पान:Paripurti.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






जुळी मुले

'महाभारतातील एक मजेदार प्रसंग मी

वाचीत होते. कुंतीने आपल्या मंत्रसामर्थ्याच्या
जोरावर यम, इंद्र वगैरे देवांकडून तीन मुलगे
मिळवले, त्याच्यापुढचा कथाभाग होता तो.
माद्री पांडूला म्हणत होती, राजा, तुला व्यंग
असले तरी मी कधी मनाचा संताप केला नाही,
पण तिला तीन मुले व्हावी आणि मला मात्र एकही
नसावे ह्याचेच मला दु:ख होते. ती तर
बोलूनचालून सवत, तिजजवळ मी ही गोष्ट कशी
काढणार? तर तूच माझ्या वतीने कुंतीजवळ
याचना कर, त्यामुळे माझी तृप्ती व तुझा लाभ
अशा दोन गोष्टी साधतील." माद्रीचे म्हणणे पटून
राजाने माद्रीसाठी कुंतीची मनधरणी केली, व
कुंतीनेही उदार होऊन कोणत्याही दैवताचे एकदा
चिंतन करावयास माद्रीस सांगितले. माद्रीने
विचार करून अश्विनीदेवांना बोलावले, व
त्यांच्याकडून तिला अत्यंत सुंदर अशा दोन
मुलांची प्राप्ती झाली. काही दिवस गेल्यावर
राजाने परत माद्रीसाठी शब्द टाकला, तेव्हा कुंती
म्हणाली, “तिला एक मंत्र दिला त्याच्या बळावर
तिने जुळे मिळविले! मी बिचारी चांगलीच

फसले! मला तिच्या वरचष्म्याची भीती वाटते.