पान:Sanskruti1 cropped.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ख्रिस्ती व मुस्लिम समाजाचे आपल्या बांधवांशी वागावयाचे नियम व अखिस्ती व अमहंमदी मानवतेशी वागावयाचे नियम अगदी भिन्न आहेत. ख्रिस्ती लोक व महमंदी लोक इतर मानवांना कमी दर्जाचे समजतात; व त्यांच्याशी वागताना सत्य, समता इत्यादी गोष्टींना मुळीच महत्त्व देत नाहीत. जी गोष्ट ह्या दोन सांप्रदायिकांची, अगदी बरोबर तीच कम्युनिस्ट मतप्रणालीच्या लोकांची आहे. ह्या तिघांचाही दावा असा आहे की, मानवसमाजाच्या अंतिम हिताची गुरूकिल्ली त्यांना सापडलेली आहे; उच्चतम धर्माचे दर्शन त्यांना झालेले आहे; ज्या आंधळ्यांना ते झाले नाही, त्यांना हात धरून तिकडे नेले पाहिजे; ते आले नाहीत, तर बलात्काराने नेले पाहिजे; बलात्कारानेही नेता आले नाही, तर ती माणसे मेलेली बरी. आज मानवसमाजात संघांतर्गत धर्म व संघाबाहेरील व्यक्तींशी वागावयाचा धर्म ह्यात जितकी फारकत झाली आहे, तितकी दुसऱ्या कोणत्य कोणत्याही ऐतिहासिक कालात दिसून येत नाही.
 संघांतर्गत विधीनिषेधही सर्वसामान्य नसतात. निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळे नियम लागू असतात. आपल्या हिंदुसमाजात उत्तरेकडे फार पूर्वीपासून पुरुषाला पितृ-(माता + पिता) - भक्ती हा परम धर्म सांगितला आहे; पण स्त्रीचा मात्र पतिभक्ती हा अंतिम धर्म मानिला आहे. लग्न होईपर्यंत पितृभक्ती व नंतर पतिभक्ती असा नियम जर स्त्रीच्या बाबतीत, तर लग्न होईपर्यंत पितृभक्ती व नंतर पत्नीभक्ती हा नियम पुरुषांना का नसावा? पितृप्रधान एकत्र कुटुंबपद्धती हा हिंदूंच्या समाजरचनेचा गाभा होता. अशा कुटुंबातील पुरूष एकमेकांबरोबर जन्मभर राहिलेले असतात. कुटुंबात जन्मलेल्या स्त्रिया परघरी जाणाऱ्या असतात. कुटुंबात वधू म्हणून येणाऱ्या, पुढे माता होणाऱ्या स्त्रिया परघरून आलेल्या असतात. अशा स्त्रियांनी जर आपापल्या पितृकुलाशी इमान राखले, तर घरात जितक्या स्त्रिया तितकी निरनिराळी राजकारणे उत्पन्न व्हावयाची व कुटुंबाला विस्कळीतपणा यायचा. ह्यासाठी बालविवाह करणे म्हणजे परघरातील स्त्रियांना शक्य तितक्या लहानपणी आपल्या घरी आणून रुळविणे व पतिभक्ती हे

।। संस्कृती ।।

९१