पान:Yugant.pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / १०१
 


अरण्य जाळण्याची कल्पना निघालीच का? महाभारतात म्हटले आहे की, अग्नी ब्राह्मणाला 'नाही' कसे म्हणावयाचे, म्हणून ह्या वीरांनी खांडव जाळले. जाळले ते कसे? तर दोघांनी दोन बाजूंनी रथ व धनुष्यबाण असे चालवले की, एकाही प्राण्याला बाहेर निघता येऊ नये. नुसती झाडेच जाळली नाहीत, तर रानातला प्रत्येक प्राणी टिपून मारून किंवा मागे हाकून रानात जाळला. तूप खाऊन कंटाळलेल्या अग्नीने रुचिपालट म्हणून रानातील जनावरे खाण्यास मागितली व अशा प्रकारे कृष्णार्जुनांनी ती दिली. ह्या कथेत दोन पर्याय संभवतात; पहिला, कृष्णार्जुनांनी खांडव जाळले नाही, ते आपसूख जळाले, व त्याचा मोठेपणा कृष्णार्जुनाला दिला गेला. दुसरा, खरोखरच कृष्णार्जुनांनी वन जाळले. दुसरा पर्याय खरा धरला, तर एवढे मोठे रान प्राण्यांसकट जाळले हे मोठे शौर्याचे व यशोदायी कृत्य समजले गेले पाहिजे, हे तर निर्विवादच. महाभारतात म्हटल्याप्रमाणे खरोखरच त्यांनी खपून-पाऊस पडला तरीही पुन्हापुन्हा आग लावून हे वन जाळले, असे गृहीत धरण्यास काही प्रत्यवाय दिसत नाही. पण ते का जाळले?
 गुरे-ढोरे बाळगणाऱ्या, नांगराने शेती करणाऱ्या 'आर्य'- जमातींच्या इतिहासात वन जाळण्याची वा कापण्याची घटना आढळते. संबंध उत्तर हिंदस्थानात दाट अरण्ये होती. त्यांचे वर्णन वेदांत येते; महाभारतात येते. काही प्रसिद्ध वनांचे वर्णन बौद्ध वाङ्मयातही येते. एवढेच काय, पण ऐतिहासिक काळातील शिलालेखांत ते येते.
 महाभारतातली राज्ये फार लहान होती. आजचा पंजाब व दिल्लीच्या भोवतालचा भाग एवढ्या प्रदेशात कुरू, दक्षिण व उत्तर पांचाल, त्रिगर्त, मत्स्य एवढी राज्ये होती. ती एकमेकांना लागून नव्हती. एक राजधानी, भोवती शेती असलेली खेडी व त्यांभोवती अरण्ये असे राज्याचे रूप होते. काम्यकवन, द्वैतवन, खांडववन अशा कितीतरी वनांची वर्णने येतात. महाभारतानंतर बौद्धकालात