पान:Sanskruti1 cropped.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उच्चतम ध्येय त्यांच्या पुढे ठेवणे अशी कुटुंबपद्धती टिकविण्याचे मार्ग होते. कौरवांच्या घरी गांधारीच्या भावाचे व पांडवांच्या घरी कुंतीच्या भाच्याचे वर्चस्व नसते, तर कुरूवंशाचा निष्पात कदाचित होता ना. वरील उदाहरणाने दिसून येईल की, धर्म म्हणून जे आहे, ते विशिष्ट समाजरचना टिकवून धरण्याचे नियम आहेत. काही प्रदेशातील मातृप्रधान कुटुंबात लग्नाचे नातेवाईक मुळी राहतच नाहीत. एका घरात राहणारी माणसे नवराबायको, सासु-सासरा, जावा-जावा वगैरे नसून फक्त आई, मुलगे, मुली, भावंडे अशी असतात. लग्न करुन बाहेरून आणिलेल्या निरनिराळ्या पिढ्यांतील स्त्रिया (सासवा, जावा, सुना) व त्यांची स्पर्धा ह्यांचा प्रश्नच उरत नाही. घरातील सर्व माणसे घरातील स्त्रियांची मुले वा भावंडे असतात. पुरूषांची मुले आपापल्या आयांच्या घरी असतात. नवरे संध्याकाळचे क्वचित एखाद्या दिवसाचे पाहुणे असतात. बाप मुलांना दिसतात; पण घरी राहणारे नसतात; व मुलांवर त्यांची सत्ताच नसते. अशा कुटुंबात 'मातृभक्ती' हेच एक परमोच्च ध्येय सर्व स्त्रीपुरुषांना समान असते. पतिभक्ती किंवा पत्नीप्रेम ह्यांना जागाच नसते. रचनाभिन्नत्वामुळे पितृप्रधान समाजात बहुपत्नीत्व चालू शकते, भूषणावह ठरते. तर मातृप्रधान समाजात बहुपतित्व चालू शकते व भूषणावहही ठरते. जी गोष्ट पितृभक्ती, पतिभक्ती वगैरेंची ती इतरही सामाजिक मूल्यांची. सर्व परिस्थितीत चालू शकेल, असे मूल्य सापडणे कठीण. आणखी एक उदाहरण देते. आईची मुलाविषयी माया र असते, व ती तशी असावी, अशी बहुतेक मानवसमाजांत अपेक्षा असते. मूल जन्मल्याक्षणापासून स्वतःच्या जिवाकडे लक्ष न देता त्याची शुश्रूषा आईने करावी, अशी अपेक्षा बहुतेक समाजांतून असते. पण काही समाज ह्याला अपवाद आहेत. कालाहारी वाळवंटाच्या कडेला राहणारे 'बुशमन' म्हणून लोक आहेत. त्यांचे जीवन भटके असते. एकीकडच्या पाण्याचा व अन्नाचा साठा संपला की टोळी दुसरीकडे जाते. कित्येक महिने त्यांना रोज २०-२५ मैल जावे लागते. अशा वेळी एखादी बाई बाळंत झाली, तर नाळ तोडून ती मुलाला पाठीवरच्या पिशवीत घालते. मुक्कामाला गेले की मुलाला बाहेर

९२

।। संस्कृती ।।