पान:Yugant.pdf/212

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त/१९५
 


त्याला म्हणाला, "बाबा, ज्या प्रद्युम्न-सात्यकीचे तू गुणगान करीत होतास, ते तुझे दोघे भक्त व शिष्यवर ह्या सगळ्या अनर्थाला कारण आहेत" अर्जुनाने वसुदेवाला राजाच्या इतमामाने जाळले, मग रामकृष्णांसह सर्व मृत यादववीराना जाळले. वसुदेव सर्वांत वडील, म्हणजे तोच यादवांचा राजा होता का? का बलराम राजा व वसुदेवाचा मान? दुर्योधन राजा, पण धृतराष्ट्र जिवंत होता म्हणून त्याला 'महाराज' म्हणत, तसाच प्रकार होता की काय?
 बलराम, कृष्ण वृद्ध होऊन गेले. वसुदेव तर कुंतीचा भाऊ व राम-कृष्णांचा बाप म्हणजे खूपच म्हातारा. कृष्णाची मुले अभिमन्यूपेक्षा थोडी वडील असतील, म्हणजे पन्नाशीच्या आतबाहेर. ह्या संहारात तिसरी पिढी जिवंत राहिली. ती परीक्षिताच्या वयाची, म्हणजे पस्तीस छत्तीस वर्षांची होती. ते कसे जिवंत राहिले ? का अतिवृद्ध वसुदेव व ही नातवंडे ह्यांना ठेवून फक्त मधल्या दोन पिढ्यांची माणसेच यात्रेला गेली होती? ही पासष्ट ते पंचाहत्तर वयाची माणसे व त्यांचे मुलगे दारू पिऊन शुद्ध विसरून एकमेकांशी भांडून मेली, असे समजायचे का? महाभारत व सर्व पुराणे असेच सांगतात. काही दिवसांतच द्वारका पाण्यात बुडाली. धरणीकंपाने का? ह्या संबंध किनाऱ्यावर वारंवार धरणीकंप होत असत, अजूनही होतात. तसाच प्रकार झाला असावा का? 'एरका' नावाचे गवत लोहाचे झाले, ह्याचा अर्थ काय? एरका नावाच्या सरळ टणक गवताच्या कांड्यांचे बाण करून त्यांना लोखंडाची पाती लावणारे काही लोक होते व त्यांनी यादव धुंदीत आहेत, असे पाहून त्यांचा नाश केला काय? किती तरी प्रश्न मनात उद्भवतात. द्वारकेच्या उत्खननात असे दिसते की, द्वारका कधीतरी पाण्याखाली बुडाली व परत वसवली गेली. एकदा का अनेकदा? ह्याचे उत्तर देण्याइतका पुरावा अजून सापडलेला नाही.
 अंताच्या क्षणापर्यंत कृष्ण शांत राहिला. ह्या अवस्थेत जेवढी निरवानिरव करणे शक्य होते, तेवढी त्याने केली. तो रडला नाही.