पान:Sanskruti1 cropped.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रामाला निदान त्याचे अंत्यसंस्कार तरी करिता आले. राम कुठे आहे, हे तरी लौकर सांग; म्हणजे दशरथाच्या शेवटच्या क्षणाची मला वार्ता कळेल." असे विचारिल्यावर कैकेयी म्हणाली, "हा राम! हा सीते! हा लक्ष्मणा! असा आक्रोश करीत राजा वारला. राजाचं शेवटचं भाषण होतं- 'राम सीतेबरोबर परत येईल व प्रजेला आनंद देईल.".
 ही दुसरी अप्रिय वार्ता ऐकल्यावर भरताने विचारिले, "म्हणजे राम, सीता, लक्ष्मण आहेत तरी कुठे?"
 कैकेयीचे उत्तर "तो वल्कले धारण करून दण्डकारण्यात गेला आहे." भरताला भीतीने कापरे भरले. "झाले तरी काय असे?” त्याने त्रस्तपणे विचारिले, "रामाने काय एखाद्या ब्राह्मणाचे धन हरण केले का ? एखाद्याला ठार मारिले का ? परस्त्रीचा अभिलाष धरला का? दण्डकारण्यात हद्दपार करण्याची शिक्षा त्याला कशामुळे मिळाली?" हे ऐकून त्याला अभिषेक होणार हे ऐकिल्यावर रामाला वनवासात पाठविण्याची बहादुरी आपणच कशी केली, हे कैकेयीने सांगितले व ती म्हणाली, "बाबा, हे सर्व मी तुझ्यासाठी केले. आता राज्यावर बैस शक्य तितक्या लवकर राजाचे अन्त्यसंस्कार कर व मग स्वतःचा अभिषेक करवून घे." संबंध ६६ वा अध्याय ह्या संवादात गेला आहे. किती वाकडेपणे एखादी घडलेली हकीकत सांगायची ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मला वाटते लोकांत रूढ असलेल्या अशाच तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टींचे हे मूळ असावे. एक गोष्ट चमत्कारिक वाटून विचारावी, तो तीहीपेक्षा चमत्कारिक व वाईट गोष्टीवर ती अवलंबून असावी. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत.
 'एकादशीच्या दिवशी सुपारी का हो खाता?' असे एका ब्राह्मणाला विचारिले, तो म्हणाला, 'कांद्याचा वास जाण्यासाठी!' वगैरे वगैरे अशी गोष्ट लहानपणी ऐकल्याचे स्मरते. अशा गोष्टी विनोदी म्हणून सांगितल्या जात. त्यांचे मूळ रामायणाच्या अयोध्याकांडाच्या ६६ अध्यायात असेल, अशी त्या वेळी कल्पनाही नव्हती.

२८

॥ संस्कृती ॥