पान:Gangajal cropped.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३२ / गंगाजल


गेल्या होत्या. गृहस्थाच्या घरी त्यांचे जे आदरातिथ्य व्हायचे ते होत असे, व ते अगदी मनापासून होई. पण अप्पांनी कधी कोणाचा मोठा बडेजाव केला नाही व कोणाला आपला करू दिला नाही. त्यांच्या सान्निध्याचा असाच प्रभाव पुणे विद्यापीठावरही पडला. डॉ.जयकर अतिशय बुद्धिमान, पण स्वभावाने तर्ककर्कश व हुकमत गाजविणारे. ते सभापती होते, तेव्हा सारखे खटके उडत व तीव्र असंतोष असे. एखाद्याला खाली बसवीत तेही इतक्या हुकमतीने व तुच्छतेने की, ते मनुष्य कायम दुखावले जाई व इतर सभासदांच्या मनातही भीती व असंतोष निर्माण होई. अप्पा आल्यावर हे सर्व बदलले. सर्व सभागृहातील वातावरणच बदलून गेले. एक वयस्क प्रोफेसर मला म्हणाले, "काय गोड माणूस हो! त्यानं आम्हांला आमच स्वत्व: परत दिलं.' विशेषतः, तरुण माणसांना आणि आता सर्वच त्यांच्यापेक्षा लहान आहेत, ह्या वागणुकीमुळे फारच आनंद होतो.

 हे सर्व होत असता त्यांच्या कर्तव्यात काडीमात्र कसूर होत नाही. बायबलमध्ये एक वाक्य आहे.... “जो प्रेम करतो. तोच शिक्षाही करू शकतो.” (He chastiseth best who loveth best.) ते मला नेहमी त्यांना लावावेसे वाटते. एका बाबतीत मात्र त्यांच्या मायेला कर्तव्यनिष्ठुरतेचा बंध नाही. त्यांना अगदी लहान मुले कमालीची आवडतात. अगदी एका दिवसाचे तान्हे मूलसद्धा ते हौसेने मांडीवर घेतात, व तोंडाने चाक-चूक असे आवाज काढीत त्याच्याशी बोलतात. एखादे तान्हे मूल त्यांच्या मांडीवर मुतले म्हणजे तर त्यांना धन्य वाटते. जाई, गौरी, सई वगैरे सर्व नातींना ते बजावून सांगतात, “नसता मोठेपणा सांगू नकोस; लहानपणी माझी मांडी भिजवली आहेस!"

 मुले जरा मोठी झाली, म्हणजे मात्र अप्पांच्या जवळून पळून जातात; कारण ते हळूच तपकीर त्यांच्या नाकात कोंबतात, नाही तर दंड दाबून बेटकुळी काढतात. मूल भेदरले, म्हणजे मोठमोठ्याने हसतात. 'मुलांचे मानसशास्त्र' हे शब्द त्यांनी ऐकिलेले दिसत नाहीत. एक प्रकारे ते ठीकच आहे. कारण त्यांच्या ह्या रानटी वागणुकीमुळे कुणी मूल त्यांना कायम दुरावलेले मला माहीत नाही. मुले परत जरा मोठी झाली की, त्यांच्याकडे ओढली जातातच.

 आप्पांच्यात विरोधी वाटणार्‍या दोन गुणांचा मिलाफ मजेदार रीतीने झालेला आहे. पहिला, त्यांची समता किंवा न्यायबुद्धी; आणि दुसरा, त्यांचे