पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सगळी फैय्यर जयवंतीच्या पुलावरच्या दोन्ही कठड्यांवर बसली होती. मनी, रेखा यांच्या सोबत आज अनूही आली होती. इरा, जनकची आजी आल्याने अनूलाही येणे जमवता आले होते. सोबत दोन लाल झेंडे लावलेली निशाणे घेतली होती. काही खाजगी मोटारी, दोन एस.टी. बसेस पुढे सरकल्या आणि पाठोपाठ पहिला मासा गळाला लागला. लातूरच्या डेप्युटी इंजिनिअरची गाडी होती. आत दोन तीन स्त्रिया, चार मुले. गाडी अडवताच साहेब रूबाबात आतून उतरले. सुधीर, श्रीनाथ सारख्यांना पाहून इंग्रजीतून रूबाब दाखवू लागले. मग सुधीर आणि श्रीनाथनेही गावरान नाटकी आवाजात विंग्रजी खर्डा मारायला सुरुवात केली. बाप्पा देशमुख पुढे झाले आणि झूकून नमस्कार करीत विनंती केली.
 "साहेब, वैनी ताई… मुलांना आमचे सैनिक एसटीत जागा मिळवून बसवून देतील. तुमच्या गाडीचं लॉगबुकही आम्ही पाहणार आहोत. त्यात तुमचा जिल्हा पार करून परळीला जात आहात त्याची आणि जाण्याचे कारण याची नोंद केली आहे का? साहेब नाराज होऊ नका. एका भारतीय नागरिकाची नम्र विनती आहे ही."
 साहेब खजील झाला. 'सॉरी' म्हणत त्याने ड्रायव्हरला गाडी मागे फिरवायला लावली. संध्याकाळपर्यंत बेचाळीस गाड्या माघारी पाठवल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी दैनिक मराठवाड्याच्या पहिल्या पानावर बातमी झळकली. "महाशिवरात्रीच्या दिवशी परळी येथे वैद्यनाथच्या दर्शनासाठी शासकीय गाड्यांतून सहकुटुंब निघालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना अंबाजोगाईतील झुंजार तरूणांनी माघारी पिटाळले…"
 १९७२ ते १९७५ चे ते मंतरलेले दिवस. प्रत्येक क्षणी बहरत जाणारे, संघर्षासाठी उर्जा देणारे. २४ एप्रिल १९७४ चा दुष्काळ विरोधी मोर्चा, गावातल्याचे नव्हे परसिरातील अनेकांच्या मनात नेहमीच ताजा राहील असा. हजारो स्त्री पुरुष भाकऱ्या बांधून मोर्चात सामिल होण्यासाठी आले होते. बदलाव संघटनेने पिठलं नि मिरचीचा ठेसा पुरवला होता.

'हाताला काम द्या, पोटाला भाकर द्या
जनावरांना चारा द्या, तहानलेल्या माणसांना
तहानलेल्या जमिनीला पाणी द्या पाणी द्या.'

ही त्यांची मागणी होती. गेल्या वर्षात डोंगरातल्या गावाची लोकसंख्या अर्ध्यावर आली होती. हजारो कुटूंबे पुणे, मुंबई, सुरत वगैरे भागात चंबुगबाळ बांधून घर...शेत वाऱ्यावर टाकून निघून गेली होती. दहाबारा हजारांच्या मोर्चात महिला तीन चार हजार


शोध अकराव्या दिशेचा / ६६