पान:Sanskruti1 cropped.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढारी घेतात, त्या वेळी समाजाचे हित साधत नसून काही व्यक्ती इतरांना मारून आपले हित तेवढे साधीत असतात. हाच मुद्दा परत विचारात येईलच. पण समाज, समाज म्हणून जे काही आहे, ते व्यक्तींचे मिळून झालेले आहे, व्यक्तीमय आहे, व्यक्तींमध्ये समाजाची मूल्ये केंद्रित झालेली असतात, व्यक्ती समाज बदलीत असते, व व्यक्तीला विसरून संघाचा विचार करणे अशास्त्रीय होईल, हे सत्य समाजशास्त्रज्ञांनी व विशेषतः समाजातील विचारवंत लोकांनी दृष्टीआड करता कामा नये.
 धर्म म्हणजे समाजाची जी रचना झालेली असते, ती टिकण्यासाठी आलले परंपरागत नियम. हे नियम समाजरचनेशी इतके निगडित असतात की, त्यांचे आकलन झाले की. समाजाच्या घडणीचेही आकलन होतेच. ह्या नियमांना काही मोल असते. त्याप्रमाणे वागणे योग्य ठरते, त्याप्रमाणे न वागणे अयोग्य ठरते. हे नियम बऱ्याच अंशी परंपरागत असतात व ते संस्कृतिसंक्रमणाच्या नियमांनी माणूस इतके आत्मसात करतो की, ते नैसर्गिक आहेत व अतिमूल्यवान आहेत, अशी भावना होते; व सर्व धर्माभोवती भावनांचे घट्ट वलय बसते. आपले म्हणजे स्वसंघाचे आचारविचार तेवढे योग्य व इतरांचे वाईट, अशी समजूत होते. सामाजिक मूल्यांचे मापन तीन तऱ्हांनी होतेः (१) सांप्रदायिक, (२) केवळ सामाजिक - कायदेविषयक, व (३) नीतितत्त्वाच्या दृष्टीने सांप्रदायिक व सामाजिक नियम आचारमय असतात, तर नीतितत्त्वे आचाराच्या बुडाशी असलेल्या विचाराला - मनःप्रवृत्तीला जास्त मानितात. पण नीतितत्त्वेही विशिष्ट समाजात उदयाला आलेली अशीच असतात; व केवळ विचारावर भर देऊन आचारशून्यतेत परिणत होणारी नीतितत्त्वेही निरूपयोगीच ठरतात. संस्कृतिसंगमाच्या व संस्कृतिसंक्रमणाच्या कालात जुन्या आचारविचारांचा पगडा कमी होतो. नवे आचारविचार निर्माण होऊन रुजण्यास वेळ लागतो व एक प्रकारची प्रमाणशिथिलता वा प्रमाणशून्यता समाजात शिरते. ह्याच कालात धर्म कोणता व अधर्म कोणता, ह्याचाही समग्र ऊहापोह करणे शक्य होते. समाजात निरनिराळ्या नियंत्रक शक्ती असतात. त्या चांगल्या आचरणाला

।। संस्कृती ।।

८९