पान:Sanskruti1 cropped.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भरताने कैकेयीची निर्भर्त्सना केली. "ना बाप, ना भाऊ, अशा मला राज्य घेऊन करायचे काय ? धार्मिक अश्वपतीची ( हेच नाव सावित्रीच्या बापाचे होते.) तू मुलगी नसून कुळाचा समूळ नाश करणारी अशी राक्षसीणच जन्माला आली आहेस." येथे भरताने कैकेयीला एक मजेदार गोष्ट सांगितली आहे. "एकदा देवांची गाय सुरभी हिने हाडे निघालेले, श्रान्त असे दोन बैल कसेबसे नांगर ओढताना पाहिले. मुलांचे दुःख पाहून ती रडू लागली. तिचे अश्रू इन्द्रावर पडले. तो म्हणाला, 'बाई, रडतेस का? आम्ही काय केले आहे ?' ती म्हणाली, 'तुम्ही नाही, पण पृथ्वीवर पहा माझ्या लेकरांचे काय हाल चालले आहेत ते अग कैकेयी, लक्षावधी मुले असलेल्या सुरभीला दोघांचे दुःख पाहवले नाही. तर एकपुत्रा कौसल्येला काय झाले असेल? मी अस्सा जातो; रामाला परत आणतो किंवा ते शक्य न झाले, तर मी वनात जातो."
 भरताचा शब्द कानांवर पडताच कौसल्या तरातरा आपल्या वाड्याबाहेर त्याला भेटावयाला आली. पहिले शब्द ती काय बोलली ? "बाबा, हे निष्कंटक राज्य तुला मिळाले आहे, ते भोग. आता कैकेयीने मला पण माझा मुलगा आहे, तेथे हाकलून द्यावे. नाहीतर तू तरी मला तिकडे नेऊन टाक?" बिचारा भरत! त्याच्या क्लेशांना सुरुवात झाली. "आर्ये, ह्यातले मला काही माहीत नाही. मला का बरं दोष लावितेस जगातील सगळी पापे व फळे मला लाभोत, जर ह्यातले मला काही माहीत असेल तर!" अशा नाना शपथा भरताने घेतल्या व कौसल्येचे सांत्वन केले.
 वसिष्ठाने भरताला सांगितले, “बाबा आता शोक पुरे. बापाचे कार्य कर." रीतीप्रमाणे राजाचे सर्व संस्कार झाले व भरत आणि इतर परत राजधानीत येऊन दहा दिवस जमिनीवर निजून राहिले. पित्याचा बारावा व तेरावा दिवस भरताने केला.
 तेराव्या दिवशी शत्रुघ्न भरताचे सांत्वन करीत असता त्याला कुब्जा मंथरा दिसली. तिला शत्रुघ्नाने भरताच्या सांगण्यावरून मारून काढले. पण राम रागावेल, म्हणून जिवानीशी सोडले.

।। संस्कृती ।।

२९