पान:Sanskruti1 cropped.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वाल्मीकीच्या आश्रमात सीता बाळंत होऊन सीतेला जुळे झाले व ही दोन्ही मुले आश्रमात वाढली. ज्या कवीने सीता त्यागाचा बनाव रचला त्याला पुढचा भागही रचणे क्रमप्राप्त होते. सीता समजा वनात मेली असती तर 'ही तुझी मुले, संभाळ' म्हणून त्यांना रामाच्या स्वाधीन करणे शक्य नव्हते. बीजक्षेत्रन्यायाने हे शक्य होते, असे महाभारत कथेवरून दिसते. पण रामायणाच्या प्रकृतीलाच मुळी तो न्याय पटणारा नाही. म्हणून सीतेची मुले रामाच्या बीजाची आहेत, हे सिद्ध करणे अत्यावश्यक होते. आता सीतेचे दिव्य फक्त तिच्यापुरतेच नव्हते ते न करून रानात मरून जाणेही तिला शक्य नव्हते. कारण तिच्या शुद्धत्वाबरोबर मुलांचे औरसत्व सिद्ध होणार होते. रामाचे वारस म्हणून अयोध्येच्या सिंहासनावर त्यांचा हक्क प्रस्थापित होणार होता. किंबहुना, इमानी बायको म्हणून दिव्य करणे जेवढे आवश्यक होते, त्याहीपेक्षा आईचे एक शेवटचे कर्तव्य म्हणून ते आवश्यक झाले होते. ही गोष्टही जाहीरपणे मोठ्या जनसमुदायापुढे होणे आवश्यक होते.
 ह्यानंतरचा प्रसंग पुष्कळच कवींनी रंगविला आहे. पण त्याचे कधी न पुसणारे चित्र कालिदासाने जे काढले आहे, तसे कोणालाच जमले नाही. तीन श्लोकांच्या आखूड सहा ओळींत एखाद्या क्षणचित्राप्रमाणे कालिदास हे चित्र उभे करतो. राम काय म्हणाला, सीतेने कसले भयंकर दिव्य केले, हे कळायच्या आतच हे वर्णन संपते. त्याच्या शब्दांतच ते देणे योग्य होईल.
 वाक्मनः कर्मभिः पत्यौ व्यभिचारो यथा न मे ।
 तथा विश्वम्भरे देवि मामन्तार्धातुमर्हसि ।।
 तत्र नागफणेक्षिप्तसिंहासन निषेदुषी ।
 समुद्ररशना साक्षात् प्रादुरासीद् वसुंधरा ।।
 असा सीतामङ्कमारोप्य भर्तृ प्रणिहिते क्षणाम् ।
 मा मेति व्याहरत्येव तस्मिन् पातालमभ्यगात्
या ओळींचा स्वैर अनुवाद खालीलप्रमाणे-
 मनोवाचाकृतीने ना पतिशी टळले जर ।
 ओटीमध्ये मला घ्यावे माये विश्वंभरे तर ।।

।। संस्कृती ।।

५१