पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अभाविपचा खंदा कार्यकर्ता प्रवीण, मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या Reason, Romanticism & Revolution 'कारण क्रांती आणि प्रेरणा' या तीन 'R' मध्ये डुबक्या घेण्याचा प्रयत्न करीत होता. अर्थात आरएसएस, जनसंघ, विहिंप यांच्या वेटोळ्यात अडकलेला सुधीर प्रस्तावनेच्या पल्याड फारसा जाऊ शकला नाही. पण उत्कृष्ट वक्तृत्व, शब्दांवरची पकड आणि भावनांना हात घालणारा ठाम... काहीसा कोरडा आवाज, यांच्या आधारावर तो त्याला न कळलेल्या विषयालाही निर्भिडपणे हात घाली. आणि अशी खुमासदारपणे मांडणी करी की श्रोत्यांनी भारावून जावे. अमनने हे पुस्तक पूर्णपणे पचवले होते. सुधीर त्या दिवशी या डाव्या विचारांची मांडणी करणार होता हीच आगळी बात होती. म्हणून या विषयावर बोलण्याची संधी त्याला एकमताने दिली होती. रोज रात्री एकेकजण अभ्यास विषय मांडीत असे. नंतर प्रश्न विचारले जात. प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने अमन पुढ्यात जाऊन बसला होता. पण प्रविणने कटाक्षाने त्याला टाळले. अमन जाम वैतागला. पण त्याच्या मांडणीमुळे श्रीनाथच्या मनात मानवेन्द्र नाथांचे साहित्य वाचण्याची ओढ मात्र निर्माण झाली.

 मार्क्सच्या साम्यवादाच्या मांडणीपेक्षा माओची मांडणी सामान्य आणि मोठ्या संख्येने असणाऱ्या छोटया शेतकऱ्यांना न्याय देणारी, नवी उभारी देणारी ठरेल असे त्याला वाटे. मानवेन्द्र नाथांच्या मांडणीत व्यक्ती आणि तिचे स्वातंत्र्य यांना मध्यवर्ती स्थान होते. समाजविकास साधतांना जर स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य यांचा प्रत्यक्ष अनुभव सर्वसामान्य व्यक्तीला येत नसेल तर ती प्रगती, ते स्वातंत्र्य भासमय होय. ही त्यांची ठाम आणि मध्यवर्ती भूमिका. त्यांच्या मते आर्थिक लोकशाही आली नाही तर राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापितच होऊच शकत नाही. श्रीनाथने मानवेन्द्रनाथांच्या विचारांकडे वळण्याचे श्रेय मनोमनी सुधीरलाच देऊन टाकले. मानवेन्द्रनाथांची काही पुस्तके अनूला घेऊन येण्यास लिहिण्याचे ठरवले. पत्रही पोस्टात पडले. आणि दुसऱ्या दिवशी जेलर साहेब त्याला चार दिवसांची पॅरोल मिळाल्याची खबर घेऊन आले. ही बातमी ऐकून श्रीनाथ गोंधळून गेला. गेल्या चौदा महिन्यात एस्टीचे दर्शनही झालेले नव्हते. शिवाय इथून निघायचे म्हणजे उद्या सकाळी? त्याने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले सकाळचे नऊ वाजलेले. नाशिकडून अंब्याला जाणारी एस्टी एकच. ती सकाळी सहालाच निघून गेली असणार. क्षणभर वाटले इथेच फतकल मारून बसावे. लोळावे. त्या एस्ट्या बदला.. बारा तासांचा प्रवास... जीव टोकदार सुईवर तोलावा तसेच काहीसे. एवढ्यात अमन दिसला. त्याच्यापर्यंत बातमी पोचली होती. त्याची बडबड सुरु झाली.


शोध अकराव्या दिशेचा / ९१