पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१५८]

वाढली तर त्यांचे मजुरीचे दर अवश्यमेव कमी झाले पाहिजेत.तेव्हां मजूरलोकांनीं लग्राच्या बाबतीत आत्मसंयमन करून लोकसंख्येवर हितकर दाब ठेविल्याखेरीज त्यांची स्थितिं सुधारण्यास दुसरा मार्गाच नाही. परंतु या बाबतीत मजूरलोक अगदीं बेफिकीर असतात व भराभर लग्नें करून लोकसंख्या वाढवितात व आपल्याच मजुरीच्या चढाओढींत आपल्या हातानें भर घालतात. हें कृत्य आपल्या हातानें आपल्या पायावर धोंडा ओढून घेण्यासारखें आत्मघातकी आहे. तेव्हां मजुरांची दैन्यावस्था ही स्वयंकृत आहे. कारण ते अविचारानें लग्नें करून लोकसंख्येंत भर घालतत; असें मिल्लनें मोठ्या जोरानें प्रतिपादन केलें आहे. तेव्हां मजुरांची स्थिति सुधारण्यास त्यांच्यामध्यें वरिष्ठ वर्गाप्रमाणें अशी भावना उत्पन्न झाली पाहिजे कीं, आपल्या मुलांबाळांचें संगोपन करण्याचें सामर्थ्य येण्यापूर्वी लग्न करणें हें मोठे सामाजिक पाप आहे.
 या कल्पनेपासून अभिमत अर्थशास्त्रज्ञ दुसरें एक अनुमान काढतात; तें अनुमान संपाच्या फोलपणाबद्दल होय. त्याचें ह्मणणें हें कीं, मजुरीफंडाच्या कल्पनेवरून संपाचा फोलपणा उघड होतो. संपाचा उद्देश पुष्कळ वेळां मजुरी वाढविण्याचा असतो; परंतु जोपर्यंत देशांतील भांडवल व लोकसंख्या यांमध्यें फरक झालेला नाहीं, तोंपर्यंत मजुरीच्या सरासरीच्या सामान्य दरांत फरक होणें शक्यच नाहीं. कारण संपानें जर एका धंद्यांतील लोकांची मजुरी वाढली तर दुस-या धंद्यांतील मजुरी कमी झालीच पाहिजे. म्हणजे एकंदरीत संप मजूरवर्गाच्या हिताचे विघातक असतात. परंतु या विषयाचा पुढें एका भागांत स्वतंत्र विचार करावयाचा आहे,तेव्हां सध्यां इतकें विवचन बस्स आहे.
 या वादांचे सार तीन विधानांत आहे असें वर दाखविलेंच आहे. या प्रत्यक विधानांवर या उपपत्तीच्या विरोधकांनीं आक्षेप आणलेले आहेत.पहिलें विंधान म्हणजे मजुरी देण्याकरितां भांडवलाचा कांहीं एक भाग प्रत्येक देशांत अलग राखलेला असतो व तो बिनअट खर्च होतोच हें होय, परंतु हें म्हणणें खरें नाहीं.कारखानदाराजवळ भांडवल असलें म्हणजे त्यानें तें मजुरींत खर्च केलेंच पाहिजे असें नाही.संपत्तीच्या उत्पादनानें आपल्यास फायदा होईल अशी अटकळ असली तरच कारखानदार मजुरीत आपलें भांडवल खर्च करील.फायदा होणें हें