पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणारी या तहानलेल्या मातीचे उजाड कोरडे डोळे आणि उत्तरेतल्या नद्यांचे पूर ...वाहून जाणारी माणसे, जमीन सतत स्वप्नात येतात. ते पाणी तर आपल्या भागात येणे अशक्यच पण आपल्या भागातल्या कोरड्या विहिरी कधी भरणार? जीवघेणा दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलाय का? पण हे 'अंधारयुग' संपणार आहे ना? ते बाईच जाणे आणि नियती जाणे!
 आता सारचे मिसा कैदी कंटाळले आहेत. शासनाने एक नवा रेशमी फास टाकला आहे. अनेक जण त्यांत अडकत आहेत. मिसाकैद्याने लिहून द्यायचे की, 'मी गैरसमजुतीने आणीबाणीला विरोध केला. मला अनुशासन मान्य आहे.' लिहा आणि सुटा. कधीतरी केव्हातरी लहानपणी शाखेत गेलेली माणसं. कधी मोर्चात वा मिरवणुकीत मिरवली असतील वा दसऱ्याच्या बँडपथकात ढोल बडवला असेल. पण मुळात सारीच माणसे साधीसुधी आणि संसारमग्न. ती या फतव्यात अडकली. युक्रांद, समाजवादी यात फारसे अडकणार नाहीत याची शासनाला कल्पना होतीच. म्हणून त्यांच्या गटावर सुरवातीला फासा टाकला तो काडी पैलवान वैजनाथ आणि आपल्या नरहरी अण्णांवर. स्वभावाने आणि परिस्थितीने गरीब. न शिकलेले. पण ते काय बधतात? खरे वीर तेच. त्या दिवशीच्या सायंकाळच्या बौद्धिकात बापूंनी कणखर पण गदगदलेल्या आवाजात आम्हा सर्वांच्याच मनातली कृतज्ञता नोंदवली. 'एके काळी मला एस्सेमकडून प्रेरणा मिळाली होती. पण वैजनाथ, नरहरीअण्णा, आज मात्र माझ्या निराशेने पिचलेल्या मनाला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे.'
 गेल्या चार दिवसात बारा जणांना चारचार दिवसांचा पॅरोल मिळालाय. मीही अर्ज केलाय. बघू. पण आजकाल बाहेरची बसंती हवा इथवर पोचू लागलीय. तुम्ही सगळे मला भेटता. बकील भाईंच्या पत्नी - भाभीजी, श्रीकांत दादा येतात. भेटून जातात. पण गांव, त्यातले रस्ते, माणसं, ओळखीची घरं... गल्ल्या... परिसर. यांनाही पहावेसे वाटते. 'माणदेशी माणसं' शिकवतांना साधुगुरुजी सांगत की गावालाही चेहेरा असतो. आज पटतंय ते...बाई नि काकाजींची खूप खूप आठवण येते. त्यांना प्रणाम. ईरा जनकला आशिर्वाद.
 खूप खरडतोय मी. कंटाळलीस? थांबतो इथेच."

 श्रीनाथने पत्र बंद केले. आणि अमनकडे टाकायला देण्यासाठी तो खोलीच्या बाहेर आला.
 आज अमन, बन्सीधर, अशोक यांच्या पोटात आणि छातीत दुखणार आहे.


शोध अकराव्या दिशेचा / ८९