पान:Sanskruti1 cropped.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सात


सासवा सुना


 महाभारतकाळी बायकांचे सर्व आयुष्य पुरुषांच्या अधीन असे. लहानपणी बापाच्या घरी लाडकी मुलगी म्हणून कौतुकही होई. त्याचप्रमाणे कोणाची, विशेषतः ब्राह्मणाची मर्जी संपादन करावयाची असली तर मुलगी त्याच्या शुश्रुषेला ठेवीत किंवा तिचे ब्राह्मणाबरोबर लग्न करून देत. ती वयात आली, म्हणजे शस्त्रविद्येत श्रेष्ठ ठरलेल्या मनुष्याशी तिचे लग्न होई, किंवा पैसे घेऊन तिचे लग्न होई किंवा तिला कोणी पळवून घेऊन जाऊ शकत असे. नवऱ्याच्या घरी, समाजात तिला नवऱ्याच्या दर्जाप्रमाणे मानमान्यता मिळे किंवा अपमान होई. ती राणी होऊ शके, ती दासी होऊ शके. तिला नवऱ्याकडून मुले होत, त्याचप्रमाणे नवऱ्याने नेमलेल्या पुरुषाबरोबर प्रजोत्पत्तीसाठी तिला संग करावा लागे. नवरा मेल्यानंतर तिला बऱ्याचदा सती जावे लागे. ती पुत्रवती असेल तर पुत्र ठेवील त्याप्रमाणे तिला रहावे लागे.
  महाभारतातील कोणत्याही स्त्रीला हे जिणे चुकले नाही. बायका बायकांच्यात जो फरक पडला, तो नवऱ्याच्या गुणामुळे. तरीही महाभारतातील काही स्त्रिया मनावर ठसा उमटवून जातात. त्याचे कारण ह्या पराधीन जिण्यात त्यांनी आपल्या नवऱ्याचे व मुलांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, वेळेस त्यांनी शिव्याशाप दिले. पण तीन बायका मात्र अशा आहेत की, दुःखाच्या त्यांना मूकनायिकाच म्हणावे लागेल. त्या म्हणजे काली सत्यवती व तिच्या दोन सुना अंबिका आणि अंबालिका - काशीराजाच्या मुली. महाभारत हा इतिहास घडविण्यात त्यांचा वाटा दैवाच्या हातचे खेळणे ह्यापलीकडे नाही. त्यातल्या त्यात सत्यवतीच सर्वस्वी पराधीन आणि परतंत्र अशी वागली. तिच्या सुनांनी आयुष्यात एकदा तरी चालले आहे त्याविरूद्ध आपली अनिच्छा नोंदविली.

५४

।। संस्कृती ।।