पान:Sanskruti1 cropped.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवला तर समाजात छी: थू: होते, आणि वर शिक्षाही होते. परसंघातील स्त्रियांचे बलात्काराने हरण करणे हे पौरूषाचे लक्षण समजले जाई. ऋग्वेदात व अथर्ववेदात निरनिराळ्या तऱ्हेचे रोग नाहीसे व्हावे, म्हणून मंत्र आहेत. तापाला उद्देशून असलेल्या ऋचेत म्हटले आहे की 'ह्या माणसाच्या अंगातून नाहीसा हो; शत्रूच्या देशात जा.' शेजारच्या संघाशी भांडण नाही, तोपर्यंत बहुधा एकमेकांच्या वाटेला जाणे नको, अशी वृत्ती असते. पण तेच भांडण निघाले, म्हणजे परकीय संघांची जास्तीत-जास्त हानी करणे हे एक सामाजिक कर्तव्य व सत्कृत्य बनते, व त्याबद्दल समाजाकडून गौरव होतो, पारितोषिकेही मिळतात. प्रत्येक संघाचा धर्म त्या संघापुरता मर्यादित असतो. ज्या गोष्टी स्वसंघात अधार्मिक वा त्याज्य असतात, त्या परसंघातील माणसांना उद्देशून केल्या, तर त्याज्य ठरत नाहीत.
 सुमारे पन्नास-साठ हजार वर्षांपूर्वी मानवाचे संघ लहान-लहान होते. प्रत्येक संघ दुसऱ्यापासून बराच लांब असे. अशावेळी संघधर्म संघापुरताच असावा. हल्ली केवळ शिकारीवर उपजीविका करणाऱ्या किंवा लहान-लहान दऱ्याखोऱ्यांतून थोडी शेती करणाऱ्या वन्य जमाती लहान-लहान संघ कित्येकदा व्यापारानिमित्त किंवा काही उत्सवासाठी बरेच संघ एकत्र येतात. अशा वेळी संघासंघातील शत्रुत्व तात्पुरते सुप्त असते. कोणी कोणाची कागाळी करावयाची नाही, असा दंडक असतो. तात्पुरता का होईना, पण काही बाबतीत थोडा व्यापक संघधर्म उत्पन्न होतो. शिकाऱ्याचे जीवन संपून जेव्हा शेतीचे जीवन सुरू झाले, व हळूहळू पशुपालन करणाऱ्या जमाती त्यांत मिसळल्या, तेव्हा लहानशा भूप्रदेशावर पुष्कळ लोक राहून त्यांची उपजीविका होण्याची शक्यता उत्पन्न झाली. संघातल्या संघात एकजिनसी जीवन नाहीसे होऊन भेद वाढत गेले. शिकारीवर जगणाऱ्या वन्य जमातीत समानता असते. वन्य जमातींना दुसऱ्यांना जिंकून गुलाम करण्याची व राबविण्याची शक्यता नसते. संघाच्या म्होरक्यापासून ते सामान्य जनांपर्यंत सर्वांना सारखेच काम करावे लागते. शेतीच्या व्यवसायात नोकर ठेवायची शक्यता उत्पन्न होते, व संघामध्ये वर्गभेद उत्पन्न होतो. पहिल्याने लहानलहान खेडी व नंतर राज्ये निर्माण झाली. मोठमोठे मानवसंघ एकत्र

।। संस्कृती ।।

७९