पान:Yugant.pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७६ / युगान्त



व तिच्या माहेरची माणसे; आज्याच्या पिढीतली माणसे, भीष्म, शंतनू ही सर्व येऊन गेली आहेत. सख्खे-सावत्र, लहान-मोठे, जावाजावा, भांवडे, चुलते-पुतणे-सर्व कौटुंबिक नाती व यांतील गुंतागुंतीचे संबंध, सर्व काही महाभारतात आहे. ह्यामुळे द्रौपदीचे चित्र अधिक भरीव व अनेकांगी झाले आहे. कौटुंबिक गुंतागुतीच्या मागे त्या वेळची सर्व राजकीय गुंतागुंतही उभी केलेली आहे. यादव, कौरव, द्रुपद, विराट, मगधाचा जरासंध, शल्य, शाल्व ह्या व इतर अनेक राजघराण्यांचे एकमेकांशी आलेले संबंध व त्यांमुळे कौटुंबिक व वैयक्तिक संघर्षाला चढलेली धार असे हे चित्र आहे.
महाभारतातील लढाई हा कौटुंबिक व राजकीय सत्ता-स्पर्धेचा परिपाक आहे. ह्याच्या उलट रामायणामध्ये जनकाचा काय, किंवा केकयांचा काय, नुसता उल्लेख आलेला आहे. आणि ज्या रावणाशी लढाई झाली, तो रावण तर रामाच्या जगाच्या बाहेरचाच म्हणावयाला हरकत नाही. अगदी आधुनिक प्रणयकथेप्रमाणे दोन व्यक्तींचे व त्यांच्या अंतर्मनांचे चित्रण; ज्यामुळे त्या व्यक्तींची अंतर्मने घडली, त्या कौटुंबिक व सामाजिक शक्तींचे दर्शन जवळजवळ नाहीच. द्रौपदीच्या लग्नाच्या दिवसापर्यंत पांडव बापुडवाणे व अनाथ होते. एका दुष्ट कारस्थानातून जे जिवानिशी कसेबसे बाहेर पडले होते. आपण जिवंत आहोत, हा सुगावाही शत्रूंना लागू नये म्हणून लपत-छपत आज ह्या गावी, तर उद्या त्या गावी असे हिंडत होते. द्रौपदी-स्वयंवराला ते आले, तेही ब्राह्मणांच्या वेषाने, आपण कोण हे इतरांना कळू न देण्याची खबरदारी घेऊन. द्रुपदाच्या राज्यामध्ये त्यांना द्रौपदीच मिळाली असे नव्हे, तर पराक्रमी, वैभवशाली मित्र, पाठीराखे मिळाले. बायकोचे माहेर द्रुपद व आईचे माहेर यादव यांच्या संयुक्त पाठबळाने त्यांना प्रकट होऊन बेधडकपणे हस्तिनापुराच्या राज्याचा वाटा मागता आला. द्रौपदीशी लग्न केल्यामुळे पांडवांना नुसती सुंदर बायकोच मिळाली असे नव्हे तर प्रतिष्ठा मिळाली व राज्य मिळाले.