक असते. दहशतवाद आज जागतिक समस्या बनली आहे. पर्यावरणाच्या विध्वंसामुळे नैसर्गिक संकटे वाढताहेत. अशा काळात नवी आव्हाने पेलण्याचे शिक्षण दिल्याशिवाय या शतकातील पिढी ख-या अर्थाने जबाबदार व सक्षम होऊ शकणार नाही. याचे भान ठेवून पुस्तकात नव्या विचार व व्यवहाराची दिली गेलेली जोड स्तुत्यच होय.

 समग्रतः ‘व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे हे पुस्तक नव्या माणूस घडणीची सूक्ते गाणारे व नवमूल्य रुजवणारे एक सक्षम संस्कार धन बनले आहे. त्याबद्दल लेखिका भगिनींचे अभिनंदन! या पुस्तकामुळे नवी पिढी, नवे व्यक्तिमत्त्व अधिक समाजशील, संस्कारी, संवेदी, अधिकारापेक्षा कर्तव्यपरायण होईल, असा मला विश्वास वाटतो.

◼◼


दि. १९ मार्च, २००७
गुढीपाडवा

सुगंध (लेखसंग्रह)

डॉ. जी. पी. माळी

अजब पब्लिकेशन, कोल्हापूर

प्रकाशन - डिसेंबर, २००७

पृष्ठे - १९२ किंमत - रु. १७0/



विविधभावी कॅलिडिओस्कोप


 ‘सुगंध' हा प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी वेळोवेळी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह होय. या लेखसंग्रहाचं वैशिष्ट्य असं की, विविध चॉकलेट्स, गोळ्या, ड्रायफूट्स आदींचे बाजारात जसे अॅसॉरटेड बॉक्स मिळतात तसा हा संग्रह! ‘अॅसॉरटेड' म्हणजे बहुविध, बहुरंगी, बहुढंगी. लहान मुलं नि मोठी माणसं अशा संग्रहावर तुटून पडतात. वाचन हे देखील असं बहुरंगी असतं. लेखनही विविध भावांमुळे वैविध्यपूर्ण ठरतं. भेटीचं वर्णन वा आठवणीस स्मृतिशलाकेची हळुवार झालर असते. बालपणीच्या

आठवणीत गतकाल रम्य करण्याचे कौशल्य असतं. प्रवासवर्णनात निरीक्षणातील तरलता असते. व्यक्तिचरित्रात गुण, स्वभावाचं इंद्रधनुष्य असतं. कधी-कधी त्यात गूढ धुकंही डोकावतं. कधी कथा तर कधी समीक्षा लेखन. माणूस असं बहुविध, बहुआयामी तेव्हाच लिहू शकतो जेव्हा तो अनुभवसंपन्न असतो. शिवाय संपन्न अनुभवांची प्रस्तुती, तिचं सादरीकरण करण्याचे कौशल्य लेखकात असलेल्या प्रतिभाशैलीमुळे कधी खोचक, खोडकर, बोचक तर कधी गंभीर नि व्यवच्छेदकही बनतं! लहानपणी आम्ही गल्लीत येणारा ‘दिल्ली का कुतुबमिनार देखो, आगरा का ताजमहाल देखो' म्हणत फिरणारा सिनेमा पहायचो, तसेच बांगड्यांचे तुकडे हालवत आकारांची शत-शत आरास दाखविणारं जत्रेतलं शोभादर्शक

(कॅलिडिओस्कोप) आणायचो नि पहायचो. या साच्यात मनोरंजन, जिज्ञासा, कुतूहल असायचं तसं कल्पनेचं जग रुंदावणारं नवं क्षितिज त्यातून दिसायचं.

 ‘सुगंध' असाच बहुविध, बहुभावी कॅलिडिओस्कोप आहे. यात आठवणी, व्यक्तिलेख, समीक्षा, लघुनिबंध, कथा, आढावा सारं आहे. रसांच्या विविध अंगानं बोलायचं तर यात हास्य, करुणा, आश्चर्य सारं आहे. शैली कधी गंभीर तर कधी गमतीच्या अंगानं जात हास्यकल्लोळ उठवणारी! लेखकाकडे मुळात असलेली अनुभवांची अस्सलता - त्याचा गंध, रंग मौलिक! त्यामुळे ‘सुगंध'चं वाचन ही पंचपक्वान्नांची मेजवानी. ज्यांना कुणाला लेखनशैलीच्या नाना कळा अनुभवायच्या असतील त्यांना सुगंध एक वस्तुपाठ ठरावा. डॉ. माळींना त्याची प्रतवारी करता आली असती. पण त्यांचा उद्देशच मुळी आपले सारे वाण एकत्र पेश करण्याचा आहे. त्यामुळे आलेल्या वैविध्याने वाचकांचा रुचिपालट आपसूक घडून येतो व ‘सुगंध' हातासरशी केव्हा वाचून होते ते वाचकांच्या लक्षातही येत नाही. ही असते सारी अष्टपैलू, इंद्रधनुष्यी लेखनाची किमया. ती सा-यांनाच जमेल असे मात्र नाही.

 प्राचार्य डॉ. माळी यांनी कवी कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, समीक्षक डॉ. ल. रा. नसिराबादकर, प्रा. एन. डी. पाटील, प्राचार्य डी. डी. मगदूम, अभिनेता निळू फुले, कथाकार रणजित देसाई इ. मान्यवरांचे जीवन, कार्य, विचार, सामाजिक योगदान कधी लेखाच्या तर कधी समीक्षेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आपल्या आवडत्या कवी भेटीचं मनोज्ञ वर्णन ते ‘मनविहारी सकाळ' मध्ये करतात. ‘क्षण एक पुरे भेटीचा' मध्ये आपल्या प्रेरक अभिनेत्याचं - निळू फुलेंचं रसज्ञ वर्णन करतात. आपल्या ज्ञातीतला हा माणूस इतका मोठा असल्याचं समाधान नि औत्सुक्य याचं द्वंद्व, द्वैत रसभरित झालंय. कवी नारायण सुर्वे व कथाकार रणजित देसाई यांचा साहित्यिक धांडोळा अभ्यास, समीक्षा इ. अंगाने डॉ. माळी सादर करतात. त्यात लेखनाची अभ्यासकाची शिस्त व बैठक लक्षात येते. आपल्या गुरुजनांविषयीचा आदर ते ध्येयवादी अध्यापक', 'एक समर्पित जीवन', ‘कर्मवीरांचा खरा वारसदार' सारख्या लेखांतून व्यक्त करतात.

 व्यक्तिपर लेखनाची आत्मपर छटा त्यांच्या वाटेवर काटे वेचीत चाललो' सारख्या अपवाद लेखात दिसून येते. ते त्यांचं छोटेखानी आत्मकथनच! याच अंगानं पण जीवनातील वैविध्यपूर्ण अनुभवांचं कथन ते प्रमुख पाहुणा' (कथा), ‘सौ. माहेरून येते व जेव्हा मी डॉक्टर झालो या लेखांतून करतात. व्यक्तिपर लेखनात गंभीर लिहिणारा हा लेखक या

लेखातून विनोद, हास्य इ. च्या अंगाने समाजाचे अज्ञान, त्यातून आपल्या उच्च विद्याविभूषित होण्याची ऐशीतैशी मार्मिकपणे शब्दबद्ध करतात. लेखक जेव्हा स्वतःचं जीवन हा आपल्या टीका नि व्यंगाचा विषय बनवतो, ती त्याच्या प्रगल्भ प्रतिभेची खूण असते. ‘दिवस असेही होते लेखही आत्मपर लेखनात चपखल बसणारा. तो वाचताना प्र. के. अत्र्यांचे ‘मी कसा झालो' आठवल्याशिवाय राहात नाही. समाजवादी वाहनातील सहप्रवासी' लेख विनोदी शैलीचा नमुना म्हणून अवश्य वाचायला हवा.

 डॉ. माळी वृत्तपत्राची गरज, फर्माईश म्हणून आढावा घेणारे लेख लिहितात. भारतीय प्रजासत्ताकास चार दशक झाल्याच्या प्रीत्यर्थ ‘प्रजेने, प्रजेसाठी' शीर्षक लेख लिहून आपली सामाजिक निरीक्षण नोंदवतात. त्यातून त्यांची राजकीय जाणही स्पष्ट होते. ‘मायबोली मराठीची स्तुती आणि स्थितीतून ते शासन, समाजाच्या भाषा व्यवहाराचं वास्तव वेशीवर टांगतात आणि समजावतात की मराठी भाषेचा विकास व वापर वाढायचा तर ‘‘मातृभाषेच्या स्तुती ऐवजी स्थिती पाहून कृती हवी."

 अशा प्रकारे ‘सुगंध' हा विविध विषयांना स्पर्श करणारा लेखसंग्रह आहे. लेखक वेळोवेळी प्रसंगपरत्वे काही एक दृष्टी ठेवून लिहितो. पण ते जेव्हा संग्रह रूपाने एकत्रपणे वाचकास वाचण्यास मिळते तेव्हा लेखकाचे अनुभव, शैली, जीवनदृष्टी इत्यादींचे सम्यक दर्शन घडते. ‘सुगंध'मुळे ते झाले आहे. डॉ. माळी यांच्यातील लेखकात एकीकडे मार्क्सची समाजदृष्टी आहे तर दुसरीकडे चॅप्लीनचं व्यंगावर नेमकं बोट ठेवण्याचे कौशल्यही. ते एखादा गंभीर विषय अत्यंत पोक्त नि जबाबदारीने हाताळतात तितकाच एखादा साधा विषय सहज नि गमतीदारपणे. हे डॉ. माळींच्या लेखनाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य होय. त्यांना साहित्य, समाज, व्यक्ती, राजकारण अशा बहुविध क्षेत्राची चपखल जाण आहे. त्यांचे जीवन कृतज्ञतेच्या संस्कारांनी भारलेलं आढळतं. ते सामान्यात जसे रमतात तसे असामान्यातही. त्यांचं सारं जीवन व लेखन म्हणजे मागे टाकलेल्या आयुष्याचा मागोवा घेणं आहे. त्यात त्यांच्यातील चिकित्सक, टीकाकार सतत जागा असतो. स्तुती नि स्थिती यातला फरक नि अंतर ते ओळखून आहेत. म्हणून त्यांच्या एकंदर लेखनास साहित्य, संस्कृती, व्यक्तिवेध यांचा केवळ सुगंध नाही तर सुवर्णाची झळाळी पण आपलं लक्ष वेधून घेते. ‘सोने पे सुहागा' असं त्यांच्या या लेखनप्रपंचाचं वर्णन करावं लागेल.

 डॉ. जी. पी. माळींचं हे लेखन मराठी सारस्वतास अनुभव आणि अभिव्यक्ती अशा उभयांगानी समृद्धी देणारं आहे. त्यांच्या लेखन साधनेस

सातत्याची जोड लाभली तर उद्या मराठीस गंभीर नि गमतीदार लेखन एकाच ताकदीने लिहिणारा साहित्य साधक मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या लेखनास शुभेच्छा! नवलेखनाच्या प्रतीक्षेसह विराम.

◼◼


दि. १५ ऑक्टोबर, २००७

अधांतरी (आत्मकथन)

प्रा. प्रभावती मुठाळ

सुगावा प्रकाशन, पुणे

प्रकाशन - ऑगस्ट, २००९

पृष्ठे - २८0 किंमत - २५0/-



ख-या अर्थाने धर्मबुद्धीवर आधारित सामाजिक न्याय कोणता?


 शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया आता कायद्याच्या दृष्टीने दलित नाहीत. जोतिबा फुल्यांनी आमच्या आत्मजाणिवा जाग्या केल्या आहेत. या आत्मजाणिवा जाग्या झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वैधानिक अधिष्ठान दिले. घटनेने आमचे दलितत्व संपवले. आम्हाला हक्क आणि अधिकार दिले. आम्हाला समान मताधिकार व राजकीय दर्जा प्राप्त झाला. आमच्यावरचे अन्याय समजायला आम्हाला अकल आहे. त्यामुळे आमच्यावरचे अन्याय आम्ही निमूटपणे गिळत नाही. आमच्यावरचे अन्याय ओरडून सांगायला आम्हाला शब्द आहेत. आम्हाला राजकीय अधिकार आहेत. आम्ही ‘वोट बँक' आहोत. लोकशाहीतील मतांच्या राजकारणाने आणि आमच्या अक्कलेने व शब्दशक्तीने शासनाला आमची दखल घ्यावीच लागते. पण नवजात अनाथ आणि स्त्री (कुमारी माता)... दोन्ही अदृश्य दलित... बिचारी मरतात किंवा आमचे अनाथाश्रम भरतात. हे अनुभवकथन व्यक्त करणारे प्रा. प्रभावती मुठाळ यांचे ‘अधांतरी' हे। अनुभवकथन वाचकांत एक नवी सामाजिक न्यायबुद्धी जागवेल असा मला विश्वास आहे.

 प्रा. प्रभावती मुठाळ जन्माने सवर्ण, विवाहाने त्या शूद्र होतात. विवाहित जीवनानंतर दलित समाजातील स्त्रियांची दुःस्थिती त्यांना विकल करते. त्या सेवेतून निवृत्त होतात. त्यांच्या जीवनात पोकळी निर्माण होते. मुले शिकून-सवरून मोठी झालेली. पापड, कुरडया, लोणची घालून उर्वरित आयुष्य रिकामं कंठणं त्यांच्या जीवावर येतं. दरम्यान डॉक्टर मुलगा आपल्या दवाखान्यात एक चिमुरडी मुलगी जगण्याचा चिवट संघर्ष करत कशी श्वास टिकवून आहे याची रामकहाणी सांगतो. प्रभावतीताईंच्यात त्यातून दुसरे मातृत्व जन्मते... त्या मोहिनीला आपलंसं करतात... त्यासाठी त्या कायद्याची व त-हेवाईक माणसांशी मोठी लढाई खेळतात... ‘लढल्याशिवाय हरायचं नाही' चा संस्कार त्यांना यश देतो... त्या अनाथाश्रम चालवतात... अनेक अनाथांना अभय देतात... त्यातून त्यांना अनाथांचं विश्व, कायदे, शासकीय यंत्रणा, समाज, माणसं यांची खरी ओळख होते. समाजशिक्षण पदरी येतं. जे जे आपणासी ठावे। ते ते दुसन्यासी सांगावे।। शहाणे करूनि सोडावे। सकल जन।।' या न्यायाने आपला अनुभव कथन करतात. आणि त्यातून अनाथांचं एक ‘अधांतरी' जीवन आपल्यापुढे येतं. ते आपल्यात जात, धर्म या पलीकडे जाऊन सामाजिक न्यायाची कसोटी विचारतं... आपल्यात एक सामाजिक धर्मबुद्धी जागवतं... माझ्या दृष्टीनं ‘अधांतरी' या अनुभवकथनाची ही सर्वांत मोठी जमेची बाजू होय.

 ‘अधांतरी'मध्ये प्रा. प्रभावती मुठाळ यांनी आपले अनुभव व त्यातून जागृत झालेल्या जाणिवा, आलेलं भान तीन भागांत मांडलं आहे. प्रथम भागात त्या मोहिनीचं पालकत्व पेलणं, झेलणं नि त्यासाठी करावे लागलेले कायदेशीर व मनुष्याच्या अधिकारकर्तव्याचे द्वंद्व चित्रित करतात. दुसच्या भागात मोहिनीसाठी अनाथाश्रम सुरू केल्यानंतर ज्या कुमारी माता, अनाथ मुलं यांना संरक्षण देऊन त्यांचे संगोपन, शिक्षण, संस्कार करतात त्याचे विविध अनुभव व आठवणी विशद करतात. अधांतरी'चा तिसरा भाग। वैचारिक व वैधानिक आहे. यात त्या कुमारी माता व अनाथ मुले यांचा सांभाळ करणारं महिला व बालकल्याण मंत्रालय, आयुक्तालय, तेथील अधिकारी, यंत्रणा, मनुष्य-व्यवहार, कायदे, कायद्यातील त्रुटी यांच्यावर बोट ठेवत, त्यात सुधारणा झाल्या असल्या, तरी सुधारणेस अद्यापही भरपूर वाव असल्याचं अधोरेखित करतात.

 कोणतीही यंत्रणा व व्यवस्था कधीच निर्दोष असत नाही. सुधारणा, दुरुस्ती ही एक निरंतर समाजक्रिया आहे. त्यातूनच कल्याणाचा मार्ग विकासाकडे कूच करत असतो. प्रश्न आहे तो मनुष्य म्हणून जीवनव्यवहार

करण्याचा, अनाथ मुलं, मुली नि कुमारी मातांचं विश्व, त्यांचे कायदे, त्यांचं कल्याण करणारी वर्तमान व्यवस्था हा ‘अधांतरी'चा परीघ आहे. अनाथ मुलं नि कुमारी मातांची समाज व शासन स्तरावरील सद्यःस्थिती ‘धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का' अशी झाली आहे हे ‘अधांतरी'नं अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिलं आहे. त्यामागे या प्रश्नाविषयीची लेखिकेची जाण व तळमळ वाखाणण्याजोगी आहे. विकतचं श्राद्ध करणारी, निखार पदरात घेऊन फिरणारी फार कमी माणसं समाजात असतात. त्यात प्रा. प्रभावती मुठाळ यांचा समावेश करावा लागेल.

 एकविसाव्या शतकातील मनुष्यसमाज हा आत्मकेंद्रित जसा आहे तसा स्वार्थी नि संकुचितही! खरं तर तो आत्मकेंद्रित असल्यानेच संकुचित आहे. तुम्ही जसे निःस्वार्थी व्हाल तसे व्यापक होता. दूरचं दिसायचं तर जवळचं, हातातलं, केवळ आपलं पाहणं सोडायला हवं. दुःख केवळ आपलंच नाही, जगाचं पण असू शकतं नि आपल्यापेक्षा अधिक नि भयंकर असतं हे आपल्या पलीकडे जाऊन पहायला शिकल्याशिवाय दिसत नाही. स्वातंत्र्याच्या गेल्या बासष्ट वर्षांच्या प्रवासात आपला राजकीय प्रवास हा मतांवर डोळे ठेवून झाला. सामाजिक प्रश्नांकडे आपण जात, धर्माची उतरंड सुरक्षित राहील अशा बेतानेच पाहिलं. धर्मनिरपेक्षतेपेक्षा आपला जीवनव्यवहार धर्मांधच राहिला. परिणामी, खरा सामाजिक न्याय येऊच शकला नाही. त्याचे मुख्य कारण आपली सामाजिक न्यायाची कल्पनाच मुळी जात, धर्मावर उभी होती. खरी सामाजिक धर्मबुद्धी ही जात, धर्म, वंश, प्रांत, भाषा, संस्कृती, लिंग यापलीकडे जाऊन मनुष्यकेंद्रित हवी. दलितांचे प्रश्न आहेत. पण दलित लोक वंचितांचे प्रश्न आपले' मानतात का? मानत असतील तर त्यांच्या सोडवणुकीत त्यांचे योगदान काय? स्त्रियांचे प्रश्न आहेत. पण त्यात कुमारी माता, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित, वृद्ध, अशिक्षित स्त्रियांचे प्रश्न खरे ऐरणीवरचे प्रश्न नव्हेत का? सामाजिक प्रश्नांवर ‘आरक्षण' हा काही रामबाण उपाय नव्हे. शिवाय तो कालातीत नाही. तो समाजाच्या वंचित वर्गास मध्यप्रवाहात आणणारा सामाजिक न्यायाचा खुश्कीचा नि तात्पुरता मार्ग आहे. तो जात, धर्म, वंश, लिंगभेद न मानता ‘मनुष्य' या एकाच कसोटीवर लावणे शक्य नाही का? ते अधिक सर्वसमावेशक नव्हे का? सामाजिक समावेशन धोरणाचे वेळोवेळी मूल्यांकन होऊन वर्तमानात अधिक गरजू वर्ग कोण हे ठरवून त्यानुसार आपले कायदे, घटना, विकास योजना नको का तयार व्हायला? असे सारे सामाजिक प्रश्नांचे मोहळ ‘अधांतरी' वाचताना वाचकांच्या

मनात घोंघावत राहते. प्रश्नांची ही गांधील माशी पुस्तकात केवळ घोंघावते, तरी मनुष्य अस्वस्थ होतो. तिने आपल्या विखाराचा दंश केला तर समाजमनाची काय काहिली होईल याची कल्पनाच केलेली बरी!

 ‘अधांतरी' ही नवजात अनाथ अर्भकांच्या व्यथा-वेदनांची गाथा आहे. ती कुमारी मातांची तगमग तळमळीने व्यक्त करणारी करूण कहाणी आहे. सामाजिक धर्मबुद्धीअभावी व सामाजिक न्यायाचा हक्क स्वातंत्र्याच्या गेल्या बासष्ठ वर्षात ज्या प्रमाणात पदरी पडायला हवा होता तो पडल्यानं जे अरिष्ट ओढवलं त्याची ही कर्मकहाणी आहे. प्रासंगिक दयाबुद्धीनं, खोट्या सहानुभूतीच्या प्रदर्शनानं, स्वतःचे अधिकार न सवलती सुरक्षित ठेवून नवी रचना कधीच अस्तित्वात येत नाही. नवं मिळवायचं तर जुनं सोडावं लागतं. ‘जुनं ते सोनं' हा विचार केव्हाच इतिहास जमा झाला आहे. समाजातील दलित, वंचित, अपंग, स्त्री-पुरुष सामाजिक न्यायाच्या एकाच तराजूने जोखण्याची गरज आहे. त्यासाठी नव्या समाजजागराची वेळ येऊन ठेपली आहे. ती हे अधांतरी आपल्याला जाणवून देते. ज्यांना समाजाची धारणा व पुनर्रचना ‘मनुष्य' निकषावर व्हावी वाटते त्या सर्वांना हे पुस्तक नवी दृष्टी व बळ देते. ते दिल्याबद्दल प्रा. प्रभावती मुठाळ यांचे आभार नि अभिनंदन!

◼◼


दि. २ एप्रिल, २००९ ज्ञानदीप (बालकविता संग्रह) अशोक पाटील गमभन प्रकाशन, पुणे

प्रकाशन - जानेवारी, २00८
पृष्ठे - ६४ किंमत - ३२/

नव्या बालकवीच्या नव्या कविता


 मराठी बालकविता सुंदर नि सुस्वर केली ती बालकवी ठोंबरे यांनी. त्यांची कविता निसर्गस्पर्शी खरी. शिवाय ती बालचमूस भुरळ घालणारी म्हणूनही प्रसिद्ध! विसाव्या शतकातील या कवी नि काव्याची परंपरा जपणारे एकोणिसाव्या शतकातील ‘नव बालकवी' म्हणून अशोक पाटील यांचा परिचय करून द्यायला हवा. त्यांची बालकविता नवे विषय, नव्या कल्पना, कालसंगत मांडणी घेऊन येते म्हणून तिचं वर्णन ‘नव बालकविता असेच करावे लागेल.
 नव बालकवी अशोक पाटील हे संवेदनशील प्राथमिक शिक्षक होत. आताशा गावाकडेच शिल्लक राहिलेलं भाबडेपण त्यांच्यात आहे. असं असलं तरी त्यांना नागरी बालविश्व बदलल्याची जाण आहे. त्यांचा पिंड शिवारातील दगड-माती, गवत, रानफुलं यावर पोसला असल्यानं त्यांच्या कवितेत निसर्गही सतत पोसावर आलेला आढळतो. ज्ञानदीप' हा त्यांचा पहिला बालकविता संग्रह होय. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याच्या योजनेतून त्यांना अनुदान लाभले आहे. गमभन प्रकाशनाने या नव्या बालकवीचं कवितेतील पहिले गमभन साहित्याच्या पाटीवर गिरवून त्याला एक प्रकारे गौरवान्वित केले आहे. ही बहुगुणी बालकविता आमचे गुरूबंधू व ज्येष्ठ बाल साहित्यिक

श्याम कुरळे यांच्यामुळे वाचण्याचा योग आला आणि हा परिचय प्रपंच घडला याचा मला मनस्वी आनंद आहे.


“अंधाच्या रात्रीत मुलांच्या हाती ज्ञानदीप' व्हावे
उजळून त्यांची वाट सुखाने हसत-खेळत राहावे
.
 अशी आकांक्षा मनी ठेवून अशोक पाटील यांनी या संग्रहातील ५४ कविता लिहिल्या. खरं त्या लिहिल्या गेल्या असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल कारण ह्या कवितात जी उत्स्फूर्तता आहे ती लिहिल्या गेल्यासारखं क्रियापद सार्थ करणारी होय. या कवीस पहिली कविता स्फुरली ती एका विद्यार्थिनीनं लिहिलेली कविता पाहन, ‘शिष्यात् इच्छेत् पराजयः।' सारख्या

ओळी ख-या ठरतात ते अशा कवींच्या प्रांजळ स्वीकृतीतून. विद्यार्थी कधी-कधी शिक्षकांचा खरा गुरू ठरतो हे अशा प्रसंगातून अधोरेखित होतं.
 ‘ज्ञानदीप' बालकविता संग्रह विषय, आशय, मांडणी, प्रतीक रचना, उपमा, दृष्टान्त अशा अनेक अंगाने विचार केला तर वैचित्र्य आणि विविधतेने नटलेला असा काव्यसंग्रह होय. त्यात शाळा, गुरुजी, आजी, घड्याळ, चांदोबा, वाघोबा, मनीमाऊ, मोतीभाऊ, बाहुली, पतंग असं सारं बालसुलभ विषयविश्व प्रतिबिंबित आहे. बालविश्वाच्या कुतूहलास निसर्ग नेहमीच खुणावत असतो. तसा तो या संग्रहातही वाकुल्या देत राहतो. यात ढग, पाऊस, पक्षी, इंद्रधनुष्य आहेत पण ते पारंपरिक नाहीत. अशोक पाटील यांच्या या कवितेत बदललेल्या परिस्थितीची जाण असल्यामुळे यात पर्यावरणाचा विध्वंस, लोडशेडिंग, फास्टफूडचा जमाना, संगणक असे विषय आपसूक येतात. त्यात बालसुलभ जिज्ञासेची जी झालर आहे, त्यामुळे ही कविता बालगोपाळांना भुरळ घालणारी ठरते. यात गेयता आहे. हितगूज आहे. लळा आहे. ताल व संगीतही आहे. त्यामुळेच ही कविता मी गंमत म्हणून माझ्या नातवास वाचून दाखवल्या तेव्हा त्याचं मान डोलावणं, मुरका घेणं, टाळी देणं, डोळे विस्फारणं सारं या काव्याच्या यशस्वीतेची दाद देणं होतं, हे वेगळे सांगायला नको. |
 ‘ज्ञानदीप'मधला आरसा असा हुबेहुब आहे


‘मीच तसा, तुम्ही जसे ।
प्रतिबिंबित जे रूप तसे'।
 आरशाचं स्वतःचं असं काहीच नसतं. ते असतं तुमचं प्रतिबिंबित हे ‘आरसा' कविता समजाविते. ही कविता केवळ शब्दप्रपंच नाही. ती स्वच्छता, व्यवस्थितपणा, टापटिपीच्या टीपाही मुलांना देते. म्हणून तिचं शैक्षणिक नि संस्कारी असं महत्त्व आहे. ज्ञानदीप ही कविता कळीच्या

पाकळ्या फुलविण्याची क्षमता घेऊन येते.

सुरुवातीस असू आम्ही
उमलणाच्या कळ्या
ज्ञानवसा लाभताच
फुलतील पाकळ्या
 तीत संस्कारांचा नंदादीप सतत तेवत असतो हे ‘पणती’ सारखी कविता वाचली की लक्षात येतं. 'ज्ञानदीप' मधील ‘गाऊ भारत गान', ‘भारत देश महान', 'एक फूल - एक झाड' सारख्या कविता देशप्रेम शिकवितात. तर 'येईल मेघराजा', 'निसर्गाशी प्रेम करा रे', 'चांदोबाला आमंत्रण', सारख्या कविता पर्यावरण संरक्षणाचं भान देतात. या कवितात ‘नवता' ही अनेक अंगांनी सामोरी येते. यातल्या घड्याळाची किल्ली गायब आहे. त्याला लागतो ‘सेल' चा खाऊ. यातली मुलं भाजी-भाकरी खातात तसं फास्टफूडही चाखतात. यातला पंखा लोडशेडिंगमुळे लहरी झालाय. यातले ढग मुलांची बालसुलभ जिज्ञासा चपखलपणे व्यक्त करतात.
गडगडणाच्या ढगात आई
कोण वाजवी ढोल?
एवढ्या ऊंचावरून त्यांचा

जात नाही का तोल?
 असं विचारणारी कविता मुलांची कधी होते ते कळतसुद्धा नाही. इथल्या चांदोबाला लपायला लिंबोणीचं झाड उरलं नसल्याची खंत वाचली की माणसानं निसर्ग कसा ओरबाडून टाकलाय, ते प्रकर्षाने लक्षात येतं. नुसता निसर्गच नाही तर आपला सांस्कृतिक विध्वंसही हा कवी ‘मामाचा चिरेबंदी वाडा' जमीनदोस्त झाल्याचं वास्तव रेखांकित करतो नि मन सुन्न होतं.
 ‘ज्ञानदीप' मधील कविता एकाच वेळी रंजक असते व प्रबोधकही। असं आगळं रसायन लाभलेली ही अपवाद कविता. तिच्या शब्दकळा सराईत नाहीत. कवितेत बालसुलभ तालाचा तिला अजून रियाज नाही. ती पहिली बाललीला आहे. तिच्यात बाललीलेचं सारं लालित्य आहे, अद्भुतता आहे. कालसंगत अभिनवपण हे ‘ज्ञानदीप' चं खरं वेगळेपण. त्यामुळे ही कविता बालवाचकांना भुरळ घालेल. त्यांच्या मनाची मरगळ दूर करणारी विनोदची लकेरपण त्यात आहे.


पंखेदादा फिरून तुम्हा
येत नाही का चक्कर?

 विचारणारी ही कविता मुलांचं खरं सारं मानस प्रतिबिंबित करते नि म्हणून ती रंजकही ठरते. ज्ञानदीप' हा बहुगुणी बालकविता संग्रह नव्या बालपिढीस बहुश्रुत केल्याशिवाय राहणार नाही.

  बालकवितेसाठी लिहिलेली ही प्रौढ प्रस्तावना बालकांच्या शिक्षक व पालकांसाठी लिहिली आहे. जेणेकरून ते हा ‘ज्ञानदीप' बालकांच्या हाती ठेवतील व कवीच्या आकांक्षेप्रमाणे बालमन हसत-खेळत राहील, असा मला विश्वास वाटतो.

◼◼

पेशंटचे किस्से (आठवणी)
डॉ. शरद प्रभुदेसाई
डायमंड प्रकाशन, पुणे
प्रकाशन - जुलै, २००८
पृष्ठे - ७६ किंमत - ६0/-



लोकव्यवहारातून समाजशिक्षण देणारा अनुभवकुंभ

 डॉ. प्रभुदेसाई हे रत्नागिरीच्या पंचक्रोशीत एक समाजशील डॉक्टर म्हणून सर्वपरिचित आहेत. आयुष्यभर बालकांच्या सेवेत ते समर्पित आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त मुलांसाठी कार्य करणाच्या अनेक समाजसेवी संस्थांत । सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून सतत आघाडीवर असतात. रत्नागिरीचे रिमांड होम असो, “आविष्कार' सारखी मतिमंदांची शाळा असो वा लांजे महिलाश्रम असो; गरजू, अनाथ मुला-मुलींसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा ध्यास असलेले ते केवळ चळवळे डॉक्टर नसून मी त्यांना कळवळे समाजसेवक म्हणूनच अधिक ओळखतो.
 त्यांचा मूळ पिंड असा असल्याने आपल्याकडे येणा-या बालरुग्णांबद्दल त्यांना अतिरिक्त काळजी वाटणे स्वाभाविक आहे. यातून रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, समव्यवसायी यांच्याबद्दल ते सतत चिंतन, मनन, कृती करत राहतात. आपल्या व्यवसायात त्यांनी तीन दशकांपेक्षा अधिक काळ काढला. या प्रवासात हरत-हेचे रुग्ण, माणसे भेटली. रुग्णांबद्दलच्या त्यांच्या विचार व कृतींना सातत्याने त्यांना लिहिते केले. त्यातून पेशंटचे किस्से हे अनुभव, आठवणींचा संग्रह असलेले पुस्तक साकारले.
 डॉक्टरी व्यवसायात माणसास व्यक्तिगत जीवन असे नसते. तो रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी रुग्णांना उपलब्ध होणे ही या व्यवसायाची

पूर्वअटच असते. डॉक्टरला त्याचं म्हणून काही जीवन, हक्काचा वेळ असतो वा असावा हे रुग्णाच्या गावीही नसतं किंबहुना तो अष्टौप्रहर आपणास उपलब्ध असणे हा रुग्ण म्हणून आपला अधिकार आहे, असाच समाजप्रघात दिसून येतो. डॉक्टर पैसे घेतो हे खरे; पण तो मुळात एक समाजसेवी असल्याशिवाय या व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, हे प्रखर वास्तव होय.

 डॉ. प्रभुदेसाई यांना रात्रंदिनी रुग्णांचा ध्यास असतो. म्हणून रुग्णांबरोबर ते औपचारिक राहू शकत नाहीत. रुग्णांसाठी काम करत असताना त्यांची भूमिका निष्काम कर्मयोग्याची असते. एका अर्थाने फकिरी वृत्तीने ते ‘रुग्णोदेवो भव' म्हणून आपले कर्तव्य बजावत असतात. कुणाला त्याची जाणीव होते, कुणास होत नाही. पण ते आपल्या सेवा नि कर्तव्यभावनेवर अविचल, दृढ असतात. त्यामुळे त्यांना सुखी निद्रा नि मुद्रा लाभली आहे. त्या सर्व कर्तव्ययज्ञातील काही समिधा त्यांनी शब्दरूप केल्या नि वाचकांसमोर सादर केल्या आहेत. |

 ‘पेशंटचे किस्से' या आठवणींच्या ओंजळीत त्यांनी व्यवसायात आलेले ४0 अनुभव नोंदलेले आहेत. हे पुस्तक त्यांनी आत्मस्तुतीसाठी लिहिलेले नाही. त्यामागे समाजशिक्षणाचा उद्देश स्पष्ट आहे. डॉक्टरची रुग्णामध्ये किती मानसिक गुंतवणूक असते, हे सदर पुस्तकवाचनाने उमगते. यातून रुग्णांच्या कळा, वेदनांचा पाझर उमटतो. तद्वतच रुग्णांचे आई-वडील, नातलग यांच्या नाना कळा, त-हाही समजून येतात. डॉक्टर चांगला असून चालत नाही. ब-याचदा तो रुग्णांच्या हिताचे, हिताच्या उद्देशाने काही खरे बोल सुनावतो. डॉक्टरवाक्यं प्रमाणम्' असे प्रमाण मानून वागणा-या । रुग्णास लवकर उतारा येतो. डॉक्टरला रुग्णांचा लळा असतो म्हणून ते समुपदेशनातून, संवाद, प्रश्नोत्तरातून रुग्णांची पूर्वपीठिका, लक्षणे समजून घेतात. मग रोगाची पूर्वपीठिका, पूर्वकृती, पूर्वोपचार, पूर्वलक्षणे समजून घेऊन निदान निश्चिती महत्त्वाची. डॉक्टर प्रभुदेसाई समाजयोजनापेक्षा समुपदेशन महत्त्वाचे मानणारे डॉक्टर होत. | रुग्ण अंधश्रद्ध असतात. त्यांना त्या गर्तेतून बाहेर काढताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. बालरुग्ण रडतो. त्याच्या रडण्याचे निदान करायला तर्क-वितर्क, पूर्वानुभव सारे एकवटावे लागते. ते येरागबाळ्याचे काम नाही. ते केवळ डॉक्टरी पदवीने येत नाही. डॉक्टरमध्ये ‘माणुसकीची डिग्री', 'संवेदनासूचकांक किती चरमसीमेचा, टिपेचा - त्यावर निदान निश्चिती होते.


 निदान म्हणजे ५0% यश. उपचार हा खरंच उपचारच असतो. तो नर्स, कंपाऊंडरही करू शकतो. डॉक्टर देव वाटतो, ते त्यांच्या रुग्णांशी असलेल्या लळ्यामुळे, त्यांच्यातील गुंतवणुकीमुळे, रोगाची बाह्य लक्षणे एक असली तरी वास्तव भिन्न असू शकतं. ते रडके मूल' वाचलं की लक्षात येतं. या व्यवसायात ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्नाः' हे तत्त्व सर्वार्थाने लागू होते. ‘सब घोडे बारा टक्के’, ‘अंदाज पंचे दाहोदरसे' असं असत नाही. प्रत्येक वेळी यश येत नाही. निष्काम कर्मयोग्याप्रमाणे तुम्हास कर्तव्यपरायण राहावं लागतं. रुग्ण लहरी असतात, ढोंगी असतात याचं भान ज्या डॉक्टरला असते तो 'मामा' होऊ देत नाही. प्रसंगावधान पाहून वागणारा डॉक्टर अग्निपरीक्षेतून सहीसलामत सुटू शकतो. वड्याचे तेल वांग्यावर काढणारे रुग्णांचे नातेवाईक असतात, हे या पुस्तकातून उमगतं.
 ‘पेशंटचे किस्से' हे पुस्तक वाचून संपलं की लक्षात येतं की, हे रुग्णालयाशी संबंधित वा मर्यादित राहात नाही. सारा समाज एक मनोरुग्णालय आहे, याचं भान देणारं हे पुस्तक म्हणून केवळ एका डॉक्टरांच्या आठवणी, अनुभव, किस्से असं मर्यादित न राहता माणूस वाचणारी ती गाथा ठरते. एकविसावं शतक हे व्यक्ती अवलोकन व विकासाचे शतक आहे. या शतकात अनुभवजन्य लेखन हे समाजोपयोगी एक वरदान म्हणून पुढे येत आहे. या शतकात कल्पनेस महत्त्व आहे. ते साहित्यात नव्हे तर विज्ञानात. गेल्या शतकाचं साहित्य कल्पनाप्रचुर होतं. त्याची जागा अपरिचित, अलिखित अनुभवविश्वाने घेतली आहे. डॉक्टर शरद प्रभुदेसाई यांचं पुस्तक अशाच सर्वथा नव्या जगात आपणास घेऊन जातं. माणसांची नवी ओळख, नवे चेहरे, नवी पारख, नवी दृष्टी देणारं हे पुस्तक केवळ डॉक्टर नि रुग्णांमधील जीवनव्यवहार राहात नाही तर माणूस समजून घ्यायचा वस्तुपाठ म्हणून या पुस्तकांचे सामाजिक महत्त्व असाधारण आहे. त्यातून मिळणारं समाजशिक्षण लाख मोलाचं आहे. ते विद्यापीठाच्या उच्च शिक्षणातून मिळणार नाही. लोकव्यवहार व लोकशिक्षणासारखं खरं समाजशिक्षण नाही हेच खरे, असं भान देणारं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. त्यातून शिकावं व आपला परस्परांशी व्यवहार बदलावा, ही या पुस्तकाची खरी शिकवण होय. ती दिल्याबद्दल डॉक्टर शरद प्रभुदेसाईंचे अभिनंदन!

▄ ▄


दि. २६ जुलै, २00८ शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा संघर्ष (वैचारिक)
डॉ. अनिल सदगोपाल
भाषांतर - डॉ. उत्तरा कुलकर्णी
आरडंट प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - फेब्रुवारी, २०१०
पृष्ठे - ८0 किंमत - ६0/


समान शिक्षणाच्या सर्वंकष कायद्याची गरज

 जो देश शिक्षणाचा मूलगामी विचार व त्याचे दीर्घकालीन नियोजन करतो, तोच विकासाचे लक्ष्य गाठू शकतो. अल्पकाळात ज्या देशांनी चौफेर विकास केला अशा चीन, जपान, इस्त्रायलसारखे देश पाहताना हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. आपला देश १५ ऑगस्ट, १९४७ ला । स्वतंत्र झाला. सन १९५० ला राज्यघटनेद्वारे तो प्रजासत्ताक झाला. आपल्या देशाच्या राज्यघटनेत कलम २१(क) अन्वये ‘सहा ते १४ वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी विधिद्वारा निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. ‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा - २00८ अन्वये ते सकृतदर्शनी पाळले गेले असे दिसत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. प्रत्यक्षात ३ ते १८ वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे सार्वजनिक शिक्षण मिळते तर येथील प्रत्येक नागरिक किमान शैक्षणिक पात्रता धारण करणारा ठरला असता त्यामुळे हा देश संपूर्ण साक्षर होणे शक्य होते. पण नव्या कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्या समाजात समान शिक्षण पद्धती ऐवजी ऐपतीप्रमाणे शिक्षणाचे नवे धोरण रुजवू पाहात आहेत. त्यामुळे शिक्षणात पंक्तीप्रपंच सुरू होईल. सर्वसामान्य नागरिकास मोफत शिक्षण मिळेलच याची शाश्वती हा नवा कायदा देत नाही. उलट धनदांडग्या

प्रशस्ती/६८

वर्गाला मोकळे रान व गरिबाला कुंपणातच गवत खावे लागण्याचा काच हा कायदा देईल. डॉ. अनिल सदगोपालांनी हे मूलभूत शिक्षणाचे भयाण वास्तव आपल्या मूळ हिंदी पुस्तकात शब्दबद्ध केले. ते पुस्तक आहे - ‘संसद में शिक्षा का अधिकार छिनने वाला बिल' डॉ. उत्तरा कुलकर्णी यांनी त्याचा उत्कृष्ट मराठी अनुवाद केला. तो ‘शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा संघर्ष' या शीर्षकाने. ‘आरडंट ह्यू'चे संपादक व प्रकाशक प्रभाकर आरडे यांनी तो प्रकाशित करून प्राथमिक शिक्षणासंबंधी केंद्र व राज्य सरकारचे खायचे व दाखवायचे दात वेगळे कसे आहेत हे दाखवून दिले आहे. त्याबद्दल मूळ लेखक, अनुवादिका व प्रकाशक समाज कृतज्ञतेस तसेच अभिनंदनास पात्र आहे.

  हे सारे करायला कार्यकर्त्यांची कुळी कळवळ्याची असावी लागते. डॉ. अनिल सदगोपाल यांनी देशभर प्राथमिक शिक्षण विषयक जागर घडवून आणला आहे. हे पुस्तक वाचताना पानोपानी या कळवळ्या कार्यकत्र्याची धडपड लक्षात आल्यावाचून राहात नाही. मूळ पुस्तक महाराष्ट्रातील सर्वदूर कार्यकत्र्यांपर्यंत पोहोचावे म्हणून राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी केलेले जिवाचे रान मी अनुभवले आहे. त्यांचेही डॉ. अनिल सदगोपालांइतकेच समाजावर ऋण आहेत.

 बाल शिक्षण हा मनुष्य घडणीचा पाया असतो. ज्या पिढीस बाल शिक्षण समृद्ध स्वरूपात मिळतो त्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वाचा अष्टपैलू विकास झाल्याशिवाय राहात नाही. बालवाडी व अंगणवाडीद्वारे आरंभिक संगोपन, आहार सुविधेसह बालशिक्षण सर्वांना समानपणे, हक्काने व मोफत मिळायला हवे. त्यामुळे देशातील बाल्य सुदृढ होईल व उमलत्या वयात शिक्षणाविषयी आनंददायी व सर्जनात्मक ओढ त्यांच्यात निर्माण होईल. पूर्व प्राथमिक शिक्षणानंतरचे प्राथमिक शिक्षणही तितकेच महत्त्वाचे, सर्वोच्च न्यायालयाने म्हणून तर उन्नीकृष्णन निवाड्यात शिक्षणाचा समावेश ‘मूलभूत हक्क' म्हणून केला. पण नव्या शिक्षण कायद्यातील तरतुदीने यास कसा हरताळ फासला आहे हे या पुस्तकात वाचत असताना कायदे करणारे शिक्षणतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी व पर्यायाने सरकार गांधारीची पट्टी ओढून अंधत्व का स्वीकारते याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.

 हे पुस्तक जे कोणी शिक्षक, नागरिक वाचतील त्यांना विद्यमान कायद्याच्या त्रुटी व फोलपणाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. तसे झाले तर अनुवाद व मूळ लेखन सार्थकी ठरेल असे होईल. देशातील

सर्वांना समान गुणवत्तेचे व विकासाच्या समान संधीचे शिक्षण उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी होय. कल्याणकारी राज्यव्यवस्थेत ते अपेक्षित असताना जर शासन शिक्षणाविषयी निर्गुतवणुकीचे धोरण स्वीकारेल तर ते घड्याळाचे काटे उलटे फिरल्यासारखे होईल. हा देश । २०२० साली महासत्ता व्हायचा तर ३ ते १८ वयोगटातील सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणारा सर्वसमावेशक व सर्वंकष कायदा होणे कालसंगत उचललेले पाऊल ठरेल.

◼◼

५ फेब्रुवारी, २०१० ठिगळ (आत्मकथन)
गुलाबराव आवडे
शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - मे, २०१०
पृष्ठे - ११४, किंमत - १00/

_____________________________________
धर्मातरित दलितांच्या वेदनेचा

  गुलाबराव आवडे यांचे आत्मकथन ‘ठिगळ' हे एका सामान्याचं असामान्य जगणं शब्दबद्ध करतं. आजवर मराठी साहित्यात सवर्ण, दलित, ग्रामीण, स्त्री, वंचित अशा वेगवेगळ्या वर्गाचं जगणं शब्दबद्ध झालं आहे. परंतु जन्माने दलित, धर्मांतराने ख्रिश्चन व स्थित्यंतराने बौद्ध असा एकाच जन्मी त्रिधर्माचा प्रवास कराव्या लागणाच्या माणसाची परवड मात्र ‘ठिगळ'मुळे पहिल्यांदाच मराठीत व्यक्त झाली आहे. ठिगळ' प्रतीकात्मक आहे. ते दुय्यमतेचं प्रतीक आहे. ‘आदमी होकर भी आदमी से एक दर्जा नीचे जीने की कसक' असं हिंदीत आत्मकथेचं एक सूत्रवाक्य आहे. त्या भरतवाक्याची सारी वेदना या ‘ठिगळ' मध्ये आपणास वाचण्यास मिळते. ।
 श्री. आवडेंचा जन्म दलित समाजात झाला. घरची गरिबी, पोट काढण्यासाठी ठिगळ जोडीचा व्यवसाय त्यांचे कुटुंब करतं. त्या वेळी पोरास शिकवायचं स्वप्न दलित कुटुंब पाहू शकत नव्हतं. कारण दोन वेळच्या भाकरीची भ्रांत. भूक हाच त्याच्या जीवन-मरणाचा यक्षप्रश्न! अशात मग कोडोली, बोरपाडळे परिसरात त्यावेळी कार्यरत असलेल्या ख्रिश्चन धर्मगुरू, पाळक यांच्या सहवासात हे कुटुंब येतं. धर्मांतराने शिक्षणाची कवाडे किलकिली होतात. खेडं सुटतं. शहरात सामाजिक मोलाच्या संभावना खुणावू लागतात. पण जात नि धर्माच्या द्वंद्वात अडकलेलं

प्रशस्ती/७१ 

श्री. आवडे यांचं जीवन आयुष्यभर त्या दोन्हींचा ऊन-पावसाचा खेळ होऊन जातं. अशाच धर्मांतरित दलित महिलेशी त्यांचं लग्न होतं. गुलाबराव मोठी तोशीस सहन करून आपल्या अल्पशिक्षित पत्नीस शिकवून शिक्षिका करतात. स्वतःही वीज मंडळात कामगार शिक्षक होतात. माणसाचं शिक्षक होणं त्यातही दलित समाजातील माणसाचं शिक्षक होणं यात सामाजिक स्थित्यंतर आहे. सुरवंटाचं फुलपाखरू होणं ज्यांना माहीत आहे त्यांनाच आवडेंच्या जीवनातील सामाजिक कायाकल्प कळेल. मग लेखन, वाचन, भाषण, शिक्षण, प्रशिक्षण, पुरोगामी व्यक्ती व विचाराच्या वारशांनी ते एका जन्मात सात जन्मांची चढण चढून आज उच्चभ्रू म्हणून जगताना, मिरवताना मी पाहतो तेव्हा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांच्या विचार, व्यवहाराचं मोल पुन्हा अधोरेखित होतं.

  मी त्यांच्या कुटुंबाचा निकटवर्ती असल्याने कागदोपत्री दलित असलेलं हे कुटुंब संस्काराने ख्रिश्चन असलं तरी बौद्ध धर्माचे व्यवहार समाजरूढी म्हणून परंपरा म्हणून पाळताना जेव्हा मी पाहतो तेव्हा ती त्या काळच्या अनेक कुटुंबांची, एका मोठ्या संख्येच्या समाजवर्गाची घालमेल म्हणून माझ्या पुढे येते. कदाचित जात नि धर्मयुक्त केवळ 'माणूस जिणं' या कुटुंबाच्या वाट्यास येतं, तर आजच्यापेक्षा अधिक मोठी भरारी, झळाळी या कुटुंबास लाभती. दोन मुलं इंजीनिअर, एक डॉक्टर, एक सून डॉक्टर तर दुसरी उपजिल्हाधिकारी (तिचे जिल्हाधिकारी होणं आता केवळ कालगत औपचारिकताच) - मला आवडे यांची कथा स्वातंत्र्योत्तर दलित वर्ग विकासाची कथा म्हणून प्रातिनिधिक वाटते तशीच ती आगळी-वेगळी ही।

 फिलिप लेज्यून यांनी आपल्या 'अॅटो-बायोग्राफिकल पॅक्ट' या समीक्षा ग्रंथात आत्मकथेचं साहित्यिक स्वरूप स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात, ‘आत्मकथा ही गद्यात शब्दबद्ध झालेली प्रतिसादात्मक घटनांची एक शृंखला असते. अशा कथेत कथानायक आपला जीवनसंघर्ष वास्तव नि। वस्तुनिष्ठपणे प्रस्तुत करतो. त्यातून त्या व्यक्तीच्या विकासाचा एक आलेख आपसूकच तयार होतो. श्री. आवडे यांचं ‘ठिगळ' या व्याख्येचं मूर्त रूप. त्यात त्यांनी आपण, कुटुंबीय, परिजन सा-यांचं चित्र नि चारित्र्य रेखाटलंय. ते अधिक वस्तुनिष्ठपणे त्यांना मांडता आलं असतं. पण समाज आक्षेप पेलण्याचं बळ सर्वांच्यात असतं असं नाही. या कथेत आत्मविवरण । आहे, पण आत्मसमर्थन नाही. दुषण द्यायचे आहे, पण उपकृताच्या ओझ्याखाली दबलेलं जीवन त्यांना मोकळा श्वास घेण्याचं बळ वानप्रस्थातही


देत नाही. हा दोष व्यक्तीचा नाही. सामाजिक परंपरा, चाली, रूढी, जातीय उतरंड, धर्मभेद यांचंच ते अटळ अपत्य होय. श्री. आवडे ठिगळ' या आपल्या आत्मकथेत आपली जीवनगाथा क्रमबद्धपणे सादर करतात. पण पूर्ण करतात असं म्हणणे म्हणजे सत्याचा अपलाप ठरेल. प्रत्येक आत्मकथा लेखनामागे लेखकाचा उद्देश असतो. इथे जात व धर्माच्या कात्रीत सापडलेल्या माणसाची परवड शब्दबद्ध करण्याचा हेतू आहे. आपली सारी कथा त्यांनी क्रमबद्धपणे मांडली आहे. ती कलात्मक करता येणे शक्य होते. पण असे असले तरी प्रांजळ आत्मकथन म्हणून तिचे सौंदर्य राहतेच. ही आत्मकथा ‘जे जसे घडले तसे' अशा सरधोपट पद्धतीने आपल्यासमोर येते. त्यामुळे ती उद्देशाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. ती पोहोचती तर अधिक प्रभावी होती.

 श्री. आवडे यांना लेखनाची तळमळ असली तरी आपल्या मर्यादांचं त्यांना भान आहे. मनोगतातील पहिलंच वाक्य अशी टाळी घेतं. वर्णाश्रम व्यवस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय माणूस म्हणून असलेली अपेक्षित समानता साकारणार नाही याचं भान ‘ठिगळ' देतं. वर्तमान हिंदू समाज अठरापगड जातीच्या ठिगळाची गोधडी आहे. ती समता व स्वातंत्र्याच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी तलम वस्त्र बनवायची तर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, सामाजिक समायोजनेचे भान समाजात रुजायला हवे, हे ‘ठिगळ' वाचताना प्रकर्षाने जाणवते. ही जाणीव हेच या आत्मकथेचं फलित व यश होय. धर्मांतर झाले तरी समाजात मन्वन्तर घडले नाही याची । श्री. आवाडे यांची बोच त्यांच्या समाजशील व्यक्तिमत्त्वाची खूण होय.

 ‘ठिगळ'मुळे दलित, धर्मांतरितांच्या वेदनांना स्वर मिळाला आहे. आजवर दलित साहित्याने विशेषतः त्यातील आत्मकथनांनी जातीय परीघात राहनच लेखन केले आहे. धर्मांतरित नवबौद्धांच्या वेदना यात अधोरेखित झाल्या. त्यापण सूचकतेने व तुटकपणे. नवख्रिश्चन दलितांचं जीवन, जगण्याची घालमेल ‘ठिगळ'मुळे पहिल्यांदाच समाजासमोर येत आहे. एकविसावे शतक दया नि क्षमाशीलतेचे, सहिष्णुतेचे व्हायचे असेल तर जीवनाचे असे नवे कंगोरे पुढे आले पाहिजेत, हे ‘ठिगळ'चे ऐतिहासिक योगदान होय. ‘ठिगळ'चे प्रकाशन नव्या सामाजिक वस्त्रविणीची सुरुवात होय. शुभास्ते पंथानः सन्तु!

◼◼

दि. १७/३/२००९
रेव्ह. हेन्री हॉवर्ड : जीवन व कार्य (चरित्र)

गुलाबराव आवडे
डॉ. अजित आवडे, कोल्हापूर
प्रकाशन - डिसेंबर, २0१0
पृष्ठे - १६६ किंमत - १६६/
__________________________
कृतज्ञतेतून साकारलेले साग्र चरित्र


 भाषा व साहित्यव्यवहारात शब्द दोन प्रकारे रूढ होताना दिसतात. एका प्रकारात शब्दांतच आशय पुरेपूर भरलेला असतो, तो शब्दसामथ्र्यामुळे व्यवहारावर प्रभाव टाकतो. उदा. जिव्हाळा शब्द. तो प्रेम, आस्था, आपुलकी, आत्मीयतेने काठोकाठ भरलेला असल्याने त्या शब्दाचा वापर करताच, त्यातील गुणांचा झरा आपसूकच वाहू लागतो. दुस-या प्रकारात व्यवहारसामर्थ्य, सातत्यामुळे शब्दांना एका वेगळ्या अर्थसामर्थ्याची झळाळी येते. अशा पठडीतला शब्द आहे, मिशनरी झील (Missionary Zeal). शब्द आहे इंग्रजी; पण मराठीत तो बहुप्रचलित वा प्रचारित आहे. मिशनरी शब्द उच्चारला की, त्यास जोडून एक शब्द लागतो- ख्रिश्चन. ख्रिश्चन मिशनरी. त्यांनी जगभर धर्मप्रसाराचे जे कार्य सेवाभावाने नि समर्पणाने केले, त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी या शब्दाचा एक अर्थच रूढ होऊन बसला आहे आणि तो म्हणजे समर्पित व्यक्ती.
 मिशन अनेक प्रकारची असतात - धार्मिक, राजकीय, सामाजिक, कार्यविषयक वा अगदी युद्ध, हेरगिरी व अलीकडे दहशतवाद्यांचीही ती असतात. पण, लोकव्यवहारात या शब्दाला जो सकारात्मक व सर्जनात्मक अर्थ प्राप्त झाला आहे, तो ख्रिश्चन मिशन-यांच्या कार्यामुळे. ख्रिश्चन मिशनरींनी प्रामुख्याने दोन कार्ये केली (१) धर्मप्रचार, प्रसार व धर्मांतर

प्रशस्ती/७४

(२) दीन-दुबळ्यांची मानवसेवा. त्यात वैद्यकीय, शिक्षण, समाजोद्धार यांचा अंतर्भाव होतो. ख्रिस्ती मिशनरी कार्याचा प्रारंभ येशू ख्रिस्तापासून झाल्याचे मानले जाते. त्याचे कार्य इस्त्रायलपुरते मर्यादित होते. पण, त्याने शेवटची शिकवण दिली, ती होती, ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूनंतर त्याच्या अनुयायांनी हा आदेश तंतोतंत पाळला व ख्रिश्चन धर्माचा प्रसार जगभर झाला. त्यात सेंट पॉलचा सिंहाचा वाटा मानला जातो. फिलिप, बॉर्नाबस, मार्क अपोलो, मत्तय, लुक, योहान, सिलास प्रभृती आरंभीचे मिशनरी होत. त्यामुळे आशिया व युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला.
 भारतात आलेला येशूचा पहिला शिष्य ख्रिश्चन मिशनरी होता. सेंट थॉमस (थोमा). तो केरळमध्ये आला. त्याने तिथे सात चर्चेस उभी केली. अठराव्या शतकात आलेले रेव्ह. विल्यम कॅरी हे भारतातील आधुनिक मिशनरी कार्याचे जनक मानले जातात. ते बंगालमध्ये आले व त्यांनी धर्मप्रसार केला. महाराष्ट्रात मुंबई, अहमदनगर, वसईबरोबर दुर्गम भागात जाऊन खेडी, जंगल, डोंगर, दच्या ओलांडून जिथे विकासाच्या पाऊलखुणा उमटणे अशक्य, अशा ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी जात व तिथल्या लोकांची सेवा करत. हरिजन, आदिवासी, कोळी इ. वस्त्या त्या काळात माणूस म्हणून समाजाच्या खिजगणतीत नव्हत्या. समाजात अस्पृश्यता होती. जातीय उच्चनीचता, आर्थिक विषमता, धर्ममार्तंडांचे प्राबल्य, सावकारी पाश, प्रस्थापितांची शिरजोरी यामध्ये दीनदुबळ्या वर्गास कोणतेच स्थान नव्हते. विकासाचे पहिले हक्कदार असणारा हा वर्ग गावकुसाबाहेर उपेक्षित जिणे जगायचा. ख्रिश्चन मिशनच्यांनी त्यांना आपलेसे केले. सेवा, शिक्षण, आरोग्य, धर्म इ. माध्यमांतून त्याचे जीवनमान उंचावून, त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात 'माणूस' म्हणून प्रतिष्ठित केले.

  महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मिशनरी आले. त्यापैकी रेव्ह. डॉ. हेन्री जॉर्ज हॉवर्ड होते. ते मूळचे अमेरिकेतील. त्यांचे वडीलही धर्मप्रसारक होते. धर्मप्रचारकाचे शिक्षण, प्रशिक्षण व विविध देशांतील कार्यानुभव घेऊन, ते प्रेस्बिटेरियन मिशनमार्फत सन १९०७ मध्ये भारतात आले. प्रारंभी मिरज-सांगली परिसरात येऊन त्यांनी येथील लोकजीवन, भाषा, संस्कृतीचा अभ्यास केला. ते मराठी शिकले. त्या काळी मराठी मोडी लिपीत लिहिली जायची. ती लिपी त्यांनी अवगत केली व नंतर ते कोडोली (ता. पन्हाळा) येथे तत्कालीन कोल्हापूर संस्थानच्या अखत्यारीत असलेल्या भागात एका शाळेचे प्राचार्य म्हणून


रुजू झाले (१९०८). आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत (१९६८) सलग ६० वर्षे त्यांनी केलेले कार्य म्हणजे 'मिशनरी झील' या शब्दाचे मूर्त रूपच

 गुलाबराव आवडे स्वतः महार कुटुंबात जन्मले. स्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिश्चन मिशनच्यांच्या धर्मप्रचार, प्रसार व धर्मांतरामुळे त्यांचे कुटुंबीय ख्रिश्चन झाले असल्याने, त्यांचे शिक्षण ख्रिश्चन मिशन-यांच्या सान्निध्यात आले. त्यामुळे साहजिकच त्या धर्माबद्दल त्यांना सहानुभूती होती नि आहे. मधल्या काळात भारतातील मूळ हरिजन असलेले, धर्मांतराने ख्रिश्चन । झालेले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथील मागासवर्गीयांना घटनेने देऊ केलेल्या संधीचा फायदा करून घेणारे धर्मांतरित ख्रिश्चन आजही आहेत. आवडेंची हिंदू धर्माने हेटाळणी केली. ख्रिश्चन धर्माने त्यांना शिक्षणाने, संस्कारांनी मनुष्य बनवले. त्यांची नेत्रदीपक प्रगती झाली. मुलांना शिक्षण व नोकरी, कुटुंबाला घर, जागा, कर्ज इ. सुविधा दिल्या व कुटुंबाचे भौतिक जीवन समृद्ध झाले. जीवनाच्या संध्याकाळी सावली लांब होत चालली की, माणूस आपल्या जीवनाचा ताळेबंद तपासतो, तेव्हा त्याला महत्त्वाचे वाटतात ते माणूसपण देणारे घटक, व्यक्ती व संस्था! बौद्ध धर्मातील ‘अत्त दीप भव’ आणि ‘बायबल' मधील 'Know thyself' यांचा । संगम म्हणजे धर्मांतरितांचे जीवन!

  गुलाबराव आवडे यांनी या कृतज्ञतेपोटी रेव्ह. डॉ. हेन्री जॉर्ज हॉवर्ड यांचे लिहिलेले हे चरित्र म्हणजे एका परकीय माणसाने भारतात येऊन आपल्या समर्पित कार्याने भारताच्या डोळ्यांत घातलेले माणूसपणाचे अंजन होय. हे नुसते चरित्र नाही, तर भारतातील ख्रिश्चन मिशन-यांच्या कार्याचा व जीवनशैलीचा रेखाटलेला एक अभ्यासपूर्ण आलेख होय. हे चरित्र त्यांनी कृतज्ञतेपोटी लिहिले असले, तरी त्यात अतिशयोक्ती नाही की भाबडेपणाही । नाही. प्राप्त संदर्भाच्या आधारे रेखाटलेले हे साग्र चरित्र होय. ते त्यांनी सहा भागांत लिहिले आहे. संशोधकांची बैठक नसल्याने, चरित्रलेखनाच्या शास्त्रीय पठडीचा अभाव त्यात असला, तरी लेखकाची धडपड संशोधकापेक्षा कमी नाही, हे त्यांनी जमविलेले संदर्भ, व्यक्तींकडून आवर्जून करून घेतलेले लेखन, डॉ. हॉवर्ड यांच्या मुलाच्या लेखाचा करून घेतलेला अनुवाद, लिहिलेला इतिहास, जमविलेली छायाचित्रे, केलेली पायपीट व पदरमोड या सर्वांतून स्पष्ट होते. तसेच, रेव्ह. डॉ. हॉवर्ड यांच्याप्रती त्यांच्या मनातील आदरही स्पष्ट होतो. हे कार्य एकट्या गुलाबराव आवडे यांनी केले असले, तरी त्यात तत्कालीन उपकृत केलेल्या साच्या पिढीबद्दलची कृतज्ञता भरलेली आढळते. म्हणून हे चरित्र एका व्यक्तीचे असले, तरी समाजाने लिहिलेले वाटते. त्यास गौरवग्रंथाचे रूप येणे हे त्याचेच प्रतीक होय.

 या चरित्राचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, यातून रेव्ह. डॉ. हॉवर्ड याचे समग्र जीवन व कार्य समजते. एका परक्या ठिकाणी आपले पूर्वायुष्य, संस्कार, संस्कृती सोडून यायचे, जिथे जायचे तिथे त्या परिसराचा भाग होऊन जायचे, तिथले सुखदुःख आपले मानायचे, लोकांना लळा लावायचा, त्यांच्यातलाच एक होऊन राहायचे ही गोष्ट सोपी नाही. ते येरागबाळ्याचे काम नाही. ते केवळ ध्येयवेडेपणामुळे व तीव्र अंतःप्रेरणेने शक्य आहे. मिशनरी कार्य पाहता मला तर असे वाटते की, त्यांनी केलेले कार्य धर्मप्रेरणेने झाले असेल; पण ज्या माणूस धर्माचे ते जिवंत कार्य करायचे, त्यात त्यांना येशूची शिकवण प्रतिबिंबित झालेली अनुभवायला यायची. बायबलने जगात जे मोठे काम केले, ते हेच होय. जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंगभेद विसरून कितीही किळसवाणे व कठीण कार्य असो, ते करायचे, कारण खरा ईश्वर गरजेत शोधायचे तत्त्वज्ञान हे बायबलचे मोठे बलस्थान आहे. हिंदू धर्माने त्याची उपेक्षाच केली असे म्हटले तर वावगे ठरू नये. हजारो हिंद ख्रिश्चन होतात. हिंदचे मुस्लीम होणे आणि ख्रिश्चन होणे यात मूलभूत अंतर आहे. हिंदू मुसलमान झाले ते तलवारीच्या जोरावर. उलटपक्षी, ते ख्रिश्चन झाले ते हृदयपरिवर्तनामुळे. काही लोक आमिष वा लालूच दाखवून धर्मपरिवर्तन झाले, असे सांगतात. पण, सर्वांत मोठे ख्रिश्चनांचे यश भेदातीत मनुष्यस्वीकृतीत आहे, हे इतिहास व काळास नाकारता येणार नाही.

  रेव्ह. डॉ. हॉवर्ड हे हाडाचे शिक्षक व समाजसेवक होते. ते बहुभाषी होते. संस्कृत, इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, हिब्रू भाषा त्यांना अवगत होत्या. ते बहुश्रुत होते. भाषांतरकार म्हणून त्यांनी केलेले कार्य कोण विसरेल? गरीब ग्रामीण भारतीयांना शिक्षण देण्यानेच ते उर्जितावस्थेस पोहोचतील, अशी खात्री असल्याने त्यांनी शिक्षण हे मनुष्योद्धाराचे साधन मानून कोडोली कम्युनिटी स्कूलचा विस्तार केला. तिथे पिढ्या घडवल्या. रेव्ह. हॉवर्डचे कार्य एतद्देशीय जनतेस निरपेक्ष वाटले म्हणून तर त्यांनी त्या हायस्कूलचे नामांतर करून हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल केले. त्यांनी केवळ धर्मातराचे काम केले असते व ते सक्तीने केले असते, तर हे घडणे अशक्य होते, हे आपण समजून घेतले पाहिजे. सुवार्तेच्या कार्यापेक्षा सुजनांची सेवा त्यांनी अधिक केली, हे या चरित्रातून स्पष्ट होते. त्यासाठी त्यांनी चौफेर प्रयत्न केले. निधिसंकलन केले. इमारती उभ्या केल्या. हे सर्व लोकसहभाग व

लोकसहकार्याशिवाय शक्य नव्हते. लोक चोखंदळ असतात. ते देवाचे देवाला व सैतानाचे सैतानाला देण्याचा विवेक करतात, हे कोण नाकारेल?

  या चरित्रग्रंथातील समकालीनांनी लिहिलेल्या आठवणी रेव्ह. डॉ. हॉवर्ड यांच्या मोठेपणास दुजोरा देतात. यात रेव्ह. डॉ. हॉवर्ड यांनी आपली मुले आपल्याच शाळेत इतर उपेक्षित मुलांबरोबर शिकवून जो आदर्श घालून दिला होता, त्यास तोड नाही. रेव्ह. डॉ. हॉवर्ड निसर्गप्रेमी होते. प्रवासाची त्यांना आवड होती. ते अमेरिकेत जाऊन भारतीयांच्या गरजांची आवश्यकता पटवून देत व लोक त्यांना तेथून साहाय्य करीत. हॉवर्ड यांची मुले मराठी बोलत यात सर्व आले. हॉवर्ड हिंदू धर्म समजून घेत, हेही महत्त्वाचे. रेव्ह. डॉ. हॉवर्ड आपल्या मुलांना धोतर-फेटा व मुलीला साडी नेसवत असत, हे वाचून आश्चर्य वाटते. एकरूप होणे, मत, माणूस, माती यांच्याशी एक होणे हे, स्वविसर्जनाशिवाय शक्य नसते.

 अशा अनेक सौंदर्यस्थळांनी हे चरित्र भरलेले आहे. ते आपण मुळातून वाचावे. हा चरित्रग्रंथ म्हणजे एतद्देशीय उपेक्षितांच्या स्वीकाराची, विकासाची कहाणी आहे. ती परकेपणाचा चश्मा दूर केल्याशिवाय तुमच्या हृदयाला । भिडणार नाही. आज एकविसाव्या शतकातही भारतात जातीय भेद, धर्म, घृणा, जातीय अभिनिवेश, प्रांतवाद, भाषावाद उफाळतो. कारण, आपण खच्या माणूसविकासाचा मार्ग समजून न घेतल्याची ती खूणगाठ आहे. जोवर आपण जातिअंताचा प्रवास सुरू करून धर्मनिरपेक्ष माणूसकेंद्री भारताचे स्वप्न पाहणार नाही तोवर कितीही हॉवर्ड इथे खपले, तरी ते पालथ्या घड्यावर पाणीच ठरेल.

 गुलाबराव आवडे यांचे या देशकार्याबद्दल अभिनंदन!

◼◼

दि. २५ डिसेंबर, २०१० नाताळ

अनवाणी (आत्मकथन)
अंकुश गाजरे
रावा प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - मार्च, २०११
पृष्ठे - २०२ किंमत - रु. २00/
________________________________
परिस्थितीवर मांड ठोकणारं आयुष्य


 ‘अनवाणी' ही आहे अंकुश गाजरे यांची आत्मकथा. शेळ्या पाळून उपजीविका करणाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गरिबी, अज्ञान यांच्याशी दोन हात करत वाढणारं सात जणांचं कुटुंब जगवताना आई-वडिलांची होणारी त्रेधातिरपीट वाचत असताना वाटत राहतं की, असं दारिद्र्य कुणाच्याच वाट्याला येऊ नये. शेळ्या पाळताना डोंगर-दच्या पायी तुडवाव्याच लागतात. मग काटेकुटे तुडवत होणारा प्रवास म्हणजे रोज नवा पराक्रम अशीच स्थिती... या परिस्थितीत साधं पायी चप्पल आलं तरी विमान प्रवासाचं सुख लाभावं असा दिलासा देणारा क्षण...
 देवडे गावी पाचरुटाच्या छपरात आई-वडील आपल्या पाच मुलामुलींसह संसार ओढत दिवस काढत होते ते एकाच आशेवर... मुलं मोठी होतील, शिकतील व हे दिवस सरून जातील. अंकुन्या, आबी, कबी, मनुताई आणि लह सारी पोरं गुण्यागोविंदानं ताटात पडेल ते खाऊन आनंदात असायची. आई - वजानानी व वडील - परमानाना साच्या गावचे नाना-नानी होते. एक मासा सर्व मिळून खात. गुढीपाडव्याला पूजेला नारळ आणणं पण दुरापास्त असायचं. देवळातला नैवेद्य चोरून खात पोट भरणारी पोरं... कण्यांवर दिवस काढायची... भटकायची... शेळ्या हाकायची!
 एकदा एक गुरुजी अंकुन्याला भेटतात... त्याच्या कानात शाळेचं


प्रशस्ती/७९

स्वप्न घालतात तसा अंकुन्या शेळ्या सोडून शाळेच्या मागं लागतो... शाळेत जातो तशी गोडी वाढते... शिकू वाटायचं पण रोज अडथळ्यांची शर्यत... पाटी हाय तर पेन्सिल न्हाय... पुस्तक हाय तर वही नाय... रोज नवा लपंडाव... शिकणं सोपं नव्हतं. त्यातच बोहाळीन मामा आला... आबीला घेऊन जाया... सायकलवरून जात होता नि आबी पडली. अपघात पन्नास हजार रुपयांना पडला तशी हातची जमीन गमवावी लागली... पण आबी हाती आली. लुळी-लंगडी झाली तरी वाचली याचाच आनंद मोठा. तिला उजवायला मोठं दिव्य करावं लागलं.
 अशा स्थितीत अंकुश गाजरे मजल दरमजल करत शिकतात. सातवी, एस.एस.सी., बारावी आणि डी.एड्. ला प्रवेश मिळवण्याची कहाणी म्हणजे ‘अनवाणी' ही आत्मकथा. ती त्यांनी आपल्या बोलीभाषेत लिहून तिच्यात एक नवा प्राण भरला आहे.

 ‘अनवाणी' ही आत्मकथा मुळातूनच वाचली पाहिजे. तिची खरी रंगत तिच्या ग्रामीण बोलीत व अंकुश गाजरेंच्या स्वानुभवजन्य सहज शैलीत आहे. या आत्मकथेचं सौंदर्य तिच्या समीक्षेत नसून तिच्या आस्वादनात आहे. देवडे, शेळव्याचा परिसर म्हणजे अष्टौप्रहर दारिद्र्याशी झुंजणारा. पुरुष शेळ्या राखून फिरणार अन् कुटुंब शेती-भाती, पोरं-टोरं सांभाळणार असं अलिखित कार्य विभाजन असलेल्या घरा-घरात अज्ञान, अंधश्रद्धा पाचवीला पुजलेली... अशा कुटुंबात एखाद्या पोरानं शिकणं म्हणजे परंपरागत घरच्या अर्थचक्राला धक्का देणं अन् चलन बंद करणं असा समज. पण अंकुश गाजरे तो समज आपल्याला लाभलेल्या शिक्षणाच्या दिव्य दृष्टीने पुसण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा तो प्रयत्न म्हणजे परिस्थितीवर मांड ठोकण्याचाच पुरुषार्थ. तो ते आपल्या जगण्याच्या भाषेतून मांडतात. ‘अनवाणी'त येणारे पाटरु, चपकारा, सौन, निवद, रुटिंग, वटा, खाकूरासारखे शब्द याची प्रचिती देतात.

 अंकुश गाजरे ‘अनवाणी'त घर, प्रसंग, परिस्थिती विलक्षण सहजपणे जिवंत करतात. माझे पाय गळाटलं होतं. पोटात अन्नाचा कण नव्हता. पोटात भुकेनं कावळ्यांची भांडणं चालू होती. पायात चप्पल नव्हती. डोक्याला उन लागत होतं. जीव भुकेनं तीळ तीळ तुटत होता.' वाचताना हे लक्षात येतं. जगण्यातून येणा-या म्हणी, वाकुप्रचार पेरत ते आपलं लेखन लोकसाहित्याच्या पठडीत नेऊन बसवतात. शेळ्या पाळताना ती त्याची लेकरं होतात हे मैनीवरून अंकुश गाजरे समजावतात.

 शाळेतून चोरी करून आणलेली पुस्तके, त्यातून घडलेलं लंका दहन

या साच्या प्रसंगातून गावचा प्रामाणिकपणा उभा राहतो. शिक्षकांचं भय हे त्या समाजातील नैतिकतेला मिळालेलं वरदान असतं हे ही आत्मकथा समजावते. पोटच्या पोरांसाठी... त्यांचे उपचार, शिक्षण यासाठी कर्ज घेणं, जमीन विकणं यात शहाणपण नसतं पण शिक्षणानं दशा सरेल या एकाच आशेवर कमरेचं डोक्याला बांधून कफल्लक होणारी कुटुंब हे नव्या भारताचं शल्य... त्यात उद्ध्वस्तपण भरलेलं... पण माफ अशासाठी की, एका भाबडेपणावर ते उभं आहे... पोरगं शिकेल... हे दिवस बदलतील.

 परमानाना नि वजानानी ही ग्रामीण भारतीय कृषी संस्कृतीची प्रातिनिधिक पात्रं होत. अंकुन्या या व्यवस्थेतला आशेचा किरण... तो शिक्षक होईल मग सारं सरेल हा आशावाद... त्याचे पुढे काय झालं हे ही आत्मकथा सांगत नसली तरी ती एक शक्यतेची सावली सूचित करते. गरिबांना शक्यतेवर जगण्याशिवाय पर्याय असत नाही... 'Begger have no chooice' त्याप्रमाणे 'Poor have no voice' हेही तितकंच खरं... म्हणून अंकुशला 'कमवा आणि शिका' योजनेत लेडिज हॉस्टेलमध्ये दळायला जाताना वा कॅटिनमध्ये टेबल पुसताना, ऑर्डर सर्व्ह करताना स्वाभिमान, प्रतिष्ठा खुटीला टांगून अपमानाने जगावं लागतं ते एक नाइलाज म्हणून!

 ही आत्मकथा अंकुश गाजरे यांनी लिहून ग्रामीण आत्मकथेत एक मोलाची भर घातली आहे. त्यांची ही पहिली रचना असली तरी मोठी आश्वासक आहे. ती एक दीर्घकथा वा लघु कादंबरीचा घाट घेऊन येते. या आत्मकथेचं वैशिष्ट्य असं की, ती एक व्यक्तीची कथा न होता कुटुंबाचं आत्मकथन होतं... समूहाचं आत्मकथन असलेलं याचं रूप म्हणून अभिनव! त्यांचं लेखन त्यांच्या पुढील लेखनाच्या आशा जागवतं... त्या लेखनाच्या अपेक्षेसह अभिनंदन व शुभेच्छा!

◼◼

नॉट पेड (कथासंग्रह)
हरिशंकर परसाई
भाषांतर - उज्ज्वला केळकर
मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
प्रकाशन - सप्टेंबर, २०११
पृष्ठे - १४0 किंमत - १४0/
________________________
नॉट पेड रिसीट


 'नॉट पेड' हा हिंदी साहित्यातील व्यंगसम्राट हरिशंकर परसाई यांच्या निवडक व्यंगात्मक निबंध नि कथांचा अनुवाद संग्रह होय. हा अनुवाद श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी केलाय. त्यांनी आपल्या ‘अन् रजिस्टर्ड' या भूमिकेत स्पष्ट केल्याप्रमाणे मराठीत असे फारसे कुठे वाचायला मिळत नाही. म्हणून तो अनुवाद केला आहे.
  मराठी वाचक ज्याला स्थूल रूपाने विनोदी साहित्य म्हणतो त्याला हिंदीत ‘हास्य-व्यंग साहित्य' म्हणण्याचा प्रघात आहे. 'विनोद' आणि ‘व्यंग' यात मुळातच फरक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विनोद, उपहास, कोटी, विडंबन अशा विनोदाच्या अनेक परी आहेत. इसवी सन पूर्व कालखंडापासून विनोदी साहित्य लेखनाची व त्याच्या चिकित्सेची परंपरा विश्व साहित्यात आढळते. विनोद विचार प्लेटा, अॅरिस्टॉटलनी जसा केला तसा आपल्याकडे भरतमुनींनी पण. आधुनिक काळात थॉमस, हॉब्ज, जेम्स फीबलमन, ऑस्कर मॅडेल, इमॅन्युअर कांट, सिग्मंड फ्रॉईड, ऑर्थर कोसलर, मार्क ट्वेन प्रभृतींनी विनोदाची चिकित्सा केली आहे. मराठीत विनोदाचा प्रारंभ 'लीळा चरित्र'पासून मानला जातो. एकनाथ, तुकारामांच्या काव्यात त्याच्या छटा दिसतात. आधुनिक गद्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते मुकुंद टाकसाळेपर्यंतच्या विकास प्रवासात चिं.


प्रशस्ती/८२

वि. जोशी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. आ. बुवा, द. मा. मिरासदार, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, सुभाष भेंडे, रामदास फुटाणे आपणास भेटतात नि भिडतातही। हिंदीत कबीरापासून विनोद आहे पण तो व्यंगाच्या अंगाने जाणारा अधिक, मराठी विनोद कोटीच्या श्रेणीचा अधिक. विशुद्ध विनोदाची परंपरा हिंदी व मराठी दोन्ही साहित्यात क्षीण आहे.

  हरिशंकर परसाईंचं लेखन व्यंगात्मक विनोद शैलीनं अधिकांशतः झालंय. टोमणा, टिचकी, फिरकी, वस्त्रहरण, प्रहार, टीका, उपहास, आक्षेप या अंगानं जाणारं असल्यानं ते मराठी विनोदी साहित्यापेक्षा अधिक आक्रमक, आघात करणारं नि म्हणून बोचरं आहे. मराठी व हिंदी विनोदी साहित्याची स्थूल उद्दिष्टच भिन्न आहे. सर्वसाधारणपणे मराठीत विनोद रंजनासाठी लिहिला जातो. त्याला हिंदीमध्ये ‘हास्य' म्हणतात. शाब्दिक कोटीचा विनोद हिंदीत क्षीण. समाजाच्या विसंगतीवर बोट ठेवायचं, त्याची रेवडी उडवायची व ती नष्ट झाली पाहिजे म्हणून त्यावर कठोर प्रहार करायचा असा प्रघात. हिंदी काव्यातील विनोद मात्र रंजकतेकडे झुकणारा. दुष्यन्तकुमारांच्या काव्यात मात्र परसाईंसारखं गांभीर्य आढळतं.

 “नॉट पेड' मधील हरिशंकर परसाईंचे निबंध नि कथा जीवनाच्या अनेक अंगांचे नि प्रश्नांचे चित्रण करतात. माणसाची प्रसिद्धीची हाव, उच्च शिक्षणातील भ्रष्टाचार, प्रामाणिक माणसाचं भूकबळी होऊन मरण येणं, निंदा वृत्ती, साहित्याचे वैयर्थ, उपोषणाचं झालेलं अधःपतन, बुद्धिवाद्यांचं फोलपण, खासगी शिक्षणाची दुकानदारी अशा अनेक समकालीन प्रश्नांना हात घालत परसाई लिहीत राहतात. हे पाहिलं की लक्षात येतं की वर्तमान प्रश्न हेरण्याचं मोठं कौशल्य या लेखकात दडलेल्या निरीक्षकात आहे. परसाई एक समाजशील लेखक होत. व्यक्तीपेक्षा समाजकेंद्री असलेली त्यांची दृष्टी-त्यांचं मन सतत अस्वस्थ ठेवते. ही अस्वस्थता विसंगती हेरते. मग शब्दांची शस्त्रे होतात. एकाच वेळी रंजक व गंभीर लिहिण्याची सरमिसळ परसाईच करू जाणे. हिंदी समीक्षक व निबंधकार हजारीप्रसाद द्विवेदींनी व्यंग साहित्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना म्हटलं आहे की ‘व्यंग करणारा दबल्या ओठात हसत असतो तर ऐकणारा वा ज्याच्यावर व्यंग केलं जातं त्याचा मात्र तिळपापड होत राहतो. ही असते व्यंगाची शक्ती. एकीकडे त्यात व्यर्थ नसलेलं नष्ट करण्याची त्याच्या निर्दालनाची वृत्ती असते तर दुसरीकडे नवसर्जनाची ऊर्जाही! व्यंग लेखन पुरोगामी वृत्तीचं असतं. ते बौद्धिक खाद्य असतं. हे लेखन शिळोप्याचा उद्योग असत नाही. असेलच तर तो सामाजिक बांधिलकीचा खटाटोप असतो. म्हणून हरिशंकर

परसाईंचे 'नॉट पॅड'मधील निबंध नि कथा वाचून झाल्या... आपण हसलो नि विसरलो... असं होत नाही. परसाईंचे लेखन वाचकास हसवत-हसवत अंतर्मुख करतं. विचार करायला भाग पाडतं. विसंगती, विषमतेचं भान देतं. ते नष्ट करण्यास प्रवृत्त करतं. कोटीच्या श्रेणीतलं विनोदी लेखन साबणाचे फुगे, बुडबुडे असतात. त्यात व्यापकतेचा भ्रम असतो नि अस्तित्वाचा फोलपणाही! उलटपक्षी व्यंग वस्तुनिष्ठ सर्जन असतं.

 अलीकडच्या काळात मराठी विनोदावर गंभीरपणे व खोलवर विचार करणारा एक ग्रंथ डॉ. गो. मा. पवार यांनी लिहिला आहे. ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप त्यात त्यांनी विनोदाची तत्त्वे व त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्या विवेचनात मराठी साहित्यातील विनोदाची अनेक उदाहरणे दिली आहेत. ती वाचली तरी मराठी व हिंदी विनोदाची प्रकृती स्पष्ट होते. फरकही लक्षात येतो. यात कोणती भाषा श्रेष्ठ, कनिष्ठ असा भाव नाही. त्यातून प्रवृत्ती व प्रकृतीचा फरक अधोरेखित होतो हे मात्र खरे.
 हरिशंकर परसाई एक विनोदी लेखक म्हणून समजून घ्यायचे तर त्यांचं समग्र साहित्य वाचायला हवं. त्यांनी ९ कथासंग्रह, ३ कादंब-या, ९ निबंध संग्रह, २ व्यंग लेख संग्रह, ४ स्तंभ लेख संग्रह, १ शब्दचित्र संग्रह, १ आठवण संग्रह, आत्मचरित्र, संपादन, संकीर्ण असं विपुल व वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे. 'नॉट पेड' वाचल्यावर मराठी वाचकांच्या मनात समग्र परसाई साहित्य मराठीत अनुवादित व्हावं अशी इच्छा निर्माण होईल अशी आशा आहे. ती तशी निर्माण झाली तर त्यांचं श्रेय अनुवादिका उज्ज्वला केळकर यांना द्यावं लागेल. त्यांनी 'नॉट पेड'चा अनुवाद मनःपूर्वक केला आहे. तो प्रयत्नपूर्वक केल्याच्या अनेक खुणा या अनुवादात आढळतात. विनोदाच्या जशा अनेक परी तशा अनुवादाच्याही. हिंदीतील अनेक रचनांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. एकाच हिंदी कृतीचे अनेक मराठी अनुवादही आढळतात. या संदर्भात हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला' या काव्याचं उदाहरण चपखलपणे लक्षात येतं. या रचनेचे मराठीत पाच अनुवाद झाले असून ते अनुक्रमे सर्वश्री डॉ. तारा भवाळकर, शं. पा. जोशी, विजयकुमार चोकसी, नानासाहेब चौधरी व जहीर शेख यांनी केले आहेत. पैकी पहिले तीन तर एकाच वर्षी म्हणजे १९८३ मध्ये चौधरींचा गतवर्षी ‘ग्रंथाली'तर्फे तर जहीर शेखांचा याचवर्षी प्रकाशित झाला आहे.
  हरिशंकर परसाईंचं उपरोक्त वैविध्यपूर्ण लेखन वाचन असताना लक्षात येतं की विनोद, व्यंग, उपहास, कोटी या विनोदाच्या परी त्यांत सर्वत्र आढळतात. त्यात सामाजिक विसंगतीचं वैविध्य दिसून येतं. त्यामुळे त्यांच्या साहित्यास सामाजिक विसंगतीच्या इतिहासाचं, अभिलेखाचं रूप प्राप्त होतं. हिंदीत संत कबीरदासांनी ज्या पोटतिडकीने विसंगतीवर आघात केले, परसाई तितक्याच तडफेने ते वर्तमानात करताना दिसतात. म्हणून तर त्यांना हिंदीचे ‘आधुनिक कबीर' म्हणून ओळखलं जातं. परसाईंचं लेखन हे समकालाचं रडार' असतं. समाज काल कुठे होता, आज कुठे आहे नि उद्या कुठे जाईल याचा भविष्यवेध घेणारं हे लेखन सामाजिक अभ्यासकांना एक आव्हान असतं. त्यांचं लेखन येऊ घातलेल्या समाजाची ‘ब्लू प्रिंट मानली जाते.

 नॉट पेड' मधील या अनुवादित रचनांमधून आपणास हरिशंकर परसाईंच्या विनोद दृष्टीचं भान येतं. त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनाबद्दल केलेली विधानं या रचना वाचत असताना ध्यानी येतात -

 -व्यंग गरिबांसाठी ‘अॅलोपॅथी' नसते, न ‘होमिओपॅथी', ती फक्त ‘सिंपथी' असते.

 - व्यंग ‘स्ट्रक्चर' नसून एक ‘स्पिरीट' आहे. - पूर्वी व्यंगास लोक ‘शूद्र' मानत. आता तो ‘क्षत्रिय' झालाय. मला मात्र त्यास ‘ब्राह्मण' नाही करायचं. नाही तर तो नुसतं कीर्तन करत राहील.

 - जे हसतात, रडतात ती माणसं' असतात. तीच माझी ‘पात्रं' होऊ शकतात.

 - मी एक ‘हरवलेली वस्तू' आहे. तिचा पत्ता तुम्हीच आहात.

 - व्यंग वाचकाच्या संवेदनेस हादरवून सोडतं. ते त्यास सामाजिक विद्रूपाचा साक्षात्कार घडवून आणतं.

 - व्यंग सहेतुक असतं नि प्रतिबद्धही! - व्यंग सकारात्मक असतं नि रचनात्मकही।

 श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी आपल्या अनुवादात परसाईंची ही भूमिका उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. हा अनुवाद प्रमाणभाषेच्या जवळ जाणारा आहे. तो मराठी बोलीच्या जवळ जाता तर अधिक प्रभावीपणे वाचकांप्रत पोहोचला असता. या रचनातून मराठी वाचकांना अनेक जीवनभाष्य हाती लागतील. नाव होण्याची महत्त्वाकांक्षा धरण्यापेक्षा ते कमावण्यासाठी कष्ट आवश्यक असतात. साहित्य चौर्य प्रत्येक युगात असतं. फक्त युगानुरूप त्याचे चेहरे बदलतात. निःस्वार्थ उपोषण, हृदयपरिवर्तनाचं ओंगळ रूप स्वार्थावर उभं राहण्यासारखं मूल्यपतन दुसरं नाही. स्त्रीच्या भाबडेपणावरच पुरुषांच्या लबाडीचा वाडा टिकून आहे. अशा विधानांमुळेच परसाईंचं विनोदी लेखन विचारगर्भ होतं.

 मूळ कृतीबरहुकूम अनुवाद व्हायचा तर अनुवादकास अनेक व्यवधानं पाळावी लागतात. मूळ आशयास धक्का न लावता अर्थातरण व्हावं लागतं. विचार समजून घेऊन अनुवाद करावा लागतो. संदर्भाचं भान असावं लागतं. शैलीचं अढळपद सांभाळावं लागतं. कला, सौंदर्य जपणं अनिवार्य असतं. लेखकाला जे सांगायचं, सुचवायचं असतं ते पकडून त्याचे हुबेहूब प्रतिबिंब उमटवावं लागतं. ज्या भाषेत अनुवाद करणार त्या भाषेची पुरी जाण असणं पूर्वअटच असते म्हणा ना! हे सारं सांभाळत श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी हा अनुवाद केला आहे. अनुवाद व कवितेची निर्मिती प्रक्रिया कधी कधी एकसारखी असते. उर्दू भाषेत ती समजून सांगणारे दोन शब्द आहेत - ‘आमद’ नि ‘आर्बुद'. जी कविता स्वयंस्फूर्त असते तिला ‘आमद' म्हणतात, तर प्रयत्नसाध्य असते तिला ‘आर्बुद' म्हणतात. खरा अनुवाद स्वयंस्फूर्त असतो. मूळ कृती अनुवादकाला। भिडली की अनुवाद झरत राहतो. म्हणून अलीकडे अनुवादास ‘पुनःसर्जन’ मानलं जातं. श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी त्या वृत्ती नि तादात्म भावाने तो केला आहे. हा अनुवादिकेचा प्रारंभिक रियाज आहे. त्यात अनुवाद कौशल्याचं पक्वपण अपेक्षिणं चुकीचं. पण यात परिपूर्णता आणण्याचा अनुवादिकेचा आटापिटा, तळमळ शब्दागणिक प्रकट होते. त्यामुळे भविष्यकाळात त्यांच्या हातून यापेक्षा उत्कृष्ट अनुवाद मराठी वाचकांना भविष्यात वाचण्यास मिळतील. तशा संभावना या अनुवादात जागोजागी दिसून येतात. हरिशंकर परसाई पचवून तो प्रतिबिंबित करणं हे शिवधनुष्य । उचलण्यासारखं आहे. ते साहस करून श्रीमती केळकर यांनी आपली भाषा क्षमता, अनुवाद कुशलताच सिद्ध केली आहे.

 'नॉट पेड' मध्ये श्रीमती उज्ज्वला केळकर यांना भावलेल्या हरिशंकर परसाईंच्या निवडक कथा व निबंध आहेत. पण काही निमित्ताने समग्र परसाई वाचलेल्या माझ्यासारख्या वाचकास अशी चुटपूट लागून राहते की 'Yet good translations are to be done' ... उल्लेखच करायचा तर ‘बेचारा भला आदमी', 'ठिठुरता हुआ गणतंत्र', 'पहिला सफेद बाल', ‘विकलांग श्रद्धा का दौर', 'प्रेमचंद के फटे जुते' सारखे निबंध नि ‘सदाचार की ताबीज', 'वैष्णव की फिसलन’, ‘अकाल-उत्सव', 'गांधीजी का शाल’, ‘एक के भीतर दो आदमी' सारख्या कथा - ज्यांना परसाईंच्या श्रेष्ठ रचना मानता येईल अशांचाही मराठी अनुवाद होणे आवश्यक आहे. 'नॉट

पेड’ ट्रेलर आहे. मुख्य चित्रपट पाहणं बाकी आहे. तोही अनुवादक दाखवतील ही आशा. प्रयत्नांना शुभेच्छा!

◼◼


दि. ११ ऑगस्ट, २00८
ऑलिंपिक अभिनव सुवर्णपदक
संपादन स्मृतीप्रित्यर्थ

लोकराजा शाहू व अन्य एकांकिका (एकांकी संग्रह)
डी. के. रायकर
वंदना रायकर, कोल्हापूर
प्रकाशन - सप्टेंबर, २०११
पृष्ठे - ७0 किंमत - ५0/
_________________________________

रंगमंचीय एकांकिका


 ‘लोकराजा शाह व अन्य एकांकिका' हा डी. के. रायकर यांच्या पाच एकांकिकांचा संग्रह होय. रायकर हे मूलतः शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक असले, तरी त्यांच्यात एक प्रयोगशील नाटककार दडलेला आढळतो. माणसात अनेक गुण सुप्त असतात. ते प्रसंगाने, गरजेने प्रकट होत असतात. माध्यमिक शाळेत विद्याथ्र्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व संस्कारांसाठी नित्य नव्या स्पर्धा, महोत्सव, मेळावे, कार्यक्रम होत असतात. कधी कधी ते विशिष्ट विषयाला वाहिलेले असतात. त्या विषयानुषंगिक सादरीकरणासाठी तयार साहित्य प्रत्येक वेळी हाती येतंच असं नसतं. मग तिथे शिक्षकाची कसोटी पणाला लागते. विशेषतः वर्तमान वा तात्कालिक संदर्भ वा विषय प्रतिबिंबित करणारं नाटक, निबंध, एकांकिका, कविता, कथा मिळणं दुरापास्त असतं. अशावेळी रायकरांसारखा शिक्षक प्रश्नास आव्हान मानून मार्ग काढतो. मग तो स्वतःच लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, चित्रकार होतो. यासाठी माणसात शिक्षक नामक वृत्ती उपजत असावी लागते. ती रायकरांकडे असल्याने त्यांनी विविध एकांकिका स्पर्धांत भाग घेण्याच्या गरजेतून या एकांकिकांचं लेखन केलं असलं तरी त्यात कलात्मकता, विषय नावीन्य, रंगमंचीय भान असल्याने त्या एकांकिका नामांकित नाटककाराच्या तोडीच्या झालेल्या आहेत.


प्रशस्ती/८८

 डी. के. रायकर हे माझे योगायोगाने महाविद्यालयीन विद्यार्थी. त्या काळात हा गरीब, आज्ञाधारक, मेहनती विद्यार्थी म्हणून आजही तो माझ्या लक्षात आहे. शिक्षक होणं... गरीब विद्याथ्र्यांचे शिक्षक होणं आज देण्याघेण्याच्या काळात सोपं राहिलं नाही. तरी त्यांनी स्वतःच्या नम्र नि । कष्टकरी वृत्तीनं ते करून दाखवले. तो माझ्याच शाळेत माझ्यासारखे शिक्षक झाल्याचा मला आनंद आहे. या संग्रहातील अनेक एकांकिका त्यांनी विविध स्पर्धांत केवळ सादर केल्या नाहीत तर त्या अव्वल ठरल्या, पुरस्कार मिळाले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! यातली ‘दहशतवाद ही एकांकिका हिंदीत लिहिल्याचा मला विशेष अभिमान अशासाठी वाटतो की कधी काळी मी त्याला हिंदी शिकवलं होतं. सगळ्याच बिया काही खडकावर नाही पडत. कुठे, कधी त्या सांदी-कोप-यात पडतात, रुजतात. रोपांचे वृक्ष होतात ते असे.

  या संग्रहातील 'लोकराजा शाह' एकांकिकेत रायकरांनी राजर्षी शाह छत्रपतीच्या लोकोपयोगी वृत्तीचे चित्रण केले आहे. हा राजा प्रजाहितदक्ष होता. विविध योजनांकडे त्याचे बारीक लक्ष होते. दुष्काळात रयतेस कष्ट पडू नयेत म्हणून तो काळजी करायचा नि घ्यायचाही. या एकांकिकेतील कृष्णा मोरे, गंगाराम कांबळे, धनगर इ. जनसामान्यांना हा राजा कसा मदत । करायचा त्याचं चित्रण आहे. तंटामुक्त गाव'मध्ये शासनाच्या या नव्या योजनेद्वारे चावट गाव कसे सुधारले त्याचे मार्मिक चित्रण केले आहे. ‘राजा प्लॅस्टिक पर्यावरण जागृती करणारी एकांकिका. तीमध्ये रायकरांनी प्लॅस्टिकने निसर्ग व मनुष्य जीवन कसे वेठीस धरले आहे ते दाखवले आहे. राजाची आठवण' एकांकी राजर्षी शाहू महाराजांच्या द्रष्ट्या सुधारणा, सुविधांची आठवण करत आज त्याकडे झालेले दुर्लक्ष ऐतिहासिक दृष्ट्या अक्षम्य । असल्याची जाणीव निर्माण करते. वरील चारही एकांकिकांपेक्षा सर्वार्थाने भिन्न एकांकी आहे ‘आतंकवाद'. एक तर ती हिंदीत लिहिली आहे. राष्ट्रप्रेम हा तिचा संदेश आहे. दहशतवादाचं संकट किती भयंकर आहे, हे सदरची एकांकिका स्पष्ट करते.   ‘लोकराजा शाहू व अन्य एकांकिका' मधील सर्वच नाटकं ही सादरीकरणासाठीच लिहिली गेली असल्याने प्रत्येकात अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, संकलन त्रय (स्थल-काल-प्रसंग एकात्मिकता) इ. चं भान राखलं आहे. एकांकिका शालेय मुलं करणार हे गृहीत असल्याने त्यांची भाषा सोपी आहे. संवाद छोटे आहेत. प्रसंगात नाटकीयता ठासून भरलेली आढळते. पात्र परिचय, दिग्दर्शन सूचना, प्रकाश योजना इ.

संबंधाने नाटककारांनी जागोजागी केलेलं सूचन अन्य सादरीकरण करणा-यांना उपयोगाचं ठरेल. एकंदरीत या नाटिका शालेय रंगमंचाचा व बालकुमार साहित्याचा विकास करणा-या ठरणार आहेत. भविष्यकाळात डी. के. रायकर अशा नाटिका सतत लिहीत राहतील तर शालेय रंगभूमीचे प्रसिद्ध नाटककार होण्याचा सन्मान त्यांना लाभेल. तो लाभावा अशी शुभेच्छा!

◼◼

कोल्हापूर

१७.५.२०११ आस्वादाची काही पान (काव्यसमीक्षा)

प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार
निर्मोही प्रकाशन, पुणे
प्रकाशन - मे, २०११
पृष्ठे - १२७ किंमत - १२५/
_______________________________
सकल सौंदर्याची ध्यासमय शब्दसाधना

 ‘आस्वादाची काही पाने हा प्रा. चंद्रकांत पोतदार यांचा काव्यसमीक्षा संग्रह होय. त्यांनी वेळोवेळी वृत्तपत्रे, नियतकालिके यांच्यासाठी वेगवेगळ्या वेळी अनेक ग्रंथांची परीक्षणे, परिचय दिले होते. त्यांचा हा संग्रह. तो काव्यसमीक्षा ग्रंथ होणे जरुरीचे होते. आपण एखाद्या वाङ्मयप्रकाराची सलगपणे समीक्षा, परीक्षण, परिचय करीत राहतो. त्यातून त्या समकालीन वाङ्मयप्रकाराची सद्यःस्थिती, विषय, काव्यशिल्प, भाषा, प्रतीके, रूपे इत्यादींचे आकलन होत असते व वाचन, लेखन, निरीक्षण, चिंतन यांच्या सातत्यातून त्या साहित्यरूपाचा वर्तमान घाट, आवाका हाती येत असतो. त्याचे वर्णन, विश्लेषण ही समीक्षेची पूर्वअट असते. तसे झाले तर आपली समीक्षा वाचून वाचक प्रौढ होतो.
 असे असले, तरी अशा संग्रहाचा फायदा राहतोच. अशा संग्रहातून सध्या कोण, काय, कसे लिहितो याचा आलेख हाती येतो. ती इतिहासाची कमाई असतेच मुळी. वृत्तपत्रीय परीक्षणांत त्यांना शब्द नि रूपांच्या मर्यादा असल्याने संक्षिप्तता आपसूकच आली आहे. अलीकडे वाचकांचा वाचनसंयम संकुचित होत असल्याने व वृत्तपत्रात साहित्यासाठीच्या जागेची वानवा असल्याने असे घडत असले तरी त्या परीक्षणास 'गागर में सागर'चे रूप येते. ते देत असताना लेखकाचे कौशल्य यात आहे की, त्या घागरीतही


प्रशस्ती/९१

तो आपल्या साहित्यमंथनातून चौदा रत्नं भरतो का? दाखवतो का? प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी तसा प्रयत्न केला आहे.

 या ग्रंथातील कविता कालक्रमाने म्हणाल तर गेल्या दोन दशकांतील आहेत. सारे वर्तमान कवी-कवयित्री आहेत. त्यात नामांकितांबरोबर नवोदितही आहेत. गेल्या दोन दशकांतही मराठी कवी, त्यांचे काव्यविषय, शिल्प, भाषा, प्रतीक एकत्र आल्याने ‘आस्वादाची काही पाने' हे शीर्षक असलेला हा संग्रह वर्तमान मराठी काव्यावर मात्र लख्ख प्रकाश टाकतो.

 कविता महाजनांच्या ‘मृगजळीचा मासा'मध्ये विचारांचं काहर, मृत्यूची अनेक रूपं, जगण्यातील ऊर्मी आहे. जागतिकीकरणात माणूस तुटत असल्याचं शल्य ही कविता व्यक्त करते. ग्रंथाली'नं अलीकडे प्रकाशित केलेल्या प्रज्ञा दया पवार ऊर्फ प्रज्ञा लोखंडेंच्या 'मी भिडवू पहाते समग्राशी डोळा'मध्ये स्त्रीवाद कसा आहे, त्यातून स्त्रीचं समग्रपण कसं उभं राहतं हे स्पष्ट होतं. या कवितेस असलेले समकालीन संदर्भ ताजे असल्याने ही कविता हृदयाला सरळ भिडते. कवी पत्रकार असला की त्याची कवितासुद्धा चिकित्सक कशी बनते, याची वानगी आपणास विजय चोरमारे यांच्या ‘आत-बाहेर सर्वत्र'मधील कविता वाचताना मिळते. हा एक अस्वस्थ कवी आहे. तो समाजशोधक आहे. त्याला गाव, संस्कृती, नाती यांचं तुटणं अस्वस्थ । करतं. तो आतून-बाहेरून हादरून जातो; कारण त्याला सर्वत्र सांस्कृतिक हाहाकार दिसतो. 'सांजभयाच्या साजणी'मधील ग्रेसांची कविता आकांताची कविता असल्याने डॉ. पोतदारांनी नोंदलेलं निरीक्षण ग्रेसांच्या कवितांचं समीक्षकाला असलेलं आकलन स्पष्ट करतं. ती कविता आत्मसंवादी तशीच आत्ममग्नही. दुःखाचे अभिजात शिल्प घेऊन येणारी ही कविता ‘जन्म सारा शोधताना' मध्ये कवी अशोक भोईटे समग्र जीवनाचा समग्र पट मांडतात नि समजावतात. कवी माणूसशोधक होय. त्याला हळवेपणाचा लाभलेला लळा त्याच्या कवितांतून झरत राहतो. डॉ. धम्मपाल रत्नाकर ‘हॉटेल माझा देश' मध्ये एक नवं जग चित्रित करतात. सभ्यतेच्या आड दडलेलं मनुष्याचं दांभिकपण ते मोठ्या प्रत्ययकारी भाषेत आपणापर्यंत पोहोचतात व वाचक आतून-बाहेरून उद्ध्वस्त होतो. कवी श्रीधर तिळवेही इथे भेटतात. आपल्या एका भारतीय विद्याथ्र्यांचे उद्गार'मधून आपल्या समाजाचे दाहक रूप ते तितक्याच आक्रमक शब्दात व्यक्त करतात. लेखकाच्या या साच्या निरीक्षणांतून संग्रहातील कवी व कवितांचा आशयविषय स्पष्ट होतो.

 डॉ. चंद्रकांत पोतदार स्वतः कवी आहेत. संवेदनशील समीक्षकास चिकित्सक होणं कठीण जातं. मग तो शब्दांचा छंद विकसित करीत कविता वर्णनाच्या अंगांनी समजावत राहतो. अलीकडे वृत्तपत्रांत परीक्षणाऐवजी परिचयास महत्त्व येते आहे. समीक्षेपेक्षा सौंदर्यस्थळे खुलविणे मग अनिवार्य होते. या सर्वांत समीक्षा एकांगी होण्याचा जो धोका असतो, तो ‘आस्वादाची काही पाने'मध्ये प्रकर्षाने जाणवतो. वर्णनामागे लागत आपण गुणसाधना करतो. दोषांवर बोट ठेवायला कविता नुसती वाचून चालत नाही. तिची चिकित्सा, विश्लेषण, विचार, शिल्प, रस, संगीत अशा अंगांनी करीत दोषदिग्दर्शन व्हायला हवे. समीक्षकांचे कार्य वाचकांच्या साहित्यजाणिवा प्रगल्भ करण्याचेही असते, हे विसरून चालणार नाही. कविता केवळ आस्वादक नसते, तर तिचा पैल हा भविष्यवेधी असतो. त्याची उकलही तितकीच आवश्यक गोष्ट असते. ग्रेस केवळ शब्दकवी नव्हते. त्यांच्या कवितेचा आशयाचं शिवधनुष्य पेलायची ताकद वाचकांत निर्माण करण्याची जबाबदारी समीक्षकाची असते. सुबोधातलं सौंदर्य व दुर्बोधातील आशय एकाच ताकदीनं समीक्षक करील तर कविता आपोआप वाचकांप्रत पोहोचत राहते. कवितेची सौंदर्यस्थळे केवळ शब्दांत असत नाहीत, तर तिच्या आशयघन घाटात ही तुडुंब भरलेली असतात. ती शोधायची दृष्टीही समीक्षकच वाचकास देत असतो. समीक्षक एका अर्थाने वाचकाचा वाटाड्या, शिक्षक असतो हे विसरून चालणार नाही. समीक्षा उजवी व्हायची तर विवेचन डावं हवं, प्रगल्भ हवं.

 डॉ. चंद्रकांत पोतदार यांचा ध्यास नवी, ताजी कविता तातडीने वाचकांप्रत पोहोचविण्याचा आहे नि तो स्तुत्यच म्हणावा लागेल. इतक्या साच्या कवितासंग्रहांचे वाचन, परिशीलन करणे ही मोठी साहित्यसेवाच आहे. तिच्यातील सातत्य अनुकरणीय होय. आप्त कवींच्या कविता आपलेपणाने समजाविताना पण समीक्षकाचं सुरक्षित अंतर लेखकांनी जपायलाच हवं. अन्यथा समीक्षा हीच एक कविता बनून जाते. ती तशी । व्हायची नसेल तर समीक्षकाचा तटस्थपणा, तत्त्वज्ञानाची समाधीस्तता अधिकारायला हवी. समीक्षकाच्या हाती शब्द तोलायला लाकडाच्या वखारीतील वजनकाटा चालत नाही. सोनारी सूक्ष्मता तोलायची तर काटाही । सोनारीच हवा, याची जाणीव ही समीक्षा वाचताना होते.

 हे सारं असूनही प्रयत्नांचं साहित्यिक मोल उरतं. वर्तमानाचा समग्र आलेख यामुळे उमजतो. कवितेची धाटणी कळायला मदत होते. सौंदर्यस्थळे उमजतात. शब्दसंभाराचे भान येते. भाषिक बाज खुलतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कवितेची बलस्थाने अशा समीक्षा अधोरेखित करीत असतात.

त्यातून कवींना प्रोत्साहन लाभते. त्यांची उमेद वाढते. वाचक सश्रद्ध होऊन कविता कवटाळू लागतो. हे सारे डॉ. पोतदारांच्या उदाराशय वृत्तीमुळे घडते, हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व नव्या चिकित्सक लेखनास शुभेच्छा!


◼◼

________________


युगामागुनी युगे सरती (लेखसंग्रह)
डॉ. पुष्पपाल सिंह, भाषांतर - डॉ. चंदा गिरीश
रावा प्रकाशन, कोल्हापूर,
प्रकाशन - डिसेंबर, २०११

गमावलेल्या इतिहास व संस्कृतीची नोंद


 डॉ. पुष्पपाल सिंह हिंदीतील प्रसिद्ध समीक्षक, संपादक व अनुवादक आहेत. ललित लेखक म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत. नवी दिल्लीहून प्रसिद्ध होणा-या ‘जनसत्ता' दैनिकात त्यांनी ‘जुग बीते, युग आये' शीर्षकाने एक सदर चालविले होते. काळाच्या ओघात विवाह, सण, मनुष्याचे नाते व समाजसंबंध यात फरक पडत गेला तरी काही रीतीभाती काळास चिकटूनच राहातात. तारुण्यातील प्रेम, समाजातील विविध सण-समारंभ, रूढी-परंपरा यांची पडझड झाली तरी ते नामशेष मात्र होत नाहीत. अशा । वेळी त्यांचे पूर्वरूप काय होते, पूर्वज ते कसे साजरे करत, त्यात आत्मीयता कशी होती, सण, समारंभ, रूढी ही उरकून टाकायची गोष्ट नव्हती. उलटपक्षी ते दिवसेंदिवस आनंद आणि उत्साहाने भरून साजरे करण्याची गोष्ट कशी होती ते या ललित निबंधांचे वाचन करताना शब्दोशब्दी । जाणवते. बालपण सरल्याचे दुःख कवयित्री शांता शेळके यांनी ‘अहा ते सुंदर दिन हरपले' सारख्या कवितेतून व्यक्त केले आहे. 'तेही नो दिवसो गतः' म्हणणारा संस्कृत कवी असो वा जुनं ते सोनं' सांगणारी लोकोक्ती साच्यात गतकालाचं वैभव सरल्याचं शल्य आकंठ भरलेलं आढळतं. तसं पुष्पपाल सिंह यांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या ‘जुग बीते, युग आये संग्रहातील ललित निबंधातही डॉ. चंदा सोनकर-काशीद यांनी ‘युगामागुनी युगे सरती' शीर्षकाने त्या निबंधांचा मराठी अनुवाद करून मराठी वाचकांसमोर


प्रशस्ती/९५


पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील सण, समारंभ, रीतीरिवाज, रूढी, परंपरा, यांचं जे वर्णन केले आहे, ते वाचत असताना त्यामागचं भावविश्व आपलंच असल्याची येणारी प्रचिती या निबंधांचं मोठं यश होय.
 जागतिकीकरणाचा परिणाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रात झाला आहे. पण सर्वाधिक कठोर प्रहार जर त्यानं कशावर केला असेल तर मनुष्य संबंधांवर. संपर्क साधनांमुळे जगात अंतर नावाची कल्पनाच संपुष्टात । आली. जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत माणूस गतिशील यंत्र बनला. माणसाची पद-प्रतिष्ठा पैशावर जोखली जाऊ लागली. मनुष्य संबंधांची जागा । अर्थसंबंधांनी घेतली. या सर्वांचा परिणाम रोजच्या जीवनावर होणे स्वाभाविक होते. त्यामुळे होळी तर झाली'सारख्या वाक्यात भरलेला आशय काळाबरोबर वाहून गेला. दसरा, दिवाळी व होळी हे तीन सण म्हणजे तीन मोठे उत्सव असायचे. सणात जात, धर्म, पंथ भेद नव्हता. तीन दिवस चालणारी होळी असो अथवा विवाह दिवसातल्या तिस-या प्रहरी संपतं. चटावरचं श्राद्ध उरकण्याचं स्वरूप आलेले सण, समारंभ मनुष्य संबंध व संस्कृतीचे भग्नावशेष झालेत. होळीत टोपी उडवणे, लाकडं चोरणे, वर्गणी गोळा करणे (खरं तर वसूल करणे!) या सर्वांची असणारी रंगत हरवल्याचं लेखकाचं दुःख इतिहासजमा संस्कृतीचं आहे खरं तर! धुळवडीतलं रांगडेपण गमावून आपण नदीकाठी निराळे राहणारे सभ्य... आपण जीवनातल्या रंगछटा । गमावून सारं जीवन सफेदीचं. एकरंगी, सपाट करतो आहोत याचं भानच आपणास उरलं नाही. बाजार गेला नि मॉल्स, शॉपी कल्चर आलं. त्यात माल, वजन, काटा, दो-या, दगड, पोती, कागद, पुडी, चुरा, भुसा सारं गमावून आपण चकचकीत, गुळगुळीत कागदातील हवाबंद वस्तू झालो आहोत. दारबंद, विचारबंद, असंबंध स्थितीत आपण जेरबंद झालो आहोत. लग्नपत्रिका इंग्रजीत छापणं... आपली भाषा गमावणं म्हणजे आपलं अस्तित्व गमावणं नि अस्मिता अव्हेरणं आहे हे आपणास केव्हा समजणार? ‘वरातीमागून घोडे' अशी आपली स्थिती होणार. पण तोवर सर्वस्व संपलेलं असणार. घड्याळाची टिकटिक जपायची तर वेळीच किल्ली द्यायला हवी. वेळीच वंगण घातलं तर चक्र फिरत राहणार. काळाची पण एक गुरूकिल्ली असते... सावध ऐका पुढल्या हाका'... त्या ऐकल्या नाही तर पश्चात्ताप ठरलेला... पश्चात्तापही वेळीच करावा लागतो... गोफण जशी वेळीच चालवावी लागते तसा पश्चात्ताप! व-हाड, वरात, व्याही, अहेर, नमस्कार, भाजी, भाकरी, भटजी सर्वच नाही का आपण गमावलं? ते हरियाणातच नाही... महाराष्ट्रातही व खाली केरळातही तेच! काँक्रिटच्या लांब रुंद


रस्त्यांनी गाव पांढरीच्या साच्या ओळखी पुसून टाकल्या. ठेले गेले. स्टॉप्स आले. गावं गेली, ती स्टेज झाली. हे सारं बदललेलं जग चित्रित करून डॉ. पुष्पपाल सिंह यांनी माणसाच्या गमवलेल्या इतिहास व संस्कृतीची नोंद केली आहे.

 डॉ. चंदा सोनकर-काशीद यांनी या ललित निबंधांचा केलेला अनुवाद मराठी वाचक डोळ्यांसमोर ठेवून केलेला असल्याने मूळ हिंदी आशयाचे त्यांनी योग्य मराठीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अनुवाद शब्दप्रमाण म्हणता येणार नाही. पण रूपांतरही ते नव्हे. मूळ सामग्री यथातथ्य पोहोचवण्याचा हा प्रयत्न होय. अनुवाद करताना स्रोत भाषा व लक्ष्य भाषा यात फार अंतर आणले तरी सौंदर्य व वस्तुनिष्ठतेचे द्वंद्व सुरू होते. ते अंतर यथातथा ठेवण्याचा प्रयत्न केल्याने या अनुवादास मूळ कृतीचे सौंदर्य प्राप्त झाले आहे.

 अलीकडच्या काळात जागतिकीकरणास सर्रास नावे ठेवली जातात. पण अनुवादास जागतिकीकरण हे वरदान ठरले आहे याचा विसर पड़ता। कामा नये. मराठी साहित्यात तर अनुवादाच्या आलेल्या त्सुनामीमुळे ललित लयाला गेलं अशी स्थिती आहे. मौलिक लेखन करणारे वळचणीत व अनुवादक सेलिब्रिटी होत आहेत. गमावण्याचा हिशोब करत असताना काय कमावले हे ही पाहायला हवं. लेखकांचे महत्त्व जाऊन प्रकाशक शिरजोर होण्याचा काळ हा! त्याचाही वेळीच हिशोब व्हायला हवा. लेखक सार्वभौम याचे विस्मरण झाले तर प्रतिभा संपेल. प्रतिभा संपेल तर लालित्य, लालित्य गेले तर उरतील मुळाक्षरे! अक्षर, शब्दांना परब्रह्माचं रूप कल्पना, कला, संगीत, लय, आशय, विचार, संदर्भ, मिथकांच्या समन्वयाने व प्रसंगतः उपयोगाच्या विवेक व बुद्धिमत्तेने येते. अलीकडे चित्रकाराचे काम डीटीपी ऑपरेटर ग्राफिक्सच्या सुबोध प्रयत्नाने करताहेत. प्रकाशक केवळ किफायती विचाराने लेखक, कलाकारांना पैशाने जोखताना दिसतात. साहित्य, संमेलन, जाहिरात, विक्री, मुद्रण, उत्पादन, बांधणी, संयोजक साच्या शब्दांना जागतिकीकरण पैशाने तोलू लागलं आहे. ही धोक्याची घंटा वेळीच ऐकू आली तर त्यात सर्वांचे हित आहे. लेखकवाचकातलं संपलेलं अद्वैत साहित्य व्यवहारातील सर्वाधिक ऐरणीवरचा विषय आहे. याचे भानही या निमित्ताने व्हावे. ती पण गमावलेल्या इतिहास व संस्कृतीचीच नोंद आहे हे विसरून चालणार नाही.

◼◼


१८-५-२०११

कोल्हापूर, ________________

बालविकासाच्या वादळवाटा (लेखसंग्रह)
अतुल
आनंदराव देसाई, फणसवाडी, जि. कोल्हापूर
प्रकाशन - जुलै, २०११
पृष्ठे - ७४ किंमत - ५0/
______________________________________

बालदीप जपणे म्हणजे भविष्य सोनेरी करणे

 ‘बालविकासाच्या वादळवाटा' हे छोटेखानी पुस्तक वंचित बालकांविषयी अतुल देसाई यांच्या मनात असलेल्या अस्वस्थता व तळमळीतून साकारले आहे. तो स्फुट लेखांचा संग्रह होय. श्री. देसाई यांच्या घराण्यात समाज कार्याची परंपरा आहे. त्यांचे वडील ए. के. देसाई, परिवीक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते त्या काळात आम्ही भेटत असू. वडिलांची परंपरा प्रेरणा घेऊन अतुल देसाईही परिवीक्षा अधिकारी होऊन बालकल्याण क्षेत्रात आले. त्यांनी सध्या आपले कार्यक्षेत्र बदलून बांधकाम व्यवसाय चालविला आहे. परंतु त्यांची ओढ बालकल्याणामध्ये आहे.
 ब-याचदा माणूस पोटासाठी एक काम करत राहतो. परंतु त्याचे ‘अंतरीचे धावे' मात्र त्याच्या प्रिय क्षेत्रात रुंजी घालत राहतात. अतुल देसाईंचा कल बालकल्याणाकडे असल्याने व व्यवसायातील मिळकतीचा काही भाग व आयुष्याचा काही काळ बालकल्याणासाठी खर्च करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. स्वप्ने माणसास स्वस्थ बसू देत नसतात. स्वप्नांची अस्वस्थता हीच साहित्याची जननी असते. त्याप्रमाणे अतुल देसाई यांनी बालकल्याण विषयक लेख लिहिले. ते वृत्तपत्रात प्रकाशित झाले. त्याचे संकलित रूप म्हणजे ‘बाल विकासाच्या वादळवाटा!'
 महाराष्ट्रात बाल्य उपेक्षित राहिले. त्यातही अनाथ, निराधार, बालगुन्हेगारांच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आली नाही तर अवहेलनाही!


प्रशस्ती/९८

या शल्यातून हे सारं लेखन झालं आहे. अतुल देसाई यांनी परिवीक्षा अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, समुपदेशक म्हणून कार्य केलं आहे. त्या काळात वंचित बालकांशी त्यांचा जवळून संबंध आला. त्यातून बालपणाचं भीषण चित्र त्यांच्या लक्षात आलं. कोणतंही कल्याण वा विकास कार्य केवळ यंत्रणा नि संस्था उभारून होत नसतं. केवळ कायदेही उपयोगी ठरत नाहीत. त्यासाठी गरज असते त्या विषयासंबंधीच्या भावसाक्षरतेची व संवेदनशीलतेची. ती नसेल तर कार्यात कोरडेपण येतं. पूर्वी आपल्याकडे मुलांचे कायदे प्रत्येक राज्यात वेगळे होते. १९८६ साली प्रथम बालकल्याणाचा केंद्रीय वा राष्ट्रीय कायदा झाला. तो अपुरा नि सदोष असल्यानं त्यात सन २000 मध्ये दुरुस्ती करण्यात येऊन नवा कायदा अंमलात आला. तरी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, काळजीवाहक यांचे संवेदीकरण न झाल्याने 'ये रे माझ्या मागल्या प्रमाणे मागील पानावरून पुढे चालु अशीच स्थिती राहिली. त्याचे विदारक चित्र अतुल देसाई यांनी रेखाटले आहे. ते वाचले की कोणताही संवेदी नागरिक विकल झाल्यावाचून राहात नाही. हे या लेखनाचं यश होय.

 अनाथ, निराधार, बालगुन्हेगार मुले संस्थेत येतात. त्यांच्या पालकांचा शोध घेणे, गुन्हा का झाला हे अभ्यासणे, त्यावर उपाय होण्यासाठी वेबसाईट विकास, हेल्पलाईन, संस्थांमध्ये संगणक, इंटरनेट संपर्क असे उपाय लेखक सुचवतो ते कालानुरूप योग्य आहे. शासकीय यंत्रणा नेहमी काळामागे पन्नास वर्ष चालत असते. तिची गती वाढल्याशिवाय वंचित बालकांना न्याय मिळणार नाही. तसे झाले, घडले तर म्हणजे सुधारणा होईल तर मुलांना सोनेरी बालपण व उज्ज्वल भविष्य मिळेल, अतुल देसाई यांची बालमन, बालविकास, बालकल्याण संस्था, बालमनावर दुष्परिणाम करणारे घटक (उदा. व्हिडिओ गेम्स) या सर्वांचे विवेचन या छोट्या ग्रंथात करून आपणास बाल्य जपण्याचा, जोपासण्याचा सल्ला दिला आहे. गॅब्रियल मिस्ट्रलनी आपल्या एका कवितेत बाल्य म्हणजे 'आज'. त्यांच्या विकासाचे उत्तर ‘उद्या' कधीच होऊ शकत नसल्याचे बजावले होते. अतुल देसाईच्या या 'वादळवाटा' ही तेच सांगत आहेत. हे पुस्तक म्हणजे ‘सावध एका पुढच्या हाका' सारखं धोक्याची घंटी वाजवतंय. तो घंटानाद आपण कानभरून ऐकला पाहिजे व मन भरून वंचित बालकांसाठी काही केलं पाहिजे. अतुल देसाई त्यांच्या मनातील हा बालदीप जपतील तर अंधार दूर होणे फार दूरची गोष्ट राहणार नाही.

▄ ▄

दि. ४ जुलै, २०११
कोल्हापुरी रंग-ढंग(वृत्तांत संग्रह)
आप्पासाहेब माळी 
आलोक प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - जुलै, २०१२
पृष्ठे - १३0 किंमत - १५0/-

अश्वत्थाम्याची अस्वस्थ जखम दाखवणारं लेखन


 दैनिक तरुण भारतचे तरुण , उत्साही व निगर्वी पत्रकार अप्पासाहेब माळी यांना मी गेली अनेक वर्षे मूकपणे निरखत आलो आहे. ते मृदुभाषी, प्रसिद्धी पराङ्मुख, समर्पित व समाजशील वार्ताहर आहेत. ते अनेक कार्यक्रम, पत्रकार परिषदात उपस्थित असतात. मनस्वी टिपण, निरीक्षण असतं. त्यांचं खोचकपणा त्यांच्यात नसला तरी ते चिकित्सक, चोखंदळ निश्चित आहेत. त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांची चांगली जाण आहे. मात्र कल आहे तो समाजहिताच्या प्रश्नांकडे! त्याचं स्वतःचं असं सर्व प्रश्नांचं निरीक्षण, आकलन व मत आहे. ते मन आणि मत आपल्या लिखाणात उतरवतात. दैनिक तरुण भारतला ते केवळ बातम्या पुरवण्याचं पाटी टाकू काम करीत नाही. आपलं वृत्तपत्र बातमी पलीकडे जाऊन वाचकाला अधिकचं, सकस, विचारप्रवण, दिशादर्शक, अंतर्मुख करणारं काही देतं का ? याचा ते नित्य विचार करत असतात. आतल्या आत पत्रकार म्हणून ते अस्वस्थ असतात. प्रश्नांविषयी त्यांचं चिंतन, मनन सुरू असतं. त्यामुळे बातम्यांच्या पलीकडे जाऊन वृत्तचित्र' (Feature) देण्यावर त्यांचा भर असतो. कोल्हापूरला तरुण भारत माझ्यासारख्या नित्य वाचकास आपलासा नि आवर्जून वाचावासा वाटतो तो आप्पासाहेब माळी यांच्या विशेष वृत्तांमुळे ! अशी शेकडो विशेष वृत्ते आप्पासाहेब



माळी यांनी तरुण भारतात लिहिली असतील. पैकी निवडक विशेष वृत्तांचं संकलन त्यांनी केलं आहे. त्यास ग्रंथरूप देऊन ‘कोल्हापुरी रंग ढंग' घेऊन ते वाचकांना पुन्हा सादर करीत आहेत. या उपक्रमाबद्दल प्रथमतः मी त्यांचे स्वागत करतो. त्यांचा हा पहिलाच ग्रंथ असल्याने त्यांचे अभिनंदनही करतो.
 ‘कोल्हापुरी रंग-ढंग' वाचताना माझ्यासारख्या तरुण भारताच्या नित्य वाचकास पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल, पण नववाचकास कोल्हापूरची संस्कृती, माणसं, वृत्ती, उपक्रम विकासाच्या पाऊलखुणा उमजतील. कोल्हापूर ही राजर्षी शाहू छत्रपतींच्या सुधारणांच्या पाश्र्वभूमीवर विकसित झालेली भूमी आहे. तिच्यात मातीतून आलेलं रांगडेपण आहे नि रंगेलीही! अलीकडच्या काळात हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. सहकाराची घट्ट वीण असलेल्या या प्रदेशानं इथल्या शेतक-यास समृद्ध केलं. इथं दूध, साखर, गूळ, कुक्कुटपालन इ. तून आलेला चौपट पांढरा नि करमुक्त पैसा आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश इ.च्या तुलनेनं इथं समृद्धी आहे. दरडोई शिक्षणमान आणि अर्थमानाचा आलेख निरंतर चढता राहिला आहे. त्यामुळे इथे गावसमृद्धी आहे. माणसं स्वतंत्र विकास वृत्तीची आहेत. 'घेतलं तर डोक्यावर नाही तर पायदळी' असा इथला प्रघात आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी इथं हिरिरीने केली जाते. पूर्वीचं इथलं गाव वेशीतलं होतं. आता त्याने सर्व प्रकारच्या तटबंदी तोडल्यात. गावच्या आळी, गल्ल्या, पक्ष, संस्था, अण्णा-भाऊ-दादांचे गट यात विभागल्यात. नोकरी, लग्न, सभासदत्व सान्याला एकच ओळख राहिली... हा कोणत्या गटाचा? गावचे सर्व निर्णय निवडणूक, विकास योजना, दारूबंदी सारं गट ठरवतो. भाऊबंदकी मागं पडून अर्थसंबंध, हितसंबंध महत्त्वाचे ठरू लागले. त्याचे परिणाम इथल्या जनमानसावर नित्य उमटत राहतात. अप्पासाहेब माळींचं हे लेखन बदलत्या जनमानसाचं चित्रण आहे, आरसा आहे.
 ‘उत्सवप्रिय कोल्हापूर' मध्ये कोल्हापुरात होणा-या विविध महोत्सवांची नोंद घेऊन इथं घडणारं सांस्कृतिक परिवर्तन टिपलं आहे. या नोंदीत गुण आहेत तसे दोषदिग्दर्शनही! पण हेतू स्वच्छ आहे. उत्सव, व्यापक, सर्वसमावेशक होतील तर जनसहभाग राहील. अलीकडे महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर प्रभृतींचा जयजयकार सवंग पद्धतीने होताना पाहून माळी अस्वस्थ होतात. तसबिरी लावण्यापेक्षा... की जय पुकारण्यापेक्षा महनीय व्यक्तींचे विचार आमचा आचारधर्म होईल तो सुदिन... महापुरुषांना वापरण्याच्या वृत्तीवर आप्पासाहेबांमधील पत्रकार नेमकेपणाने बोट ठेवतो.
अलीकडे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश देण्याची मागणी पुरोगामी कार्यकर्त्यांनी केली. श्रेयवादाच्या स्पर्धेत प्रतिगामी पाऊलच यशस्वी होतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘जागर मंदिर प्रवेशाचा वृत्तविशेषात जात, धर्म हे भेदापलिकडे मनुष्यकेंद्रित समाजनिर्मितीचा अडसर असल्याने तो जोवर आपण दूर करणार नाही तोवर असेलच तर परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद लेखक व्यक्त करतो. हे त्याच्या मानवतावादी वृत्तीचा पुरावा होय.
  हे नि असे अनेक विशेष वृत्तांत कोल्हापूरचे रंग, ढंग'मध्ये आहेत. साहित्य, सहकार, प्रबोधन, महाविद्यालयात युवक साजरे करत असलेले विविध दिन- साडी डे, टाय डे, व्हॅलेंटाईन डे इ. पुरस्कार, स्त्री विकास व शिक्षण, शेतकरी मालाचा भाव, हक्क आणि मूल्यांचा संघर्ष, तंटामुक्ती, निर्मलग्राम, जलस्वराज्य, बंदीबांधवांचे ग्रंथालय असे विषय वैविध्य यात आहे. त्यातून कोल्हापूरचा सांस्कृतिक परीघ रोज कसा रुंदावत निघाला आहे त्यांचे आश्वासक चित्र एका बाजूला अन् दुसरीकडे त्या उपक्रमांची पडछाया म्हणून पसरणारे दोष - साच्यांचं सम्यक चित्र या रंग-ढंगात आहे. इथला शिक्षक, प्राध्यापक अतिरिक्त सुरक्षा, समृद्धीमुळे 'नेता' कसा बनला याचे विदारक चित्र माळी यांनी उभं केलं आहे. एके काळी शिकवण्यापलीकडचा विचार न करणारा ‘गुरुजी', ‘मास्टर' आज ‘सर' झाला खरा पण मूल्य हरवल्यानं त्याची समाज प्रतिष्ठा घसरतीला कशी लागली याचं वस्तुनिष्ठ चित्र समस्त शिक्षक समाजाला अंतर्मुख करेल अशी ताकद या लेखनात आहे. या लेखनाचे संस्कार मूल्य मोठे आहे. हे लेखन केवळ चिमटे नाही घेत ते तुम्हाला प्रश्न करतं... विचार करायला भाग पाडतं. बालकल्याण संकुलातील अनाथ मुलांना आपल्या खर्चातून रोज १० काढून ठेवून बचत करणारं पाटील नावाचं कुटुंब... त्यांचा उपक्रम वाचून तुमचे हात दाते होतात... हे या लेखनाचं यश!
 वृत्तपत्रातील सूर्योदयाला उगवणारी वृत्त सूर्यास्ताबरोबर अस्तंगत भले होत असतील, पण अप्पासाहेब माळींचं लेखन आयुष्यभर तुम्हाला अस्वस्थ करून पाठलाग करत राहतं. ही असते या लेखनाची चिरंतन ताकद! बालपण, बुवाबाजी, “यस आय कॅन’, ‘तहान दुधाची' सारखं लेखन वृत्तपत्री असलं तरी त्यातलं ललित सौंदर्य कमी नाही. हे लेखन रिपोर्ताज शैलीच्या औपचारिकतेस छेद देऊन आत्मस्वर बनतं नि म्हणून वाचकांच्या हृदयाला भिडतं.
 आप्पासाहेब माळी यांनी निरंतर लिहीत राहावं. त्यांच्यातला अस्वस्थ


अश्वत्थामा जखम भरून काढण्यासाठी लेखनाची नित्य वणवण करीत राहील तर समाज दुःख, दैन्यमुक्त होईल.
 त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छांचं बळ देऊन विराम.



दि. २५ मे, २०१२


धगधग(कादंबरी)
प्रशांत दिवटे
ऋतू प्रकाशन, अहमदनगर
प्रकाशन - जुलै, २०१२
पृष्ठे - १६९ किंमत - १५0/


नव्या ग्रामोदयाचं आश्वासक चित्रण करणारी कादंबरी

 ‘धगधग' ही ग्रामीण कुटुंब जीवनावर आधारित कादंबरी होय. प्रशांत दिवटे या तरुण व उमद्या लेखकाने ती लिहिली आहे. गाव, खेडं अजून एकत्र कुटुंबाने मोठं होतं हे खरं आहे. पण गावातील तरुण वर्गास शिक्षण, नोकरीच्या पर्यायांशिवाय जगता येत नाही. केवळ शेतीवर जगायचा काळ मागे पडला. पूरक अर्थबळ असेल तरच गावात राहणं सुसह्य होतं, हे। एकविसाव्या शतकाचं वास्तव आहे.
 संपतराव, शेवंता यांचा मुलगा राम. कुटुंब एकत्रदादा, भाऊ हे। संपतरावांचे भाऊ. त्यांचंही कुटुंब असतं. शेती एकत्र असली तरी चूल वेगळी. शेती कसण्यावरून भावा-भावात रोजची भांडणं ठरलेली. त्याला कंटाळून संपतराव आपलं बि-हाड गावातून हलवतात. मुलगा राम गावात वाईट संगतीत बिघडतो म्हणून आणि मुलाला शिकून मोठं करायच्या स्वप्नांमुळे शहरात शिकायला ठेवतात. त्याला काही कमी पडू देत नये म्हणून पोटाला चिमटा घेऊन पैसे पाठवत राहतात. गावाकडे वाईट मित्रांची संगत शहरातही नडते व राम बिघडतो, व्यसनी होतो. दरम्यान शेतात साप चावून संपतराव दगावतात. रामला याचा धक्का बसतो. बहिणी त्याला समजावतात. विधवा आईचे कष्ट व बहिणीची शपथ, तिला दिलेला शब्द... सान्यांना जागून राम सुधारतो व कुटुंब सावरतो. तिकडे दादा,

प्रशस्ती/१०४
भाऊ विश्वासराव व गोपाळराव यांना पश्चात्ताप होतो. दुभंगलेलं कुटुंब एक होतं.

 अशी सुखान्त, आदर्शवादी कथा घेऊन लिहिलेली ही कादंबरी प्रशांत दिवटे यांच्या तारुण्यसुलभ आदर्शोन्मुख वास्तववादाची निर्मिती होय. खेड्यातील कुटुंब एका आड्या, छपराखाली एकत्र राहात असलं तरी एक नसतं. रोज घडणा-या घरगुती गोष्टींची हेवादाव्याची धग व जगण्याची दगदग याचा परिणाम म्हणून एका रक्ता, नात्याची माणसं सत्ता, संपत्ती, स्वार्थ इ. मुळे एकमेकांचे नुसते स्पर्धकच होत नाही तर वैरी होऊन जिवावर उठत असतात. संपतरावांच्या कुटुंबाची वाताहत याचीच परिणती असते. ज्या कुटुंबातील आई-वडिलांना वनवास मिळतो त्यांची रामसारखी मुलं आपल्या पालकांची जगण्याची ‘दगदग' रोज अनुभवत असतात. त्यामुळे मुळात जगण्याचा नवोन्मेष जन्मतो. ती जिद्दी होतात. जिद्दीच्या जोरावर कष्टांवर, संकटांवर मात करून स्वप्न साकार करतात. याचं आश्वासक चित्र या कादंबरीत असलं तरी प्रत्यक्ष समाजजीवनात ते लीलया घडताना दिसत नाही. त्याचं कारण सामान्य माणूस स्वतःचा स्वार्थ व कुटुंब यापलीकडे पाहण्यास तयार नसतो.
 प्रशांत दिवटे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या रूई-छत्रपतीसारख्या खेड्यात जन्मले, वाढले. ते अजून पदवीधर नाहीत. मिळवतही नाहीत. घरी श्रीमंती नसली तरी सुख आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचे त्यांच्याकडे एक भाबडं मन आहे. जीवनाच्या कटुतेचा अनुभव नसलेलं मन भाबडं असतं. भाबड्या मनाला जग सुंदर व्हावं, माणसं मौल्यवान, प्रेमळ, नि:स्वार्थी असावी असं वाटत असतं. असं वाटण्याच्या वयातील ही कादंबरी असल्याने ती एकीकडे जगण्यातली दगदग व्यक्त करते व दुसरीकडे स्वप्नांचा आरसेमहाल कल्पत असते. अशा एका भ्रामक, कल्पित शुभाकांक्षी मनाची निर्मिती असलेली कथा विधायक जगाचा पाया घालू मागते आहे.
 अण्णा हजारे लोक आंदोलनातून जो नवा भारत घडवू पाहतात त्याचा मूलाधार तरुण आहेत. बाबा आमटेंनी तरुणाची व्याख्या करताना तरुण खांद्यावर तरुण शिर असलेला' अशी केली होती. उद्याचं जग विधायक व्हायचं तर आपली मनोवृत्ती सकारात्मक, रचनात्मकच असायला हवी हे दिवटे यांची ही कादंबरी समजावते. ती वाचत असताना माझ्या मनात दोन ओळी आल्या 

संभावनाओं का आसमान

भले बादलों से घिरा हो,

आकांक्षाओं का सूरज निकल करही रहेगा।

सब्र करो दोस्तों।

अंधेरा हटाने की प्रतिज्ञा लेकर

पलिते जल निकले हैं।

◼◼


दि. ११ जून, २०१२
साने गुरुजी स्मृतिदिन


गोष्टी समुपदेशनाच्या (आठवणी)

डॉ. शुभदा दिवाण । गुरूकुल प्रकाशन, पुणे
प्रकाशन - सप्टेंबर, २०११
पृष्ठे - १०५ किंमत -५0/-

जगणे समजावणारे हितगुज
 डॉ. शुभदा दिवाण यांनी लिहिलेलं ‘गोष्टी समुपदेशनाच्या' हे कुटुंबविषयक समस्यांचे निराकरण करणारं पुस्तक आहे. त्यांनी मानसशास्त्र विषयातील एम.ए. पदवी मिळविली आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉक्टर हा या काळातला केवळ औषधोपचार करणारा वैद्यक राहिलेला नाही. आजच्या माणसाचे प्रश्न अनेक आहेत. त्यामध्ये त्यावर उपचारही अनेक परीने, पद्धतीने करावे लागतात. औषधाबरोबर जो वैद्यक रुग्णांशी संवाद साधतो, हितगुज करतो, समुपदेशन करतो तो रुग्णास आपला वाटतो. अशा वैद्यकाचा व्यवसाय चांगला चालतो.
 सन १९९० पासून भारतात खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळे भारतात समृद्धीच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. शिक्षणमान वाढलं, वेतन वाढलं, माणसाचं जग बघणं वाढलं, जीवनशैली बदलली, व्यवसाय केवळ पुरुष करत. त्याची जागा स्त्री-पुरुष दोघांनी घेतली. दोघे शिकू, मिळवू लागले. स्वातंत्र्य आलं. स्वत्वाचा विकास झाला. यातून कुटुंब बदलत गेली. एकत्र कुटुंबांची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली. “भारत उदय'चा प्रकाश नि प्रभाव जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत दिसू व जाणवू लागला. स्पर्धा वाढली तशा संधी वाढल्या. आकांक्षांचं क्षितिज विस्तारलं. गरीब व श्रीमंत यांमधील ‘मध्यमवर्ग' नावाचा जो समाजघटक
    प्रशस्ती/१०७  होता, तो संघटित झाल्याने स्वातंत्र्योत्तर काळात त्याची मिळकत व जीवनपद्धती प्रत्येक पंचवार्षिक योजनेगणिक नवे व चढे वेतन मिळाल्याने उंचावत गेली. तो नवश्रीमंत झाला. गरीब, निम्नवर्गीयही अस्मिता व अस्तित्व भानामुळे रोज वर चढत गेला. झोपडपट्टीतही टी.व्ही., टेलिफोन, मोबाईलच्या रिंग नि टोनचे स्वर घुमू लागले. सायकलीची जागा टू व्हिलरने व टू व्हिलरची जागा चारचाकीने घेतली. घर निवृत्तीच्या वेळी न बांधता नियुक्ती होताच घेण्याचा फंडा जोर धरू लागला. ‘पळा पळा... पाहू कोण पुढे येतो ते'ची स्पर्धा इतकी जीवघेणी झाली की, प्रत्येक माणसाचा ‘कांचनमृग' झाला. जो तो राजा मिडास' होण्याची कृती करू लागला. त्याला आपली मुलं पैशाची यंत्रं व्हावी असं वाटू लागलं. ती मुलं न राहता पालकांनी आपल्या मुलांना एटीएम् बनवलं.
  ‘असतील तर पैसे'च्या जागी ‘हरघडी पैसे' (Any Time Money) त्याचं जीवन तत्त्वज्ञान बनलं. ‘पैसे मिळवणं' हे एकच जीवनध्येय बनल्यानं माणसानं मूल्यविवेक गमावला. विवेक विसरून भ्रष्टाचार करायचा नि शील विकून समृद्धीचं शिखर गाठायचं यात इथल्या स्त्री-पुरुषांना काहीच गैर वाटेनासं झालं. विचार करायचा मन नावाचा अवयव त्यानं सत्ता, समृद्धी, संचय साधायचं साधन बनवलं. साधनांनाच त्यानं साध्य बनवलं.कुटुंबात माणूस पाहुणा झाला. संवाद संपला. देणं हे कर्तव्य ठरल्यावर ‘दिलं की संपलं' असा दुरावा आला. मुलं वासनेची फळं झाली. पति-पत्नी नर-मादी बनत गेले. हे वाचताना अंगावर येत असलं तरी हे आपलं नाकारता न येणारं समाजवास्तव बनलं आहे. या सर्वांतून आपल्या कुटुंबातील पति-पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण ही एके काळी असलेली जिवाभावाची नाती जीवघेणी बनू लागली. जगण्याचा गुंता वाढत जाऊन नात्यातील गुंतागुंत वाढत गेली. प्रेम, ममत्व, जिव्हाळा, आपुलकीसारखे शब्द कवितेतच राहिले. जगण्यात काम, क्रोध, मत्सर, जुगुप्सा, ईर्षा, अधिकार इ. भावभावनांचे साम्राज्य निर्माण झालं. पति-पत्नी सात जन्माचे न राहता न संपणाच्या आयुष्यात प्रतीक्षित प्रवासी झाले. महागडे उपचार, औषधं, साधनं, शिक्षण यामुळे मुलं आनंदाचे क्षणाचे सोबती बनले. लहान मुलं ‘हवीशी' मोठी होतील तशी ‘नकोशी' बनू लागली. परस्पर राग, द्वेष, संशय यामुळे पिढ्यांतील संघर्ष तीव्र बनला. आई-वडिलांची कमाई, इस्टेट हवी पण ते नको अशी आत्मकेंद्री, स्वार्थी मनोवृत्ती जगण्याची शैली बनली. त्याचे साक्षीदार बनलेली मुलं... ती अकाली प्रौढ बनली. लाड, प्रेम, अतिरिक्त सुख साधनं सहज मिळाल्यानं पाल्यं शेफारलेली अपत्यं बनली.

प्रशस्ती/१०८

देता म्हणजे काय उपकार करता का? जमत नाही तर जन्म का दिला? तुमची कष्ट, गरिबीची कॅसेट ऐकून कंटाळा आला... हे रोजचे संवाद घर, कुटुंब उद्ध्वस्त करत गेले. उद्ध्वस्त धर्मशाळातील प्रश्नांकित प्रवासी... त्यांना डॉक्टर...' औषधं देणारा, समुपदेशन करणारा अनिवार्य वाटू लागला. जगण्यातील गुंतागुंत सोडवायची तर मनातली घुसमट कोंडमारा व्यक्त व्हायला हवा. प्रतिष्ठेच्या बुरख्याआड किती गुदमरायचं... दारं बंद करून किती दिवस सोसत राहायचं... तोंड दाबून बुक्क्यांचा मार असह्य होऊन माणसं आपलं दबलं दुःख डॉक्टरांकडे ओकू ... व्यक्त करू लागली. ‘डॉक्टर हा संयमी श्रोता असायला हवा...' हा सिद्धांत रोजचा व्यवहार बनला. त्या सर्वांच्या कथा... गोष्टी... कहाण्या... झाल्या. त्यांचंच नाव आहे ‘गोष्टी : समुपदेशनाच्या.'
  तन्मय नि सायली भाऊ-बहीण. मोठी होतात तशी एकमेकांचे वैरी बनू लागतात. कारण काय, तर आई-वडिलांचा मुलगा-मुलगी म्हणून दुजाभाव. उत्कर्षचे आई-बाबा दोघे मिळवते. घरात अतिरिक्त पैसे. चैनीची चंगळवादी जीवनशैली. वाढता पैसा... प्रलोभन उत्कर्षला उचल्या बनवते. 'सॉरी म्हटलं की संपतं' चा फॉर्म्युला नातं संपवतो. ऋचा चटपटीत खाण्यास चटावलेली. तिला घरची पालेभाजी ओकारी आणते पण जंकफूड आणते ढेकर... रियाच्या बाबांनी जमदग्नी स्वभावामुळे नोकरी गमावली. घरी रोज ओढाताण. आई-बाबांच्या घटस्फोटामुळे भीतीच्या सावलीत जगणारी रिया रोज तणावग्रस्त. परीक्षा म्हणजे राक्षस... शिंदे पतिपत्नीस आपली मुलगी स्नेहास आपल्या विचार, स्वप्नांची बाहुली बनवण्याच्या नादात हे विसरतात की मुलीला स्वतःचा काही विचार, दिशा आहे... ती तिची म्हणून स्वतंत्र आहे. रुपाली-अजय वर्गमित्र. मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी होतं कळत नाही... ‘प्रेमासाठी सर्वकाही' ठरलं की विधिनिषेध संपतो. चोरीपण सत्कृत्य वाटण्याच्या वयात जीवनाची झालेली वाताहात समजून उमजत नाही अशी स्थिती. दहावीला मेरिटमध्ये असलेली प्रज्ञा अकरावीला नापास. YD... Year Down... Rest Year चं फॅड टाईमपास म्हणून चॅटिंग... Boy friend हवाच. त्याशिवाय आपण मॉडर्न नाही अशी वाढत जाणारी क्रेझ'. योगेश Hi Fi जगाचा शिकार, मौज, मस्ती फॅशनचं जीवन वाटतंय त्याला. अभय हा एकुलता. लाडानं अप्पलपोटा. मी... माझं... मला काय दुस-याचं? असा आत्मकेंद्री. घरी वाढणारी मुलगी. ती केव्हातरी कुणाची तरी बायको, सून म्हणून जाणार. तिला जबाबदार, कामसू बनवावं याचा विसर पडलेले आईवडील. अशी मुलगी माहेरी

प्रशस्ती/१०९

कायमची आली नाही तरच आश्चर्य. बायको हवीय मला, पण ती घरकाम करणारी की नोकरी करणारी ? निर्णय न होण्याचा गुंता. सुप्रिया व रोहन शिकूनसवरून मोठे होतात. लग्न न करता एकत्र राहतात. इकडे आई वडलांचा जीव टांगणीला... तिकडे दोघे स्वर्गसुखात.
 असे एक नाही, दोन नाही, शंभर प्रश्न! समाज यक्षप्रश्नांचं महाजाल झालंय. ‘सॉफ्ट' कुटुंबांचे प्रश्न ‘हार्ड' होताहेत याचं भान हे पुस्तक वाचताना पानागणिक येत राहतं. पुस्तक अंगावर येणारं जगणं समजावत ही पुस्तकाची मिळकतच. डॉ. शुभदा दिवाण स्वतः सोशिक महिला आहे... शोषित नव्हे! ज्यांना सोसणं जमतं अशा बहुसंख्य भारतीय महिलांच्या त्या प्रतिनिधी स्वतःचं दुःख समजायला अक्कल लागत नाही. पण दुस-याचं दुःख समजायचं तर तुमचा संवेदना सूचकांक उच्च हवा. तो शिकण्यापेक्षा शहाणपणातून येतो. अनुभवजन्य समज म्हणजे शहाणपण. ते ज्याच्याजवळ असतं तो स्वतःला आवरत दुस-याला सावरत राहतो. समुपदेशक धीर देणारा, मार्ग दाखविणारा, समजून घेणारा, तुमच्या मन, हृदयाचा ठाव घेणारा, तरी तटस्थ राहून जगण्याची युक्ती देणारा ‘संजय' हवा, हे सदरचे पुस्तक लक्षात आणून देतं.
 यातील अनुभव व्यक्तिगत असले तरी प्रातिनिधिक आहेत. वाचक हे वाचतील तर स्वतः समुपदेशक बनतील, हे या पुस्तकाचं बलस्थान होय. डॉ. दिवाण रुग्णांना रुग्ण न मानता 'माणूस' मानतात. यातच त्यांच्या व्यवसाय यशाचं गमक आहे. रोजचं जगणं कठीण झाल्याच्या आजच्या काळात हे पुस्तक वाचकाला फक्त धीर, दिलासा न देता मार्ग दाखवतं. हे पुस्तक वाचताना दोन पुस्तकं आठवली. एक म्हणजे खलील जिब्रानचं महाकाव्य ‘प्रोफेट' आणि दुसरं ‘द मिनिंग ऑफ नो दायसेल्फ'. दोन्ही पुस्तकं जगणं समजावतात. असंच एक पुस्तक आहे ‘कुरल'.पुस्तकं माणसाची मित्र मार्गदर्शक व आयुष्याचे सख्खे सोबती असतात. ‘गोष्टी : समुपदेशनाच्या' हे अशाच पठडीतील पुस्तक.
 ‘जे आपणासी ठावे, ते दुस-यांशी सांगावे। शहाणे करूनी सोडावे सकल जन।।' उक्तीप्रमाणे हे पुस्तक वाचक समाजास प्रगल्भ करेल. सिग्मंड फ्रॉइडने अबोध मनाचे गुंते सोडवले. 'समाजस्वास्थ्य कार र. धों. कर्वे यांनी समाज गुंते ढिले केले. हे पुस्तक जगण्याचा ताण शिथिल करेलअसा मला विश्वास आहे. रक्ताची नाती जिवावर उठण्याच्या आजच्या काळात हे पुस्तक वाट चुकलेल्या युवकांसाठी सामाजिक होकायंत्र बनेल. आजच्या गुंतागुंतीच्या जगण्यात ‘कळतं पण वळत नाही' अशी स्थिती

प्रशस्ती/११०



झालेल्या सर्वांना दीपस्तंभ वाटत राहील. आकाशदीप होणारं हे पुस्तक घरोघरी वाचलं गेलं, तर माणसाची जगण्यावरची श्रद्धा नक्कीच द्विगुणित होईल.


◼◼

दिवस अकरावीचे(दैनंदिनी) भागवत माळी
अ. भा. साने गुरुजी कथामाला प्रकाशन, मुंबई
प्रकाशन - सप्टेंबर २०१२
पृष्ठे - ११४ किंमत - १00/



काल-चित्र उभे करणारी दैनंदिनी

 ‘अकरावीचे दिवस' ही भागवत माळी यांची वयाच्या १६-१७ व्या वर्षी लिहिलेली दैनंदिनी आहे. इतक्या लहान वयात माणूस सहसा अशी सविस्तर दैनंदिनी लिहीत नाही. त्यांना ती त्या दिवसात लिहावी वाटणे याचे कारण त्या वेळच्या त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत दडले आहे. वडील अल्पशिक्षित. शेतकरी कुटुंबातले. भावांच्या मागणीवरून घराची वाटणी होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते आपले घोटीसारखे छोटे गाव सोडून टेंभूर्णीसारख्या तालुकासदृश गावी येतात. नोकरीमुळे डाकबंगल्यात असलेल्या कर्मचारी निवासात राहतात. घरी असताना दिवाबत्तीची सोय नसताना अल्पशिक्षित वडील हातात चिमणी घेऊन 'चांदोबा' मासिक वाचत. वडिलांच्या या वाचनवेडाचा संस्कार मुलगा भागवत वर पडला. तो बालपणापासूनच. त्यामुळे इयत्ता अकरावीपर्यंत त्यांचे वाचन प्रगल्भ झाले. घरच्या हलाखीने त्यांना अकाली प्रौढ केल्यानेच १६ व्या वर्षीच्या अल्लड काळात भागवत पोक्तपणे वागत होता हे १९७२ साली लिहिलेल्या या दैनंदिनीवरून स्पष्ट होते.
 १६ ऑक्टोबर, १९७२ ते ७ जून १९७३ असा सुमारे ९ महिन्यांचा काळ भागवत माळी यांनी या दैनंदिनीत शब्दबद्ध केला आहे. हे त्याचे  जुन्या आकरावीचे म्हणजे शालान्त वर्ष. १९७२ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याप्रमाणे या काळात त्यांनी आपले अनेक स्वकीय, आत्मीय परिजन गमावले. विशेषतः बाईचं जाणं (आई) धक्कादायक होतं. स्त्री नसलेलं घर, बांगड्यांचा आवाज नसलेलं माजघर काय असतं ते दिवाळीसारख्या सणांना प्रकर्षानं लक्षात येतं. दिवाळीचे या दैनंदिनीतील दिवस वाचकांचे डोळे पाणावतात. वडिलांना पगार दोन रुपये. गुरुजींची शिकवणी ३ रुपये. म्हणून ती न घेणा-या भागवतवर गुरुजी जे कोरडे ओढतात, ते वाचले की वाटतं अशी वेळ कुणावर येऊ नये. रोज मक्याची भाकरी खाणारं त्याचं कुटुंब. त्याला गव्हाची पोळी मिळणं म्हणजे मिष्टान्न वाटावं यावरून भागवतची आर्थिक स्थिती लक्षात येते. अशा परिस्थितीतही तो ५८% गुण मिळवतो. संपन्न घरातील मुलाने ५८% मिळवणे व भागवतने ५८% मिळवणे यात अंतर आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

 ‘अकरावीचे दिवस' ही दैनंदिनी भागवत माळी यांनी विद्यार्थी दशेत लिहिली असल्याने त्याचे मूल्यमापन साहित्यिक निकषांवर करणे चुकीचे ठरेल. परंतु त्याला शाळकरी दैनंदिनी म्हणून तिची उपेक्षा करणे अन्यायकारक होईल. या दैनंदिनीचे सामाजिक महत्त्व आहे. तीत काळ जिवंत करण्याची ताकद आहे. त्यातील समाज चित्रण, पात्रे, मनुष्य व्यवहार, प्रसंग इ. इतकं बोलकं आहे की ते चित्र म्हणून उभं राहतं. घर, परंपरा, नातेवाईक, मित्रसंबंध, विद्यार्थी-शिक्षक संवाद व संबंध, प्रसंगातून माणसाचं शिकणं इ. अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारं हे लेखन कालचित्र व चरित्र बनून पुढे येतं.

 मराठी साहित्यात ‘दैनंदिनी' हा साहित्य प्रकार फार रूढ नसला तरी अनेक राजकीय नेत्यांच्या दैनंदिनींना इतिहासापेक्षा कमी महत्त्व नाही. महात्मा गांधी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण यांच्या दैनंदिनी कोण विसरेल? साने गुरुजींच्या हस्तलिखित दैनंदिनी मी वाचल्या-मिळवल्या आहेत. इंग्रजी साहित्यात त्याचे उत्कृष्ट नमुने आढळतात. त्यांचे कलात्मक सौंदर्य असते. यात भागवत माळी यांनी पत्र, कविता, सुभाषितांचा वापर करून ही दैनंदिनी वाचनीय केली आहे.

 अल्पवयीन लेखन असूनही दैनंदिनीचा बाज मात्र प्रगल्भ केला आहे.

▄ ▄

दि. ४ जुलै, २०११

चेन्नई घोषणापत्र(वैचारिक)
साप्ताहिक आरडंट व्ह्यू,कोल्हापूर,
पृष्ठ ३२ किंमत २0/




३१.शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचा मूलमंत्र

 शिक्षणाचे व्यापारीकरण रोखणे आणि नव्या समान शालेय शिक्षण पद्धतीची निर्मिती करण्यासाठी ‘अखिल भारतीय शिक्षण हक्क मंच'तर्फे ३० जून व १ जुलै, २०१२ या दोन दिवशी वलुवरकोट्टम, नंगमबक्कम, चेन्नई (तमिळनाडू) येथे विविध जात-धर्मीय बांधव, विधिज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, लेखक, पत्रकार, कलाकार, शिक्षक संघटना, शिक्षण संस्था यांची ‘अखिल भारतीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत जो विचारविनिमय झाला, जे ठराव झाले त्याचे एक घोषणापत्र तयार करून ते परिषदेत स्वीकृत करण्यात आले. ते 'चेन्नई’ घोषणापत्र नावाने सर्व वृत्तपत्रे, नियतकालिके, माध्यमे इ. द्वारे प्रसृत करण्यात आले होते. ते मराठीत सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध करून त्याचा व्यापक प्रचार, प्रसार व्हावा म्हणून या पुस्तिकेच्या रूपाने प्रकाशित केल्याबद्दल शिक्षक समितीस धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे.
 शिक्षण ही सामाजिक, सांस्कृतिक प्रक्रिया होय. शिक्षणातूनच न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा आदी मूल्यांची रुजवण होत असते. म्हणून भारतीय राज्यघटनेने भारतातील सर्वसामान्य नागरिकास सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क दिला.

त्यातून गेल्या ६५ वर्षांत समान शिक्षण मिळत राहून समाज एकसंध व एकजिनसी राहण्यास मोठे सहाय्य झाले. परंतु गॅट, डंकेल करार, जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य, उदार आर्थिक धोरण, खासगीकरण, जागतिकीकरण इ. मुळे शिक्षण सेवा न राहता उद्योग, व्यवसाय, व्यापार होऊन गेला. त्याच्या खच्या स्वरूपाचे वर्णन करायचे झाले तर शिक्षणाला बाजाराचे, बजबजपुरीचे रूप आले. खासगी शिक्षण संस्था, विना अनुदान शिक्षण संस्कृती, विदेशी विद्यापीठांचे आगमन, शिक्षणाचे खासगीकरण अशा अनेक प्रकार समान शिक्षण पद्धतीच्या जागी नवी विषम व विसंगत संस्कृती निर्मिण्याचा उद्योग सरकारनं आरंभला असून त्यामुळे शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्याचे राहिलेले नाही. 'बळी तो कान पिळी' अशी धनसत्तेच्या जोरावर विद्याप्राप्तीचा नवा उद्योग फोफावतो आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फुटलेले पेव हे राज्यघटनेच्या भाषाधोरणाची उघडउघड पायमल्ली आहे. शिक्षक सेवक' नावाची श्रेणी म्हणजे शिक्षक पदाची अप्रतिष्ठा आहे. शिक्षणातील किमान सुविधांचे बंधन शिथिल करून, अभ्यासक्रमाची स्वायत्तता देऊन सरकार एकसमावयी प्रचलित शिक्षणास सुरुंग लावत शिक्षण व पदव्यांची विक्री करू पाहते आहे.

 शिक्षणावरील आर्थिक तरतूद कमी करणे, उच्च शिक्षणाची जबादारी शासनाची नसल्याने जाहीर करणे, या सरकारच्या कृतीतून शिक्षणाविषयीच्या शासनाचा नवा दृष्टिकोण पुरेसा स्पष्ट होतो. सन १९८६ च्या शिक्षा की चुनौती' (Challenge of Education) या नव शैक्षणिक धोरणापासून सुरू झालेले शिक्षणाचे खासगीकरण आज ते बाजार होऊन बसले आहे. चेन्नई घोषणापत्र' या समाजविघातक शैक्षणिक धोरणास विरोध करून त्यास पर्याय म्हणून ‘समान शालेय शिक्षण व्यवस्था' (Common Schooling) सुचवू इच्छिते. आज वस्तुस्थिती अशी आहे की बालवाडीस किमान ५000 रुपये भरल्याशिवाय खासगी शिक्षण संस्थेत सामान्यास प्रवेश नाही. एके काळी सर्व शिक्षण आर्थिक मागासलेल्या (Economic Backward) प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत वा अल्प दरात मिळण्याची सोय होती. स्वातंत्र्यानंतरच्या पाच पिढ्या या पद्धतीतून शिकल्या. सर्वसामान्यांची मुले डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, वकील, शास्त्रज्ञ होऊ शकली. मुलींच्या शिक्षणाचा व्यापक प्रचार, प्रसार झाला. त्याला या नव्या बाजारीकरणाने खीळ बसून शिक्षणातून सर्वसामान्य मनुष्य, आम आदमी हद्दपार होती आहे. शिक्षण सर्व समाजाचे (Mass) न राहता मूठभर वर्गाचे होते आहे.

त्यातून धनदांडग्यांची शैक्षणिक मक्तेदारी (Monopoly) निर्माण होऊ पाहते आहे. चेन्नई घोषणापत्र' या असामाजिक, विषम शिक्षण रचनेविरुद्धचा जिहाद आहे.

 चेन्नई घोषणापत्र' केवळ विरोध करून थांबत नाही तर येऊ पाहणा-या वर्तमान विषम शिक्षण पद्धतीस ‘समान शालेय शिक्षण पद्धती'चा सकारात्मक पर्यायही सुचवित आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रात निकटवर्ती शाळा (Neighbourhood School) असतील. तिथे निकट निवासी क्षेत्रातील सर्व विद्याथ्र्यांना प्रवेश मिळेल. सर्वांना समान शिक्षण मिळण्याची शाश्वती असेल. या शाळा शासन चालवेल व त्याचा खर्चही शासन करेल, असे शिक्षण किमान १२ वी पर्यंत मिळेल तर भेदरहित शिक्षणातून भेदरहित समाज (Classless Society) निर्माण करणे शक्य होईल. ही काही कवी कल्पना नाही. अमेरिकेत अशा शाळा, शिक्षण अस्तित्वात असून रूढ आहे. पदवी शिक्षणापर्यंत ‘समान शिक्षण' धोरण शासन राबवेल तर आज भारतास प्रांतवाद, भाषावाद, भ्रष्टाचार इ. चा जो विळखा आवळतो आहे, त्यातून देशाची मुक्तता होऊन राष्ट्रीय शिक्षणाचे सर्व हिताचे धोरण अमलात येईल.
 यासाठी चेन्नई घोषणापत्र महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या हातात जाईल तर सन २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकच या प्रश्नावर मत देण्यास सज्ज होतील असा निखळ दृष्टिकोण निर्माण करण्याची ताकद या घोषणापत्रात आहे. सर्वसामान्यांच्या खिशास परवडणारे असे शिक्षण हवे, तसे ते सर्वसामान्यांच्या बौद्धिक क्षमतेचे व आकलनाचेही असणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमांच्या हव्यासाने व टी.व्ही. चॅनल्सच्या माध्यमातून भाषेची जागतिक मक्तेदारी निर्माण केली जात आहे. इंग्रजी ज्ञानभाषा आहे' असा धूर्त प्रसार करून अन्य भाषांना मरण बहाल करण्याचा छुपा अजेंडा लपून राहिला नाही. इंटरनेट, टी.व्ही. चॅनल्स, मोबाईल, उच्च शिक्षण, संदर्भ ग्रंथ, विश्वकोश इ. ज्ञानसामग्री इंग्रजीत निर्माण होईल असे एकीकडे पाहायचे. दुसरीकडे इंजीनिअरिंग, मेडिकल, लॉ इ. शिक्षणाचे व त्याच्या व्यवहाराचे (Practice) माध्यमही इंग्रजी राहील असे पाहायचे ही ज्ञानाची धूर्त व्यूहरचना सर्वसामान्यास शिक्षणाच्या चक्रव्यूहात तोंडावरच अडविण्याचा (खरे तर तोंडघशी पाडण्याचा!) डाव आहे, हे केव्हातरी एकदा आपण समजून घ्यायलाच हवे.

 शिक्षणाच्या गुणवत्तेच्या नावावर ते तंत्रज्ञानाधारित विकसित करायचे व तंत्रज्ञान इतके महाग ठेवायचे की सामान्य माणूस त्याचे केवळ स्वप्नच

पाहू शकेल! हा देखील शिक्षणापासून सर्वसामान्यांना वंचित करण्याच्या जागतिक व्यूहरचनेचाच एक अविभाज्य भाग आहे. जागतिकीकरणाच्या नव्या ज्ञान व्यूहास समर्थ पर्याय म्हणून चेन्नई घोषणापत्राचे असाधारण सामाजिक महत्त्व आहे. मातृभाषेतून मोफत, गुणवत्ताप्रधान, तंत्रज्ञानमुक्त शिक्षणाची निवासी क्षेत्रात सोय होईल तर कोण शिक्षण वंचित राहील? शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा (Universalization) उपाय चेन्नई घोषणापत्र असून शिक्षणाचे जागतिकीकरण (Globalization) नव्हे. समजून घेण्यासाठी ही छोटेखानी पुस्तिका सर्व समान हितचिंतक, पालक, शिक्षक, संस्थाचालक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, शिक्षण तज्ज्ञ इ. नी गंभीरपणे वाचून समाज शालेय शिक्षण पद्धतीचा आग्रह संघटितपणे प्रसंगी चळवळ करून धरायला हवा.

▄ ▄

गोष्ट सुखी माणसाची (आत्मकथन)
डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे
सौ. मनिषा पूर्णपात्रे, नाशिक
प्रकाशन - ऑक्टोबर, २०१३ पृष्ठे -२०८ किमत - १७५/



पूर्णपात्र समाजसेवेची सार्थक कहाणी

 गोष्ट सुखी माणसाची' नावानं नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. हे पुस्तक शीर्षकापासूनच पकड घेतं. आज एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक सरलेल्या काळात आपण वावरतो आहोत. माणसं आज आतल्या- आत रडतात नि वर हास्य क्लबात हसून आपण सुखी असल्याचा दाखला देतात. अशा काळात एक माणूस आपल्या सुखाची गोष्ट सांगतो ही न पटणारी गोष्ट! म्हणून त्यांनी मला मनोगत व अन्य एक दोन प्रकरणे वाचून प्रस्तावना लिहिली तरी चालेल असे सुचवले असतानाही पूर्ण पुस्तक वाचूनच प्रस्तावना लिहिण्याच्या माझ्या शिरस्त्याप्रमाणे ते पूर्ण वाचले. पूर्ण वाचून माझी खात्री झाली की ही खरंच एका सुखी माणसाची गोष्ट होय.

 डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे पूर्ण सुखी गृहस्थ होत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी इच्छिलं नि घडलं असाच सारा क्रम दिसतो.माणसाच्या जीवनाच्या सारीपाटात साऱ्या सोंगट्या, फासे अनुकूलच कसे व का पडत जातात याचे रहस्य मी या पुस्तकात शोधू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की जीवनात ऊन असावं की पाऊस ते तुमच्या वृत्तीनंच ठरतं. डॉ.श्रीकांत पूर्णपात्रे यांनी आपलं हे आत्मचरित्र 'गोष्ट सुखी माणसाची अत्यंत खिलाडू वृत्तीनं लिहिलंय.जागोजागी कोट्या, कोपरखळ्या आहेत.सर्वांत महत्त्वाचे

म्हणजे या आत्मचरित्रात स्वतःवर अनेकदा विनोद केलेले आढळतात. स्वतःवर विनोद करता येणं ही आयुष्य जगण्याची वरची कला होय.

 डॉक्टरांचा नि माझा परिचय गेल्या १५-२० वर्षातला. मी पूर्वी अनाथ, निराधार, मुले, मुली व महिलांच्या संगोपन व पुनर्वसन क्षेत्रात काम करायचो. तेव्हा तेरेदेस होम्स नावाची एक जर्मन संस्था महाराष्ट्रातल्या निवडक नि गरजू संस्थांना अर्थसाहाय्य करायची. त्या संस्था सचोटीनं काम करायच्या नि तिथले कार्यकर्ते समर्पित असायचे. अशांचं संयुक्त संमेलन, प्रशिक्षण असायचं. त्या निमित्ताने साहाय्य मिळविणाच्या संस्थांचे कार्यकर्ते एकत्र येत. अनुभवांची देवाणघेवाण व्हायची. अशा एका प्रशिक्षणात आधाराश्रमाचे नाना उपाध्ये आमच्या कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात आले होते. तेव्हा प्रथम ही संस्था मला समजली. मग मी त्यांच्या दत्तक पालक मेळाव्यात उद्घाटक म्हणून गेलो. संस्था पाहिली व आमचे संस्थात्मक ऋणानुबंध प्रथम निर्माण झाले. त्याचे रूपांतर व्यक्तिगत मैत्रीत झाले. ही परंपरा डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांनी नुसती टिकवली नाही तर वाढविली... समृद्ध केली.

 ‘गोष्ट सुखी माणसाची' हे आत्मचरित्र डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे व्यक्तिगत व सामाजिक जीवन निखळपणे व्यक्त करते. आपल्या आई, वडील, पत्नी, मुले, सुना, नातवंडे सर्वांबद्दल त्यांनी जे लिहिलं ते आडपडदा न बाळगता व हतचाही न ठेवता. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा माणूस आत-बाहेर एक असतो. अद्वैत व्यक्तिमत्त्व समाजात आढळणारी दुर्मीळ गोष्ट होय. ती डॉ. पूर्णपात्रे यांच्या ठायी आहे. ते अष्टपैलू आहेत. डॉक्टर व्यवसायातील त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते अनेक कुटुंबांचे ‘फॅमिली डॉक्टर' झाले. त्याचे पेशंट सर्व थरातील. यातून माणसाचा सर्वांप्रती समभाव दिसून येतो. डॉ. पूर्णपात्रे पेशंटसाठी २४ तास उपलब्ध असायचे. त्यांचा फोन कधी ‘स्विच्ड ऑफ' असत नाही ही आख्यायिकेसारखी वाटणारी गोष्ट वस्तुस्थिती असणं यातच त्यांची सेवापरायणता सिद्ध होते. ते कुशल संघटक होत. आधाराश्रमक फिजिशियन्स असोसिएशन, लायन्स क्लब, मेडिकल असोसिएशन साच्या संस्थातलं त्यांचं अजातशत्रू नेतृत्व त्यांच्या निरपेक्षतेतून आल्याचं आढळतं. कुशल सूत्रधार, वक्ते, लेखक अशा चतुरस्र पद्धतीने ते जीवनाचा आस्वाद घेताना दिसतात.ही जिंदादिली त्यांची खरी वृत्ती, आतला आवाज! मीनाकुमारी काळाच्या पडद्याआड गेली म्हणून त्या दिवशी ‘ठंडी चाय' (दारू)पिणारा माणूस खरा संवेदनशील!पत्नी प्राप्तीच्या दिव्यातही ती प्रतिबिंबित! आपल्याला दोन मुलं म्हणून

तिस-या मानस कन्येचं सर्व करणारा हा आगळा पिता! ही सारी हरहुन्नरी माणसात येते ती जीवनाकडे पाहण्याच्या एका ऊर्जस्वल ऊर्मीतून!

 सामाजिक काम करताना त्यांना अनेक पुरस्काराने गौरविलं जाणं स्वाभाविकच म्हणायला हवं. प्रेमळ पालक, हजरजबाबी वक्तृत्व, अजातशत्रू संघटक, कवी मन, संस्थांचा आधारवड असं सारं एक माणसात असणं... यासाठी माणसात काही गोष्टी उपजतच असाव्या लागतात. पूर्वजांनी केव्हातरी एका राजाकडून पूर्णपात्र सुवर्णमुद्रा हट्टानं मागून घेतल्या पण येथून पुढे त्यांच्या साच्या पिढ्या ‘पूर्णपात्रे' नावाने ओळखल्या जातील त्या केवळ डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांच्या पूर्णपात्र समाजसेवेमुळे! दानातून मिळालेलं नामाभिदान जो मनुष्य कर्तृत्वाने सार्थक करतो तो पुरुषार्थ म्हणून अनुकरणीय व अभिनंदनीय ठरतो.

 डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांच्या आत्मचरित्र ‘गोष्ट सुखी माणसाची' ... ती एका माणसाची गोष्ट नाही. आधारआश्रमाच्या माध्यमातून, आपल्या रुग्णसेवेतून ज्या कुणा अनाथ, निराधार, गरजूंना आधार, सहाय्य, समुपदेशन करून साधार केलं, स्वावलंबी केलं, सुखी केलं त्या सर्वांची ही साठाउत्तराची कहाणी! ती सुफळ, संपूर्ण, पूर्णपात्र न होती तरच आश्चर्य!

▄ ▄

दि. २ ऑक्टोबर, २०१२

महात्मा गांधी जयंती

रक्ताच्या नात्यापेक्षा (कथासंग्रह)
रंगराव बन्ने साहित्य विकास मंडळ, कारदगा (कर्नाटक)
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१२
पृष्ठे - ६८, किंमत - ७५/



उद्याचे जग आज पाहता यायला हवं

 रंगराव बन्ने यांचा ‘रक्ताच्या नात्यापेक्षा' हा कथासंग्रह मी वाचला. या संग्रहात एकूण अकरा कथा आहेत. पैकी पाच कथांना यापूर्वी दैनिक महासत्ता, इचलकरंजीतून पूर्वप्रसिद्धी मिळालेली आहे. त्या अर्थाने ते वाचक परिचित आहेत. नवोदित कथाकार असल्याने या त्यांच्या कथा रियाजाच्या काळातील होत. गायक छंद म्हणून प्रथम गातो. मग रियाज करतो. रियाजातून त्याला सूर गवसतो म्हणे. कथाकारांचं तसंच असतं. पहिल्यांदा तो छंद म्हणून लिहितो. मग त्याला लिहिण्याचा नाद लागतो. या नादातून मग त्याला त्याच्या प्रतिभेचं भान येतं. रक्ताच्या नात्यापेक्षा मधील कथा या असा सराव काळातील असल्यानं त्यांच्याकडून फार मोठ्या कलात्मक कथांची अपेक्षा करणं चुकीचं. या कथा वाचताना एक गोष्ट लक्षात येते की हा लेखक सजग आहे. त्याला आजूबाजूचं जग माहीत आहे. जगण्याचे प्रश्न माहीत आहेत. गरिबांची नाडवणूक, श्रीमंतांची माजोरी, तरुणांचं प्रेम, माणूस आणि जनावर यांच्यातील संबंध, फरक सारं त्याला चांगलं माहीत आहे. माणसांची या लेखकाला पारख आहे. पोलीस, शिक्षक, जमीनदार इ. व्यवसाय म्हणून तेथील माणसांचे चेहरे रंगराव बन्ने जाणून आहेत. ते ज्या ग्रामीण भागात राहतात तेथील नातेसंबंध, अर्थव्यवहार,

प्रेम, विवाह, शेती-भाती, भाषा, रिवाज यांची लेखक म्हणून असलेली समज प्रौढ आहे. त्यामुळे परिसरात घडलेल्या घटनांचे पडसाद म्हणून त्यांची कथा आकार घेत राहते. ते कल्पनेनं कथा लिहीत नाहीत. त्याची कथा वास्तवावर बेतलेला कल्पनेचा इमला असतो. कुठल्या कथेत कशी पात्रं निर्माण करायची, कुठल्या कथेची भाषा कशी हवी यांचे लेखक म्हणून रंगराव बन्नेचे स्वतःचे असे आडाखे असतात. त्यातून त्यांची कथा खुलत राहते. ती वाचनीय असते. प्रत्येक कथेचं बीज वेगळं. घटना, प्रसंग, पात्र, प्रदेश, वातावरण वेगळे. म्हणून प्रत्येक कथेचा चेहरा-मोहरा वेगळा. त्याचं वाचन वाढलं, इतर कथाकारांच्या कथालेखनाचा त्यांनी अभ्यास केला, स्वतःचं चिंतन, विचार विकसित केले तर या कथा संग्रहापेक्षा अधिक सरस नि सकस कथा ते मराठी साहित्य व वाचकास देतील असा विश्वास ‘रक्ताच्या नात्यापेक्षा' मधील कथा वाचताना वाटला.

 या कथासंग्रहातील ‘तपास' कथा नव-याला सोडून श्रीपती जाधवबरोबर राहणाच्या धोंडीच्या खुनाच्या तपासाची कथा. सडलेलं प्रेत हाती आल्यानं खून की आत्महत्या ठरवू न शकलेल्या पोलिसांच्या पुढे तपासाचं आव्हान उभं असतं. इन्स्पेक्टर नांगरे शक्कल लढवतात. त्यांना हे माहीत असतं की बाईच्या खुनाचं रहस्य बाईलाच माहीत असणार. ते पांदीत हागणदारीच्या निमित्तानं येणाच्या बायकांवर पहारा बसवतात. गप्पा ऐकतात नि खुनाचे धागेदोरे मिळवतात. हे सारं कथाकार मोठ्या रहस्यानं सांगतो ते मुळातूनच वाचायला हवं. ओवाळणी' ही बंधुप्रेमाची कथा. बहीण नसल्याचं शल्य एक तरुण संकटग्रस्त भगिनीची अब्रू वाचवून दूर तर करतोच पण ओवाळणी म्हणून तिला प्रत्येक संकटग्रस्त स्त्रीस मदत करायचं आश्वासन देतो. यातून लेखकाचं आदर्श, मूल्य इ. बद्दलचं प्रेम व्यक्त होतं. मराठी कथेत तर वि. स. खांडेकरांनी 'भाऊबीज' विषयावर आठ-दहा कथा लिहिल्यात. त्या बन्ने वाचतील तर ‘ओवाळणी' कथा त्यांना अधिक प्रभावीपणे लिहिता येईल. 'साथ', 'त्याग', ‘शेवटचा आशीर्वाद' या तीनही कथा प्रेमकथा होत. त्याही वेगळी पात्रं, प्रसंग निवडून त्या कथा वाचनीय बनवल्याआहेत. पैकी 'त्याग' मधला नायक प्रेमी शिक्षक असतो. पण तो स्वतःचं प्रेम व्यक्त न करता अविवाहित राहून जपतो. यात प्रेम आणि शिक्षक दोन्हीचं मूल्य व महत्त्व जपलं गेलं आहे. या संग्रहातील ‘आधार’ कथा ग्रामीण होय. ती भाषेच्या अंगाने जशी ग्रामीण तशी पात्रं, घटना इ. नी पण. ‘भक्तीचे मोल' कथेतून भिका-याचं दातृत्व व कृतज्ञता स्पष्ट होते.‘शेवटचा आशीर्वाद'काल्पनिक कथा वाटते.'रक्ताच्या नात्यापेक्षा' ही या

संग्रहाचे शीर्षक असलेली कथा ‘माणसापरास मेंढरं बरी न्यायाने भूतदयेचे, प्राणीप्रेमाचे उदाहरण होय. ‘उपकाराची परतफेड’, ‘माया', ग्रहणकथा अशाच पठडीतील. या सर्व कथांना बोधकथेचं वलय आहे. त्या केवळ वेळ काढायचं साधन, मनोरंजन, शिळोप्याचा उद्योग म्हणून लिहिलेल्या नाहीत. तर या लेखनामागे एक समाजभान आहे. रंजनातून दृष्टी, विचार, संस्कार देण्याची कथालेखकाची धडपड अनुकरणीय आहे.

 कथा हा साहित्यप्रकार म्हणून रामायण, महाभारत, उपनिषद, वेद, जातक साच्यातून आढळतो. कथा सांगणं नि ऐकणं ही माणसाची उपजत वृत्ती आहे. अगदी रानटी अवस्थेतही मनुष्य जंगलात शेकोटी पेटवून रात्रभर दिवसाच्या अनुभव कथा सांगत राहायचा. कथांचे सर्व प्रकार पूर्वीपासून आपल्यात आहेत. निसर्ग कथा, रूपककथा, दृष्टान्त कथा, बोधकथा, शिकार कथा, रहस्य कथा, प्रेमकथा, युद्धकथा किती प्रकार आहेत कथांचे. थोडक्यात, मोठा आशय सांगण्याचं कसब केवळ कथेतच असतं. रूपककथा या संदर्भात सगळ्यात सुंदर प्रकार. चांगल्या कथाकाराला भूत, वर्तमान व भविष्याचा मेळ घालता आला पाहिजे. खरा कथाकार भविष्यलक्ष्यी असतो. ‘सावध ऐका पुढल्या हाका' या ओळीतील गर्भितार्थ ज्याला गवसतो तो चांगला कथाकार होऊ शकतो. लहान मुलांना कार्टून्स का आवडतात तर ती उद्याच्या जगात त्यांना नेत असतात. कथाकाराला उद्याचं जग आज पाहता येण्याची प्रतिभा हवी. आजचं सगळ्यांनाच दिसतं. उद्याचा संसार दिसायला तुमचा व्यासंग हवा. रंगराव बन्ने हे सारं समजून घेऊन लिहितील तर त्यांची कथा जी आज केवळ वाचनीय आहे, उद्या ती विचारणीय होईल तर त्यांच्या लेखणीत सामर्थ्य आल्याचा प्रत्यय येईल. तो यावा अशी शुभेच्छा!

▄ ▄


दि. १० ऑक्टोबर, २०१२

कोल्हापूर

नाथा (कादंबरी)
चार्ल्स डिकन्स
भाषांतर- सुभाष विभूते चैतन्य सृजन व सेवा संस्था,आजरा
प्रकाशन -डिसेंबर, २०१२
पृष्ठे - ६६ किंमत - १0/



‘नाथा' जन्माला न येण्याचे शिवधनुष्य पेलूया!


‘नाथा' ही प्रा. सुभाष विभूते यांनी चार्लस् डिकन्सच्या ‘ऑलिव्हर विस्ट' या जगप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीचं केलेलं मराठी रूपांतर आहे. या रूपांतराची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. स्वतः अनुवादकारांनी आपण केलेल्या या कार्याला ‘अनुनिर्मिती' असं म्हटलं आहे. असं म्हणण्याची कारणं आहेत. ते त्यांच्या दृष्टीनं अनुवाद नाही की रूपांतर. एक तर ते संक्षेपीकरण आहे. मूळ इंग्रजी ‘ऑलिव्हर विस्ट' ही कादंबरी पावणे दोनशे पानांची आहे. ती अवघ्या ४४ पानात प्रा. विभूते यांनी सादर केलेली आहे. दुसरं असं की या कादंबरीतील ब्रिटिश व्यक्तिरेखा, गावं, प्रसंग बदलून ती चक्क मराठी, महाराष्ट्रीय केलेली आहेत. यामुळे ती सादरकर्यास अनुनिर्मिती वाटते. तिचा एकोणिसाव्या शतकाचा काळ ही वर्तमान विसावे शतक करण्यात आला आहे.

 चार्लस डिकन्सची ‘ऑलिव्हर विस्ट' ही कादंबरी पहिल्यांदा 'बेंटलिज मिसिलिनी' या मासिकातून क्रमशः फेब्रुवारी १८३७ ते एप्रिल, १८३९ या काळात ५३ भागात प्रकाशित झाली तेव्हा तिचे नाव 'पेरिश बॉयज प्रोग्रेस' असे होते. त्याचा अर्थ होतो एक मृतप्राय बालकाची प्रगती. ही डिकन्सची दुसरी कादंबरी. यातून चार्ल्स डिकन्सनी गरिबांचा कायदा (Poor Law), बालमजूर, रस्त्यावरची मुले, बाल गुन्हेगार अशा विविध

 अंगांनी अनाथ निराधार मुलांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसन विषयक प्रश्न मांडले. त्यामुळे ब्रिटिश समाजात या प्रश्नांविषयी जागृती निर्माण होऊन एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात पुअर होम्स, रिफॉर्मेटरी स्कूल्स, बोट्रल स्कूल, ऑर्फनेजीस, शेल्टर होम्स, फंडलिंग होम्स सुरू झाली. त्याच धर्तीवर विसाव्या शतकात भारतात अशा प्रकारच्या संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाल्या.

 विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगास दोन महायुद्धांना सामोरे जावे लागले. त्यात अक्षरशः लक्षावधी बालके मेली, जी जिवंत होती त्यापैकी अनेक आई-वडिलांच्या मृत्यूने अनाथ निराधार झाली होती. या मुलांच्या व विधवा स्त्रियांच्या प्रश्नातून युनो, युनिसेफ, युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना, संस्था उदयाला येऊन त्यांनी बालकांचे हक्क मान्य करून जागतिक स्तरावर अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, बालमजूर, संकटग्रस्त, युद्धग्रस्त बालकांच्या संगोपन व पुनर्वसनाचे कार्य अंगिकारले. पण त्या सर्वांमागे ‘ऑलिव्हर विस्ट' युरोपात घडवून आणलेला भावजागर होता हे आपणास विसरून चालणार नाही.

 ‘नाथा' हा प्रा. सुभाष विभूते यांनी घडविलेला ‘ऑलिव्हर विस्ट' चा एकविसाव्या शतकातला भारतीय अवतार होय. या अनुनिर्मितीत लेखकाने मूळ आशय सुरक्षित ठेवून चरित्र व प्रसंगांचे संक्षिप्तीकरण केले आहे. ही अनुनिर्मिती त्यांनी कुमार-किशोर गटातील बालवाचक डोळ्यांसमोर ठेवून केलेली असल्याने भाषा, घटना, चरित्र यांचे यात सुलभीकरण आहे. हे पुस्तक वाचून मुलांच्या मनात अनाथांविषयी सहानुभूतीच निर्माण होणार नाही तर ते त्यांच्या संगोपन, शिक्षणात आपला खारीचा वाटा उचलतील. खाऊचे पैसे बचत करणे, वाढदिवसावर पैसे कमी खर्च करणे, फटाके कमी उडविणे, या सर्वातून ते अनाथ मुलांशी नाते जोडतील व समाजातील सर्व अनाथ मुलांचे 'नाथ' होतील. या कादंबरीतील ‘नाथा' शेवटी त्याची परवड संपून सुखी घरात सुरक्षित होतो तसा प्रत्येक अनाथ मुलगा सनाथ व्हावा म्हणून प्रा. सुभाष विभूते यांनी केलेला खटाटोप. तो सुफळ संपूर्ण करणे तुमच्या संवेदनशील क्रियात्मकतेवर अवलंबून आहे.

 सगळ्याच बिया काही खडकावर पडत नसतात. या पुस्तकातला नाथा ज्यांच्या हृदयास भिडेल, भावेल तोच संवेदनशील वाचक, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटली तरी आपल्या देशात मुलांचं अनाथ होणं कमी होत नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार या देशात आई-वडील नसलेली तीन कोटी मुलं आहेत. शिवाय बेघर, रस्त्यावरची,

बालमजूर, दुभंगलेल्या कुटुंबातील, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी, कुमारी मातांची संकटग्रस्त मुलं, एड्सग्रस्त, धरणग्रस्त, सेझग्रस्त, रस्ता विकास प्रकल्पग्रस्त दहशतवादाचे बळी, नक्षलग्रस्त व युद्धग्रस्त सीमांत प्रदेशातील मुलं अशी दोन कोटी आणखी मुले अनाथांचं जिणं जगत आहेत. अनाथाश्रम, रिमांड होम, विशेषगृहे, आश्रमशाळा इ. मधून राहणारी मुले हजारांच्याच घरात आहेत. बाकीच्या कोट्यवधी मुलांचे काय? संस्थातील मुलांची स्थिती पुअर होम मधल्या ऑलिव्हर विस्टपेक्षा वेगळी नाही. २00 वर्षे उलटून गेली तरी प्रा. सुभाष विभूते यांनी या सर्व वास्तवातून आलेल्या अस्वस्थतेतून ‘नाथा' या ऑलिव्हर विस्टचा पुनर्जन्म घडवून आणला आहे. नाथा जन्मालाच येणार नाही असा समाज निर्माण करण्याचे शिवधनुष्य, त्यांनी आपणापुढे ठेवले आहे. आपण सर्व मिळून ते उचलू या. प्रत्येक नाथा सनाथ करू या! All is well, that's end well!!

▄ ▄


दि. ३० नोव्हेंबर, २०१२

प्राथमिक शिक्षणाचे वास्तव (लेखसंग्रह) प्रभाकर आरडे
आरडंट प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - जानेवारी, २०१३
पृष्ठे - ११२ किंमत - १२०/




चांगल्याचे स्वागत नि वाईटाचा विरोध


 "प्राथमिक शिक्षणाचे वास्तव' हा साप्ताहिक 'आरडंट व्ह्यू' चे संपादक व अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष श्री. प्रभाकर आरडे यांच्या त्यांनी वेळोवेळी विविध वर्तमानपत्रांतून लिहिलेल्या व त्यातही प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण विषयक व चळवळीविषयक लेखांचा संग्रह होय. हे लेख प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण व शिक्षक यांना केंद्र धरून लिहिलेले असले, तरी काही विषय आगतिक शैक्षणिक घटनांविषयी आहेत. या लेखांचे सूत्र शिक्षक व शिक्षणविषयक हक्क आहे. शिक्षकांच्या संघटना त्यांच्या हक्कांविषयी लढतात खऱ्या, पण प्रभाकर आरडे हे स्वतः कर्तव्यदक्ष प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी स्वतःचे काम चोख बजावत असताना प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षक संघटनेचे कार्य केले आहे. त्यामुळे इतर संघटक केवळ हक्कांची मागणी व पाठपुराव्याचे काम करत राहिले. मात्र प्रभाकर आरडेंनी आपल्या स्वतःच्या जीवनातील कार्य व लेखन हक्क व कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मानून केले. त्यामुळे आपल्या साप्ताहिक 'आरडंट व्ह्यू' मध्ये लेखन करताना शिक्षक व शिक्षणविषयक घटना, शासन निर्णय, योजना इत्यादींना मुख्यतः प्रतिसाद देण्याचा त्यांचा राहिला. जिथे निर्णय, प्रसंग योग्य होते, तिथे

त्यांची भूमिका प्रतिसाद सकारात्मक राहिला. कारण ते मुळात विधायक वृत्तीचे पुरोगामी कार्यकर्ते व संघटक होत. पण जिथे घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचे निर्णय झाले, शिक्षकांच्या हक्कांवर नांगर फिरवणारी धोरणे जाहीर झाली, तिथे तिथे त्यांची प्रतिक्रिया तीव्र, तिखट असली तरी व्यवस्थेला सुरुंग लावणारी नव्हती. व्यवस्था टिकली तरच नोक-या टिकणार याचं भान ठेवून संघटन कार्य करण्याची जागरूकता आरडे यांनी आयुष्यभर दाखविली असल्याने त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटणे स्वाभाविक आहे. तसा प्रत्यय सदर लेख वाचताना येतो. त्यामुळे हे लेखन मला आश्वासक वाटले. आपणासही ते वाटेल असा मला विश्वास आहे.

 या लेख संग्रहात विषयाची विविधता आहे. प्राथमिक शिक्षणविषयक बृहत आराखडा, इंग्रजी शाळांचा अतिरेक, पटपडताळणी, सर्व शिक्षा अभियान, पदवीनंतर डी.टी.एड., प्राथमिक शाळांचे सर्वेक्षण व नियंत्रण, प्राथमिक शिक्षण हक्क विधेयक, पेन्शन हक्क, शिक्षक गुणवत्ता असे विविध विषय घेऊन लिहिलेले लेख महाराष्ट्रातील वर्तमान प्राथमिक शिक्षणाचे प्रश्न मांडणारे होत. त्याचा पाया शिक्षक हक्क व कर्तव्ये, शिक्षक व शिक्षकांची गुणवत्ता हाच आहे. प्रभाकर आरडे हे चांगले चिकित्सक वाचक असल्याने जगातील शिक्षण विषयक घटनांसंबंधी प्रतिक्रिया व प्रतिसाद म्हणूनही त्यांनी वेळोवेळी लेखन केले आहे. फ्रान्सचा पेन्शन विषयक नवा कायदा, ऑक्सफर्डचे ‘ढ' विद्यार्थी, फी वाढ विरोधातील ब्रिटिश विद्यार्थ्यांचे आंदोलन असे विषय हाताळताना ते शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, कामगार अशा चतुर्दिक पैलूंना स्पर्श करून आपलं लेखन चतुरस्त्र बनवतात.

 शिक्षण विषयक हे लेख सैद्धांतिक नाहीत. ते प्रश्नांची मांडणी करतात. मांडणीत उदाहरणे आल्याने ते अनुभवसंपन्न झाले आहेत. लेखकाचं आयुष्य शिक्षणात गेलं. तो सतत कोणत्या ना कोणत्या संघटना, चळवळी, उपक्रमांशी स्वतःला जोडत आला. त्यामुळे त्याचं म्हणून एक समाजमन तयार झालेलं आहे. तो एक चांगला समाज निरीक्षक आहे. त्यामुळे प्रश्नांचे विविध पैलू त्याच्या लक्षात येतात आणि म्हणून या पुस्तकातील लेख एकांगी न होता बहस्पर्शी होतात. लेखकाचा स्वतःचा असा प्रगतिशील दृष्टिकोण आहे. नव्याचं स्वागत ते करतात पण चिकित्सकपणे त्यात भाबडेपणा नाही, की भावुकता नाही. असेलच तर जमिनीवर पाय ठेवून आकाशाकडे पाहायची वृत्ती! बोगस पट नोंदणीतून होत असलेल्या भ्रष्टाचाराचा ते विरोध करतात आणि तेही शिक्षक पदे यातून धोक्यात येण्याची शक्यता असून. कारण

नीरक्षीर न्यायवृत्ती त्यांना अधिक महत्त्वाची वाटते. भ्रष्टाचारमुक्त शिक्षण व्यवस्थेतून शिक्षणाचं वास्तव चित्र स्पष्ट होणार याची जाण लेखकाच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाची. त्यामुळे हे लेखन लोकप्रिय प्रसिद्धीसाठीचा उद्योग न होता वर्तमान शिक्षणावरचं 'क्ष' किरण होतं.
 जिल्हा परिषद व नगर परिषदांमार्फत महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी भागात प्राथमिक शाळा चालविल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणा-या या शाळांना सध्या जी घरघर लागली आहे, त्यात शासकीय धोरणाचा जसा वाटा आहे तसा शिक्षण अधिका-यांच्या खासगी संस्थांविषयीचा कळवळा, झुकते माप हेही कारण आहे असे जेव्हा लेखक समजावतो त्यामागे या संस्थांचे अंतरंग त्यानी वर्षानुवर्षे पाहिलेलं ध्यानात येतं. शिक्षणातील अंधार दूर करूया' म्हणणारं हे लेखन म्हणूनच रचनात्मक व सकारात्मक वाटत राहतं.

 प्राथमिक शिक्षणाचे प्रश्न कायदा करून सुटणार नाही याचं भान हे लेख देतात. कायदा मंजुरीबरोबर सक्षम यंत्रणा उभारणे महत्त्वाचे हा विचार हे पुस्तक देतं. देश श्रीमंत पण माणसं गरीब असलेल्या भारतात खरं तर ‘कॉमन स्कूल' हाच उपाय होय. पण शासन आज आंतरराष्ट्रीय खासगी शिक्षण संस्थांचे पायघड्या घालून जे स्वागत करतं ते परिस्थितीचं आकलन नसल्याचं द्योतक होय असं सांगणारा हा ग्रंथ भविष्यात येणा-या शैक्षणिक अरिष्टच एक प्रकारे रेखांकित करतो.

 देश विदेशातील अनेक संप, आंदोलनाच्या निमित्ताने लिहिलेले काही लेख या पुस्तकात आहेत. हक्क अबाधित ठेवण्याची अनिवार्यता समजावत हक्क कशासाठी आवश्यक असतात त्याचा लेखक इथे ऊहापोह करतो. पगार वाढ, पेन्शन ही दया म्हणून, भीक म्हणून न देता हक्क म्हणून देण्याची मागणी करून लेखक मानव अधिकारांच्या संदर्भात शिक्षकाचं जीवन हे सन्मानपूर्ण व्यवसायाचा भाग झाला पाहिजे. याचा आग्रह धरतो. यात त्याची आधुनिक दृष्टी स्पष्ट होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ‘ढ' विद्यार्थी होते अशी बातमी लेखकाला दिलासा देणारी वाटते. कारण लेखक मुळात शिक्षक आहे. वर्गात ‘सब घोडे बारा टक्के' असं असत नाही. ‘उडदामाजी काळे-गोरे' तसे वर्गात विविध गुणवत्तेचे विद्यार्थी असणं स्वाभाविक असतं. आज गुणवत्तेच्या नावावर शिक्षण संस्थांत नवा बौद्धिक वर्णाश्रम रुजविण्यातील भयानकता लेखक लक्षात आणून देतो. हे पुस्तक नुसतं प्रश्नांचे वर्णन करणारं महाभारत न होता दृष्टी व विचार देणारं

 मार्गदर्शक पुस्तक बनतं. पण 'गाइड' नाही. असेलच तर शैक्षणिक वास्तवाचं भान देणारं भाष्य!

 आज शिक्षकांचं शिक्षण (टीचर्स एज्युकेशन) लिलाव पद्धतीनं सुरू आहे. शिक्षण संस्थांना मान्यता देणारी एनसीटीई, भोपाळ सारखी संस्था पैसे घेऊन डी.एड., बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.पी.एड. कॉलेजिसना मान्यता देते म्हणून बंद करण्यात आली. अशा पद्धतीने सुरू होणा-या विनाअनुदानित शिक्षण संस्था प्रवेशाचा बाजार मांडतात. दर्जा नसलेल्या अशा शिक्षण संस्थांतून गुणवान शिक्षक कसे बाहेर पडणार? जे पडतात त्यांना नोकरीसाठी लाखो रुपये संस्थांना देणगी म्हणून द्यावी लागते. अशा परिस्थितीत ना शिक्षणाचा दर्जा ना शिक्षकांचा. हे भीषण विदारक चित्र उभं करणारं हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करतं.

 एके काळी शिक्षकाचं जीवन समाज, पालक व विद्यार्थी यांच्या दयेवर पोसलं जायचं. काळ बदलला. पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाने शिक्षकांचे आर्थिक जीवन समृद्ध केलं. त्यातून शिक्षकांच्या पतसंस्था उभारल्या. त्या समृद्ध स्थिर झाल्या. त्यातून होणारं शिक्षकांचं राजकारण, चारित्रिक अधःपतन इ. वर यातील लेखात कोरडे ओढण्यात आले आहेत. ‘आपल्याकडेही चार बोटे' सारख्या लेखातून लेखक शिक्षकांना अंतर्मुख करू पाहतो. यात त्याचा विवेक लक्षात येतो. शिक्षकांची गुणवत्ता वाढवायची असेल तर राजकीय इच्छाशक्ती असावी लागते हे अनुभवाचे बोल या पुस्तकातून उमटताना दिसतात.

 हे आणि असेच पंचवीस लेख या पुस्तकात आहेत. त्यात एकीकडे चांगल्याला प्रतिसाद आहे तर दुसरीकडे वाईटाचा विरोध. समाज विकास प्रतिसाद व प्रतिक्रियेच्या द्वंद्वातून नव्या विचारांना जन्म देत असतो. एकविसावे शतक हे बदल व विकासाच्या दृष्टीने अत्यंत गतिमान काळाचे आहे. हे लेख सन १९९० नंतरच्या काळातले होत. त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरण या समाजवाद विरोधी तत्व व व्यवहारांची फलनिष्पत्ती म्हणून येणा-या नव्या समाज व्यवस्थेकडे डोळसपणे पहात येणा-या बदलांना हाक देणारं हे पुस्तक शिक्षणाशी संबंध असलेल्या प्रत्येकाने वाचायला हवं. शिक्षक, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षण अधिकारी, संघटना कार्यकर्ते, पालक, राजकीय निर्णायक अशा सर्वांनी वाचावे असेच आहे.

▄ ▄


दि. १४ जानेवारी, २०१३

इंद्रधनुष्य (बालकाव्य संग्रह)
समृद्धी कुलकर्णी
हर्षित प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - जानेवारी, २०१३
पृष्ठे - ४0 किंमत - २0/




बालप्रतिभेची उजळली प्रभा

 बाल कवयित्री समृद्धी कुलकर्णीने लिहिलेल्या तिच्या ‘इंद्रधनुष्य' या बालकविता संग्रहातील कविता मी वाचल्या. सर्वप्रथम मी तिचे अभिनंदन करू इच्छितो की इतक्या छोट्या वयात तिच्या मनात कवितेचे असे विविधांगी धुमारे फुलले. प्रतिभा ही माणसास मिळालेले उपजत देणगी आहे. ती प्रयत्न साध्य नाही. तिच्या कवितेत निसर्ग, माणूस, जीवन, खेळ, नाती, विचार, स्वप्न सान्यांची रेलचेल आहे. तिचं निरीक्षण विलक्षण आहे. आपले अनुभव ती थेट मांडते. शब्दांचा शोध नि खेळ ती करत बसत नाही. यमकाची जुळणी ही पहिल्या वहिल्या कवितेत आपसूक होत असते. बालवयात 'र'ला 'र' आणि 'ट' ला ‘ट' जोडणे म्हणजे कविता असा समज असतो. समृद्धीचाही तो तसा आहे नि तो स्वाभाविकच म्हणायला हवा. परंतु तिनं कविता वाचायचा छंद जडून घेतला तर ती भविष्यात अलंकारिक काव्याच्या चौकटीतून बाहेर पडून मुक्त कविता लिहील. तशा त्या ती लिहू शकेल तर मराठी साहित्यास एक श्रेष्ठ कवयित्री भेटेल. तिच्या भविष्य विकासास शुभेच्छा!

 'निसर्ग गीत' कवितेत समृद्धीनं रातराणीचा सुगंध भरला आहे तर 'पतंग'मध्ये विविध रंग. तिची ‘इंद्रधनुष्य' कविता म्हणजे तर रंगांची उधळणच! समृद्धीची ‘परीक्षा' कविता म्हणजे अबोध बालमनाचा सुबोध

 आविष्कारच. भूगोलाचा पेपर असताना मुलं वेंधळेपणाने इतिहासाचा अभ्यास करून जातात. मग जे होतं ते सारं या कवितेत उतरलंय! या कवितेत शिक्षण, शिक्षक, अभ्यासक्रमावर पण सूचक भाष्य आहे. ते या कवयित्रीची बालवयातील प्रगल्भतेची चुणूक दाखवतं. तिला इतिहासाची विशेष आवड दिसते. कारण तिच्या कवितेत गड, किल्ले, बुरूज, छत्रपती शिवाजी महाराज सारे येतात नि हजेरी लावून जातात. संविधान, स्वातंत्र्य संग्राम असे अवघड विषय ही कवयित्री हाताळते. त्यावरून तिचं अष्टावधान लक्षात येतं. आयुष्यावर बोलू काही' वाचताना ती अकाली प्रौढ झाल्याचे जाणवते. 'आई' हा तिचा हळवा कोपरा आहे. जीवन, शाळा, नातीगोती यावर तिचं प्रेम आहे. 'घर' तिला आवडतं. ‘स्वप्नं रंगवायची नसतात तर ती पूर्ण करायची असतात याचं भान समृद्धीस बालपणीच आलेलं असल्यानं ती मोठेपणी नक्की कोणीतरी होणार याची खात्री पटते. ‘दमलेल्या बाबाची कहाणी' हे तिचं करुण कथात्मक काव्य वाचताना डोळे पाणावतात.

 प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर इथं आठवी इयत्तेत शिकणाच्या बाल कवयित्री समृद्धी कुलकर्णीला तिचे शिक्षक, आई-बाबा सर्वांचं प्रोत्साहन मिळाल्याने तिच्या प्रतिभेचं हे देणं आपल्यासमोर येत आहे. बालवयात प्रोत्साहन मिळालं तर स्वप्नांची फुले होतात. अन्यथा, साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे ‘सुंदरशा कळ्या किडीच खाऊन टाकतात. असं घडल्यामुळे अनेक कलावंत जन्मण्यापूर्वीच कोमेजतात. समृद्धीला प्रोत्साहन बळ लाभल्यानं ती या कविता संग्रहाच्या रूपाने प्रकाशात आली. वाचक तिला प्रसिद्धी देतील. तिची काव्य प्रतिभा रोज फुलत राहील.

▄ ▄

दि. १ जानेवारी, २०१३
नववर्ष दिन!

आठवणीचे तरंग (आत्मकथा)
का. मा. आगवणे
सौ. कुसुम आगवणे.
प्रकाशन - जानेवारी, २०१३
पृष्ठे - १८९ किंमत - १५0/




गैराशी वैर करत लाभलेलं गौरवी जीवन


 का. मा. आगवणे हे बारामतीमधील मूळ सामाजिक पिंड असलेले राजकीय कार्यकर्ते नेते होत. मागास वर्गात जन्म, शिक्षण, जीवन गेले तरी उपजत राष्ट्रभक्ती व समाजसेवी वृत्तीमुळे ते मूल्याधिष्ठित कार्य करणाच्या प्रभावळीत राहतात नि त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं. त्यांचा जन्म शेतकरी परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. वडील मारुतीराव व आई अनुसयाबाई यांचं कुटुंब इंदापूर तालुक्यातील अकोल्याचं. ते शेती, भाती व्यवसाय करत बारामतीच्या कसब्यात स्थिरावतात. वडील नशीब काढायला म्हणून मुंबईला जातात. चाळीत जीवन काढतात. कारखान्यात काम करतात. पुढे स्वतःचा कागद पाकिटाचा कारखाना काढतात. पण जम कुठेच काही बसत नाही म्हणून स्वगृही येतात नि दुकान थाटतात.वडिलांना तीन अपत्ये झाली.काळूराम, माधव व सरू. काळूराम शाळेत शिकत असतानाच त्याला आपण मागासवर्गीय असल्याची जाणीव झाली ती नुसत्या खिडकीच्या गजाला हात लागला म्हणून भाकरी बाटल्याचा कांगावा करणा-या तथाकथित उच्चभ्रू वर्गाच्या विद्याथ्र्यांमुळे. जातीच्या आधारावर श्रेष्ठ, कनिष्ठता अमान्य असलेला काळूराम हेडमास्तरांना निरुत्तर, निष्प्रश्न करतो तेव्हा त्याचे तळहात रूळानी शेकले जातात. त्या अन्यायाने पेटून उठलेला काळूराम शिक्षण अर्धवट सोडतो ते राष्ट्रीय

स्वातंत्र्य लढ्याच्या प्रभावाने आणि संस्कारांनी! वयाच्या सतराव्या वर्षी ‘भारत छोडो आंदोलन' आणि दुसरे महायुद्ध' या पार्श्वभूमीवर ते लष्करात दाखल झाले पण देशभक्तीचे बाळकडू रोमारोमात भिनलेल्या का. मा. आगवणे या जवानास लष्करापेक्षा आझाद हिंद सेना आकर्षक वाटू लागली. सेनेत त्याने बंडाचा झेंडा उभारण्याचा प्रयत्न केला पण त्यास यश आले नाही.

 सेनेतून निवृत्त होऊन का. मा. आगवणे यांनी पोलीस दलात प्रवेश मिळवला. इथे पण त्यांचा चळवळ्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देईना. भ्रष्ट अधिकारी नि वरिष्ठांविरुद्ध त्याच्या तक्रारींचा पाढा काही पूर्ण होत नव्हता. उलट हा शिपाई गडी पोलिसात राहून राष्ट्र सेवादलाची शाखा चालव, समाजवादी पक्षांच्या शिबिर, मेळाव्यास उपस्थित राहा, साने गुरुजी कथामाला चालव असे उद्योग करत राहायचा. पोलीस दलात गुप्तवार्ता विभागात काम करत असलेले का. मा. त्यांना हे कळत नव्हतं अशातला भाग नव्हता. राष्ट्रभक्ती, देशप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.

 मग स्वारीनं होमगार्डकडे मोर्चा वळवला. सन १९५५ ते ६५ पर्यंत त्यांनी हे कार्य केलं नि स्वतःस पण पूर्णवेळ समाजकार्यात झोकून दिलं. प्रारंभी समाजवादी पक्ष. नंतर त्या पक्षाच्या फुटीनंतर काँग्रेसमध्ये. मग पुलोद नि आता ते राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते, कारण राजकारणात यशवंतराव चव्हाण यांना प्रमाण मानून ते बिनीचे शिलेदार झाले नि शरद पवार यांचे पाठीराखे बनले. साधा कार्यकर्ता ते पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय आलेख. राजकीय उदय व विकास, विस्ताराची कथा सांगते. ती मुळात वाचत असताना राजकारण ही युद्धासारखं रोमहर्षक असतं हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. यातच ‘माझी कर्म कहाणी' या का. मा. आगवणे यांच्या आत्मकथेचं यश सामावलेलं आहे. ते त्यांनी मनस्वीपणे लिहिलं असल्यानं या आत्मकथेला सहज उत्स्फूर्त आठवणींचा उमाळा मिळत गेला व लेखक हे ओजपूर्ण आत्मचरित्र लिहू शकला असं वाटतं. कुठंही जोडा-जोडी नाही. ते आहे ते आत-बाहेर एक... निखळ हे या आत्मकथेचं बळ आणि संचित म्हणून सांगता येईल.

 का. मा. आगवणे यांची ही कर्मकहाणी म्हणजे एका अस्वस्थ अश्वत्थाम्याची तगमग होय. जो मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतून वर येतो त्यांच्या वंचितांच्या वेदना सतत अशांत ठेवतात अन् मग तो माणूस ध्यास व ध्येयाने झपाटून आपणाला अधिक चांगलं कसं करता, जगता येईल ते पहात रहातो. जिथे जातो तिथे ‘गैराशी वैर वागणं' हा का. मां. चा

स्थायीभाव. त्यामुळे मूल्यांपुढे पद, वरिष्ठता शून्य मानणाच्या का. मां. नी नोकरीत परवड झाली तरी तत्त्वांशी प्रतारणा केली नाही. बारामतीत वीज कामगारांचं आंदोलन, संगठन यशस्वी करून त्यांना त्यांच्या न्यायाचा वाटा मिळवून देणारा हा संगटक त्याच्या घरी मात्र वीज नव्हती. कामगारांना हे कळताच का. मां. चं घर विजेनं न्हाऊन निघतं ते वर्गणीतून!

 ही असते सचोटी नि त्याची पोचपावतीही! शरद पवारांशी स्नेह, सलगी म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायची बुद्धी कधी झाली नाही. मागासवर्गीय जन्म, जात त्यांनी बिरुद म्हणून न मिरवता ती इष्टापत्ती मानून त्याचं उन्नयन घडवून आणलं. हे सारं करताना कोणता आव नाही की भाव. 'मी उरलो नावापुरता' अशी निरिच्छता. ही फार दुर्मीळ देणगी. म्हणून प्रत्येक संधीचं सोनं झालं!

 यशस्वी पुरुषामागे असिद्ध स्त्रीची जशी सावली असते तसेच राजकीय नेत्यांचंही! का. मां. सारखे अहोरात्र झटणारे कार्यकर्ते सतत उपेक्षांचेच धनी असतात. पण यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासारखे अपवाद संस्कारी अशा कार्यकत्र्यांचा त्याग, समर्पण, निष्ठा लक्षात ठेवून योग्य वेळी त्यांची उतराई करतात. का. मां. चं पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद सतत सात वर्ष उपभोगायला मिळणं हा याच काव्यगत न्यायाचा भाग होय.

 अंधार युग प्रयत्नांपुढे थिटं पडतं नि एक दिवस सूर्याचं युग उगवतं ते चंद्राचं सहस्र दर्शन घडवूनच थांबतं. मग येतं कृतार्थपण! ते या आत्मकथेच्या । शेवटी भरलेलं, भारलेलं आढळतं! अशा कार्यकत्र्यास शतायू जीवन लाभावं हीच सदिच्छा! जीवेत शरदः शतम्!!

▄ ▄


'दि. १४ जानेवारी, २०१३'
मकर संक्रांत

उगवतीच्या नाट्यछटा (नाट्यछटा संग्रह)
सुरेश जत्राटकर
अक्षर दालन प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन - ऑगस्ट, २०१३
पृष्ठे - १00 किंमत - १00/-




मूल्यशिक्षण रुजवणाच्या नाट्यछटा


 शिक्षण एक ठसा असतो. ते आपल्यात संस्कार, मूल्य रुजवत असते. शिकवताना औपचारिक पद्धतीपेक्षा अनौपचारिक पद्धत दीर्घ परिणाम करणारी असते. सहज मिळणारं शिक्षण प्रत्यकारी ठरतं. म्हणून शिक्षक शिकवत असताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करीत असतात. संवाद, प्रयोग, नाट्यसाधनांचा वापर, संगीत, खेळ, कला, नृत्य, आकृती, प्रतिकृती, कथाकथन, हावभाव साच्यांचा वापर करून शिक्षक आपण शिकवत असलेली गोष्ट रंजक, रचनात्मक, रंगतदार करीत असतात. नाट्य' हे शिक्षणाचं अत्यंत परिणामकारी माध्यम होय. शालेय वयात सांगितलेल्या गोष्टीपेक्षा बघितलेली गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहते व तिचा प्रभाव आयुष्यभर राहतो. म्हणून एकोणिसाव्या शतकापासून 'नाट्यछटा (Dramatic Monologue) हा साहित्यप्रकार प्रबोधनाचे साधन म्हणून जगभर वापरला जात आहे.

 नाट्यछटा गेल्या शतकात प्रचलित असलेली कला. दृक्-श्राव्य साधनांच्या विकासामुळे अन्य अनेक साहित्य प्रकारांना उतरती कळा लागली. तशी ती नाट्यछटांनाही. नाट्यछटा हा अनेक अंगांनी किफायतशीर ठरणारा कला प्रकार होय. नाट्यछटा एका अर्थाने प्रगट संवाद, स्वगतच असते. एका विषय वा प्रसंगावर एका व्यक्तीद्वारे साभिनय केलेला व्यक्त

संवाद म्हणजे नाट्यछटा. तिचा उद्देश विसंगतीवर बोट ठेवून ती दूर करणे असतो. नाट्यछटेत एकच पात्र अनेक काल्पनिक पात्रं संवादातून निर्मून नाट्याचा आभास निर्माण करते व प्रेक्षकांना खिळवून ठेवते. नाट्यछटाकार आपल्या या छोट्या एकपात्री नाटिकेतून एका विषयाचे सर्व पैलू, बाजू आपणासमोर ठेवत असल्याने वाचक वा प्रेक्षक त्या विषयासंबंधी विचार विनिमयात विचाराच्या पातळीवर सहभागी होत असतात. शिक्षणात शिकवणारा एक व शिकणारे अनेक तसेच नाट्यछटेचेही असते. शिक्षण सहसंवाद असतो तशी नाट्यछटाही म्हणून यात सारे सहभागी, सक्रिय होतात व त्याचा परिणाम सामूहिक असतो. गती, उत्साह, हर्ष, शोक, आश्चर्य, आनंद सा-याची यात सरमिसळ असते. इंग्रजीत रॉबर्ट ब्राऊनिंगनी नाट्यगीतांच्या रूपात याचे सादरीकरण केले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांनी दैनिक केसरीत प्रथमतः नाट्यछटा लिहिली. वि. स. खांडेकरांनी 'दिवाकरांच्या नाट्यछटा' संपादित करून मराठीत तिची मोहर उठविण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.,

 सुरेश जत्राटकरांचा नाट्यछटा संग्रह ‘उगवतीच्या नाट्यछटा'वरील पार्श्वभूमीवर पाहता ते मराठी साहित्यातील नष्टप्राय झालेल्या अप्रचलित साहित्य प्रकाराचे पुनरुज्जीवन होय. जत्राटकर हे कोल्हापूरच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचे शिक्षक, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ गेली अनेक वर्षे शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्यस्पर्धा योजत असते. दरवर्षी नवनव्या विषयांवर नाटक, एकांकिका, अभिनेते, विद्यार्थीच श्रोते, पालक नेपथ्यकार, शिक्षकेतर कर्मचारी संगीतकार, मुख्याध्यापक मार्गदर्शक असा संच असतो. दरवर्षी रंगणारा हा शालेय नाट्य महोत्सवच असतो. ‘उगवतीच्या नाट्यछटा' या नाट्यमहोत्सवाचंच अपत्य म्हणावं लागेल. सुरेश जत्राटकरांनी सन २000 पासून आजअखेर लिहिलेल्या ४३ नाट्यछटा या संग्रहात आहेत. ही एका तपाची नाट्यसाधना होय. ते लेखक, सहकारी दिग्दर्शक व विद्यार्थी अभिनेते. प्रत्येक नाट्यछटेखाली श्रेयनामावली, रचनाकाल इ. तपशील देऊन या नाट्यछटांचा संदर्भ व इतिहास मूल्य त्यांनी जपलं आहे.

 ‘उगवतीच्या नाट्यछटा' वाचत असताना लक्षात येतं की त्यांचे विषय समकालीन आहेत. त्यांची भाषा ग्रामीण बोली आहे. आपणाला कुणाचं प्रबोधन करायचं आहे त्या अशिक्षित समाजाची भाषा ते हटकून वापरतात. या नाट्यछटा प्रायोगिक स्तरावर शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांसमोर सादर करत गेले असले, तरी उद्या या नाट्यछटा प्रकाशित झाल्यावर

लोककलावंत आपल्या लोकनाट्यात, प्रबोधन उपक्रमात सादर करून समाज प्रबोधनात मोठी आघाडी मिळवू शकतील. म्हणून यांचं मोल केवळ शालेय परीघ न राहता ते समाज व्यापक होतं, हे या नाट्यछटा संग्रहाचं खरं योगदान होय. या नाट्यछटातून सुरेश जत्राटकर यांनी विद्यार्थ्यांतील बेशिस्त, व्यसनाचे दुष्परिणाम, प्रदूषण, पर्यावरण रक्षण, हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या, वाहतूक नियमांचे पालन, पालकांचे कष्ट, गणपती दूध पितो इ. अनेक विषय हाताळून या नाट्यछटांना मूल्य शिक्षण व प्रबोधनाचे प्रभावी साधन बनवले आहे. या नाट्यछटा प्रारंभीच संबोधनातून प्रेक्षकांना आपणाकडे आकर्षित करतात. मध्यावर विषय विस्तार येतो. शेवटी या निष्कर्षाप्रत पोहोचतात. त्यामुळे या नाट्यछटांची सगळी किमया तिची भाषा, संवाद कौशल्य, कल्पना चमत्कार, अभिनय सामर्थ्य, श्रोते, प्रेक्षक, वाचकांशी हितगुज करण्याची हातोटी, प्रश्न विचारून त्यांना आपल्या नाट्याचं अंग बनवणं अशा बहुविध गुणात सामावलेली आहे. या नाट्यछटा मुळातूनच वाचायला हव्यात. त्यात जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण करणारा ऊहापोह आहे. ‘सब मर्ज की दवा’, ‘गागर में सागर' असं समाज संचित बनलेल्या या नाट्यछटा शिक्षण व समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात मूल्य व संस्कार दोन्ही एकाच वेळी रुजवतात. या नाट्यछटा प्रत्येक शाळेत सादर होतील तर उद्याचे नागरिक सुजाण होतील. या नाट्यछटा खेड्यापाड्यातील पारावर सादर होतील तर अडाणी समाज शिक्षित व जबाबदार होईल. ‘उगवतीच्या नाट्यछटा' शैक्षणिक, सामाजिक दोन्ही अंगांनी महत्त्वाच्या आहेत. हे कार्य केल्याबद्दल सुरेश जत्राटकर अभिनंदन व प्रशंसेस पात्र आहेत. त्यांच्या या नाट्यछटांना यापूर्वी अनेक पारितोषिके लाभली. उद्या या संग्रहास साहित्य पुरस्कार मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

▄ ▄

दि. २ जानेवारी, २०१३

बालसंगोपनाचे कानमंत्र(मार्गदर्शिका)
सौ. यज्ञिता राऊत
सुरेश वर्तक, वसई
प्रकाशन - ऑक्टोबर, २०१३ पृष्ठे - ९४ किंमत - २५0/-


पालकांसाठी बालकांचे बायबल


 ‘बालसंगोपनाचे कानमंत्र (मार्गदर्शन)' हे सौ. यज्ञिता राऊत यांचे या विषयावर लिहिलेले पहिले पुस्तक. ते पहिले असले तरी लेखनातील खोली आजमावता ते मुरब्बी बाल संगोपन तज्ज्ञाचे वा ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञाचे वाटावे इतके अनुभव समृद्ध आहे. त्यांचे वय मला माहीत नाही. तथापि, लेखनात प्रतिबिंबित जाण त्यांना प्रौढ सिद्ध करण्यास पुरेशी आहे. प्रौढत्वी निज शैशवास जपणे' असा आपल्याकडचा एक जीवन संस्कार आहे. ती मुळात एक कवी कल्पना असली तरी त्यात मोठे जीवनसूत्र, जीवन तत्त्वज्ञान भरलेले आढळते. बाल, कुमार, किशोर, युवक, प्रौढ, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यस्त अशा अवस्थेतून मनुष्यास जावे लागते. यातून जीवनास पूर्णत्व प्राप्त होते. या विविध अवस्थातून जात असताना वय, कालपरत्वे त्याच्या भूमिका बदलत असतात, तशा जबाबदाच्याही.

  माणूस विवाह करतोच मुळी अपत्यसुखासाठी. अपत्यप्राप्ती हे त्याच्या जीवनाचे परमोच्च ध्येय असते. अपत्यप्राप्ती हे त्याचे मोक्षकारण खरे. पण प्रत्यक्षात तो आपल्यास जन्म देऊन आपल्या पत्नीच्या ऋणातून व सासूसास-यांच्या सोपवलेल्या, समाजाने अपेक्षिलेल्या जबाबदारीतून मुक्त होत असतो. मोक्ष म्हणजे स्वर्गप्राप्ती नव्हे तर जबाबदारीतून मुक्ती. त्यात स्वर्गसुख असते हे मान्य. अपत्य जन्म ही सुखाची बाब असली, तरी ती

जोखीम असते. जन्मलेले अपत्य... त्याचं पहिलं मुखदर्शन म्हणजे विश्व जिंकल्याचा आनंद! तो क्षणिक असतो. दुस-याच क्षणी जबाबदारीची न संपणारी यादी सुरू होते. दूध, गुटी, अंगडे-टोपडे, औषध, नाव, बारसं, खेळणी, डॉक्टर, पाळणा, वाढदिवस, संगोपन, संस्कार, शिक्षण... हनुमानाची शेपूटही छोटी होईल इतकी लांबलचक यादी व लांब पल्ल्याचं भविष्य!

 बाळ जन्म ही प्रत्येक दांपत्यासाठी एक अननुभूत क्रिया असते. गर्भ जन्माला आला की बाळ चाहूल माणसास जिज्ञासा, स्वप्नांच्या न संपणाच्या प्रदेशात घेऊन जाते. प्रसूतिपूर्व गर्भ संगोपन' हा बालसंगोपनाचा खरं तर पाया, प्रारंभ. त्याबाबत मात्र या पुस्तकात दुर्लक्ष झालंय खरं! सवयींचं बीजारोपण गर्भावस्थेत होत असतं. गर्भाचं पोषण, वाढ, विकास हे आईला मिळणाच्या पोषण व विकासाचं प्रतिबिंब व प्रतिकृती असते. गेले काही दिवस आम्ही काही बालविकासाचे कार्य करणारी मंडळी महाराष्ट्र शासनाचे बाल धोरण ठरवत आहोत. त्याच्या मसुद्यात आम्ही आवर्जून, प्राथमिक संगोपनात जन्मपूर्व काळजी, संगोपनाचा अंतर्भाव केला आहे. जन्मपूर्व नऊ महिने नऊ दिवस (-९.९) यात गर्भधारणा ते गर्भवाढ, गर्भ संगोपन, गर्भ पोषण, गर्भ आरोग्य, गर्भ उपचार यांचा आवर्जून अंतर्भाव केला आहे. कारण गर्भ सुदृढ, सुरक्षित तर बाळ संगोपन सुदृढ, सुगठित. गर्भसंस्कार नावाची गोष्ट काय असते ते मला कळत नाही. मला कळतं गर्भ वाढ, पोषण व काळजी, उपचार. ते वैज्ञानिक म्हणून वास्तव. बालसंगोपन ही आध्यात्मिक, धार्मिक बाब नसून ती शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे हे एकदा आपण सर्वांनी, विशेषतः सुजाण, सुशिक्षित पालकांनी समजून घेतलं की गर्भ संस्कारासारख्या थोतांडास फार अर्थ उरत नाही.

 गर्भ वाढ झाली, गर्भ पोसला की बाळाचा जन्म होतो. बाळ ही कल्पना लिंगनिरपेक्ष आहे. पुत्र वा कन्या हे दोन्ही जीव त्यात गहीत आहेत. जिवात लिंगभाव प्रगट होत नाही तोवर ते पालकांच्या लेखी बाळ असतं. फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाने मात्र बाळ जन्मतः लैंगिक भावना घेऊन येतं असं म्हटलं आहे. जन्मतः बाळ अनेक वृत्ती, वैशिष्ट्य, गुण, दोष घेऊन जन्मतं. अनुवंशाने बाळात काही गोष्टी येतात असं जे म्हणतात त्यात गर्भावस्थेत आई आणि वडिलांच्या गुणसूत्रांच्या, जनुकांच्या मिलाफातून जन्मलेला नवा जीव आई-बाबांच्या गुणांच्या वृत्तीच्या गोळाबेरजेतूनच नाही तर वजाबाकी, गुणाकार, भागाकारांनी जन्मलेला स्वतंत्र जीव असतो. जिवाची वाढ म्हणजे परिसर, पर्यावरण, परिस्थितीचा प्रभाव, अनुवंश व परिस्थिती या दोघांचं फलित म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास. त्यात वृत्ती व

सवयींचा मोठा वाटा असतो. मुलांच्या सवयी आणि आपण' या पुस्तकात मुलांच्या, पाल्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सवयींचं महत्त्व व त्यांना योग्य वेळी योग्य दशा व दिशा देणं यास महत्त्व देऊन त्यांची विवेचना, विश्लेषण, मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यज्ञिता राऊत यांनी पाल्यजन्म ते विकास असा पट योजून पालकांना आपल्या पाल्याच्या सवयींना आकार, सकारात्मकता देऊन पाल्याचे व्यक्तिमत्त्व संस्कारी, सद्गुणी व सत्प्रवृत्त करण्यास साहाय्य केलं असल्याने हे पुस्तक सुजाण पालकांसाठी बाल विकासाचा कानमंत्र ठरलं आहे.

 ‘मुलांच्या व्यक्तिमत्त्वासाठी उत्तम शिक्षण कोणते' या पहिल्या प्रकरणात त्यांनी मुलांना समजावून घेऊन निरपेक्ष देण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. महत्त्वाचं सूचन ठळकपणे लक्षात आणून दिलं आहे. छायाचित्रांचा उपयोग करून त्यांना तुम्हाला जे सांगायचं, सुचवायचं आहे ते प्रभावीपणे सादर केले आहे. ती या पुस्तकाची जमेची बाजू असून त्यामुळे हे पुस्तक बोलकं हितगुज बनून जातं. यात लेखकाची भूमिका एका समजूतदार समुपदेशकाची आहे व ती मला अधिक महत्त्वाची वाटतं. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे हा या प्रकरणात मिळणारा मंत्र पाल्याच्या विकासात परिणामकारी आहे. मुलांना वेळ देणं या वर्तमान व्यस्त, यांत्रिक जगात किती महत्त्वाचं आहे हे लेखिकेनं पटवून दिलं आहे. या लेखनातलं सूचन सकारात्मक, पालकांचा आत्मविश्वास वाढवणारं व पालकांना सक्रिय करणारं आहे. पाल्यात पालकांचे सर्व त-हेनं गुंतणं म्हणजे सांभाळ, संगोपन हे या प्रकरणातून पुरेपूर लक्षात येतं.

 ‘नक्की काय आहे, जे बदलायचं आहे?' मध्ये नेमकेपणाने लेखिका अधोरेखित करते. त्यासाठी पालकांचं आत्मपरीक्षण,स्वयंमूल्यमापन महत्त्वाचं. पालकांनी मुलांना देण्यापूर्वी आपल्यात काय आहे, काय नाही याचा शोध, धांडोळा घ्यायला हवा. 'Know thyself' हे बायबलचं सूत्र असो वा । ‘कोऽहं' हे भारतीय तत्त्वज्ञानाचं ब्रीद असो, सर्वांत आत्मशोध महत्त्वाचा. तो काय एकदा बोध झाला की पाल्याला आपण काय देऊ शकतो, काय नाही ते कळतं. त्यासाठी पाल्याचे निरीक्षण, नोंद महत्त्वाची ठरते. निरीक्षणाचा पडताळा महत्त्वाचा.गणिताचं उत्तर बरोबर का हे पडताळ्यातूनच ठरतं तसंच पाल्यांच्या सवयीसंबंधी आपल्या निष्कर्षांचं असतं हे लेखिका जाणते.त्यातून ती तुम्हास पाल्य घडणीचा वस्तुपाठ देते. त्यामुळे हे पुस्तक मार्गदर्शक बनलं आहे. त्यात तात्त्विक चर्चेपेक्षा वर्तमान संदर्भातील व्यवहार्य तोडगे, उपाय असल्यानं ते अधिक प्रत्ययी झालं आहे. उदाहरणार्थ

 ‘ओपन डे' ला काय करायचं याचे मार्गदर्शन पाहता येईल. मुलांच्या वाढीनुरूप त्यांच्या मनोभूमिका भावविश्व बदलतं. त्या अनुषंगाने पालकांची भूमिका बदलणं महत्त्वाचं. चांगल्या सवयी जडायच्या तर पालकांनी प्रथम त्या आत्मसात करायला हव्यात. ‘दुसन्यास सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण' यातून विसंगतीच जन्मणार, शिवाय हाती काहीच लागणार नाही ही या पुस्तकातील शिकवण अधिक प्रगल्भ करते.

 ‘सवयी नक्की येतात कुठून?' याची जिज्ञासा पालकांच्या मनात असते. यज्ञिता राऊत यांनी समजावलं आहे की त्या काही उपजत असतात, काही संपर्कातील नातेवाइकांतून, कुटुंबातून येतात तशा इतरांकडून, समाजातूनही लागतात. एखादी गोष्ट नियमित करण्यातून सवय झडते, घडते. त्याला कधी पूर्वविचार असतो, कधी नसतो, एखाद्या गोष्टीची सवय झाली की तिचं रूपांतर वृत्ती, प्रवृत्तीत होतं. सवयी अनेक प्रकारच्या असतात. चांगल्या, वाईट, नियमित, अनियमित कधी-कधी त्या प्रासंगिकही असतात. म्हणून त्या जीवनाला कलाटणी देणाच्या ठरतात. सवयी सहजस्फूर्त असतात तर कधी व्यक्ती, क्रिया, वस्तूच्या निरंतरतेतून आकारतात. पुनरावृत्ती, वारंवारिता इत्यादीमुळे सवयी दृढ होतात. दृढ सवयी मोडणे म्हणजे तिच्या जागी नवी सवय रुजवणे, पर्याय देणे वा कधी अवकाश (space) निर्माण करणेही असते. हेतुपूर्वक संस्कार, सवयी घडवणे हे संयम व सातत्याने शक्य होते. पालकांसाठी ते कष्टसाध्य तर कधी जीवघेणेही होते. चांगल्या सवयी अनुकरणातून येणे इष्ट. वाईट सवय संगतीतून वा उपजत प्रेरणेतून जन्मते. ती जितक्या कोवळ्या अवस्थेत बदलाल, ती लवकर बदलते. वाईट सवयीचं रूपांतर सद्गुण, सत्प्रवृत्तीत होतं. सवय घडणीत प्रेरक, प्रबलकांच्या भूमिका महत्त्वाच्या असतात. पालकांना सवयीच्या उगमाचा स्रोत समजणे महत्त्वाचे असते. सवयीचं प्रगटीकरण होऊ लागलं की त्या लक्षात येतात. त्यामुळे पालक सजग, निरीक्षक आहे. मुलांच्या उमलत्या, कळत्या वयात पालकांची भूमिका ‘रात्र वैच्याची, जागे रहा' अशी हवी. संशय हवा पण त्याचे प्रदर्शन असता कामा नये. संशयामागची भूमिका विधायक हवी. त्यात काळजी हवी. पाल्यावर दोषारोप नको. आपली संशयी वृत्ती पाल्यांना अपराधी बनवते हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. सवयी बदलायच्या तर संवाद, समज, समुपदेशन हवं. शिक्षा, धमकी, राग, मार, नकार जन्माला घालतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. बोलण्याबरोबर पाल्याचं ऐकायलाही हवं. त्याची बाजू, पक्ष, मत यांचा आदर होईल तर परिणाम लवकर दिसतील. पालक मालक

नसतो. असतो तो मित्र, मार्गदर्शन. मग मुलं तुमची जिवाभावाची होतात. नाही तर कळत्या वयात त्याचं वैरी होणं ठरलेलं अटळ. 'Petions pays' लक्षात ठेवून सहनशक्ती वाढवणे पालकांचे कर्तव्य असते. जे अधिक सहन करतात ते निष्क्रिय ठरतात. सहनशक्तीच्या मर्यादा, कुठे थांबायचं व असे प्रतिक्षिप्त (React, Reflex) व्हायचं हे माहीत हवं. हे सारं यज्ञिता राऊत यांनी घटना, प्रसंगातून सोदाहरण समजावलं असल्याने त्यांनी सांगितलेल्या कानगोष्टी पालक आपला आचारधर्म, आचारसंहिता बनवतील तर त्यांची पाल्ये आदर्श नागरिक बनतील. याचसाठी तर असतो सारा अट्टाहास'. आपण मुलांना स्वप्ने उरी बाळगून जन्माला घालतो हे खरं आहे पण आपली स्वप्नं, आपले विचार मुलांवर लादू नये असं खलील जिब्राननी सांगून ठेवलं आहे. प्रोफेट' या आपल्या काव्यात तो कवी म्हणतो, “तुम्ही आपल्या मुलांना सर्वकाही द्या. फक्त तुमचे विचार व स्वप्नं नका देऊ. कारण ती आपली स्वतःची स्वप्नं, विचार घेऊन जन्माला येत असतात.' पालक धनुष्य असतात तर मुलं बाण. पालकांचं काम बाणास दिशा देणं असतं. पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सुटलेल्या बाणाची स्वतःची अशी दिशा असते. एका विशिष्ट वयानंतर पालकांनी प्रेक्षक व्हायला पण शिकलं पाहिजे.

 यज्ञिता राऊत यांनी प्रथम काय बदलाल' मध्ये बदलाचा सांगितलेला क्रम अनुकरणीय आहे. 'आधी केले, मग सांगितले' असा क्रम पालकांनी ठेवला तर बदल घडवणं सहज, सोपं शक्य होतं ही त्यांची टीप महत्त्वाची. बदल अनुभवणं, चांगल्या बदलाचं कौतुकही आवश्यक असतं. सवयी बदल म्हणजेच वर्तन परिवर्तन त्यात 'Reward and Punishment' दोन्ही हवं.सर्वांत महत्त्वाचं असतं मुलाचं होणं नि मुलांना पालक आपले हितचिंतक आहे याची अनुभूती येणं, देणं! ‘इतरांपासून आलेल्या सवयींचं काय करायचं?' असा यक्ष प्रश्न पालकांना नेहमी सतावत असतो.त्याबाबत सजगता हवी तशी खबरदारीही.'Pricotion is better than cure' हे वैद्यकीय तत्त्व मानवी व्यवहारातही तितकंच सार्थक ठरत असतं. इतर सवयींसाठी सकारात्मक पर्याय हे रचनात्मक उन्नयन (Constructive Sublimation) असतं हे लेखिकेने विविध पर्याय नीतीकथा, खेळ, खेळणी, टी.व्ही. इत्यादीतून देऊन स्पष्ट केलं आहे. लेखिकेचं मार्गदर्शन वास्तव असल्यानं ते पटणारं, आचरणसुलभ असल्यानं उपयुक्त ठरतं.

 ‘धमाकेदार आगमन', ‘काही नियम' सारख्या पुस्तकाच्या भागांतून लेखिका यज्ञिता राऊत यांनी सवयींसंबंधी विधिनिषेध, क्रिया-अक्रिया

________________

(Do's, Don'ts) चं ज्ञान दिलं आहे. काही युक्त्या, क्लृप्त्याही सुचवल्या आहेत. तक्ते, नियम दिले आहेत. या सर्वांतून हे पुस्तक पालकांसाठी ‘बालकांचे बायबल' म्हणून पुढे येते. ते लिहिल्याबद्दल सौ. यज्ञिता राऊत यांचे अभिनंदन, आभार नि अभिवादन!

▄ ▄


दि. १८ ऑक्टोबर, २०१३

कोजागिरी पौर्णिमा

कळ (कथासंग्रह)
चंद्रकांत खामकर
श्री गणेश प्रकाशन, कारदगा (कर्नाटक)
प्रकाशन - २०१३। पृष्ठ - १४२ किंमत - १६0/



अस्वस्थ करणारी ग्रामीण कळ


 ‘कळ' हा चंद्रकांत खामकर यांच्या ग्रामीण कथांचा संग्रह होय. यात बारा कथा संग्रहित आहेत. यापूर्वी त्यांचा ‘भूक' हा कथासंग्रह गतवर्षीच प्रकाशित झाला असून तो याच पठडीतला आहे. चंद्रकांत खामकर प्राथमिक शिक्षक होत. कारदगासारख्या सीमाभागात ते राहतात. त्याच परिसरात शिक्षक म्हणून कार्य करतात. कारदगा हे कोल्हापूर-बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवरचं गाव आहे. हे सधन गाव आहे. इथे मराठी, कन्नड भाषी लोक राहतात. पण मराठी बहुल प्रदेश म्हणून कारदगा गाव ओळखला जातो. चंद्रकांत खामकर यांना मराठी व कन्नड दोन्ही भाषा अवगत असल्याचे त्यांच्या कथेवरून जाणवते. ते ज्या ग्रामीण परिसरात राहतात तिथला समाज, लोक, प्रश्न, बोली, राजकारण, समाजकारण यांची खामकर यांना जाण आहे. ग्रामीण बोलीवर त्यांची हुकमत आहे. शब्द निवड ते चपखल । करतात तशा त्यांच्या उपमाही समर्पक असतात. कथेतले संवाद, पात्र, प्रश्न हा खामकरांचा रोजच्या जगण्यातला भाग असल्याने ते कथेत आपसूक निर्माण होतात. त्यात सहजता आढळते.

 चंद्रकांत खामकर यांच्या ‘कळ' संग्रहात 'न्याय', ‘इलेक्शन', 'मोर्चा', ‘दुष्काळ’, ‘फरपट', 'हनिमून', ‘घुसमट', 'आखाडा', 'कोंब', 'एकटी', ‘मरणकळा', 'शाळाभेट' अशा बारा कथा असून त्यात विषय वैविध्य

आहे. ते शिक्षक असल्याने आपल्या परिसरातील समाजात ते विविध निमित्ताने जात-येत असल्याने परिसरातील प्रश्न व समस्यांचे त्यांचे निरीक्षण व आकलन सम्यक आहे, त्यामुळे प्रत्येक कथा नवी समस्या मांडते. काही कथा प्रसंगांनी निर्माण झाल्यात तर काही त्यांनी विचारपूर्वक लिहिल्यात. ज्या निर्माण झाल्यात त्या प्रभावी होणे स्वाभाविकच. ज्या लिहिल्या गेल्या त्या हेतुप्रधान असल्याने बोधप्रद असल्या, तरी कलात्मक होऊ शकल्या नाहीत. सर्व कथात चंद्रकांत खामकर यांची वर्णन शैली अफलातून आहे. त्यांच्या मुळात त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आढळतं. कथांची भाषा बोलीमय, गावभाषा राहिल्याने कथा वाचनीय झाल्यात. ‘हनिमून' सारखी कथा शैलीच्या अंगाने विनोदी असली तरी ग्रामीण भागातील माणसाचं त्यातून प्रकट होणारं अज्ञान मात्र करुण होतं. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, मजूर हा राजकीय शापामुळे गरीब राहिला तसा तो अज्ञानी, व्यसनाधीनही झाला हे शल्य कथाकारांनी विविध कथाप्रसंगांतून चित्रित केलं. ते वाचकास अस्वस्थ करतं.

 ‘कळ' मधील आरंभिक कथा 'न्याय' स्त्री अत्याचाराला वाचा फोडणारी व स्त्रीशक्ती जागृतीची कथा म्हणून विषय व आशय दोन्ही अंगांनी समकालीन आहे. कथानायक संता गरीब शेतकरी आहे. नंदा त्याची पत्नी. दोघं काबाडकष्ट करून जीवन कंठत असतात. त्यांना सागर व शुभांगी ही। दोन अपत्य असतात. शुभांगी दहावी पास होते. तिला पुढं शिकायची इच्छा. पण आईचा मुलगी म्हणून काळजीने विरोध असतो. शिवाय शिकायला रोज बसनं परगावी निपाणीला जावं लागणार असतं. मुलीच्या हट्टापुढे दोघे हात टेकतात. शुभांगी कॉलेजला एस.टी.ने जाऊन येऊन असते. प्रवासात कॉलेजची मुलं छळत असतात. एकदा साळुख्याचा परश्या तिला मुद्दाम धक्का देतो. रागाच्या भरात ती त्याच्या कानाखाली आवाज काढते. बदला म्हणून तो मित्रांसह तिच्यावर बलात्कार करतो. गावातील महिला शकुंतला पाटील या महिला कार्यकर्तीच्या जागृती व संघटनेमुळे परश्याच्या घरावर मोर्चा काढून जाब विचारतात. घरचे दाद देत नाहीत म्हणून महिला पोलिसांत तक्रार करतात. पोलीस निरीक्षक न्याय दिल्याशिवाय खुर्चीवर न बसायची प्रतिज्ञा करतो, असं कथानक घेऊन येणारी ही कथा. तशी ती प्रातिनिधिक कथा होय. वर्तमान वाढती स्त्री जागृती ही या कथेची प्रेरणा. कलात्मकदृष्ट्या सामान्य असली तरी लेखकानं वर्णन कौशल्यावर ती जिवंत केली आहे.

 ‘इलेक्शन' शीर्षकाप्रमाणेच राजकीय कथा होय. वर्तमान राजकीय

चित्रण करणा-या या कथेत ग्रामीण राजकारणाचं सजीव व हबेहब चित्रण आहे. राजकारणात आणि विशेषतः निवडणुकीत मतं विकत घेणे, सत्ता स्पर्धेसाठी आमिष, प्रलोभनाचे अवैध, अनैतिक हाथकंडे, स्त्री-पुरुष संबंध, माणसं नि मतं खरेदी याचं पत्यंकारी वर्णन या कथेत शब्दबद्ध केलं आहे. गरिबी व अज्ञानाचा फायदा उठवत राजकारणी जनतेस व्यसनी, चैनखोर कसे बनवतात याचं सूक्ष्म चित्रण या कथेत आहे. कथेची शैली व्यंगात्मक आहे. ती वर्तमान राजकीय परिस्थितीवर भाष्य म्हणून पाहता येते. बाईबाटलीत बरबटत जाणारं राजकारण यात आहे. तसं ईपोटी होत जाणारी सामाजिक फरफटही यात प्रतिबिंबित आहे. निवडणुकीतील प्रचाराचं यथार्थ चित्रण चंद्रकांत खामकर यात करतात. कारण त्यांनी ते जवळून पाहिलं, अनुभवलं आहे. यात कन्नड भाषेचा उपयोग कथेस सीमाभागाचा चेहरा देऊन जातो. त्यातून कथाकाराचं द्वैभाषिकत्व सिद्ध होतं. कन्नड उद्घोषणेचा मराठी अनुवाद देऊन खामकर यांनी द्वैभाषिक वाचकांची सोय केली आहे.

 ‘मोर्चा' ही अलीकडच्या काळात व्यसनाधीनतेच्या पोटी संसाराची राखरांगोळी करणाच्या दारूबाज पुरुषांविरुद्ध शोषित स्त्रियांनी पुकारलेल्या दारूबंदीच्या एल्गाराची कथा होय. अलिकडे कोल्हापूर जिल्ह्यात स्त्री मतदानावर आधारित ‘बाटली आडवी करण्याचा सपाटा सुरू आहे. त्या पाश्र्वभूमीवर या कथेची निर्मिती झाली आहे. कथेत अनेक व्यक्तिगत पात्रे असली तरी व्यसनाच्या आधारावर शोषक, शोषितातील, पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व स्त्रीचं परिस्थितीशरण शोषित रूप यांचं द्वंद्व, संघर्ष हा या कथेचा विषय आहे. कथेत पोलिसांची लाचखोरी, व्यसनाधीन पुरुषांचं हवालदिल होणं याचं यथातथ्य वर्णन आहे. स्त्री दुर्गा रूप हे या कथेचं व्यवच्छेदक रूप म्हणावं लागेल. लाटणं-मुसळ मोर्चा हा परिस्थितीविरुद्ध संघटित स्त्रीने उठवले ला के वळ आवाज नसून तो अन्याय, अत्याचाराविरुद्धचा जिहादही आहे. माध्यम प्रभावाचं महत्त्व ही कथा अधोरेखित करते. तशीच ती माध्यम प्रभावाने खडबडून जागे होणाच्या, झोपेचे सोंग घेणाच्या प्रशासन व्यवस्थेवरही अप्रत्यक्ष प्रहार करणारी कथा आहे.

 ‘दुष्काळ' कथेत शेत, शेतकरी, जनावरं यांचं दुष्टचक्र आहे.‘फरफट स्त्रीच्या न संपणाच्या सोसण्याची व शोषणाचीही पण कहाणी होऊन जाते. माईचा न संपणारा वनवास, फरपट चित्रित करणारी कथा घरभेदी मुलगा पदरी आला की मायेला पारखा होतो व कष्ट उपसणाच्या मातेच्या माथी

 वृद्धाश्रमात जगण्याच्या नामुष्की येते हे सांगणारी कथा आता खेडे व शहर यांच्या जीवन व जगण्याचा सीमारेषा जागतिकीकरणात अंधुक होत नाहीशा कशा होत आहेत हे समजावते. माईच्या रडण्याला शेरातल्या (शहरातल्या), गळक्या चावीची उपमा देऊन कथालेखकानं आपलं नागरी, ग्रामीण निरीक्षण एकवटून नोंदवलं आहे.
 ‘हनिमून' ही ‘कळ' मधील हास्यकथा होय. यातला बबन्या प्रा. लक्ष्मण देशपांडेच्या ‘व-हाड निघालं लंडनला' या एकपात्री प्रयोगातील बबन्याची आठवण करून देणारा. बबन्याचं लग्न होतं नि तो ऐकून असलेल्या 'हनिमून' ला निघतो. हनिमूनची फँटसी त्याला कर्जबाजारी करते तशी खोटं बोलून नवस करायचं सोंग करायला भाग पाडते. महाबळेश्वरला ‘हनिमून' साजरा करायला गेलेला बबन्यावर उपाशी दिवस कंठण्याची पाळी येतेच. शिवाय अज्ञानामुळे जे घरात फुकट झालं असतं ते पैसे देऊन हात दाखवून अवलक्षण करून घेण्याच्या पश्चात्तापानं बबन्याला करुण बनवतं. कथा शैलीच्या अंगाने अत्यंत यशस्वी कथा म्हणून नोंदवावी लागेल.
 ‘घुसमट' स्त्रीस्वभाव चित्रण करणारी कथा होय. चंद्रकांत खामकर यांनी सासू-सुनेच्या भांडणात मुलाच्या होणा-या सँडविचचं वर्णन, चित्रण संताच्या रूपात केलं आहे. सासू-सुनेच्या, आई-बायकोच्या अडकित्त्यात सापडलेला 'संता' म्हणजे पराधीन पुरुष. पण तोच शेवटी समुपदेशक होतो. आई-बायकोस समजावतो तेव्हा कुठे त्यास अन्न गोड लागू लागतं व तो सुखाची झोप घेऊ लागतो.
 कुस्ती ही ग्रामीण संस्कृतीची शान, मान, अभिमान तसेच जगण्याजागवण्याचं समर्थ साधन. आखाडा भरला नाही तर जत्रा रंगणार कशी? गावचा मल्ल सत्या कुस्ती जिंकून कसा फड मारतो याचं रोमांचकारी वर्णन करणारी ‘आखाडा' कथा म्हणजे गाव जत्रेचा ‘आँखो देखा हाल' होय.
 ‘कोंब' नकोशी ठरणाच्या स्त्री भ्रूण हत्येविषयी लोकप्रबोधन करणारी समस्या प्रधान कथा म्हणून समोर येते. यात आत्मकथेचा, शैलीचा द्रष्टा प्रयोग लेखकाने केला आहे. वारंवार स्त्री जीव जन्माला घालणा-या स्त्री दुःखाची ही जशी कथा, व्यथा आहे तशी नवा कोंब म्हणून जन्मणाच्या कन्येचा तो आक्रोशही होय. यात लेखक कवीही असल्याचे लक्षात येते ते कथेत वापरलेल्या स्वरचित दीर्घ कवितेमुळे. चंद्रकांत खामकरांच्यातला कथाकार एक समाज शिक्षक असल्याने त्याला समाजाची ‘कळ' अस्वस्थ  करते. त्यातून तो जबाबदारीच्या भूमिकेतून कथाबीज निवडतो व त्याचा वेलू कथाभर पसरतो.
 'एकटी' मधील नायिका मंजुळा. तिचं गावात पाय घसरून एकटं राहणं हेच मुळी समाजाच्या लेखी लैंगिक भावना चेतवण्याचं कारण बनून राहतं. कथाकार खामकर यातून समाजमन रंगवून त्यावर टीकास्त्र सोडतात. ते मात्र नेहमीच अबोल, अशब्द असतं म्हणून प्रभावी. त्यांची ही अबोल टीका शैली मला लक्ष्यवेधी वाटते. यातील नायिकेचं उत्तान वर्णन लावण्यापेक्षा पुढे जाऊन शृंगारिक बनतं व तमाशाप्रधान ग्रामीण सिनेमाशी नकळत स्पर्धा करतं असं वाचकास वाटत राहतं. समाजात मंजुळासारखी एकटी। स्त्री सत्शील जगत असूनही तिच्याकडे समाज तिरक्या नजरेनं का पाहतो याबद्दल कथा अव्यक्त आश्चर्य व्यक्त करतं. हेच या कथेचं यश. कारण ती समाजाच्या पुरुषी, लिंगपिसाट वृत्तीचं चित्रण करत मंजुळेबद्दल सहानुभूती व्यक्त करते. तो त्या कथेचा उद्देशही होऊन जातो.
 ‘मरणकळा'मध्ये निसर्ग प्रकोपापुढे माणूस दीन-हीन कसा होऊन जातो हे चंद्रकांत खामकर सांगतात. नदीला पूर येतो व गाव होत्याचं नव्हतं होतं. यात पुरात सापडलेल्या संता, दिनकरची तगमग, जीव मुठीत घेऊन जगणं वाचकांच्या डोळ्याच्या कडा पाणावतं. ते या लेखकाच्या लेखन सामथ्र्याचं प्रशस्तीपत्र बनतं. 'कळ' मधील शेवटची ‘शाळाभेट' कथा म्हणजे टिपिकल झेडपी एज्युकेशनवर उठवलेली झोड म्हणता येईल. वर्तमान प्राथमिक शिक्षक व शिक्षणाधिकारी हे कथेचे नायक-खलनायक दोन्ही भूमिका एकाच वेळी जगून परस्परपूरक वागत ग्रामीण शिक्षणाचा, शिक्षण योजनांचा बोजवारा कसा उडवतात... त्याबद्दल त्याचं ‘ना खंत, ना खेद वागणं, बोलणं, जगणं, लाचारी सारंच किळसवाणं!
 ‘कळ'मधील साच्या कथांतून चंद्रकांत खामकर यांनी ग्रामीण जीवनाची ‘कळ' (मेख व दुःखं!) एकाच वेळी चित्रित करून वाचकाला अंतर्मुख करण्यास भाग पाडलं आहे. अशा 'Compel' करणाच्या या कथा ग्रामीण अस्वस्थ जीवनाची रंग, नस, ठसठस व्यक्त करतात. माझ्यासारख्या शहरी जीवन जगणाच्याच्या मनात त्या वाचताना एक प्रकारचा अपराध बोध तयार होतो. अजून आपण महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत, हिंदी कथाकार प्रेमचंदांनी कल्पिलेला अन्याय, अत्याचार, कर्ज, अंधश्रद्धा, व्यसनमुक्त शेतकरी आपण स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांच्या प्रवासानंतरही निर्माण करू शकलो नसल्याचं शल्य या कथा वाचकांच्या उरी जागवतात, निर्माण करतात. त्यास त्या अस्वस्थ करतात तशाच अंतर्मुखही. या कथा  कलात्मक कमी असतील पण त्याचं परिवर्तन मूल्य मोठे आहे. त्या रंजक आहेत तशाच त्यांस एक शोषण, दुःख, करुणेची झालर आहे. म्हणून कळ (व्यथा, वेदना!) निर्माण करणाच्या कथा म्हणूनही त्याचं असाधारण महत्त्व आहे.
 चंद्रकांत खामकर ग्रामीण बोलीची ताकद घेऊन जन्मलेले, खेड्याची खदखद टिपणारे कथाकार, शब्दकार म्हणून महत्त्वाचे! त्यांचे कळ'बद्दल अभिनंदन!

■■



दि. १६ ऑक्टोबर, २०१३
बकरी ईद
____________________________

वि. स. खांडेकरांच्या कथा
साहित्याचा मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास

(संशोधन प्रबंध) सौ. वर्षा वाकणकर
प्रकाशन २०१४ ___________________________________

खांडेकरांच्या कथासाहित्याचे मूल्यनिष्ठ संशोधन

 ‘वि. स. खांडेकरांच्या साहित्याचा मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास' शीर्षक शोध प्रबंध सौ. वर्षा वाकणकर यांनी सन २००८ साली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या पीएच्.डी. पदवीसाठी म्हणून डॉ. एस. के. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. त्याचेच ग्रंथरूप म्हणजे ' हे पुस्तक होय. मूळ प्रबंध शीर्षकात ‘साहित्य शब्द असला तरी अभ्यास मात्र कथांचाच आहे. त्या कथाही अवघ्या पन्नासच आहेत. खरंतर वि. स. खांडेकरांचं समग्र साहित्य म्हणजे मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठच! वि. स. खांडेकरांचा कथा लेखनाचा काळ येतो १९१९ ते १९७६. म्हणजे साहित्य लेखनाच्या प्रारंभापासून ते शेवटपर्यंत. ते सर्वकाळ कथा लिहीत राहिले. या सुमारे सहा दशकांच्या कालखंडात त्यांचे ४६ कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यात कथांची द्विरुक्ती आढळते. ती वजा केली तरी ही संख्या सुमारे ३५0 होते. इतक्या वपुल कथांतून संशोधिकेने मूल्यशिक्षण देणाच्या ५० प्रातिनिधिक कथांची चिकित्सा केली आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्या ५0 निवडक कथांतच मूल्यशिक्षणाची बीजे आहेत. निवडलेल्या कथांतून त्यांना श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय ऐक्य, सर्वधर्मसमभाव, स्त्रीपुरुष समानता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोण ही मूल्ये

प्रशस्ती/१५१

आढळली. त्यात ४५ कथांत ‘संवेदनशीलता' हे मूल्य आढळले. यातून संवेदनशीलता हे खांडेकरांच्या कथेचे केंद्रीय मूल्य आहे असा निष्कर्ष । संशोधिकेने काढला आहे. तो संशोधन मर्यादेत खरा असला तरी समग्र कथांचा विचार करता तेच केंद्रीय मूल्य मानता येणार नाही. वि. स. खांडेकर एक लेखक म्हणून संवेदनशील होते हे मात्र खरं.

 मूल्य ही गोष्ट मुळात तात्त्विक व मूलभूत असे वर्तनास मार्गदर्शक ठरणारी ही गोष्ट होय. ती योग्य व प्रमाणित ठरते ती तिच्या अपेक्षित व सकारात्मक विचार-व्यवहारामुळे. त्यामुळे शिक्षणात जेव्हा मूल्यांचा विचार होतो तेव्हा विधायक वर्तन व्यवहार हे त्याचे साध्य असते व शिक्षण साधन बनून राहते. साहित्याच्या बाबतीतही असेच आहे. साहित्य लेखन अनेक उद्दिष्टांनी होत असले तरी अंतिमतः ते मानव समाजाच्या हिताचे असले पाहिजे हे गृहीतच असते. वि. स. खांडेकरांनी साहित्य, समाज आणि मूल्य यांच्या परस्पर संबंधांच्या अनुषंगाने ‘प्रीतीचा शोध' या आपल्या कथासंग्रहाच्या ‘शोधाच्या नादात' शीर्षक प्रस्तावनेत आपली मूल्यविषयक भूमिका विस्ताराने मांडली आहे. या संग्रहात ‘वारसा' कथा आहे. या कथेत चिरंतन । जीवनमूल्यांवरल्या श्रद्धेचे सद्य:स्थितीत ती मूल्ये कशी ढासळू पहात । आहेत आणि ती ढासळू नयेत म्हणून मानवी संस्कृती कशी धडपडत आहे। या परिस्थितीचे वर्णन आहे. ते व्यवच्छेदक असले, तरी खांडेकरांच्या समग्र कथा साहित्यातून ते प्रतिबिंबित होताना दिसते. खांडेकर आपल्या कथांतून अनेक प्रश्न करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर - ‘रामकृष्णाच्या काळी उपयुक्त असलेली जीवनमूल्ये आजच्या काळातही व्यक्ती व समाज यांच्या दृष्टीने तितकीच उपकारक राहिली आहेत काय?', ‘आदर्शासाठी जीवन आहे की जीवनासाठी आदर्श आहेत?', ‘पाप-पुण्याचे नियम कुणी केले?' इत्यादी कथाकार खांडेकर साहित्यिक, चिंतक म्हणून सतत अस्वस्थ दिसतात. ते आपल्या साहित्यातून केवळ प्रश्न, समस्या मांडत नाहीत तर कालसंगत मूल्ये काय असली पाहिजेत हेही सुचवितात. त्यामुळे खांडेकर वास्तववादी चित्रण करणारे कथाकार जसे असतात तसेच उद्याच्या जगाचे ते भाष्यकारही ठरतात. म्हणून त्यांच्या कथात्मक साहित्याचे मूल्यशिक्षणाच्या संदर्भातले महत्त्व लक्षात येते. खांडेकर परंपरागत मूल्य आणि संस्कारांना वर्तमानाच्या कसोटीवर पारखण्याचा आग्रह धरतात यात त्यांचे पुरोगामित्वच सिद्ध होते. ते म्हणतात ते खरेच आहे की ‘विवेक हे बुद्धिवाद आणि भावना यांचे अपत्य आहे. बुद्धिवादाला डोळे असले तरी बहशः पाय नसतात. भावना जन्मतः आंधळी असते; पण या आंधळ्या शक्तीला

निसर्गाने गरुड पंख दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनातल्या समस्या सोडविण्याकरिता केवळ बुद्धिवाद किंवा केवळ भावनात्मकता यांच्यावर भर देऊन भागत नाही, त्या दोन्हीची प्रत्येक पिढीच्या परिस्थितीच्या दृष्टीने सांगड घालावी लागते.'(प्रीतीचा शोध पृ. २१४)

 डॉ. वर्षा वाकरणकर यांनी मूल्यशिक्षण देणाच्या कथा म्हणून ज्या ५० रचनांची निवड केली आहे. त्या कथाप्रकाराच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आहेत. त्यात भावकथा, नीतीकथा, कौटुंबिक कथा, रूपककथा, सामाजिक कथा, प्रेमकथा अशा वैविध्यांचा समावेश असल्याने त्या खांडेकरांच्या कथा वैशिष्ट्यांच्या दृष्टीनेही प्रातिनिधिक बनल्या आहेत. हे मात्र खरे की। खांडेकरांनी आपल्या पहिल्या कथांचे जे संग्रह प्रारंभीच्या काळात तयार केले त्यापैकी ‘नवमल्लिका' (१९२९), 'पहिली लाट' (१९४०), ‘पहिल्या वहिल्या' (१९४४) सारखे कथासंग्रह तर विद्यार्थ्यांसाठीच तयार केले होते. त्यात तरुणांच्या भावना व प्रौढांचे विचार चित्रित करणाच्या गोष्टी संग्रहातून मुद्दाम वगळण्यात आल्या होत्या.' (नवमालिका पृ. १) खांडेकरांची ही सतर्कता लेखकातील शिक्षकाची सजगता सिद्ध करते, तशीच ती । मूल्यशिक्षणाचे पथ्यही स्पष्ट करते. हाच तो मूल्यविवेक म्हणायचा. या कथा वाचक कशा वाचतील, घेतील हे खांडेकरांनी बेट्सच्याच शब्दात सांगताना म्हटलं आहे की, "The best, I can hope, is that they will read these stories with something of the spirit in which they were written; for pleasure, and out of a passionate interest in human lives." (पहिली लाट - पृ. ९) यातूनही खांडेकरांची कथालेखनाची भूमिका स्पष्ट होते. मानवी कल्याणासाठी भावुकपणे लिहिणारे खांडेकर त्यांची वृत्ती मनोरंजनार्थ कथालेखनाची कधीच नव्हती. रंजकता ही त्यांच्या कथेतून वाचकास लाभली तरी मूल्यांची मात्रा प्रत्येक कथेत वरचढच राहिली.


 ‘‘खांडेकरांच्या कथा साहित्यात मूल्यशिक्षण विचार लक्षणीय आहे. हे साहित्य मूल्य रुजवणीचे उत्तम साधन आहे. खांडेकरांच्या कथा साहित्यात तत्कालीन सामाजिक प्रश्न व स्थितीचे सम्यक दर्शन घडते. या कथांतून वि. स. खांडेकरांचे व्यक्तिमत्त्व व जीवन प्रतिबिंबित झाले आहे. या कथांनी मराठी बरोबर भाषांतराद्वारे तमिळ, गुजराथी, कन्नड साहित्यात मोलाची भर घातली आहे.' असे अनेक निष्कर्ष पुढे ठेवणारे डॉ. वर्षा वाकणकरांचे हे संशोधन ग्रंथालयीन अभ्यास, सर्वेक्षण, वैज्ञानिक विश्लेषणातून प्राप्त झालेले असल्याने त्यांचे शैक्षणिक महत्त्व आहेच. पण त्यापेक्षा त्यांची

महती हे कथासाहित्य दैववाद, जातिभेद, अंधश्रद्धांचा निरास करणारे आहे म्हणून अधिक आहे. स्त्री आणि पुरुष' सारख्या कथासंग्रहातील कथांतून खांडेकर स्त्रीचं स्वरूप, प्रश्न, समस्या, मनःस्थिती, सामाजिक स्थान यांची चिकित्सा ज्या प्रगल्भ मनाने व विश्व साहित्याचे संदर्भ देत करतात त्यातून खांडेकरांचे मूल्यभान भारतीय परिप्रेक्ष्याचं असलं तरी त्याला वैश्विक पाश्र्वभूमी आणि अभ्यासाची जोड आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा स्त्री संदर्भातील खांडेकरांची प्रगल्भता अधिक अंतर्मुख करते. नवी स्त्री' सारखी कादंबरी याचं उदाहरण म्हणून सांगता येईल.
 ओस्वालु श्वार्झचं एक पुस्तक आहे. The psychology of sex नावाचं. त्यात 'Differential psychology of sexes' नावाचं प्रकरण आहे. खांडेकर ते वाचतात आणि त्यांची अशी धारणा तयार होते की पुरुषापेक्षा स्त्री कितीतरी निराळी आहे. संघर्ष, द्वंद्व तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न घटक आहे. तिला पुरुषाप्रमाणे बुद्धी असते. पण पुरुषात नसलेलं तिच्यातलं गर्भाशय तिला व्यवच्छेदक द्वंद्वाचं वरदान देतं. त्यातून तिच्यात दुहेरी निष्ठा तयार होते. ती निसर्गाची योजनाच असते. स्त्री एकाच वेळी आई, पत्नी, प्रेयसी, सखी, भगिनी राहू शकते ती अतिरिक्त निसर्ग क्षमतांमुळे! ही खांडेकरीय पठडीची चिकित्सा वाचन व अभ्यासावर आधारित भले असो; पण कथाकार म्हणून खांडेकरांना ती स्त्रीवादी ठरवते आणि आधुनिक बनवते तसेच स्त्रीविषयक नवमूल्यांचा, द्रष्टा, सर्जकही बनवते.

 “मूल्यांचा प्रश्न भारताच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. एक प्रकारे तो आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा कणा आहे. काळाबरोबर पुष्कळ मूल्यांचे स्वरूप बदलते, हे खरे आहे. प्राचीन काळी धर्मनिष्ठा हे।

आपले सर्वांत मोठे मूल्य होते. गेल्या शे-दीडशे वर्षांत राष्ट्रनिष्ठेने त्याची जागा घेतली. पण या दोन्ही निष्ठांच्या मागे जो मनाचा कणखरपणा होता, जी सर्वस्वाच्या त्यागाची वृत्ती होती, माणूस म्हणजे नुसते खातेपिते शरीर नव्हे, ही जी तीव्र जाणीव होती, ती एकाच जातीची, एकाच प्रकारची होती. जुन्या धर्मनिष्ठेचे रूपांतर नव्या राष्ट्रनिष्ठेत झाले व ही नवी निष्ठा स्वातंत्र्याच्या लढ्याच्या रूपाने प्रकट झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या । राष्ट्रनिष्ठेचे पुन्हा विशाल समाजनिष्ठेत रूपांतर व्हायला हवे होते. पण या नव्या अपूर्व सामाजिक निष्ठेला आवश्यक असलेली बौद्धिक आणि भावनात्मक पूर्वतयारी आपल्या समाजाने कधीच केली नव्हती. 'प्रसाद' कथासंग्रहाच्या प्रस्तावनेतील (पृ. २२३) ही खांडेकरीय मूल्य चिकित्सा

वर्तमान भारताचे वास्तव आहे, याची जाण डॉ. वर्षा वाकणकरांचे प्रस्तुत संशोधन देत असल्याने ते भविष्यकाळाच्या शिक्षणाच्या आराखड्याचा पाया ठरेल तर हे संशोधन उपयोजित संशोधन (Applied Research) म्हणून त्याचे महत्त्व अधोरेखित होईल. तशी अपेक्षा व शुभाकांक्षा व्यक्त करतो. त्यांच्या या संशोधनाचा दर्जा त्याच्या विस्तार, विवेचनांपेक्षा त्यामागील प्रामाणिक धडपड, तळमळ म्हणून अधिक समाजहितैषी वाटतो.

◼◼


दि. २० जून, २०१४ ________________


कष्टाचं चीज (कथासंग्रह)
रंगराव बन्ने
साहित्य विकास मंडळ, कारदगा
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१४
पृष्ठे - ५६ किंमत - ७५/
_____________________________________

विकासाच्या पाऊलखुणांचा राजमार्ग व्हावा


 कथाकार रंगराव बन्ने यांचा 'कष्टाचं चीज' हा दुसरा कथासंग्रह आहे. यापूर्वी सन २०१२ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘रक्ताच्या नात्यापेक्षा प्रसिद्ध झाला होता. त्यासही मी प्रस्तावना लिहिली होती, असे आठवते. त्यात अकरा कथा होत्या. पैकी काहींना दैनिकातून प्रसिद्धी मिळाली होती. ‘कष्टाचं चीज' मध्ये एकूण पंधरा कथा आहेत. त्यातील कथांना पूर्वप्रसिद्धी मिळाली होती का ते कळण्यास काही वाव नाही. ही प्रस्तावना लिहिताना लेखकाने कथांची चवड तेवढी माझ्या हाती सोपवली आहे.
 रंगराव बन्ने कारदगासारख्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात रहात असले तरी प्रभाव म्हणाल तर मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचाच दिसून येतो. ते ग्रामीण भागात राहात असल्याने त्यांच्या सर्व कथा ग्रामीणच असतात नि आहेत. ते स्वाभाविकच म्हणायला हवे. रक्ताच्या नात्यापेक्षा कथासंग्रहातील कथांच्या पार्श्वभूमीवर ‘कष्टाचं चीज' मधील कथा कलेच्या अंगाने उजव्या असाव्यात अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली असे वाचनांती माझे मत म्हणून नोंदवावेसे वाटते. ग्रामीण भागातील सर्वसाधारण माणूस कष्टांवर पोसतो. लेखनाचा छंदही कष्टसाध्यच असतो. लेखकास इतरांचे भरपूर वाचले पाहिजे. सतत चिंतन हवे. प्रयोग वृत्ती हवी. ती नसेल तर लेखन शिळोप्याचा उद्योग होतो. प्रख्यात कवी वसंत आबाजी डहाके

प्रशस्ती/१५६

एकदा म्हणाले होते की ‘लेखक काही अक्षर सुधारण्यासाठी लिहीत नसतो'. तुमच्या लेखनात भाषा, शिल्प, शैली, प्रयोग, भाष्य, निरीक्षण यांची नवीनता आणि वैविध्य नसेल तर मग ते लेखन अक्षर सुधारण्यासाठी केलेला कित्ता होऊन जातं. आपलं लेखन गिरवणंच ठरणार असेल तर विद्यार्थी व लेखकात फरक तो काय उरला?
 कथासंग्रहाचं शीर्षक असलेली ‘कष्टाचं चीज' एक सामान्य बोधकथा आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' ची उक्ती सार्थ करणारी कथा. लेखकाने ती इतिवृत्तात्मक शैलीत लिहिली आहे. नायक सहदेव कष्टातून मोठा होतो व मोठा झाल्यावर मोठे कष्ट करून सुखी संसार करतो. कॅन्सरने मेलेल्या आपल्या आईची स्वप्नातली शिकवण प्रमाण मानून तो जीवन कंठतो व सुखी होतो. चोरीच्या तपासाची दिशा' ही म्हैस चोरीवर आधारलेली आहे. जनावर मुकं असलं तरी त्याला माया कळते हे समजावणाच्या कथेत चोरीला गेलेली रखमाची म्हैस फौजदार शोधून ज्याची त्याला देतो. भूतदया हे या कथेचं सूत्र म्हणून सांगता येईल. ‘पुनर्जन्म' ही डॉक्टरांच्या सेवाभावी उपचाराचे मोल वेड्या माणसास । शहाणे करते असं आश्वासक सत्य रुजवणारी कथा. कथानायक संजय व्याधिग्रस्त होऊन मनोरुग्ण होतो व एके दिवशी परागंदा होतो. वेडात तो पोहोचतो तमिळनाडूत. दशकभरानंतर तो गावात सुजाण माणूस म्हणून परततो. त्याच्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. ही किमया असते डॉक्टरांच्या सेवेची. तशीच ती मनोरुग्णालयाच्या मानव सेवेची पावती पण असते. आपण शहाणी सुरती माणसं मनोरुग्णालयांसारख्या सेवा केंद्रांची उपेक्षा करतो, म्हणून ती सुमार दर्जाच्या सुविधा घेऊन उभ्या राहिलेल्या असतात. आपण त्या लक्ष्यवेधी केल्या तर अधिक सुविधा संपन्न होऊन उच्च प्रतीची समाज सेवा करू शकतील ही या कथेची खरी शिकवण होय.

 'पैज' कथा ग्रामीण भागातील तरुणात असलेल्या ईर्थ्यांच्या विघातक परिणामांचे चित्रण करणारी विषयाच्या दृष्टीने पाहिली तर प्रत्येकारी कथा. कथाबीजात खरं तर प्रचंड नाट्य व रहस्य भरलेलं. पण रंगराव बन्ने यांनी ती सुमार पद्धतीने लिहून त्या चांगल्या कथेचं वांगं केलं. वर मी म्हटल्याप्रमाणे कथाकारात निरीक्षण कौशल्य असूनसुद्धा सादरीकरणाचा, शिल्प, शैलीचा अभ्यास करत नसल्यानं असं होतं. ऐन उमेदीतील पाच तरुण जीवघेणी स्पर्धा करत भुता-खेताशी खेळ करतात व खेळ अंगाशी येतो व खुनाचा ठपका नशिबी लागतो. ‘साडेसाती' ही लेखकाच्या अंधश्रद्धा वृत्तीची निदर्शक कथा. एकविसाव्या शतकात कथा लिहिताना लेखकावर समाजास



अंधश्रद्धा मुक्त करून विज्ञाननिष्ठ बनवण्याचे दायित्व आहे, याचं भान यायला हवं. साहित्य समाजाचा दीपस्तंभ मार्गदर्शक बनायचा तर प्रतिभा ही प्रागतिक नको का व्हायला?

 ‘कावळ्याचा मान ही त्याच्या एकाक्ष (काना) होण्याची आख्यायिका आहे. कावळा एकाच डोळ्याने का पाहू शकतो या समजुतीवर आधारित आहे. ती समजच मुळात तपासून घेण्याची गरज नाही का? कावळा पूर्वजांचं प्रतीक मग चिमणी का नाही? या पाश्र्वभूमीवर ‘अज्ञानाचं इपरीत' कथेतील नायिका हौसाका अज्ञान दूर सारून डॉक्टरांकडे जाते. पुढे मुलांना शिकवण्याचा निर्धार करते, हे दाखवून लेखक पुरोगामी होत असल्याच्या पाऊलखुणा या संग्रहात आपण जसे वाचत पुढे जाऊ तशा आढळतात. त्या पाऊलखुणा भविष्यात राजमार्ग होईल तर तो लेखकाचा विकास आलेख ठरेल. तो ठरावा अशी अपेक्षा आहे. ‘गरिबीची जाणीव' मधील शिरीष याच विचाराची री ओढताना आश्वासक दिलासा देतो.

  ‘पश्चात्ताप', 'पेरणी', ‘सावीचं भूत', 'खेळ नियतीचा', 'कर्ज', 'डाव', ‘परिवर्तन'सारख्या अन्य कथांतून लेखक आश्वासक विकास दाखवत । असल्याने वाचकांना सुखद शिडकाव्याचा अनुभव येईल. विशेषतः ‘सावीचं भूत' कथेत भूत-पिशाच कल्पनेचा पर्दाफाश हा दिलासा ठळक करतो.

 समग्रतः ‘कष्टाचं चीज' कथासंग्रह रंगराव बन्ने यांचा विषय आणि विचारांच्या अंगाने विकास दर्शवणारा असला तरी तो कलाविकासाचे आव्हान देत राहतो. कथाकार रंगराव बन्ने यांचा प्रयत्न प्रामाणिक आहे. त्यांना शुभेच्छा!

◼◼

दि. १५ ऑक्टोबर, २०१४ ________________

मिश्किली (विनोदी लेखसंग्रह)
सौ. प्रतिभा जगदाळे
प्रयत्न प्रकाशन, औदुंबर
प्रकाशन - डिसेंबर, २०१४
पृष्ठे-८१ किंमत - १७५/
_________________________________________

हास्यामागील खंत जागवणारी 'मिश्किली


 ‘भावनांच्या हिंदोळ्यावर' हा स्फुट लेखसंग्रह आणि ‘अनुबंध' हा ललित लेखसंग्रह लिहिलेल्या सौ. प्रतिभा जगदाळे यांचा तिसरा लेखसंग्रह विनोदी आहे. ‘मिश्किली' या थेट शीर्षकातून ते स्पष्ट होतं. सौ. प्रतिभा जगदाळे यांच्या फक्त नावातच प्रतिभा आहे असे नाही, तर ती लेखणीतही आहे. त्यामुळेच त्या प्रत्येक वेळी नवीन लेखन शैली वापरतात. प्रथम स्फुट, नंतर ललित आणि आता विनोदाचा उपयोग त्यांनी केला आहे. त्यातून त्यांची त्रिविध प्रतिभा प्रत्ययास येते. 'विनोद' ही लेखनात शैली असली, तरी जीवनात मात्र वृत्ती असते. जी माणसं विनोद करू शकतात नि लिहू शकतात त्यांची जीवन प्रकृती निखळ असते. जीवनात निखळपण येतं ते स्वास्थ्यातून. पण कधी-कधी दुःख, वैराग्य, विशाद इत्यादी भावही 'विनोद' जन्मास घालत असतात. विनोद, व्यंग, हास्य अशा विनोदाच्या अनेक छटा आहेत. ‘हास्य विनोद' हा स्वास्थ्यकारक तर 'व्यंग विनोद गंभीर! टोमणा, टिचकी, फिरकी, वस्त्रहरण, प्रहार, टीका, उपहास, आक्षेप अशा कितीतरी पद्धतींनी हास्य, व्यंग व विनोद फेर धरत जीवन कधी हलकं, तर कधी अंतर्यामी बनवत असतो. प्रतिभा जगदाळे यांचं ‘मिश्किली हे दैनंदिन जीवनात घडलेल्या विनोदी घटनांचे चित्रण आहे. त्यात हास्य आहे, व्यंग आहे आणि उपरोधही भरलेला आहे.

प्रशस्ती/१५९


 ‘शाही वारी' हा विनोदी लेख पंढरपूरच्या वारीवर बेतलेला आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन जाणारा अनवाणी वारकरी आणि माथ्यावर तुळस घेऊन त्याच्या मागं सावली धरणारी त्या वारक-याची भाविक घरधनीण, त्यांनी केलेल्या पंढरीच्या वा-या म्हणजे जीवन शिणवत, झिजवत केलेला विठूचा धावा. त्यामागे भक्ती होती व निर्मळ मनाची एकतानता. वारक-यांची वारी म्हणजे ‘भुकेला कोंडा नि निजेला धोंडा' पण प्रतिभा जगदाळे यांनी वर्णिलेली ‘शाही वारी' म्हणजे फॅशन म्हणून केल्या जाणाच्या सुखवस्तू व श्रीमंतांचा आध्यात्मिक विलासच होय. हेलिकॉप्टर मधून उतरायचं, वारीमध्ये मनाला येईल तेव्हा सामील व्हायचं, मनाला येईल तेव्हा गाडीत पहुडायचं, खाणे पिणं, झोपणं, पोषाख साच्यात शाही थाट! हे सारं कमी म्हणून श्रीमंतीच्या जोरावर दर्शनाच्या पाळीत मध्येच घुसून दर्शन घ्यायचं. वारीची सार्थकता म्हणून पार्टी करायची. या सर्वातून लेखिकेने नवश्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय समाजाची मानसिकता, जीवनशैली, जीवनाचे तत्त्वज्ञानच स्पष्ट केले आहे. आयटीतील एनआरआयांच्या पालकांची ही ऐटीतली जिवाची मुंबई यातून परमेश्वरच काय त्यांचा आत्मा आणि आत्मही त्यांना भेटणार नाही. हे लेखिकेने ज्या हलक्याफुलक्या लेखन वर्णनातून सहज स्पष्ट केलेलं असलं तरी ते हलकं नव्हे. ते तुम्हाला अंतर्मुखही करतं.

 ‘श्वान पुराण' मध्ये गिट्या आणि त्यांचा कंपू म्हणजे असाच नव श्रीमंत वर्गाच्या घरात जन्माला येणाच्या नव्या पिढीचा पराक्रम चित्रित करणारा लेख. यात या वर्गाच्या माणसापेक्षा कुत्र्यावर असणारा जीव, जसा स्पष्ट होतो, तसा कुत्र्याला माणसापेक्षा अधिक असणारी किंमतही त्यातून अधोरेखित होते. नवश्रीमंतांचं जिणं, जगणं, लिहिणं, वाचणं, शोक, फैशन या सर्वातून जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरण, खासगीकरण या सर्वातून येणारी चंगळवादी संस्कृतीच लेखिका चित्रित करते. ती लेखात कोणतंही भाष्य करत नसली तरी तिची सुप्त वेदना मात्र स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही.

 ‘व्यथा खिशाची, कथा फराळाची' नव्या कमावत्या, सुशिक्षित । स्त्रियांच्या उधळपट्टीचं व तोरा मिरवणाच्या मिजाशी जीवनाचं चित्रण

आहे. वैश्विक संस्कृतीत जगात स्थानिक परंपरा कवटाळणाच्या या वामाज, मसाज ऑर्डर देऊन आणलेला फराळ खात दिवाळी साजरी करतात. परंपरा म्हणून फराळाचं ताट एकमेकींकडे पाठवतात. सान्यांचा फराळ, पदार्थ, चव, रंग, रूप सारखं चित्रित करून लेखिकेने सण, संस्कृतीचे सपाटीकरण,

दिखावा, खोटं प्रदर्शन ठळकपणे मांडलं आहे.
 ‘अचाट स्मरणशक्ती' लेख वर्तमान अर्थ फुगवट्याचा फुगा, उच्च शिक्षितांच्या माध्यात्मानुरागी, बुवाबाजी व पारंपरिक वेडावर प्रहार करणारा लेख. जप, तप, बुवा, आराधना म्हणजे बुद्धी गहाण ठेवण्याचाच नाही तर, डोकं भाड्याने देण्याचा प्रकार कसा झाला आहे, याचं मार्मिक वर्णन करतो. जीवनात वखवख वाढली की विखार उद्भवतो नि विकारही. याचं चित्रण या लेखात केलं आहे. स्मरण असो वा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या बौद्धिक संतुलन, असंतुलनाचे निदर्शक असतात, हे आपणास विसरून चालणार नाही.

 'नर' आणि 'वानर' यातलं अंतर एकविसाव्या शतकात संपून गेलं आहे. 'वानर' लेख वाचताना ते लक्षात येतं. श्रीमंतीच्या धुंदीने माणसांच्या डोळ्यांवर व डोक्यावर आत्ममग्नतेचं गारूड केलं आहे. वानराचा ‘नर' झाला खरा पण ‘वानर' अवस्थेतलं त्याचं रानटीपण काही हटलं नाही. अकारण गॉगल घालून डोळे चुकवू पाहणारा मनुष्य याचं अनुकरण माकडासही करण्याचा मोह होतो व मग तो माणसाचा गॉगलच पळवतो. हा माणसाचा पराभव जीवघेणा ठरतो. ‘हाक्के मावशी' हा ‘मिश्किली'मधील व्यक्तिगत लेख असला तरी त्याचं रूप व्यक्तिचित्राचं झालं आहे. 'मान न मान, मैं तेरा मेहमान मानणारी माणसं समाजात सर्वत्र आढळतात. ही त्यांची उपजत गरज असली तरी, समाजमान्य शिष्टाचाराच्या पाश्र्वभूमीवर अशी माणसं सांस्कृतिक कार्यक्रम, सण, समारंभात विदुषकी ठरतात. हे मात्र खरं.

 ‘हाक्के मावशी' हाक न मारता येते. ती समाजहितदक्षतेने नाही तर लांगूलचालन, लाळघोटेपणा, स्वार्थ यामुळे. असं वागणं निषाधार्हच. कथाकार व पु. काळेची एक कथा आहे, ‘कधीही बोलवा येतो. त्यातील नायक बोलवल्याक्षणी मदतीला दत्त, पण मदत व गरज संपताच अंतर्धान होणारं. नाव नाही, गाव नाही. ‘सार्वजनिक काका' असणारी माणसं असतात म्हणून हाक्के मावशी'ची हाकाटी, किळसवाणी वाटत राहाते.

 ‘पुरण पोळीचं पुराण' हे गृहस्थ जीवनातलं अटळ नाट्य. नातेसंबंधात देणं-घेणं ठरलेलं. त्यातलं प्रेम महत्त्वाचं. जिव्हाळा महत्त्वाचा खरा, पण नातेसंबंध म्हणजे कधी कुरघोडी असते तर कधी लपंडाव. तो लंगडीचा खेळही असतो व संगीत खुर्चीही असते. प्रतिभा जगदाळे यांनी 'मिश्किली मध्ये ‘पुरण पोळीचं पुराण' आणून तो सारा जीवनरस, राग व वैविध्य चित्रित केलं आहे.


 ‘इंग्रजीची ऐशीतैशी- नव्या पिढीतील 'इंग्रजीमॅनियाचं चित्रण करणारा विनोदी लेख. नव्या ज्ञानसमाजाची अशी धारणा होऊन बसली आहे की इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. इंग्रजी आल्याशिवाय आपणास वर्तमानाचे महाद्वार उघडणार नाही. अशा भ्रमजालात अडकलेल्या ममीज ‘इंग्लिश स्पीकिंग कोर्स'ची वाट धरून अमेरिकन, युरोपियन बनू इच्छित आहेत. यामुळे नवा पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतो, ते आपलं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याची आकांक्षा म्हणून. पण त्यात सर्वच भाषा मुळापासून उपटून आपण टाकत आहोत. मातृभाषा, राष्ट्रभाषा व आंतरराष्ट्रीय भाषा जनामनात रुजायच्या बंध होऊन, नवे भाषिक संकर घडत आहे. व्याकरण संपून व्यवहारशास्त्र हाच भाषेचा आधार ठरतो आहे. भाषासंकराचं हे संकट नवं सांस्कृतिक अरिष्ट जन्मास घालत असल्याची जाणीव देणारा हा लेख विनोदी वाटला, तरी तो आपल्या विसंगत व्यवहारावर नेमकेपणे बोट ठेवतो.

 ‘कौतुकायण' वाचताना शाळांमधून शिक्षण संपून शोषणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचा घंटानाद ऐकवणारा हा लेख गॅदरिंगच्या निमित्तानं एका बीभत्स लोकव्यवहाराचा तमाशा उभा करतो. गॅदरिंग सुरू झालं ते सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी. आज त्याचं व्यापारीकरण, विद्रूपीकरण झालं आहे. रेकॉर्ड डान्स, रेडिमेड ड्रेपरी, कोरिओग्राफरचं फॅड या साच्यांत मुलं कठपुतळे होत आहेत. शिक्षकांची निष्क्रियता, कामचोरी, कलासक्तपणाचा अभाव हे सारं वैगुण्य. त्यात कुणाचंच कौतुक राहिलेलं नाही. शिक्षण हा पैशाचा, प्रदर्शनाचा ओंगळ खेळ झाल्याचं प्रतिभा जगदाळे या लेखातून ज्या उपहासाने स्पष्ट करतात, ते ओरखडे ओढणारं आहे।।

 ‘जीवघेणे हार्दिक स्वागत' डासांच्या उच्छादातून आपलं आरोग्य औदासिन्य व प्रतिबंधात्मक आरोग्याची दिवाळखोरी रेखांकित करणारा लेख आहे. ‘मच्छर पुराण!' तो लेखिकेचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवतो. मच्छरांपासून वाचवायला माणसानं काय काय उपाय शोधले, धूप, मच्छरदाणी, कासवछाप अगरबत्ती, कॉईल, वड्या, लिक्विड, मलम, रॅकेट, तरी मच्छर अजिंक्यच! या वास्तवाचं भान देणारा हा विनोदी लेख.
  या सर्वांचे समग्र रूप म्हणजे 'मिश्किली. त्याला ‘शाही विनोद पुराण' ही म्हणता येईल. कारण याची लेखन शैली टीकेपेक्षा हास्याकडे, हलक्याफुलक्या रंजक पद्धतीकडे झुकणारी आहे. या लेखनाचा हेतूही रंजनच आहे. पण माझ्यासारख्या वाचकास मूळ लेखिकेस अभिप्रेत नसलेलंही

उमगत गेलं. ही प्रस्तावना म्हणजे कदाचित नमनाला घडाभर तेल असं वाटेल. रोगापेक्षा इलाज भयंकर असंही काहींना या भाष्याबद्दल वाटण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही लेखक व लेखिकेची खरी यशस्विता असते ती, त्यांचं लेखन वाचण्यास किती वाचकांना प्रभावित करते यावर अवलंबून असते.

 प्रतिभा जगदाळे यांनी 'मिश्किली' सहज लिहावी अशी लिहिली आहे. त्यात शिळोप्याचा भागही दिसतो. पण त्यामागे एक अव्यक्त अस्वस्थपण आहे. सर्कशीतला विदुषक दुसन्यास हसवत, स्वतः आसवं जिरवत असतो असं म्हणतात. आपल्या आसपास आपणास हसवणारी माणसं, लाफ्टरशोमधील कलाकार, त्यांना दुःख नसतं असं थोडंच आहे? हास्यामागील खंत, खेदाची झिरझिरीत झालर तीच दुःखाचं खरं आरपार, पारदर्शी, नितळ दर्शन घडवते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्या पाश्र्वभूमीवर ‘मिश्किली' वाचलं की त्याचा महिमा समजण्यास वेळ लागणार नाही.

 पण त्यासाठी वाचकांकडे एक समजदार व प्रगल्भ मन हवं!

या लेखनाबद्दल लेखिकेचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील अधिक प्रगल्भ, प्रौढ व कलात्मक, लेखनासाठी शुभेच्छा!


◼◼

________________


लढवय्या बुलबुल (अनुभव)
मिलिंद यादव
सायली ग्राफिक्स, कोल्हापूर
प्रकाशन - डिसेंबर, २०१४
पृ. ३६ किंमत - ५0/
_______________________________________

निसर्गमित्र आणि लढवय्या बुलबुल


 माणूस कितीही समृद्ध झाला तरी त्याची निसर्ग शरणता ही न मिटणारी तहान असते. माणूस आणि माती यांच्यातल्या नात्याचं नाव निसर्ग ओढ आहे. मिलिंद यादव यांचं ‘लढवय्या बुलबुल' हे छोटेखानी पुस्तक याची साक्ष देतं. हे पुस्तक खरं तर एका निसर्ग वेड्या माणसाची निरीक्षण वही आहे. दि. २२.९.२०१३ ते ९.१०.२०१३ या अवघ्या एक महिन्याचं हे। निरीक्षण टिपण. पण ते सारा निसर्गक्रम टिपतं.
  निसर्गमित्र मिलिंद यादव इतर लक्षावधी माणसांप्रमाणे जीव अस्तित्व टिकविण्यासाठी जिवाच्या आकांताने गाव, शेत, जंगल, जीव, जनावरं, पक्षी, निसर्ग, जंगल, डोंगर, दरी, नदी, करवंदं सारं मागे टाकून शहरात स्थिरावले. माणसाच्या कानात सतत गमावल्याचं गुंजन नि गुंजारव पिंगा घालत असतो. माणसं शहरात येतात. घर, इमले रचतात, तेव्हा निसर्गाच्या अनिवार ओढीने घराच्या छपराची गच्ची करतात ती निसर्गाची नि आपली झालेली गोची भेदण्यासाठी. ही गच्ची असतं त्यानं गावात, मनात मागं टाकलेलं मचाण. तो त्यावर मांड ठोकतो अन् हरवलेलं गवसावं म्हणून निसर्गाचा लुटुपुटचा डाव मांडतो. तो या भ्रमात असतो की मी समृद्धीच्या आधारे माझ्या तळहातावर प्रतिनिसर्ग निर्माण करू शकतो.
 निसर्गमित्र मिलिंद यादव आपल्या घरच्या टेरेसवर हँगिंग गार्डन निर्माण



प्रशस्ती/१६४

करतात. कुंड्या, झुले, वाफे असा फेर धरत मिनी नेचर उभारतं. माणूस मोठा स्वार्थी. उपयोगाचं पेरत राहतो. कडुलिंब, शेवंती, नेचा, पाम असं डोळ्याला अन् मनाला सुखावेल असं पेरत, रोपत राहतो. त्याचं स्वप्न असतं. अंगणात बकुळीचा सडा पडावा, बुलबुलाचा संसार गच्चीवर झुलावा, निसर्गमित्र मिलिंद यादव यांच्या खटाटोपाला यश येऊन नेच्याच्या कुंडीत एक दिवस बुलबुलाची अंडी दिसतात. पांढरं अंडे राखाडी होत एक दिवस चक्क तिळं जन्मतं. बुलबुल नर-मादी, आई-बाबा घरटं ज्या ओढीनं बांधतात त्याच ओढीनं पिल्लांना भरवत मोठे करतात. मध्येच काळकठोर कावळा एक बाळ गडप करतो. पण लढवय्या बुलबुल उर्वरित दोघांचा डोळ्यांत तेल घालून सांभाळ करतो.   निसर्गमित्र मिलिंद यादव नामक माणूस या भ्रामक आनंदात असतो की मी प्रतिसृष्टी निर्माण केली. पण निसर्गाचा क्रम अटळ असतो. निसर्गाकडून निसर्गाकडे एक दिवस बुलबुल बाळं पंखात बळ घेऊन उडून जातात. नवा डाव, संसार मांडण्यासाठी. माणसाप्रमाणे निसर्गाचं पण एक स्वप्न असतं निसर्ग क्रम निरंतर ठेवण्याचं, म्हणून निसर्ग सर्वश्रेष्ठ! त्याला तसंच राहू द्यावं माणसाचं काम क्रम छेदण्याचं नाही, क्रम पाळायचं आहे, हे विसरून कसं चालेल? लढवय्या बुलबुलाप्रमाणे प्रत्येक माणसानं काळ कठोर कावळ्याचा बिमोड करत न थांबता निसर्गक्रम चालू ठेवला पाहिजे. बाग, बगीचा, वन, जंगल कुठंही फुलवा पण निसर्गाच्या कायदा, क्रमाची गती निरंतर ठेवा, हे सांगणारं 'लढवय्या बुलबुल' प्रत्येक माणसाच्या मनात निसर्गाचं घर बांधेल असा मला विश्वास आहे.

 या ओळी लिहीत मी माझ्या अभ्यासिकेतून बाहेर डोकावतोय... खिडकीच्या शेजारी कडीपत्ता फुलला आहे. बियांचे घस खुडत बुलबुलाची जोडी विट ऽ ऽ करते आहे. मी इंटरनेटवर ट्विट करत लिहितो आहे. 'Not man, but nature is mighty' - माणूस नाही, निसर्गच श्रेष्ठ ! दि. १७ नोव्हेंबर, २०१४
पुनःश्च


 'लढवय्या बुलबुल' मध्ये सर्वांत भावलेली गोष्ट जर कोणती असेल तर निसर्गवेल्हाळ मिलिंद यादव यांची निसर्गाबद्दलची मनस्विता. या मनस्वितेतून या कथेतला निसर्ग माणूसधर्मी होतो. निसर्गाचं मानवीकरण हे।

आपणास त्याच्याशी जोडलेल्या घट्ट विणीशिवाय निर्माण नाही करता येत. निसर्गातील प्राणी, पक्षी, फुलं, पानं, झाडं तुमच्याशी तेव्हाच बोलू लागतात जेव्हा तुम्ही त्यांचे होता या पुस्तकात माणसाचं हृदय निसर्ग मनाशी

बांधण्याची, जोडण्याची जी किमया घडून येते ती निसर्ग आणि 
माणसांच्या परस्पर हार्दिक संवाद आणि नात्यातून. म्हणून 'लढवय्या बुलबुल'
निसर्ग आणि माणूस जोडणारा राजहंस होऊन जातो.

◼◼

________________


गजरा (कथासंग्रह)
खलील पटेल
अभिनंदन प्रकाशन , कोल्हापूर
प्रकाशन - एप्रिल, २०१५
पृष्ठे - १६0 किंमत - २२0/
_______________________________________________


रंजक कथा अभिजात व्हायला हव्यात


 खलील पटेल लिखित ‘गजरा' हा कथासंग्रह आहे. पटेलांची कथालेखन वृत्ती ही दीर्घकथा लेखनाची दिसते. दीर्घकथा लिहिणारा लेखक उपजत वर्णन विस्तारी असतो. ती लेखनाची लकबही असते आणि वृत्तीही. या कथासंग्रहातील ‘गजरा’ आणि ‘शाहबाबा' दीर्घकथा होत. उद्धार मात्र सर्वसामान्य कथेसारखी. खलील पटेलांचा जन्म मुस्लिम कुटुंबातला. त्यांचे संगोपन मुस्लीम समाजात झाले. त्यामुळे कथांचे वातावरण, पात्र, त्यांची भाषा ही त्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारी हिंदी, उर्दू प्रचुर रहाणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. ज्याला आपण रंजक साहित्य म्हणून संबोधतो, अशा वर्गातल्या या कथा, प्रेम, प्रणय हा या कथांचा आत्मा. खलील पटेल आदर्श म्हणून धर्मनिरपेक्षतेचे उपासक असले तरी त्यांचा वाचन, व्यवहार, उठबस सर्वसामान्यांची राहिली असल्याने अभिजात साहित्याची सावली काही त्यांच्या लेखनावर पडत नाही. तरी परंतु रंजक साहित्याचा एक हकमी वाचक सर्व काळात समाजात असतोच. त्यांच्यासाठी मात्र हा कथासंग्रह असली माल पुरवतो असे दिसते. त्यांच्या नायिका तवायफ, वेश्या असणं कथांची गुंफण कोठे, वेश्यावस्तीत होणं, यातून दलाल, पंटर, गि-हाईक, नथ उतरवणे, नशापान, शरीरसंबंध यातच या कथा घुमत फिरत राहतात. 'गजरा', ‘उद्धार' कथेचा आशय, उद्देश भव्य, दिव्य असला...

प्रशस्ती/१६७

आत्मा पवित्र असला तरी शरीर ओंगळ राहून गेल्याने साधनशुचितेचा प्रश्न उभा राहतो. जीवनात साध्य भव्य, दिव्य असून चालत नाही. साधनही पवित्र हवे. तर साहित्य अभिजात होते, याचे भान, संस्कार खलील पटेल यांनी जाणीवपूर्वक करून घ्यायला हवेत. त्यासाठी त्यांनी वि. स. खांडेकर, शरच्चंद्र चतर्जी, प्रेमचंदांसारखे साहित्य वाचायला हवे.

 ‘गजरा' कथासंग्रहातील कथांचा लेखक प्रामाणिक आहे. या कथांचे बीज दुस-या कुणी सुचविले. खलील पटेल यांनी त्याला शब्दरूप दिले... शब्दसंभार त्यांना दिला. ‘गजरा' कथा राम आणि रूक्सारची प्रेमकथा. ती मंदिरात सुरू होते आणि मजलिसमध्ये संपते. कथेला कितीही तात्त्विक मुलामा दिला असला तरी ती काल्पनिकच बनून राहते. कारण समाजात विधर्मी लोकांत सामंजस्य, उदारता अपवादानेच आढळते. या कथेचं बळ असेल तर कथा विस्ताराचं कौशल्य. खलील पटेल ही कथा इतिवृत्तात्मक, वर्णनात्मक पद्धतीनं ती लिहितात. कथेत पात्रांचा उपयोग करून कथेचा रोमान्स वाढवतात. ‘गजन्याचा उपयोग, प्रेम व भक्तीचं प्रतीक म्हणून करतात. कथेत जिज्ञासावर्धन आहे. कथाबीज कलात्मक रीतीने व्यक्त । होणं शक्य असताना, ते घडत नाही, याचं कारण लेखकाचा वाचन पैस तोकडा. हे सायास लेखन होय. कथाकार नवोदित असल्याने रियाज म्हणूनच या कथांकडे पाहावं लागेल. फार मोठ्या अपेक्षा करून कथालेखकाकडे पाहणे अन्यायकारक ठरेल. पहिला प्रयत्न म्हणून स्तुत्य पण विकासाची त्याला पूर्वअट लावावीच लागेल. या कथेवर नाटक, सिनेमा व्हावा अशी लेखकाची अपेक्षा दिसते. त्यात गैर काहीच नाही. पण त्यातूनही कथेचं रंजक चरित्र सिद्ध होतं. कथेतून लेखकाची संगीताची जाण स्पष्ट होते. मुस्लीम असून मंदिराच्या रीतीभाती लेखक चपखल वर्णन करतो. यातून लेखकाची अन्य धर्मीयांबद्दलची प्रीती, ओढ स्पष्ट होते. तो त्याचा जाणीव विकास म्हणूनही त्याचं सामाजिक मोल नाकारता येणार नाही. प्रेमकथेचा गाभा असतो अनिवार ओढ. रुक्सारच्या चरित्रातून ते पुरेपूर ओसंडताना दिसते. त्यातून कथा वाचनीय बनते.

 ‘उद्धार' लघुकथा आहे. ही किशोर आणि कविताची प्रेमकहाणी आहे. सर्वसामान्य कथा. गरिबी, संघर्ष, भाबडेपणा, परिस्थितीचा गैरफायदा घेणारे समाजातील वासनांध लांडगे यांच्या आवतीभोवती फिरणारी ही कथा वेश्यालयातून देवालयाकडे अग्रेसर होत सामाजिक होते. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून लेखकाने कथाविस्तार साधला आहे. इथेही लेखकाचं संगीत प्रेम, जाण स्पष्ट होते. वेश्येचा उद्धार करण्याच्या सद्हेतूने लेखक कथा

लिहितो. त्यातूनही त्याचे भाबडेपणच सिद्ध होतं. ऑर्केस्ट्रा, तमाशा म्हटला की प्रेम, प्रणय अटळ. असं हुकमी विषयांचं रसायन या कथेत आहे. उपकथांमध्येपण प्रेम, प्रणयच. त्यामुळे या कथा ‘यलो लिटरेचर'कडे झुकतात.

 ‘शाहबाबा' दीर्घकथा. ती लेखकाची आपबीती. म्हणून सत्यकथा. ती ‘फॅक्ट आणि फँटसी'चं सुंदर मिश्रण होय. ‘मृत्यू' हा अटळ विषय घेऊन कथा साकारते. इब्राहिमच्या मृत्यूचा लेखकावर झालेला परिणाम हे कथेचं केंद्र. त्यातून समाज चित्रण आणि माणूस वाचन घडतं. प्रयोग म्हणून या कथेचं महत्त्व आहे.

 खलील पटेल यांनी भविष्यकाळात रियाज करत आपली कलम कसली (कंबर नव्हे!) तर त्यांना लेखक म्हणून उज्ज्वल भविष्य आहे. कारण त्यांना लिहिण्यावाचण्याचा छंद आहे. तो मात्र त्यांनी चतुरस्त्र वाचन, व्यासंगाने जोपासायला हवा. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

◼◼


दि. २८.११.२०१४
कोल्हापूर
________________

चौथा स्तंभ (अनुभव)
सुभाष धुमे
चपराक प्रकाशन, पुणे
प्रकाशन - ऑगस्ट २०१५
पृष्ठे - ८८ किंमत - १00/
___________________________________

पत्रकारितेच्या पाच दशकांचा अनुबोध पट


 श्री. सुभाष घुमे यांचे पुस्तक ‘चौथा खांब' हे त्यांच्या सन १९६० नंतरच्या गेल्या पाच दशकातील वृत्तपत्रीय कारकिर्दीचा लेखाजोखा आहे. मी त्यांना बातमीदार म्हणून सन १९७० पासून पाहात आलोय. तो काळ त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उमेदवारीचा जसा होता तसा तो उभारीचाही होता. खादी चौकड्याचा पूर्णबाही बुशशर्ट, एखादी पँट, पायात चप्पल, गळ्यात शबनम आणि राखलेली काळी कुळकुळीत दाढी. हा मितभाषी बातमीदार अंगाने कृश होता. डोळे सतत नव्याच्या शोधात असायचे. त्यांना त्या काळी बोलताना मी फारसं पाहिलं नाही. मग दहा वर्षांनंतर दैनिक सकाळची कोल्हापूर आवृत्ती सुरू झाली. ते कोल्हापुरात आलेलं पहिलं साखळी वर्तमानपत्र. त्यात बेळगाव, चंदगड, गडहिंग्लजचं वार्तापत्र यायचं अन् ‘सुभाष धुमे यांच्याकडून' अशी क्रेडिट लाईन असायची. त्या वेळच्या सकाळचा मी नित्य वाचक, लेखक असल्याने वर्धापन दिनी १ ऑगस्टला त्यांची भेट, गप्पा हा नित्याचा कार्यक्रम होऊन गेला होता. मी माझी आयुष्याची खरी कमाई उत्तूर परिसरातील पिंपळगावी शिक्षक म्हणून केली होती. या गप्पांचं केंद्र अर्थातच परिसरातील सुहृदांचा हालहवाल असायचा. त्यात सुभाष धुमै मार्मिक भाष्य करत वित्तंबातम्या देत राहायचे. त्यातून लक्षात आलं की यांच्यातला बातमीदार एखाद्या ‘व्हिसल-ब्लोअर'

प्रशस्ती/१७०

सारखा नित्य सजग तरी चतुरस्त्र संपर्क ठेवून असणारा होता. आज पाच दशके उलटल्यानंतर लक्षात येतं की कधी काळी एकांडा लढणारा हा शिलेदार आज मनुष्यसंग्रही सेनापती बनून परिसरातील सर्व विधायक उपक्रमांचा पाठीराखा, मार्गदर्शक बनला आहे. पत्रकारांचा म्होरक्या। होण्यासाठी लागणारं बेरकेपण त्यांच्या अनुभवाची कमाई खरी पण ती ते अनुबोध, प्रबोधन, संघटन मार्गाने विधायकतेची एक एक वीट रचतो आहे.

 सन १९६० च्या दरम्यान दैनिक राष्ट्रप्रगती सारख्या छोट्या दैनिकात बातमीदार म्हणून सुरू झालेली त्यांची पत्रकारिता नोकरीतून औपचारिक निवृत्ती मिळवून ही ‘ब्युरो चीफ' म्हणून सुरू आहे. मधल्या काळात त्यांनी दैनिक सकाळ, पुढारी, केसरी, तरुण भारत अशा नामांकित दैनिकात । विभागीय बातमीदार म्हणून कार्य केलं. एखाद्या सैनिकास कायम युद्धभूमीवर राहणं भाग पडतं तसं सुभाष धुर्म कायम गडहिंग्लज, आजरा, चंदगड, बेळगाव ते थेट बेंगलोरपर्यंत नित्य बातमीचा शोध घेत भटकत राहिले. त्यांनी ज्या काळात बातमीदारी सुरू केली, त्या वेळी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन, संबंधितांशी बोलून घटनेची खातरजमा करून लिहिण्याचा, वार्ताकन करण्याचा तो काळ होता. लिहिलेली बातमी तातडीने पोहोचवण्याचं काम एस. टी. करायची. एस.टी. ने पाठवलेली बातमी दुस-या दिवशी वर्तमानपत्रात आली तर टपाल पोहोचलं समजायचं. बातमी आली नाही तर परत पाठवायची. कार्यक्रम, घटनांची छायाचित्रे वर्तमानपत्रात अपवादाने छापले जायचे. कारण छायाचित्रांचे ब्लॉक बनवणे आवश्यक असायचे ते । काम खर्चीक तर होतंच, पण वेळखाऊही होतं. वृत्तपत्रसृष्टी पेनाच्या शाईपेक्षा पत्रकाराच्या घाईवर चालते हे त्या वेळचं वास्तव होतं. फोनवर ट्रैककॉल करून बातमी देणं म्हणजे एक्सप्रेस न्यूज' व्हायची. ती ‘छापताछापता' सदरात ताजी बातमी म्हणून राहायची. बातमीला मूल्य होतं तसं बातमीदारालाही मोल होतं. पाकीट संस्कृती आली आणि ‘चौथा खांब ढासळला. हे पुस्तक बुरूज ढासळण्यापूर्वीच्या भुईकोट किल्ल्याचं आत्मकथन आहे. ते अनुभव कथन असल्यानं त्याचं अनुबोध (शिकवण) म्हणून महत्त्व आहे.

 ‘चौथा खांब' वाचत असताना वृत्तपत्र व्यवसायाची फारशी माहिती नसणाच्या माझ्यासारख्या वाचकांना हा 'मॅजिक लँटर्न' वाटला तर आश्चर्य वाटायला नको. लोकशाहीत संसद, न्यायालय, प्रशासन व प्रसार माध्यमे ही अनुक्रमे कायदा, न्याय, व्यवस्थापन व प्रबोधनात्मक नियंत्रक स्तंभ

होत. लोकशाहीत प्रत्येकाचं महत्त्व असलं, तरी जनमत म्हणून आक्रमकही! जागतिकीकरण, माहिती आणि तंत्रज्ञान अर्थकारण यांच्या बदलत्या गणितामुळे माध्यमे प्रबोधक न राहता उत्पन्नाची साधने बनली. संपादकापेक्षा व्यवस्थापक मोठा ठरण्याच्या या काळात बातमीपेक्षा जाहिरात महत्त्वाची ठरली. त्यामुळे पेड न्यूजचा जमाना अवतरला. वृत्तपत्रे वाचन साधन न राहता ती दृश्य बनली. आज वर्तमानपत्र चहा पीत पाहण्याचा चाळा बनून राहणे यातच त्याचे अवमूल्यन सिद्ध होते. हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या ‘ब्रेकिंग न्यूज

आणि २४ घंटे ७ दिवसच्या सातत्याचे अपत्य होय. स्पर्धेत ‘पळा पळा, पाहू कोण पुढे' च्या खटपटीत सुभाष धुमेंसारख्या कधी काळी ‘पाकीट'ऐवजी पुस्तक' भेट स्वीकारणारा पत्रकार म्हणजे वर्तमानात वस्तुसंग्रहालयातील “अँटिक पीस'. हे अधःपतीत शल्यही या पुस्तकात आहे. तरुण पत्रकारांना हा चौथा खांब' ढासळलेले काळाचे बुरुज डागडुजी करून किंवा नव्याने बांधून नवे गडकोट उभारत नव वृत्तपत्र सृष्टी उभारण्याचं स्वप्न, बळ, दृष्टी देतं. हेच या पुस्तकाचे श्रेय आणि प्रेय होय. वाचकांनी ते मुळातून वाचावं असा भरपूर खजिना, मसाला भरलेलं हे पुस्तक वृत्तपत्र सृष्टीतील हरलेल्या लढाया आणि हरवलेल्या मूल्यांच्या कथा सांगत परत एकदा ‘जागते रहो' चा पुकारा करत पत्रकारांना ‘गस्तवाला' बनवू इच्छितं.


◼◼


दि. २१ मार्च, २०१५
गुढीपाडवा
________________

चंद्रप्रकाशाच्या झळा (ललित लेखसंग्रह)
युवराज पाटील
अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - सप्टेंबर, २०१५
पृष्ठे - १00 किंमत -१४0/
__________________________________

चंद्रकलेला सरस्वतीचंद्रांचं तेज लाभावं

 ‘चंद्रप्रकाशाच्या झळा' हा युवराज पाटील यांनी लिहिलेल्या ललित लेखांचा संग्रह होय. 'ललित' शब्दाचा अर्थच मुळी आहे सुंदर, आल्हादक, आकर्षक, मनोहर. ज्याला जीवन सुंदर व्हावं वाटतं असाच माणूस ललित लेखन करतो. ललित लेखन येरागबाळ्याचे काम नाही. त्याला प्रतिभा असावी लागते. प्रतिभा म्हणजे वेगळी दृष्टी नि शब्दप्रभुता. ते सामर्थ्य तुमच्यात असेल, तर तुमचं लेखन कलात्मक बनतं. ललित हे साहित्याचं मूल्य आहे. साहित्यात लालित्य असेल तर ते अभिजात होण्याची शक्यता असते. ललित साहित्यात जीवन प्रतिबिंब असतं. कल्पनेचा स्वैर संचार व शब्द सौंदर्याची पखरण साहित्यास आल्हादक बनवते.
 मुळात माणूस साहित्य का वाचतो? तर त्याची अनेक उत्तरे देता येणं शक्य आहे. मनोरंजन, विरंगुळा, ज्ञान, माहिती, तत्त्व, तर्क, मन, जीवन कौशल्य साच्यासाठी माणूस साहित्य वाचत असतो. चंद्रप्रकाशाच्या झळा' या शीर्षकातच लालित्य भरलेलं तुम्हाला आढळेल. चंद्र हाच मुळी आल्हादक, आकर्षक, मनोहारी! त्याचा प्रकाश शांत, शीतल, रुपेरी! ज्याला चांदण्या रात्री नौका विहार करायला आवडणार नाही असा माणूस विरळा. पण झळा आणि शीतलता या परस्पर विरुद्ध अनुभूती होत. झळ अग्नीचे. ती होरपळते. पण झळीशिवाय जीवन थोडंच आल्हादक होतं!

प्रशस्ती/१७३

जीवन जगणं ही कल्पना नसून ते एक भीषण वास्तव आहे. झळ त्या विद्रूप, क्रूर वास्तवाचं प्रतीक होय. झळीचा प्रदेश पादाक्रांत कराल तर तुम्हास चांदण्या रात्रीचं सौंदर्य प्रसन्नता देत राहील. युवराज पाटील यांच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे कल्पना आणि वास्तवाचा सुंदर मिलाफ होय. युवराज पाटील यांना माणसाचं जीवन सत्य, शिव, सुंदर असावं वाटतं. पण असं वाटण्यातल्या भाबडेपणाला फाटा देत ते लिहितात. त्यांना हे माहीत आहे की डोंगर चढल्यानंतरच दरीचं सौंदर्य दृष्टिपथात येतं.

 चंद्रप्रकाशाच्या झळा' लेखसंग्रहात युवराज पाटील लिखित अठरा लेख आहेत. अठरा विश्व दारिद्रय पाहिलेला हा लेखक संवेदनशील आहे. ‘स्वदुःखाच्या पलीकडे जाऊन, ‘आप’ला ओलांडून तो 'पर'चा विचार करणारा समाज शिक्षक आहे. ‘जीवन त्यांना कळले हो' अशी काही माणसं असतात. ती माणसं स्वतःला ओलांडून (खरं तर स्वतःला विसरून) जगाचाच घोषा लावत बसतात. मग एकाच वेळी त्याला जगण्याच्या भिन्न कळा जाणवू लागतात. त्याला कवितेतलं शब्द सौंदर्य खुणावतं नि शेतक-याचे कष्ट, घाम, दारिद्रयही त्याला तितक्याच तन्मयतेनं साद घालत राहतं. मग त्यातून शेतकरी, पाऊस आणि कविता' सारखा ललित लेख जन्मतो. पाऊस शेतक-यासाठी वरदान असतो. जर तो पिकाच्या । गरजेनुसार पडला तर. पण तो असतो लहरी. तो त्याच्या मातीचाच नाही तर आयुष्याचा चिखल करून टाकतो. हे दिसायला, कळायला कवी मन । असावं लागतं. अश्रूतलं इंद्रधनुष्य ज्याला दिसतं तो प्रतिभावान साहित्यिक. युवराज पाटील कवी, शिक्षक, समाजसेवक असं व्यक्तिमत्त्व घेऊन जगत असल्याने ते केवळ कल्पनेत रममाण नाही होत. वास्तवाची झळ त्यांना लागलेली असल्याने व तीही कळत्या वयात लागली असल्याने ज्वालांच्या फुलं बनवण्याचं स्वप्न घेऊन ते लिहीत राहतात. त्यांच्या लेखनामागे जीवन मांगल्याची शिव नि सुंदर ओढ आहे. म्हणून ते सत्याला पालाण न घालता सामोरे जात लिहितात. पावसाचा वेध घेत लिहिलेलं काव्य पूर्ण ललित लेखन माणूसलक्ष्यी होतं. ते वाचून विसरता येत नाही. असं शल्य सुंदर हे लेखन माणसाला अंतर्मुख करतं. ते जागं ठेवतं. म्हणून त्याचं मोल मातीला मोत्याचा साज चढवणाच्या माऊलीच्या हातांना मेंदीचं वरदान नसलं, तरी डोक्यावर सूर्य घेत भांगलणीच्या हातांना पडलेले घट्टे, दगड, माती, खडकांचे टवके हेच तिचं सौंदर्य! झळेतही झळाळी दडलेली असते हे ज्यांना अनुभवायचे असेल त्यांनी या मायमाउलीचा हात आपल्या चेह-यावर मायेनं फिरवून घ्यावा. मग त्याला एकाच वेळी मायेतलं राकट

रांगडेपण नि मऊशार मलईची माया काय असते ते उमजेल.

 माणसाचं जीवन ऊन-पावसाचा खेळ जसा, तसा तो हसण्या-रडण्याचा लपंडावही असतो. पावसाच्या सरीनंतर येणा-या उन्हाच्या झडीला जी लज्जत असते, ती जीवनातही! जीवनात सुरुवातीला दुःखाचे ढग भरभरून । यावे. त्यांच्या ओहोटीनंतर, रिते, हलके होण्याने जीवन सुखाने कसे भरून जाते ते कळायला ‘आनंदी आनंद गडे, इकडे-तिकडे चोहीकडे'चं गाणं कानात कायम रुंजी घालत राहायला हवं. मग ‘कौतुकाचे रडणे' हा लेख का लिहिला त्याचे रहस्य कळतं. 'आनंद' घेणं वेगळं. तो मतलबी जीवन व्यवहार. आनंद देण्यात मनाचं उदार असणं पूर्वअट असते. वाढदिवसादिवशी लक्षात ठेवून मोबाईलच्या 'कॉन्टॅक्ट'मधील माणसाला शुभेच्छा देण्यास पन्नास पैसे पण पडत नाही. पण काही माणसं रुपये, आणे, पैमध्ये इतके गुंततात की त्यांचा मिडास राजा होऊन जातो. पण जे आनंदाची उधळत करत राहतात त्यांचे जीवन सोनेरी मुंगसासारखं झळेतून झळाळीकडे नित्य अग्रेसर होत राहतं. ।

 ‘जीवन मैफल' तुम्हाला कर्मयोगी करील, जर हा ललित लेख तुम्ही तुमच्या आचारधर्म बनवाल, गाण्याच्या मैफिलीसारखं तुमचं जीवन सुरेल व्हायचं तर वर्तमानावर तुम्हाला स्वार होता आलं पाहिजे असे समजावणारे युवराज पाटील जीवनावर मांड ठोकण्याची ऊर्मी नि ऊर्जा आपल्या या लेखांमधून वाचकांना देतात. चंद्रप्रकाशाच्या झळा'चं वाचन रिकामा वेळ घालवायचं साधन नसून जीवनातला बहुमोल वेळ सत्कारणी लावण्याचं ते माध्यम आहे. तीच गोष्ट ‘मदतीचे हात'ची. हात कशासाठी असतात? स्वार्थ की परमार्थासाठी? देण्यासाठी की घेण्यासाठी? जोडण्यासाठी की तोडण्यासाठी? मागण्यासाठी की निर्मितीसाठी? देण्याने तुम्ही दाते होता, घेण्याने याचक ठरता. हे लेखन मूल्य संस्कार म्हणूनही मला महत्त्वाचं वाटतं. हे लेखन प्रश्न निर्माण करतं. म्हणूनही वाचलं पाहिजे. प्रश्नांना सामोरे जाण्याचं बळ या लेखनाचं सामर्थ्य म्हणून नोंदवता येईल.

 ‘शरीर' विज्ञान, आरोग्य, आयुष्य, मानस सर्वांचा मेळ घालत वाचकांचं समुपदेशन करतो. नाण्याच्या अनेक बाजू' मधून युवराज पाटील संवाद शैलीचा चपखल उपयोग करत या संवादास हितगुज बनवतो. त्यामुळे लेखक सखा, मित्र होत नाण्याच्या बाजू दोन नसून अनेक असल्याचं नोंदवतो. दोन पिढ्यांतलं अंतर कमी करण्याची लेखकाची भूमिका बुजुर्गाची खरी. ती लेखकाच्या वयाला शोभत नाही. समाजभान एखाद्यास अल्पवयी। प्रौढ बनवतं. युवराज पाटील संस्कारी आहे. छोट्या वयात ते लेखनातून

मोठ्या भूमिका घेतात. हे लेखकाचं लेखकराव' बनणं नेमाडेंपेक्षा वेगळं आहे.

 ‘शाळेच्या आठवणी' लेखकाचं स्मरणरंजन आहे. अलीकडे वर्गातील विद्यार्थी कालांतराने भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा देत जुनं गमावल्याचं दुःख व्यक्त करत भविष्यासाठी काही करू मागतात, पाहतात - हे। समाजाचं सकारात्मक रूप रचनात्मक आहे. समाज श्रीमंत पैशांनी नाही। होत. जाणिवा त्याला समृद्ध, प्रगल्भ करत असतात हे या लेखनातून कळतं. त्याची बाजू' या संग्रहातील वेगळा लेख होय. तो लिहिण्याची धाटणी वेगळी. विचारही आगळा. आत्मविश्वासाचं बळ वृद्धिंगत करणारा हा लेख अनेक हात सरसावत स्वप्नांचं महत्त्व अधोरेखित करतो. घर असावे घरासारखे' म्हणणं नि असणं वेगळं. घर सोय की गैरसोय हे सापेक्ष असतं. 'घर वडाच्या झाडासारखे असावे' हा लेखकाचा भाबडेपणा आहे. पारंब्या वाढतात. जमिनीत रुजतात. नव्या पारंब्या अंकुरतात. हे वास्तव कसं विसरून चालेल? ‘साधनेतून पूर्ततेकडे' वैचारिक लेखन आहे. 'शिक्षण' याच पठडीतले. तशी या पुस्तकात ललित व फलिताची सरमिसळ आहे. ‘आभासी जग' एकविसाव्या शतकाला स्पर्श करणारा लेख. त्याचा विषय अत्याधुनिक आहे. ‘आदर्शाच्या शोधात' मध्ये लेखकातला शिक्षक डोकावतो. हे सर्व वाचत असताना लक्षात येतं की हे पुस्तक ललित आहे. पण त्यापेक्षा ते अधिक मूल्यप्रवण व संस्कारी आहे.

 ‘चंद्रप्रकाशाच्या झळा'चं वाचन मनस्वी आनंद देतं. पण त्यापेक्षा अधिक आपणास जीवनबोध देतं. माणूस, जीवन, साहित्य, निसर्ग, कल्पना, वास्तव, भावतरंग, स्मरणरंजन असं वैविध्यपूर्ण भाव, रस देणारं हे लेखन. लेखक या उसन्या शब्दकळांमागे धावत नाही. कल्पनांची उत्तुंग भरारीपण यात नाही. आहे एखाद्या पाणबुड्याची जीवन सागराचा तळ शोधणारी तळमळ, धडपण! साहित्याचं मोल सौंदर्यापेक्षा उपयुक्ततेकडे सरकण्याच्या आजच्या काळात माणसं गुंड्याभराच्या आपल्या स्वर्गाद्यानात गुलाब लावण्यापेक्षा नारळ लावणं एवढ्याचसाठी पसंत करतात की ते सावली सोडता सर्व देतं. गुलाबाचा सुगंध व सौंदर्य पहिल्या चहाबरोबरच्या वृत्तपत्रांइतकाच! त्याला शेक्सपिअरचं अभिजातपण यायचं तर उपयोगितेला मूल्यांचा स्पर्श हवा. तो स्पर्श हे लेखन देतं.

 युवराज पाटील नवोदित लेखक आहेत. त्यांचं हे पुस्तक त्यांच्या प्रतिभेची पहिली चंद्रकला होय. चंद्रकलेचं सौंदर्य तिच्या अपूर्णतेतच असतं. तिच्या कृश कलेवराची कलात्मकता पूर्ण चंद्रात नसते. ‘दूज का

चाँद' आणि 'चौदहवी का चाँद' दोन्ही सुंदर खरेच! एकाचं सौंदर्य अपूर्णतेत तर दुस-याचं पूर्णतेत! चंद्रप्रकाशाची झळ' दूज का चाँद आहे. तो भविष्यात ‘चौदहवी का चाँद' होणं अटळ निसर्गक्रम. त्या निसर्गक्रमाचे रूपांतर पृथ्वी प्रदक्षिणेत होऊन हे लेखन सुफळ, संपूर्ण व्हावे अशी अपेक्षा! त्यासाठी मनस्वी शुभेच्छा!!

◼◼

दि. २५ ऑगस्ट, २०१५
प्रेमचंद स्मृतिदिन
________________


पणत्यांचा प्रकाश (अनुभव कथन)
संपतराव गायकवाड
हृदय प्रकाशन, पोहाळे, जि. कोल्हापूर
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१५
पृष्ठे - १00 किंमत - १00/

______________________________________

लहान प्रसंगांतून महान विचारांची पेरणी

 मला मुलखावेगळ्या माणसांचं मुळातच मोठं आकर्षण. मी एकदा मुख्याध्यापक झालेल्या माझ्या विद्यार्थ्यांशी बोलत होतो. विषय होता शालेय तपासणीचा. तो सांगत होता तो अनुभव मला अचंबित करणारा होता. त्याच्या शाळेच्या विभागात आलेले शिक्षणाधिकारी शालेय तपासणीला येताना स्वतःचा जेवणाचा डबा घेऊन येतात. तोच खातात. शाळेचा चहापण पीत नाहीत.
 पुढे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एक गट शिक्षणाधिकारी भेटले. ते सांगत होते, “आमचे भाग शिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी '(3T)' उपक्रम राबवला आहे. शिक्षक प्रबोधन शिबिर असते. ते शिबिर सरकारी नसते. परिपत्रक, रजा, भत्ता नसतो. उलटपक्षी शिक्षक या शिबिरासाठी सुट्टीतला आपला वेळ (Time) देतात. शिबिरासाठी स्वतः प्रवास खर्च (Ticket) करतात. शिबिराला येताना जेवणाचा डबा (Tiffine) घेऊन येतात. एकदा माझे अनेक वर्षे सहकारी असलेले मित्र सांगत होते. माझा एक भाऊ आहे. तसा सावत्र. पण आम्ही इतके सख्ख्याने राहतो की कुणाला सांगूनही खरं वाटत नाही.
 या तीनही प्रसंगातला मुलखावेगळा माणूस म्हणजे संपतराव गायकवाड.

प्रशस्ती/१७८

त्यांची नि माझी पहिली भेट झाली कुरुंदवाडमधील एका शिक्षकाच्या सन्मानार्थ योजलेल्या गौरव समारंभात मी प्रमुख पाहुणा. संपतराव अध्यक्ष. माझ्या भाषणानंतर झालेलं त्यांचं अध्यक्षीय भाषण हे शिक्षणाधिका-यांचं नव्हतं. ते होतं एका संवेदनशील, हळव्या शिक्षकाचं. ज्याला सारं शिक्षण म्हणजे संस्कारयज्ञ वाटतं. शिक्षक म्हणजे संस्कारदीप वाटतात. त्यांच्या लेखी विद्यार्थी म्हणजे पंडीत नेहरूंच्याच शब्दात सांगायचं झालं तर 'Child is father of Man' ही तीन सूत्र घेऊन लिहिलेलं .......' हे पुस्तक म्हणजे आपल्या रोजच्या परिपाठीच्या कामातून आलेल्या अविस्मरणीय अनुभवांचं शब्दांकन ते केलं आहे. दिगंबर टिपुगडे यांनी संपतराव गायकवाड यांच्याकडे सचोटी, संवेदनशीलता व कर्तव्यपरायणता असल्याने त्यांना लहान प्रसंगातून महान संस्कार, विचार दिसतो.

 या पुस्तकातील ५० पानात पस्तीस एक प्रसंगांचं वर्णन आहे. सारे प्रसंग घटना प्राथमिक, माध्यमिक शाळेतील. प्रसंगातील नायक आहेत शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी. गौण पात्रे आहेत शिक्षक, पालक, प्रसंगाची रचना व मांडणी ‘लेकी बोले, सुने लागे' अशी आहे. त्यामुळे पुस्तकात विद्यार्थ्यांचे चित्रण असलं तरी शिकवण मात्र शिक्षक, पालकांसाठी आहे. त्यामुळे हे पुस्तक संपतराव गायकवाड यांनी शिक्षक, पालकांसाठी लिहिले आहे, हे स्पष्ट. सदर पुस्तक शिक्षक वाचून, विचार करतील, तर त्यांना विद्याथ्र्यांकडे पाहण्याची एक संवेदनशील दृष्टी मिळेल. पालक वाचतील तर आपल्या पाल्यांकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच असतं, याची जाणीव होईल.

 ‘शाळा तपासणी' हे वार्षिक कर्मकांड नसून स्वयंमूल्यमापनाची वार्षिक पर्वणी होय, असा वस्तुपाठ देणारे हे लेखन आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी किती परम आदर असतो याचं चित्रण हे पुस्तक करतं. शाळेत पादत्राणे बाहेर काढून वर्गात जायची शिस्त शिकवणारे शिक्षक, त्यांच्या लेखी शाळा म्हणजे पवित्र ज्ञानमंदिर. तिथे तपासणीला आलेले ‘साहेब’ बूट घालून वर्गात येतात म्हणून उत्तर न देता मौन निषेध नोंदवणारा विद्यार्थी मला महात्मा गांधींचा सच्चा सत्याग्रही वाटतो. आपल्या भावाला फोडणीचा भात आवडतो म्हणून स्वतः उपाशी राहून भावासाठी डबा नेणारी सुमन मला गीतेचा ‘तेन त्येक्तेन भुजितः' (अगोदर त्याग आणि नंतर भोग!) संदेश आचरणारी संस्कारी अनुकरणीय, आदर्श बहीण वाटत राहते. वर्गात शिक्षक शिकवित असताना कॅन्सरग्रस्त आईच्या सांगाव्याची वाट पाहणारा यातील मुलगा मला कायम खिडकीबाहेर पाहणा-या चिमुरड्या

‘तोत्तोचान'चं स्मरण देतो. या नि अशा अनेक प्रसंगातून हे पुस्तक शिक्षकांच्या घाण्याच्या बैलाच्या मळलेल्या वाटेचे सामाजिक वक्रीभवन करते नि पालकांच्या अहंकारी भूमिकेचे पृथक्करण! हीच या पुस्तकाची कमाई नि मिळकत .

 हे पुस्तक मला एक गोष्ट न सांगता शिकवते, ती म्हणजे वर्तमान शिक्षण व्यवस्था. आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत महत्त्व कुणाचे? तर ते शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकाचे. जो शिकवत नाही त्याला शिकवण्याचा काय अधिकार असा एक अव्यक्त प्रश्न या पुस्तकाच्या पानापानातून उमटतो असं मला जाणवलं. शिक्षणाधिकारी ‘साहेब' होणं आपल्या शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका आहे. तो मित्र, मार्गदर्शक, मदतनीस न होता प्रश्नकर्ता होतो, त्यामुळे शिक्षणात गुणवत्तावर्धन होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शाळेची तपासणी म्हणजे शिक्षण, अध्ययन, अध्यापनाचे मूल्यमापन (Evaluation) न होता साहेबांच्या बडदास्तीचं श्रेणीकरण (Gradetion) होऊन गेलं आहे. तपासणीची पूर्वतयारी मुख्याध्यापक करतात म्हणजे काय करतात? तर चहा, चिवडा, केळी, पेट्रोल, पाकिटांचा इंतजाम. ही गोष्ट आता काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे तपासणी पूर्ण झाल्यावर शिक्षणाधिकारी शिक्षकांना जे मार्गदर्शन करतात, जे शेरे लिहितात, जे अहवाल बनवतात, आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या ज्या शिफारसी करतात, त्याला नैतिक अधिष्ठान न राहिल्याने एक व्यर्थ कर्मकांड' किंवा 'निष्फळ कर्म' किंवा 'अनाठायी वाचाळता' असे त्याचे ओंगळ स्वरूप होऊन गेले आहे. सदर पुस्तक या सर्व भ्रष्ट व्यवस्थेवर क्ष किरण असून ती एक मूक समीक्षा होय. म्हणून मला या पुस्तकाचे शैक्षणिक मोल मुलखावेगळे वाटते. सेवांतर्गत प्रशिक्षण, सेवापूर्व प्रशिक्षणात शिक्षकाची घडण हा महत्त्वाचा गाभा घटक असतो. त्यासाठी हे पुस्तक पाठ्यपुस्तकाचे काम करते अशी वाचनानंतर झालेली माझी खात्री हेच या पुस्तकाचे यश होय. ‘मौन' सर्वांत बोलके शस्त्र असते. त्याचा संयमित वापर करू तर त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा ठरतो. हा अनुभव पाहता हे पुस्तक सर्व शिक्षक, पालकांनी असीम आस्थेने वाचून, रिचवून आचरले तर ती एकविसाव्या शतकातील संवेदी व मनुष्यकेंद्री शिक्षणाची पहाट ठरेल.

 जीवनात साच्याच बिया काही खडकावर पडत नसतात. एखादं बी सांदी कोप-यांत रुजतं. त्याचे रोप होतं. रोपाचा वृक्ष, वटवृक्ष होतो, हा आशावाद शिक्षण विकासाचे बलस्थान आहे. या प्रसंगातील अनेक शिक्षक मला अंधारातील कवडसे वाटले. भारतातला बहुसंख्य विद्यार्थी-पालक

रंजला, गांजलेला आहे. शिक्षकांचे त्यांच्या प्रती एक बांधील कर्तव्य आहे याची जाणीव देणारे पुस्तक नव्या काळातील शिक्षकांना समुपदेशक बनवील. तसे झाले तर आजचे शिक्षण अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया न राहता माणूस घडणीचा खटाटोप बनेल. तो तसा बनावा म्हणून संपतराव गायकवाडांनी सेवा-निवृत्त होताना हे चिंतन शिक्षण समाजापुढे मांडले आहे. त्यामागे मर्यादा व आव्हानांचे भान आहे. शासकीय सेवेत असताना यंत्रणा, व्यवस्थेची एक सक्तीची शिस्त असते. ती मोडली तर तो अधिकारी, कर्मचारी दंड, शिक्षेस पात्र ठरतो. पण त्यापेक्षा तो कावळ्यांच्या शाळेतला अस्पर्शित (खरे तर बहिष्कृत, उपेक्षापात्र) ठरतो. हे माहीत असल्याने त्यांनी हे लेखन सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येस प्रकाशित करण्याचे योजलेले दिसते. यातही शिस्तपालन, कर्तव्यपालन असा अनुकरणीय वस्तुपाठ आहे.

 संपतराव गायकवाड यांच्या या लेखनाचा वसा नि वारसा, कित्ता, धडा भविष्यकालीन शिक्षण अधिकारी, शिक्षक, पालक गिरवतील तर उद्याचे शिखण कायाकल्प होऊन अवतरेल. क्रांतीचे पाय सैतानाचे असतात. पण उत्क्रांतीच्या पाऊलखुणा शांत सीतेची न मिटणारी पावले असतात, हे सांगणारे लेखन केल्याबद्दल संपतरावांचे अभिनंदन! त्यांना उत्तम आयुष्य, आरोग्य लाभो ही सदिच्छा!


◼◼


दि. ३0 जून, २०१५ ________________


पोलीस पाटील (कथासंग्रह)
तानाजी कुरळे
अक्षरवेध प्रकाशन, गडहिंग्लज जि. कोल्हापूर
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१५
पृष्ठे - ११८ किंमत - १५0/

_________________________________________________

समाजाच्या मंगल बदलाचे स्वप्न रंगवणाच्या कथा

 पोलीस पाटील' हा तानाजी कुरळे यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. यात त्यांनी लिहिलेल्या बारा कथा संग्रहित आहेत. प्रत्येक कथेचा नायक पोलीस पाटील आहे. त्यामुळे संग्रहातील सर्व कथा त्या पदाभोवती फिरत राहतात. असे अजाणतेपणी घडलेले नाही. कथाकार तानाजी कुरळे यांना मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षे ओळखतो. त्यांनी मनोगत मध्ये स्पष्ट केल्यानुसार त्यांच्यावर महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृती समाजसुधारकांच्या विचार व कार्याचा प्रभाव आणि संस्कार आहे. विशेषतः राजर्षी शाहू महाराज आणि बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी आपापल्या संस्थानात केलेले पुरोगामी कार्य, कानून यांच्याबद्दल कुरळे यांच्यामध्ये आपल्या संस्थानात ‘गाव कामगार पाटील स्कूल' सुरू केले होते. दिल्ली दरबार पाटील शाळा' म्हणून तत्कालीन ग्रामीण जनतेस ओळखली जायची. या शाळेत गावकामगार पाटील या पदावर नेमल्या गेलेल्या हुद्देदारांचे प्रशिक्षण होत असे. गाव कामगार पाटील हा गेल्या शतकातला प्रशासन व्यवस्थेतील कायदा व सुरक्षा राखणारा, त्याची अंमलबजावणी करणारा म्हटले तर पहिला नाही म्हटले तर शेवटचा घटक होय. सामान्य प्रजेचा राजाशी संबंध प्रसंगपरत्वे येण्याच्या काळात गावकामगार पाटील हरघडी मदतीला उभा राहायचा. तो

प्रशस्ती/१८२

तसा उभा राहावा अशी राजाची अपेक्षा असायची. अशा परंपरेत कार्य केलेल्या वसा नि वारसा घेऊन तानाजी कुरळे यांना गाव कामगार पाटील व्हावे वाटले व तसे ते झाले. माणूस एखादं स्वप्न घेऊन एखाद्या व्यवसायात येतो खरा. पण तिथल्या बजबजपुरीने तो खंतावतो. कुरळे हे पुरोगामी चळवळीतील भूमिगत कार्यकर्ते. ते कार्य करतात पण मिरवत नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन, समता परिषद, विज्ञान प्रबोधिनी अशा उपक्रमातून त्यांचा कार्यकर्ता घडला आहे.

 ‘पोलीस पाटील' कथासंग्रहातील पहिली कथा ‘भुताचा बाप' वाचताना लेखकावरील अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा प्रभाव स्पष्ट होतो. मुंबईच्या बकाल चाळीतील सार्वजनिक संडासात भूत असल्याच्या आवईने सारी चाळ बेजार असते. पण कथानायक गुणाजी गायकवाड आपल्या निरीक्षणातून लोकांना होणारा भास भूत नसून तो भ्रम आहे. पालीमुळे लोंबकळणारा दिवा कसा हलतो, त्यामुळे सावली कशी हलते-डोलते, लोकांना त्याचे भय कसे वाटते, हे कथाकार स्पष्ट करतो. तसेच संडासात येणारा खर्रऽऽ खर्रऽऽ आवाज कोब्या खालच्या वाळूचा कसा आहे, घूस घर कशी करते या निरीक्षणातून चाळकरींना भूतबाधेतून मुक्ती कशी देतो याचं साद्यंत विवेचन करणारी ही कथा. कथाकाराने अशा कथेस आवश्यक भय व जिज्ञासा दोन्हीच्या निर्मितीने गूढकथा बनवली आहे. अंधार चाळीचा नि अज्ञानाचा तो तर्क व ज्ञानाने दूर करून अंधश्रद्धेचा, भुताचा केलेला । पर्दाफाश नायकास ‘भुताचा बाप' बनवतो.

 संग्रहातील ‘शीळ' कथा हेरकथेला शोभणारी आहे. खेड्यात पडलेल्या एका दरोड्याचा शोध नुकतीच पोलीस पाटील बनलेली ज्योती चांदणे कशी लावते, तिला पोलीस इन्स्पेक्टर झालेली उषा थोरात कशी मदत करते, याची ही कथा. या कथेत पुरुषी सत्ता असलेल्या पारंपरिक पोलीस व्यवस्थेत व एकूणच प्रशासनात महिलाराज कसे आले आहे, ते लेखकाने खुबीने रेखाटले आहे. बिराप्पा धनगराची गिरफ्तारी हे या कथेतलं खरं नाट्य. ते लेखकाने कमालीच्या शिताफीने रंगवलं आहे. नायिकाप्रधान ही कथा ‘शीळ'द्वारे दरोडेखोराच्या तपासाची कथा. ती तपासाचे बारकावे । चित्रित करून कथाकाराने आपले वर्णन कौशल्य पणाला लावले आहे. आरोपींना जेरबंद करण्याचा प्रसंग सिनेमाला शोभणारा. एकंदरच ही कथा पोलीस तपासाच्या अंगाने रोचक बनवली आहे.

 ‘मान’, ‘दाखला', 'पोलीस पाटील' या कथा संग्रहापूर्वी स्थानिक दैनिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. 'मान' कथेमागे पर्यावरण संरक्षणाचं

भान आहे. 'दाखला' कथा सामाजिक प्रश्न म्हणून विचार करायला लावणारी आहे. चंद्राबाई यादवी विधवा युवती. तिला निराधार निवृत्ती वेतनासाठी दाखल्याची गरज असते. सरपंच तिच्या नाडलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. पण ती त्यातून स्वतःला वाचवते. पोलीस पाटील असलेले राम कुंभार. तिचा पुनर्विवाह आपले स्नेही शाम साळुखे यांचेशी घडवून आणतात. अशी ही सुखान्त आदर्शवादी कथा. पोलीस पाटील कथेद्वारे दारूच्या व्यसनाधीनतेचे चित्रण करून भुताचे सोंग घेणारा भैराप्पा त्याच्या वस्त्रहरणाची ही कथाही बोधकथा बनून राहाते. बाळू वडर' कथा जातीयतेला छेद देत समता स्थापन करणारी अशीच कथा आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'.

 संग्रहातील अन्य कथाही याच पठडीतल्या. त्या सर्व वाचत असताना कथाकाराचा आदर्शवाद लपून राहात नाही. तानाजी कुरळे कथाकार म्हणून नि कार्यकर्ते म्हणूनही भाबडे आहेत. जग मंगल व्हावे ही त्यांची आंतरिक ऊर्मी आहे. सदाचाराच्या ऊर्जेवर जगणारा हा कथाकार. त्याला जगातलं वैर, दुष्टावा, फसवणूक, अंधश्रद्धा, अज्ञान, विषमता दूर व्हावी असं वाटणं स्वाभाविक आहे. ती त्यांची पोटतिडीक आहे. सभ्य माणसं सज्जनतेचा घोषा लावतात म्हणून समाज सरासरीने शिष्ट, नैतिक राहतो. हीच कथा बोधपर कथांची मिळकत नि सामाजिक योगदानही! त्यांनी हे चांगुलपण व त्यावरील श्रद्धा अटळ ठेवावी. उशिरा का असेना, उजाडेल अशा आशावाद जागवणाच्या या कथा गावच्या पालक पदाधिकारी मंडळींना त्यांच्या जबाबदारीचे भान जसे देतात तशाच त्या सामान्य नागरिक म्हणून वाचकात कर्तव्य भाव रुजवतात. हे उभयपक्षी महन्मंगल सीमोल्लंघन प्रत्यक्षात घडेल तर महात्मा गांधींच्या स्वप्नातील रामराज्य अवतरेल! लेखनास शुभेच्छा !


◼◼

दि. २४ नोव्हेंबर, २०१५ ________________


मुली दुर्मीळ झाल्या हो (कथासंग्रह)
बाबूराव शिरसाट
प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - मार्च, २०१६
पृष्ठे - १०४ किंमत - १२0/

______________________________________________

स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा समाज जागर घडविणाच्या कथा


 ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' हा वर्तमान समाजाचा आकांत आहे. माणसाच्या विकासात शिक्षण नेहमीच विधायक भूमिका वठवत राहते असे नाही. मिळालेल्या बुद्धी नि शिक्षणाचा माणूस कधी कधी गैरवापर करतो किंवा स्वार्थ, अदूरदर्शितेमुळे चुकीच्या निर्णयास कारणीभूत होतो. वर्तमान भारताची जनगणना आपणास सांगते आहे की देशातील स्त्री-पुरुष जन्मप्रमाण विषम होत चालते आहे. पुरुषांच्या तुलनेने स्त्री जन्मप्रमाण कमी होते आहे. कारण काय तर समाजाचा स्त्रीविषयक अनुदार दृष्टिकोण. परंपरेने भारतात स्त्रीस दुय्यम स्थान मिळत आले आहे. पूर्वी तिला घरी, दारी, समाजात कुठेही मानाचे स्थान नव्हते. तिला अधिकार, हक्क नव्हते. ती पुरुषाची सोबतीण, सावली होती. भोग्या इतकेच तिचे स्थान. पण समाजात शिक्षण, देशाटन, उद्योग, व्यापार, देवाणघेवाण इ. मुळे बदल होत जाऊन स्त्रीला मन असते, भावना असतात. तिला अधिकार असतात. ती विचार व निर्णय करू शकते हे समाजसुधारकांनी विविध समाज विज्ञानाच्या प्रगती आधारे दाखवून दिले व स्त्रीशिक्षणास गती आली. स्त्री शिक्षित, कमावती झाली पण समाजाच्या पुरुषी मानसिकतेत बदल न झाल्याने स्त्री विषयक समाजधारणेत म्हणावा तितका बदल झाला नाही.
 याचे मूळ होते समाज प्रचलित विवाह पद्धतीत मुलीच्या लग्नास हुंडा

प्रशस्ती/१८५

द्यावा लागण्याच्या प्रथेचा बळी मुली ठरल्या. विज्ञान प्राप्त गर्भनिदान सुविधा खरं तर अपंग बाळ जन्मू नये म्हणून तिचा वापर व्हायचा. हुशार माणसाने या शोध-सुविधेचा गैरवापर लिंग निदानार्थ करण्यास प्रारंभ केला. स्त्री-भ्रूण हत्या हे हुंडाबळीचे अपत्य होय. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येने स्त्रीपुरुष प्रमाण विषम होत गेले. ही असमानता माणसाच्या अस्तित्वाच्या मुळावर आघात करती झाली व समाज जागा झाला. गर्भनिदान बंदी, गर्भपात बंदी कायदे झाले. पण लोक जागृती होत नव्हती. म्हणून साहित्य, प्रबोधन, प्रचार, प्रसार अशी चतुःसूत्री धरून शासनाने कार्य आरंभिले. सार्क बालिका वर्षाच्या निमित्ताने स्त्रीविषयक प्रश्नांच्या जागृतीस महत्त्व आले. मुलगी दुर्मीळ होण्याचे दुष्परिणाम समाजास जाणवू लागले. त्याविषयी प्रबोधनास गती आली. प्रबोधन साहित्याची गरज भासू लागली. त्याचे अपत्य म्हणजे 'मुलगी दुर्मीळ झाली हो' हा कथासंग्रह।

  हा कथासंग्रह माझे स्नेही व विख्यात बाल साहित्यिक बाबूराव शिरसाट यांनी संपादित केला आहे. या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती सहा महिन्यात प्रकाशित होते आहे, ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी यापूर्वी याच विषयावर ‘एक कळी उमलताना...' पुस्तक लिहून आपले स्त्री दाक्षिण्य सिद्ध केले होते. तसे शिरसाट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्य करत होते. पण ते संवेदनशील साहित्यिक असल्याने समाजाप्रती त्यांच्या मनात एक प्रकारची कणव नि कळकळ सतत भरलेली मी अनुभवली आहे. बाबूराव शिरसाट यांनी संपादित केलेला ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' हा कथासंग्रह दहा कथाकारांच्या रचनांनी आकारला आहे. इंग्रजीत ज्याला 'Theme Based Story' वा मराठीत बोधकथा म्हटल्या जातात, तशा या कथा. म्हटल्यातून हेतुपूर्वक लिहिलेल्या. अशा कथांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असते. त्या सहेतुक लिहिलेल्या असतात. त्यांचे लक्ष्य निश्चित असते. ज्याला एखाद्या गोष्टीचा प्रचार, प्रसार, प्रबोधन करायचे असते, असा लेखकच सहेतुक लिहितो. गेल्या शतकाच्या मध्यास विशेषतः दुस-या महायुद्धाच्या आगेमागे असे प्रचारकी साहित्य मोठ्या प्रमाणात उदयाला आले होते. ते बहुतांशी राजकीय होते.

 ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' कथासंग्रहातील कथांचे ब्रीद आहे. स्त्रीभ्रूण हत्या'! त्या रोखायच्या, जनसंख्येत मुलींचे प्रमाण वाढेल असे पाहायचे. लिंगभेद संपवून स्त्री-पुरुष समान असा भाव समाजात रुजवायचा. स्त्रीस माणूस म्हणून जन्माला घालायचे, जगवायचे, वाढवायचे, शिकवायचे,

स्वावलंबी नि स्वाभिमानी बनवून सन्मानित करायचे. या धाग्याने या कथासंग्रहातील कथाकारांनी सामाजिक बांधिलकीच्या भावना नि नात्याने हे लेखन केले आहे. या कथांचा वाचक लक्ष्य गट ग्रामीण समाज आहे. शहरात स्त्री-पुरुष समानता रुजली. खेड्यात बाकी आहे. लोकांना लोकांच्या । भाषेत लिहिले, बोलले की उमजते, समजते हे लक्षात घेऊन या कथांची भाषा, पात्रे, प्रसंग, संवाद, पर्यावरण ग्रामीण ठेवल्याने त्या प्रभावी झाल्या आहेत.
 ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' संग्रहाची सुरुवात बाबूराव शिरसाट यांनी लिहिली आहे. या कथेत मुलगी दुर्मीळ झाल्याने मांडवातून वधूला पळवून नेण्याचा घाट घातला आहे. या प्रसंगाने कथाकाराने मुलींचे दुर्मीळपण अधोरेखित केले आहे. संग्रहातील त्यांची दुसरी कथा आहे ‘डॉक्टरांशी संवाद'. कथेत पैशासाठी स्त्री भ्रूण हत्या करणा-या डॉक्टरांबद्दल नाराजी आहे. ती स्वाभाविकच म्हणायला हवी. सन १९८८ च्या भ्रूण हत्या बंदी आणि नंतरच्या गर्भपात, गर्भनिदान बंदीमुळे (१९९४) महाराष्ट्र राज्य पुरोगामी झाले. या कथेस कायदा साक्षरता व प्रचार, प्रसाराची पार्श्वभूमी आहे. जगात चांगल्या गोष्टीचा पण प्रचार करावा लागतो, यासारखे दुर्दैव ते कोणते?

 या संग्रहात दोन-दोन कथा लिहिणारे आणखी काही कथाकार आहेत. पैकी एक आहेत ज्येष्ठ बाल साहित्यिक रजनी हिरळीकर. त्यांच्या लेखनाला समाज शिक्षकाच्या संस्कारशील शैलीचा स्पर्श आहे. त्या सांगत नाहीत, समजावतात. समुपदेशक ज्याप्रमाणे प्रश्नाची उकल हळुवारपणे करत गुंता सोडतो, तशा त्या लिहितात. यात विमलचा प्रसंग आहे. मुलगी झाली तर नवरा आपणाला सोडेल या भीतीत जीव मुठीत घेऊन जगणारी. अशा शेकडो विमला घरोघरी गुदमरत जगताहेत. कथेत लाडू, पेढे, जिलेबीच्या रूपाने समाज मनात पसरलेला लिंगभाव लेखिकेने सूचकपणे वर्णिला आहे. ‘निर्मलाचा लढा' कथेतील निर्मला तिची चाळिशी उलटली तरी तिला मूल-बाळ होत नाही. ती उकिरड्यात टाकलेल्या बाळाला, मुलीला ‘भाग्यश्री बनवते. या सर्वच कथांमधून एक सकारात्मकता, आदर्शवाद, विधायकता । जोपासली गेली आहे. व्यक्तिगत दुःखाचं उन्नयन करत सामाजिक दायित्व आपण निभावत गेलो की सामाजिक प्रश्न सुटायला मदत होत राहते. या कथांचे मोठे समाजमूल्य, जीवनमूल्य आहे. 'नकोशी' मुलगी हवीशी' करणे यासारखी समाज ऋणाची उतराई दुसरी कोणती असणार? वात्सल्य सदनात मुली वाढण्यापेक्षा प्रत्येक घर वात्सल्यसदन होईल, प्रत्येक स्त्री

निर्मलासारखी भेदरहित निर्मल होईल तरच स्त्रीचं ‘निर्माल्य’ होणं थांबणार ना? |
 सरोज चौगुले यांच्या दोन कथा सदर संग्रहात आहेत. परिमार्जन आणि ‘रुसवा फळाला आला' नावांनी चितारलेल्या या कथांपैकी ‘परिमार्जन कथेतील अमृता सुशिक्षित शिक्षिका आहे. पदरी मुलगी आहे. पाठोपाठ दोन मुली होतात म्हणून सुशिक्षित नवरा सोडचिठ्ठी देतो. अमृता जिद्दी. मुलींना शिकवते. नावलौकिक मिळवते. नव-याला पश्चात्ताप होतो. कथेच्या शेवटी चुकला पीर मशिदीत' तसा अमृताच्या स्त्रीभ्रूण हत्या विरोध अभियान' मध्ये सक्रिय होतो. पुरुष मानसिकता स्वावलंबन व स्वाभिमानाने बदलणारी अमृता नव्या युगाची दुर्गाच नाही का? ‘रुसवा फळाला आला'मध्ये शासनाने मुलींच्या विकासाच्या योजनांची पार्श्वभूमी आहे. ही कथा शासन योजनांविषयी सकारात्मक भावजागर व भावसाक्षरता रुजवणारी म्हणून उल्लेखनीय ठरते.

 संजय खोचारेंची ‘शेजारणीची लेक' कथा अस्सल ग्रामीण कथेचा साज-बाज घेऊन अवतरली आहे. राम मेस्त्रींची ‘जननी' विचारगर्भ कथा होय. ‘अनामिक भीती' ही भैरवनाथ डवरी यांची कथा स्त्री मनावर असलेला मुलीच्या जन्माचा ताण स्पष्ट करते. कथेस मानसशास्त्रीय बैठक आहे. कथेतील सासरच्याचे हृदय परिवर्तन व राधेची तणाव मुक्ती म्हणजे पुरुषी मानसिकता बदल व स्त्री सन्मानाचे सकारात्मक द्वंद्वच! प्रा. हेमा गंगातीरकरांनी स्वागत कन्या जन्माचे' मधून कमळा नि सून या पात्रद्वयातून ‘सुनेला माया देणे, मुलाचा हट्ट सोडणे इ. विचार स्पष्ट झाले आहेत. यातील सरिताची भूमिका परिवर्तकाची ठरते. अनंत चौगले लिखित । ‘खजिना'कथा स्त्री-पुरुष लिंगाधारित जन्माची वैज्ञानिक उकल करणारी म्हणून महत्त्वाची ठरते. स्त्री जन्मास पुरुषच जबाबदार असल्याची ही कथा जाणीव जागृती करते. अज्ञान दूर करणारे लेखन म्हणून या कथेचे वेगळेपण आहे. प्रियांका कांबळे यांनी आपली कथानायिका लग्नाच्या बोहल्यावरून पळून जाऊन जिल्हाधिकारी बनून ज्या नाट्यमयरित्या गावी येते त्यातून शिक्षण हे स्त्री विकासाचे खरे साधन होय, याची प्रचिती देते. प्रत्येक कथाकारांनी आपापल्या शैलीने स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध समाज जागर घडवून आणला आहे.

 बाबूराव शिरसाट यांनी ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' असा हकारा घालत केलेले कथांचे संपादन एक सामाजिक जाणीव होय. ती मध्ये स्त्रियांविषयीचा कळवळा आहे. त्यात गळाकाढूपणा नाही. असेलच तर सामाजिक ऋणातून

मुक्तीची धडपड. ती यशस्वी होण्याचा आलेला योग. तो कपिला षष्ठीचा योग नाही. एकविसावे शतक हे सुशिक्षित-अशिक्षित, नागरी-ग्रामीण, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष सर्वांसाठी प्रबोधन पर्व आहे. ते समाजास प्रगल्भतेकडे नेणारे आहे. हा कथासंग्रह मुखपृष्ठापासूनच वाचकाची पकड घेतो. कथा आशय संपन्न आहेत. त्यात विषय, पात्र, प्रसंग, विचार वैविध्य आहे. या वैविध्यामुळेच त्या सर्व वाचनीय ठरल्या आहेत. सोनोग्राफीच्या युगात लिंग निदान वरदान न ठरता शाप व्हावा, हे शिक्षित समाजाने ज्ञान व साधनांच्या अविवेकी वापरातून ओढवून घेतलेल्या सामाजिक अरिष्ट्राचा लेखाजोखा होय. “देर आये, दुरुस्त आये' अशी हिंदीत म्हण आहे. उशिरा का असेना शहाणपण येणं, ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा' यातून येणारं समाज शिक्षण म्हणजे खरा समाज विकास, तो या कथातून घडून येतो. या सर्व कथा वाचकांनी कर्तव्य भावनेनी वाचून समाज जागर घडवून आणावा. तर उद्याचं जग सुंदर होईल.

 शुभेच्छा !


◼◼

दि. ५ ऑगस्ट, २०१६ ________________

वास्तुपर्छ। वास्तुपर्व (सौंदर्यशास्त्र)
मोहन वायचळ
सौ. रंजना वायचळ, कोल्हापूर
प्रकाशन - मे, २०१७
पृष्ठे - २६२ किंमत - ६00/

__________________________________

वास्तुशिल्पविद्येचा आस्वादक अध्याय

 कोल्हापुरातील प्रसिद्ध वास्तुशिल्पी मोहन वायचळ यांचे पुस्तक ‘वास्तुपर्व' हे वास्तुशास्त्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्य असा त्रिकालिक वेध घेणारे म्हणून महत्त्वाचे दस्तऐवज होय. सदर ग्रंथाची रचना करताना लेखकानेच उपशीर्षकाद्वारे घोषित केल्यानुसार ग्रंथातील मजकूर, आशय आणि विषयाचा तो छेद, भेद आणि वेध आहे. छेदातून अंतरंगाचा प्रत्यय । येतो, भेदातून तुलना शक्य होते आणि वेधातून भविष्य लक्ष्यित केले जाते. सदर ग्रंथाच्या भूमिकेमधून पाश्चिमात्य वास्तुशिल्पींनी भारतीय वास्तुशिल्पशास्त्रात केलेल्या हस्तक्षेप नि आक्रमणाबद्दल नाराजीचा सूर आळवला आहे. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर फिरविताना लक्षात येते । की ग्रंथात लेखकाने वास्तुशिल्पशास्त्राच्या विविध अंगांना स्पर्श करण्याच्या दृष्टीने आपल्या लेखनाचे अष्टपैलू विभाजन केले आहे. खरे तर या पुस्तकातील विविध विषयांचे लेखन दीर्घकाळ चाललेले दिसते. हे लेखन प्रसंगोपात झाले असले तरी प्रासंगिक अथवा क्षणिक महत्त्वाचे ठरत नाही. परंतु कालौघातील गरज वैविध्यामुळे जे विषय वैविध्य निर्माण झाले त्यास ग्रंथरूप देताना वर्गवारी करणे अनिवार्य झाल्याने ग्रंथ मजकूर (अ) स्थापत्यकला व वास्तुसंस्कृती (ब) आंतरराष्ट्रीय वास्तुरचना व ऊहापोह (क) कोल्हापूर वास्तुकलेचा मागोवा (ड) स्मार्टसिटी : संकल्पातून

प्रशस्ती/१९०

सिद्धीकडे (इ) ल कर्बुजीए (फ) स्वनिर्मिती (ग) व्यक्तिचित्रण (ह) इंग्रजी भाषांतर अशा आठ भागात विभागणे भाग पडले. या वैविध्यातूनही मजकूरविषयक आशय भिन्नता लक्षात येते. ते ग्रंथाचे एका अर्थाने वैभव वैचित्र्य होय. यातून ग्रंथास आपसूक एक शिल्पवैभव प्राप्त झाले असून ते अष्टकोनी झाल्याने अष्टपैलू ठरले आहे.

 “वास्तुपर्व' वाचताना प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लेखक म्हणून वास्तुशिल्पी मोहन वायचळ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना इतिहास, पुराण, परंपरा, कला, संस्कृतीची चांगली जाण आहे. स्थापत्यशास्त्र केवळ उभ्या आडव्या रेषांचे रेखाटन नाही. ती एक कलात्मक निर्मिती असल्याने आणि त्या निर्मितीचा संबंध मानवी जीवनाशी असल्याने संकल्पित वास्तू एखाद्या शिल्पासारखी हृद्य, संवेदी, सौंदर्यपूर्ण, आस्वादक, रसपूर्ण, रंगवैविध्य ल्यालेली शिवाय तिचं शरीरीरूप निसर्गासारखं नेत्रदीपकही हवं याचं त्यांना भान आहे. त्यामुळे त्यांचं लेखन तांत्रिक असलं तरी वरील जाणिवांतून झाल्याने ते वाचकांना एका नव्या जगात घेऊन जातं. वास्तुकलाविद म्हणून मोहन वायचळ स्थानिक असले तरी आपल्या क्षेत्राच्या विस्तारलेल्या वैश्विक क्षितिजाचा त्यांचा व्यासंग या लेखनास सार्वकालिक आणि सार्वत्रिक बनवतो. वास्तुविद्या पौर्वात्य आहे नि पाश्चात्त्यही! जगभरातील प्रभाव पाश्चात्त्य शैलीकडे झुकणारा आहे म्हणून ग्रंथातील समग्र लेखनात लेखक नवनवे मराठी शब्द योजतो व त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाकडे लक्ष वेधण्यासाठी कंसात इंग्रजी शब्द पुरवून आपले म्हणणे सर्वदूर पोहोचवतो.

 ‘वास्तुपर्व'चे लेखन सध्या प्रचलित झालेल्या वास्तुशास्त्राशी नाही, जे माणसास अंधश्रद्धेकडे घेऊन जाते. लेखनाची सारी बैठक वैज्ञानिक आहे शिवाय ती पुरोगामी आहे. वास्तुशिल्पशास्त्र हे एकाच वेळी विज्ञान, कला, काव्य, निसर्ग, संगीत, रंग, रस, आकारासह अव्यक्त व अलौकिक आनंदाचा नित्य शोध असल्याने त्यात कालानुषंगिक बदल, परिवर्तन न। उतरता ते आल्हादक असायला हवे. घर, कार्यालय, नगर, रस्ते, पूल, सार्वजनिक स्थळे सर्वत्र माणूस अल्पकालिक वा दीर्घकालीन रहिवास, विश्रांती, विरंगुळा, साधना करताना ती प्रत्येकाच्या गरजांना उतरणार नाही परंतु ‘अधिकस्य अधिकं फलम्' न्यायाने बहुसंख्याकांच्या समाधानास उतरली पाहिजे, हा वास्तुशिल्पी म्हणून मोहन वायचळांचा समग्र लेखनातून पाझरणारा दृष्टिकोण व्यापक व उदारमतवादीच म्हणायला हवा. पूर्वग्रहमुक्त लेखन म्हणूनही या ग्रंथाचे महत्त्व आहे. सारे लेखन इतिहास, परंपरेच्या

पार्श्वभूमीवर झालेले असल्याने भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानाची चिकित्सा व भविष्यवेध असे त्याचे प्रागतिक रूपडे बनून गेले आहे.

 मोहन वायचळ यांनी सदर ग्रंथाच्या प्रारंभी प्रास्ताविक म्हणून लिहिलेला मजकूर वाचताना लक्षात येते की ते वास्तुकडे निर्जीव निर्मिती न मानता कलात्मक आविष्कार म्हणून पाहतात. वास्तूनिर्मितीचे घटक दगड, माती, सिमेंट, लाकूड, लोखंड निर्जीव असले तरी वास्तुशिल्पी त्यातून इमारत, रस्ते, पूल यांना आकार, प्रकारांचे जे घाट, वक्रता, त्रिमितिक रूप प्रदान करतो त्यातून जे शिल्प साकारते ते मनोहारी, ललित, विस्मयकारी असते. जगभर फिरताना मी जुन्या, नव्या किल्ले, मंदिर, चर्च, मशिदी, इमारती, संग्रहालये, मनोरे पाहिले आहेत त्या त्या काळच्या वास्तुशिल्पींनी काळाला साजेशा रचना करत त्यावर आपली दृष्टीमुद्रा उठवली आहे. साध्या गुंफांची खुदाई पाहिली तरी आदिमानवात ही शिल्पकार दडलेला होता हे। त्या गुंफेच्या आकार, वळण, उंची, जमिनीचा घाट पाहताना लक्षात येते. गुंफेतील शिल्पे असो वा चित्रकारी सारं वास्तुशिल्पशास्त्रास धरून असल्याचं लक्षात येतं. अजिंठा, वेरूळही मी पाहिले आहे नि फ्रान्स, जपानमधील, मलेशियातील गुंफाही. सर्वत्र वायचळ चित्रांची समर्पक पेरणी करतात. त्यामुळे मजकूर दृश्य होतो. त्यास ‘चक्षुर्वे सत्यम्'चे रूप येऊन जाते. आर्य चाणक्य, ब्रह्मगुप्त, कणाद, भास्कराचार्य त्यांना माहीत आहेत. नील कर्बुजिए, चार्ल्स कोरिया, लॉरी बेकर, आयफेलही ते जाणतात.

 पुस्तकाचा पहिला भाग ‘वास्तु संस्कृती'स समर्पित करून त्यांनी कोल्हापूर परिसरातील पुरातन वास्तूचे सौंदर्य विशद केले आहे. यात नगारखाना, नवीन राजवाडा, टाऊन हॉल, महालक्ष्मी मंदिर, किंग एडवर्ड रुग्णालय, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, मौनी महाराज मठ त्यांनी चर्चिला आहे. कोल्हापूर रोमन काळापासून विश्व व्यापारी मार्गावरचे ठिकाण. त्यामुळे रेशीम मार्ग (सिल्क ट्रेड रोड) म्हणून ते पुरातन काळापासून जागतिक नकाशावर आहे. त्यामुळे इथे रोमन-ग्रीक संस्कृती, जैन संस्कृती, बुद्ध संस्कृती, इस्लाम संस्कृती, शिवशाही, आदिलशाही सातवाहन, बहामनी साम्राज्य सर्वांच्या कालगत पाऊलखुणा इथल्या वास्तूंवर आढळतात. शिल्पशैली सौंदर्य हेमाडपंथी तसेच आधुनिकही असा काळाचा विशाल पट मोहन वायचळ या ग्रंथातून उलगडत राहतात तेव्हा वाचक कल्पना, तर्काने थकून जातो आणि लेखकाच्या सव्यसाची व्यासंगाने चकितही होतो. लेखकास वास्तुशिल्प विद्येची सर्व अंगे माहीत आहेत. दगड, लाकूड, माती, शस्त्रे, अस्त्रे, शास्त्र, पुराण, इतिहास, सौंदर्यशास्त्र सर्वांगांनी

ते वास्तूचे अंतरंग सौंदर्य समजावतात. तेव्हा पर्यटनातील मार्गदर्शक (गाइड) आठवतो. ते ब्रिटिशांना फिरंगी म्हणतात, इंग्रजी प्रभावाला आंग्लाळलेले म्हणतात पण वर्तमान त्यावर उभा आहे, हे विसरतात. अगदी या ग्रंथातील ‘स्वनिर्मिती भागातील त्यांच्या वास्तू भारतीय की पाश्चात्त्य प्रभावी हे। कळायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज राहात नाही. पूर्व परंपरा नाकारून कधी ना नावे ठेवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध होत नसते, ते सिद्ध होते ते काळावर तुम्ही तुमची मुद्रा कशी उठवता. त्यावरूनच चाल्र्स कोरिया, ल। कर्बुजीएचे आकर्षण, भक्तीपण हेच सुचवते.

 एक वास्तुशिल्पविशारद म्हणून मोहन वायचळ यांना इजिप्त, तुर्कस्थान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. देशातील वास्तूंचे असलेले अप्रूप आंतरराष्ट्रीय वास्तुरचनेविषयी केलेल्या लेखनातून स्पष्ट होते. हा व यापुढील सारा भाग कमालीचा वाचनीय झाला आहे. पहिल्या भागात वायचळ तंत्रात घुटमळतात. पुढे ते आस्वादक होतात. ही आस्वादक लेखन शैली त्यांच्यातील कवी, कलाकार, शिल्पी व्यक्तिमत्त्वाची साक्ष होय. सांता सोफिया, फॉलिंग वॉटर हाऊस असो वा प्राचीन विदेशी शिल्पांचे स्थलांतर. मोहन वायचळ यांनी महालक्ष्मी मंदिर आणि इजिप्तचा अबू सिंबेल च्या किरणोत्सवाचे साम्य वर्जून आपले प्राचीन वास्तुशास्त्रही वैश्विक होते हे सिद्ध केले आहे. मोहन वायचळ हे कवी मनाचे वास्तुशिल्पी असल्याची खात्री त्यांच्या अबु सिंबेलच्या स्थलांतराप्रमाणे महालक्ष्मी मंदिराचे स्थलांतर शक्य असलेल्या स्वप्नातून स्पष्ट होते. जे इजिप्तला होते ते भारतात आजच्या घडीला मात्र अशक्य. कारण आपला प्रवास हा भौतिकाच्या मार्गावर सुसाट असला तरी बौद्धिक पातळीवर आपण अद्याप आध्यात्मिकच आहोत, पुरोगामी नाही. हे अनेकदा सिद्ध झालेली गोष्ट आहे. तरी धक्के मात्र द्यायलाच हवेत, ते । कल्पना स्वैर स्वातंत्र्य मोहन वायचळ यांनी घेतल्याचा मला आनंद आहे, ती त्यांची प्रागतिकता आहे. ही त्यांची प्रागतिकता मला ‘स्मार्ट सिटी संबंधातील लेखनातही प्रत्ययास आली. म्हणजे असे की प्राचीन काळात वस्ती व्हायची. पाणथळ जागेपेक्षा उंच ठिकाणी टेकडीवर. त्यामागे पूर, भूकंपापासून वाचण्याचा विचार होता. नवीन वस्ती पाणी पुरवठ्यासाठी पाण्याच्या पातळीपेक्षा खोल ठिकाणी हवी, जेणेकरून गुरुत्वाकर्षणाने विना ऊर्जा पाणी पुरवठा मलविसर्जन शक्य. असाच विचार ते नव्या वस्तीवरील सौर आच्छादनात मांडतात. त्यातून ते द्रष्टे (व्हिजनरी) वास्तुशिल्पी ठरतात.

 वास्तुविशारद म्हणून मोहन वायचळ यांचा प्राचीन वाङ्मय व्यासंग

सखोल असल्याची प्रचिती कोल्हापूर वास्तुकलेचा मागोवा' वाचताना येते. त्याचा वापर त्यांनी 'स्वनिर्मिती'मध्ये अनेक अंगांनी केला आहे. ‘व्यक्तिचित्रण' भागात त्यांनी एम्. एफ्. हुसेन, सुनील पाटील, शिरीष बेरी, यांचे केलेले चित्रण मोहक व आश्वासक आहेत. कॉम्रेड अतुल दिघे यांचा समाजशिल्पी यातून उलगडतो, वास्तुशिल्पीपण कळायला हवा होता. या पुस्तकाचा गाभा मराठी तर अन्य भाषिकांना कळावा म्हणून काही लेखांची इंग्रजी भाषांतरे पुस्तकाच्या शेवटी देऊन मोठे औचित्य साधले आहे. द्विरुक्ती असली तरी त्याची स्वतंत्र अशी उपयुक्तता आहे.

 ‘वास्तुपर्व' ग्रंथ मोहन वायचळ यांच्या वास्तुकलासंबंधी लेखनाचा पहिला वहिला ग्रंथ असला तरी तो लेखक म्हणून त्यांच्याकडून मोठ्या आशा, अपेक्षा करणारा, उंचावणारा ठरला आहे, तो त्यातील प्राचीन / अर्वाचीन, शास्त्र/कला, पौर्वात्य/पाश्चात्त्य अशा समन्वयामुळे. हे पुस्तक वास्तुकलेचे वर्णन नसून इतिहास, संस्कृती संदर्भातील वाचक भान आणि जाणिवा रुंदावण्याचा वस्तुपाठ होय. वास्तू केवळ निर्मिती नसून तो कलात्मक उद्गार असतो अशी आस्वादक भावना रुजवणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या मनात वास्तूकडे पाहण्याचा सौंदर्यशास्त्रीय संस्कार आहे. त्याबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि भविष्यातील अशाच अपेक्षित लेखनास शुभेच्छा!

◼◼

दि. २१ सप्टेंबर, २०१७
घटस्थापना
________________


संवाद मनाशी (वैचारिक)
डॉ. वासुदेव देशिंगकर अभिनंदन
प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन - मे, २०१६
पृष्ठे - १५२ किंमत - रु. २५0/

_____________________________________

मोहाच्या क्षणी विवेकाची कसोटी


 येशू ख्रिस्ताने लिहिलेल्या 'बायबल'चे एक सूत्रवाक्य आहे, 'Know thyself. स्वतःला जाणा. ही मोठी अवघड गोष्ट आहे खरी. पण तितकीच ती आवश्यक नि अनिवार्यही खरी! डॉ. वासुदेव देशिंगकरांनी लिहिलेले पुस्तक ‘संवाद मनाशी' याची प्रचिती देतं. मनुष्याच्या जीवनाचा उतार सुरू झाला की तो मागे वळून पाहू लागतो. गाडी उताराला लागली की शहाणा माणूस ब्रेकवर पाय ठेवतो. पण गाडी चढत चढत असते तेव्हाही खरं तर ब्रेकवर पाय ठेवण्याची गरज असते. अन्यथा, ती दरीत कोसळण्याची भीती नि शक्यता. पण माणूस त्यावेळी क्लचवर पाय ठेवून असतो. गाडी नि जीवन रेटत असताना जे ब्रेक सांभाळतात त्यांच्या जीवनाला उत्तरायणात झळाळी येते.
 लेखकाने आपल्या मनोगत' मध्ये स्पष्ट केल्यानुसार हे पुस्तक त्यांचं ‘अनुभव संचित' होय. पासष्ट वर्षांच्या गेल्या आयुष्यात त्यांनी कर सल्लागाराची भूमिका निभावली. अनेक संस्थात कार्य केलं. सिनेमासारख्या आळवावरचं पाणीही त्यांनी चाखलं आहे. जीवनाचे कृष्ण शुक्ल पक्ष पाहिलेला माणूस वानप्रस्थात संन्यस्त जरी झाला नसला तरी समाधिस्त होत असतो. जगापासून अलिप्त राहू लागला की त्याचा मनाशी संवाद सुरू होतं. हे पुस्तक त्या अवस्थेचं अपत्य होय. यात त्यांनी तीस लेखात मनात

प्रशस्ती/१९५

उठणारे तरंग, भाव, विचार शब्दबद्ध केले आहेत. लेखकाचं वाचन चांगलं.बुद्धी तल्लख. समयसूचकता दांडगी. दृष्टांताचा चपखल प्रयोग करण्याचं कौशल्य त्यांच्या लेखनात सर्वत्र आढळतं. या गुणांमुळे सदरचं पुस्तक वाचनीयच नाही तर मननीय ठरतं. एखादा धर्मग्रंथ श्रद्धाळू माणूस नित्य उशाशी ठेवतो, तसा जगण्याच्या प्रत्येक क्षणी उपयोगी ठरावा असा हा ग्रंथराज अनेक थोरांच्या उद्धरणांनी सजलेला आहे. त्याचे सौंदर्य विचार जसे आहेत तसेच अभिव्यक्तीत ते सौंदर्य ठायीठायी वाचकाला भिडते, भावते.

 जीवनात निकराचा, बाका प्रसंग येतो तो विवेकाच्या क्षणी माणसाचे सारे पराभव विवेकाच्या क्षणी होतात. हिंदीत डॉ. शंकर शेष नावाचे नाटककार होऊन गेलेत. त्यांचं एक नाटक आहे. खजुराहो का शिल्पी'. ते नाटक दुसरे तिसरे काही नसून 'मोहाचा क्षण’ चित्रित करते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष साच्या रिपूंचा पराभव करण्याचे सामर्थ्य केवळ मोहाच्या क्षणात असतं. ज्याचा विवेक मोहाच्या क्षणी 'सत्' पक्षाकडे झुकतो त्याचा विजय होतो. हे अवघड कार्य मन करतं. मनासारखी चंचल वस्तू दुसरी । नाही हे जितकं खरं तितकंच मनासारखी कठोर वस्तू नाही हेही तितकंच खरं! ‘हिरा ठेविता ऐरणी!' ही त्याची कसोटी. माणसाच्या आयुष्यात कसोटीचे क्षण येतात. त्यातून तो तावून सुलाखून बाहेर पडतो. कधी सदोष, कधी निर्दोष! पण सारं सापेक्ष असतं. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षण, प्रसंगांकडे कसे पाहता हे जितकं महत्त्वाचं तितकंच लोक तुमच्याकडे कसे पाहतात तेही महत्त्वाचं. 'स्व', 'पर', 'अन्य' असे दृष्टीचे तीन प्रकार असतात. पैकी पहिल्या दोन सापेक्ष तर तिसरी निरपेक्ष खरं तर वस्तुनिष्ठ! जीवनाकडे वस्तुनिष्ठ पाहण्याचं कसब जे आत्मसात करतात त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते. “जीवन त्यांना कळले हो' ची स्वीकृती, मान्यता मिळवायची तर निरपेक्षतेसारखी दुसरी कसोटी नाही. ‘संवाद मनाशी पुस्तक क्षमा, शांती, चिंता, दुःख, सुख, नैतिकता, आदर्श, स्वातंत्र असा भाव, विचारांचा पिंगा घालत जीवन जगण्याची रीत समजावते. 'पेरते व्हा' चा संदेश देते. 'तुझे आहे तुजपाशी, परि जागा चुकलाशी' असं समजावणारं, हे पुस्तक केवळ उशाशी ठेवणारे निद्रिस्त जीवन जगतात. ‘रात्र वैच्याशी आहे, जागे रहा' हा खरा या पुस्तकाचा मंत्र. तो ज्यांच्या कानी-कपाळी घुमेल त्यांचे जीवन सुफळ, संपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

 या पुस्तकात फ्रॉईड, जे. कृष्णमूर्ती, नेल्सन मंडेला, शेक्सपिअर अशा थोरा-मोठ्यांच्या उक्ती आहेत. सुभाषिते आहेत. म्हणी, वाक्प्रचार आहेत.

अलंकार आहेत. उदाहरणे आहेत. विचारांचे विस्तृत विवेचन आहे. सर्व असले तरी माणसाची गोची आचरत होते. तिथे हे पुस्तक इशारा देण्याचे कार्य करते म्हणून या पुस्तकाचे महत्त्व. माणसं आयुष्यात किती पुस्तक वाचतात, यावर त्यांचं मोठेपण अवलंबून असत नाही. माणूस एक छोटं ब्रीद जगून अमर होऊ शकतो. राजा हरिश्चंद्र समोर आहे नि राजा मिडासही! तुम्हाला कोण व्हायचं आहे ते महत्त्वाचं 'Man is master of his own fait' असं एक सुंदर वाक्य आहे. नीती नि नियती या सख्ख्या की सवत तुम्ही ठरवायच्या. हे पुस्तक ते ठरवयला मदत करतं म्हणून त्याचं मोल मार्गदर्शकांचे!

 लेखनानं लेखांपूर्वीच निष्कर्ष दिला आहे. पाया आधी कळस असं म्हणता येईल. किंवा निष्कर्षातून विवेचनाकडे असा या पुस्तकाचा क्रम आहे. शीर्षक समर्पक आहेत. लेखक भाषाप्रभू आहे. खरं तर या पुस्तकाला । पुस्ती जोडण्याची गरज नाही. ते स्वयंभू आहे. समीक्षकास सहृदय असे दुसरे नाव आहे. प्रस्तावक हा समीक्षक की सहृदय असावा हा वादाचा मुद्दा. पण या पुस्तकास प्रस्तावनेचं ठिगळ मी लावलंय. ठिगळ नेहमीच ओकंबोकं असतं. ते चित्ताकर्षक असलं तरी विसंगतही असतं हे विसरून चालणार नाही. मी यथामती पुस्तक समजावून घेण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे ते प्रतिबिंब इतकेच. लेखकास शुभेच्छा! सतकार्य, सदाचार, सत्लेखन सदासर्वकाळ आवश्यक म्हणून अनिवार्य असतात. लेखकाने ते करत । राहावे. गायकाचा रियाज कधी तरी समेवर येतोच येतो. तो सुदिन यावा. याचि देही याचि डोळा तो मला दिसावा ‘शुभास्ते पंथानः संतु!

◼◼

दि. २६ नोव्हेंबर, २०१५
संविधान दिन


प्रशस्ती/१९७
________________


आनंदाश्रम (आठवणी)
प्रभाकर केळकर
शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
प्रकाशन - जुलै, २०१७
पृष्ठे - १२६ किंमत - १२0/

______________________________

अनाथ, निराधारांच्या प्रश्नांविषयी भावसाक्षरता वाढवणाच्या आठवणी
 प्रभाकर केळकर हे आधाराश्रम, नाशिकचे एक सेवाभावी कार्यकर्ते आहेत. आधार आश्रमाशी त्यांचा पूर्वापार संबंध आहे. त्यांच्या आईवडिलांनी तर एके काळी आश्रमासाठी घरोघरी शिधा वा माधुकरी मागून अनाथ, निराधार, मुले, मुली व महिलांच्या संगोपन, संरक्षण, संस्कार, शिक्षण व पुनर्वसन कार्यास वर्षांनुवर्षे हातभार लावला आहे. प्रभाकर केळकर सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आधार आश्रमच आपला वानप्रस्थ आश्रम बनवून टाकला. गेले तपभर ते आधार आश्रमच्या रोजच्या प्रवासाचे वाटसरू बनून त्यात तन, मन, धन अर्पून कार्य करत आहेत.
 मी सन १९८0 च्या दशकापासून आधार आश्रमाशी निगडित आहे. त्यावेळी नाना उपाध्ये आश्रमाचे सर्व पहात असत. नंतर डॉ. पूर्णपात्रे यांनीही सुमारे पंचवीस वर्षे नानांचा वसा चालवला आहे. आता ते व्रत प्रभाकर केळकर सांभाळताना दिसतात. त्यांनी आश्रमीय मुले, मुली, महिलांचे आश्रमात येणे कसे घडते, आल्यावर आश्रम त्यांचा कसा सांभाळ करतो, ते करत असताना संस्थाचालक, कर्मचारी, समाजसेवक यांना कोणत्या दिव्यातून जावे लागते या संबंधीच्या काही आठवणी या पुस्तकात ग्रंथित केल्या आहेत. आठवणीचं लेखन त्यांनी स्मरणरंजन

प्रशस्ती/१९८

म्हणून केलं नाही. आश्रमाची कार्यपद्धती समाजास समजविण्याची त्यांची भूमिका आहे. तपभर कार्य करूनही या समग्र लेखनात 'मी'शब्द कुठेही आढळला नाही. या साच्या लेखनाचा कर्ता, कर्म, क्रियापद आधार आश्रम आहे. अशी कार्योत्तर तटस्थता, निरिच्छता, निरपेक्षता जपणे ही मला 'संत' कोटीतली वाटते. 'इदं न मम' किंवा 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु । कदाचन' असा निर्मोही जीवन यज्ञ फार कमी लोकांना साधतो. तो त्यांनी जपला, जोपासला म्हणून मी प्रस्तावना लिहायला धजलो. अन्यथा, आज घरचं खाऊन कोण लष्कराच्या भाकया थापतो, यावर समाज विश्वास ठेवत नाही. सामाजिक वातावरण संस्थाचालक नामक जमात सेवा समर्पित असण्याऐवजी प्रसिद्धी प्रवीण नि परायण असल्याचेच सर्वत्र दर्शन घडते.

 अत्यंत छोटेखानी आठवणींचं हे पुस्तक. पण त्यात ‘गागर में सागर भरल्याची प्रचिती हे लेखन देते. अनाथ आश्रमात येणारा प्रत्येकजण वंचित असतो. अनौरस अर्भक, कुमारी माता, परित्यक्ता, भिक्षेकरी मुले, अल्पवयीन वेश्या, विभक्त कुटुंबातील पाल्य, व्यसनी पालकांची अपत्ये अशा समाजाने नाकारलेल्या, टाकलेल्यांना संस्था पदरात घेते, कुशीत घेते व प्रेमाने सांभाळ करते. शासन काही एक अनुदान देते. देणगीदार रोख तसेच वस्तुरूप देणगी देतात. अपत्य नसलेली दांपत्य इथल्या बाळांना दत्तक घेऊन सनाथ करतात. परदेशी पालकांची उदारता तर शब्दातीत. या सर्वांचा मेळ संस्थाचालक व कर्मचारी घालतात म्हणून अनाथांच्या जीवनात कायाकल्प घडून येतो. हे कार्य करताना अनेक कडू-गोड अनुभव येतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे या आठवणीत लाखाची देणगी देऊन पावती व आयकराच्या सुटीची अपेक्षा न करणारे देणगीदार भेटतात तसे मुलांना बटाटे वड्यासाठी शिधा आणून दिल्यावर वडे तळून उरलेलं जळकं तेल बरणीत भरून नेणारे महाभागही भेटतात. नियमावर बोट ठेवून अव्यवहार्य सूचना करणारे सरकारी अधिकारी येथे भेटतात तसे साहाय्य तत्पर पोलीसही। भेटतात. दत्तक बालक होऊन विदेशात गेलेला बारक्या इथे भेटतो तो सज्ञान, सुखी होऊन. तर मला कशाला दत्तक दिलं, संस्थेत अधिक सुखी झालो असतो असा त्रागा करणारा दीपकही इथे भेटतो. हे सारं विश्व समाजाच्या रूढ परीघाबाहेरचे असल्याने सर्वसामान्यास ते अविश्वसनीय वाटले तरी वास्तव आहे खरे. कल्पनेपेक्षा वास्तव कधी कधी भयंकर असते.

 ‘अनोखे नाते' मध्ये आपणास एक अनामिक आजोबा भेटतात. देणगी द्यायच्या निमित्ताने ते आश्रमात येतात. एका चिमुरडीवर त्यांचा जीव



जडतो. आपली भविष्याची पुंजी ते तिच्यासाठी आश्रमाच्या हवाली करतात. आश्रमाला प्रश्नात पाडतात. आश्रम मुलींसाठी पुनर्वसन होईपर्यंतचे वसतिगृह काढण्याचा विचार करू लागतं. यातच त्या अनामिक आजोबांच्या देणगीचे खरे सार्थक! जे साहाय्य तुम्हास संकल्पास प्रेरित करते, ते दिलेल्या दानाचे मूल्य शतपटीने, भूमितीच्या पटीने वृद्धिंगत करते. रक्षाबंधन, भाऊबीज सारखे सण म्हणजे अशा संस्थांचे सामाजिक स्मरण करण्याचे निमित्त. पण इथे विदेशी दत्तक दिलेला मुलगा ‘बारक्या' सज्ञान होऊन परत येतो. पूर्वस्मृतींना उजाळा देत विस्मृत नात्यांना उभारी आणतो. नाती केवळ रक्ताची नसतात. खरे तर रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली, मानलेली नाती अतूट व अकृत्रिम असतात, हे आपण रोजच्या व्यवहारात अनुभवत असतो. रक्षाबंधन' रूपाने वर्णिलेली स्मृती हेच अधोरेखित करते.
 समाजात नैतिक, अनैतिक संबंधांविषयीच्या धारणा कालौघात बदलणे आवश्यक असल्याची जाण देणारी आठवण आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी?' एक अनौरस मुलगा कचराकुंडीत टाकायची क्रूरता आई करते ती केवळ समाज भ्रामक कल्पनांमुळे. हे बदलणं आवश्यकच नाही तर अनिवार्य असल्याच्या दोन आठवणी या संग्रहात आहे. एका मुलाला असंच उकिरड्यात टाकलं जातं. कुत्रे त्याच्या हाताचा लचका तोडून त्याला कायमचे अपंग करतो. देशपांडे नावचे संवेदनशील गृहस्थ आपल्याला मुलं असताना अपंग बाळास दत्तक घेऊन आपला सदाचार सिद्ध करतात. असाच एक मुलगा मालेगाव जवळच्या खेड्यात सापडतो. उपाशी अवस्थेत उकिरड्यात पडून राहिल्याने त्याचे आतडे चिकटते. शस्त्रक्रिया होते. ते बाळ विदेशी दत्तक जातं, कारण त्याला इथं कोणी पालक भेटत नाही. एड्स झाला म्हणून नाकारणारं एक जग नि तो झाला म्हणून स्वीकारणारं दुसरं उदार विदेशी जग! स्वदेशी समाज प्रगल्भ, परंपरामुक्त व नव्या, प्रगत विचारांचा केव्हा होणार असा भुंगा ही मुलं वाचकांच्या कानात । सोडतात. आश्रमाचं मोठेपण हेच की ते समाजाच्या दांभिक नैतिकतेजागी व्यवहारी नैतिकता रुजवतात. म्हणून समाजापेक्षा या संस्था श्रेष्ठ व पुरोगामी सिद्ध होतात. यातील अनेक आठवणीत दत्तक प्रक्रिया, पालक प्रकार इ. तपशील आले आहेत. त्यातून सकारात्मक सामाजिक प्रबोधन घडतं. हे या लेखनाचे खरे मोल. रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणं श्रेष्ठ, याची जाणीव या आठवणी समाजमनात रुजवतात.

 आधाराश्रमसारख्या संस्था म्हणजे सामाजिक प्रश्न समस्यांचे प्रतिबिंब

असते. ‘ताटातूट' आठवणीतून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई-वडिलांची अपत्ये जिवंत राहतात. अनाथ, निराधार अशा अपत्यांचा आश्रम केवळ सांभाळच करते असे नाही तर त्यांना दत्तक देऊन सनाथ करते. काही वेळा निकटच्या नातेवाइकांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करते. सख्खे भाऊबहीण त्यांना इच्छा असून एकत्र निवासी शाळा न मिळाल्याने वेगळे ठेवावे लागते. ते जड अंतःकरणाने. कायदा केवळ आंधळाच नसतो तर त्याची अंमलबजावणी करणारी पोलीस यंत्रणा निर्दोष व भ्रष्टाचारमुक्त नसेल तर तो निष्प्रभ कसा ठरतो याची प्रचिती ‘कायद्याची ऐशी तैशी' मध्ये येते. बालमजूर ही आपल्या समाजातील अशी समस्या आहे, तशी बालभिकारीपण आहे. पालक आपल्या मुलांना भीक मागायला जाऊन स्वतःची गुजराण करतात. काही माणसं मुलं पळवून नेऊन त्यांचा अमानुष छळ करून, त्यांना साखळीने जेरबंद करून भीक मागणे भाग पाडतात. अशांना शिक्षा होणे गरजेचे आहे. पण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी अंमलबजावणी यंत्रणा हा आपल्या समाज बदलातील मोठा अडसर आहे. मग पोलीस यंत्रणेबरोबर महिला, बालकल्याणासारखे खाते पण यापासून वेगळे करता येत नाही. कुंपण शेत खाऊ लागले तर राखायचे कोणी हा आपला प्रश्न आहे. त्याचे उत्तर भविष्यात आपणास निर्दोष माणूस घडणीतूनच शक्य आहे.

 आपल्या समाजावर जात, धर्म तत्त्वांचा मोठा प्रभाव आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम समाजावर नित्य होत असतात. दान धर्म हा चांगला परिणाम. अनौरस संतती अमान्यता हा वाईट परिणाम. काळाबरोबर नीतीअनीती कल्पना बदलतो तो समाज, प्रगल्भ समाजात दाते, दातार, देणगीदार आहेत म्हणून अल्प अनुदानावर मात करून आधाराश्रमसारख्या संस्था मुलांचा चांगला सांभाळ करू शकतात. पण अनौरसपणाचा -हास अथवा त्याला समाजमान्यता अशा अंगांनी प्रश्न सोडवत आपण राहिले पाहिजे. समाजात आधाराश्रमसारख्या संस्था असणं हे भूषण नसून दूषण आहे, हे जेव्हा आपणास उमजेल तो सोन्याचा दिवस!

 आपल्याकडे अशा संस्था सर्वप्रथम ख्रिश्चन मिशनरींनी सुरू केल्या. त्यांचे अनुकरण एतद्देशीय समाजसुधारकांनी केले. काळाच्या ओघात संस्था व कायदे बदलत गेले. पण इंग्लंडसारखे आपल्याकडे घडत नाही. तिथे संस्थांचे समाजविसर्जन झाले. म्हणजे संस्था जे कार्य करायची ते घरोघरी व्हायला लागलं. अनौरस बाळ सांभाळायला त्यांनी बाळ सांभाळणारी कुटुंब शोधली. दत्तक पालक तेथून बाळ घेऊ लागले. शासकीय यंत्रणा

समन्वयक झाली. एका ठिकाणी १० परित्यक्ता न ठेवता त्यांना घरं दिली. संस्थाश्रयीचा कलंक गेला व ठपकाही. आपणाला आता संस्थाबाह्य उपाय शोधावे लागतील. भविष्य काळात शासनकेंद्री काम समाजकेंद्री व्हायला हवं. नियमबद्ध काम संस्कार, कर्तव्य, जबाबदारी म्हणून झालं तरच आपले प्रश्न सुटतील. कोणत्याही समाजात सदासर्वकाळ प्रश्न जर चेहरे बदलून येतच राहिले तर समाज सुधारला म्हणायचे कशाच्या आधारे ? याचा विचार व्हायला हवा. प्रभाकर केळकर यांच्यासारखे सेवाभावी कार्यकर्ते व आधाराश्रमसारखी संस्था दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेल्या काळात समस्यामोचनाचे उपाय, कार्यपद्धतीही नव्या अंगिकारायला हव्यात. आपल्या देशात अपंग व दुर्धर रोगग्रस्त बालके दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची क्षमता असलेली हजारो कुटुंबे आहेत. पण स्वतःपलीकडे जाऊन सामाजिक दुःख स्वीकारून ते निवारण्याची मानसिकता समाजात येणे म्हणजे ख-या मानवधर्माकडे आपण जात असल्याची ती खूणगाठ समजावी. प्रभाकर केळकरांच्या या पुस्तकोने मला परत १९८० च्या दशकात नेले. मी तेव्हापासून असे कार्य करत आलो आहे. नव्या सहस्रकाबरोबर मी चालायचे ठरवून संस्थात्मक परिघातून स्वतःस मुक्त करून घेतले. पण मी ना युद्ध सोडले, ना युद्धभूमी. शासन योजना, धोरण, आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याबरोबरीने तेच काम मी आता व्यापक परीघावर करत आहे. सात जन्म घेतले तरी प्रश्न पुरून् । उरतील अशा देशात आपण असल्याने सतत विकास करत खिंड लढवत । राहिली पाहिजे. प्रभाकर केळकरांच्या सेवाभावास व आधाराश्रमाच्या समर्पणास सलाम!

◼◼

दि. ११ जून, २०१७
साने गुरुजी स्मृतिदिन
________________


तपस्वी (चरित्र)
सुभाष धुमे
व्हिजन प्रकाशन, गडहिंग्लज
प्रकाशन - ऑगस्ट, २०१७
पृष्ठे - ११३ किंमत - १00/

_____________________________________________

ध्येयवादी शिक्षकाचे अनुकरणीय चरित्र


 विसाव्या शतकातील सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारे वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन महात्मा गांधींच्या जीवन, कार्य, विचार, चरित्राने प्रभावित होते. महात्मा गांधींबद्दल त्यांनी त्या वेळी भाकीत केले होते, अर्थात पुढील पिढ्यांना कदाचित हे खरे वाटणार नाही की असा एक हाडामांसाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला. या भाकितालाही शतक उलटून गेलं. या अवलियाच्या पावलावर पाऊल ठेवत अजून एक माणूस चालतो आहे... पुढच्या शतकातील पिढीस महात्मा गांधींइतकंच अविश्वसनीय वाटावं असं पण चक्षुर्वैसत्यम चरित्र म्हणजे अनंतराव विष्णू आजगावकर. त्यांचं एक स्थूल चरित्र माझे पत्रकार मित्र सुभाष धुमे यांनी लिहिले आहे. मी सन १९७१-७२ मध्ये आंतरभारती शिक्षण मंडळ, उत्तूरच्या वतीने त्याचवर्षी चालविण्यास घेतलेल्या पिंपळगाव विद्यालय, पिंपळगाव मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. त्या काळात सुभाष धुमे एक तरुण कार्यकर्ते म्हणून उदयाला येत होते. ते मूळचे उत्तूरचेच पण शिक्षणासाठी गडहिंग्लजला गेले तरी माहेरी, स्वगृही येणं-जाणं होतं. आजगावकर सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक दर्शनी प्रभाव म्हणजे खादी पेहराव, शिडशिडीत बांधा, काळीशार दाढी असं व्यक्तिमत्त्व मनी-मानसी आहे. एक आदरयुक्त दुरावा तरी आब त्यांच्या देहबोलीतून झरत राहायचा. आज पन्नास वर्ष

प्रशस्ती/२०३

उलटून गेली तरी त्यात कणसुर घट नाही चढसुर वाढ. एकसुर अढळ आदरापोटी त्यांनी आपल्याला गुरू तल्य वाटणाच्या अनंतराव आजगावकरांविषयी श्रद्धा व्यक्त करायची म्हणून ‘तपस्वी' शीर्षक सुमारे १00 पानांचं छोटेखानी चरित्र लिहिलंय.

 अनंतराव आजगावकर यांचा जन्म ९ सप्टेंबर, १९३0 ला, उत्तूरला बालपण भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे गेले. पिंपळगाव हे उत्तूरच्या पायथ्याला चिकोत्रा नदीच्या काठी वसलेलं शंभर उंब-यांचं पण गाव नसेल. टेकडीवर वसलेलं टुमदार गाव. इथे ठाकुर कुटुंबीय गावचे वतनदार, जमीनदार. त्यांची कन्या विठाबाई अवघ्या पंधराव्या वर्षी उत्तूरच्या विष्णू नरहरी आजगावकरांना दिली. घरची गरिबी म्हणून मुलं आजोळीच वाढली. त्यांना दोन अपत्ये झाली. एक अनंत तर दुसरी इंद्. अनंता पिंपळगावलाच इयत्ता तिसरीपर्यंत शिकला. त्याचे वडील लहानपणीच वारल्याने पोरकं जीवन बालपणी जगावं लागलं. मामांनी मुलांच्या सांभाळात काही कसर नाही ठेवली. त्या वेळी चौथी इयत्तेत शिष्यवृत्ती व केंद्र परीक्षा असायची. पिंपळगावला सोय नसल्याने त्यांना बाळकृष्ण शहापूरकरांच्या खासगी शाळेत घालण्यात आलं. नूल, गडहिंग्लजमध्ये ते शिकत राहिले. त्यांचं माध्यमिक शिक्षण एम. आर. हायस्कूल, गडहिंग्लजमधून झालं. इथे सिंबॉयसिसचे शं. ब. मुजुमदार त्यांचे सहाध्यायी होते. मॅट्रिक पूर्ण करून ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी चुलत आजोबांकडे कोल्हापूरला गेले. त्यांचे आजोबा कोल्हापूर संस्थानात सुपरिटेंडेंट होते. घरी नोकर, चाकर, जमीन, जुमला सर्व होतं. हा काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. राजाराम कॉलेजमध्ये बी. ए. करत असताना विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले. राष्ट्रसेवा दल ही संघटना साने गुरुजी प्रभावित होती. समाजवादी विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेस अशा विद्यार्थी संघटनेच्या संघर्षात अनंतराव आजगावकरांनी समाजवादी छावणीत दाखल झाले ते समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांच्या प्रभावामुळे. याच काळात त्यांनी महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या प्रभावाने खादी स्वीकारली ती कायमची.

 सन १९५५-५६ च्या दरम्यान पदवीधर होऊन वकिली करायची डोक्यात असताना ते गडहिंग्लजमध्ये परतले. काहीतरी देशासाठी भव्य, दिव्य करायचं असं स्वप्न व ध्येय घेऊनच. प्रारंभी गडहिंग्लज येथे त्यांनी गणित, इंग्रजीच्या शिकवण्या सुरू केल्या व स्वावलंबी झाले. पर्यायच नव्हता. याच काळात गडहिंग्लजच्या समाजवादी कार्यकर्त्यांच्या वर्तुळात ते सक्रिय झाले. परिवर्तनाचे व न्याय, समतेचे कार्य करायचे म्हणून नगर

पंचायतीच्या कामगारांची संघटना बांधून त्यांना न्याय मिळवून दिला. मोहन धारिया तेव्हा वकिली करत. त्यांनी कामगार संघटनेचे वकीलपत्र घेऊन न्याय मिळवून दिला. हा काळ साधारण १९५८ चा असेल.

 वकिलीपेक्षा शिक्षकाचा पेशा हा ध्येयाद्वारे समाज परिवर्तनाचा रास्त मार्ग वाटून त्यांनी आपल्या जन्मगावी परत येऊन स्थिर व्हायचं निश्चित केलं. त्या वेळी लोकल बोर्डाचे पुढारी व्ही. टी. पाटील यांचे एक हायस्कूल उत्तूरमध्ये सक्रिय होते. दोनच इयत्ता असल्याने ते नीट चालत । नसे. तिचा कारभार त्या वेळी एम. आर. देसाई, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रभृती पहात. ती शाळा अनंतराव आजगावकरांसारख्या ध्येयवादी तरुणाने चालवावी याबद्दल सर्वांचा दुजोरा होताच. शिवाय जे. पी. नाईक यांची पाठराखणही होती.

 सन १९६० मध्ये अनंतराव आजगावकर यांनी विधिवत आंतरभारती शिक्षण मंडळाची स्थापना करून उत्तूर विद्यालय, उत्तूर आपल्या व्यवस्थापनाखाली सुरू केले. आंतरभारती विचाराची कोल्हापूर जिल्ह्यातील गुढी उभारण्याचं ऐतिहासिक श्रेय जातं ते या शिक्षण तपस्वीस. या चरित्रातून ते सारं पानागणिक उलगडत जातं. हे चरित्र आपणास सांगतं की आजगावकर सरांनी भारताच्या नकाशावर नसलेल्या छोट्या छोट्या गावात शाळा सुरू करून त्या गावांना महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आणलं. उत्तूर, चिमणे, पिंपळगाव बारवे अशा अपवाद चारच ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या.

 शिक्षण तपस्वी आजगावकर यांनी या शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून जबाबदार, ध्येयवादी, प्रामाणिक, शिस्तीची चाड असलेले नागरिक घडविण्याचे अनंत प्रयोग केले. टोपी हे ग्रामीण भारताचं प्रतीक. शिवाय गांधी टोपी म्हणून तिचं ध्येय मूल्य अबाधित. प्रारंभी मुले, मुली व शिक्षकांचे गणवेश पोषाख खादीचेच असत. मुले-मुले अधिकांश काळ शाळेत घालवत. शिक्षक निवासीच असल्यासारखी स्थिती. बारा महिने चोवीस तास ते विद्याथ्र्यांना उपलब्ध असत. यातून संस्कार घडे. कॉपी न करणारे विद्यार्थी वर्षानुवर्षे घडवणे इतके छोटे काम गृहीत धरले तरी । कालौघात ते किती मोठे, हे कोणीही मान्य करेल. अनंतराव आजगावकरांनी शिक्षण, समाज, अर्थकारण, राजकारण, समाजसेवा, ध्येयवाद असा परीघ वाढवत नेऊन आपल्या कार्याचा परीघ रुंदावला. पण मूल्यांची त्यांनी कधी न प्रतारणा होऊ दिली, न समझोता केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवून जिंकली. भ्रष्टाचार मुक्त कार्य करता येते हे

सिद्ध केलं. त्याचवेळी राजकारण वारांगना खेळ होतो असे लक्षात येताच राजीनामा देऊन नैतिकतेसारखी दुसरी प्रतिष्ठा नाही, हे अधोरेखित केले. सुभाष धुमे यांना सामाजिक नाटकांचे हे सारे प्रयोग अत्यंत संयत परंतु प्रभावी मांडणेतून हृदयस्पर्शी बनविले आहेत.

 ‘तपस्वी' चरित्र नायकास एक ध्येय, नैतिकता, सदाचार, प्रवाहाविरुद्ध पोहत राहणे, जग बदलले तरी मूल्ये अचल असतात हे सांगणारी आर्ष तपस्या, सतत अबोल, अप्रसिद्ध राहून ध्येयवादाचा मळा माळ झाला तरी अविचल विजयध्वज मिरवत ‘एकला चलो रे' म्हणत चालत राहणं या सर्वांतून त्याची जी प्रतिमा हे चरित्र निर्माण करते त्यातून प्रतिष्ठित दरारा उभा राहतो. चरित्र लिहायचे असते ते अनुकरणीय आदर्शासाठी. आज शिक्षणात कोणत्याच स्तरावर सत्व उरले नसताना हे चरित्र प्रकाशित होते आहे. मला वाटतं, शिक्षणासाठीचा प्रतिकूल व असा अधःपतित काळ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पन्नास वर्षांत नव्हता. विना अनुदान शिक्षण संस्कृतीने अनुदार शिक्षण जन्माला घातले. अनंतराव आजगावकरांनी जे ध्येय म्हणून कवटाळले त्यांचा धंदा झाल्याचे पाहणे त्यांच्या नशिबी आले. साने गुरुजींसारखी विकल होऊन ‘हेचि फळ काय मम तपाला' असा विकारी विलाप करत आत्महत्या न करता ‘लढल्याशिवाय हरणार नाही' अशा प्रतिबद्धपणे ते जे कार्य सातत्य व ध्येयनिरंतरता टिकवून, जपून जगताहेत तो सारा त्यांचा निकराचा निर्धार अपूर्व व अप्रूप वाटणारा खरा. ‘एक खिंड मी लढवीन' असा त्यात जाज्वल्य आत्मविश्वास आहे नि दृढ । प्रतिज्ञताही. “अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' असा आश्वासक व्यवहार आज न सांगता खरंच शिकवत राहतो म्हणून हे चरित्र अंतर्मुख करणारे ठरते.

 दीर्घ उज्ज्वल इतिहास हा नेहमीच अल्प स्मरणाचा अभिशाप घेऊन जन्मत असतो. अशा पाश्र्वभूमीवर ‘तपस्वी'सारखे चरित्र अविस्मरणीय व न मिटवता येणारे शिलालेख बनत असतात. अनंतराव आजगावकर यांना त्यांच्या कार्य, कर्तृत्वाची नोंद घेऊन समाज शासनाने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार' ‘फाय फाऊंडेशन पुरस्कार' देऊन गौरविले असले तरी सर्वांत मोठा पुरस्कार जर कोणता असेल तर त्यांच्या शाळेत विद्याथ्र्याच्या पाचव्या । पिढीची मुले, मुली शिकत आहेत. आजगावकर सरांच्या शाळेचे विद्यार्थी पालक होतात, तेव्हा आपल्या पाल्यास टोपीच्याच शाळेत घालणे पसंत करतात... समाजातून गांधी टोपीच काय गांधीवाद, ध्येयवादास मूठमाती देण्याचा चंग बांधला जात असताना अनंतराव आजगावकरांसारख्या शिक्षण


तपस्वीने सर्व प्रकारच्या गैराचा समुद्र प्राशन करण्याची आर्ष अगस्त मुनींची मनीषा जिवंत ठेवली हे काही कमी ऐतिहासिक नाही. हे चरित्र जमा इतिहासाचे मृत स्मारक नसून प्रेरक चरित्र बनून पुढे येते. उद्याचा शिक्षक, विद्यार्थी परत ध्येयवादी होईल तर त्याचे श्रेय ‘तपस्वी' चरित्राच्या कृतज्ञता यज्ञास द्यावे लागेल. यज्ञ केवळ स्वाहा करणारा अग्नी नसतो, पुनरुज्जीवनाचा ओनामाही असतो, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला हवे. त्याबद्दल लेखकास धन्यवाद. गुरुवर्य अनंतराव आजगावकरांना शतशः प्रणाम!?}}

◼◼

दि.२० जून,२०१७
शैक्षणिक विचार (भाग- ४)(लेखसंग्रह)
डी. बी. पाटील
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर
प्रकाशन - ऑक्टोबर, २०१७
पृष्ठे - २३८ किंमत - २00/

_______________________________________

शिक्षणविषयक जाणीव जागृतीचे समाजसंवेदी लेखन

 महाराष्ट्रातील थोर शिक्षण तज्ज्ञ आदरणीय डी. बी. पाटील यांचे ‘शैक्षणिक विचार (भाग - ४) या ग्रंथाची मुद्रणप्रत माझ्या हाती श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस, कोल्हापूरचे तरुण संचालक श्री. विनय पाटील यांनी दिली व प्रस्तावना लिहिण्याविषयी सुचविले. मला हा माझा बहुमान वाटला. पण दुस-याच क्षणी आपण काहीतरी औद्धत्य कृत्य करतो आहोत, याची जाणीव झाली व संकोच वाटला. पण सरांविषयीच्या माझ्या मनात असलेल्या अपरंपार आदरापोटी प्रस्तावना लिहिण्याचे सहर्ष । मान्य केले. डी. बी. पाटील यांचा मी अप्रत्यक्ष विद्यार्थी आहे. माणसाचे दोन शिक्षक असतात. एक वर्गात औपचारिक ज्ञान देणारे. दुसरे समाज जीवनात अनौपचारिक धडे देणारे. मला समाज शिक्षक हा शाळा शिक्षकापेक्षा नेहमीच मोठा वाटत आला आहे, तो अशासाठी की तो तुम्हाला ज्ञानाबरोबर जीवनदृष्टी व संस्कार देत असतो.
 मी आर्य समाज, कोल्हापूर संचलित शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत सन १९५९ ते १९६२ या काळात इयत्ता ४ थी ते ७ वी शिकलो. त्या काळात ते आमच्याच संस्थेच्या शेजारी असलेल्या हायस्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. वक्तशीरपणा, शिस्त याबाबतच्या त्यांच्याच लौकिकाचा माझ्या बालमनावर ठसलेला


प्रशस्ती/२०८

ठसा आज पाच-पन्नास वर्षे उलटली तरी आहे तसा आहे. नंतरच्या काळात मी शिक्षक झालो. संघटनेचा कार्यकर्ता झालो. त्या काळात ते कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक संघात सक्रिय होते. नंतर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांच्याबरोबरच्या कार्यात मी त्यांना जवळून अनुभवले. परत आम्ही योजलेल्या महाराष्ट्र राज्य वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात मी त्यांचे सहृदय सहकार्य पाहिले. राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवात तर खांद्याला खांदा लावून कार्य केले. मला या सर्वांत लक्षात आलेली गोष्ट अशी की डी. बी. पाटील सरांमधील शिक्षक, प्रशासन सतत विचार आणि आचार अशा दोन्ही पातळ्यांवर एकाचवेळी समान पातळीवर अस्वस्थ असतो नि सक्रियही. त्यांची सक्रियता अस्वस्थतेची कृतिशील प्रतिक्रिया असते. त्यांच्या हातून घडलेले लेखन याचाच परिपाक वाटतो.

 एका शिक्षकाचे समाजभान म्हणून डी. बी. पाटील सरांच्या लेखनाकडे पाहणे आवश्यक आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या शिक्षण-विषयक चिंतनपर लेखांचे तीन ग्रंथ ‘शैक्षणिक विचार' (भाग १, २ आणि ३) यापूर्वी त्यांनी प्रकाशात आणले आहे. शिवाय ‘कर्मपूजा' हे त्यांचे आत्मचरित्र मी वाचल्याचे आठवते. त्यांच्यावर बेतलेला एक अमृत महोत्सवी गौरव ग्रंथही मी अभ्यासला आहे. या सर्वांतून पुढे येणारा हा लेखक कर्मपूजक साधक वाटतो. शिक्षण हा त्यांच्यासाठी जीविकेचा विषय नसून शिक्षण हे मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणून ते त्याकडे पाहतात. शिक्षणविषयक शासन निर्णय प्रत्येक वेळी योग्य असतातच असे नाही. शासन निर्णयांच्या शिक्षणविषयक विविध घटकांवर होणा-या संभाव्य इष्ट-अनिष्ट परिणामांविषयीचे डी. बी. पाटील सरांचे चिंतन शिक्षण संस्थाचालक म्हणून नसते तर शिक्षण हितैषी, शिक्षणप्रेमी म्हणून असते हे। विशेष. म्हणून ते शिक्षण संबंधी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या विविध घटनांची मोट बांधून ‘शैक्षणिक व्यासपीठ तयार करून त्यामार्फत सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक संघटन तयार करतात, यातच त्यांच्या विचार आणि व्यवहाराचे चातुर्य दिसून येते. ते शासन विरोधक नाहीत पण शिक्षण हितकर्ते म्हणून शासनास त्यांचे म्हणणे ऐकावे लागते. शासनाने आपल्या पूर्व निर्णयात केलेले अनेक बदल हे डी. बी. पाटील सरांच्यातील द्रष्ट्या शिक्षणतज्ज्ञाचे यश होय. ही अनुभवसंपन्नता हे त्यांच्या लेखनाचे, चिंतनाचे, विचारांचे खरे अधिष्ठान होय. म्हणून ‘शैक्षणिक विचार' (भाग - ४) हा ग्रंथ शिक्षणसंबंधी सर्व घटकांनी

गांभीर्याने वाचून त्यावर चिंतन, मनन करून कृती करायला हवी. आयुष्याचे सहस्त्र चंद्र पाहिलेला हा शिक्षण योगी, त्यांचे हे विचार केवळ शब्दांचे फुगे नि बुडबुडे नाहीत. त्यांना मोत्याचे पाणीदार तेज आहे ते त्यांच्या समाजलक्ष्यी कर्तव्यदक्ष पालकाचे. म्हणून त्यांचे लेखन वाचून सोडता येत नाही ते तुम्हास विचारप्रवण करत, अंतर्मुख करत आचारधर्मी बनवते, म्हणून या लेखनाचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व आहे.

 ‘शैक्षणिक विचार (भाग - ४)' ग्रंथात एकूण ३५ विचारपूरक लेख आहेत. ते शिक्षण, संस्कार, सामाजिक प्रश्न व समस्या, व्यक्तिलेख, क्रीडा, जात वास्तव, व्यसन, व्यवसाय शिक्षण, मानवसेवा, स्त्री-जीवन, शेती, राष्ट्रीय एकात्मता अशा बहुपेडी विषयांना वाहिलेले आहे. ग्रंथातील विषय वैविध्य लेखकाच्या समाजभानाचे व्यापक क्षितिज स्पष्ट करते. डी. बी. पाटील सर रोजच्या घडणाच्या घटनांकडे प्रेक्षक म्हणून पाहात नाहीत. त्यांना सतत समाजाची चिंता असते. विशेषतः रोज घडणाच्या छोट्यामोठ्या घटनांचे विद्यार्थ्यांवर होणा-या संभाव्य परिणाम, दुष्परिणामांबद्दल ते जागरूक असतात तसेच चिंतितही. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या समग्र लेखनात आढळते. ते चांगले वाचक आहेत. त्यांचे वाचन चतुरस्त्र आहे. आपल्या लेखनापूर्वी ते स्वाध्याय करतात. संदर्भ जुळवणी, सांख्यिकी माहितीचे संकलन यांच्या आधारावर ते आपली मते बनवत असल्याने त्यांच्या लेखनाचा पाया मजबूत असतो. ते शिक्षण, समाज, माणूस असा । त्रिविध गोफ गुंफत लेखनाची वीण ठरवत असल्याने सदर लेखन वाचकास । भावते व त्याच्या हृदयास भिडतेही. वॉल्ट व्हिटमनचे श्रेष्ठ लेखनासंबंधी एक जगप्रसिद्ध वाक्य आहे - 'Who touches the book, thouches the man' साहित्य हा हितवर्धक उपक्रम असल्याने तो मनुष्यलक्ष्यी असतो. हृदयस्पर्शी लेखन लेखकाच्या हातून तेव्हाच घडते, जेव्हा लेखक त्या विषयाच्या मुळाशी, गाभ्याशी पोहोचतो. लेखनाचा गाभा घटक विद्यार्थी हा डी. बी. पाटील यांच्या जीवनाचा नर्मबिंदू (weak point) आहे. त्याचा प्रत्यय या ग्रंथातील शब्दागणिक येतो.
 'शैक्षणिक विचार (भाग ४)' मधील लेखाच्या लेखनामागे एक लेखन सूत्र असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमशिबिराच्या निमिताने विद्यार्थ्यांना संबोधन करण्याच्च्या उद्देशाने त्यांनी केलेले भाषण त्याचे लिखित रूप म्हणजे ग्रंथातील पहिला लेख. Not me,but you' हे या योजनेचे ब्रीद. ब्रीद हे उद्देश स्पष्ट करणारे विधान होय . डी .बी .पाटील सरांनी या योजनेची सर्वकष माहिती घेऊन हा लेख लिहिला असल्याने वाचन ज्ञान

संपन्न तर होतोच पण त्याला विषयाच्या विविध पैलूची - सहजीवन, स्वावलंबन, व्यक्तिमत्त्व विकास, प्रबोधन, नेतृत्व, श्रम, संस्कार इ. माहिती होते व वाचकाचे आकलन विस्तारते. समज रुंदावणारा लेखक द्रष्टा मानला जातो. डी. बी. पाटील सर असे द्रष्टे लेखक असल्याने त्यांचे लेखन वाचकास मार्गदर्शक ठरते. भारत सरकारने सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला खरा पण या कायद्यातून ० ते ६ वयोगटातील बालकांना वगळले. डी. बी. पाटील हे शिक्षणतज्ज्ञ असल्याने त्यांचे लक्ष नेहमी निर्णयांतील त्रुटींकडे जात असते. त्याच्यातील लेखक मर्मावर बोट ठेवणारा कुशल निरीक्षक जसा आहे, तसा तो चिकित्सक समीक्षकही. डी. बी. पाटील सरांनी शासनाची दाखवून दिलेली सन २००९-१० ची त्रुटी भारत सरकारने सन २०१६ च्या राष्ट्रीय शिक्षणात दुरुस्त केल्याचे दिसते. या धोरणात प्रथमच ३+ ते ५+ बालकांच्या शिक्षणाचा विचार राष्ट्रीय धोरणाचा भाग झाला आहे. ही डी. बी. पाटील यांच्या लेखनाची फलनिष्पत्ती मानावी लागेल. इतकेच नव्हे, तर पूर्व प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी मान्य करण्याप्रत वा अंगणवाडी शिक्षिकेस मानधनाऐवजी वेतन मान्य करणे हे बालशिक्षणास राष्ट्रीय मान्यता देण्याचेच ते द्योतक होय.
 या ग्रंथात शिक्षणासंबंधी आदर्श शिक्षक, स्वच्छ, सुंदर शाळा, विद्यार्थ्यांचे अपयश, खेळ, गरिबांचे शिक्षण, शिक्षण गुणवत्ता, बहुजनांचे शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, शैक्षणिक संस्थांचे स्थैर्य इ. बहुस्पर्शी लेख आहेत. या विविध लेखांतून लेखक त्या विषयासंबंधी विविध पैलूंचा ऊहापोह करत विविध शैक्षणिक प्रश्न आणि समस्यांची मांडणी करतो. इथे हा लेखक-शिक्षक समाज-शिक्षक, लोक-शिक्षक, लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका बजावतो. ती त्याची भूमिका मला समाजातील सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना मांडण्याच्या अंगाने संवेदी वाटते. त्यामागे शिक्षण क्षेत्र निर्मळ, निष्प्रश्न करण्याचा ध्यास नि तळमळ प्रेषितापेक्षा कमी नाही. असे लेखन करायचे तर तुमची वृत्ती कळवळ्याची असावी लागते. ती लेखकामध्ये आहे. सदर लेख वाचताना ती अधोरेखित होत राहते.

  शिक्षणाचे स्वतंत्र अस्तित्व केवळ ज्ञानमय असते. ते जीवनसापेक्ष व्हायचे तर शिक्षण समाजोपयोगी व्हायला हवे. ते समाजहितवर्धक तेव्हाच होते, जेव्हा ते समाज प्रश्नांची उकल करण्याचे साधन म्हणून साकारते. त्यासाठी शिक्षण तज्ज्ञास वेगवेगळे सामाजिक प्रश्न माहीत असावे लागतात. डी. बी. पाटील यांचा सामाजिक वावर हा बहुआयामी असतो. शासन, संस्था, प्रशासक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याशी त्यांचा संपर्क आणि

संवाद वडीलकीचा असतो. त्यातून त्यांच्यापुढे अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित होत राहतात. ज्येष्ठ नागरिक हे समाजधन खरे. समाज प्रशासन त्यांची काळजी वाहतो. तसे त्यांचेपण समाजाप्रती काहीएक कर्तव्य असते, अशी लेखकाची धारणा आहे. त्यातून ते ज्येष्ठांनी समाज सेवा केली पाहिजे, अशी आग्रही मांडणी करतात. ज्येष्ठांनी स्वविकासाबरोबर समाज कर्तव्यपरायण राहायला हवे, हे सांगायला लेखक विसरत नाही. भटक्या जमातींचा विकास त्यांना जीवन स्थैर्य लाभल्याशिवाय होणार नाही, हे डी. बी. पाटील यांचे समाजभाष्य त्यांच्या सामाजिक बांधिलकीची फलश्रुती म्हणावी लागेल. हुंडाबंदी, स्त्रियांचे अधिकार, महिला दिन, स्त्रियांचे संरक्षण, सक्षमीकरण सारखे लेख केवळ स्त्री दाक्षिण्याच्या भावनेतून केलेला शिळोप्याचा उद्योग नाही. तर ती स्त्रीविषयक असलेली लेखकाची भावसाक्षरता आहे. आणि म्हणून या लेखांचे असाधारण सामाजिक महत्त्व आहे.

 ‘शैक्षणिक विचार (भाग - ४)' हा ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या संवेदी समाजशील मनाचा आविष्कार होय. हे पुस्तक वाचून संपवता येत नाही. संपतही नाही. ते वाचनानंतर वाचकास अंतर्मुख करते, अस्वस्थ करते. इतकेच नव्हे तर त्याचा पिच्छा पुरवून ते त्यास आतून बाहेरून बदलून विधायकपणे कृतिशील करते. शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांविषयी जनसामान्यांत जाणीव जागृती करून ते प्रत्येकाचे जीवन पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, सकारात्मक व्हावे म्हणून प्रयत्न करताना दिसते. समाजप्रती लेखकाची बांधिलकी म्हणून निर्माण झालेला हा ग्रंथ समाज व शिक्षणसंबंधी सर्व घटकांनी मुळापासून वाचावा. जो हा ग्रंथ वाचेल तो प्रगल्भ होईलच होईल. शिवाय दुसच्यासही तो प्रबुद्ध करेल. या लेखनाबद्दल आदरणीय डी. बी. पाटील सर यांचे आभार आणि अभिनंदनही!

◼◼

दि. २० जानेवारी, २०१७ ________________
पैंजण (काव्यसंग्रह)
महंमद नाईकवाडे
कविवर्य एकनाथ पांडूरंग रेंदाळकर वाचनालय, रेंदाळ, जि. कोल्हापूर
प्रकाशन - ऑक्टोबर, २०१७
पृष्ठे - ५0 किंमत - ५0/

___________________________________

साध्या, भोळ्या जगण्याचे करुणाष्टक
 कवी महंमद नाईकवाडे यांचा ‘पैंजण' हा नवा काव्यसंग्रह वाचला. त्याच्या यापूर्वीच्या एका काव्यसंग्रह प्रकाशनास मी पाहुणा म्हणून उपस्थित राहिल्याचे आठवते. त्यांचं गाव रेंदाळ, जि. कोल्हापूर. या गावचे एक कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर हे मराठीतील ख्यातकीर्त कवी म्हणून सर्वत्र परिचित आहे. अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना' म्हणत त्यांनी आपल्या बिकट परिस्थितीचे केलेले वर्णन वाचताना प्रत्येक गरीब वाचकास आपले वाटत आले आहे. या रेंदाळ गावच्या मातीत नि तिथल्या पाण्यात कवी जन्माला घालण्याचा गुण लक्षात येतो. सद्यः काळातही डॉ. रफिक सूरज, जयसिंग पाटील यांच्यासारखे कवी मला दिसतात. कवी महंमद नाईकवाडे याच पंक्तीतील कवी होत. ते कवी तर आहेतच पण रेंदाळ गावचे सर्व लोक त्यांना शाहीर महंमद नाईकवाडे म्हणून ओळखतात. मी त्यांची कवने, पोवाडे, लावण्या ऐकल्या आहेत. त्यांचे सर्व काव्य सामान्यांच्या जगण्याचे वर्णन आहे. ‘जातीच्या सुंदरा सर्व काही शोभते' या न्यायाने उपजत कवी मन घेऊन आलेले कवी महंमद नाईकवाडेंना कवन रचनेसाठी शब्दांची जुळणी वा जोडणी करावी लागत नाही. बोली भाषेतलं अवघड सौंदर्य त्यांच्या शब्दकळेस आहे. कवितेला व्याकरण, प्रमाणभाषा इ. मोजपट्या लावणे चुकीचे असते. कवितेचं खरं सामर्थ्य कवीची भावकळा


प्प्रशस्ती/२१३

असून कवीला काय म्हणायचं आहे, ते वाचकाच्या लक्षात आलं की पुरे. खेड्यात जन्मलेला, जगलेला कवी, त्याची रोजची बोली हाच त्याच्या आशयाचा अंगरखा असतो. ढगळा सदरा नि आखूड विजारीतले कवी महंमद बाळबोध असूनही त्यांचे निष्पापपण, भाबडेपण सहवासातल्या माणसांना भावतं तशी त्यांची कविता जशी आहे, तशी जनतेला भावते. म्हणून त्यांच्या लेखी महंमद शाहीरच. त्यांच्या कवितेला कोणतंही डफ, तुणतुणं, टाळ, मृदंग लागत नाही. ती जन्मतःच ताल, नाद, ठेका घेऊन जन्मते, म्हणून महंमद कवितेचे ठेकेदार ठरतात.

  ‘पैंजण' काव्यसंग्रहात कवी महंमद नाईकवाडे यांनी रचलेल्या ३५ कविता आहेत. त्या रचल्या म्हणण्यापेक्षा जन्मल्या म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे. कारण हा कवी नित्य कवितेच्या चाळ्यातच गुंतलेला मी अनुभवलेला आहे. 'कळस' कविता देवाचा केलेला धावा होय. 'मला वाटते...' मध्ये ही भक्ताची आळवणी आहे. आपले कष्ट फळाला यावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा या रचनेत प्रतिबिंबित आहे. 'वाट' माणसास सनदशीर, नैतिक जीवन जगण्याची शिकवण देते. 'तिखट' कविता जीवनाचं जळजळीत सत्य व्यक्त करते -

माझ्याच घरात
माझ्या बायकोला
कविता थोडी तिखट आहे

  म्हणणारा हा कवी, त्याच्या बायकोला कविता सवत वाटणे स्वाभाविक आहे. 'ऐसा राजा' छत्रपती शिवरायांच्या प्रती आदरभाव व्यक्त करत वंदन गीत सिद्ध होते.
 कवी महंमद नाईकवाडे शाहीर, कवी जसे तसे लावणीकारही. त्यांची ‘लावणी' लोकनाट्याला, वगाला शोभा आणणारी खरी. लावणीचं खरं सौंदर्य तिच्या द्वयर्थी असण्यात आहे. लावणीतला ‘आवळा' शब्द या संदर्भात पाहण्यासारखा आहे. शृंगार हा माणसाचा ज्वर की रस ते अद्याप ठरलेलं नसलं तरी हे रसायन पूर्वापार काव्याचे अभिन्न तत्त्व बनून पिढ्यान्कवीचं करुणाष्ट्रकच होय. ‘कष्टफुले फुलणार कधी' या ओळींचं नि कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांच्या ‘अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना'चं अभिन्न असं नातं हे की शतक उलटून गेलं तरी सामान्यांचं जगणं, झिजणं, सोसणं सरलेलं नाही, बदललेलं नाही. स्वातंत्र्य कुणा स्वातंत्र्य' या प्रश्नाचं उत्तर गेल्या ७० वर्षाच्या प्रवासातील विकासाने आपण देऊ शकलेलो नाही.

त्याला विकास तरी का नि कसे म्हणायचे? हा यक्षप्रश्न केवळ न सुटलेला, न सोडवता येणारा. म्हणून या कविता वाचायला हव्यात.

 ‘पैंजण' संग्रहात प्रेम, प्रणय, अश्रू, हास्य, करुण, शृंगार, भक्ती असं भाव, रसांचे मिश्रण आहे. कवीचं काळीज नेहमी हरिण काळीजच असतं. “माझं काळीज' मध्ये कवी प्रियतमेस ते बहाल करून टाकतो भोपळ्याप्रमाणे नि तिला कोड्यात टाकतो. विळा नि भोपळा तुझ्या हाती बहाल केलाय, तूच ठरव म्हणणारा कवी प्रेयसीच्या अंगणात आपला चेंडू टाकून रिकामा होतो. या नि अशा अनेक कवितांमधून या कवीचा खिलाडूपणा दिसतो. ती खरे तर आहे त्याची जगण्याची शैली. क्रांतिसूर्य' मध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या देशप्रेमाची प्रशंसा आहे. नवीन' कविता द्वयर्थी कवितेचं आणखी एक उदाहरण म्हणून पाहता येते. आवळा, आंबा, चिंचा या लघु फळांना आपल्या संस्कृतीत पिढ्यान्पिढ्या एक मुरलेला दर्प नि । दरवळ आहे. 'दे सर्वांना' ही कविता कवीने सर्वांसाठी वाहिलेलं अर्थ्य होय. काही कविता व्यंगाने भरलेल्या म्हणून मार्मिक ठरल्या आहेत. ‘भारूड' या संदर्भात लक्षात राहते. पैंजण' नाव असलं तरी लावणी, भारुडाबरोबर यात भजन ही वाचावयास मिळतं. रहाट गाडगं', 'झाडाझडती अशा समर्पक शीर्षकांच्या कविता नावातच सारं काव्य व्यक्त करताना आढळतात. | कवी महंमद नाईकवाडे यांचा ‘पैंजण' काव्य संग्रह एका साध्या, भोळ्या कवीच्या जगण्याचे प्रतिबिंब होय. या संग्रहातील प्रत्येक कविता जगण्याचा नवा रंग, ढंग घेऊन येते. ती जगण्याचे सारे ताल, सूर, नाद, रस, गंध व्यक्त करीत असल्याने ही कविता जगणं समजावत न बोलता समाजाच्या अन्याय, अत्याचार, शोषण, विषमतेचा पाढा वाचत वाचकास वंचितांप्रती संवेदनशील बनवत कृतिप्रवण होण्यास भाग पाडते. हेच या काव्याचं बलस्थान होय. या पैंजणात केवळ सुंगरांची किणकिण नाही तर टाळ, मृदंगाचा नाद नि फेर आहे. म्हणून ही कविता वाचायची.

◼◼

दि. २५ ऑक्टोबर, २०१७ ________________



भंगार (आत्मकथन) अशोक जाधव
मनोविकास प्रकाशन, पुणे
प्रकाशन - ऑक्टोबर, २०१७

___________________________________________

जात पंचायतीविरुद्धचा जिहाद
 अशोक जाधव यांचं ‘भंगार' हे त्यांचं रूढ अर्थाने आत्मचरित्र आहे. पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते गोसावी समाजाचे शब्दचित्र बनलं आहे. गोसावी समाज भटका, पत्रा, लोखंड, बाटल्या, प्लॅस्टिक असं लोकांनी नको म्हणून उकिरड्यात टाकलेलं गोळा करायचं. ते भंगारवाल्याला विकायचं आणि गुजराण करायची. असा व्यवसाय करत जगणारे हे लोक. खांद्याला खांदाडी म्हणजे मोठी झोळी, पोतं अडकवायचं आणि कचरा कोंडाळे उपसत विकाऊ वेचायचं. हे काम बहधा गोसावी समाजाच्या स्त्रिया नि त्यांची मुलं-मुली करतात. पुरुष पालात दारू ढोसत शिवीगाळ करत दिवस काढतात. मुलं भंगार वेचत भीकही मागतात. भिकेतून भूक भागवायची नि भंगारातून आलेल्या पैशातून छाटण, मस्काडं (मटण) खायचं नि दारू ढोसायची. हे करत असताना ज्या माउलीनं पहाटेपासून दिवस बुडेपर्यंत अंग कुजेपर्यंत केलेल्या कष्टाबद्दल सहानुभूतीचा लवलेश नसलेले, पालात लोळत दिवस काढणारे पुरुष दारूचा अंमल वाढेल तसा त्या बापडीचा उद्धार करत राहणार नि उशीर का म्हणून संशय घेत बदडणारही. अशा पालात जन्मलेला अशोक भंगार गोळा करायला, भीक मागायला जाता येता शाळा, शाळेत जाणारी मुलं पाहतो नि शाळा शिकायचं मनावर घेतो. अशोकचा शाळेला जायचा हट्ट म्हणजे त्याच्या बापाच्या दृष्टीने


प्रशस्ती/२१६

पोराचं ‘बिघडणं'. 'मे सारा सिकवारो' (मी शाळेत शिकणार!) असं पालाआडून दबकत अशोक म्हणतो काय नि लुळ्या बापाचं पित्त खवळतं नि तो बायकोवर खेकसतो, ‘रांडं तुझ्यापायी पोर बिगडलंया, भंगार वेचाय, भीक मागाय तुझा बा जाणार काय? दयमाली.' या कलगी तुच्यानं घरचा संवाद संपतो नि अशोक चोरून शाळेला जातो. त्याची निष्ठा पाहून गुरुजीच पालावर येऊन बापाला समजावतात नि मग अशोकची शाळा शिकणं रूळावर येतं, ते पण भंगार, भीक गोळा करतच.

 अशा अशोकचं शिकणं. त्याचं बी. ए., बी. एड्. होणं, शिक्षक होणं, शिक्षक होऊन जळी, स्थळी विद्रोह करणं खरं नाही वाटत. गोसावी समाज परंपरेनं घेरलेला. जात पंचायत या समाजाचं सर्वोच्च न्यायालय. तेथील पंच म्हणजे पंच परमेश्वर. त्यांच्या जिभेवर येणारा शब्द कायदा. जो पैसे देईल त्याच्या बाजूनं न्याय. या पंचायतीत स्त्रीची किंमत शून्य, पंचायत कुणाच्याही लग्नाची कधीही सुपारी फोडू शकते. स्त्रीवर कोणीही संशय व्यक्त करू शकतो. निवाड्यात स्त्रीस कधीच विचारलं जात नाही. तक्रार आली की ती खरीच समजली जाते. स्त्री म्हणजे पापी हे गृहीतच. नवरा मनाला येईल तेव्हा स्त्रीला सोडचिठ्ठी देणार. जात पंचायत आपल्या मर्जीनं तिचा ‘धारूच्यो करणार. म्हणजे दंड भरून घेऊन दुस-या पुरुषाच्या स्वाधीन करणार. इतकेच नव्हे तर जात पंचायतीच्या मनात आलं की ती ईर्षेवर कोणत्याही स्त्रीस ‘उभायत' ठरवू शकते. स्त्री ‘उभायत' ठरली की तिला आयुष्यभर कोणीही नांदवून घेत नाही. ती विवाहित राहते. मंगळसूत्र असतं. पण तिला नव-याच्या घरी नांदता येत नाही. ती आकर्षक दिसू नये, तिच्याकडे कुणाची नजर जाऊ नये म्हणून तिनं दातवण लावून दात कंपल्सरी काळे करून घ्यायचे, या नि अशा अनेक डागण्या देणारा हा समाज. त्या समाजाच्या जात पंचायती विरोधात अशोक जाधव दंड थोपटतात ते । स्वतःच्या लग्नापासूनच. आपल्या मर्जीनं नि आपल्या शर्तीवर लग्न करून दाखवून जात पंचायतीची मिरासदारी मोडीत काढतात. गोसावी समाजात शिक्षणास विरोध. त्यात मुलींचं शिक्षण म्हणजे मृगजळच. पण अशोक जाधव आपल्या बहिणीला एम. बी. बी. एस. करतात. स्वतः अशोक जाधव गोसावी समाजाचे आपल्या भागातील पहिले पदवीधर. आपल्या बहिणीलाही ते पहिली डॉक्टरीण बनवतात.

 अशोक जाधवांचा पुरुषार्थ इथं संपत नाही. खरं तर इथं तो सुरू होतो म्हणायला हवं. ते आपल्या गोसावी समाज बांधवांचे संघटन करतात. नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून आपल्या समाजाचं अस्तित्व,

महत्त्व राजकीय पटलावर नोंदवतात. समाजाची पतसंस्था काढतात. भंगाराची खंदाडी जाते नि टेंपो येतो. समाज बांधवांना म्हाडाची घरं मिळू लागतात. ‘भंगार' वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढे झरझर सरकत राहतो. त्या अर्थाने भंगार आत्मचरित्रास समांतर विकसित होतो. समाजचित्र जिवंत करतं.

 चित्रपटाचा कॅमेरा दृश्याचा फोकस नि फ्रेम ठरवत असतो. ती दृष्टी असते दिग्दर्शकाची नि त्या छाया चित्रकाराची, कॅमेरामनची. ‘भंगार आत्मचरित्राचा फोकस अशोक जाधव यांचं व्यक्तिगत जीवन, चरित्र, चारित्र्य नाही. फ्रेम आहे. गोसावी समाजाचं जिणं नि जगणं. पण अशोक जाधवांनी आपल्या या आत्मचरित्रात फ्रेमलाच फोकस केल्याने त्यांचं जीवन गौण होऊन जातं. ही त्यांची स्वेच्छा पसंती नसते. एखाद्या कार्यकत्र्याला समाज बदलाचा एकदा का घोर लागला की मग तो स्वतः विसर्जित होतो. ‘स्व'ऐवजी 'पर'चा वेध, समष्टीचा गोफ विणण्याचे कार्यकत्र्यांचं वेड त्याचं जीवन व चरित्र सामूहिक, सामुदायिक आणि सामाजिक करून टाकतं. त्या अर्थाने ‘भंगार' हा दलित, वंचित साहित्य प्रवाहातील लेखनाचा व्यवच्छेदक प्रयोग होय. ही कलाकुसर अशोक जाधव यांनी केली नसून ती झाली आहे. त्यामुळे या आत्मकथनात सर्वत्र एकप्रकारची प्रांजळता पसरलेली वाचकांना अनुभवायला मिळते. सुखवस्तू समाजाला स्वतःच्या आत्मरत जीवनातून जागं करण्याची विलक्षण ताकद ‘भंगार' मधील भीषण वास्तवात भरलेली आहे. ती भीषणता तुम्हास केवळ अस्वस्थ करत नाही तर ती अंतर्मुख करून या समाजाप्रती काही करण्याची कार्य प्रेरणा देते. ती प्रेरणा हेच या आत्मकथनाचं यश होय. । |

 मराठी साहित्यात यापूर्वी 'बलुतं', 'उपरा', ‘उचल्या', 'कोल्हाट्याचं पोर’, ‘अक्करमाशी' अशी अनेक आत्मचरित्रं आली. त्यांनी आपल्या परीने डोंबारी, कैकाडी, कोल्हाटी समाजाच्या व्यथा वेशीवर टांगल्या आहेत. ‘भंगार' आत्मचरित्र गोसावी समाजाचं चित्र आपल्यापुढे ठेवते. गोसावी समाजाचं भटकं जीवन, तीन दगडाची चूल, थामल्यावर (तिकाठी) उभी पानं, भंगार गोळा करण्यातील मरण यातना, कोंडाळ्याचे तीन भागीदार (माणूस, कुत्रं नि डुक्कर), जात पंचायतीचा बडेजाव, स्त्रीचं अस्तित्वहीन जगणं, मुलांचं जन्मतः नि जन्मभर वंचित जगणं हे सारं शब्दबद्ध करणारं ‘भंगार' आपणाला गोसावी समाजाचं भंगारपण समजावत वाचकांना अपराधी करतं.

 गोसावी समाजाची स्वतःची अशी भाषा, बोली आहे. ती कुठल्याच



मान्य सूची व सर्वेक्षणात नोंदलेली नाही. ती हिंदी, मराठी, मारवाडी, राजस्थानी, गुजराती सा-याचा मेळ घेत स्वतःचं स्वतंत्र रूप, शब्दकळा घेऊन येते. थारो, मारो, खादो अशी ओकारान्त क्रियेची ही बोली. शिव्या आणि शाप, शौर्य आणि क्रौर्य, परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्या परीघातलं हे जीवन मात्र संभावित, संभ्रांत समाज परिघाबाहेरचं, गावकुसाबाहेरचं. गावापलीकडील गोसाव्यांची वस्ती म्हणजे पोलिसांसाठी हक्काचे संशयित गुन्हेगार मिळण्याचे ठिकाण. मानव अधिकारांचा मागमूस नसलेलं हे जग । जात पंचायतीच्या वात्याचक्रात सतत भरडलं जाणारं. ‘भंगार' हे आत्मचरित्र जात पंचायतीविरोधी जिहाद होय. ते जात पंचायतीच्या आणि खरं तर । जात व्यवस्थेच्या समूळ उच्चाटनाची मागणी करतं. त्या अर्थाने सामाजिक न्यायाच्या संदर्भात ‘भंगार' हा वंचितांचा टाहो आहे. न्हनू, होबडी, मोरणी, बायना, भरत्या, सांबा, परशा, केच्या, आळंद्या, बारीबुढा ही सारी पात्रं नावानं नवी तशी त्यांच्या ओळखीही नव्या. खंडोबा, सितला, मरीआई, लक्ष्मीची भक्ती करत रंगीबेरंगी झेंडे गाडत वस्ती दर वस्ती नवं जीवन सुरू करणारं हे जग रोज नवा प्रपंच मांडतं. त्या अर्थानं जीवन खरंच विंचवाच्या पाठीवरचं बि-हाड होऊन जातं.

 ‘भंगार' आत्मचरित्र अनेक प्रश्न उभे करतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत अशोक जाधवांनी स्वतःचा घेतलेला शोध, स्वतःची शोधली, मळलेली वाट सारं वाचत असताना प्रश्न पडतो की अनुवंश, परिस्थिती मोठी की माणसास लागलेला अंतरीचा शोध, विकास नावाची गोष्ट भौतिक समृद्धीतून येते की आत्मविकासाच्या ध्यासातून? स्त्री-पुरुष भेदाचे नष्टचर्य संपून स्त्री माणूस केव्हा होणार? माणसास कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... तिथे कल्याणकारी, विकासगामी नियोजन असते का? मानवाधिकार, समानता, माणुसकी 'माणूस' नसलेल्या समाजास वर्गास मग ते दलित, वंचित, अनाथ, उपेक्षित कोणीही असो केव्हा मिळणार? जात पंचायत नि जात व्यवस्था आपणास त्यांचं खरंच समूळ उच्चाटन करायचं आहे का? या नि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करणारं हे आत्मकथन म्हणजे दलित, वंचितांनी प्रस्थापित व्यवस्थेला विचारलेला जाबच आहे.

 अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं, लेखनात जी प्रगल्भता दाखवली ती पाहिली की वाटतं संस्कार, वळण सारं व्यर्थ. श्रेष्ठ ते । स्वतःचा विवेकी शोध नि समाजाचा पुनर्णोध! या सर्वांबद्दल त्यांचे मनःपूत कौतुक नि अभिनंदन! मराठी वाचक ‘भंगार' वाचतील तर त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाही. ती ऊर्जा या



पुस्तकात पानोपानी भरली आहे. ती उद्या कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही.

◼◼




दि. ४ जून, २०१५
मादाम मेरी क्युरी स्मृतिदिन
________________



डॉ. नरेंद्र दाभोळकर : व्यक्ती आणि विचार (चरित्र)
प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण
अक्षर दालन, कोल्हापूर१
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१७ पृष्ठे - १९६ किंमत - २५0/

_______________________________________

पुरोगामी समाज रचनेचा खटाटोप

 डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी लिहिलेले ‘नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार' पुस्तक 'मोनोग्राफ' म्हणता येईल अशा स्वरूपाचे आहे. ते चरित्र आहे खरे, पण केवळ चरित्र नाही. विचार, कार्य, चळवळ अशा अंगाने एक माणूस समजून घ्यायचा हा एक विनम्र प्रयत्न आहे. या प्रयत्नामागे व्यक्तीने केलेल्या कार्याबद्दलची आस्था व विचारांप्रती सन्मानाचा भाव दिसून येतो. या लेखनाला संशोधनाची बैठक आहे. शिवाय शैलीला शिस्त आहे वैज्ञानिकतेची! चरित्र व्यक्तीचा इतिहास असतो, तर मोनोग्राफ शोध! त्यामुळे या लेखनास संशोधनात्मक चरित्र म्हणता येईल.
 या छोटेखानी चरित्राच्या प्रारंभी डॉ. शानेदिवाण यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची जडणघडण स्पष्ट केली आहे. दाभोलकर उपजत पुरोगामी असण्याचे कारण घर व परिसरात लाभलेले वातावरण व व्यक्ती असल्याचे दिसून येते. डॉ. दाभोलकरांचे आयुष्य म्हणजे सूर्य गिळंकृत करण्यासाठी हनुमानाने घेतलेली उडी होय. अशी अचाट ऊर्मी एखाद्या व्यक्तीत निर्माण व्हायची तर तशी ऊर्जा उपजतच असावी लागते. खेळातून नि विचार, वाचन, संस्कारातून डॉ. दाभोलकर घडले. त्यांचे बंधू आपापल्या क्षेत्रातील दिग्गज. शेती, शिक्षण, विज्ञान अशी शास्त्रीय बैठक लाभलेली चर्चा, व्यवहार व वातावरण घडणीच्या काळात राष्ट्रसेवा दल, समाजवादी


प्रशस्ती/२२१


थोरांचा सहवास लाभला. शिक्षणही त्यांनी वैद्यक विज्ञानाचेच घेतले. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर विशुद्ध वैज्ञानिक झाले. विज्ञानातच वैज्ञानिक असतात, हा आपला गैरसमज आहे. वैज्ञानिक असणं ही कोणा विद्याशाखेची मिरासदारी नाही. वैज्ञानिक असणं ही वृत्ती आणि दृष्टी आहे, हे एकदा लक्षात आले की कलेच्या क्षेत्रात प्रयोग करणारा कलंदर कलाकार नवनिर्मिती करतो ती का हे आपल्या लक्षात येईल. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सनातनी सश्रद्ध समाज विवेकाची कसोटी हरवतो व अंधश्रद्ध होतो, ही सांगितलेली गोष्ट समाजशोध व चिकित्सा होय. हा प्रवास ज्या पठडीत झाला त्याची उकल डॉ. शानेदिवाण यांनी अष्टांगी अभ्यासातून सिद्ध केली आहे.

 ‘कुछ बनो' या लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संदेशाने प्रभावित होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘हटके बनले. या प्रक्रियेची सविस्तर चर्चा या चरित्रात आहे, आपण नेहमी असे पाहात आलो आहोत की माणसाच्या बनण्याचे काही प्रसंग, घटना, व्यक्ती, कारणे असतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात काटकोनात कायाकल्प घडून येतो. हा कायाकल्प निमित्ताने एका घटनेतून होत असला तरी ती एक सुदूर व सुदीर्घ प्रक्रिया असते. डॉ. शानेदिवाण त्याचीही सविस्तर चर्चा या चरित्रात ठायीठायी करतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांचा अभ्यास संशोधकाच्या शोधक वृत्तीची खूणगाठ होय. डॉ. दाभोळकर संयम व संवादाच्या साधनांद्वारे समाज परिवर्तन घडवू इच्छित होते, हे लेखकाचे निरीक्षण चरित्र नायकाच्या कार्य वृत्तीचा नेमका व मार्मिक शोध होय. तो एखाद्याच्या व्यासंगपूर्ण अभ्यासातूनच शक्य होतो. या चरित्राचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य यातून साकारले आहे; ते असे की चरित्राची भाषा सुबोध असली तरी लेखकाचा चरित्र नायकाचा धांडोळा संदर्भ पिंजून काढण्यातून हाती आलेला आहे. वाक्ये छोटी व सुबोध असली तरी ती सारग्राही आहेत. त्यामुळे हे चरित्र कमी पृष्ठात मोठा आवाका कवेत घेते. त्यातून ‘गागर में सागर' असे या चरित्राचे रूप-स्वरूप बनून गेले आहे. ते वाचकाला काहीतरी नवे मिळाल्याची अनुभूती देते. ती त्याची मिळकत ठरते.

 सदर चरित्राद्वारे डॉ. शानेदिवाण यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खिलाडूवृत्ती, निर्भयता, निर्धार, पारखी नजर, विचारप्रवण कृती, ध्येयासक्ती इत्यादी पैलूंवर प्रकाश टाकत चरित्र नायकाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उलगडले आहे. ‘जडणघडण' या प्रकरणात लेखक चरित्र नायकाच्या जन्मापासून ते कार्यकर्ता, नेता होईपर्यंतचा प्रवास साक्षेपी पद्धतीने मांडत गेल्याने वाचकास प्रथम दर्शनीच लक्ष्य चरित्राची महात्मता प्रत्ययास येते. आपण चरित्र



वाचत घडत जातो. माझ्या दृष्टीने हे या चरित्र लेखनाचे वस्तुनिष्ठ फलित होय. चरित्र लेखनाचा मूळ उद्देश अनुकरण व संस्कार, प्रेरणा असल्याने हे चरित्र त्या कसोटीवर यशस्वी ठरते. वाचक वाचत अंधश्रद्धा मुक्त केव्हा होतो, ते त्याचे त्यालाच कळत नाही.

 डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या व्यक्तिगत जीवनात आश्चर्यचकित करून सोडणारे काहीच नाही. त्यांच्या चरित्राचा खरा करिश्मा आहे तो त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक चरित्रात. कोणतेही सार्वजनिक व्यक्तिमत्त्व महत्तम ठरते, ते वैचारिक निकषावर व निष्कर्षांवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन' हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा जीवनोद्देश होय. त्याची मांडणी डॉ. दाभोलकरांनी विविध ग्रंथांद्वारे केली आहे. ‘मती-भानामती’, ‘श्रद्धा-अंधश्रद्धा', 'विचार तर कराल', 'अंधश्रद्धा विनाशाय', 'विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी', ‘भ्रम आणि निरास’, ‘ऐसे कैसे झाले भोंदू’, ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’, ‘ठरलं डोळस व्हायचं', 'तिमिरातून तेजाकडे', 'अंधश्रद्धेचे लढे' (भाग १, २, ३) हे सारे ग्रंथ डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी वाचून सदर चरित्राची मांडणी केल्याने त्यांच्या लेखनात श्रद्धा आणि अंधश्रद्धेची संकल्पना कृष्णधवल अशी स्पष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यपद्धती त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते या चरित्रातून अंधश्रद्धेसंबंधी आचार, विचार हे विवेक आणि विज्ञान या दोनच कसोट्यांवर पारखायचे असतात, हे ज्या जबाबदार जाणिवेने स्पष्ट करतात, त्यातून लेखकाची चरित्र लेखनाविषयीची प्रतिबद्ध भूमिका अधोरेखित होते. आपणाला । विवेकशील विज्ञाननिष्ठ माणूस घडवायचा आहे, हे डॉ. दाभोलकरांच्या मनी-मानसी जितके स्फटिकवत स्पष्ट होते तितक्याच पारदर्शीपणे ते । लेखकालाही उमजलेले असल्याने हे चरित्र स्वतःच अंधश्रद्धा निर्मूलनाचे साधन बनले आहे. अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय, श्रद्धा व अंधश्रद्धेतला फरक माणसास त्या गर्तेतून बाहेर काढता येणे शक्य नसते, याची जाण व जाणीव डॉ. शानेदिवाण यांना असल्याने त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची वैचारिक बैठक प्रगल्भपणे विश्लेषित केली आहे. त्या अंगाने हे प्रकरण चर्चित चरित्राचा गाभा होय. त्याला पुरेसा न्याय लेखकाने दिला असल्याने हे चरित्र परिणामसाधक ठरले आहे.

  माणसाची ओळख म्हणजे त्याचा आचार, विचार आणि कृती होय. कृती म्हणजे अभिव्यक्ती. ती उच्चारातून होते तशी उपक्रमातूनही. डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर चळवळीत जिल्हा व राज्य पातळीवर एक कार्यकर्ता। म्हणून कार्य करताना मला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे जे चित्र, चरित्र नि

चारित्र्य अनुभवायला मिळाले, त्याआधारे मी हे सप्रमाण सांगू शकेन की हा गृहस्थ विचार, आचाराचे अद्वैत व्यक्तिमत्त्व घेऊन उभा होता. त्यांचा जीवन व्यवहार निरअहंकारी, सदाशयी होता. पण विचार व आचार दोन्ही पातळीवर प्रतिबद्ध हा माणूस सतत परिणामकेंद्री कृतीबद्दल विचार करत असायचा. डॉ. दाभोलकरांना आपले जीवन शिळोप्याचा उद्योग वा रिकामा खटाटोप कधीच वाटला नव्हता. उलटपक्षी नित्यनूतन सकारात्मक, विधायक कृतीशी साद घालत रोज एक पाऊल ते आपल्या ध्येयाप्रत चालत असायचे. मरणोत्तर का असेना, पण महाराष्ट्र सरकारने नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक व उच्चाटन अधिनियम - २०१३' मंजूर केला, ही त्या प्रवासाची इतिःश्री म्हणायची पण त्यासाठी त्यांना आपलं जीवन खर्ची घालावं लागलं, सनातनी विचारांनी त्यांचा बळी घेतला ही अत्यंत शल्यकारक गोष्ट होय. महात्मा गांधींनी अहिंसेचा पुरस्कार केला व ते हिंसेचेच शिकार झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी नरबळी आदी अघोरी प्रथांचा विरोध केला पण सनातनी वृत्तींनी त्यांना नरबळी बनवले. हे सारे डॉ. दाभोलकरांनी जपल्या, जोपासलेल्या सुसंस्कृत, संयमी, विधायक सत्याग्रही वृत्ती विरोधाचा हट्टाग्रह ठरावा याला काय म्हणावे? डॉ. दाभोळकरांची अभिव्यक्ती व तिची वैशिष्ट्ये डॉ. शानेदिवाणांनी एका स्वतंत्र प्रकरणात या चरित्रात शब्दबद्ध केली आहेत. ती वाचत असताना, हे सर्व आठवत राहतं. त्या अर्थाने हे लेखन कृती मागची कारणमीमांसा म्हणून महत्त्वाचं ठरतं. डॉ. दाभोलकरांना असलेली साहित्य, कला, काव्य, संगीताची जाण लेखक स्पष्ट करतो खरा, पण त्यातून चरित्र नायकाचे व्यक्तिमत्त्व किती प्रगल्भ होते, तेच अधोरेखित होत राहते. पण म्हणूनही सदर चरित्र वाचनीय तसेच विचारणीय सिद्ध होते. ते मुळातूनच वाचायला हवे.
 ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार' ग्रंथात डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी वैचारिक पक्ष स्पष्ट करताना अंधश्रद्धेचे स्वरूप तीन भागात स्पष्ट केले आहे. एक आहे ‘अंधश्रद्धा' आणि दुसरा आहे ‘धर्म' आणि तिसरा आहे विवेकवाद. अंधश्रद्धेचा संबंध वैचारिक धारणेशी असून धर्माचा संबंध कर्मकांडांशी आहे. विवेकवादी विज्ञाननिष्ठ मनुष्य घडायचा तर जुन्या धारणांमधून जसा तो मुक्त व्हायला हवा, तसाच तो उपवास, तापास, व्रत-वैकल्य, करणी-भानामतीतूनही. सदर चरित्र हे सारे समजावते. म्हणून ते लोकप्रबोधनाचे प्रभावी साधन बनून पुढे येते. डॉ. दाभोलकर कोणा एका विशिष्ट धर्म व आचरणाविरुद्ध नव्हते. सर्व धर्मातील दैवीकरण, कर्मकांडाच्या, अंधश्रद्धांच्या निर्मूलनाबद्दल ते आग्रही होते. ईश्वरकेंद्री मानव व्यवहार मनुष्यकेंद्री व्हावा म्हणून असलेली डॉ. दाभोलकरांची धडपड अधोरेखित करणे या चरित्राचा उद्देश होय. त्या अर्थाने डॉ. राजेखान शानेदिवाण यांना आणि त्यांच्या कुटुंबास मी जवळून ओळखतो. मुस्लीम समाज व हिंदू समाज अथवा कोणत्याही एका विशिष्ट धर्मसमाजात सदासर्वकाळ जसे सनातनी असतात, तसे पुरोगामीपण. डॉ. शानेदिवाण विचार व आचारांनी पुरोगामी, नवमतवादी, आधुनिक असल्यानेच ते हे। करू धजले. ती त्यांची उपजत ऊर्मी होय. ते त्यांना भावते, ते लिहितात, ‘मागणीवरून पुरवठा' असे त्यांच्या लेखनाबाबत घडत नाही. यशवंतराव चव्हाण, मुस्लीम आत्मचरित्रांबद्दल एकूणच समाजाच्या अंतिम हिताचं क्षितिज त्यांना गवसलेले असल्याने जे काही करतात त्यामागे एक विधायक रचनात्मकता असते. हे लेखन त्याच परंपरेतील. त्यांच्या या सततच्या समाज परिवर्तनप्रवण लेखन ध्यास व धडपडीबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!

◼◼

दि. १४ एप्रिल, २०१७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२६ वी जयंती. पुस्तकांचा गाव (पुस्तक परिचय संग्रह)
युवराज कदम
वाचनकट्टा प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - डिसेंबर २०१७
पृष्ठे - ३२ किंमत - ५0/


बाल-साहित्य वाचनाचा संस्कार

 युवराज कदम हे वाचन कट्टा' या वाचन चळवळीचे उद्गाते. पुस्तक वाचन वर्तमान दृक्-श्राव्य क्रांतीच्या जगात हरवत असल्याचं शल्य त्यांना सतत खात असतं. ते शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की आपले तरुण मित्रमैत्रिणी नुसते पाहतात - टी.व्ही., वृत्तपत्रे, मोबाइल्स, व्हीडिओ, क्लिप्स, चित्रपट इ. पण वाचत नाही. परिणामी त्यांचे जगाचे आकलन कमी नि जगण्याची, लढण्याची जिद्द, उर्मीपण असून नसल्यासारखी. त्यांना तर वाचनाचे प्रचंड वेड. मी असे पाहिले, अनुभवले आहे की युवराज कदम एम. ए. झालेले. प्राध्यापक होण्याची क्षमता, योग्यता असून ते चांगल्या नोकरीपासून वंचित राहतात. उपजीविकेसाठी लिपिक म्हणून राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टमध्ये नोकरी करू लागतात. हे केंद्र म्हणजे शहराचं सांस्कृतिक हृदय. इथे रोज काही ना काही घडत असतं. त्यांचा लोकसंपर्क वाढतो. त्याचा विधायक उपयोग करत ते प्रारंभी शिवाजी विद्यापीठात तेथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या साहाय्याने वाचन कट्टा' चालवतात. ज्येष्ठ साहित्यिकांना निमंत्रित करायचं. त्यांचा वाचकांशी संवाद घडवून आणायचा. नववाचक विद्यार्थी वाचलेल्या पुस्तकांबद्दल निवेदन करतात. संवादातून मोकळेपण येते. वाचन आवड वाढते असा अनुभव. अशातून प्रेरणा घेऊन

आज कोल्हापूर शहर व जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालयात ‘वाचन कट्टा' उपक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे वाचन संस्कृती प्रचार, प्रसारास मोठे साहाय्य झाले आहे. यातून उमेद वाढून युवराज कदम यांनी स्वतःची प्रकाशन संस्था काढली आहे. त्यामार्फत ते नवोदित लेखक, कर्वीची। पुस्तके प्रकाशित करतात. ‘वाचन कट्टा' उपक्रमात चर्चिल्या गेलेल्या पुस्तकांचा परिचय करून देणारं एक छोटेखानी पुस्तक ‘कट्ट्यावरची पुस्तके प्रकाशित केले असून ते हातोहात खपले. यातून ही वाचन व वाचक चळवळ जनांदोलन म्हणून रुजल्याचे स्पष्ट होते. अशा वाचन वेड्या युवराज कदम यांनी 'दै. पुण्यनगरी' मध्ये बाल वाचकांसाठी पुस्तक परिचय करून देणारे सदर लिहिले होते. त्या लेखनाचा संग्रह म्हणजे ‘पुस्तकांचा गाव'.

 ‘पुस्तकांचा गाव' सहा पुस्तकांचा परिचय करून देणारी छोटी पुस्तिका आहे. युवराज कदम यांनी त्यात ‘चिंधी’, ‘टागोरांच्या गोष्टी', 'वीरांच्या कथा', ‘विनूची आई', ‘गुणवान सिक्रेट सेव्हन', 'धर्मा' या पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. ही सर्व पुस्तके बाल साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. पैकी ‘चिंधी' ही एका चिमुकल्या मुलीची गोष्ट होय. प्रख्यात कथाकार डॉ. विजया वाड यांनी ती लिहिली आहे. डोंबाच्याचा खेळ खेळत जगणारी चिंधी तिचे सवंगडी आहेत. दोन माकडे व एक कबुतर. त्यांच्या प्रेमात ती वाढते. तिची एका चहावाल्याच्या परिचयाने शाळेत जाऊ लागते. एकदा एका घराला आग लागलेली असताना डोंबाच्याचा खेळ खेळत साहसी, संघर्षशील झालेली चिंधी एका मुलाचे प्राण वाचविते. ही गोष्ट वान्यासारखी सर्वत्र पसरते. तिचं सर्वत्र कौतुक होतं. माध्यमातून ती सर्वदूर पोहोचते. सर्व बालकांची ती आदर्श होते. शासन तिचे कौतुक करते. बालशौर्य पुरस्काराने सन्मानित चिंधी सेलिब्रेटी होते. हे पुस्तक मुळापासून वाचायची इच्छा निर्माण करणारा परिचय मूळ पुस्तकाइतकाच । वाचनीय आहे.

 ‘टागोरांच्या गोष्टी' हा रवींद्रनाथ टागोरांच्या गाजलेल्या नऊ बंगाली कथांचा मराठी अनुवाद होय. हा अनुवाद केलाय पद्मिनी बिनीवाले यांनी. ‘काबुलीवाला', 'पुनरागमन’, ‘सुट्टी’, ‘पोस्टमास्तर', 'सुभा', 'मास्तर महाशय', ‘नवीन बाहली’, ‘नयनजोडचे ठाकूर' ‘अतिथी' या त्या कथा होत. रवींद्रनाथ । टागोरांच्या या श्रेष्ठ बालकथा आहेत. पैकी काबुलीवाला कथेवर तर चित्रपट तयार झाला आहे. अन्य कथाही दृक् श्राव्य रूपात उपलब्ध आहेत. रवींद्रनाथ टागोर यांना बालमनाची चांगली जाण असल्याचे या



कथांवरून स्पष्ट होते. या कथा शैलीच्या अंगाने वैविध्यपूर्ण आहेत. ‘काबुलीवाला' पितृहृदय व अबोध कन्याचा सुंदर संवाद होय. मिनीचे लग्न व काबुलीवाल्याचे तुरुंगातून पुनरागमन प्रसंग म्हणजे मानवी संबंधांची सुंदर गुंफण व गुंता. अन्य कथाही तितक्याच लोभस होत.
 ‘वीरांच्या कथा' हे राजेंद्र अवस्थींचं मूळ हिंदीतील पुस्तक. त्यांच्या हिंदी कथांचे मराठी भाषांतर केले आहे. शोभा व-हाडपांडे यांनी. त्या काही वाचनीय आहेत. ‘विनूची आई' लिहिलंय सुभाष देशपांडे यांनी. 'श्यामची आई' या साने गुरुजींच्या पुस्तकाप्रमाणे असणारे हे पुस्तक. यात आचार्य विनोबांच्या आईचे चित्रण आहे. आई ही संस्कारांची जननी आणि खाणही. हे पुस्तक त्याची प्रचिती आणि प्रत्यय देते. एनिड ब्लायटन लिखित 'सिक्रेट सेव्हन' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रियांका कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद चपखल म्हणावा लागेल. रहस्य, जिज्ञासा, कुतूहल याने भरलेलं हे पुस्तक मुलांसाठी खजिनाच. बाबा भांड लिखित 'धर्मा' कादंबरिका मराठी बालसाहित्यातली विक्रमी विक्री करणारी व घराघरात वाचली गेलेली रचना. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या कादंबरिकेवर आजवर दीड लाख प्रती खपल्या आहेत. मराठी बाल साहित्यातील आजवरची ही कीर्तिमान कृती. बाबा भांड हे मराठीतील आबालवृद्ध, तरुण, महिला सर्व वाचक वर्गात प्रसिद्ध असलेले लेखक. डॉ. विजया वाड यांनी मराठी विश्व आणि संस्कृती मंडळाद्वारे अनेक नव्या-जुन्या कृतींचं पुनर्प्रकाशन केले आहे.

 अशा प्रकारे नोबेल विजेत्या साहित्यकारापासून ते सर्व प्रकारच्या श्रेष्ठ रचनाकारांच्या श्रेष्ठ रचना निवडून त्यांचा बाल वाचकांना करून दिलेला हा परिचय स्तुत्य व अनुकरणीय आहे. त्याबद्दल युवराज कदमांचे अभिनंदन व शुभेच्छा

◼◼

दि. २१ जानेवारी, २०१७ ________________



वक्तृत्वधारा (भाषण संग्रह)
संदीप मगदूम
वेदांतराजे प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - जानेवारी, २०१८
पृष्ठे - १८४ किंमत - रु. १४0/
___________________________

उपजत कलेचे उपयोजित कलेत रूपांतर करणारे पुस्तक
 ‘वक्तृत्वधारा' हे संदीप मगदूम यांचे दुसरे पुस्तक. यापूर्वीचे त्यांचे पुस्तक ‘सूत्रसंचालनाचा पासवर्ड' पाहिल्याचे आठवते. ते मंचाशी जोडलेले गृहस्थ असल्याने त्यांना वक्तृत्व, विचार, संभाषण, सूत्रसंचालन इत्यादी विषयात जिज्ञासा असणे स्वाभाविक आहे. त्याच्या पहिल्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्यामुळे त्यांना हे दुसरे पुस्तक लिहून प्रकाशित करण्याची प्रेरणा झाली असावी. ते स्वतः चांगले वक्ते, शिक्षक, सूत्रसंचालक आहेत. एकविसाव्या शतकात मंच नियंत्रक, सूत्रसंचालक, सूत्रधार, कार्यक्रम नियोजक यांना व्यावसायिक महत्त्व येऊ लागले आहे. त्यामुळे साहजिकच वक्तृत्व कलेचा शास्त्राच्या अंगाने अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. या पुस्तकात संदीप मगदूम यांनी वक्तृत्वाची भूमिका विशद करून ३५ भाषणांचे नमुने सादर केले आहेत. त्यामुळे हे पुस्तक शिक्षक आणि विद्याथ्र्यांना विशेषत्वाने उपयोगी पडेल. व्यासपीठावर घ्यायची काळजी, वक्तृत्वासाठी आवश्यक बाबी, भाषण आणि भीती, पाठांतर व सरावाचे भाषणातील महत्त्व पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी विशद केल्याने नवशिक्या वक्त्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक स्वरूपाचे बनले आहे.
 वक्तृत्वाला मराठीत अनेक शब्द आहेत. हे पर्यायी शब्द या कलेचे व्यवच्छेदक स्वरूप व्यक्त करतात. ‘वाक्' पासून वक्तृत्व शब्द साकारला


प्रशस्ती/२२९

आहे. 'वाक्' म्हणजे वाचा. वक्तृत्व ही म्हणून वाचिक कला मानली जाते. भाषण शब्दाने तिचा शब्द भाषेशी जोडला जातो. संभाषण शब्द श्रोता सूचित करतो. श्रोत्यांशी केलेला संवाद म्हणजे संभाषण. वक्तृत्व हा श्रोता नि वक्त्यातील संवाद होय. असाच एक शब्द आहे संबोधन. वक्ता कुणाला तरी उद्देशून बोलतो. माणूस स्वतःशी बोलतो तर इतरेजनांशी केलेले संबोधन विशिष्ट उद्देश, कारण, हेतूने होत असते. इंग्रजीत Rhetoric, Oratary, Adress, Speech, Elocution असे अनेक शब्द भाषणासाठी वापरले जातात. भाषणांचा इतिहास मोठा रंजक आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय्य हक्कांच्या प्राप्तीसाठी म्हणून भाषणाचा उगम झाला. भाषणाने लोकशाही जन्माला घातली असे म्हटले तर वावगे ठरू नये. लोकशाहीची सर्वांत मोठी देणगी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रथम ते वक्तृत्वाने जन्मले नंतर वाङ्मयाने जोपासले. साहित्य त्याचेच लिखित रूप होय.

 वक्तृत्व कला म्हणून जन्माला आली. आज तिचे विधिवत शास्त्र बनले आहे. या कलेचा जन्म इसवीसन पूर्व पाचव्या शतकात ग्रीकमध्ये । झाला. ग्रीक आणि रोमन संस्कृतीने जी नगर राज्ये जन्माला घातली तिच्या विकासात वक्तृत्वाचा इतिहास दडलेला आहे. प्रामुख्याने ही कला अथेन्स नि रोम शहरात जन्माला आली. रोम शहर फिरत असताना मी वक्तृत्व कलेच्या कितीतरी पाऊलखुणा अनुभवल्या आहेत. सिसिली बेटावर सिराक्यूस वसाहत होती. तेथील आदिवासी हे तेथील मूल निवासी. त्यांच्या जल, जंगल, जमिनीवर धनाढ्यांनी बळेच कब्जा मिळवलेला होता. नगर राज्यांच्या स्थापनेनंतर अत्याचारित, शोषित वंचित जनतेस न्याय मिळण्याचा हक्क नि संधी प्राप्त झाली. मूल निवासींनी जुलमी जमीनदारांवर खटले भरून न्यायाची मागणी केली. त्या वेळी जमिनीची कागदपत्रे, दाखले असे पुरावे नव्हते. वहिवाट भोगवटा म्हणजेच हक्क नि मालकी. आपल्या जमिनी धनाढ्यांनी फसवून जुलमाने बळकावल्या हे सिद्ध करण्यासाठी बिनतोड बाजू मांडणा-यांची, युक्तिवाद करणा-यांची गरज निर्माण झाली. त्या काळात अशी जी शहाणी माणसं होती त्यांनी तर्कसंगत, बिनतोड युक्तिवाद केले ते म्हणजेच भाषण कलेचे आद्य नमुने होत. असा युक्तिवाद करणारा सिसिलियन ग्रीक कोरेक (Korax) हा आद्य वक्ता म्हणून ओळखला जातो.

 सिराक्यूझमधून या कलेचा प्रचार अथेन्समध्ये झाला. त्यातून तेथील लोकशाहीस प्रेरणा मिळाली. त्या काळात अथेन्समधील जनता न्याय व

सार्वजनिक समाज नियंत्रणात खुलेपणाने सहभागी होत असे. प्रोटॅगरस, गॉर्जीअस, हिपीअस इ. सॉफिस्ट शिक्षक हिरिरीने वादविवादात भाग घेत. पाचव्या शतकाच्या आसपास पेरिक्लीझ आणि डिमॉस्थिनीझ हे प्रसिद्ध वक्ते उदयाला आले. अॅरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस हे लेखक, तत्त्वचिंतक तसेच वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. सिसेरो हा वक्तृत्वावर लिहिणारा आरंभिक लेखक होय. 'रेटोरिका अँड हेरे' हे त्याचे पुस्तक. यातून त्याने या कलेचे नियम, गुण इ. विशद केले. भाषणांच्या पाय-या स्पष्ट केल्या. नवा विषय, मांडणी, शैली, स्मरणशक्ती, अभिव्यक्ती पद्धती हे वक्तृत्व घटक त्याने प्रथम अधोरेखित केले. त्यानंतर सिसेरोने ‘द ओरंटर' ग्रंथ लिहून वक्त्याचे गुण मांडले.

 अशा विविध प्रयत्नांमधून वक्तृत्वाच्या स्वरूप, तत्त्व, विशेषाची बांधणी झाली. सभेत उभे राहून बोलावे. असे बोलावे की ऐकणारे श्रोते प्रभावित होतील. त्यांची अंतःकरणे भरून येतील, प्रेरित होतील. वक्त्याने असे नवे ज्ञान, संदर्भ, उदाहरणे द्यावीत की श्रोत्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारून जावेत. श्रोत्याची तहान, भूक, झोप हरवावी असे भाषण हवे. ते असे उत्कंठापूर्ण असावे की कधीच संपू नये असे श्रोत्यांना वाटावे. या आशयाचा संस्कृत भाषेत प्रसिद्ध श्लोक असून त्यातून भाषणाची आदर्शवतता निश्चित होते. युरोपप्रमाणे आशिया खंडातही या कलेचा प्रादुर्भाव पूर्वापारच म्हणावा लागेल. खण्डनमण्डनातून इथे नव्या ज्ञानाची निर्मिती झाली. त्या काळात शंकराचार्य, मंडनमिश्र, कुमारिलभट्ट ही नावे प्रारंभिक वक्ते म्हणून पुढे येतात. महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या प्रारंभी ज्या सामाजिक सुधारणा घडून आल्या त्या तत्कालीन वक्त्यांमुळेच. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीत वक्त्यांचे योगदान कोण नाकारेल? स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील धुरंदर आधी वक्ते होते. नंतर नेते झाले. त्याचे नेतेपण तर त्यांच्या वक्तृत्वावरच उभे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, प्रा. ना. सी. फडके प्रभृती मान्यवरांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. यशवंतराव चव्हाणही लोकनेते बनले ते सादमय वक्तृत्वामुळेच.

  या सर्व पार्श्वभूमीवर संदीप मगदूम यांचे हे पुस्तक ‘वक्तृत्वधारा वाचत असताना लक्षात येते की या परंपरेचा विकास वर्तमानात होत राहावा अशी त्यांची धडपड नि तळमळ दिसते. यात राजर्षी, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. जे. पी. नाईक, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, संत गाडगे महाराज,



पंडित नेहरू अशा मान्यवरांवर भाषणे आहेत. ही भाषण नव्या वक्त्याला, विद्यार्थ्यांना ‘तयारीचे भाषण' स्पर्धेत कसे असायला हवे याचा वस्तुपाठ समजावतात. शिवाय रोजच्या व्यवहारात समाज प्रबोधन, व्यक्तिमत्त्व विकास, प्रसार माध्यमे, लेक वाचवा अशा विषयावर विचार व्यक्त करायचा प्रसंग आल्यास त्यावर भाषण देत यावेत म्हणून काही खड़े (मसुदे) आहेत. दुसरे ३५ भाषणांचा हा संग्रह म्हणजे वक्त्यासाठी गुटिकाच. बाळ गुटिकेत जसे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सत्व, घटकांचा मेळ असतो, तसे हे बालामृत बनले आहे.
 ही सर्व भाषणे संदीप मगदूम यांनी चतुरस्त्र वाचन करून तयार केलेली प्रत्ययास येतात. अनेक संदर्भ ग्रंथ त्यांनी हाताळलेले लक्षात येते. भाषणांच्या प्रारंभी व्यक्तिचित्रे/छायाचित्रे टाकून ती बोधक बनविली आहेत. भाषणांची भाषा सुबोध आहे. वाक्ये छोटी असल्याने ती विद्याथ्र्यांच्या स्मरण पटाच्या कक्षेत सामावणारी, अविस्मरणीय बनणारी ठरली आहेत. मध्ये मध्ये सुभाषिते, श्लोक, व्याख्या, सूत्रे, उदाहरणे देऊन बोधप्रद बनविली आहेत. या भाषण संग्रहाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. वर्तमान एकविसावे शतक बहुभाषी आहे. जनव्यवहार मातृभाषेकडून राष्ट्रभाषेकडे व अंतिमतः जागतिक भाषा वा आंतरराष्ट्रीय भाषेकडे अग्रेसर आहे. शिक्षणाचे माध्यम बदलण्याचा हा संक्रमण काळ आहे. हे लक्षात घेऊन नमुन्यादाखल काही हिंदी, इंग्रजी भाषणांचे मसुदे पेश केले आहे. यामुळे हा भाषण संग्रह त्रिभाषा सूत्राचा अनुकरणीय परिपाठ झाला आहे. अलीकडे सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे फुटलेले पेव पाहता याची गरजही स्पष्ट होते.

 ‘वक्तृत्वधारा' मधील भाषणे ज्ञान, माहिती, वर्णन असा फेर धरत ती अंतिमतः प्रबोधनमाला बनतात. भाषणस्पर्धेत मुले पाठवायची म्हणजे शिक्षकांना भाषणे लिहून द्यायचा कित्ता गिरवत बसावे लागते. आज हे काम शिक्षकांपेक्षा पालक रस घेऊन कष्ट घेऊन करताना दिसतात. नाव मात्र शाळा, शिक्षकांचे होते. अशा परिस्थितीत पालकांना गुगल गुरूची मनधरणी, शोध घेणे इ. सोपस्कार करावे लागतात. अशा पालकांना हा । संग्रह धीर नि दिलासा देणारा ठरेल. कट, पेस्ट, फॉरवर्डच्या काळात । भाषणांचे नवेनवे मसुदे उपलब्ध होणे आवश्यकच नाही तर अनिवार्य होऊन बसले आहे. त्या संदर्भातही भाषणांचे हे नमुने नावीन्यपूर्ण ठरतात. वक्तृत्व कलेच्या प्रारंभापासून ते शास्त्र बनण्याच्या विकास काळात यात ज्या नव्या घटकांची भर पडली ते समयसूचकता वैश्विकता, ज्ञानवाहिता इ. गुणांचे प्रतिबिंब वाचकांना या पुस्तकात आढळेल.


{gap}}पूर्वी वक्तृत्वास प्रकृत कला मानले जाई. याचे कारण भाषण करण्याची ऊर्मी नि ऊर्जा माणसात उपजत असते अशी धारणा असायची. आज । तिच्याकडे कमावलेली वा कमवायची कला म्हणून पाहिले जाते. आज कला ही जीवन साधना न राहता जीवन साधन झाले आहे. कलेचा -हास या स्वरूप बदलात सामावलेला आहे. माणसात प्रतिभा असते म्हणून त्याची प्रतिमा तयार होते. विश्वसुंदरी उपजत असावी लागते. प्लास्टिक सर्जरी करून उपजत सौंदर्याची निर्मिती करण्याचा अट्टाहास म्हणजे निसर्ग निर्माण करण्याचे दुःसाहस. मानव इतका विकसित झाला. तो निसर्ग अंशाच्या, त्याच्या एका घटकाच्या निर्मितीचा ध्याय घेऊ शकतो. तो ती गोष्ट निर्माणही करतो. पण त्याची क्षमता तितकीच. प्रकृत गुणास उपजत कौशल्याचं जे वरदान असते, ते आपण उपयोजित हेतूने करायचे म्हटले म्हणजे त्यात कृत्रिमता येणारच. शिवाय तुम्ही त्यांचा व्यवसाय कराल तर ठीक. धंद करू मागाल तर कलेचं कातडं लक्तर झालं समजा. कला कौशल्य प्रयत्नाने विकसित करता येते पण मुळात काही उगम, पाझर हवा. ‘आडातच नाही तर पोहोच्यात कुठून येणार?' हे लक्षात घेता सदर पुस्तक हा बूस्टर डोस आहे, हे विसरता कामा नये.

 सर्व बोटे सारखी नसतात तशी माणसेही. सर्व वक्ते म्हणून जन्मत नसतात. मग श्रोत्यांचा प्रश्न तयार होईल. 'वक्ता दशसहस्त्रेषु' मध्ये ही दुर्लभता, अपवाद अधोरेखित आहे. ज्यांच्यात उपजत काही अंश, ऊर्मी, ऊर्जा आहे, त्यांच्या, त्याच्या विकासाचे हे पुस्तक साधन होय. ज्यांना चांगला वक्ता व्हावंसं वाटतं (हे वाटणं उपजत असतं!) त्यांच्यासाठी हे उपयुक्त! पण हे खरं की आजचा काळ अशक्य ते शक्य, करिता सायास' चा असल्याने नसलेलं निर्माण करण्याचा आहे. हे पुस्तक तुमच्यात वक्तृत्वाची आस, प्यास तर निर्माण करेलच. शिवाय ती आस आकांक्षा बनवून ती कुशल रूपात कौशल्याधारे ती विकसितही करेल असा मला विश्वास वाटतो. नव्या काळाची किमया साधणारे किमयागार संदीप मगदूम यांच्या या नव्या धडपडीबद्दल हार्दिक अभिनंदन नि मनःपूर्वक शुभेच्छा!

◼◼

दि. २० डिसेंबर, २०१७
लोकप्रबोधक संत गाडगे महाराज
हिरकोत्तर स्मृतिदिन
________________


मनातलं (अग्रलेख संग्रह)
प्रभाकर आरडे
चैतन्य सृजन व सेवा संस्था, आजर
प्रकाशन - २0१८

_____________________________

विकास व माणूस घडणीच्या लक्ष लक्ष संभावना जागवणारे लेखन

 अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे माजी अध्यक्ष व साप्ताहिक ‘आरडंट व्ह्यू'चे संपादक प्रभाकर आरडे यांनी आपल्या साप्ताहिकात वेळोवेळी लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांत लिहिलेल्या शैक्षणिक लेखांचा संग्रह ‘प्राथमिक शिक्षणाचे वास्तव' शीर्षकाने सन २०१३ मध्ये प्रकाशित झाला आहे. या ग्रंथातील अग्रलेख व पूर्वग्रंथातील वैचारिक लेख यांचं मुख्य सूत्र प्राथमिक शिक्षण आहे. ते प्राथमिक शिक्षक होते. शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्ह्याचे ते धडाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते. या क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे ते अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष झाले. त्या अर्थाने ते प्राथमिक शिक्षकांचे राष्ट्रीय नेते होत. भारतातल्या सर्व प्रांतांतून त्यांचे दौरे, संपर्क असल्याने प्राथमिक शिक्षणविषयक त्यांचे स्वतःचे असे एक आकलन आहे. वृत्तपत्र चालवणाच्या संपादकाचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन व विचार असावा लागतो. ‘आरडंट व्ह्यू' हे त्यांच्या साप्ताहिकाचे शीर्षक द्वयर्थी आहे. हा ‘आरडेंचा दृष्टिकोण' आहे. दुसरा 'Ardent' शब्दाचा अर्थ ‘आग्रही मत' असा होतो. दृष्टी नि मताशिवायचे वृत्तपत्र म्हणजे जाहिरातीद्वारे पोट भरण्याचे साधन. प्रभाकर आरडे यांनी


प्रशस्ती/२३४

सुमारे तीन दशके हे साप्ताहिक चालवले. मागील लेखसंग्रहात त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ते ‘नाही रे' वर्गाचे प्रतिनिधी आहेत. अशी त्यांची स्वच्छ नि। स्पष्ट भूमिका असल्याने ‘आहे रे' वर्गावर ते कोरडे ओढताना दिसतात. शासन व संस्थाचालक वर्ग हा त्यांचा लेखनाचा लक्ष्य घटक आहे. लेखनात या वर्गाद्वारे शिक्षकांवर केल्या जाणा-या अन्यायकारक निर्णयांचा ते शिक्षण, शिक्षक व विद्यार्थी, पालक हित डोळ्यांसमोर ठेवून विरोध करत असले तरी आकस नाही. ‘अन्यायाविरोधी चीड व न्यायाची चाड असणारे प्रभाकर आरडे हे ते ज्या वंचित समाज घटकातून, बहजन समाजतून टक्के, टोणपे, टोमणे खात मोठे झाले, ते भविष्यात ‘नाही रे' वर्गाला सोसावे लागू नये अशी तळमळ त्यांच्या सर्व कार्य आणि लेखनामागे दिसते.

 ‘मनातलं' हा सुमारे ४० अग्रलेखांचा संग्रह. यात विषय वैविध्य आहे. शिक्षण, खेळ, राजकारण, सहकार, स्थानिक प्रश्न, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, न्याय निवाडे, शासन निर्णय व धोरण असा फेर धरत हे अग्रलेख सारं जग कवेत घेतात. वैश्विक विषयांना स्पर्श करताना अमेरिका, इजिप्त, इराण, जपान असा फेरफटका त्यांना या अग्रलेखांमधून मारला आहे. अधिक लेख शिक्षणावर असले तरी त्यात समस्या वैविध्य आहे. शिक्षकांचे हक्क नि नोक-यांसाठी सुरक्षा असा त्यांचा संकुचित परीघ नाही. अंगणवाडी शिक्षिकांना भाऊबीज नको. हक्काचे वेतन द्या, शिक्षक सेवकांना किती दिवस वेठबिगार ठेवणार? पोषण आहाराचे धोरण व्यवहार्य हवे, शालेय फी संस्थाचालकांचे उखळ पांढरे करणारी नसावी अशी हे अग्रलेख मागणी करतात. ते वाचताना लक्षात येते की लेखकाचा युक्तिवाद बिनतोड असतो ते अग्रलेखांची शीर्षके विषय आग्रही ठेवतात. त्यात विधिनिषेध बाळगत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर आयपीएलची माँ' चे देता येईल. अग्रलेखाची शैली खास कोल्हापुरी आहे. त्यात मिक्स तांबडापांढरा रस्सा दिसतो. ‘दूध का दूध, पानी का पानी' असा नीरक्षीरविवेक त्यात आहे. ‘सुपडासाफ', ‘ढपला' असे कोल्हापुरी शब्द या शैलीतून सहज येतात. त्या अंगाने हे लेखन उत्स्फूर्त म्हणायला हवे.

 ‘शिक्षण हक्क कायदा' विषयाने सन २00९ पासून प्राथमिक शिक्षणाचे क्षेत्र संचित केले आहे. त्यातून शालाबाह्य मुले, नापास न करणे, शिक्षक समायोजन, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिक रूप असे अनेक प्रश्न निर्माण झाले. लेखक अनुभवांच्या आधारे जी मते मांडतो, वाचक त्यांच्याशी सहमत होतो. कारण मांडणी ही वास्तवाधारित असते. शिक्षणात माफिया

राज्य आल्याने लेखकाची होणारी तगमग एका सच्च्या भारतीय नागरिकाची वाटते. लेखक पुरोगामी खरा पण त्याला डावा म्हणून उपेक्षित करता येणार नाही. अशी त्याची कर्तव्यबुद्धी लेखनाबद्दलचा आदर वाढवते. सांस्कृतिक धोरण सन २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाने अंगीकारल्यावर लेखक शिक्षण धोरण कधी? अशी पृच्छा करणारा अग्रलेख लिहितो. या सर्वांतून प्रभाकर आरडेंचे लेखन एका जागरुक नागरिकाचे सिद्ध होते. शेवटच्या माणसाचे भान' हे या सर्व अग्रलेखांचा आधार असल्याने या लेखनास सामाजिक बांधिलकीचा आपसूक स्पर्श असतो.

 जागतिकीकरणाचे अरिष्ट म्हणजे खेळ, मनोरंजन, व्यापार इ. द्वारे समाजात घुसखोरी करणारा चंगळवाद. आयपीएल, सौंदर्य स्पर्धा, एक घेतली की दूसरी वस्तू मोफत असे फसवे फंडे म्हणजे अज्ञानी सामान्य माणसाचं शोषण व त्याच्या कष्टाने मिळवलेल्या पैशाची लूट. ऑन लाईन खरेदीत ‘अटी लागू' एवढ्या दोन शब्दावर होणारी फसवणूक म्हणजे या बोटाची थुकी त्या बोटावर फिरवायचा गंडीव-फशिव खेळ. त्याचा पर्दाफाश व वस्त्रहरण करून प्रभाकर आरडेंनी 'माँ' करून त्यांचा केलेला निषेध असंसदीय शब्दात असला तरी शोषणाच्या पार्श्वभूमीवर नरमच वाटतो. भोपाळ वायू दुर्घटनेचा न्याय पाहता लेखक त्यापुढे जे प्रश्नचिन्ह ठेवतात, ते समर्थनीयच होय. ‘उशिरा मिळणारा न्याय अन्यायच असतो. मुक्त। अर्थव्यवस्थेस त्यांनी केलेला विरोध केवळ विरोधासाठी नसून आक्षेपार्ह वाटतो. दहशतवाद मग तो कोणत्याही तत्त्वज्ञानाचा मुखडा घेऊन येवो, त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, असा ते जो ‘आरडंट व्ह्यू' ठेवतात त्याच्याशी कोणीही सहमतच राहणार. वारंवार प्रभाकर आरडे आपल्या अग्रलेखांमधून घोषणांचा तिटकारा करतात, कारण कृतिहीन घोषणांसारखी दुसरी फसवणूक नसते, याचा त्यांनी तीन दशके निरंतर अनुभव घेतलेला असतो. सरकार फसव्या घोषणा देते पण माध्यमांच्या वार्तांकनाची सत्यासत्यता न पाहता, खातरजमा करून न घेता एका मुख्याध्यापकाला मात्र तडकाफडकी निलंबित करते, तो मुख्याध्यापक आत्महत्या करतो, याचा कुणाला राग येणार नाही? अग्रलेख हे जनमत तयार करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे वृत्तपत्रशास्त्र सांगते, ते इथे पटल्याशिवाय राहात नाही.

 सदर संग्रहातील काही लेख हे श्रद्धांजलीपर अग्रलेख आहेत. ‘सूर्या आला तळपून गेला’, ‘ताठ मानेचा करारी नेता’, ‘शाहीर विठ्ठल उमप अमर रहे’ सारखे लेख या संदर्भात सांगता येतील. हे लेख फार अभ्यासपूर्ण नसले तरी श्रद्धेने ओथंबलेले आहेत. कविवर्य नारायण सुर्वे प्राथमिक शिक्षक होते

तसे डाव्या चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांची कविता म्हणजे शेतमजूर, कामगारांचे अश्रू सांगत समाजाला त्या वंचितांचे समर्थक करण्याचा खटाटोप असायचा. शाहीर विठ्ठल उमप तर ‘जय भीम' म्हणत धारातीर्थी पडले. विश्वासराव चव्हाण हे शिक्षक समितीचे लढवय्ये नेते होते. समाजातल्या सर्वांप्रती आदर, प्रेमभाव जपणारे प्रभाकर आरडे संपादक म्हणून उदारवादी असल्याचे या श्रद्धांजली लेखांमधून जाणवते. त्यात उपचार नाही तर कृतज्ञताभावाने हे लेख भारलेले आहेत.

 ‘इजिप्तच्या लोक आंदोलनाचे महत्त्व मातीचे गणपती व नैसर्गिक रंगच वापरा', ‘निरपराध्यांना त्रास होणारी 'रास्ता रोको' सारखी आंदोलने थांबवावीत', जपानवर आपत्ती व जपान्यांचा निर्धार' असे काही अग्रलेख आहेत की जे संपादकांचा व्यासंग अधोरेखित करतात. ‘लबाडांचे आवतन', ‘चोराला मलिदा, आणि धन्याला धत्तुरा' असे वाक्प्रचार वापरून लेखक आपले मत एकाच वेळी ललित व जहालपणे मांडतो. मोरपीस नि मशालीचा हा संगम म्हणजे संपादकांची आगळी लेखनकळा होय. जपान्यांना सलाम अग्रलेख आपल्या माणूस घडणीतील अनुकरणीय वस्तुपाठ वाटतो ते । लेखकाच्या व्यापक वृत्तीमुळे. जो लेखक, शिक्षक शिकण्यास, अनुकरण करण्यात तत्पर असतो, तिथेच विकास नि घडणीच्या लक्ष लक्ष संभावना असतात, हे समजाविणारे हे लेखन म्हणजे लोकशिक्षणच! ‘शांतता या निमित्ताने येवो' मध्ये प्रभाकर आरडे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कालखंडातील काही घटनांचा उल्लेख केला आहे. पण त्यापेक्षा ‘पंतप्रधानांनी शब्द खरा केला' मध्ये एका प्रामाणिक माणसाबद्दल केलेले भाष्य जास्त आश्वासक ठरते. सन २०१० चा अग्रलेख. त्यानंतर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने डॉ. मनमोहन सिंग यांना निर्दोष जाहीर केले आहे. असे परिस्थिती व व्यक्तीचे मूल्यांकन करण्याची क्षमता संपादक आढळणे हे या लेखनाच्या दर्जेदारपणावर मोहर उठवणारे ठरते.

 वृत्तपत्र सृष्टीत अग्रलेख, संपादकीय मजकुराचे जे महत्त्व आहे, ते जनमत संग्रहाचे साधन व माध्यम म्हणून. त्यामुळे तर इंग्रजीत त्याला 'Editorial' बरोबरच 'Opinion' असा समानार्थी शब्द वापरला जातो. वृत्तपत्रे ही प्रतिकूल परिस्थितीत समाजमनाचा मोठा आधार असतात. भारतात आणिबाणी निर्माण झाली तेव्हा संपादकीय मजकुराची जागा कोरी ठेवून संपादकांनी आपली नाराजी ‘मौन' हे बोलण्या-लिहिण्यापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे दाखवून दिले आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे कठीण प्रसंगी मौन धारण करीत. वृत्तपत्र सृष्टीत असं मानलं गेले आहे

________________

की प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी वा शत्रूपक्षावर हल्ला करण्यासाठी जेव्हा बाण नि तोफाही निष्प्रभ वाटू लागतात, तेव्हा शहाणा माणूस वृत्तपत्र काढतो. त्यासाठी उर्दूमध्ये एक मशहूर शेर आहे.


‘खींचो न तीर को, न कमान को
तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो।।'


 प्रभाकर आरडे यांनी आरडंट व्ह्यू' हे अशा प्रभावी आविष्कार नि अभिव्यक्तीचे माध्यम बनवून समाज परिवर्तनाचा वारसा चालवला. वृत्तपत्रे अपवादाने दीर्घकाळ चालतात. शहाणी माणसे जे चिरंजीवी समाजकार्य करतात त्याचे समाज स्मरणही अल्पकालिक असते. इंग्रजीत प्रचलित असलेल्या वाक्यात बदल करून मी म्हणेन, 'Though society has short memory, but always has a sensitive and strong remembarance.' माझे स्नेही व सन्मित्र प्रभाकर आरडे यांनी प्राथमिक शिक्षण व शिक्षक हित

आपले जीवित कार्य मानले. घेतला वसा टाकू नये.' या न्यायाने त्यांनी ते व्रत आणि विरासत (पारंपरिक वारसा) म्हणून जपले, याचा मला जो आनंद व अभिमान आहे, तो या अग्रलेख वाचनाने सार्थ ठरविला. प्रकृती साथ देत नसतानाही ते करत असलेल्या धडपडीचा मी निकटचा साक्षीदार आहे. समाजात असा एक जागल्या (Whistle blower) असला तरी तो सत्ताधा-यांची झोप मोडत सामान्यांचं जिणं व झोप सुखाची करतो. त्यांना शुभेच्छा! लेखनास प्रोत्साहन, शाबासकी।

◼◼


दि. ११ जून, २०१७ साने गुरुजी स्मृतिदिन.


प्रशस्ती/२३८
________________


जसं सुचलं तसं (स्फुट संग्रह)
अशोक केसरकर
रविकिरण चौगुले, इचलकरंजी
प्रकाशन - २०१८
पृष्ठे - २६४ किंमत - २५0/

____________________________________

संवेदी हितगुजाचे मृत्युंजयी आविष्करण
 ‘जसं सुचलं तसं' हे पुस्तक श्री. अशोक केसरकर यांनी इचलकरंजी येथून प्रकाशित होणा-या ‘अॅमॅच्युअर' नामक साप्ताहिकात लिहिलेल्या ‘जाता-जाता' शीर्षक सदरातील स्फुटांचा संग्रह होय. हे सदर त्यांनी निरंतर १० वर्षे लिहून एका अर्थाने विश्वविक्रम तर केला आहेच, शिवाय लेखनावरील आपली अढळ निष्ठाच त्यांनी व्यक्त केली आहे. हे पुस्तक मुखपृष्ठापासूनच तुम्हास पकडून ठेवते. मुखपृष्ठातील पारिजातक फुलांच्या पाकळ्यातील कोमलता हा अशोक केसरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव! ते ऋजू, मितभाषी, समाजशील, साहित्यवेडे नि सतत ग्रंथांनी वेढलेले गृहस्थ होत. तसे ते मुळात रोज राजकारणाच्या नि राजकारण्यांच्या गर्तेत अडकलेले असतात. अशा वातावरणात पारिजातकाच्या लालभडक देठातली तरल संवेदना जपणे, हे खायचे काम नाही. पण त्यांनी आपल्या लेखन सातत्याने ते सिद्ध केले आहे. या अनुकरणीय वृत्तीबद्दल व लेखनार्थ ते अभिनंदनास पात्र आहेत. माणूस घडतो शिक्षणाने. गुरू चांगले भेटणे म्हणजे आयुष्याचे सोने होऊन जाणे. लेखकाला असे गुरु लाभल्याने त्यांनी आपले हे पुस्तक-पुष्प त्यांच्या चरणी अर्पण केले आहे. या व्यवहारातूनही अशोक केसरकरांचा कृतज्ञ भाव स्पष्ट होतो.
 आपल्या या ग्रंथाच्या ‘मनोगत' मध्ये लेखक व्यक्त झाला आहे.


प्रशस्ती/२३९
________________

लेखनामागील प्रेरणा नि भूमिका व्यक्त करण्याचे हे ठिकाण. लेखकाने स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचे मन सतत कल्लोळांनी कोंडलेले असते. हा कल्लोळ विचार, भाव, भावना, प्रसंग, घटना, व्यक्ती, समाजकारण, राजकारण अशा वैविध्याने घेरलेला. कल्लोळ मनात उठणे हे माणसाच्या संवेदनशीलतेचे सूचक लक्षण होय. पाण्यात तरंग नि हवेत लहर उठली की समजावे, काही घडते आहे, घटते आहे. आपल्या आजूबाजूला घडणाच्या घटनांची प्रतिक्रिया, प्रचिती, प्रतिसाद म्हणून लेखन घडणे, हे तुमच्या । प्रगल्भ असल्याची खूण होय. सर्वच घटनांशी माणूस समानपणे प्रतिक्षिप्त नसतो होते. व्यक्त नि अविष्कृत व अभिव्यक्त होण्याची लेखकाची परी, पद्धत ठरवत असते की तो कोणत्या पठडीतला. ‘जसं सुचलं तसं' वाचताना लक्षात येतं की हे लेखन आपसूक नाही झालेलं. त्यामागे काही एक विचार, दृष्टिकोण आहे. अशोक केसरकर शिळोप्याचा उद्योग म्हणून लेखन प्रपंच नाहीत करत. सतत ५00 लेख ५00 आठवडे लिहीत राहणे हीच मोठी लेखन साधना! साधना प्रतिबद्धासच साधते. तुम्ही समर्पित असाल तरच सातत्य राखले जाते. अशातली निवडक १५0 स्फुटे या ग्रंथात संग्रहित करण्यात आल्याने त्यांना प्रातिनिधिक चेहरा प्राप्त झाला आहे.
 ही स्फुटे समकालाची प्रतिक्रिया होय. त्यामुळे त्यांचे मूल्य समकालीनच राहते. त्यातून भविष्यकाळात अशा लेखनास ऐतिहासिक महत्त्व येते. त्यामुळे त्याचे एक कालगत संदर्भ मूल्य असते. असे स्फुट लेखन काळाचा आरसा असतो, तसेच ते समकालीन जनमानसाचे विचारबिंबही असते. अशोक केसरकर इंग्रजी भाषा व साहित्याचे जाणकार असल्याने त्यांच्या अबोध मनात एक विधान सूत्र वा बोधवाक्य पिंगा घालत असते. त्या पार्श्वभूमीवर ते वर्तमानाचे चित्र रेखाटतात, घटनांचे त्यांचे विश्लेषण म्हणजे समाजरचनेचा एक विधायक उपक्रम. ते राजकारणात असून त्यांचे मन केवळ समाजशील राहते याचे श्रेय त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीसच द्यावे लागेल. ‘देणा-याचे हात हजार' शीर्षक स्फुटात पुरासारख्या आस्मानी । संकटास सामोरे जाणाच्यांना मदतीचा हात देणाच्या दातारांविषयीचे हे लेखन स्तुती, कृतज्ञता इ. पलीकडे जात मानवतेचा आविष्कार बनते. जात, धर्म, पंथ, वंश, भाषा इ. परिमाणांपेक्षा (कसोटी) माणूस धर्म हे परिणाम मूल्य महत्त्वाचे सांगत, ते ज्या कौशल्याने, विनयाने वाचकांच्या गळी उतरवतात, त्यातून काहीएक लेखक भूमिकाच व्यक्त होते. ती । विधायक असणे, सकारात्मक असणे यातून ‘जसं सुचलं तसं' ला एक
{{center|प्रशस्ती/२४०} ________________

समाजमूल्य येऊन जाते. हे पुस्तक वाचक जितक्या सहजपणे, निरपेक्षपणे म्हणजे पूर्वप्रभावमुक्त होऊन वाचेल तर त्याचा कायाकल्प घडल्याशिवाय राहणार नाही. हे असते या लेखनाचे योगदान. वाचकाला लेखकानुवर्ती बनवण्याचे सामर्थ्य या लेखनशैलीत आहे. तिरंग्याचा त्रिपल डोस' म्हणजे ध्येयासक्ती, देशभक्ती आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम. हे सारं पूर्वनियोजित कारण लेखक लेखनापूर्वी काही एक मानसिक मशागत करून लिहितो, हे। यातून स्पष्ट होते. घेतले पेन नि लिहिले असे घाईतले हे लेखन नाही. त्यामुळे ते पाट्या टाकणारे स्फुट राहात नाही.
 धर्म, दान, वाद, राजकारण, पर्यावरण, दुष्काळ, दहशतवाद, परंपरा, कामगार, आर्थिक नियोजन, आत्महत्या, कॉर्पोरेट जग, भाषा (उर्दू), न्याय, प्रसिद्धी, आदिवासी, आधुनिक शिक्षण, इतिहास, विवाह, व्यायाम, वटसावित्री, परीक्षा, भू-सुरुंग इतके अकल्पित विषय घेऊन लिहिलेली ही स्फुटे वाचत असताना वाचक नकळत समृद्ध होऊन जातो. तो अष्टपैलू बनतो. त्याच्या जाणिवा रुंदावतात आणि आकांक्षा उंचावतात. हे या लेखनाचे खरे यश होय. या स्फुटांची शीर्षके बोलकी, समर्पक आहेत. शिवाय ती काही ठिकाणी काव्यात्मक आहेत. ‘गा बाळांनो गा रामायण', ‘हिरवळ झाली वनवासी’, ‘रूप लावण्य अभ्यासिता न ये', 'ये परदा हटा दो', ‘अपने लिए जिए तो क्या जिए', ‘जानामि धर्मम् नच मे प्रवृत्तिः' ही शीर्षके वाचली किंवा लेखांमधील इंग्रजी अवतरणे पाहिली की लक्षात येते की लेखक बहुश्रुत जसा आहे, तसा बहुभाषीपण, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, इंग्रजी असं लेखकाचं पंचभाषिक असण्यातून स्फुटात ते शब्दसौंदर्य प्रतिबिंबित होते त्यामुळे काही स्फुटे ललित, मनोहर होऊन जातात. या स्फुटांत ज्वाला आणि फुले यांचे अद्वैत पुस्तकास वाचनीय बनवते. अलीकडे आपली मराठी इंग्रजीशी भ्रष्ट संसार, संगत करत प्रदूषित होत आहे. यात पाश्चात्त्य मानसिकतेचा प्रादुर्भाव आहे. ती लागण लेखकाच्या शब्दकळांना लागली आहे. फ्लॅट, प्लॉट, ब्लॉक, लॉन, लिफ्ट, हेल्थ, स्वीमिंग पूल, ग्लोबल व्हिलेज, टी.व्ही. फोन असे शब्द सर्रास वापरण्यातून आपण उच्चशिक्षित असल्याचा भाव व्यक्त करण्याची मानसिकता ही। संपर्क क्रांतीचा दुष्परिणाम खरा. पण त्यातून आपण स्वतःस वाचवले तरच आपली भाषा सुरक्षित राहणार. नवी पिढी शिकते इंग्रजी, पाहते हिंदी आणि बोलते मराठी. या त्रैभाषिक पिढीचं क्रियापद काय ते मातृभाषी राहिलं आहे. तेही एक दिवस माकडाच्या शेपटीसारखं झाडून गेलं तर हाती काय राहणार? याचा विचार मराठी व्हासाची वाट न पाहता तत्परतेने व्हायला


प्रशस्ती/२४१
________________

हवा. २५0 पृष्ठांमध्ये हजार शब्द परभाषी. आणि ते अकारण-सकारण प्रयोग, पर्याय नाही म्हणून प्रयोग मी क्षम्य मानतो. भाषा संकरापासून लेखकाने स्वतःस जपले पाहिजे.
 यात लेखकाचा दोष नसून ती काळाचा महिमा आहे. लेखक राजकारणाच्या निमित्ताने सहकाराशी जोडलेला आहे. त्याचा काहीएक अनुभव त्याच्या गाठीशी असल्याने या स्फुट लेखातील शेती, सहकार, अर्थ, राजकारण, दुष्काळ, आत्महत्या इ. विषय संबंधी लेखकाचे निरीक्षण व वक्तव्य वाचताना आपण अनुभव समृद्ध झाल्याची वाचकास येणारी प्रचिती म्हणजे ‘वाचनाने जग बदलते' याची पावतीच होय. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात असा त्रैराज्यिक आवाका त्यामुळे तर हे लेखन भारतीय पातळीचे बनून जाते. महात्मा गांधी, गौतम बुद्ध प्रभृती महामानवांप्रती लेखकाच्या मनातील आदरामुळे हे लेखन मानव हितवर्धक झाले आहे. जागतिकीकरणाचे लेखकाचे भान याच शीर्षकाच्या एका स्फुटातून स्पष्ट होते. या प्रत्येक स्फुटाच्या शेवटी लेखक निष्कर्षाप्रत येतो. पंचतंत्रातील कथेच्या शेवटी जसा ‘बोध' असतो तसे हे लेखन वृत्तपत्र समाजाच्या चौथा स्तंभ अशामुळे की ‘मत' निर्माण करतो. मानवी मनाचे रूपांतर मतात करणे ही किमया केवळ वृत्तपत्रीय लेखनासच साधते. किंबहुना ते त्याचे कार्यही असते. अशोक केसरकर यांनी ते निभावून आपण लेखकाबरोबर पत्रकारही। आहोत हे नकळत अधोरेखित केले आहे.


 सदर लेखन, स्फुट लेखनाची शब्दमर्यादा हा लेखनापुढचा मोठा अडसर ठरतो. विशेषतः हौशी लेखक जेव्हा वृत्तपत्रात स्फुट लेखन करतो, तेव्हा हा काच प्रकर्षाने असतो. अशोक केसरकरांना भरपूर सांगायचे असते पण शब्दमर्यादांच्या बंधनामुळे त्यांना ‘गागर में सागर’, ‘टिकलीत तळे अशा पद्धतीची संक्षिप्तीकरण शैली वापरावी लागली आहे. त्यात प्रतिभेचा झालेला संकोच व विचार आविष्करणाची झालेली कोंडी यामुळे हे लेखन ‘जसं सुचलं तसं लिहिलं गेलं नसून ‘जसं सांगितलं तसं' झाल्याने त्याचे सहज सौंदर्य हरवले आहे. त्यासाठी एकदा अशोक केसरकरांनी मुक्त लेखनाचा रियाज करून पहावा. त्यात त्यांना मोकळा श्वास घेतल्याची अनुभूती येईल व मोकळे होण्याचा आनंद मिळेल. लेखनानंतर लेखकाचं हलकं होणं ही लेखनाची खरी इतिश्री. लेखक लिहितोच मुळी अस्वस्थता, बेचैनीतून मुक्त होण्यासाठी |
 या सर्व अडथळ्यांच्या शर्यतीपलीकडे जाऊन हे लेखन एक संवेदी हितगुज झाले आहे. स्फुट लेखनास क्षणिकतेचा शाप असला तरी अशोक
प्रशस्ती/२४२
________________

केसरकरांनी हे लेखन मनस्वीपणे केल्याने ते मृत्युंजयी झाले आहे. त्याचे मूळ कारण लेखकाची बहुश्रुतता होय. हे लेखन अनेक संदर्भ, उक्ती, मिथक, म्हणी, वाक्प्रचार, अलंकार, रूपकांनी भरलेले असल्याने ते कलात्मक, वाचनीय तद्वतच ते संग्राह्य बनून गेले आहे. त्याला धर्मनिरपेक्षतेबरोबर सर्वधर्मसमभाव ही भारतीय धर्मनिरपेक्षतेतून देव, दैव, दैत्य कल्पना वजा असतात. असतात फक्त विज्ञानाधिष्ठित मानवतावाद. उलटपक्षी सर्वधर्मसमभावमध्ये देव, धर्माबरोबर जातीय सहिष्णुतेचा भाव असतो. सर्वधर्माप्रती सद्भाव हे त्याचे मूल्य असते. महात्मा गांधी सर्वधर्मसमभावी होते. रॉयवादी नव्हते. शिवाय अशोक केसरकरांवर काँग्रेसी विचारसरणीचा प्रभाव स्पष्ट आहे. त्या अर्थाने ते भांडवलवादी व्यवस्थेच्या बाजूने उभे राहतात. 'लोक सहभाग' शीर्षक स्फुटामध्ये ते सुविधांची किंमत मोजण्याच्या बाजूने उभे राहतात. 'लोककल्याण' व 'लोकविकास या दोन संकल्पना स्वतंत्र होत. लोककल्याणामागे समाजवाद, साम्यवाद उभा असतो तर लोकविकासामागे भांडवलवाद, जागतिकीकरण हे धनदांडग्यांचे समर्थन करते. ते इतक्या सूक्ष्मतेने सर्व गोष्टींकडे पाहून विचार करतात की नाही मला माहीत नाही. पण कल्याणापेक्षा विकासपक्षी विचारधारा त्यांना उत्तर आधुनिक बनवते, हे मात्र खरे.


 आज कुणाची कुणाला फिकीर नसल्याच्या काळात ते समाजाची चिंता वाहात लेखन करतात. यातच त्यांची सामाजिक बांधिलकी सामावलेली आहे. माझ्या दृष्टीने ती मोलाची गोष्ट आहे. घेतला वसा टाकू नये म्हणत त्यांनी ती जपली, जोपासली तरच समाज नावाची गोष्ट उद्या शिल्लक राहील. अन्यथा, प्रत्येक मनुष्य बेट बनण्याचा काळ अवतरल्याशिवाय राहणार नाही. भारताचा ‘स्वित्झर्लंड व्हायचा नसेल तर अशोक केसरकरांनी लिहीत राहिलेच पाहिजे. त्यांच्या लेखनास शुभेच्छा!

◼◼


दि. २३ मार्च, २०१७


प्रशस्ती/२४३
________________


फुलपरी (बालकविता संग्रह)
सागरिका येडगे

_________________________________


चिमुरड्या कवयित्रीच्या प्रगल्भ कविता

 ‘फुलपरी' हा बालकवयित्री सागरिका येडगे हिचा बालकाव्य संग्रह. यात तिच्या ३४ छोट्या कविता संग्रहित आहेत. या कवितांचा पैस मोठा आहे. पण निसर्ग आणि माणूस या परीघात ती फेर धरत राहते. या कवयित्रीस कवितेचं, शब्दांचं चांगलं भान आहे. यमक, अनुप्रास तर । तिच्या पायी लोळण घालतात. प्रदूषणासारखा नव्या काळाचा यक्षप्रश्न तिला अस्वस्थ करतो. देशाबद्दल सागरिकाला कोण अभिमान ? पृथ्वीची प्रगती व्हावी म्हणून ती प्रतिज्ञाबद्ध आहे. तिची फुलपरी खरं तर तिचंच प्रतिरूप. या कवयित्रीच्या मनात आज देव वसलेला असला तरी उद्या तिला कळू लागेल तेव्हा विज्ञान त्याची जागा घेतल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाबद्दल तिच्या मनी ओढ आहे हे ‘गाणे निसर्गाचे!' या तिच्या कवितेतून जाणवतं. बालमन म्हणजे स्वप्नरंजन! ‘मोठी मज्जा' मध्ये कवयित्री सागरिका धमाल सफर घडवते. 'दिवाळी'त तिचं निरीक्षण कौशल्य दिसून येतं. ते सूक्ष्म आहे. त्यातून दिवाळीचं काही सुटत नाही. फटाके, चंदन, अंघोळ (अभ्यंग स्नान), नवे कपडे, मिष्टान्न, फराळ, भाऊबीज, सारा थाट, घमघमाट तुम्हास तिच्या कवितेत थेट भेटेल. 'दहीकाला' मध्ये कृष्ण, दही, गोपाळ मिळणारच. सागरिकाला ‘धरणीमाता' मध्ये निसर्गाच्या जागी माणसांनी समस्यांचा डोंगर उभारल्यानं ही कवयित्री खंतावते. देशात


प्रशस्ती/२४४
________________

जाती-धर्मांत सख्य असावं असं इतक्या लहान वयात वाटतं हे मोठं आश्वासक आहे. 'फुलपाखरू', ‘वृक्षारोपण', 'श्रावण', ‘मृग नक्षत्र’, ‘ससा' अशी कवितांची नुसती शीर्षकं वाचली तरी या बाल कवयित्रीचं भावविश्व किती निरागस, प्रदूषणमुक्त आहे हे लक्षात येतं नि म्हणून तिची सगळी कविता मला आश्वासक, आस्थेवाईक वाटते.
 सागरिकाच्या कवितेचा परीघ रुंद आहे. तो सारं जग कवेत घेऊ पाहतो. तीत भाषा वैविध्य आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी असा त्रिवेणी संगम तीत आहे. अनेक कविता मराठीत असल्या तरी ‘मेरा भारत' सारखी हिंदी कविता यात आहे. शेवटची ‘मिनी' कविता तिच्यात चक्क इंग्रजी शब्द पेरून कवयित्रीनं आपली कविता एकविसाव्या शतकातली असल्याचं दाखवून दिलं आहे. Fry, Cry, Try सारखे समशब्द वापरून तिनं आपली शब्दांची जाण, यमक, अनुप्रास सारं उपजत असल्याचं समजावलं आहे. या ‘फुलपरी'च्या कवितात शिक्षकांविषयीचा आदरभाव स्पष्ट होतो. तिला इतिहासाची माहिती आहे हे माझा भारत’ कविता वाचताना लक्षात । आल्यावाचून राहात नाही. 'प्रगती पृथ्वीची' मध्ये तिला प्रगतीचा ध्यास असल्याचं जाणवतं. आपला देश महान बनावा असं वाटणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. सागरिका एक कवयित्री म्हणून परीचं रूप, रग, गंध, मन घेऊन साच्या कवितेत वावरते. वास्तवाइतकंच स्वप्नांवर ती भरोसा ठेवते. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कुणीतरी स्वप्नं पाहिल्याशिवाय सत्य सृष्टी अस्तित्वात येत नसते. किंबहुना, स्वप्नंच सत्यास जन्म देत असतात हे ब-याचदा आपण विसरतो. म्हणून ही कवयित्री स्वप्नांच्या विमानातून विश्व पर्यटन करते हे मोठी मज्जा कविता सांगते. माणुसकीचं नातं... त्याचे अनेक पदर इतक्या लहान वयात या फुलपरी कवयित्रीस कसे लक्षात आले याचं आश्चर्य वाटतं


माणसामाणसात असते तळमळ
तेव्हाच हृदयात येते कळ

 म्हणणारी ही कवयित्री मला चिमुरडी न वाटता अकाली प्रौढ झाल्यासारखी वाटते. झेंडा गीत’ कवितेतील तिचं राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान प्रौढांना लाजवेल असा आहे खरा! ‘गंगा नदी' आपण साच्या प्रौढांनी मैली केली पण ही कवयित्री ठामपणे सांगते...
हे गंगा माते! तुझे आम्ही प्रदूषण थांबवू
पावित्र्य तुझे आम्ही वाढवू
असं म्हणत ती पूर्वजांचे प्रायश्चित्त घेते हे विशेष! ‘१८५७ चे

प्रशस्ती/२४५
________________

समाजसुधारक' कवितेत इतिहासाबरोबर ‘चरित्रे त्यांची पहा जरा' चा तिचा उपदेश अनुकरणीय आहे.
 अशी ही 'फुलपरी'ची कविता सान-थोर सान्यांना एकाचवेळी साद घालते. हेच या कवितेचं बलस्थान आहे नि मर्मस्थानही! तिच्या बालप्रतिभ प्रयत्नांचं कौतुक! तिला प्रोत्साहन द्यावं तेवढं थोडं


हे फुलपरी
उड तू जगभरी
विज्ञान होवो तुझी भरार
ी विश्व लोळण तुझ्या दारी!

◼◼


दि. ७ जानेवारी, २०१३


प्रशस्ती/२४६
________________


वि. स. खांडेकरांच्या कथात्मक साहित्यातील
समस्यांचे चित्रण (संशोधन प्रबंध)

डॉ. सविता व्हटकर (२०११)

___________________
कथात्म साहित्य


 प्रा. श्रीमती सविता व्हटकर यांनी डॉ. प्रकाश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वि. स. खांडेकरांच्या कथात्म साहित्यातील समस्यांचे चित्रण' शीर्षक एक शोध प्रबंध जून, २००७ मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला सादर केला होता. तो स्वीकृत करून विद्यापीठाने त्या वेळी प्रा. श्रीमती व्हटकर यांना मराठी विषयातील डॉक्टरेट' बहाल करून त्यांच्या संशोधनाचा सन्मान केला होता. आता त्या शोध प्रबंधास प्रकाशन अनुदान देऊन तो मराठी भाषा व साहित्याच्या अभ्यासकांना ग्रंथ रूपात । उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा निर्णय म्हणजे शोध निष्कर्ष अधोरेखित करणे होय. त्याबद्दल संशोधक व मार्गदर्शक दोघांचेही अभिनंदन!
 डॉ. सविता व्हटकर यांनी प्रस्तुत ग्रंथात खांडेकरांच्या कथात्म साहित्याचा अभ्यास करून वि. स. खांडेकरांनी आपल्या कथा, रूपक कथा आणि कादंबरीच्या माध्यमातून चित्रित केलेल्या समस्यांचा ऊहापोह केला आहे. प्रारंभी त्यांनी वि. स. खांडेकरांच्या कथात्म साहित्य लेखनामागील भूमिका आणि प्रेरणांचा शोध घेतला आहे. तो घेताना लक्षात येते की खांडेकरांनी आपल्या साहित्यिक कालखंडातील समाज जीवनाचे वस्तुनिष्ठ रूप सादर केले आहे. जग बदलायची तळमळ खांडेकरांमध्ये होती. गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद या तत्त्वत्रयींच्या आधारे ते समाज परिवर्तन करू


प्रशस्ती/२४७
________________

इच्छित होते. समाजातील भेदाभेद, विषमता, अंधश्रद्धा, दारिद्रय, अज्ञान दूर करण्याचं स्वप्न ते आपल्या कथात्म साहित्यातून पाहात होते. उच्च, मध्य आणि निम्न वर्गात विभाजित समाज आपल्या वर्ग चेतनात गुरफटलेला असल्यामुळे स्वातंत्र, समता, बंधुता, लोकशाही आणि विज्ञाननिष्ठा या पंचशीलाच्या आधारे ते वर्ग संवेदनांपलीकडे जाऊन समानशील एकात्म समाज कसा निर्माण करतील याच चित्रण खांडेकर करू इच्छित होते. त्या सर्व समाजाच्या व्यथा, वेदना हा त्यांच्या साहित्याचा केंद्र होता. जग हे बदलायचे' असा ध्यास घेऊन निघालेला खांडेकर यांच्यासारखा लेखक एका अर्थाने नव्या मानव समाज निर्मितीचे चित्र रंगवत होता. त्यात भाबडेपणा असला तरी सच्ची तळमळ होती. जीवन आणि साहित्य खांडेकरांसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असे म्हटले तर ते वावगे। ठरू नये.
 वि. स. खांडेकरांनी सुमारे ३५० लघुकथा लिहिल्या. त्यांच्या हयातीत जे ३६ कथासंग्रह प्रकाशित झाले त्यात सुमारे ३00 मौलिक कथा संकलित झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात स्वप्न आणि सत्य', 'भाऊबीज', ‘विकसन’ आणि ‘सरत्या सरी' सारखे कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यात उर्वरित ५० कथा संकलित झाल्या आहेत. त्यांसह डॉ. सविता व्हटकर यांनी कथांत चित्रित समस्यांचा अभ्यास प्रस्तुत करून आपल्या संशोधनास आधुनिक बनवलं आहे व एक प्रकारे त्यामुळे हे संशोधन मौलिकतेकडे झुकते. कथाकार म्हणून खांडेकरांना अपूर्व लोकप्रियता व मान्यता मिळाली. मराठी रूपक कथांचे सर्जक व विकासक म्हणून खांडेकरांकडे पाहायला हवं. या सर्व कथांतून खांडेकरांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक समस्यांचे चित्रण केले. खांडेकरांच्या राजकीय कथा फारशा नसल्या तरी त्यांच्या कथांचे विषय, पाश्र्वभूमी काही ठिकाणी राजकीय आढळते. मराठी कथेत मध्यमवर्गीय जाणिवा व समस्यांची जितकी चर्चा, चिकित्सा खांडेकरांनी केली तितकी ती अन्य समकालीनांमध्ये आढळत नाही. यावरूनही खांडेकरांच्या कथाकार म्हणून असलेल्या समस्याकेंद्री विवरण आणि विश्लेषणाचा विचार करून डॉ. व्हटकर यांनी खांडेकरांच्या समाजशील कथाकारास योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
 तीच गोष्ट कादंब-यांची पण. नवी स्त्री' सारखी कादंबरी असो वा ‘सोनेरी स्वप्न भंगलेली असो, अपूर्ण वा अप्रकाशित राहिलेल्या कादंब-यांसह डॉ. सविता व्हटकर समस्यांचा पट मांडतात तेव्हा त्यांच्या या संशोधनपर लेखनास समग्रता लाभते. कथेप्रमाणेच खांडेकरांनी मराठी कादंबरीस नवा


प्रशस्ती/२४८
________________

रचनाबंध बहाल केला. दीर्घ प्रस्तावना लिहून खांडेकरांनी त्या त्या कादंबरीतील समस्या चित्रणामागील भूमिका विस्ताराने स्पष्ट केल्याने त्यांच्या कादंबच्या समकालीन समस्यांसंदर्भात केवळ वर्णन नव्हे, तर संदर्भ ग्रंथांचे कार्य करतात. १९३० ते १९७६ हा खांडेकरांच्या कादंब-यांचा कालखंड. या काळाचे समाज प्रतिबिंब त्यांच्या कादंब-यांत आढळते. विसाव्या शतकाच्या मध्यकाळातील समस्या ज्यांना शोधायच्या असतील, त्यासाठी या कादंब-या। म्हणजे सामाजिक दस्तावेजच होत. मध्यमवर्गीय समाज खांडेकरांच्या कादंब-यांचा केंद्र असला तरी त्यात दलित, पीडित, मजूर, अत्याचारित, प्रताडित स्त्रिया, शेतमजूर वर्ग सर्वांचे चित्रण आढळते. दुस-या महायुद्धानंतर घडलेल्या समाज परिवर्तनाने बदललेला समाज अधिक आत्मकेंद्री व भौतिक, लोभी झाला. शरीर सुखाच्या हव्यासाने त्याला 'ययाती' बनवले. ज्ञानपीठ पारितोषिकाचा मान मराठी सारस्वतास पहिल्यांदा मिळवून देणाच्या या रचनेने समाज शिल्पकार खांडेकर आणि त्यांच्या समस्या चिकित्सकाच्या द्रष्ट्या भूमिकेस राष्ट्रीय मान्यताच बहाल केली. मनाचा कांचनमृग झालेला समाज मृगजळातील कळी बनूनच राहणार हे खांडेकरांचे सुभाषित म्हणजे एक समाज भाष्य व सिद्धांतच होय.
  कथात्म साहित्यातील समस्या चित्रित करणारी वि. स. खांडेकरांची भाषा आणि शैलीचा स्वतंत्रपणे विचार करून डॉ. सविता व्हटकरांनी आपले विवेचन सारग्राही करण्याचा प्रयत्न केला आहे. खांडेकरांचं कथात्म साहित्य म्हणजे कल्पना आणि वास्तवाचा मेळ! आदर्श आणि यथार्थाची सांगड घालताना खांडेकर कधी कल्पना रम्यतेत तर कधी दुःखाच्या गर्तेत सापडतात. त्यानुसार त्यांची भाषा कधी हृदय पिळवटणारी तर कधी चांदणं । शिंपडणारी होते. अलंकार, सुभाषितांनी त्यांची शैली कधी चिंतनशील तर कधी जीवनबोधक बनते. हे सर्व सूक्ष्मतेने पकडून डॉ. व्हटकरांनी खांडेकर केवळ जीवनबोधक साहित्यकार नव्हते तर कलासक्त मन लाभलेले ते एक दिव्य कलाकार होते हे सांगितले आहे.


 ‘वि. स. खांडेकरांच्या कथात्म साहित्यातील समस्यांचे चित्रण' ग्रंथ खांडेकर साहित्य अभ्यासातील एक आश्वासक पाऊल होय. खांडेकरांच्या निधनास तीन दशकांचा काळ लोटला तरी त्यांच्या कथात्म साहित्यास नवा युवक वाचक वर्ग व नवे नवे संशोधक, अभ्यासक लाभतात यातच । त्यांच्या साहित्याचा मृत्युंजयी प्रत्यय येतो. तेच त्यांच्या साहित्याचं श्रेष्ठत्व म्हणावं लागेल.

◼◼



दि. ३० सप्टेंबर, २०११


प्रशस्ती/२४९
________________


दलित मित्र तांबट काका (स्मारक ग्रंथ)
प्रा. डॉ. दिनकर पाटील/डॉ. जे. के. पवार
प्रकाशन - २00९

नवसमाज निर्मितीची संजीवनी _____________________________________________


 प्रा. दिनकर पाटील व प्रा. जे. के. पवार या संपादक मित्र द्वयांनी ‘दलित मित्र तांबट काका' हा स्मारक ग्रंथ २ ऑक्टोबर, १९८६ ला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रकाशित केला होता. त्याला प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञाची प्रस्तावना लाभली होती. या घटनेला दोन दशकांहन अधिक काळ लोटला. या स्मारक ग्रंथाची पहिली आवृत्ती संपल्याने प्रकाशक व संपादक मित्रद्वयांनी त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा मनसुबा रचून या आवृत्तीची । प्रस्तावना मला लिहिण्याचा घाट घातला आहे. त्यांचा प्रेम नि आदर मी समजू शकत असलो तरी क्रांतिकारी तांबट काकांसारख्या देशप्रेमी व सेवाभावी व्यक्तीच्या स्मारक ग्रंथास प्रस्तावना लिहायला आपले हात । किती तोकडे आहेत, याची जाणीव हा ग्रंथ वाचताना मला प्रकर्षाने व तीव्रतेने झाली.
  हा स्मारक ग्रंथ सिद्ध झाला तेव्हा दलित मित्र तांबट काकांचे जीवन व कार्य शब्दबद्ध व्हावे, इतिहासात त्यांच्या क्रांती व सेवा कार्याची नोंद व्हावी, त्यांच्याबद्दलचा आदर विद्यार्थी, आप्त, स्वकीय, समकालीन सर्वांना व्यक्त करण्याची संधी मिळावी हा उद्देश होता. ३0 जुलै, १९८२ ला तांबट काकांचे वृद्धापकाळाने कराड मुक्कामी निधन झाल्यानंतर स्मृती
प्रशस्ती/२५०
________________

संग्रहाचा संकल्प झाला तरी पाहता-पाहता चार वर्षे लोटली होती. कार्य व संकल्प यात जसे अंतर असते तसेच संकल्प आणि सिद्धीतही! सत् संकल्प क्वचितच सहज सिद्ध होतात. या पार्श्वभूमीवर आज दोन दशकानंतर या स्मारक ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाचे औचित्य काय असा प्रश्न पडणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
 गेल्या दोन दशकात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलं आहे. देशप्रेम म्हणजे काय हे कानी-कपाळी ओरडून सांगितलं तरी नव्या पिढीच्या गळी ते उतरत नाही. कारण आजूबाजूला सर्वत्र स्वार्थाचा बुजबुजाट आहे. सेवाधर्म नावाची गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीत होती. कारण त्यांच्यापुढे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छ. शाहू महाराज, महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य प्रेरणा व आदर्श म्हणून होते. स्वातंत्र्योत्तर काळात अन् विशेषतः आणीबाणीनंतर (१९७५) राजकीय घसरण झाली. राजकारण जगण्याचे साधन झाले. सेवा शब्द इतिहास जमा झाला. मेव्याची दुकाने सुरू झाली (आता तर त्याचे मॉल्सही झालेत!) जागतिकीकरणाच्या रेट्याने माणसास महत्त्वाकांक्षेच्या रेसकोर्सचा कायम जिंकू इच्छिणारा गतिमान घोडा जसा बनवले तसाच व्यक्तिगत जीवनात तो स्वतःच्या स्वार्थाभोवती फिरणारा मतलबाच्या घाण्याचा डोळ्यावर झापड बांधलेला बैलही झाला. कल्पनेत उत्तुंगतेमुळे व गतीमुळे घोड्यास समाजजीवनात आपल्या पलीकडचं दिसत नाही व । घरी तर तो सर्वांत असून एकटाच! अशा सामाजिक शोकांतिकेच्या पार्श्वभूमीवर दलित मित्र तांबट काकांचे जीवन व कार्य नव्या पिढीपुढे आले तर त्यांची स्वार्थ गती मंदावेल व ते डोळे उघडून आपल्या पलीकडचं संवेदनशीलपणे व सहभाव, समभाव आणि सहानुभूतीने पाहू लागतील असे वाटल्यावरून हे पुनर्प्रकाशन योजले असावे व ते प्रसंगोचितच म्हणावे लागेल.
 दलित मित्र तांबट काकांचे मूळ नाव लक्ष्मण रावजी ठोंबरे. त्यांचा जन्म सन १८९९ चा. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या या सत्परुषाने दोन शतके पाहिली. तसा सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग लाभलेले गृहस्थ. सहावीपर्यंतचं अल्प शिक्षण. वडिलोपार्जित व्यवसाय शोभेची दारू तयार करण्याचा. पण या माणसास काळाचं पक्क भान होतं. घरी, दारी, बाजारी शोभेच्या दारूची आतषबाजी आपण दिवाळी, दसरा, लग्न, मुंजीत करतो, पण हा काळ पारतंत्र्याचा आहे. शोभेची दारू सुरुंगाची बनवून या गृहस्थाने


प्रशस्ती/२५१
________________

विहिरी खोदल्या. किर्लोस्करवाडीत किर्लोस्करांच्या लोखंडी नांगराचा कारखाना सुरू झाल्यावर यांच्याच दारूचे सुरुंग उडवले गेले व कातळातून पाण्याची कारंजी व पाझर निर्माण झाले. सुरुंगाच्या दारूचा उपयोग करून पारतंत्र्यास हादरा देण्याचं त्यांनी ठरवलं नि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारचे ते खंदे समर्थक व भूमिगत सहाय्यक झाले. स्वातंत्र्यानंतर सुरुंग उडवणाच्या हातांनी सेवाधर्म स्वीकारून कुंडलला आपले कार्यक्षेत्र बनवले. व गरीब, वंचित, दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करून त्यांनी रचनात्मक, विधायक कार्याची कास धरली ती अखेरच्या श्वासापर्यंत. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे यांच्या माळेतील पुढचा मणी म्हणून ते ममतेची माउली व सेवेची सावली झाले.
 या स्मारक ग्रंथात लेख, आठवणी व पत्रांचा संग्रह आहे. लेख दोन प्रकारचे आहेत. एक समकालीन समवयस्कांचे व दुसरे समकालीन उत्तराधिका-यांचे. समकालीनांच्या लेखातून तांबट काकांचे कार्य जिवंत होते. उत्तराधिका-यांच्या लेखातून आदरभाव स्पष्ट होतो. या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. हा भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकार्याचा आलेख जसा आहे तसा तो सेवाभावी स्वातंत्र्योत्तर समाजकार्याचा दस्तऐवजही. यातून महाराष्ट्रातील वसतिगृहांचा इतिहास समजतो. तसेच क्रांतिकारकांची शौर्यगाथा म्हणूनही त्याचे मोल आहे. असा बहुगुणी स्मारक ग्रंथ एकविसाव्या शतकातील पिढीपुढे अशासाठी असणे आवश्यक आहे की आजच्या पिढीस दूरचं दिसेनासं झालंय. त्यांनी ऐकून घ्यायचंही बंद केलंय. स्कार्फस्, इअर फोन्स, मोबाइल्स, गॉगल्स हेच नाही का सिद्ध करत? । |
 अशा काळात ‘दलित मित्र तांबट काका' हा स्मारक नि गौरव ग्रंथ अंजनाचे काम करील. या ग्रंथात हे असू शकतं, हे होऊ शकतं, ठरवलं तर अशक्य नाही असा आश्वासक दिलासा देण्याचे बळ व विधायक कार्याची जी प्रेरणा ओतप्रोत भरलेली आहे त्यातून स्वार्थांध समाजातून परार्थाचा (परमार्थाचा नव्हे!), परहिताचा पाझर फुटेल अशी आशा आहे तसे झाले तर या स्मारक ग्रंथाच्या संकल्पातून नवसमाज निर्मितीची संजीवनी हाती आल्याचे समाधान संपादक, प्रकाशकांना लाभेल. तीच खरी संकल्पसिद्धी होय. कै. शं. वा. किर्लोस्कर, रा. ना. चव्हाण, शाहीर शंकरराव निकम, ल. गो. कासेगावकर (धन्वंतरी) प्रभृतींचे लेख तांबट काकांचे इतिहासजमा आयुष्य परत संजीव करतात. माणसास पुनर्जन्म नसतो, हे खरे पण आठवणींना मरण नसते याची साक्ष म्हणजे हा ग्रंथ.


प्रशस्ती/२५२
________________
जीवन नसते नुसती हकिकत,

घटना नि इतिहासही!
आठवांच्या पाझरांची झालर जिथे

(पुनर्जन्म नसला खरा तरी)
तिथे स्मृतींना मरण नक्की नाही!

◼◼


दि. २१ मार्च, २००९


प्रशस्ती/२५३
________________


परीस (कथासंग्रह)
आदित्य जवळकर
प्रकाशन - २०१५

_______________________________

‘टच स्क्रीन' हाच नव्या युगाचा परीस
 ‘परीस' हे बाल साहित्यिक आदित्य जवळकरचं दुसरं पुस्तक. यापूर्वी या बाललेखकाचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. ‘सोनेरी गुलाब' त्याचं नाव. यात दोन गोष्टी आहेत. एक आहे 'सोनेरी गुलाब'. दुसरी आहे ‘पंधरा कोटींची चोरी'. या दोन्ही गोष्टी बाल वाचकांना आवडल्या. त्यामुळे आदित्यला हरूप आला. दोन वर्षांनी आता त्यानं नवी गोष्ट लिहिली. ‘परीस’ तिचं नाव. ही तशी मोठी कथा. पहिल्या दोन कथांपेक्षा पस्तीस पानं भरून लिहिलेली ही गोष्ट. ती सुरस, चमत्कारिक आणि साहसी कथा आहे. गोष्टी सांगणं आणि ऐकणं सर्वांना आवडतं.
 गोष्टी ऐकता सगळ्यांना येतात. फारच कमी लोकांना गोष्ट सांगता येते. त्याचंही एक कारण आहे. गोष्ट सांगणं एक कला आहे. ती सान्यांनाच नाही जमत. तसं गोष्टी लिहिण्याचं पण आहे. सगळेच काही गोष्टी नाही लिह शकत. कारण ते एक कौशल्य आहे. ज्यांना छान छान कल्पना सुचतात, ते सुरस गोष्टी लिहू शकतात.
  माणूस पूर्वी जंगलात राहायचा. झाडपाला हाच त्याचा पोषाख. तो गुंफेत राहायचा. कंद, मुळे, फळे खाऊन जगायचा. शिकारही करायचा. शिकारीच्या गोष्टी तो शेकोटीस बसून सांगायचा. मग त्यानं त्याच गोष्टींची


प्रशस्ती/२५४
________________

चित्रं गुंफेत कोरली. मग तो रंगवू लागला. शेकोटीची गोष्ट होती हावभावांची. नंतर त्यानं भावाला भाषा दिली. भाषेला लिपी मिळाली तसं गोष्टीचं पुस्तक तयार झालं.
 आदित्यची ‘परीस' कथा सोनपूर राज्याची. तिथं वृषसेन राजा राज्य करायचा. त्यानं एकदा यज्ञ करायचं ठरवलं. त्या काळात अचानक एक गरुड अवतरला. त्यातून विचित्र अलौकिक घटना घडल्या. केशव वाचला. बाकी सारं राज्य नष्ट झाल. त्याला ब्रह्मांडी भेटला. त्यानं केशवला तीन मणी - सिंहमणी, नागमणी, राजमणी आणले तर परत राज्य निर्माण करता येईल असे वरदान दिलं. ते तीन मणी हेच केशवचे ‘परीस' ठरले. ते त्यानं कसे मिळवले त्याची चमत्कारपूर्ण, साहसी कथा.
  मला विचाराल तर आदित्यने ही गोष्ट जुन्याच पद्धतीने लिहिली. आपण एकविसाव्या शतकात आहोत. या युगात काय कमी चमत्कार आहेत? नोबिता पाहता ना? डोक्यावर पंखा घेऊन उडणारा माणूस? बटन दाबलं की उघडणारं दार. स्पर्श केला की छू मंतर काहीही होतं. माणूस नसलेली विमानं. परग्रहावर लोक किती नव्या नव्या कल्पना आजच्या कथेत आल्यात. अशावेळी यज्ञ म्हणजे विज्ञानात वेदाची गोष्ट सांगणं. आदित्यमध्ये प्रचंड कल्पनांचं भांडार आहे. वर्णन करण्याची छान कला आहे. तो घटना, प्रसंग सुरेश गुंफतो पण पुराणात रमतो. त्याने स्वर्ग सोडून अवकाशात भरारी घेतली पाहिजे. गरुडाऐवजी त्याच्या कथेत रॉकेट हवं. मोबाईल, व्हिडिओ गेम, इंटरनेट, कॅफे, कॅसिनो, वंडरवर्ल्ड, वॉटरपार्क, थ्रीडी थिएटर हवं. मग त्याच्या कथेला वाचक मिळतील. आई-बाबांसाठी नाही आपण लिहायचं. आपण लिहायचं लिट्ल वंडर्स, किड्स पार्क, गॅझेट्स च्या गमती. टच स्क्रीन हाच नव्या युगाचा ‘परीस' आहे, हे लक्षात । घेऊन आदित्य लिहील तर तो भारताचा ‘हॅरी पॉटर' होईल. ।
  तरीही त्याची ‘परीस' कथा काही कमी प्रतीची नाही. तिच्यात क्षणाक्षणाला दे धमाल फंडे आहेत. ते एकदा मुळातून वाचलेच पाहिजे. जुन्यातूनच नवं सोनं उगवतं ना? आदित्यचं अभिनंदन! चीऽ ऽज!! हिप हिप हुरे।।।


◼◼


दि. १३ मार्च, २०१५


प्रशस्ती/२५५
________________


दुःखभोग (कविता संग्रह)
शांतीनाथ वाघमोडे

___________________________________


प्रतिकूलतेतही स्वतःचा सूर्य शोधणारी कविता

 कवी शांतीनाथ वाघमोडे नवोदित कवी होत. ते मूळचे चिकमहूदसारख्या सांगोल्याजवळील (जि. सोलापूर) खेड्यातील. नोकरीच्या निमित्ताने नाशकाला आले. दोन्ही गावं एका राज्यातली असली तरी दोन राष्ट्रांइतका सुबत्तेतील फरक. परिस्थितीतील अंतर त्यांना अस्वस्थ करतं. व्यवसायानं प्राथमिक शिक्षक असल्यानं असं का? ची जिज्ञासा त्यांना अंतर्मुख करते. या निरंतर विचारातून त्यांची कविता जन्मते. त्यामुळे तारुण्यसुलभ प्रेम, प्रणयाशिवाय ती कविता शेतकरी, शेत, जीवन, ऋतू, माणूस, उपेक्षा, भूक, धर्म अशा कितीतरी वळणांनी समग्र जीवन व्यक्त करते. माणसाचं सारं जीवन म्हणजे असतो एक ‘दुःखभोग'. हा निष्कर्ष सूचित करणारं शीर्षक ल्यालेल्या या काव्यसंग्रहात दुःख, निराशेची झालर अनिवार्यपणे येते, कारण कवी आणि त्याच्या भोवतालचं जग प्रतिकूलतेशी झगडत जगणं सुकर करत आहे.
 ‘दुःखभोग' मधील कविता फार कलात्मक नसल्या तरी आशयसंपन्न होत. कविता लेखन शांतीनाथ वाघमोडेंचा वेळ घालवायचा छंद नसून जीवनाचा तो जाणीवपूर्वक घेतलेला शोध आहे. यातील अनेक कविता नाशिकमधील सकाळ, लोकमत, गावकरीसारख्या दैनिकातून प्रसिद्ध झाल्याने वाचकांपर्यंत सुट्या-सुट्या अगोदरच पोहोचल्या आहेत. त्यातून कवी


प्रशस्ती/२५६
________________

नाही समजत. तो सुटा-सुटा समोर येतो. कवी व्यक्तिमत्त्व व वृत्ती कळायची तर अनेक कविता एकदम समोर यायला हव्यात. या संग्रहात सुमारे एक ८0 कविता आहेत. आकाराने म्हणाल तर त्या छोट्या कविता होत. त्यामुळे अल्पाक्षरी परंतु आशयगर्भ कुशल गायकाच्या तानेतील सूक्ष्मता यात नाही पण ती अनुभव वैचित्र्यानं नटलेली आहे. मुळात अनुभवाचा गाभा मजबूत असल्यानं ती पकड घेते पण पकडून नाही ठेवत. त्यासाठी कवीनं अजून बराच रियाज करायला हवा. काव्य रचनेतील गद्य प्रभाव जाईल तसा ही कविता अधिक कलात्मक होईल. कवितेत क्रियापदं शेवटी येत राहिली, अनावश्यक शब्द भेटत राहिले की कवितेतील । रसात्मकतेस हानी पोहोचते. म्हणून कवीचं लक्ष आशयाइतकंच अभिव्यक्तीकडे असायला हवं. वक्रता, अल्पाक्षरिता, ताल, अलंकार, संगीत, निसर्ग, सौंदर्य सारं कवितेत हवं पण आपसूक आलेलं!
 ‘दुःखभोग' मधील कविता भावप्रवण आहे. शोक, नैराश्य तिचा स्थायीभाव वाटतो. चिमण्या नाहीशा होणं, माणसाचं बुजगावणं होणं यातला कवीमनाचा विषाद वाचताच लक्षात येतो. या कवीला आपल्या डोळ्यातील आसवांपेक्षा बळीचे अश्रू अधिक अस्वस्थ करतात. त्या अर्थानं ‘दुःखभोग' काव्यसंग्रह व्यापक वेदनेचे वर्तुळ घेऊन येतो. कवितेत अनेक ठिकाणी व्यक्तिगत जीवनातले हळवे कोपरे, खुणा आहेत, पण ओढ मात्र समाजाची नक्की! दलित कवीच्या मनातली श्रद्धास्थानं तुम्हास या कवितांत जरूर भेटतील. पण म्हणून ही कविता दलित नाही होत. तिचा पोत ग्रामीण कवितेशी सूत बांधणारा, नाळ जोडणारा वाटतो.
 कुणी सांधावा फुटला बांध
 बळीच्या मनाचा?
 विचारणारा हा कवी आपणास या संग्रहात जागोजागी भेटतो. ‘अत्तदीप भवो' म्हणणारी कविता 'स्व'पेक्षा ‘पर'च्या शोधास अधिक आसुसलेली वाटते. वाट पाहणारं, श्वासात अडकलेलं या कवितेतलं गाव मिटल्या पापण्यांचा हिशोब मागतंय. आभाळ, पाऊस, बळी, शेत, झरे, काजवे, माती इ. प्रतिमानं घेऊन येणारी ही कविता श्वास, अश्रू, हुंदके इ. मुळे माणूस व निसर्गातलं नातं, द्वंद्व समजावते. 'देवाचिया द्वारी', 'ठेका', ‘जातो रे' सदृश्य रचनात अभंग-ओवींचा प्रयोग या कवितांना, त्यातील दुःखाला आध्यात्मिक पातळीवर नेऊन बसवतो.
 ‘दुःखभोग' काव्य संग्रह समग्रतः जगण्याचा शोध होय. तो घेत कवी स्वतःला सानुला करत अधिक मोठं जग कवेत घेऊ इच्छितो. 'माझे


प्रशस्ती/२५७
________________
आयुष्य मी इवले झरेच मानले' अथवा 'माझे साधे जगणे मोठे' मानणारा हा कवी नम्रदास बनून आपली मर्यादाच मान्य करताना आढळतो. असं मातीत पाय रोवून आकाशाकडे डोळे लावणाच्या बळीराजाचं काळीज घेऊन आलेली ही कविता सर्वत्र शोकाकुल भावाने ओथंबलेली. पण या । कवीची उद्याची कविता आनंदघन व्हायची तर जीवनाच्या उज्ज्वल पक्षाची पडताळणी तिनं करायला हवी. आत्महत्येकडे जाणाच्या वाटेपेक्षा आत्मभान देणारं पाथेय या कवितेस लाभेल तर प्रतिकूलतेतूनही स्वतःचा सूर्य उगवण्याचं सामर्थ्य शांतीनाथ वाघमोडे दाखवू शकतील. भविष्यकाळात ते त्यांनी दाखवावं अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना पुढील काव्य प्रवासास शुभेच्छा!

◼◼


दि.२६ मे २०२१


प्रशस्ती/२६०
________________


विकल्पवाट (कविता संग्रह)
सौ. मंदाकिनी देसाई
२0१४

_________________________________________________


पंख अडकलेल्या पाखराची तडफड


 ‘विकल्पवाट' हा सौ. मंदाकिनी देसाई यांचा कवितासंग्रह वाचला. संग्रहाचं शीर्षक मोठं सूचक नि सार्थ आहे. माणूस कविता का लिहितो? त्याचं उत्तर आहे विकल्पवाट शोधण्यासाठी. माणसाची कविता काय असते? ती असते एक विकल्पवाट, माणूस जगत असताना समाजाची मी मान्यता चौकट स्वीकारते. ती समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक असते. पण माणूस उपजत दुभंग असतो. शरीर या चौकटीत व्यवहार करतं. मन मुक्त असतं. ते कधी मनाच्या अंतरंगात खोल डुबकी मारतं तर कधी उंच आकाशात भरारी. अंतर्मनात कवी डोकावतो. तेव्हा त्याचं अप्रगट मन व्यक्त होतं. जेव्हा तो निसर्गात विचरतो ते त्याचं प्रगट मन असतं. या दोन्हीचं मीलनही घडतं. तिथं निसर्ग जीवनास भिडतो.


 मंदाकिनी देसाईंची कविता ही मूलतः स्त्री मनाचा उद्गार आहे. त्याला कोंडमारा म्हणणं जास्त सयुक्तिक होईल. ती ज्या चौकटीच्या जगात जगते ते तिचं जग नाही. तिचं जगणं म्हणजे अंतर्मनातील घालमेल. ती घालमेल एका आई, पत्नी, बहिणीची आहे. ती प्रगट घालमेल. पण अंतर्मनातील कालवाकालव सत्यरूपात, थेट व्यक्त करणं आपल्या मर्यादाप्रधान समाजात व्यभिचार ठरतो. मग ती कवितेची विकल्पवाट धरते आणि स्वतःला व्यक्त करत राहते.


प्रशस्ती/२५९
________________


 ही कविता मुखपृष्ठाप्रमाणे गुलमोहराची गर्द झाडी, सावली, सुगंध, रंगानी भरलेली, माखलेली आहे. सत्यास साक्ष ठेवून लिहिलेली ही कविता आत्म्याची सजावट आहे. कवयित्रीला आत्मा सजवावा लागतो. ती तिची चौकटीची मजबुरी आहे. ती नसती तर कविता आणखी खुलली असती, खरी झाली असती. कवयित्रीच्या मनाचा इमला वाळूचा ठरावा ही तिची शोकांतिका आहे. ते तिच्या अंतर्मनाचं शल्य आहे. ‘दुःख अंतरीचे सांडू कुठे?' सारख्या प्रश्नात तिची अगतिकता व्यक्त होते. व्यक्त व्हावं इतके अंतरीचे ढग भरून आलेत. तिला अश्रू परतवून लावायचे आहेत. कारण । तिला आपलं जीवन रडगाणं बनवायचं नाही. ती तराणा गाऊ इच्छिणारी मुक्त कोकिळा बनू इच्छिते. ते तिचं स्वप्न आहे. मनातली गृहितं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करूनही जमत नाही याचं तिला वाईट वाटतं. गृहिणी म्हणून किती समायोजन (Adjustment) करत राहायचं? हा अखिल भारतीय स्त्रीला पडलेला प्रश्न तिचाही यक्षप्रश्नच आहे. तरी ती फुला-फुलांत गंध शोधत स्वतःच स्वतःचं सांत्वन करत राहते. जग हिशोबाचं पुस्तक व्हावं याचं तिला दुःख आहे. तिच्या लेखी जगणं म्हणजे नात्यांचा निव्र्याज गोफ गुंफणं असतं. तिला पंखात बळ घेऊन उंच भरारी मारण्याची महत्त्वाकांक्षा आहे. पण जगण्याच्या बेड्या तिच्या पंखांना नेहमीच बंदिस्त बनवत आल्यात. ‘हम दो हमारे दो' ‘हमारा बजाज' असं आत्मकेंद्रित, बंदिस्त, मध्यमवर्गीय जगणं तिचं नाही. तिच्या जगण्याचा परीघ जग आहे. जागतिकीकरणातील तिची कविता म्हणून तर झाडाच्या फुटलेल्या पालवीला मोबाइलच्या चार्जरची उपमा देते. ती पतीला प्रेरणा मानते. पण पतीच्या लेखी ती कोण अशी तिची जिज्ञासा अतृप्तच आहे. कारण तो भरलेल्या ढगासारखा... नुसता भरलेला... पण न बरसणारा! स्त्रीला वाटत असतं आपल्या झिजण्याचं, सोसण्याचं, सहन करण्याचं कधीतरी कौतुक नसेना पण कृतज्ञ स्मरण व्हावं... जाण व्यक्त व्हावी. ती भावाची भुकेली बिचारी.
 या कवयित्रीला चांदण्यात न्हायचं आहे. पण ते तिच्या नशिबी नाही. कारण जगण्याची चौकट ती मोडू इच्छित असूनही शील, नातं, मर्यादा तिला ती विकल्पवाट घेऊ देत नाही. नियतीशरण तिचं जीवन ही तिची दुखरी नस आहे. तिची ठसठस या कवितेत भरून पावली आहे.
 यातील काही निसर्ग कविता विलक्षण आहेत. ‘सूर्यफुली'मधील सूर्यफूल, ज्वारी व तुरीमधील संवाद ‘हृद्य आहे. 'बहर सांडूनी वसंतातला झाला गुलमोहर मोकळा' सारख्या ओळी केवळ निसर्गाचं मोकळं होणं नाही


प्रशस्ती/२६०

व्यक्त करीत. त्यात मानवीकरणाचंही प्रगटीकरण आहे. कवितेतला निसर्गही जीवनलक्ष्यी आहे. काट्यांविना जीवन नाही' हे वास्तव ही कविता चित्रित करते. जीवन प्रौढ होतं अन कधी काळच्या सुरेख रांगोळ्यांचे रंग पुसट होत जातात... ही यथार्थता कवयित्रीला विकल करते. तिचा भरलेला अन् भारलेला गळा म्हणजेच तिची कविता आहे.

ती कुंपण घालून घेते स्वतःभोवती, स्वतःच्या हातांनी... ते कुंपणच तिचं सुख आहे आणि दुःखही. सुख-दुःखाच्या द्वंद्वांनी भरलेली ही विकल्पवाट... केव्हातरी तिला विकल्प शोधावा लागेल... घुसमटत जगायचं की मोकळा श्वास घेत? हा भारतीय स्त्रीचा प्रश्न घेऊन येणारी कविता पंख अडकलेल्या पाखराची तडफड आहे. तीत आकांत आहे, धडपड आहे, तगमग आहे, तळमळ आहे... सारं सारं असलेली ही कविता भारतीय स्त्री जीवनाचं सार आहे.


दि.२१ जुलै,२०१४


◼◼


प्रशस्ती/२६१
________________

महायुद्ध(काव्यसंग्रह)
वसंत भागवत ________________________________________


अनुभवांचे युद्ध आणि अभिव्यक्तीची सुबोधता
 ‘महायुद्ध' हा वसंत भागवत यांचा काव्यसंग्रह. त्या संग्रहातील कविता म्हणजे कवीच्या जीवन, अनुभव, विचार, दृष्टीची अनुभूती आणि अभिव्यक्तीही. हा कवी, त्याचा माझा परिचय नाही. कवीची खरी ओळख त्याची कविताच असते. या सूत्रानुसार समजून येणारा कवी दलित अनुभव घेऊन जगणारा. त्याला आपण खालच्या जातीत जन्मल्यानं उपेक्षा, अपमान, अत्याचार सहन करावे लागले असे त्यांची कविता परोपरीने वाचकास समजावते. त्यामुळे ‘जात व्यवस्था' नाकारून तो मनुष्य व्यवस्था स्वीकारतो, रुजवू पाहतो ही त्याच्या जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मक वृत्तीचे निदर्शक आहे. ‘जात पुसायची आहे म्हणणारा हा कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसदार आहे. जातिसंस्थेचे उच्चाटन ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, “जातीमुळे आर्थिक क्षमता वाढते असे नाही. जातिव्यवस्थेने ना पूर्वी कधी वंशविकास केला ना ती या पुढे करू शकेल! जातिभेदाने एक गोष्ट मात्र निश्चित केली. तिने हिंदू समाजाचे पूर्णतः विघटन केले आणि नैतिक अधःपतनही! (पृ. ५८) समाज जीवनात पदोपदी जातीच्या आधारे माणसाचं मूल्यमापन, स्वीकार, नकार ठरतो याचं कवीस शल्य आहे. जातनिरपेक्ष प्रेम समाज अद्याप स्वीकारत नसल्याची खंत कवीस आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह


प्रशस्ती/२६२

समर्थक कवी वसंत भागवत म्हणतात की असे विवाह पासंगालाही सापडत नाही. कवीचा विचार बरोबर असला तरी आज समाज जीवन प्रगत होते आहे आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह संख्या वाढते आहे. अशा विवाहांना होणारे प्रतिक्रियात्मक विरोध कालौघात विरून, विरघळून जाताना मी रोज पाहतो आहे. असे काम मी गेले अनेक वर्षे करत असल्याने परिवर्तित समाजमनाचं माझं आकलन सकारात्मक आहे.
 कवी समाज रचनेच्या संदर्भात विधायकतेचा पुरस्कर्ता आहे. त्यास हिंसा अमान्य आहे. मतभेदापोटी रक्ताचे पाट वाहणे त्यास मंजूर नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारण कशासाठीही हिंसा तो त्याज्यच मानतो. यावरून त्याची समाजशीलता ‘महायुद्ध' सारख्या काव्यसंग्रह शीर्षक कवितेतून स्पष्ट होते. धार्मिक भाईचारा, जातीय बंधुता केवळ गाण्यात नको, आचरणात असण्याचा आग्रह आपल्या कवितेतून करणारे वसंत भागवत भावनेच्या पेक्षा विचारावर कृती ठरवण्याच्या पक्षाचे आहेत हे महत्त्वाचे. ‘महायुद्ध' काव्य संग्रहातील महायुद्ध भावनिक, सामाजिक, व्यावहारिक सर्व प्रकारची आहेत. ‘तुझा काही दोष नाही', ‘मी का तो', 'देह', 'धग', ‘संगत' सारख्या कवितात प्रेम, प्रणय, वासना, विरहाचं युद्ध, द्वंद्व, काहर कवींनी शब्दबद्ध केलं आहे. 'लाखोल्या', ‘पूरग्रस्त', ‘फास', 'व्यभिचार' सारख्या रचना सामाजिक दोषांवर प्रहार करत समाज जीवन निकोप ठेवण्याचा प्रयत्न करताना प्रतिबिंबित होतात. साहित्यिक’, ‘साधा भोळा कवी' या कविता कवीच्या प्रतिभासंपन्न स्वप्नांची अपत्ये होत. ‘पानझड', ‘दुष्काळ' रचना पर्यावरणाच्या पण त्यामागेही समाजमन डोकावताना आढळतं.
 या संग्रहातील अधिकांश कविता या बालबोध शब्दवळणाच्या असल्या, तरी कवितेतील कवी मनाची संवेदना अस्सल आहे. ऐन तारुण्यातील कविता अनुभवांच्या तोकडेपणामुळे नेहमीच सुबोध राहते. त्यात न व्यामिश्रता असते न संप्रेषणीय कलात्मकता. पण कविता ही जेव्हा कवीच्या भोगाचे प्रतिबिंब किंवा प्रतिक्रिया म्हणून सहजस्फूर्त जन्मते तेव्हा तिचं असं अस्तित्वबोधी योगदान राहतं. ते ‘महायुद्ध' काव्यसंग्रहातील काव्यरचनात आपणास पाहायला मिळेल. काही कवितांत कवी भागवत बोलीचा वापर करतात. तेव्हा ती कविता वाचकास अधिक भिडते. मेंदूचा भेजा फ्राय होणे' सारखे वाक्प्रचार कवितेस समकालीन भाषेचे वाहकसिद्ध करतात. ‘व्यभिचार'मधील कवीची भावतीव्रता, प्रतिक्रिया स्वाभाविक व प्रभावी आहे. लिंगभाव विरहित समाजाचे स्वप्न कवी वसंत भागवतांचं भाबडेपण। सिद्ध करतं. 'कल्लोळ' मधील टाहो हृदय पिळवटणारा आहे. भडभुंज्यांच्या


प्रशस्ती/२६३

◼◼

लाह्या करण्याची कवी भावना व भाषा समाजातील त्रुटींवर नेमका बोट ठेवून क्रोधास ज्या आक्रमक पद्धतीनं व्यक्त करतात तेव्हा महायुद्ध दलित काव्याची प्रातिनिधिक प्रतिक्रियात्मक शैलीत सादर होताना आढळते. ‘आठवी पास की नापास' कविता वर्तमान शिक्षण पद्धतीचे विडंबन नेमकेपणाने व्यक्त करते. समग्रतः ‘महायुद्ध' काव्यसंग्रहात कवी वसंत भागवत आपलं जीवन प्रतिबिंबित करणाच्या कविता लिहीत असते तरी त्या स्वानुभवाचे उद्गार म्हणून त्यांचे आगळे असे गुणवैशिष्ट्य आहे. कवीच्या या आरंभिक ‘महायुद्ध'मध्ये त्यांना वाचक मिळून तो अधिकाधिक काव्य रसिकांपर्यंत जाईल तर मराठी कविता अनुभव व आशय समृद्ध झाल्याची प्रचिती देईल. शुभेच्छांसह नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे निर्मिती संवादचे धोरण व अनिल मानेंचे प्रोत्साहन मराठी साहित्य विकासाचेच कार्य होय.

◼◼



'दि. १४ एप्रिल, २०१४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती







प्रशस्ती/२६४
________________


हे सारे असूनही! (कथासंग्रह)
मोहन आळतेकर

_____________________________________


समाज संवेदी लेखन

 माणूस का लिहितो... लिहिता होतो... त्याचं सरळ उत्तर द्यायचं झालं तर ‘मोकळं होण्यासाठी' असं द्यावं लागेल. लिहिणारा जे लिहितो त्याची अनेक आवर्तनं मनात आधी घडत-बिघडत राहात असतात. माणसाचं लिहिणं हे बेचैनीची परिणती असते. गद्य आणि पद्य लेखनात हाच फरक असतो. गद्याच्या लेखनपूर्व उलाढाली उमजत असतात. पद्य एकदम प्रगटतं. पण पद्यातही उलघाल असते. पण ती अबोध रूपात. बेचैनी असते ना माणसाची तीपण दोन तव्हेची. एक 'स्व' विषयक आणि दुसरी ‘पर विषयक. स्व बेचैनी ही स्वार्थातून येते. अन्यांविषयी वाटणं ही सामाजिक संवेदनशीलतेची खूण. मोहन आळतेकरांना उपजत एक बेचैनी मन लाभलंय. ती त्यांच्या घडणीची देणगी होय. मनुष्य प्रतिकूलतेवर मात करून जेव्हा सावरतो, सरसावतो तेव्हा त्याला सुखही निश्चिंत बसू देत नाही. विकतचं श्राद्ध' ही त्याची वृत्ती बनून जाते. मग तो आपला संवेदनशीलता रिचवण्यासाठी, पचवण्यासाठी छोटी मोठी धडपड करत राहतो. कधी लिहितो, कधी बोलतो, कधी काहीबाही, सटर-फटर करत राहतो. ‘चिंतातुर जंतू' ‘अस्वस्थ आत्मा', ‘भरकटलेलं भूत' लोक काही म्हणोत, त्याच्या लेखी ते सामाजिक आन्हिक असतं. असं करण्यातून त्याला जगण्याचं


प्रशस्ती/२६५
________________

समाधान मिळतं. शिवाय आपण 'स्व' च्या पलीकडे काही करतो हे त्याचं सामाजिक उन्नयन असतं.
  मोहन आळतेकरांची यापूर्वी दोन पुस्तके वाचकांच्या हाती आली आहेत. ‘वाटेतील कवडसे' आणि 'माणूसनामा'. ही दोन्ही पुस्तके व्यक्तिचित्रांच्या अंगांनी लिहिलेल्या कथाच होत. प्रसंगोपात प्रतिक्रियात्मक लेखन अनेक रूपांनी जन्मतं. कधी ललितबंध, कधी गुजगोष्टी कधी आठवण तर कधी मनस्वी प्रतिक्रिया, पत्नी अपघातानं विकल मन डॉक्टरी । व्यवसायावर क्ष किरण असतं. ते लिहिलं की पूर्वस्मरणाचं विरेचन होतं नि दिलासा मिळतो. कृष्णाकाठचे नाना' एका सुखान्त मैफलीचा ऐसपैस विस्तार असतो. 'वंशवेल' वेदना आणि व्यंगाचा अनोखा मिलाफ असतो. 'वादळवारा' एका कामगार पुढा-याचं वादळात फाटलेलं शोकात्म शिडाचं जहाज... किना-याला विकल अवस्थेत विसावलेलं. असे अनेक ललितबंध मोहन आळतेकर दैनिक ऐक्य, साताराच्या ‘झुंबर' पुरवणीसाठी ‘आसपास सदरात लिहितात. त्याचे संकलन करून हा ग्रंथराज करतात. हा सारी खटाटोप हा काही त्यांचा शिळोप्याचा उद्योग नाही तर तगमगीतून घेतलेलं ते स्वेच्छा सामाजिक प्रायश्चित्त होय. मी केव्हातरी वंचित, व्यथित होतो. आता सुखाने चार घास घ्यायचे दिवस आले. पण मी माझा पूर्वेतिहास विसरणार नाही. व्यथा, वेदनेच्या माझ्या जखमेवर खपली आली असेल पण मी सामाजिक नाळ सुकू देणार नाही असा बांधील भाव घेऊन केलेले लेखन म्हणजे हे पुस्तक. ते वामकुक्षी म्हणून वाचून विसरता येत नसल्याने हे पुस्तक झोप लागण्याचं साधन बनत नाही. हीच या पुस्तकाची खरी बाजू व योगदान होय.
 लेखक म्हणून मोहन आळतेकरांची एक शैली आहे. ते मनस्वी हळवे गृहस्थ आहेत. भाबडेपणा त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणात सर्वत्र अश्रूचा सडा असतो. दुःखाची सावली घेऊन आलेलं त्यांचं लेखन वाचकाला संवेदनशील बनवतं. त्यांच्या वर्णनात आसपासचा आसमंत सजीव करण्याचं कौशल्य आहे. ते माणसाची विकलता, दुखरी नस पकडतात व ती शब्दबद्ध करतात. प्रसंग, व्यक्ती, चरित्र, असा फेर धरत ते आसपासचा परिवेश व पात्र शोधतात. हा शोध लेखनासाठी केलेला उपद्व्याप असत नाही. त्यांच्या संवेदी निरीक्षणातून ती त्यांना आपसूक गवसतात. काही व्यक्ती प्रसंगांनी तर काही आयुष्यभर त्यांच्या संपर्कात येतात, असतात. असं लिखाण त्यामुळे बेहद्द हुबेहूब वठतं. जगू भटजी, मानसिंग पवार त्यांनी वर्षानुवर्षे पाहिले, अनुभवलेले असतात. पण


प्रशस्ती/२६६
________________

एका कथेत ते त्यांचे समग्र आयुष्य चित्रित करतात. सूचकतेने समग्र व्यक्त करण्याचं वरदान लाभलेली त्यांची लेखणी म्हणूनच एका छोट्या कळशीत । व्यापक कैलास भरून टाकते. हे येतं उत्स्फूर्त लेखन ऊर्जेमुळे. ही ऊर्जा हेच त्याचं खरं लेखन संचित होय.
 ‘धरबंध'मधील इंदू आयुष्यभर घरात पाणी भरत राहते. एके दिवशी विहिरीवर जगलेली इंदू विहिरीतच बुडून मरते. तिचं प्रेत वर येतं तेव्हा विहिरीच्या काठावर कासव तरंगत असतं. इंदूचं प्रेत काढल्यानंतर ते । कासव कधी कुणाला दिसलं नाही असा उल्लेख ‘धरबंध' मध्ये आहे. ही सूचकता काय सांगते? मुक्या प्राण्यांचं दुःख? मूक माणसाचं प्राणतत्व? सूचकता इंदुची आहे आणि कासवाची पण! कासवाने आत्महत्या केली की मरण पत्करलं इंदूसाठी? रोज पाणी भरणाच्या इंदूशी कासवाशी जोडलेले गेलेले ऋणानुबंध एकीकडे नि घरासाठी कष्ट उपसणाच्या इंदूचं घरातलं परागंदापण हे सारं कलात्मकरित्या मोहन आळतेकर चित्रित करतात, त्याला तोड नसते. म्हणून वाचक वाचून त्यांना आवर्जून फोन करतात, दाद देतात वाचकांची दाद लेखकाला लिहिती राखत असते. आळतेकर वर्षोनुवर्षे लिहितात, ते समाजऋण फेडण्यासाठी व स्वतःला मोकळं करण्यासाठी.


 ‘करपून गेलेला वसंत', 'सोन्याचा कस’, ‘माझी आई', 'अधांतरी' च्या माध्यमातून लेखक आपल्या अनुभवाचं क्षितिज किती व्यापक आहे याची प्रचिती देतो. ही प्रचिती आकाश कवेत घेण्याचा लेखकाचा ध्यास होय. हे ध्यासपर्वाचे लेखन ‘मुंगी उडाली आकाशी' सारखं पकडता न येणारं. ज्यांना कुणाला आपली संवेदनशीलता तपासून घ्यायची असेल त्यांच्यासाठी हे लेखन तापमापकाचं कार्य करेल. कोरडे हृदय असो कुणाचं त्याचे डोळे पालवण्याचे सामर्थ्य या लेखनात आहे. दगडाला पाझर फोडण्याची किमया करणारे मोहन आळतेकर व त्यांचे हे सारे लेखन एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. त्यांनी नित्य लिहावे. पण आपले लेखन एकसुरी होऊ नये. म्हणून त्यांनी कथा, निबंध, लेख, काव्य, रूपक असे वैविध्यपूर्ण लेखन प्रकार हाताळायला हवेत. ते तसे करतील तर त्यांच्या लेखनाला नवी झळाळी लाभो. वैविध्यातील वैचित्र्य हे पण एका अर्थाने वाचकांना दिग्भ्रमित करणारं सौंदर्यच असतं. ते लाभेल तर हे लेखन सरस्वतीच्या कोंदणात अधिक देखणं रूप धारण करेल. त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा!

◼◼


दि. जून २०१५


प्रशस्ती/२६७
________________


एकटी कविता (काव्यसंग्रह)
अस्मिता चव्हाण
२0१३

_________________________

साध्या शब्दकळेतलं बिकट जीवनरूप

 ‘एकटी कविता' हा कवयित्री अस्मिता चव्हाण यांचा कविता संग्रह. जीवनातल्या विविध प्रसंगांना सामोरे जात असताना मनात आलेले विचार त्यांनी कवितेतून व्यक्त केले आहेत. या कविता त्यांनी लिहिलेल्या नाहीत. ती त्यांची एक प्रतिक्रियात्मक निर्मिती आहे. संवेदनशील माणसं सतत अस्वस्थ असतात. ती विचार करत राहतात. त्यांचं स्वतःशीच पटत नसल्यानं त्यांचं दुस-याशी जमण्याचा सुतराम संबंध असत नाही. परिणामी ती समाजात व घरात एकटी पडत जातात. एकटेपणामागे दुःख, विफलता, वैराग्य असतं. तसंच समाजमान्य चौकटीतील घुसमटही एक कारण असते. विवाहित स्त्री-पुरुष लग्नाच्या बंधनात अबोध वयात बांधले जातात. घरगृहस्थीच्या क्रमात पुलाखालून भरपूर पाणी वाहून जातं. काळ मागे पडतो, भविष्य नव्या स्वप्नांची पहाट दाखवत असतं आणि वर्तमान असतो मात्र तगमगीचा! मग कविता वाट काढते. 'एकला चलो रे!' म्हणत माणसं मग आत्मस्वर आत्मीय संबंध शोधतात, त्यांना साद घालतात. अशा सादप्रतिसादात जन्मलेली ही एकटी कविता'.
 माणसाचं एकटेपण कधी गतकालाचं स्मरण रंजन असतं तर कधी वर्तमानाशी हितगुज तर कधी भविष्यवेधही! अबोल दिसणारा कवी सतत बोलत राहतो... स्वतःशी, दुस-याशी, निसर्गाशी, निर्जिवांशीपण! ती


प्रशस्ती/२६८
________________

स्वतःत मस्त असते. मनपाखरू भिरभिरत असतं. मनात पिंगा आणि जगात दंगा असलेलं हे पाखरू त्याला नात्यांचा वीट आला तरी ते झाडाच्या फांदीसारखं अटळ कुटुंब वृक्षाला बांधील असतं. 'एक पाखरं' कविता वाचली की हे सारं उमगत राहतं. मग कवयित्री मन रिझवण्यासाठी निसर्गात रमते. कधी पाऊस भेटतो; कधी समुद्र. तरी ‘दुःख' कवितेतला पूर काही ओसरत नाही. ‘विश्वास असावा' वाटत असताना सभोवतालचा अविश्वास अस्तित्व हरवणारा असतो. नात्यांची रीत आणि वीण कळता कळत नाही, सुटता सुटत नाही. मग कधी 'तुलसी' केबलसारखी वात्रटिका उसनं हसू आणते अन् त्याच वेळी दुसन्या डोळ्यात आसवं ओघळायला लागतात. जीवन हे असं विचित्र, जीवघेणं असतं खरं! वाचन त्यावरचा उतारा वाटतो. माणूस मग ‘मृत्युंजय', 'ययाती', ‘राधेय' हाती घेतो अन् जीवनाचे सारथ्य करत राहतो विरंगुळा म्हणून.
 कालभान ही कविता आणि कवीची पूर्वअट असते. अस्मिता चव्हाण यांची ‘इंटरनेट' कविता वाचली की याची साक्ष पटते. या कवितेत त्या माणसाच्या तिसच्या डोळ्याचं वर्णन करतात. याचमुळे ज्ञानाची अनंत गुहा खुल जा सिम सिम सारखी सताड उघडून महाजाल, महामाया, महाद्वार झाली.
 आई, दाजी, मित्र, पती असा फेर धरत अस्मिता चव्हाणांची कविता स्वतःला उसवत, शोधत राहते. चांदण्यात भटकते आणि स्वतःच्या अथांग मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करते. मनाच्या आतल्या आत लागलेल्या । आगीची धग विझवणारा अग्निशामक माणसास अजून गवसला नसल्यानं राग, लोभाच्या द्वंद्वात ही कवयित्री कविता लिहून आपलं उन्नयन, उदात्तीकरण करू पाहते. पण ते इतकं सोपं थोडंच असतं? स्वार्थाच्या निबीड जंगलात त्याची शिकार झालेली असते अन् तो पहाट होण्याची वाट पाहात जीवन कंठत राहतो. पण जीवन नावाची गोष्ट आटपाट नगराच्या कहाणीसारखी। साता उत्तराची असते... संपत नाही की सरत नाही! केस पिकू लागतात नि युद्ध हरल्याचे धवलध्वज फडकू लागतात... ‘कृतांत कट कामल रजध्वजा । दिसू लागली' की पैलतीर आपसूक दिसू लागतो. प्रत्येकाचं आयुष्य असंच एकमार्गी असतं, ते कवयित्रीचं पण! ‘बरं झालं असतं, मन असतं जर दगड' म्हणणाच्या गुणगुणणाच्या अस्मिता चव्हाणांच्या या तगमगीनं ही सारी कविता भारावलेली आहे.
 ‘एकटी कविता' स्त्रीचा आत्मस्वर, घुसमट म्हणून विकल नि अस्वस्थ करणारा आहे. ‘धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं' अशा द्विधावस्थेत


प्रशस्ती/२६९
________________

जीवन हातातून निसटून केव्हा जातं कळत नाही. उरतो तो पश्चात्ताप! त्याला इलाज नसतो नि उताराही! सोसणं, मौन, असह्य जगणं ही नव्या स्त्रीची जुनी कहाणी नि पुराणी गाणी या कवितेत एकेकटी भेटत राहातात व वाचकही मग हताश, निराश, असाह्य होत राहतो. मग कामगार भेटतो... त्यांचा पुढारी मार्क्स भेटतो. पण तत्त्वज्ञानाने जीवन जगता येतं, सरत नसतं हे शल्य कवयित्रीचं असलं तरी ते एका अर्थाने जगण्याची इच्छा असणा-या सा-यांचं समान आत्मकथनच होतं.


 ‘एकटी कविता' स्त्री मनाचा उद्गार म्हणून वाचली पाहिजे. एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक मागं पडलं तरी विसाव्या शतकाचे भोग संपत नाहीत, याचं भान देणारी ही कविता तिच्या साध्या, भोळ्या शब्दकळेतही सुंदरपणे जीवनाचं विकट रूप चित्रित करते. तिला ललित किनार नसेल, पण भावनेच्या भक्कम कोंदणात ती माळावरच्या मळवटासारखी जीवनाचं रांगडं रूप रेखाटते.

◼◼


दि. ८ जानेवारी, २०१३


प्रशस्ती/२०६
________________


शुभ ऊर्जा (वैचारिक)
सुजय देसाई
२0१७
_________________________


प्राप्तकालाचे सुंदर स्वप्नरंजन!

 ‘शुभ ऊर्जा' हे सुजय सुंदरराव देसाईंचं छोटेखानी पुस्तक. ते एक संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांना मी ओळखतो. माणूस खराच संवेदनशील असेल तर सतत विधायकतेचा ध्यास त्याला लागून राहतो. त्यात तो शिक्षक असेल तर त्याची दुहेरी धडपड असते. पहिल्यांदा तो स्वतःला आदर्श बनवतो. विद्यार्थी आदर्श घडायचे तर शिक्षक संवेदी, विधायक, आदर्श अनुकरणीय हवा. इथल्या म्हणजे कोल्हापुरात गांधीवादी विचार करणाच्या मंडळींनी सुमारे पन्नास एक वर्षांपूर्वी समता हायस्कूल सुरू केलं होतं, तेव्हा त्याचे संस्थापक तत्कालीन गांधीवादी कार्यकर्ते म. दु. श्रेष्ठी (वकील) होते. प्रा. चंद्रकांत पाटगावकर त्यांच्या पाठीशी होते. माझे स्नेही व सन्मित्र श्री. कुर्लेकर त्या हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. आणीबाणीच्या काळात आम्ही सर्व अखिल भारतीय आचार्य कुल परिषदेला । पवनारला गेलो होतो. त्या काळात मी काही काळ सर्वोदय नेते अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांचा सहायक म्हणून काही काळ सेवाग्राम आश्रमात होतो. हे सारं आत्मचरित्र म्हणून सांगत नसून समता हायस्कूलची गांधीवादी परंपरा । ध्यानी यावी. अशा शाळेत सुजय देसाई यांचे शिक्षक होणं यामागे त्यांच्या वडिलांची परंपरा पुण्याई आहे. संस्काराची शिदोरी असल्याशिवाय कोणी उठून एकदम ध्येयवादी बनत नाही.


प्रशस्ती/२७१
________________


 सध्या सुजय देसाई ज्या कदमवाडी परिसरातील म. दु. श्रेष्ठी समता हायस्कूलमध्ये गेली सुमारे दोन दशके कार्यरत आहेत त्या परिसरात मी १९७४ ते ७९ अशी ५ वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले आहे. विचारे माळावरील झोपडपट्टीचे गरीब, हातावरचे पोट असलेले पालक नि कदमवाडी, भोसलेवाडी परिसरातील शेतमजूर, ऊसतोड कामगारांची मुले त्यांच्या शाळेत येतात हे मी जाणतो. खायची भ्रांत असलेल्या वर्गातील मुलामुलींनी शिकणे आज चाळीस वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या आर्थिक, सामाजिक स्थितीत परिवर्तन घडलेले नाही. कारण विकासाची गंगा या वर्गापर्यंत पोहोचलीच नाही. म्हणून येथील मुले-मुली शिकण्यापेक्षा जगण्यासाठी येतात याची मला कल्पना आहे. यातील बरीचशी मुले-मुली त्यांच्या कुटुंबातली शाळेत जाणारी पहिली मुले असतात. आई-वडील अशिक्षित असतात. काही पालक परिस्थितीने गांजलेले असल्याने व्यसनी, कर्जबाजारी असतात. हातावरचं पोट असलेला पालक वर्ग मुलांना शाळेत पाठवतो. ते घरी सांभाळायला कोण नसतं म्हणून शिवाय शाळेतल्या दुपारच्या पोषण आहार उर्फ खिचडीमुळे दिवस निघून जातो म्हणूनही. गणवेष, दफ्तर मोफत. फी नाही. शाळेला पाठवण्यात तोशीस असेल तर पोरा-पोरींचा रोज बुडतो (मजुरी) ही.
 अशा विद्याथ्र्यांत शिक्षणाची ऊर्जाच असत नाही नि ऊर्मीपण. तशात ती निर्माण करून तिला विधायक सर्जनात्मक वळण देणे हे शिक्षकांपुढचे खरे आव्हान असते. सुजय देसाई ज्या ऊर्जा नि ऊर्मीला ‘शुभ' असे नामाभिधान देऊ इच्छितात ती असोशी माझ्या दृष्टीने एक सकारात्मक प्रेरणा होय. जीवन अंधारले असताना प्रकाशाचे अनुगमन स्वाभाविकच म्हणावे लागेल. जीवन प्रेरणा सकारात्मक, विधायक बनवणे म्हणजे ‘तमसो मा ज्योतिर्गमय' चाच ध्यास ना? महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांनी ‘सर्वोदय' संकल्पना मांडली ती केवळ खादी, शेती, सूतकताई नव्हती तर ती जीवन शिक्षणाची नई तालीम, नवी शैली होती. प्राप्तस्थितीतून मार्ग काढायचा तर साधनेपण कालसंगत हवीत. हे भान सुजय देसाईंना असल्याने ते आपल्या विद्याथ्र्यांतच नव्हे तर समाजात शुभ ऊर्जा निर्माण करू पाहतात ते शुभ वर्तमान घडावे म्हणून. महात्मा गौतम बुद्ध असो वा येशू ख्रिस्त असो, सर्वांची धडपड शुभ वर्तमानाचीच होती. सुजय देसाई शिक्षक, लेखक आहेत नि समाजात रचनात्मक, सर्जनात्मक घडावं म्हणून ते अध्ययन, अध्यापन, संस्कार, प्रकल्प, परिपाठ, प्रयोग सान्यांचा मेळ घालत, फेर धरत आपले विद्यार्थी सजग सकारात्मक घडावे म्हणून


प्रशस्ती/२७२
________________

प्रयत्नशील राहतात. ‘शुभ ऊर्जा' - लेखन त्या विधायक धडपडीचं एक साधन बनवून त्या योगे ते नवा माणूस घडवू पाहात आहेत.
 ‘चिरंतन शुभचिंतनातून सुंदर परिवर्तन' हे त्यांच्या या लेखनाचं ब्रीद आहे. भरत वाक्य आहे. सूचन माणसाचं वर्तन बदलते यावर लेखकाचा विश्वास असल्याने ते स्वयंसूचनातून स्वयंविकासाकडे नेऊन आपल्या विद्याथ्र्यांचा नि समाजाचा कायाकल्प करू इच्छितात. सोनेरी पहाटेची त्यांनी प्रतीक्षा आहे. म्हणून ते मयूरपंखी रंगीबेरंगी स्वप्ने उराशी बाळगतात. या पुस्तकाच्या भूमिकेतून ते स्पष्ट होते. सूचन अमलात कसे आणावे याचे धडे त्यांनी स्वानुभवातून दिले असल्याने ते डोळे झाकून गिरवायला हरकत नाही. हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांइतकंच सर्वसामान्य जनतेस उपयुक्त । व्हावे असा लेखकाचा प्रयत्न दिसतो. सर्व वयोगटातील सर्वांना ते उपयोगी व्हावे यात व्यापकता नि उदारता आहे. विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक सर्वांना उपयुक्त होतील असे यातील सूचन त्याचेच निदर्शक होय.


 हे पुस्तक रोजच्या जगण्यातले ताण-तणाव, नैराश्य, आरोग्याचे प्रश्न, सामाजिक समस्या, धर्म समजुती सर्वांवर मात करण्याच्या उद्देशाने लिहिलेले दिसून येते. देशविदेशाचं भान त्यामागे आहे. एवढ्या लहान वयात अशी व्यापक धारणा केवळ ध्येयातूनच शक्य आहे. ज्याला सर्वसाधारणपणे ‘अध्यात्म' म्हणून समजले जाते अशा भाबड्या भावबोधाचे हे लेखन असले तरी माझ्या दृष्टीने त्यामागची निरागसता महत्त्वाची. 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे, हा बोध आहे खरा' हे जितके सत्य तितकेच ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा' म्हणत केलेले हे लेखन अध्यात्मापलीकडची ध्येयवादी धडपड म्हणून महत्त्वाची! शुभेच्छांसह सदिच्छा!

◼◼



दि. २१ सप्टेंबर, २०१७
जागतिक अहिंसा दिन


प्रशस्ती/२७३


संदर्भ सूची
_____________________________________________________
१. समाजणिवेच्या प्रबोधक एकांकिका
 सुगंधी काटे' - प्रा. बाबासाहेब पवार (एकांकिका संग्रह)
२. समाजणिवेच्या. समाजपूर्व प्रबोधन
 प्रबोधन पर्व' - प्रा. कुसुमताई कुलकर्णी (लेखसंग्रह)
 सिंहवाणी प्रकाशन, कोल्हापूर/एप्रिल, १९९९/पृ. १८४/किं.१00/
३. समाजबालकवितेची अंगत-पंगत, आहे खरी सुंदर संगत
 ‘गुड्डु' - सौ. प्रतिभा साठम (बालकथा संग्रह)
 प्रहार प्रकाशन, कोल्हापूर/डिसेंबर, २00१/पृ. ६0/किं. ४0/-
४. समाजकोंडलेलेनिःश्वास सोडताना...
' माझी आई' - प्रतिभा साठम (कविता संग्रह)
 प्रहार प्रकाशन, कोल्हापूर/डिसेंबर, २00१/पृ.५४/किं. ४0/-
५. समाजकोंडलेलेचित्रपट सृष्टीतील झाकली माणकं
 'सिनेमाचा रंग वेगळा' - माधवराव देशपांडे (व्यक्तिचित्र संग्रह)
 कीर्ती प्रकाशन, कोल्हापूर/नोव्हेंबर, २00३/पृ.२00 /किं.१५0/-
६. ग्रामीण मीण जीवनाच्या बोधक कथा
 'वळणावरची वाट' - शिवाजी पाटील (कथासंग्रह)
 ओंकार प्रकाशन, कसबा वाळवे, जि. कोल्हापूर/२00३/पृ.८९/कि.४५/-
७. ग्रामीण ग्रामीणदाटून येते तेव्हा...
 'कोंडलेले हुंदके' - श्रद्धा कळंबटे (सत्यकथा संग्रह)
 स्पर्श प्रकाशन, पुणे/मार्च, २00४/पृ.१0३/किं.१00/-
८. एक उद्ध्वस्त जग अनुभवताना...
 'आमचा काय गुन्हा?' - रेणू गावस्कर (लेखसंग्रह)
 मनोविकास प्रकाशन, पुणे/मार्च, २००५/पृ. २०४/किं.१५0/-
९. उतराईचा असा जागर - उरी, जिव्हारी...
 'वास्तव' - प्राचार्य अरविंद सातवेकर (व्यक्तिचित्र संग्रह)
 नलिनी प्रकाशन, कोल्हापूर/नोव्हेंबर, २00५/पृ. १0८/किं.१००/-
१०. वाचनाची वैज्ञानिक मांडणी करणारा शैक्षणिक संदर्भ ग्रंथ
 'जलद आणि प्रभावी वाचन' - अशोक इंगवले (संशोधन ग्रंथ)
  नंदिनी प्रकाशन, कोल्हापूर/मार्च, २00६/पृ.२०७/किं. १२५/
प्रशस्ती/२७४ 

११. हृदयपरिवर्तनाशिवाय धर्मपरिवर्तन व्यर्थ
 ‘बुद्धाची शांती, भीमाची क्रांती-- विजय शिंदे (काव्य)
 प्रज्ञा प्रकाशन, कोल्हापूर/जानेवारी, २००७/पृ.२१/किं. २0
१२.'माणूस घडणीची सूक्ते
 व्यक्तिमत्त्व विकासाची सूत्रे' - डॉ. लता पाटील व सौ. सुलोचना भागाजे
 (क्रमिक पुस्तक)
प्रणव प्रकाशन, कोल्हापूर/एप्रिल, २00७/पृ. १०९/किं. ६0.
१३. विविध भावी कॅलिडिओस्कोप
 ‘सुगंध' - डॉ. जी. पी. माळी (लेखसंग्रह)
 अजब पब्लिकेशन, कोल्हापूर/डिसेंबर, २००७/पृ. १९२/किं. १७0/
१४. सामाजिक धर्मबुद्धीवर आधारित सामाजिक न्याय कोणता?
 ‘अधांतरी' - प्रभावती मुठाळ (आत्मकथन)
  सुगावा प्रकाशन, पुणे/ऑगस्ट, २००९/पृ. २८0/किं.२५0/-
१५. बालकवींच्या नव्या कविता
 ज्ञानदीप' - अशोक पाटील - (बालकविता संग्रह)
 गमभन प्रकाशन, पुणे/जानेवारी, २00८ /पृ. ६४/ किं. ३२/-
१६.लोकव्यवहारातून समाजशिक्षण देणारा अमृतकुंभ
 ‘पेशंटचे किस्से' - डॉ. शरद प्रभुदेसाई (आठवणी)
 डायमंड प्रकाशन, पुणे/जुलै, २००८/पृ. ७६/किं. ६0/-
१७. समान शिक्षणाच्या सर्वंकष कायद्याची गरज
 ‘शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा संघर्ष' - डॉ. अनिल सदगोपाल
 भाषांतर - डॉ. उत्तरा कुलकर्णी (वैचारिक)
 आरडंट प्रकाशन, कोल्हापूर/फेब्रुवारी, २०१०/पृ. ८0/किं. ६0/-
१८. धर्मांतरित दलित वेदनेचा आत्मस्वर
 ‘ठिगळ' - गुलाबराव आवडे (आत्मकथन)
 शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर/मे, २0१0/पृ. ११४/किं. १00/-
१९. कृतज्ञतेतून साकारलेले साग्र चरित्र
 रेव्ह. हेन्री हॉवर्ड : जीवन व कार्य (चरित्र)प्रका.
 डॉ. अजित आवडे, कोल्हापूर/डिसेंबर, २०१०/पृ. १६६/किं.२00/-
२०. परिस्थितीवर मांड ठोकणारं आयुष्य
 ‘अनवाणी' - अंकुश गाजरे (आत्मकथन)
 रावा प्रकाशन, कोल्हापूर/मार्च, २०११/पृ. २०२/किं. रु. २००/
प्रशस्ती/२७५ २१. नॉट पेड रिसिट
  'नॉट पेड' - हरिशंकर परसाई - भाषांतर - उज्ज्वला केळकर
  मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/सप्टेंबर, २०११/पृ. १४0 /किं.१४0/-
२२. रंगमंचीय एकांकिका
  लोकराजा शाहू व अन्य एकांकिका' - डी. के. रायकर (एकांकिका संग्रह)
  मेहताशन-वंदना रायकर, कोल्हापूर/सप्टेंबर, २०११/पृ. ७0 /किं.५0/-
२३. सकल सौंदर्याची ध्यासमय साधना
  ‘आस्वादाची काही पाने' - प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार (काव्यसमीक्षा संग्रह)
  निर्मोही प्रकाशन, पुणे/मे, २०११/पृ.१२७/किं. १२५/-
२४. गमावलेल्या इतिहास आणि संस्कृतीची नोंद
  ‘युगामागुनी युगे सरती' - डॉ. पुष्पपाल सिंह, भाषांतर डॉ. चंदा गिरीश/ रावा
  प्रकाशन, कोल्हापूर/डिसेंबर, २०११/पृ. १८७/ किं. ५0/-
२५. बालदीप जपणे म्हणजे भविष्य सोनेरी करणे
  ‘बालविकासाच्या वादळवाटा' - अतुल देसाई (लेखसंग्रह) आनंदराव
  देसाई,फणसवाडी जि. कोल्हापूर/जुलै, २०११/पृ. ७४/किं. ५0/-
२६. अश्वत्थाम्याची अस्वस्थ जखम दाखवणारं लेखन
  आलोकपुरी रंग ढंग' - आप्पासाहेब माळी (वृत्तांत संग्रह)
  आलोक प्रकाशन, कोल्हापूर/जुलै, २०१२/पृ. १३0/किं.१५0/-
२७.नव्या ग्रामोदयाचं आश्वासक चित्रण करणारी कादंबरी
  ‘धगधग' - प्रशांत दिवटे (कादंबरी)
  ऋतू प्रकाशन, अहमदनगर/जुलै. २०१२/पृ. १६९/किं. १५0/-
२८. जगणं समजावणारं हितगुज
  ‘गोष्टी समुपदेशनाच्या' - डॉ. शुभदा दिवाण (आठवणीतल्या गोष्टी) गुरुकुल
  प्रतिष्ठान, पुणे/सप्टेंबर, २०१२/पृ. १०५/किं. रु. ५०/-
२९. कालचित्र उभं करणारी दैनंदिनी
  ‘दिवस अकरावीचे' - भागवत माळी (दैनंदिनी)
  अ. भा. साने गुरुजी कथामाला प्रकाशन संस्था, मुंबई/सप्टेंबर, २०१२/
  पृ ११४/किं. १00/-
३०. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा मूलमंत्र
  पृचेन्नई घोषणापत्र' - डॉ. अनिल सदगोपाल (वैचारिक)
  आरडंट प्रकाशन, कोल्हापूर/नोव्हेंबर, २०१२/पृ. ३२/किं.२०/

प्रशस्ती/२७६


३१. पूर्णपात्र समाजसेवेची सार्थक कहाणी
 ‘गोष्ट सुखी माणसाची' - डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे (आत्मकथन)
 प्रकाशनः सौ. मनिषा पूर्णपात्रे/ऑक्टोबर, २०१२/पृ. २0८/.१७५/
३२. उद्याचं जग आज पाहता यायला हवं
 'रक्ताच्या नात्यापेक्षा' - रंगराव बन्ने (कथासंग्रह)
 साहित्य विकास मंडळ, कारदगा(कर्नाटक)/नोव्हेंबर, २०१२/पृ.६८/किं. ७५/
३३. नाथा' जन्माला न येण्याचे शिवधनुष्य उचलूया
 ‘नाथा' - सुभाष विभूते (भाषांतरित कादंबरी)
 प्रकाशन - चैतन्यसृजन व सेवा संस्था, आजरा/डिसेंबर, २०१२/
 पृ. ६६/किं. १0/
३४. चांगल्याचे स्वागत नि वाईटाचा विरोध
 ‘प्राथमिक शिक्षणाचे वास्तव' - प्रभाकर आरडे (लेखसंग्रह)
 आरडंट प्रकाशन, कोल्हापूर/जानेवारी, २०१३/पृ. ११२/किं. १२0/
३५. बाल प्रतिभेची उजळली प्रभा
 ‘इंद्रधनुष्य' - समृद्धी कुलकर्णी (बालकाव्य संग्रह)
 हर्षित प्रकाशन, कोल्हापूर/जानेवारी, २०१३/पृ. ४0 /किं. २०/
३६. गैराशी वैर करत लाभलेलं गौरवी जीवन
 ‘आठवणींचे तरंग' - का. मा. आगावणे (आत्मकथा)
 प्रकाशन-सौ. कुसुम आगवणे/जानेवारी, २०१३/पृ. १८९/किं.१५0/
३७. मूल्य शिक्षण रुजवणाच्या नाट्यछटा
 ‘उगवतीच्या नाट्यछटा' - सुरेश जत्राटकर (नाट्यछटा संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/ऑगस्ट, २०१३/पृ.१00 /किं.१00/
३८. पालकांसाठी बालकांचे बायबल
 ‘बालसंगोपनाचे कानमंत्र' सौ. यज्ञिता राऊत (बालसंगोपन मार्गदर्शिका)
 सुरेश वर्तक, वसई/ऑक्टोबर, २०१३/पृ. ९४/किं. २५0/
३९. अस्वस्थ करणारी ग्रामीण कळ'
 ‘कळ' - चंद्रकांत खामकर (कथासंग्रह) श्री गणेश प्रकाशन,
 कारदगा (कर्नाटक)/नोव्हेंबर, २०१३/पृ. १४२/किं. १६0/
४०. खांडेकरांच्या कथा साहित्याचे मूल्यनिष्ठ संशोधन
 ‘वि. स. खांडेकरांच्या साहित्याचा मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास' - सौ. वर्षा वाकणकर (संशोधन प्रबंध) २०१४


प्रशस्ती/२७७

४१. विकासाच्या पाऊलखुणा राजमार्ग व्हावा

 ‘कष्टांचं चीज' - रंगराव बन्ने (कथासंग्रह)
 साहित्य विकास मंडळ, कारदगा/नोव्हेंबर, २०१४/पृ. ५६/किं. ७५/-
४२. हास्यामागील खंत जागवणारी ‘मिश्किली
 ‘मिश्किली' - सौ. प्रतिभा जगदाळे (विनोदी लेखसंग्रह)
 प्रयत्न प्रकाशन, औदुंबर/डिसेंबर, २०१४/पृ. ८१/किं. १७५/-
४३. निसर्ग मित्र आणि लढवय्या बुलबुल
 ‘लढवय्या बुलबुल' - मिलिंद यादव (अनुभव)
 सायली ग्राफिक्स, कोल्हापूर/डिसेंबर, २०१४/पृ. ३६/किं. ५0/-
४४. रंजक कथा अभिजात व्हायला हव्यात
 ‘गजरा' - खलील पटेल (कथासंग्रह)
 अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर/एप्रिल, २०१५/पृ. १६0/ रु. २२0/-
४५. पत्रकारितेच्या पाच दशकांचा अनुबोध पट
 ‘चौथा स्तंभ' - सुभाष धुमे (अनुभव कथन)
 चपराक प्रकाशन, पुणे/ऑगस्ट, २०१५/पृ. ८८/किं. १00/-
४६. चंद्रकलेला सरस्वतीचंद्रांचं तेज लाभावं
 ‘चंद्रप्रकाशाच्या झळा' - युवराज पाटील (ललित लेखसंग्रह)
 अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर /सप्टेंबर, २०१५/पृ. १००/किं. १४0/-
४७. लहान प्रसंगांतून महान विचारांची पेरणी
 ‘पणत्यांचा प्रकाश' - संपतराव गायकवाड (अनुभव कथन)
 हृदय प्रकाशन, पोहाळे, कोल्हापूर/नोव्हेंबर, २०१५/पृ. १००/१00/-
४८. समाजाच्या मंगल बदलाचे स्वप्न रंगवणाच्या कथा
 ‘पोलीस पाटील' - तानाजी कुरळे (कथासंग्रह)
 अक्षरवेध प्रकाशन,गडहिंग्लज (कोल्हापूर)/नोव्हेंबर, २०१५/पृ.११८/किं. १५०/-
४९. स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा समाज जागर घडविणा-या कथा
 ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' - बाबूराव शिरसाट (कथासंग्रह)
 प्रतीक प्रकाशन, कोल्हापूर/मार्च, २०१६/पृ.१०४/किं. १२०/-
५०. मोहाच्या क्षणी विवेकाची कसोटी
 ‘संवाद मनाशी' - डॉ. वासुदेव देशिंगकर (अनुभव/वैचारिक)
 अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर/मे, २०१६/पृ. १५२/किं. २५0/-
५१. वास्तुविद्येचा आस्वादक अध्याय
 ‘वास्तुपर्व' - मोहन वायचळ (सौंदर्यशास्त्र)
  प्रकाशन. सौ. रंजना वायचळ, कोल्हापूर/मे, २०१७/पृ. २६२/किं. ६00/


प्रशस्ती/२७८
५२. अनाथ-निराधारांच्या प्रश्नांविषयी भावसाक्षरता वाढविणा-या आठवणी

 ‘आनंदाश्रम' - प्रभाकर केळकर (आठवणी)
 शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक/जुलै, २०१७/पृ. १२६/किं.१00/-
५३. ध्येयवादी शिक्षकाचे अनुकरणीय चित्र
 ‘तपस्वी' - सुभाष धुमे (चरित्र)
 व्हिजन प्रकाशन, गडहिंग्लज/ऑगस्ट, २०१७/पृ. ११३/किं. १00/-
५४. शिक्षणविषयक जाणीव जागृतीचे समाजसंवेदी लेखन
  शैक्षणिक विचार' (भाग - ४) / कर्मपूजा (भाग २) डी. बी. पाटील (लेखसंग्रह)
 प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस, कोल्हापूर/ऑक्टोबर, २०१७
 पृ. २३८/किं. २00/-
५५. साध्या भोळ्या जगण्याचं करुणाष्टक
 ‘पैंजण' - महंमद नाईकवाडे (काव्यसंग्रह)
  प्रकाशन-कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर वाचनालय, रेंदाळ/ऑक्टोबर, २०१७/
 पृ. ५0/किं. ५0/-
५६. जात पंचायतीविरुद्धचा जिहाद
 ‘भंगार' - अशोक जाधव (आत्मकथा)
 मनोविकास प्रकाशन, पुणे/ऑक्टोबर २०१७/ पृ. १८६/किं. २00/-
५७. पुरोगामी समाजरचनेचा खटाटोप
 ‘नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार' - डॉ. राजेखान शानेदिवाण (चरित्र)
  अक्षर दालन, कोल्हापूर/नोव्हेंबर, २०१७/पृ. ११६/किं. २५0/-
५८. बाल साहित्य वाचनाचा संस्कार
 'पुस्तकांचा गाव' - युवराज कदम (पुस्तक परिचय संग्रह)
 वाचन कट्टा प्रकाशन, कोल्हापूर/डिसेंबर २०१७/पृ. ३२/किं. ५0/-
५९. उपजत कलेचे उपयोजित कलेत रूपांतर करणारे पुस्तक
 ‘वक्तृत्वधारा' - संदीप मगदूम (भाषण संग्रह)
 वेदांतराजे प्रकाशन, कोल्हापूर/जानेवारी, २०१८/पृ.१८४/किं.१४0/-
६०. विकास आणि माणूस घडणीच्या लक्ष-लक्ष संभावना जागवणारे लेखन
 ‘मनातलं प्रभाकर आरडे (संपादकीय संग्रह)
 ऋग्वेद/चैतन्य सृजन व सेवा संस्था/आजरा/२०१८
६१. संवेदी हितगुजाचे मृत्युंजयी आविष्करण
 ‘जसं सुचलं तसं' - अशोक केसरकर (स्फुट संग्रह)
 रविकिरण चौगुले, इचलकरंजी/२०१८/पृ. २६४/किं. २५0/


प्रशस्ती/२७९

६२. चिमुरड्या कवयित्रीची प्रगल्भ कविता
 ‘फुलपरी' - सागरिका येडगे (बालकाव्य संग्रह)
६३. वर्गीय समस्या भेदून एकात्म समाज निर्मिणारे खांडेकरांचे कथात्म साहित्य
 ‘वि. स. खांडेकरांच्या कथात्म साहित्यातील समस्यांचे चित्रण
 डॉ. सविता व्हटकर (संशोधन प्रबंध)
६४. नवसमाज निर्मितीची संजीवनी
 दलित मित्र तांबट काका - प्रा. दिनकर पाटील/डॉ. जे. के. पवार (स्मारक ग्रंथ)
६५. टच स्क्रीन हाच नव्या युगाचा परीस
 ‘परीस' - अदित्य जवळकर (कथासंग्रह) (९४२३४५४७७३)
६६. प्रतिकूलतेतही स्वतःचा सूर्य शोधणारी कविता
 ‘दुःखभोग' - शांतीनाथ वाघमोडे (कविता संग्रह)
६७. पंख अडकलेल्या पाखराची तडफड
 ‘विकल्पवाट’ - सौ. मंदाकिनी देसाई (कविता संग्रह)
६८. अनुभवांचे युद्ध आणि अभिव्यक्तीची सुबोधता
 ‘महायुद्ध - वसंत भागवत (काव्यसंग्रह)
६९. समाज संवेदी लेखन
 ‘हे सारे असूनही' - मोहन आळतेकर (कथासंग्रह)
७०. साध्या शब्दकळेचे विकट जीवनरूप
 ‘एकटी कविता' - अस्मिता चव्हाण (काव्य संग्रह)
७१. प्राप्तकालाचे सुंदर स्वप्नरंजन!
 'शुभ ऊर्जा’ - सुजय देसाई (वैचारिक)


प्रशस्ती/२८०



डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा
________________________________________
१. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00६/पृ. २१०/रु. १८0 सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00७/पृ. १३८/रु. १४0 तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
 निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१00/रु.१00/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५0/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२00/तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३0/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२00/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५0/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६0/रु.१८0/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२00/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती


प्रशस्ती/२८१
________________

१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२0१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)।

अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५0 /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ. १९८ रु. ३00 /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा) ।
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ. २२0 रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१८५ रु.२५0 /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१५५/रु.२00/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५0/पहिली आवृत्ती

आगामी
• भारतीय भाषा (समीक्षा)
• भारतीय साहित्य (समीक्षा)
• भारतीय लिपी (समीक्षा)

• वाचन (सैद्धान्तिक)
* वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन

◼◼


प्रशस्ती/२८२