पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७४]

नफ्याच्या स्वरूपाचें अशा प्रकारचें विवेचन अर्वाचीन अर्थशास्रकारांनीं केलेलें आहे. अभिमत अर्थशास्रकारांनी नफ्याचें स्वरूप एकच असतें व नफ्याचा सामान्य दूर एकच असतो असें प्रतिपाद्न केलेलें आहे. व त्यांचे मतानें देशाची संपत्ति जसजशी वाढते त्या मानानें नफ्याचे दर कमी होत जातात. या बाबतींत स्वाभाविकपणें पडणाऱ्या संपत्तीच्या चार वांट्यांमधील साम्य व विरोध यांचा विचार करण्यासारखा आहे. नफा व व्याज यांमध्यें अत्यंत साम्य आहे. कांहीं अंशीं ते एकच आहेत असें अभिमत अर्थशास्त्रकारांचें म्हणणें आहे. ज्याप्रमाणें समाजाच्या औद्योगिक प्रगतीबरोबर व्याजाचा दर कमी कमी होत जातो तोच प्रकार नफ्याचाही होतो. म्हणजे समाजाच्या औद्योगिक प्रगतीबरोबर देशांतील धंद्यांतील नफ्याचा सामान्य दर कमी कमी होतो. कारण नफा हा उत्पन्न केलेल्या संपत्तीला येणारी किंमत व उत्पन्न करण्यास लागलेला खर्च यांच्या वजाबाकीपासून येतो व एखाद्या धंद्यांत मालाला मागणी जास्त झाली म्हणजे त्याची किंमत वाढते व अशी किंमत वाढली म्हणजे नफा जास्त होती व एका धंद्यांत याप्रमाणें नेहमीपेक्षां नफा जास्त होऊं लागला म्हणजे त्या धंद्यांत लोकांची गर्दी होते व नवीन नवीन कारखाने निघून मालाचा पुरवठा वाढतो व यामुळे मालाचा दर पुनः पूर्वीच्या सरासरीवर येऊन पोंचतो. तेव्हां देशामध्यें जी नेहमीं चढाओढ चालू असते त्यामुळे देशांतील नफ्याचे दर व्याजाच्या दरांप्रमाणें नेहमीं कमी होतात.
 परंतु जमिनीचा खंड व मजुरी यांचा क्रम याच्या उलट असतो. देशाच्या प्रगतीबरोबर हीं दोन्हीं वाढत जातात. कारण जसजशी वाईट जमीन लागवडीस येते तसतशी लागवडीची धार खालीं खालीं येते व म्हणून जमिनीचा खंड वाढतो व जीविताच्या अवश्यकांची किंमत वाढल्यामुळं मजुरीचे दरही वाढत जातात. अभिमतअर्थशास्त्रकारांनी याप्रमाणें जमिनीचा खंड व मजुरी आणि व्याज व नफा यांमध्यें विरोध आहे असें दाखविलें आहे.विशेषतः मजुरी व नफा यामध्यें विशेष प्रकारचा विरोध आहे असें त्यांचें ह्मणणें आहे. कारण वर दर्शविल्याप्रमाणें नफा हा मालाला येणारी किंमत व मालाला लागणारा खर्च यांच्या वजाबाकी इतका असतो व मालाला लागणाऱ्या खर्चाचा मुख्य भाग मजुरीमध्येंच खर्च होतो. तेव्हां कांहीं कारणांनीं मजुरी वाढल्यास नफा कमी झालाच