पान:Sanskruti1 cropped.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हा जलसंचय कोठेही अतिशय खोल नाही. रावणाचा रथ जटायूने मोडल्यावर रावण सीतेला घेऊन गेला, असे सुपाश्वाच्या वर्णनावरून दिसते. तो आकाशमार्गे गेला वगैरे भाग अतिशयोक्त, काव्यमय किंवा मागाहून घुसडलेला असावा. राम वानरसेना घेऊन 'समुद्र'तीरी आला. तेव्हा तोही म्हणतो की, सर्व वानर पायी पायी दुसऱ्या तीराला पोहोचतील (६.२२.३). नलाने सेतू बांधला त्यासाठी त्याने दगड आणी झाडे (६.२२.५४.६७)ह्यांचा उपयोग केला. म्हणजे जेथे जेथे पाणी जरा खोल होते तेथे तेथे दगड आणि लाकडे टाकून तात्पुरता मार्ग तयार केला.
 ह्या वरील तर्काला पोषक असे आणखी एक दोन मुद्दे आहेत. कालिदासाच्या वेळी लंका म्हणजे सध्या ज्याला लंका म्हणतात ते असे लोक निश्चित धरून चालत होते. रघुवंशातील तेरावा सर्ग वाचताना तीच लंका कालिदास धरून चाललेला आहे, पण विमान लंकेहून अयोध्येपर्यंत जाताना ज्या मार्गाचे वर्णन केले आहे, तो मात्र जरा विचार करायला लावण्यासारखा आहे. पहिले १६ श्लोक समुद्राचे वर्णन आहे. नंतर दोन लोक किनाऱ्याचे वर्णन आहे. त्या नंतर कुठच्याच दक्षिण भूभागाचे वर्णन येत नाही. एकदम २२ व्या श्लोकात जनस्थानाचा उल्लेख आहे. नंतर माल्यवान पर्वताचा; नंतर पंपासरोवराचा, त्यानंतर गोदावरी नदीतून उठलेल्या सारसपक्ष्यांचा आणि पंचवटीचा. ह्यापुढे ओळीने अगस्त्याश्रम, पंचाप्सरस सरोवर, नंतर सुतीक्ष्ण, नंतर शरभंगाचा आश्रम, नंतर चित्रकूट, त्याच्याभोवताली वाहणारी मंदाकिनी नदी, नंतर अत्रींचा आश्रम, मग गंगायमुनांचा संगम आणि त्यापुढे शरयू नदी व अयोध्या. राम ज्या क्रमाने दंडकारण्यात पोहोचला, त्याच्या बरोबर उलट क्रमानेच हे वर्णन केलेले आहे. जनस्थान व माल्यवान यांचा उल्लेख पंपेच्या आधी आहे. माल्यवान पर्वत व गोदावरी ही परस्परांपासून किती दूर होती, ह्याचा मात्र काहीच बोध होत नाही. रामायणातही पंपेचा उल्लेख येतो तो सीताहरणानंतर. पण ते स्थान गोदावरीच्या दक्षिणेला का उत्तरेला, हे मात्र कळत नाही.

४२

।। संस्कृती ।।