पान:Sanskruti1 cropped.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वास्तू असावी, अशी कल्पना आहे. विशालानगरीतून पार झाल्यावर ते मिथिलानगरीच्या उपवनात पोहोचले. तेथेच त्यांना अहिल्या भेटली व तिचा उद्धार झाला. मिथिलेहून अयोध्येला येताना गंगापार व्हावे लागत नाही. जनकाने द्रुत पाठविले ते तीन रात्रींच्या मुक्कामानंतर अयोध्येला पोहोचले असे वर्णन आहे.
 रामाने दुसऱ्या वेळेला गंगा ओलांडली, ती वनात जाताना. ह्या वेळेला त्याने खूपच पश्चिमेकडे गंगा ओलांडली. शरयूच्या (सध्याची घोग्रा नदी) दक्षिणतीराने जाता-जाता त्याने तमसा (हल्लीची तॉस) नदी ओलांडली. काही मार्ग दक्षिणेकडे चालून गेल्यावर त्याला गंगेचे पात्र दिसले. गंगेच्या दक्षिण तीराला गेल्यावर एका मोठ्या झाडाखाली रामलक्ष्मण रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी दिवसभर चालून ते गंगा-यमुनाच्या संगमावर प्रयागला भारद्वाजांच्या आश्रमात पोहोचले. भारद्वाजाच्या आश्रमापासून १० कोसांवर चित्रकूट पर्वत आहे असे सांगितले आहे. प्रयागच्या दक्षिणेकडे तो पर्वत होता. यात शंका नाही पण पश्चिमेकडे का पूर्वेकडे, ते मात्र दिलेले नाही. त्या पर्वतावर जाताना वाटेत त्यांना कालिंदी, अंशुमती अशा दोन नद्या लागल्या असे म्हटलेले आहे. कालिंदी व अंशुमती या दोन नद्या कोठच्या असाव्या, हे काही नीट समजत नाही.
 भरत भेटीनंतर रामाच्या असे लक्षात आले की, आपण जर चित्रकूटावर राहिलो, तर अयोध्यावासी नातेवाईक व पौरजन आपल्याला परत-परत भेटायला येतील व उगीच मुनिजनांच्या वसतीची शांती भंगेल, तेव्हा आपण चित्रकूट सोडून पुढे जावे. चित्रकूटाला लागून मंदाकिनी नावाची नदी होती. ही मंदाकिनी उत्तरेकडची गंगेची उपनदी असली पाहिजे. चित्रकूटाशेजारीच पंपा नावाची दुसरी नदी होती. चित्रकूटावर रामाला दोन मार्ग दाखविले. एका मार्गाने ऋषी जवळपास फळे वगैरे आणायला जात असत. दुसरा मार्ग दंडकारण्यात जात होता. रामाने तो मार्ग पत्करला व तो दंडकारण्यात शिरला. तेथे त्याला आश्रममंडल दिसले तेथे राहून दुसऱ्या दिवशी राम वनात शिरला. तेंव्हा त्याला विराग नावाचा राक्षस दिसला.

।। संस्कृती ।।

३७