हायडेगरने ह्या भावनेचे पृथक्करण फार उत्तम तऱ्हेने केले आहे. असणे हा भाव(म्हणजेच जीव) हा नाशवंत असतो. जन्ममरण बरोबर घेऊनच तो येतो.
जे असते, त्याला न असण्याची भीती कायम असते. आपल्या मनातली ही भीती दुसऱ्याबद्दलची कल्पून जीव (being) हा सर्व जगाच्या काळजीत गुंतून पडतो. म्हणजे विश्वाची चिंता, काळजी, भीती ही सर्व स्वतःविषयी वाटणाऱ्या काळजीचा इतरांवर केलेला अध्यारोप आहे. आजार, वार्धक्य व मृत्यू ही पाहून बुद्धाला उपरती झाली. ‘जितके जगात गुंतून पडू, तितकी भयस्थाने जास्त, म्हणून जगात गुंतून पडू नका,' हा बुद्धाचा उपदेश. अगदी ह्याउलट महाभारताची व ब्राह्मणांची शिकवण. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यूः' हा सगळ्यांच्याच तत्त्वज्ञानाचा पाया. 'ध्रुवं जन्म मृतस्य च' हा बुद्धाचा व कृष्णाचाही सिद्धान्त; हायडेगरचा नाही. पण एक जन्म असो वा अनेक असोत, सर्व मृत्यूतच नाश पावतात. म्हणून फलाशा न धरता उघड्या डोळ्यांनी कर्म कर, कर्मसंन्यास कठीण, जवळजवळ अशक्य, ही कृष्णाची शिकवण. शक्य तर संन्याय घ्या व गृहस्थाश्रमीच्या भिक्षेवर जगा, ही बुद्धाची शिकवण. आणि ‘जे आहे, ते हे. पुढे काही नाही. मागे काही नव्हते. ह्या परिस्थितीत फक्त येथचाच विचार करा. उगीच मूल्यांच्या नादी लागूच नका,' ही हायडेगरच्या सिद्धान्तावर आधारलेली सध्याच्या लेखकांची तिसरी भूमिका. पहिली भूमिका कणखर, दुसरी पलायनवादीच नव्हे, तर विरोधाने भरलेली. मोठ्या संख्येने संन्यास घेणाच्या भिक्षुना संपन्न, दानशूर, गृहस्थाश्रमी कुटुंबांच्या भिक्षेवरच जगावे लागते. म्हणून संन्यासधर्म टिकावयास गृहस्थाश्रमी आवश्यक, असा हा अंतर्गत विरोध अशा धर्मातून दिसून येतो.