"तू राज्याचा, स्वतःचा, मंत्र्यांचा, सगळ्यांचा घात केलास. मला व माझ्या पोराला मारिलेस. तुझी बायको व तुझा मुलगा ह्यांना मात्र आनंद झाला आहे." कैकेयी व भरत तुझे, आम्ही तुझे कोणीच नव्हत, असे ती म्हणत आहे. चौदा वर्षांनी राम येईल व राज्य घेईल, असे कदाचित राजा म्हणेल म्हणून त्याआधीच ती म्हणते-
एवं कनीयसा भ्रात्रा भुक्तं राज्यं विशांपते ।
भ्राता ज्येष्ठो वरिष्ठश्च किमर्थं नावमंस्यते ||
न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति ।
तथा ह्यात्तमिदं राज्यं हृतसारां सुरामिव ।
नाभिमन्तुमलं रामो.. ।। (२.५५.११,१३).
"धाकट्या भावाने ज्या राज्याचा उपभोग घेतला, त्या राज्याला थोरला भाऊ का झिडकारणार नाही? दुस-याने आणिलेले भक्ष्य वाघ कधी खात नसतो. अशा प्रकारे मिळालेले राज्य म्हणजेच चव गेलेली (शिळी) दारूच. राम मुळीच कशाचा स्वीकार करणार नाही. "
दोघी सवती- सवतींची मने अगदी सारखीच. ज्या शब्दात त्या बोलतात, तेही सारखेच. एका भावाने उपभोगलेले किंवा ज्यातून श्रीमंत, कोशकार व इतर निघून गेले आहेत अशा राज्याला दोघीही शिळ्या, चव गेलेल्या दारूची उपमा देतात. धाकटा भाऊ राज्यावर बसला व मागून थोरल्याला ते मिळाले, तर ते जणू उष्टे होते, अशा तऱ्हेने कौसल्या बोलत होती. राजाने वर दिले होते व ते पाळले पाहिजेत, हे कारण फक्त राजाला, कैकेयीला व रामाला मान्य होते. इतरांना ते एक स्त्रैण माणसाने पुढे केलेले निमित्त वाटते.
इमां गिरं दारुणशब्दसंश्रितां निशम्य स्वदुष्कृतं चापि पुनस्तां स्मरन् । (२.५५.२१)
"हे दारुण शब्द ऐकल्यावर स्वतःच्या दुष्कृत्याची राजाला (परत) आठवण झाली." ह्या श्लोकात राजा स्वतःच्या कृत्याला दुष्कृत्यच म्हणतो. राम वनवासाला निघाला, तेव्हा राज्याबाहेरच त्याला ठेवून भरपूर द्रव्य वगैरे
॥ संस्कृती ॥