पान:Sanskruti1 cropped.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थोडा आहे. दोन्ही धर्म एका बाजूने उच्चतम, सर्वसाधारण अशी मोक्षाची तत्त्वे सांगतात, व दुसऱ्या बाजूने नसत्या आचारधर्माचे स्तोम माजवितात. बुद्धाच्या शिकवणीत काही तत्त्वे अशी दिसतात की, ती सार्वजनिक व सार्वकालिक वाटतात. आपण त्यांचा पुढे विचार करू.
 हल्लीच्या काळात युरोपात कम्युनिस्ट मतप्रणालीचा उगम झाला. हा उगमही कारूण्यात व दयेत झाला; पण त्याच्याच जोडीला अन्यायाची चीड व त्याचा प्रतिकार करण्याची तीव्र इच्छा होती. बुद्ध ज्यांना दुःख म्हणे. ती मानवाच्या मानवपणामुळे उत्पन्न झालेली व त्यावर इलाज नसलेली अशी होती. पण मार्क्स व एंगेल्स ह्यांना जी दुःखे दिसली, ती समाजातील विषमतेमुळे उत्पन्न झालेली होती. समाजाची रचना पालटली, म्हणजे ती दुःखे संपून सुखाची पहाट होईल, अशी ह्या द्रष्ट्यांची कल्पना होती. अशाच तऱ्हेची कल्पना फ्रेंच क्रांतिकारकांचीही होती. मनुष्याच्या दुःखाचे मूळ नैसर्गिक किंवा दैवी नसून मानवी आहे. समाजाची रचना अशी झाली आहे की, काहींच्या हातात अर्थ व सत्ता केंद्रित झाली आहे, त्यामुळे ते इतरांना राबवितात, श्रमाचा मोबदला पुरा देत नाहीत, व जीवन दुःसह अथवा सर्वस्वी असह्य करून टाकितात. श्रमजीवी लोकांच्या हातांत सत्ता गेली, म्हणजे अर्थकामांची विषमता जाईल व मानवाचे कल्याण होईल, हा ह्या लोकांचा दावा. बुद्ध आणि कम्युनिस्ट ह्यांच्या ध्येयांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. बुद्धाचे डोळे अस्मानात लागलेले होते. तो ह्या जीवनाची असारता शिकवीत होता; तर कम्युनिस्ट फक्त ह्या पृथ्वीवरील जीवनाचाच विचार करतात. दोन्ही शिकवणींचा उगम दयेच्या पोटी असला, तरी साधने मात्र सर्वस्वी भिन्न आहेत. कम्युनिस्ट द्रष्ट्यांच्या विचाराला चालना दयेने प्रेरित होऊन मिळाली असली, तरी ते दयेशीच थांबले नाहीत. दुःखाची सामाजिक बीजे काय, ह्याचे संशोधन करून गरिबांच्या हाती सत्ता आली, तर दुःखे नाहीतशी होतील, असा सिद्धांत बांधून, त्या तत्त्वांवर समाजरचना करण्याच्या मार्गाला ते लागले. ही रचना करताना त्यांनी अति क्रूर व निष्ठुर मार्गांचा अवलंब केला. नुसत्या श्रीमंतांनाच नाही, तर

।। संस्कृती ।।

९७