पान:Sanskruti1 cropped.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "धर्म म्हणजे काय, ह्याचा विचार करिताना धर्मातीताशी आपल्याला काय कर्तव्य ?"
 - थोड्या वेळात कळेल. जरा दम धरा !
 आपल्या वेदान्त तत्त्वज्ञानात ज्याला काहीही विशेषण लागत नाही, जे सर्वमूल्यातीत आहे, असे एक सर्वव्यापी तत्त्व कल्पिलेले आहे. ह्या तत्त्वाला 'ब्रह्म' असे नाव दिलेले आहे. ह्या तत्त्वालाच शंकराचार्य 'पारमार्थिक सत्य' असे नाव देतात. ह्याशिवाय इतर जे काही आहे, त्याला ‘व्यावहारिक सत्य' असे नाव त्यांनी दिलेले आहे. पारमार्थिक सत्य हे अविनाशी आहे. त्रिकालाबाधित आहे, क्रियापदांनी व विशेषणांनी वर्णन न करता येण्यासारखे आहे. सर्व विश्व त्यात सामावलेले आहे; पण ते विश्वात सामावलेले नाही. सर्वात मौज म्हणजे ते 'ब्रह्म' म्हणून जे काय म्हणतात ते मी आहे, ते तुम्ही आहा, जे सर्व काही दिसते आहे, ते सर्व ब्रह्मच आहे.
 धर्म म्हणजे काय, ह्याचा ऊहापोह करण्याचा माझा काय अधिकार, हे आता तुमच्या ध्यानात आले असेलच. काही लोकांना वाटते की, 'रामकृष्णांसारख्या दैवतांच्या लौकिक आयुष्याबद्दल बोलणे क्षुद्र मानवांचे काम नाही; पूर्वकालीन मोठे राजे, योद्धे, ऋषी, द्रष्टे ह्यांच्या चरित्रावर साधकबाधक लिहीणे म्हणजे अविनयाची पराकोटी आहे. 'माझ्या ह्या क्षुद्र खटाटोपाला प्रत्यक्ष शंकर जरी मजल्यामजल्यांनी हसला व त्याने जरी आपल्या हास्यांचे प्रचंड हिमालय रचिले, तरी त्या उमामहेश्वरांच्या पायांवर डोके ठेवीन व म्हणेन की, 'मायबापांनो, मीपण ब्रह्म आहे. '
 दुसरे म्हणजे फक्त ब्रह्म जर त्रिकालातीत असेल, व तेच फक्त अविनाशी व नित्य असेल, तर 'धर्म', 'धर्म' म्हणून जे म्हणतात, ते पारमार्थिक, अविनाशी व नित्य अशा स्वरूपाचे सत्य नसून एक व्यावहारिक, सदा अपूर्ण व दिक्कालसापेक्ष असे काहीतरी आहे. ह्या धर्माचे स्वरूप समजावून घेण्यासाठी सध्या तात्पुरती एक व्याख्या करणे जरूर आहे. धर्म म्हणजे काय, ह्याचा विचार जसा पक्का होईल, तशी ती व्याख्या बदलून घेता येईल.

।। संस्कृती ।।

६१