Jump to content

पान:सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



देशात शांतता राखणे, शत्रूपासून प्रजेचे रक्षण करणे ही सरकारची प्रमुख कामे होती. सर्व जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडमध्येही हीच स्थिती होती. त्या काळात इंग्लंडमध्ये सरकार शिक्षणावर छदामही खर्च करत नव्हते. सर्वत्र शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ होते; पण त्यात श्रीमंत अन् सरदारांच्या मुलांसाठी मोठे शुल्क घेऊन शिक्षण दिले जाई. (घाटे, १९६१, २८४-५) हिंदुस्थानाती पंतोजीच्या अशाच शाळा होत्या. श्रीमंत आणि मोठ्यांची मुले इथे शिकत. या परिस्थितीत १८५१ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढणारे जोतिबा फुले हे काळाच्या पुढे दृष्टी असलेले समाजपुरुष होते.
 महात्मा फुल्यांनी स्वत:च्या खर्चाने मुलींसाठी शाळा सुरू केली. या काळात पुणे-मुंबईत उच्चवर्णीय व श्रीमंतांसाठी कॉलेजशिक्षण सुरू झाले होते; पण गरिबांना इथे संधी नव्हती. विद्या सामान्य वर्गाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत नव्हती. सामान्यांच्या शिक्षणाचा विचार करण्यासाठी १८८२ साली हंटर कमिशन नेमले गेले. या कमिशनपुढे साक्ष देताना समाजातील एक वर्ग म्हणत होता, शहरातील उच्चवर्गीय वर्गाला प्रथम इंग्रजीतून शिक्षण द्यावे; ते शिकल्यानंतर खेड्यातील बहुजनांना निदान बारा वर्षांपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा."

 इंग्लंडमध्येही १८८२ पर्यंत सरकारी खर्चाने सामान्यांना शिक्षण मिळत नसे. त्या सुमारास पार्लमेंटमध्ये गरिबांचा कैवार घेणारा एक वर्ग सरकारच्या खर्चाने सगळ्यांना शिक्षण मिळावे

सयाजीराव गायकवाड आणि शाहू छत्रपती / ११