पान:Sanskruti1 cropped.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कम्युनिस्टांचे ध्येय समाजहितवर्धक आहे किंवा नाही, हे पाहण्याआधी ज्या दोन गोष्टी बुद्धीला पटत नाहीत, त्यांचा उल्लेख करणे जरूर आहे. त्यांतील पहिली म्हणजे जे काही हित असेल, ते 'समाजाचे' किंवा 'एका वर्गाचे', समाजांतर्गत एका विशिष्ट संघाचे असेल, असे कम्युनिस्टांचे म्हणणे आहे. त्यांच्या दृष्टीने हिताहितांच्या विचारात व्यक्तीला काडीमात्र स्थान नाही. व्यक्तीचे सुख, व्यक्तीचे स्वास्थ्य ह्याही गोष्टींची जेथे दखल घेतली जात नाही, तेथे व्यक्तीविकासाची गोष्टच बोलावयास नको. पहिल्याने त्यांचे लिखाण एका वर्गाबद्दल होते; आता ते सर्वस्वी एका राष्ट्राबद्दल आहे. ते राष्ट्र म्हणजे कम्युनिस्ट रशिया. कम्युनिस्ट रशियाचे वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांत व्यक्तींचा व इतर राष्ट्रांचा त्याग नेहमी अपुराच पडतो. अंती संघाचे हित तेच व्यक्तीचे हित, तेव्हा संघाच्या हिताची फक्त दक्षता बाळगली पाहिजे; एवढ्यावरच ते थांबत नाहीत. हित फक्त संघाचेच असते, व्यक्तीच्या हिताचा विचार समाजहिताला विघातक आहे, अशीच त्यांची विचारसरणी आहे. संघ आणि व्यक्ती ह्यांबद्दलचा हा सिद्धांत मी मागे सांगितलेल्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. समाजहिताचे नाव पुढे करून काही विशिष्ट सत्ताधारी व्यक्ती आपला मोठेपणा साधीत असतात. हा प्रकार इतिहासात सर्वत्र दिसून येतो. इजिप्तच्या राजांनी जगातील एक महान आश्चर्य असे पिरामिड बांधून इजिप्तचे नाव केले. हे पिरामिड बांधताना मजुरांच्या किती पिढ्या गारद झाल्या, त्याचा अंदाज हल्लीचे इतिहासकार करत असतात. राष्ट्रकूट राजांनी वेरुळची लेणी बांधून आपले नाव अजरामर केले. चीनच्या मजुरांचे व कैद्यांचे किती बळी चिनी भिंतीने घेतले, हे एक परमेश्वरच जाणे. पुंजीपती सम्राटांच्या अमानुषत्वाची उदाहरणे म्हणून वरील घटनांचे वर्णन करण्यात येते. रशियाला आजचे वर्चस्व प्राप्त करून देण्यासाठी बहुजनसमाज व इतर राष्ट्रांचे कैदी ह्यांकडून करून घेतलेले काम व त्याप्रीत्यर्थ मरण पावलेले लोक ह्यांची गणती कोणी करावी? श्रमिक वर्गाचे हित बाळगणारे तत्त्वज्ञान म्हणावे तर प्राणिमात्रांच्या साध्या गरजांना आंचवलेले हे लोक श्रमिक नव्हते का? ज्यांच्यासाठी राष्ट्राने मोठे व्हावे,


१००

।। संस्कृती ।।