पान:Sanskruti1 cropped.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काय वर्तमान घडले, हे भरताला न सांगण्याची जासुंदांना आज्ञा होती. अतिशय त्वरेने जासूद पाच दिवसांनी गिरिव्रजाला केकय- देशात अश्वपतीच्या राजधानीत पोहोंचले. 'तुला अयोध्येला बोलाविले आहे,' एवढाच निरोप भरताला कळला व तो लागलीच निघाला. लाडक्या नातवाला व भाच्याला खूप आहेर, उत्तम घोडे वगैरे देऊन अश्वपतीने परत पाठविले. भरताला परत येण्यास आठ दिवस लागले. अयोध्येत तो पोहोंचला, तर सर्व वातावरण त्याला चमत्कारिकच दिसले. बाप कुठे दिसेना. तो हटकून कैकेयींच्या महालात असणार. तेथे त्याच्या पाया पडावयास म्हणून गेला, तो एकटी कैकेयीच त्याला दिसली. तिने त्याला मिठी मारली, "आजोबा कसे आहेत ?" वगैरे प्रश्न विचारिले त्याने त्या प्रश्नांना उत्तरे दिली व उताविळीने विचारिले की, "महाराज कुठे आहेत?" ह्यानंतरची प्रश्नोत्तरे फारच मासलेवाईक आहेत. ती देण्याआधी एक मुद्दा, कैकयी विधवा झाली आहे ह्याचे कोठचेच चिन्ह भरताला दिसले नसले पाहिजे. त्या वेळच्या स्त्रिया कुंकूही लावीत नव्हत्या व मंगळसूत्रही बांधीत नव्हत्या.
 भरत विचारितो, 'काय झालंय तरी काय? कोणी आनंदी दिसत नाही. राजा बहुतकरून आईच्या (कैकेयीच्या) घरी असतो, म्हणून मी येथे आलो, तर तो दिसतच नाही. मला बापाच्या पाया पडायचंय. तो थोरली (कौसल्ये) कडे आहे का ? सांग पाहू."
 कैकेयीने उत्तर दिले, "बाबा, जन्माला आलेल्यांची शेवटी जी गत होते, तीच तुझ्या पित्याची झाली. "
 हे ऐकून तो बेशुद्धचं पडला व मग शोक करु लागला. (महाभारताशी तुलना करिता रामायणातील सर्व पुरुष वारंवार रडतानाच आढळतात.) त्याची आई म्हणाली, "ऊठ, पडला आहेस तो. तुझ्यासारखे असा शोक करीत नाहीत."
 भरत म्हणाला, "रामाला अभिषेक तरी होत असेल किंवा राजा एखादा मोठा यज्ञ करीत असेल, म्हणून मी मोठ्या आनंदाने व उत्सुकतेने आलो, तर हे घडले. कोठच्या रोगाने राजा गेला? मला पाह्यलाही मिळाला नाही.

।। संस्कृती ।।

२७