पान:Yugant.pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त /११७
 

द्रोणाचे कर्तव्य ठरले. शिवाय, ज्या तऱ्हेने तो सेनापती झाला, त्याहीमुळे आपली निवड योग्य झाली, असे त्याला दुर्योधनाला दाखवावयाचे होते. “तू फक्त अर्जुनाला लांब ठेव, म्हणजे मी पांडवांचा फडशा पाडतो," असे द्रोणाने सांगितले आणि त्याप्रमाणे द्रोण लढलाही. तीन दिवसांच्या सेनापतिपदाच्या वेळी फार मोठे रणकंदन झाले व फार महत्त्वाची माणसे मेली. मुख्य म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु व धृतराष्ट्राचा जावई जयद्रथ हे मेले. तिन्ही दिवशी कर्ण लढत होता. मुख्य लढाईपासून अर्जुनाला दुसरीकडे गुंतवण्याच्या युक्तीमुळे कदाचित असेल, पण अर्जुनाची व द्रोणाची समोरासमोरी झाली नाही. अर्जुन नसल्यामुळे अभिमन्यूला मारणे शक्य झाले. द्रोणाने अभिमन्यूला मारताना काहीही गय दाखवली असे दिसत नाही. मनात येते की, भीष्माला आपल्या स्वतःच्या पणतवंडाला असे मारवले नसते.
 द्रोण ज्या तऱ्हेने मारला गेला. तीही हकीकत लक्षात घेण्याजोगी आहे. भीमाने अश्वत्थामा नावाचा एक मोठा हत्ती मारला व सर्वत्र 'अश्वत्थामा मारला गेला,' अशी हूल उठवली. द्रोणाला हे खरे वाटून तो धर्माला विचारायला गेला. तेव्हा धर्म तोंडातल्या तोंडात "कोण जाणे, माणूस का हत्ती ते?” असे पुटपुटला. ते द्रोणाला सर्व ऐकू गेले नाही, व स्वतःचा मुलगा अश्वत्थामाच मेला असावा, अशी शंका त्याला आली. पुढील हकीकतीवरून अश्वत्थामा नक्की मेलाच, अशी त्याची खात्री झाली असावीसे वाटत नाही. अवत्थामा मेला. ह्या बातमीवर विश्वास न बसायचे कारण असे देता येईल की, अशा तऱ्हेची कोणी तरी मित्र किंवा आवडता माणूस मेल्याची हूल उठवून शत्रूला हतबल करण्याचा डावपेच त्या वेळी चांगला माहीत होता. जरासंधाचे सेनापती हंस आणि डिंभक हे एकमेकांचे अतिशय मित्र होते, त्यांपैकी एक मेला, अशी हूल उठवल्यामुळे दुसऱ्याने जीव दिला. दुसऱ्याने जीव दिलेला पाहून पहिल्याने खरोखरीच आपल्याला मारून घेतले, असा वृत्तांत