पान:Sanskruti1 cropped.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक हजार गावे दिली, त्याला उद्देशून हे वाक्य आहे. म्हणजे इतर प्रक्षिप्त म्हणून गळालेल्या भागात ही माहीती असणार. लक्ष्मण सुमित्रेचा निरोप घेणे थोडक्यातच आटोपतो.
 ह्या सर्व निरोपानिरोपीत व पुढेही एक गोष्ट राम व इतरही पुनः पुनः सांगतात, "मी परत येऊन राज्यावर बसेन तेव्हा " असे राम म्हणतो, इतरही म्हणतात. भरताला जर यौवराज्याभिषेक व्हायचा, तर 'मी राज्यावर बसेन,' असे राम का म्हणू शकतो? (प्राप्तराज्येन नरव्याघ्रे शिवेन पुनरागतः।(२.४६.७२). सुमित्राही असेच म्हणते (२.३९.१५). सर्वांचेच असे मत दिसते. भरताला अभिषेक झाला व दशरथ चौदा वर्षे राज्यावर राहिला, तर तो रामाला आपला वारस करू शकतो, असा का ह्याचा अर्थ ? म्हणून का कैकेयी राजाला मारील, असे भय सर्वांना वाटते? ह्या प्रश्नाचा उलगडा रामायणात झाला नाही. हा पेच मात्र पुढे सर्वस्वी सुटला.
 रामाने लक्ष्मणाला शस्त्रागारातून उत्तम शस्त्रे विशेषतः दैवी धनुष्य बाण आणावयास सांगितले. आपले सर्व धन रामाने गुरूपुत्रांना व इतरांना वाटून टाकले व जाण्याच्या आधी दशरथाचा निरोप घेण्यास राम, लक्ष्मण व सीता अशी तिघेही कैकेयीच्या राजवाड्यात गेली, तो लक्ष्मण व सीता पायी जाताना पाहून सर्व लोक हळहळत होते. राम निरोप घ्यायला आला आहे, असे सुमंत्राने सांगितले, तेव्हा राजाने माझ्या बायकांना बोलावून आण म्हणून सांगितले, व राजाच्या शेकडो (७००-वर) बायका कौसल्येला घेऊन आल्या. ह्या सर्व घटनांमधे एक गोष्ट लक्षात येते. "सुमंत्रा, रामाला आण.” “सुमंत्रा, माझ्या सर्व स्त्रियांना बोलाव." असले निरोप सांगताना राजा पूर्ण शुद्धीवर होता. रामाने विचारिले, “माझी काय चूक झाली?" तेव्हा त्याला बोलवेना. त्याचप्रमाणे “माझ्या स्त्रियांना बोलाव, " ह्याऐवजी "मंत्र्यांना बोलाव," किंवा "वसिष्ठांना बोलाव." असे तो म्हणेना. ही एकच गोष्ट तो कैकेयीच्या किती अधीन होता व तिला वर दिले होते वगैरे खोटे असण्याचा कसा संभव आहे, हे दाखविते. "रामाला आणव," असे त्याने सांगितले. राम येताना पाहून तो धावत त्याला भेटायला गेला व मध्येच बेशुद्ध झाला. त्याला

२०

।। संस्कृती ।।